दुसऱ्या टप्प्यात राज्यातील आठ मतदारसंघात 352 उमेदवारांपैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध

0
47

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील आठ मतदारसंघात एकूण 352 पैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पाहिल्यास बुलढाणा 25, अकोला 17, अमरावती 56, वर्धा 26, यवतमाळ-वाशिम 20, हिंगोली 48, नांदेड 66, आणि परभणी 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील आठ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 8 एप्रिल 2024 ही असून, या मतदारसंघांसाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होईल.

अधिक वाचा  राज्यातील डीजेमुळे थेट मंत्र्यालाही 40 टक्के बहिरेपण अन् भावाचा डीजेमुळे मृत्यू तरीही सरकारकडून धोरणात्मक निर्णय नाही

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. यासाठी मराठवाडा व विदर्भातील मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली , नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. विशेष म्हणजे उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सायंकाळपर्यंत एकूण 352 उमेदवारांचे 477 अर्ज दाखल झाले होते. पण एकूण 352 पैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज दाखल झाले होते?

दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुलढाणा 29 उमेदवारांचे 42 अर्ज, अकोला 28 उमेदवारांचे 40, अमरावती 59 उमेदवारांचे 73, वर्धा 27 उमेदवारांचे 38, यवतमाळ- वाशिम 38 उमेदवारांचे 49, हिंगोली 55 उमेदवारांचे 78, नांदेड 74 उमेदवारांचे 92 आणि परभणी 42 उमेदवारांचे 65 अर्ज दाखल झाले होते.

अधिक वाचा  ‘एसआयआर’साठी दोन लाख मतदारांना आजपासून नोटिसा; या कागदपत्रांची पडताळणी २ महिन्यांत २ लाख सुनावण्या आव्हान

उमेदवारी अर्ज दाखल करताना घ्यावयाची दक्षता

इच्छुक उमेदवार व समर्थकांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात फक्त तीन वाहने आणता येणार आहेत.
यासाठी पोलिस अधिकारी त्या ठिकाणी शंभर मीटर परिसराची निश्चिती ( मार्कींग) आधीच केली जाईल.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करणारे उमेदवार आणि त्यांच्या समवेत चार व्यक्ती अशा एकूण पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात एकाच दाराने प्रवेश देण्यात येईल.
या संपूर्ण प्रक्रियेचे व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येईल.
निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी पोलिस विभागाकडून सहायक पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून, पोलिस नोडल अधिकारी या ठिकाणी आवश्यक पोलिस बंदोबस्तासह उपस्थित राहतील.

अधिक वाचा  कोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे यांची ही तयारी अन् मुंबईतील आंदोलनाबाबत घेतला ”हा” मोठा निर्णय