ग्रामस्थांनी स्मशानभूमीतच अनोखं ‘बॅनर’ लावले; दशक्रिया विधीत ‘पोकळ वावड्या’ नको; हवेलीतील स्तुत्य उपक्रम

0
55

गावात दशक्रिया विधी असला की, राजकीय नेत्यांची गर्दी… पोकळ भाषणबाजी…. वारेमाप स्तुतीसुमने….. याला लोक कंटाळलेले असतानाच आता एकमेकांची उणीदुनी काढत टीकाटिप्पणी केली जाते. या भाषणबाजीला कंटाळून उरुळी कांचन (ता.हवेली) येथील ग्रामस्थांकडून स्मशानभूमी परिसरात ‘भाषणबाजी बंद’चे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. दशक्रिया विधीला राजकीय नेत्यांची मोठी गर्दी होते. त्यामध्ये भाषणबाजी करत एकमेकांची उणीदुनी काढत टीकाटिप्पणी केली जाते. दशक्रिया विधीला उपस्थित असलेले सर्वसामान्य नागरिक, मृत व्यक्तीच्या कुटुंबाचे नातेवाईक, कुटुंब अक्षरशः या भाषणबाजीला कंटाळले आहेत. हे चित्र सर्रास पहावयास मिळत आहे. ही भाषणबाजी तातडीने थांबवावी, अशी मागणी या बॅनरवर करण्यात आली आहे.

अधिक वाचा  शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात ८३ तालुक्यांत २० दिवसांहून दीर्घकालीन पर्जन्यखंड; पुण्यातही या भागात ३८ दिवस पर्जन्यखंड

मयत व दहावा हा त्या कुटुंबांसह नातेवाईकांसाठी खूप मोठा दुःखाचा प्रसंग असतो. सर्वांनी श्रद्धांजली वाहून राजकीय फायदा घेण्यासाठी लोकांना वेठीस धरणे थांबवले पाहिजे. उपस्थित असलेल्या एका जेष्ठाने एकच श्रद्धांजली वाहून शेवट करत लोकांच्या भावनेशी खेळायचे बंद करावे. मयत आणि दहाव्यामधील भाषणे राजकीय पुढाऱ्यांनी बंद करून लोकांना सहकार्य करावे, असे बॅनर लिहिण्यात आले आहे. त्याखाली समस्त उरुळी कांचन ग्रामस्थ, असा देखील उल्लेख करण्यात करण्यात आला आहे. भाषणबाजीबाबत दशक्रियेसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर ऐकू येत आहे. त्यामुळे दशक्रिया विधी म्हटलं की, ती राजकीय नेत्यांची सभास्थळे झालेत का? हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  दुष्काळाचा मुद्दा मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा महत्त्वाचा, मुंबईला गणेशोत्सवात आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे

पूर्व हवेलीसह परिसरात दशक्रिया विधीचे कार्यक्रम म्हणजे राजकीय नेत्यांची सभास्थळे झालेली आहेत, असे पाहावयास मिळते. दशक्रिया विधी कोणाचाही असला, तर त्या कुटुंबाचे, मृत्यू झालेल्या व्यक्तीची माहिती देऊन सांत्वन करण्याऐवजी राजकीय नेत्यांची भाषणे लांबलचक, रटाळवाणी होत आहेत. राजकीय नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता भाषण करतो. परंतु, उपस्थित असलेले लोक मात्र खाली बसून त्यांची चक्क टवाळी करतात. खाली बसलेले वेगळ्याच गप्पा मारत असतात, हे वास्तव आहे. त्यामध्ये कोण कुणाचे ऐकतो, हेच कळत नाही. दरम्यान, दशक्रिया विधी कार्यक्रमात एक-दोन राजकीय व्यक्तींनी प्रतिनिधी स्वरूपात बोलणे उचित आहे. परंतु, अगदी दहा ते बारा जण बोलतात. ही भाषणबाजी कंटाळा आणणारी असते. त्यामुळे उपस्थित, मृत व्यक्तीचे कुटुंब, नातेवाईक अक्षरशः कंटाळतात. त्यामुळे नागरिक कसेबसे या दशक्रिया विधीला उपस्थिती दाखवतात.

अधिक वाचा  महापालिकेत पुन्हा ५०० सुरक्षा रक्षक भरती संख्या थेट २४१५ ; ‘वाट्या’साठी सत्ताधाऱ्यांत जुंपली; १३६ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च

याबाबत बोलताना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन म्हणाले, “दशक्रिया विधीत होणारी भाषणे कुठेतरी थांबली पाहिजे होती. अनेकदा दशक्रिया विधीत परिसरातील ठराविक 20 ते 25 पुढारी श्रद्धांजलीची भाषणे करतात. त्याच्या घरी गेले नाहीत, कधी अडचण विचारली नाही, कर्ज आहे की काय याची चौकशी केली नाही, कसलीही मदत करीत नाहीत. या भाषणबाजीला कंटाळून ज्याने कोणी हे बॅनर लावले त्यांचे आभार.