महाराष्ट्रात पुढचे ४ दिवस पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज; कोयना, अलमट्टीतून विसर्ग वाढला

0
3

राज्यातील बहुतांश भागात पावसाने काहीशी उघडीप दिली असली, तरी कोकण आणि पश्चिम घाटात पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारी (ता. ४) भिरा येथे सर्वाधिक ३०० मिलिमीटर, तर महाबळेश्वर येथे २२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून उजनी, कोयना, अलमट्टीसह अनेक धरणांतून विसर्ग सुरूच आहे.

मराठवाडा, विदर्भ, पूर्व महाराष्ट्र आणि खानदेशात पावसाचा जोर कमी झाला असून अवघ्या ३१ मंडळांत पावसाची नोंद झाली. दुसरीकडे, हवामान विभागाने पुढील तीन ते चार तासांत मुंबईसह कोकण, घाटमाथा आणि अंतर्गत महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

अधिक वाचा  शासनस्तरावर एकल मातांना मदतीचा प्रस्ताव विचाराधीन; याच भावनेतून कोथरुड मध्ये सेवा कार्ये सुरु: चंद्रकांतदादा पाटील

मुळशी, ताम्हिणी, लोणावळा परिसरांसह पश्चिम घाटात दमदार पावसामुळे अनेक प्रमुख धरणांमधून विसर्ग सुरूच असून उजनी, कोयना, अलमट्टी, दौंड, राजापूर बंधारा अशा ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असला तरी राज्याच्या उर्वरित भागांत पावसाची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे अनेक भागांत तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील धरणक्षेत्रात झालेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक सुरूच आहे.

उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ९७.४६ टक्के, जायकवाडीचा ८९.४४ टक्के, तर कोयना जलाशयाचा उपयुक्त साठा ८७.१३ टक्के झाला आहे. पुणे विभागातील पानशेत, खडकवासला, भाटघर यांसह अनेक धरणे पूर्ण क्षमतेच्या जवळ पोहोचली असून चासकमान, पवना, वीर आणि मुळशी धरणांतील साठाही समाधानकारक आहे.राज्यातील प्रमुख धरणांमधून नदीपात्रात विसर्ग कायम आहे.

  • उजनी धरणातून ७१ हजार ६०० क्युसेक,
  • दौंड येथे भीमा नदीत ६८ हजार ८९७ क्युसेक,
  • कोयना धरणातून २४ हजार ९०८ क्युसेक,
  • घोड धरणातून २५ हजार क्युसेक,
  • खडकवासला धरणातून १८ हजार ४१४ क्युसेक,
  • वीर धरणातून १३ हजार ७१६ क्युसेक,
  • मुळशी धरणातून ९ हजार ९०० क्युसेक,
  • भाटघर धरणातून ६ हजार ५१५ क्युसेक,
  • पानशेत धरणातून ६ हजार ११६ क्युसेक,
अधिक वाचा  भाजप सत्ताधारी तरी प्रशासकीय अंकुश नाही वर्गीकरणाचा वादंग अधिकाऱ्यांची पाठराखण थांबवा मुख्य पदाधिकाऱ्यांवर नाराजी

तर अलमट्टी धरणातून १ लाख ४९ हजार ९८३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी, तापी आणि कृष्णा खोऱ्यातील अनेक धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.