राज्यात गेल्या काही दिवसांपासून ओसरलेला पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पुढील दोन दिवस राज्यात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आज (ता. १२) पालघरसह ११ जिल्ह्यांना जोरदार सरी आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला असून, या भागांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला आहे. राजस्थानपासून मध्य प्रदेश, छत्तीसगडमार्गे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण कोकण आणि लगतच्या अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, दक्षिण कर्नाटक ते मन्नारच्या आखातापर्यंतही कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात त्याचा पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी (ता. ११) सकाळपर्यंत चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे १६.९ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदले गेले. पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे ३० मिलिमीटर पाऊस झाला.










