शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात ८३ तालुक्यांत २० दिवसांहून दीर्घकालीन पर्जन्यखंड; पुण्यातही या भागात ३८ दिवस पर्जन्यखंड

0
114

राज्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाने मोठी ओढ दिली असून, पिके बहरण्याच्या काळातच पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. दररोज २.५ मिलिमीटरपेक्षा कमी पावसाचा तांत्रिक निकष पाहता, राज्यातील चार विभागांमधील १९ जिल्ह्यांतील ८३ तालुक्यांमध्ये २० दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा दीर्घकालीन पर्जन्यखंड नोंदवला गेला आहे.राज्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने, विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक तीव्रता जाणवत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, ३० दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाचा खंड पडलेल्या २३ तालुक्यांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर (घोडनदी) आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एक ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सर्वाधिक म्हणजेच तब्बल ३८ दिवसांचा सलग पर्जन्यखंड नोंदवला गेला आहे.

अधिक वाचा  पुणेरी पोरं ऐकणार नाय! ज्यांचा विरोध त्यांनाच DJ वर नाचवलं, दहीहंडीत सुपरस्टार ‘बापट’ नाचले, पुणेरी कल्पनशक्तीचे धुमारे!

त्यापाठोपाठ बारामती, दौंड, पुरंदर (पुणे), खामगाव (बुलढाणा), नांदगाव, येवला (नाशिक), आटपाडी (सांगली), आणि माण, फलटण (सातारा) या तालुक्यांमध्ये सलग ३७ दिवस पाऊस पडलेला नाही. तसेच संगमनेर, देवळाली, कळवण येथे ३५ दिवस, तर गेवराई (बीड), पैठण (छत्रपती संभाजीनगर), परांडा (धाराशिव), शेवगाव, इंदापूर व माळशिरस येथे ३४ दिवसांचा प्रदीर्घ खंड नोंदवला गेला आहे.बाधित ८३ तालुक्यांचे खंडाच्या कालावधीनुसार वर्गीकरण केले असता, ४२ तालुक्यांमध्ये २० ते २५ दिवसांचा खंड पडला आहे. यामध्ये मुख्यतः विदर्भातील अकोला, अमरावती, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यांचा मोठा भरणा आहे. २५ ते ३० दिवसांचा खंड असलेल्या १८ तालुक्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ, अमळनेर, रावेर, धुळे आणि मराठवाड्यातील परळी (बीड) या तालुक्यांचा समावेश होतो. तर २३ तालुक्यांमध्ये ३० दिवसांपेक्षा जास्त काळ पाऊस गायब राहिला आहे.

अधिक वाचा  आंतरवली सराटीत ॲड. मंगेश ससाणेसह ओबीसी आंदोलकांच्या दडपशाहीचा तीव्र निषेध! एकाच राज्यात दोन न्याय दुजाभाव का?

उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुक्यांना झळ

उत्तर महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यांतील ३१ तालुके पावसाच्या खंडाने प्रभावित झाले आहेत. यामध्ये जळगाव (१३ तालुके), अहिल्यानगर (नऊ), नाशिक (सात) आणि धुळे (दोन) यांचा समावेश आहे.

विदर्भातील सहा जिल्ह्यांतील २० तालुके बाधित असून यात बुलडाणा (सात), अकोला (पाच), अमरावती (चार), वाशीम (दोन), वर्धा (एक) व नागपूर (एक) या जिल्ह्यांचा समावेश आहे.मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील १७ तालुक्यांमध्ये पावसाने ओढ दिली असून बीड (सहा), छत्रपती संभाजीनगर (चार), धाराशिव (चार), परभणी (दोन) आणि जालना (एक) येथे भीषण परिस्थिती आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांतील १५ तालुके पुणे सहा, सोलापूर चार सातारा चार व सांगली एक पर्जन्यखंडाच्या तडाख्यात सापडले आहेत.

अधिक वाचा  नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरेपाटील यांनी कुणबी दाखला वापरला: अंतरवालीत ओबीसी आंदोलनात खळबळजनक दावा

भूजल पातळीत घट

ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाने मारलेली दडी आणि वाढत्या उकाड्यामुळे भूजल पातळी घटू लागली असून, अनेक ठिकाणी विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, बाजरी आणि कधान्यांची पिके हातातून जाण्याची भीती व्यक्त होत असून, शासनाने तातडीने उपाययोजना आणि मदत जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.