राजस्थान आणि उत्तर प्रदेशसह विविध राज्यांतील नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आलंय. काँग्रेस पक्षाच्या संघटनेत नवीन टीम तयार करण्याचे प्रयत्न आता तीव्र झाले आहेत. देशरात पक्षात मोठी उलटफेर केली जाणारी आहे. काही दिवसापूर्वीच सहा राज्याच्या नव्या प्रभारींची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता AICC अखिल भारतीय काँग्रेस समितीच सचिव नियुक्त केले जाणार आहेत. या नियुक्तीसाठी १०० हून अधिक संभाव्य नेत्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या नेत्यांच्या मुलाखतींची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस (संघटना) के. सी. वेणुगोपाल यांच्यासमवेत संभाव्य उमेदवारांशी स्वतः चर्चा करतील. राजस्थान आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. तसेच, दिल्लीतील तीन नेत्यांनाही मुलाखतीसाठी बोलावण्यात आल्याचे वृत्त आहे.
पक्षीय सूत्रांनुसार, मुलाखतीची प्रक्रिया अनेक टप्प्यांत घेतली जाईल. यामध्ये संभाव्य नेत्यांचे संघटनात्मक अनुभव, राज्यातील त्यांची उपस्थिती, पक्षासाठी त्यांनी आतापर्यंत केलेले कार्य आणि भविष्यात संघटना बळकट करण्याची त्यांची क्षमता या निकषांवर मूल्यमापन केले जाणार आहे. काँग्रेसमधील राष्ट्रीय संघटनात्मक पदांवरील नियुक्त्यांच्या बाबतीत, केवळ राजकीय ज्येष्ठतेपेक्षा कामाचा अनुभव आणि तळागाळातील सक्रियता यांना आता महत्त्वाचे निकष मानले जात आहे.
पक्ष संघटनेला ‘निवडणूक मोड’मध्ये आणणार
काँग्रेस हायकमांड विविध राज्यांमधील पक्ष संघटनेला ‘निवडणूक मोड’मध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील असतानाच ही प्रक्रिया घडत आहे. शनिवारी पक्षाने सहा राज्यांमधील आपल्या प्रभारींच्या नियुक्त्यांमध्ये मोठा फेरबदल केला. पंजाबसाठी सचिन पायलट, आसामसाठी भूपेश बघेल आणि गुजरातसाठी रणदीप सिंग सुरजेवाला यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. सुखदेव भगत यांच्याकडे छत्तीसगडची, डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्याकडे महाराष्ट्राची आणि पी. व्ही. मोहन यांच्याकडे आंध्र प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आलीय. सुरजेवाला गुजरातसोबतच कर्नाटकचीही जबाबदारी सांभाळतील.
नवीन प्रभारींच्या निवडीवरून कोणाच्या कामावर विश्वास आहे, हे स्पष्ट होते. अलीकडील फेरबदलांमध्ये, पक्षश्रेष्ठींनी अशा नेत्यांवर विश्वास टाकला आहे ज्यांच्याकडे संघटना सांभाळण्याची क्षमता आणि निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांमधील आव्हाने पेलण्याची धमक आहे. यात सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे पंजाबची जबाबदारी सचिन पायलट यांच्यावर सोपवणे. राज्यातील पक्षसंघटनेतील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर, संघटना एकसंध करणे आणि आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी करणे ही जबाबदारी पायलट यांच्यावर सोपवण्यात आली आहे.










