मराठा आरक्षणावर पुण्यात खलबतं! फडणवीसांच्या उपस्थितीत उपसमितीची बैठक; १२ सप्टेंबरपूर्वी तोडगा काढण्यासाठी सरकारची धावपळ

0
47

मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या संभाव्य आंदोलनाची तयारी सुरू असतानाच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने पुण्यात बैठकांचा धडाका लावला. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने पुण्यात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपसमितीच्या सदस्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. आंदोलनाचा तिढा वाढण्यापूर्वीच तोडगा काढण्यासाठी सरकारच्या पातळीवर हालचालींना वेग आला आहे.

गणेश कला क्रीडा मंच येथे सोमवारी भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंतही येथे दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उपसमितीच्या सदस्यांसोबत सामंत यांची बैठक झाली.

अधिक वाचा  राज्यात जोरदार पाऊस बरसणार; नदी-नाले एक होणार, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

बैठकीनंतर सामंत आणि लाड यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यातील ५८ लाख कुणबी नोंदी, गॅझेटिअरची अंमलबजावणी आणि मराठा समाजाच्या अन्य मागण्यांवर सरकारच्या पातळीवर धोरणात्मक चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आंदोलकांशी चर्चा करणार आहे. मात्र, या बैठकीतील नेमक्या निर्णयांबाबत सरकारकडून अधिक माहिती देण्यात आली नाही.

१२ सप्टेंबरपूर्वी तोडग्याची धडपड

मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात मोठे आंदोलन झाल्यास कायदा-सुव्यवस्थेसह नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १२ सप्टेंबरपूर्वी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजासोबतच ओबीसी आणि धनगर समाजाच्या आंदोलकांशीही संवाद साधण्याची सरकारची भूमिका आहे.

अधिक वाचा  दुष्काळाचा मुद्दा मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा महत्त्वाचा, मुंबईला गणेशोत्सवात आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे

मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घेताना ओबीसी आरक्षणाला धक्का दिला जाणार नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले. ‘ओबीसींचा एक टक्काही हिस्सा कमी न करता मराठा समाजाच्या मागण्यांवर संविधानिक चौकटीत तोडगा काढला जाईल,’ असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जरांगे पाटील यांनी कोणत्याही अफवा अथवा गैरसमजांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

जात पडताळणीतील गैरप्रकारांची चौकशी

जात पडताळणी प्रक्रियेतील गैरप्रकारांबाबत मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या तक्रारींची चौकशी सुरू असून, दोषी अधिकारी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला.जात पडताळणीची प्रक्रिया ऑनलाइन आणि अधिक पारदर्शक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांची गैरसोय आणि पिळवणूक होऊ नये, यासाठी प्रक्रियेत सुधारणा करण्यात येणार असल्याचे लाड यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  राज्यात ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरुवात, शेतकरी आणि उद्योगाच्या हिताचा समतोल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

मराठा क्रांती मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गणेश कला क्रीडा मंच येथे भेट घेतली. मराठा समाजाला ‘मराठा’ म्हणून मिळालेले ‘एसईबीसी’ आरक्षण कायम ठेवावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांचा प्रलंबित व्याज परतावा तातडीने एकरकमी द्यावा, तसेच कमी शुल्काच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना जात प्रमाणपत्र पडताळणीतून वगळावे, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

यावेळी राजेंद्र कुंजीर, अनिल ताडगे, धनंजय जाधव, सचिन आडेकर, अमर पवार, राकेश गायकवाड, किशोर मोरे, प्रशांत कुंजीर, द्वारकेश जाधव आदी उपस्थित होते.