Home Blog Page 169

संतोष देशमुख हत्या प्रकरणी पहिला जामीनही मंजूर; सीआयडीने आरोपपत्रातून याला वगळल्याने झाली कार्यवाही

0

संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर झाला आहे. आरोपी सिद्धार्थ सोनवणेला केज कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 25 हजारांच्या जातमुचालक्यावर जामीन मंजूर केला आहे. सिद्धार्थ सोनवणेविरोधात पुरावे नसल्याने सीआयडीने आरोपपत्रात त्याच्या नावाचा समावेश केला नव्हता. सीआयडीने आरोपपत्रातून सिद्धार्थ सोनवणेला वगळल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आलाय. मकोका गुन्ह्यातला हा पहिलाच जामीन मंजूर झाला आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाविरोधात बीडसह राज्यभरात मोठ आंदोलन सुरु आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते.

राज्य सरकारने या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी आणि एसआयटीची स्थापना केली होती. मागच्या आठवड्यात सीआयडीने या प्रकरणी 1800 पानाच आरोपपत्र दाखल केलं. त्यानुसार वाल्मिक कराड या हत्येचा मास्टरमाइंड असल्याच सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. खंडणी उकळण्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असं सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विविध नेत्यांनी, ग्रामस्थांनी अशाच प्रकारचे आरोप केले होते. आरोपपत्रात सुद्धा हेच नमूद असल्यामुळे त्यावर आता शिक्कामोर्तब होत आहे. सीआयडीच्या आरोपपत्रानुसार वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येमागचा मुख्य मास्टरमाइंड आहे.

कोण-कोणावर मकोका अंतर्गत कारवाई?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली होती.

काय आहे मकोका कायदा?

महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम अ‍ॅक्ट म्हणजेच मकोका कायदा. संघटीत गुन्हेगारी रोखण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात 1999 साली हा कायदा मंजूर झाला. पूर्वी असलेल्या टाडा कायद्यात काही बदल करुन नव्या स्वरुपात हा कायदा आणला गेला. खंडणी वसुली, हप्ता वसुली, अपहरण, हत्या, सामूहिक गुन्हेगारी म्हणजे संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मकोका कायदा लावला जातो. हा कायदा लावल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळत नाही. मकोका कायदा एकापेक्षा जास्त आरोपी टोळी म्हणून गुन्हे करत असतील तेव्हा लावला जातो. मकोका कायद्यात फरार आरोपीची  संपत्ती जप्त करता येते. त्याची बँक खाती गोठवता येतात. मकोका लागल्यानंतर विशेष कोर्टात खटला चालतो.

सरकार स्थापनेनंतरच पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; ‘हे विसंवादी सरकार’ विरोधकांची भूमिका? कोणत्या घोषणा?

0

मुंबई: विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज, सोमवारपासून मुंबईत सुरुवात होणार आहे. राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होणार असून पहिल्याच दिवशी २०२४-२५च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार असल्याने, सत्ताधारी आणि विरोधकांचे लक्ष या पुरवणी मागण्यांवर असणार आहे. मुख्य म्हणजे, पुरेसे संख्याबळ हातात नसतानाही राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरील अत्याचार आणि मंत्र्याच्या राजीनाम्याबाबत विरोधक नेमकी कोणती भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता आहे.

मुंबईतील विधानभवनात सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त राखण्यात आला आहे. याशिवाय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळ सचिवालयाची सर्व तयारीही पूर्ण झाली आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्चपर्यंत सुरू राहणार असून सोमवारी १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून कोणत्या घोषणांचा पाऊस पाडण्यात येतो, हा औत्सुक्याचा विषय आहे.

दरम्यान, राज्याची आर्थिक स्थिती, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा, बीड हत्याकांडमुळे चर्चेत आलेले मंत्री धनंजय मुंडे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारखे मुद्दे हाताशी असताना विरोधक नेमकी कोणती भूमिका मांडतात, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीकडे पुरेसे असे संख्याबळ नाही, त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची आणि सभागृहातील भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

‘हे विसंवादी सरकार’

हे सरकार शेतकरीविरोधी असून, तीन बाजूंना तीन तोंडे असणारे हे विसंवादी सरकार असल्याची खरमरीत टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. ‘कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आढळूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. स्वारगेट एसटी बस डेपोतील तरुणीवर बलात्काराच्या घटनेवर निषेध करण्याऐवजी गृह राज्यमंत्र्यांनी असंवेदनशील वक्तव्य केले असून, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही,’ असे दानवे म्हणाले. बीड प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडला तुरुंगात व्हीआयपी सुविधा दिली जाते. वाहनांच्या नवीन प्लेट नंबरसाठी इतर राज्यांच्या तुलनेत आकारण्यात येत असलेले जादा शुल्क, कृषी विभागात बदल्यांसाठी झालेला भ्रष्टाचार, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाला परत आणण्यासाठी सरकारने दाखवलेली तत्परता, लाडकी बहीण योजनेत सुरू असलेली कपात, लाडक्या भाऊ योजनेतील लाभार्थ्यांनाही पैसे न मिळणे यावरून दानवे यांनी सरकारवर टीकास्र सोडले.

अर्थ नसलेले अधिवेशन

हे अर्थ नसलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. केलेल्या तरतुदी, दिलेला निधी व झालेला खर्च यांची सांगड घातल्यास हा ढोबळ अर्थसंकल्प असणार आहे. गेल्या वेळी ज्याप्रमाणे आकडेवारी फिरवून सांगण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न यंदाही होईल. या सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली असल्याची टीका कॉंग्रेसचे नेते, आमदार भाई जगताप यांनी केली.

पालकमंत्रीनंतर मालक मंत्री, कोण यावर वाद

रस्ते, पाणी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणीतही या सरकारच्या काळात घोटाळा झाला आहे. मंत्रिमंडळात कोणी दोषी असेल तर त्यावर कारवाई करा, आम्ही साथ देऊ, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले. सरकारने केंद्रात संमतीसाठी पाठविलेला शक्ती कायदा राष्ट्रपती यांनी परत पाठवला, हे सरकारचे अपयश आहे. तीन पक्षांत पालकमंत्रीनंतर मालक मंत्री, कोण यावर वाद आहे; मात्र आमच्यात महाराष्ट्राच्या हितासाठी वाद आहे. एकप्रकारे सत्ताधाऱ्यांचे स्वार्थी राजकारण सुरू आहे, अशी टीका या वेळी ठाकरे यांनी केली.

‘नथुराम’ने ‘गांधीवधा’त सावरकर आणि संघालाही मारलं; सावरकरांच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न सुरूच: भाजपा माजी खासदाराचे स्पष्ट मत

0

पुणे : ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि नथुराम गोडसे हे वैचारिकदृष्ट्या एक नाहीत. महात्मा गांधींवर झाडण्यात आलेल्या तीनपैकी एका गोळीने त्यांची हत्या केली, दुसऱ्या गोळीने सावरकरांची पुण्याई संपवली आणि तिसऱ्या गोळीने हिंदूंचा कैवार घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांना अनेक दशके राजकीय अस्पृश्य ठरविण्यात आले, याचे भान ठेवून हा घोळ दुरुस्त केला पाहिजे,’ अशी परखड भूमिका माजी खासदार प्रदीप रावत यांनी रविवारी मांडली.

स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सहकार्याने आयोजित ‘मी सावरकर’ या वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रदीप रावत बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, सात्यकी सावरकर, संयोजन समितीचे धनंजय बर्वे व रणजित नातू या वेळी उपस्थित होते.

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न सुरू आहे; परंतु सावरकरांचा विचार हा देशाचा राष्ट्रीय प्रवाह झाला आहे. हा विचार बहुजनांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी राबविण्यात येणारा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे,’ असे रावत यांनी सांगितले. ‘सावरकरांचे अनुकरण करताना त्यांचे बुद्धिनिष्ठ व व्यावहारिक विचार आत्मसात केले पाहिजेत,’ असे आवाहन रणजित सावरकर यांनी केले.

सावरकरांचे अनुकरण करताना त्यांचे चार आत्मसात केले पाहिजे

‘सावरकरांचे हिंदुत्व हा पोरखेळ नसून, हिंदूंच्या अधिकारांचे संरक्षण आहे. त्यांच्या नावे खोटे पसरविणे ही त्यांची बदनामी आहे. संविधानाची प्रत हाती घेऊन सावरकरांची अपकीर्ती करणारे आज न्यायालयात येण्यास घाबरत आहेत. मात्र, त्यांना न्यायालयाचा दणका देण्यासाठी लढत राहणार,’ असा निर्धार सात्यकी सावरकर यांनी व्यक्त केला. धनंजय बर्वे यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण गोखले यांनी सूत्रसंचालन केले

महायुतीत कुरघोडी नाट्य? शिंदे यांना पुन्हा डावलल तर राष्ट्रवादीला मिळणार विधानसभेत हे मानाचे पद; तात्काळ नेत्याचं नावही ठरवलं

0

आजपासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आता या अधिवेशनात सभागृहाला उपाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्षपद आणि विधानपरिषदेचे अध्यक्षपद भाजपाकडे आहे. दरम्यान, आता उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकुमार बडोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक समतोल साधण्यासाठी एससी प्रवर्गाला न्याय देण्यासाठी उपाध्यक्षपद देणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, आता राजकुमार बडोले यांना उपाध्यक्षपद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

तर दुसरीकडे अजूनही विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर शिक्कामोर्तब झालेला नाही. या अधिवेशनात या पदावर निर्णय होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी इतर दोन पक्षांचा पाठिंबा लागणार आहे. ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे, सुनिल प्रभू यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.

हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधान भवनात दाखल

अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याच्या तयारीत आहेत. बऱ्याचदा अधिवेशनाच्या दिवशी विरोधक सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेताना दिसतात. पहिल्या दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलनास बसतात परंतु आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड विधान भवनात बेड्या घालून पोहचले.

आव्हाडांच्या दोन्ही हातात बेड्या घातलेल्या होत्या, विधान भवनात जितेंद्र आव्हाड दाखल होताच सर्व माध्यमांचे कॅमेरे त्यांच्याकडे केंद्रीत झाले. अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून का आलेत असा प्रश्न सर्वांना पडला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो घाला घातला जातोय. जे कार्यकर्ते व्यक्त होतायेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आवाज बंद केले जातायेत. ही पद्धत चुकीची आहे. आम्हाला संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. हे मुलभूत अधिकार असताना ते शाबीत राहिले पाहिजेत त्यासाठी या बेड्या घालून निषेध केला जात आहे असं त्यांनी सांगितले.

युरोकिड्स वारजेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात…

0

वारजे (प्रतिनिधी) अतुल नगर वाराणसी सोसायटी येथील युरो किड्स प्री स्कूलचे उत्साहवर्धक वार्षिक स्नेह संमेलन साजरे करण्यात आले. या संमेलन मध्ये विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचा त्यामध्ये समावेश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महापौर अंकुश अण्णा काकडे यांच्या हस्ते झाले. संचालिका माधुरी गुरनानी आणि प्राचार्य डॉ. श्रुती तापाडिया यांनी अनमोल मार्गदर्शन करून कलात्मक प्रतिभेचे उल्लेखनीय प्रदर्शन घडवून आणले.

यावेळी लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांनी सादर केलेल्या कला गुणांना उपस्थित श्रोत्यांनी दाद दिली.

कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी 1 आरोपी अटक, गुंडाना स्थानिक नेत्यांचं संरक्षण – खडसे

0

रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी अनिकेत भोईला पोलिसांनी अटक केली आहे. रक्षा खडसेंच्या अल्पवयीन मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची त्याने छेड काढली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.महाशिवरात्रीच्या यात्रेत रक्षा खडसे यांची मुलगी गेली होती. त्यावेळी ही घटना घडली आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कोथळी विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकाशी झटापट केली. यानंतर टवाळखोर तरुणांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं.

इतर आरोपींचा शोध सुरु

टवाळखोर व छेडखानी करूनही तरुण मोकाट असल्याने रक्षा खडसे यांनी पोलिसांना जाब विचारला. यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी अनिकेत भोई,पीयूष मोरे, सोम माळी,अनुज पाटील किरण माळी या पाच जणांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत भोई याला पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

एकनाथ खडसे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

“राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यभरात अशा घटना वारंवार घडत आहेत. मुली पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घाबरतात. मुलींची सुरक्षा ही बाब अवघड आहे. मी माझ्या नातीला सांगितलं की तू स्वतः जाऊन तक्रार कर. आपण कुणालाही घाबरता कामा नये.” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

गुंडाना स्थानिक नेत्यांचं संरक्षण-खडसे

छेडछाडीच्या या प्रकरणाबाबत रक्षा खडसे यादेखील पोलिसांशी बोलल्या आहेत.मी स्वतः पोलिसांशी बोललो आहे. हे लोक गुंड आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोरींचे त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अडवलं होतं. पण त्यांनी पोलिसांना देखील मारहाण केली. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पण ते जामिनावर सुटले. त्यांची इतकी हिंमत होते की ते पोलिसांना देखील मारहाण करातात. इतके गुंड याठिकाणी पसरलेले आहेत आणि इथे त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे संरक्षण आहे, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे.

धनंजय मुंडे राजीनाम्यावर मुख्यमंत्र्‍यांकडून भाष्य; चहापान कार्यक्रमाला मुंडे हजर अण्णा हजारेंबद्दलही स्पष्टच बोलले

0

राज्यात गेल्या 2 महिन्यांपासून कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे.विशेष म्हणजे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडेंच्या काळात कृषी खात्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. तर, संतोष देशमुख हत्याप्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर देखील त्यांनी तीव्र भावना व्यक्त करत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, सरकारकडून त्यांची पाठराखण करण्यात येत आहे. राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी आयोजित चहापान कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात सरकारने आधीच भुमिका स्पष्ट केली आहे, असे म्हणत दोषी आढळल्यानंतरच त्यांचा राजीनामा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सूचवले आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात मोठा दावा केला होता. 3 तारखेला धनंजय मुडेंचा राजीनामा होईल, असे करुणा शर्मा यांनी सोशल मीडियातून म्हटले होते. त्यामुळे, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात सरकारने आधीच भुमिका स्पष्ट केली आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण न्यायालयीन आहे, कोर्टाचा निकाल आल्यानंतर त्याबाबत आम्ही भूमिका घेऊ, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले. त्यामुळे, सरकारमधील दोन्ही मंत्र्यांचा बचाव मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ⁠अण्णा हजारे यांनी देखील धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे असे वक्तव्य केलं होतं. तर, सरकारमधील काही मंत्र्यांनी देखील राजीनाम्यासंदर्भात बोलताना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं समर्थन केल्याचं दिसून आलं. मात्र, सरकारने त्यांचा राजीनामा अद्यापही घेतला नाही. त्याच, अनुषंगाने प्रश्न विचारल असता, अण्णा हजारे यांचा आम्ही आदर करतो, आमची यावर चर्चा झाली आहे. ⁠ज्यावेळी वाटेल नैतिकतेचा मुद्दा उपस्थित होतो, त्यावेळी मात्र भूमिका घेतली जाईल.⁠ आम्ही यावर खूप काही चर्चा केली आहे, असे स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

चहापान कार्यक्रमाला धनंजय मुंडे हजर

दरम्यान, आजच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. मात्र, गेल्या कॅबिनेट 3 बैठकींना गैरहजर राहिलेले धनंजय मुंडे आज चहापान कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी चहा पितानाचा त्यांचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे, सध्यातरी धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबाबत सरकारच्या मनात काहीही नसल्याचे दिसून येते.

रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नाथाभाऊंचे गंभीर आरोप अन् फडणवीसांनीही शिंदेंसमोरच थेट सुनावलं

0

राज्यात महिलांच्या सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील घटनेवरून संताप व्यक्त केला जात आहे. त्यात आज केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचे प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली.केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल तर सामान्यांचे काय असा सवाल उपस्थित होऊ लागला. रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुक्ताईनगर कोथळी गावातील यात्रेदरम्यान ही घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आरोपींना माफी देता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्री स्पष्ट म्हणाले….

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, या घटनेत एका विशिष्ट राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. आरोपींना माफी देता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई होणारच असेही त्यांनी म्हटले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मु्ख्यमंत्र्यांसोबत होते. जळगाव प्रकरणातील आरोपी हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट राजकीय पक्षाचे पदाधिकारी असे म्हटल्याने हे प्रकरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

एकनाथ खडसे यांनीदेखील दाखवले बोट…

आपल्या नातीवर ओढावलेल्या प्रसंगाबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी आरोपींना राजकीय अभय असल्याचे म्हटले होते. मागील सरकारच्या काळातही तक्रार केल्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी फोन करून सोडण्यास सांगितले होते असे खडसे यांनी म्हणत एकनाथ शिंदेंवर प्रश्न उभे केले.

नेमकी घटना काय?

मुक्ताईनगर येथे यात्रा महोत्सव सुरू आहे. या यात्रा महोत्सवात भाजपच्या मंत्र्यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसह गेली होती. यावेळी काही टवाळखोरांनी त्यांची छेड काढली. सुरक्षारक्षकांनी टवाळखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला परंतु टवाळखोर त्यांच्यासमोर बधले नाहीत. त्यांनी शेरेबाजी करणे सुरुच ठेवले. तसेच मुलींना धक्काबुक्कीही झाली.

सदर प्रकरणाविरोधात सुरक्षारक्षक घाईघाईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीसाठी गेले. त्यांच्या मागोमाग भाजपच्या बड्या नेत्याही तिथे पोहोचल्या. त्यांची पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. सदर आरोपींना काही तासांतच अटक झाली पाहिजे, अशा सक्त सूचना त्यांनी केल्या.

स्वारगेट प्रकरणाचं सत्य शिरुरच्या शेतात दडलंय?, पोलिसांचे पथक रवाना; होणार मोठा खुलासा

0

स्वारगेट बस डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करून त्याच्या गावातून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.मात्र आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणातील नेमकं सत्य समोर आणण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे. हेच सत्य समोर आणण्यासाठी सध्या दत्ताच्या मोबाईलचा शोध सुरू आहे. आरोपीच्या मोबाईलमधून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असून पोलिसांकडून त्याच्या मोबाईलचा शोध घेतला जात आहे.

पुणे पोलिसांकडून नराधम दत्ता गाडे याच्या मोबाईल चा शोध सुरू आहे. नराधम गाडे याने मोबाईल शिरूरमध्ये एका शेतात लपवल्याची माहिती समोर आली आहे. घटना घडल्यावर मोबाईलवरून कोणा कोणाला फोन केले याचा तपास केला जाणार आहे. तसेच मोबाईलमध्ये असलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन वरून कधी कोणाला पैसे दिले आहेत का याचा सुद्धा पोलिसांना घ्यायचा शोध आहे. घटना घडल्यावर गाडे याने मोबाईल बंद केला होता. पुणे पोलिसांकडून आरोपी गाडे याची चौकशी सध्या सुरू आहे.

आरोपी गाडेची चौकशी सुरू

पुण्यातील स्वारगेट बलात्कार आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली. काल कोर्टात हजर केल्यानंतर दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दत्ता गाडे याला शिरुरमधून त्याच्या मुळगावातून अटक करण्यात आली होती. दरम्यान, आरोपी जेरबंद झाल्यानंतर या अत्याचार प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. आरोपी आणि तरूणी हे आधीपासून ऐकमेकांना ओळखत असून त्यांच्या आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती आली.

आरोपीचा फोन ठरणार महत्त्वाचा पुरावा

पीडित तरुणीवर बलात्कार झालाच नाही. दोघांमध्ये जे झालं ते दोघांच्या संमतीने झालं होतं. दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यापासून ओळखतात. त्यांचे कॉल रेकॉर्डस काढले तर समजेल, असंही आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे. त्यामुळे आरोपीचा फोन हा या प्रकरणात नवे वळण आणण्याची शक्यता आहे. त्यासाठी पुणे पोलीस फोनचा कसून तपास करत आहे.

अंबादास दानवेंची ‘आमदारकी’ काहीच दिवस बाकी; विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचा डोळा?

0

विधानसभा विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. याबाबतचे पत्र अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र सद्यस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 20 आमदार असून विरोधी पक्ष नेतेपदासाठी आवश्यक 29 आमदारांची अट पूर्ण होत नाही.

त्यामुळे यावेळी एखाद्या पक्षाला विरोधी पक्ष नेते पद द्यायचे का? याबाबत राहुल नार्वेकर यांना विशेषाधिकारातून निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे या पत्रानंतरही विधानसभा अध्यक्ष कार्यालयाची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. विरोधी पक्ष नेते पदाचा निर्णय घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भूमिका तितकीच महत्वाची असणार आहे.

त्याचवेळी विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदावर काँग्रेस दावा करणार असल्याची माहिती एका ज्येष्ठ काँग्रेसने नेत्याने दिली आहे. काँग्रेसला जनतेचा पक्ष म्हणून पुढे यायचे आहे. याच भूमिकेचा भाग म्हणून एका सभागृहाचे विरोधी पक्ष नेते पद आपल्याकडे ठेवून राज्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असणार आहे.

विद्यमान विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या सदस्यत्वाचा कालावधी लवकरच संपत आहे. 29 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या आमदारकीची मुदत संपुष्टात येत आहे. ते छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रलंबित असल्याने पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांना वाट पहावी लागणार आहे.

त्यामुळे आत्ताच या संदर्भात घाई करावी की ? आता घाई न करता पावसाळी अधिवेशनापर्यंत थांबावे का? अशीही चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात ऐकावयास मिळत आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका आणि मध्यस्थी देखील महत्त्वाची मानली जात आहे.