करणीयमेत्तसुत्त म्हणजे मैत्री, सद्भावना आचरणात आणण्याचा धम्म मार्ग होय – कल्याणमित्र महेश कांबळे

0
22

मुंबई दि. ७ (रामदास धो. गमरे) “करणीयमेत्तसुत्त हे केवळ पठण करण्यासाठी असलेले सुत्त नाही, तर माणसाने स्वतःच्या जीवनात, कुटुंबात आणि समाजात कशा प्रकारे मैत्री, करुणा आणि मानवतेची भावना निर्माण करावी, याचे मार्गदर्शन करणारे अत्यंत महत्त्वपूर्ण सुत्त आहे. या सुत्ताचा अभ्यास करताना प्रत्येक गाथेचा वरवरचा अर्थ समजून न घेता त्या गाथेमध्ये आलेल्या प्रत्येक पाली शब्दाच्या मुळापर्यंत जाणे आवश्यक आहे. एखाद्या शब्दाचा अर्थ समजून घेताना त्याची विभक्ती कोणती आहे, त्याचे वचन काय आहे, लिंग कोणते आहे, त्याचे धातुरूप काय आहे अथवा त्या शब्दाची रचना कशी झाली आहे याचाही विचार करणे आवश्यक आहे कारण पाली भाषेतील एखाद्या शब्दाची व्याकरणदृष्ट्या योग्य समज झाली, तर त्या शब्दाचा खरा अर्थ आणि त्यातून व्यक्त होणारा आशय आणि बुद्धवचनाचा आशय समजून येतो.

या अभ्यासासाठी मी आचार्य बुद्धघोष यांनी रचलेल्या परमत्थज्योतिका अट्ठकथेचा विशेष आधार घेतला आहे. माझ्या मते करणीयमेत्तसुत्त समजून घेण्याचा खरा उद्देश केवळ प्राचीन पाली ग्रंथाचा अर्थ जाणून घेणे एवढाच नसावा. त्या गाथा आज आपल्या जीवनाशी काय बोलतात, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. आजच्या काळात आपण सर्वजण विविध प्रकारच्या तणावातून जात आहोत. कुटुंबांमध्ये मतभेद आहेत, नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे, समाजामध्ये असहिष्णुता वाढताना दिसते आणि अनेकदा माणूस माणसाकडे संशयाने, रागाने किंवा द्वेषाने पाहताना दिसतो.

अधिक वाचा  शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात ८३ तालुक्यांत २० दिवसांहून दीर्घकालीन पर्जन्यखंड; पुण्यातही या भागात ३८ दिवस पर्जन्यखंड

अशा परिस्थितीत करणीयमेत्तसुत्तातील मेत्ता हा विचार आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश देतो. मेत्ता म्हणजे केवळ कोणाबद्दल वरवर प्रेम व्यक्त करणे नव्हे तर मेत्ता म्हणजे सर्व प्राणिमात्रांच्या सुखाची इच्छा करणे, दुसऱ्याच्या दुःखाबद्दल संवेदनशील होणे, मतभेद असले तरी द्वेष न वाढवणे, मत वेगळे असले तरी माणुसकीचा संबंध न तोडणे आणि आपल्या मनात राग, द्वेष किंवा वैर निर्माण झाले तरी त्यावर विवेकाने आणि मैत्रीभावनेने विजय मिळवण्याचा प्रयत्न करणे. अनेक वेळा छोट्या गैरसमजांमुळे मोठे मतभेद निर्माण होतात, शब्दांमुळे नाती दुखावली जातात, अहंकारामुळे माणसे एकमेकांपासून दूर जातात अशा वेळी जर आपण मेत्तेचा दृष्टिकोन स्वीकारला तर आपण दुसऱ्या व्यक्तीला केवळ त्याच्या एका चुकीवरून मोजणार नाही, तर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू, प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करू, रागाने बोलण्यापूर्वी आपल्या शब्दांचा परिणाम काय होईल याचा विचार करू. वेगळा विचार म्हणजे द्वेष करण्याचे कारण नाही, करणीयमेत्तसुत्त आपल्याला शिकवते की, माणूस म्हणून आपण एकमेकांच्या अस्तित्वाचा आदर करायला शिकले पाहिजे, सामाजिक सलोखा, सहिष्णुता आणि मानवतावादी दृष्टिकोन यांचा पाया मेत्तेमध्येच आहे; म्हणूनच या सुत्ताचा अभ्यास करताना आपण शब्द, व्याकरण, अर्थ, अट्ठकथेतील आशय, गाथेचा व्यापक अर्थ आणि आधुनिक जीवनातील उपयोग हा क्रम लक्षात ठेवू आणि या क्रमाने अभ्यास केल्यास आपण केवळ पाली भाषा शिकत नाही, तर बुद्धांच्या विचारांची खोली समजून घेतो, करणीयमेत्तसुत्ताचा अभ्यास हा केवळ ग्रंथाचा अभ्यास राहणार नाही; तर तो आपल्या स्वतःच्या जीवनाला बदलणारा आणि अधिक सुंदर करणारा एक मार्ग ठरेल, करणीयमेत्तसुत्त म्हणजे मैत्री, सद्भावना आचरणात आणण्याचा धम्म मार्ग होय” असे प्रतिपादन वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आठवे पुष्प गुंफत असताना कारणीयमेत्तासुत्त या विषयावर बोलत असताना कल्याणमित्र महेश कांबळे यांनी केले.

अधिक वाचा  आंतरवली सराटीत ॲड. मंगेश ससाणेसह ओबीसी आंदोलकांच्या दडपशाहीचा तीव्र निषेध! एकाच राज्यात दोन न्याय दुजाभाव का?

बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे या प्रवचन मालिकेचे आठवे पुष्प कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात पार पडले, सदर प्रसंगी गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली तद्नंतर आसावरी जाधव यांनी आपल्या सुमधुर वाणीने सूत्तपठण व पूजापठण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार समितीचे सरचिटणीस मनोहर बा. मोरे यांनी आपल्या भारदस्त आवाजात लाघवी भाषाशैलीत केले तर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले, प्रास्ताविक सादर करताना “आपण सूत्तपठण व पूजा विधी नेहमीच करतो पण त्यासोबतच बावीस प्रतिज्ञांचे पठण करून कार्यक्रम सुरू करण्यात यावा” असे नमूद केले.

अधिक वाचा  FDA ची सर्वात मोठी कारवाई; ११ कोटींची औषधं जप्त, ६०७ उत्पादक आणि २,२९५ विक्री आस्थापनांची तपासणी २१ जणांना बेड्या

अध्यक्षीय भाषणात कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी प्रा. कल्याणमित्र महेश हरिश्चंद्र कांबळे यांनी करणीयमेत्तासुत्त या विषयावर बोलत असताना पाली व मराठी भाषेत जे विचार मांडले व त्याचा भावार्थ सर्वसामान्यांना ज्याप्रकारे साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

सदर प्रसंगी उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, एच. आर. पवार, सरचिटणीस राजेश घाडगे, अतिरिक्त चिटणीस श्रीधर साळवी, चिटणीस तुकाराम घाडगे, अनिरुद्ध जाधव, विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष तुळशीराम शिर्के, अतुल साळवी, निवडणूक मंडळाचे माजी अध्यक्ष मनोहर तांबे, महिला मंडळाच्या सचिव अंजलीताई मोहिते, सायली साळवी, जाधव आणि सहकारी, कार्यकारिणी, विविध शाखा, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, सदर कार्यक्रमास शिवडी गटक्रमांक १३ चे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीधर कांबळे आणि परिवार यांच्या वतीने अल्पोहार देण्यात आला, सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आणि उपस्थितांचे आभार मानून मनोहर बा. मोरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.