काश्मीर दहशतवादी हल्ला राज ठाकरे संतप्त, धर्म विचारला ही मुजोरी? ” पुढच्या १० पिढ्यांना सुद्धा थरकाप उडायला हवा…”

0
56

काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारची सकाळ श्रीनगरमध्ये प्रचंड तणावपूर्ण वातावरणात सुरू झाली. बाजारपेठा ओस पडल्याचं दिसून येत असून अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी श्रीनगर बंदची हाक दिली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहशतवादी हल्ल्यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करा की पुढच्या १० पिढ्यांना ते आठवून त्यांचा थरकाप उडाला पाहिजे अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

राज ठाकरेंची पोस्ट काय?

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली… ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील.

अधिक वाचा  शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात ८३ तालुक्यांत २० दिवसांहून दीर्घकालीन पर्जन्यखंड; पुण्यातही या भागात ३८ दिवस पर्जन्यखंड

आता असा बंदोबस्त करा की…

केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा… १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला… यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत… केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्यांना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

या देशात आमच्या हिंदूंच्या अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र तुमच्या अंगावर जाऊ- राज ठाकरे

अधिक वाचा  लालबागचा राजा 2026 चं प्रथम दर्शन; पहा मोहक रूप

या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली… एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला… ही तुमची मुजोरी ? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ… या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे…

केंद्र सरकार कठोर होईल यात माझ्या मनात शंका नाही-राज ठाकरे

केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल ? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी….हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये… आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल.

अधिक वाचा  बंगाल उपसागर कमी दाब पट्टा कायम राज्यात १२ जिल्हे वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज अन् पोषक वातावरण

राज ठाकरे

अशी पोस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली असून दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडला आहे आणि ते भारतात परतले आहेत. आज केंद्राची उच्च स्तरीय बैठक घेतली जाईल. गृहमंत्री अमित शाह यांनीही आम्ही हल्लेखोरांना सोडणार नाही असं म्हटलं आहे.