Home Blog Page 88

दहावीचा निकाल उद्या दुपारी; कुठे आणि कधी पाहता येणार?

0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा निकालही जाहीर होणार आहे. दहावीचा निकाल १३ मे रोजी निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे. बोर्डाची पत्रकार परिषद मंगळवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे. त्यानंतर ऑनलाइन निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर जारी होतील. बोर्डाकडून पत्रकार परिषदेत राज्याचा निकाल, मुलींचे आणि मुलांचे उत्तीर्ण प्रमाण, जिल्हानिहाय उत्तीर्ण आकडेवारी सांगितली जाईल.

दहावीचा निकाल १२ मे रोजी जाहीर करण्याचं निश्चित केलं होतं. मात्र सोमवारी बुद्ध पौर्णिमेची सार्वजनिक सुट्टी असल्यानं सोमवार ऐवजी मंगळवारी १३ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निकाल लवकर जाहीर होणार असल्यानं पुनर्परीक्षार्थींची लवकर परीक्षा होईल.

कुठे आणि किती वाजता बघता येणार निकाल?

बोर्डाकडून तीन अधिकृत संकेतस्थळांवर निकाल जाहीर केला जाणार आहे. mahresult.nic.in, results.gov.in, DigiLocker यावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. निकालाबाबत सविस्तर माहिती बोर्डाकडून मंगळवारी ११ वाजता पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे.

महाविद्यालयात हेलपाटे न मारता अकरावी प्रवेश! प्रवेशासाठी लागतील 5 कागदपत्रे, अर्ज करताना विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ 4 बाबी

0

राज्यभर यंदा पहिल्यांदाच इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना घरबसल्या अर्ज करता येणार आहेत. त्यांना एकूण दहा महाविद्यालयांची निवड पसंतीक्रमाने करावी लागणार असून, त्यानुसार त्यांना तीन प्रवेश फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळणार आहे. अकरावी प्रवेशावेळी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत नियमित बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा बैठक क्रमांक टाकल्यावर त्यांची वैयक्तिक माहिती आपोआप येईल. आपोआप माहिती न येणाऱ्यांनी स्वत: माहिती भरायची आहे. मोबाईल ॲपमधूनही विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येणार आहे. अर्ज दोन भागात असून, अर्जातील भाग-एक भरल्यावर (स्वत:चे व आईचे नाव, जन्मतारीख, जातप्रवर्ग, आरक्षण) ऑनलाइन शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे (एक एमबीपेक्षा जास्त आकार नसावा) अपलोड करावीत. अर्ज लॉक करण्यापूर्वी तो प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्राची मदत घ्यावी.

अर्जाचा भाग-एक भरल्यावर डॅशबोर्ड तपासा, तेथे अर्ज व्हेरिफाइड असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी अर्जाप्रमाणे म्हणजे व्हेरिफाय करून घेणार नाहीत, त्यांचा अर्ज अपूर्ण राहील व तो प्रवेश प्रक्रियेतून बाद ठरेल. प्रवेशाच्या तीन प्रमुख फेऱ्या असतील, आवश्यकता भासल्यास विशेष फेरी जाहीर होईल.

प्रवेशासाठी लागतील ‘ही’ कागदपत्रे

दहावीच्या परीक्षेचे मूळ गुणपत्रक

दहावीच्या वर्गातून शाळा सोडल्याचा दाखला

आधार कार्ड (छायांकित प्रत)

दोन पासपोर्ट साइज फोटो

सामाजिक आरक्षणातून प्रवेश घेणाऱ्यांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला

विद्यार्थ्यांनो, ‘या’ बाबी लक्षात ठेवाच

(१) विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी दिलेल्या संकेतसस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. केंद्रीय प्रवेशाच्या कॅप जागांशिवाय संस्थांअंतर्गत इन हाउस कोटा, व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्याक शाळांमधील कोटा राखीव असेल. राखीव जागांवर पूर्ण प्रवेश न झाल्यास शिल्लक जागांवर खुल्या प्रवर्गातून प्रवेश दिले जातील.

(२) खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५५ टक्के, तर उर्वरित ४५ टक्के जागांवर सर्व जातसंवर्गातील विद्यार्थ्यांना मिळतील प्रवेश. नियमानुसारच प्रवेशासाठीचे शैक्षणिक शुल्क शिक्षण संस्थांकडून घेतले जाईल. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पारदर्शक होणार असून, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.

(३) प्रवेश अर्ज दोन भागात भरायचा असून भाग- एकमध्ये विद्यार्थ्यांनी स्वत:ची माहिती भरून अर्ज प्रमाणित करून घ्यावा. अर्जाच्या भाग-दोनमध्ये १० महाविद्यालयांच्या सांकेतिक क्रमांकानुसार पसंतीक्रम निवडावेत. अर्ज भरून झाल्यावर तो ‘सबमिट’ करावा.

(४) प्रवेश फेरीनंतर प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्यांनी मूळ कागदपत्रे देऊन प्रवेश निश्चित करावा. तरीदेखील प्रवेश न घेतल्यास तो विद्यार्थी पुढील प्रवेश फेरीसाठी पात्र नसेल. त्याला ऑनलाइन संमती नोंदवून विशेष फेऱ्यांमध्ये सहभागी होता येईल.

प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश अशक्य 

जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचे अकरावी प्रवेश ऑनलाइनच होतील. तीनवेळा प्राचार्यांना त्यासंदर्भात माहिती दिली असून, आता महाविद्यालयांचे रजिस्ट्रेशन होईल. ऑनलाइन प्रवेशामुळे क्षमतेपेक्षा जास्त एकाही विद्यार्थ्यास प्रवेश देता येणार नाही.

– सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

अदानी सुमहाने मोडले सर्व विक्रम, एका दिवसात कमावले तब्बल 70 हजार कोटी रुपये

0

भारत पाकिस्तान युद्धबंदीच्या निर्णयानंतर उद्योगपती गौतम अदानी यांनी मोठा फायदा झाला आहे. अदानींच्या 10 कंपन्यांनी इतकी चांगली कामगिरी केली की त्यांनी एका दिवसात 70 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे.

अदानी एंटरप्रायझेसला 20 हजार कोटी रुपयांचा नफा

सर्वात मोठा फायदा अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसला झाला आहे. ज्यामध्ये सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गौतम अदानी यांच्या सिमेंट कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्येही चांगली वाढ झाली आहे. वीज आणि ऊर्जा कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अदानी समूहाच्या एकूण मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली. सध्या अदानी ग्रुपचे मार्केट कॅप किती आहे ते देखील आपण सांगूया.

अदानी ग्रुपच्या कोणत्या कंपन्यांना सर्वाधिक फायदा झाला?

अदानी समूहाची सर्वात मोठी कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसचे मार्केट कॅप 19955.78 कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 259892.65 कोटी रुपयांवरून 279 848.43 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

अदानी समूहाच्या अदानी पोर्ट अँड सेझचे मार्केट कॅप 12,064.38 कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप2,82,351.76 कोटी रुपयांवरून 2,94,416.14 कोटी रुपयांवर पोहोचले.

अदानी समूहाच्या अदानी पॉवरचे मार्केट कॅप 12,708.62 कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 1,98,053.81 कोटी रुपयांवरून 2,10,762.43 कोटी रुपयांवर पोहोचले.

अदानी समूहाच्या अदानी एनर्जी सोल्युशन्सचे मार्केट कॅप 8,090.65 कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 99,273.99 कोटी रुपयांवरून 1,07,364.64 कोटी रुपयांवर पोहोचले.

अदानी ग्रुपच्या अदानी ग्रीन एनर्जीचे मार्केट कॅप 9,876.45 कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 1,39,220.61 कोटी रुपयांवरून 1,49,097.06 कोटी रुपयांवर पोहोचले.

अदानी समूहाच्या अदानी टोटल गॅसचे मार्केट कॅप 3,161.96 कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 66,274.55 कोटी रुपयांवरून 69,436.51 कोटी रुपयांवर पोहोचले.

अदानी ग्रुपची सिमेंट कंपनी एसीसी लिमिटेडचे मार्केट कॅप 861.95 कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 34,049.58 कोटी रुपयांवरून 34,911.53 कोटी रुपयांवर पोहोचले.

अदानी समूहाची सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंटचे मार्केट कॅप 3,337.54 कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 1,30,028.28 कोटी रुपयांवरून 1,33,365.82 कोटी रुपयांवर पोहोचले.

अदानी समूहाच्या सिमेंट कंपनी सांघी इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 63.29कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 1,505.01 कोटी रुपयांवरून 1,568.30 कोटी रुपयांवर पोहोचले.

अदानी ग्रुपची मीडिया कंपनी एनडीटीव्हीचे मार्केट कॅप 24.82 कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 758.83 कोटी रुपयांवरून 783.65 कोटी रुपयांवर पोहोचले.

अदानी ग्रुपला किती झाला नफा ?

बीएसईच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी अदानी ग्रुपच्या एकूण 10 कंपन्यांचे मार्केट कॅप 12,11,409.07 कोटी रुपये होते. जे सोमवारी वाढून 12,81,554.51 कोटी रुपये झाले. याचा अर्थ असा की अदानी समूहाच्या एकूण मार्केट कॅपमध्ये 70,145.44 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गौतम अदानींसाठीही हा एक मोठा फायदा आहे.

लाडक्या बहिणींना केवळ १५०० रुपये देऊन शांत बसायचं नाही, तर…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्वाचं बोलले

0

लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता न वाढवल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे.विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लाडक्या बहिणींना केवळ १५०० रुपये देऊन शांत बसायचं नाही. तर त्यांना लखपती दीदी बनवायचं आहे, असं विधान करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावर आहेत. वर्ध्यात एका कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठं भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे रुपये देऊन शांत बसायचं नाही. तर त्यांना लखपती दीदी बनवायचं आहे. त्यांचं सक्षमकरण करायचं आहे. आमचं लक्ष्य आहे की, एक कोटी बहिणींना लखपती दीदी बनवणार आहे. याकरिता प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा सुरु आहे’.

आरटीओ कार्यालयावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

‘वर्धेत अकरा टक्के आदिवासी राहतात. त्यांना लहान लहान कामासाठी नागपूरला जावा लागत होते म्हणून आरटीओ कार्यालय मंजूर केले होते. आधी भाड्याच्या खोलीत कार्यालय होते. आता सुसज्ज इमारत झाली. 2019 साली सांगितलं होतं की, मी पुन्हा येईल. तेव्हापासून इमारत वाट पाहत होती. इमारतीचं आज लोकार्पण झालं, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘वर्धा जिल्ह्यात पंचवीस टक्क्यांनी अपघाताची संख्या कमी झाली आहे. यासाठी परिवहन विभागाच अभिनंदन. परिवहन मंत्री वर्धेचे भूमिपुत्र आहे. त्यांना तुम्ही पन्नास बस मागितल्या. पण त्यांना शंभर मागितल्या असत्या तरी दिल्या असत्या. कारण सरनाईक यांची जन्मभूमी असून या भूमीपेक्षा काही मोठं नसतं. वर्धा बाजार समितीच्या कामांना मंजुरी दिली आहे. या जिल्ह्याच्या विकासाकरिता मागितलं ते देऊ, असे ते म्हणाले.

पाषाण-सुतारवाडीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हक्काचे केंद्र – ना. चंद्रकांतदादा पाटील 

0

नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हे हक्काचे केंद्र असून, कोथरुड मतदारसंघातील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे विविध समस्या सोडविण्यासोबतच; शासनाच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ पोहोचवण्याची भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. कोथरुड मतदारसंघातील पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकांसाठी नवीन जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण ना. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजप उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद सायकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, उत्तरचे माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, दक्षिणचे माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले की, नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हे हक्काचे केंद्र आहे. मतदारसंघातील विविध जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासोबतच; शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या. त्यामुळे या जनसंपर्क कार्यालयाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सुकन्या समृद्धी योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचे कार्ड प्रदान करण्यात आले.

वाऱ्यांची दिशा बदलली! मान्सून वेळेआधी धडकणार, महाराष्ट्रात मान्सून कधी समोर आली मोठी अपडेट

0

महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाचं थैमान सुरू आहे. त्याच दरम्यान आणखी एक बातमी समोर येत आहे. ही बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे. यंदाच्या वर्षी नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) प्रवास अपेक्षेपेक्षा जलद असण्याची चिन्हं हवामान खात्याने व्यक्त केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी, बागायतदार आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आता मॉन्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ६ जून २०२५ च्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

सध्या दिलेल्या हवामान विभागाने दिलेल्या अंदाजांमुळे सध्या सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यंदा मान्सून लवकर आल्यास केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनाही उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.

हवामान खात्याच्या माहितीवरून समजते की, १३ मेपासून अंदमान-निकोबार बेटसमूहावर नैऋत्य मोसमी वारे दाखल होण्यासाठी हवामान पोषक होत आहे. यामुळे मान्सूनचा प्रवास वेळेआधी सुरू होणार असून, याचा परिणाम केरळ आणि महाराष्ट्रावरही होणार आहे. विशेष म्हणजे, यंदा केरळमध्ये मान्सून २७ मे रोजीच दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही तारीख नेहमीच्या सरासरी तारखेच्या (१ जून) आधीची आहे.

आजचं हवामान: महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल होणार! पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

केरळमध्ये मॉन्सून वेळेआधी दाखल झाल्यास, पुढील आठवड्यात म्हणजेच ६ जूनपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रातही पोहोचण्याची शक्यता वाढते. राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी मॉन्सूनचे वेळेवर आगमन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मागील काही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा वेळेवर आणि पुरेसा पाऊस होईल, अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

हवामान खात्याने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात हळूहळू पावसाचे आगमन होऊ शकते. देशभरात शेतकरी, उद्योगधंदे आणि पाणीसाठ्यांवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था मोसमी पावसावर खूप प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळे वेळेपूर्वी मान्सूनचे आगमन हे अनेकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. लवकर पावसामुळे शेती हंगाम वेळेवर सुरू होईल, तर जलसाठ्यांमध्येही पाण्याची वाढ होण्यास मदत मिळेल.

भारत – पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती

0

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तानमधील नऊ दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले केले. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. यानंतर पाकिस्तान लष्कराने हल्ले सुरू केले होते. या हल्ल्यांना भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती करत युद्धविराम लागू करण्यात आला. पण, त्याच दिवशी रात्री पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. दरम्यान,आज सीमेवर परिस्थिती सामान्य झाली असून गोळीबार झाला नसल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली.

सीमेवरील परिस्थितीची माहिती आज भारतीय लष्कराने दिली. सीमेवर सर्व काही सामान्य आहे. पाकिस्तानकडून कोणताही हल्ला झालेला नाही. गोळीबाराची कोणत्याही घटनेची नोंद झाली नाही, त्यामुळे अलिकडच्या काही दिवसांत ही पहिलीच शांत रात्र ठरली.

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथून सकाळचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जम्मू-काश्मीर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील इतर भागात रात्रीनंतर आता सकाळी जनजीवन सामान्य आहे, अशी माहिती लष्कराने दिली.

९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार

भारताने या कारवाईत मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांसह १००हून अधिक दहशतवादी यमसदनी पाठवले. ७ ते १० मेदरम्यान शत्रूच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे ३५ ते ४० सैनिक मारले गेल्याची माहिती या वेळी देण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत हवाई दलाचे सर्व पायलट सुखरूप परतल्याचे एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले. तर, वेळप्रसंगी कराची बंदरावर जोरदार हल्ल्यासाठी नौदल सज्ज होते, असे व्हाईस ॲडमिरल ए. एन. प्रमोद यांनी सांगितले.

लष्करी मोहिमांचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, या संघर्षात ३५-४० पाकिस्तानी लष्करी जवान ठार करण्यात आले. या कारवाईत भारताचे उद्दिष्ट साध्य झाले आहे आणि यापुढे पाकिस्तानने कोणतेही दु:साहस केले तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल.

वर्षभरात बँकांनी कमावले १.७९ लाख कोटी,  नफा २७ टक्क्यांनी वाढला

0

कमी झालेला एनपीए, व्यवहारांमध्ये वाढ याच्या बळावर सर्व १२ सरकारी बँकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये विक्रमी १.७९ लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात २७ टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ बँकांना १.४१ लाख कोटी रुपये इतका नफा झाला होता. सहा बँका अशा आहेत, ज्यांनी वर्षभरात १० हजार कोटींपेक्षा अधिक फायदा कमावला आहे.

यात स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वाधिक ७०,९०१ कोटी रुपयांचा नफा कमावला. पंजाब नॅशनल बँकेच्या नफा सर्वाधिक १०१ टक्क्यांनी वाढून १६,६३० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सेंट्रल बँक ७८ टक्के वाढीसह दुसऱ्या आणि पंजाब अँड सिंध बँक ७१ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानी आहे.

शुद्ध एनपीए ०.७०% पेक्षा कमी : बँकांचा शुद्ध एनपीए ०.७०% पेक्षा कमी आहे. पंजाब अँड सिंध बँकेचा एनपीए ०.९६ टक्के आहे. सर्वात कमी ०.१८% एनपीए बँक ऑफ महाराष्ट्रचा आहे.

‘४ आर’ धोरणामुळे एनपीएमध्ये घट

बँकांची स्थिती सुधारणे, एनपीए कमी करण्यासाठी सरकारने ‘४ आर’ धोरण राबवले. यात रिकॅपिटलायझेसन (पुनर्भांडवलीकरण) म्हणजे बँकांमध्ये भांडवल ओतणे, रिकग्निशन (ओळख पटवणे) म्हणजे अडचणीतील कर्जांची ओळख, रिझोल्युशन (निकालात काढणे) म्हणजे वाईट कर्जांचे निराकरण आणि रिफॉर्म (सुधारणा) म्हणजे बँकिंग प्रणालीत सुधारणा यांचा समावेश होता. या धोरणांमुळे बँकांचे एनपीए कमी झाले. बुडीत कर्जाची समस्या आटोक्यात आली.

४८,४५१ कोटी रुपयांचा चौथ्या तिमाहीत नफा

चौथी तिमाही म्हणजेच जानेवारी-मार्च दरम्यान बँकांचा फायदा ४८,४५१ कोटी रुपये इतका होता. २०२३-२४ याच समान तिमाहीत बँकांचा नफा ४२,८४७६ कोटी इतका होता. यात एकट्या एसबीआयच्या नफ्याचा वाटा १८,६४३ कोटी इतका आहे.

तिमाही आधारावर सर्व बँकांचा नफा वाढला, परंतु एसबीआयचा १० टक्के घटला आहे. सर्वाधिक फायदा कमावण्यात १२४ टक्क्यांसह पंजाब अँड सिंध बँक आघाडीवर आहे.

बँक ऑफ इंडियाचा नफा ८२ टक्के, पंजाब नॅशनल बँक ५२ टक्के, कॅनरा २८ टक्के, इंडियन बँक ३२ टक्के आणि इंडियन ओव्हरसीज बँक ३० टक्के नफा वाढलेला आहे.

सर्वाधिक कमाई कुणाची?

स्टेट बँक ऑफ इंडिया ७०,९०१

बँक ऑफ बडोदा १९,५८१

युनियन बँक १७,९८७

कॅनरा बँक १७,५४०

पंजाब नॅशनल बँक १६,६३० (कोटी रुपयांमध्ये)

सैन्यदलांच्या पत्रकार परिषदेत सुरुवातीला वाजलेल्या तांडव स्तोत्र ‘त्या’ धुनची सर्वत्र चर्चा; विविध प्रतिक्रिया लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

0

पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्यदलांनी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी रविवारी तिन्ही सैन्यदलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली. चार दिवस चाललेल्या या मोहिमेची त्यांनी पुराव्यांसह सविस्तर माहिती दिली. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या समन्वयातून अचूक आणि जलदगतीने मोहिमा फत्ते केल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. या पत्रकार परिषदेतील सर्वांत लक्षवेधी गोष्ट ठरली, ती म्हणजे त्याची सुरुवात. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला काही व्हिडीओ दाखवण्यात आले. या व्हिडीओमध्ये शिव तांडव स्तोत्राची धुन ऐकायला मिळाली.

भगवान शंकराला समर्पित शिव तांडव स्तोत्र हे अत्यंत शक्तीशाली आणि फलदायी मानलं जातं. या स्तोत्राची रचना शिवभक्त रावणाने केली होती. तिन्ही सैन्यदलांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दाखवलेल्या कारवाईच्या व्हिडीओत शिव स्तोत्राची धुन ऐकून नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया a देण्यास सुरुवात केली. ‘ज्या दहशतवाद्यांना कलमा म्हणायला लावून निष्पाप पर्यटकांवर गोळी झाडली, त्यांना हे उत्तर आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘मला अजूनही माझ्या कानांवर विश्वास बसत नाहीये’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

शिव तांडव स्तोत्राच्या रचनेची कथा

पुराणांमधील उल्लेखानुसार एकदा रावणाने आपल्या शक्तीच्या आणि गर्वाच्या जोरावर भगवान शिवाचं निवासस्थान असलेल्या कैलाश पर्वताला उचलण्याचा प्रयत्न केला. रावणाचा हा उद्धटपणा पाहून शंकराने आपल्या अंगठ्याने तो पर्वत दाबला. यामुळे रावणाचा हात पर्वताखाली अडकला आणि तो असह्य वेदनेनं व्याकूळ झाला. पण तरीही रावणाने हार मानली नाही. वेदनेतही तो भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत भावनिक स्तुती गाऊ लागला. त्याची स्तुती इतकी प्रभावी आणि शक्तीशाली होती की शिव स्वत: प्रसन्न झाले. हीच स्तुती नंतर शिव तांडव स्तोत्र या नावाने प्रसिद्ध झाली. या स्तोत्रात रावणाने भगवान शंकराच्या तांडव स्वरुपाचं, त्यांच्या दिव्य तेजाचं आणि सौंदर्याचं वर्णन केलं आहे.

दरम्यान ऑपरेशन सिंदूरमध्ये किमान 100 दहशतवादी आणि पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक मारले गेल्याची माहिती डीजीएमओ लेफ्ट. जनरल राजीव घई यांनी दिली. पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईला दिलेल्या प्रत्युत्तरात त्यांचं मोठं नुकसान झाल्याचंही ते म्हणाले. यापुढे कोणतीही आगळीक झाली, तर त्याला अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्यात येईल, अशा शब्दांत पाकिस्तानला खडसावण्यात आलं आहे.

भाजपच्या पाठिंब्यावर काँग्रेस नेत्याची निवड; फडणवीसांच्या आदेशाने नियुक्ती सभापतीपदी काँग्रेस नेता विराजमान १८ पैकी १३ जागी वर्चस्व

0

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेस नेते व माजी आमदार दिलीप माने यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या पाठिंब्यावर काँग्रेस नेत्याची निवड होणे, ही पहिलीच घटना आहे. उपसभापतीपदी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे समर्थक सुनील कळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापती आणि उपसभापती पदाची निवड दोन वर्षांसाठी राहणार आहे. दोन वर्षानंतर नव्या संचालकांना संधी मिळणार आहे.

फडणवीसांच्या आदेशानुसार सभापती व उपसभापतीची निवड

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील विजयानंतर भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार व काँग्रेस नेते दिलीप माने, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत जाऊन भेट घेतली होती. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत सभापती आणि उपसभापती कोण होणार, यावर चर्चा झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सभापती ठरविणार, असे सांगण्यात आले होते. रविवारी दिलीप माने आणि सुनील कळके यांची नावे जाहीर करण्यात आली.भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिलीप माने यांचे नाव सभापती पदासाठी, तर उपसभापती पदासाठी सुनील कळके यांचे नाव जाहीर केले. दोघांनीच सभापतीपद आणि उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केले होते.

फडणवीसांच्या लाडक्या आमदाराने आखली रणनीती

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांना सोबत घेऊन पॅनेल बनविले होते. विरोधात भाजप आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. निवडणुकीत कल्याणशेट्टी, माने, हसापुरे यांच्या पॅनेलने १८ पैकी १३ जागा जिंकत बाजार समितीवर वर्चस्व मिळविले होते. फडणवीसांच्या लाडक्या आमदाराने काँग्रेस नेत्यांना सोबत घेत भाजपच्या दिग्गज आमदारांच्या पॅनलचा पराभव केला होता.