Home Blog Page 89

आयपीएलची तारीख ठरली! ३ शहरात होणार सामने; या दिवशी रंगणार फायनलचा थरार

0

भारत आणि पाकिस्तानातील तणावाची स्थिती पाहता आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या स्पर्धेतील फायनलचा सामना २५ मे रोजी होणार होता. मात्र, आता बीसीसीआय ही स्पर्धा आणखी पुढे खेचणार असल्याचं म्हटलं जात आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार स्पर्धेतील फायनलचा सामना ३० मे रोजी खेळवला जाऊ शकतो. या स्पर्धेतील उर्वरीत सामन्यांना १६ मे पासून सुरूवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर या स्पर्धेतील सामने चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये खेळवले जाणार आहेत.

आयपीएल २०२५ स्पर्धेतील एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी ५८ सामने पूर्ण झाले आहेत. तर १६ सामने अजूनही शिल्लक आहेत. ज्यात प्लेऑफच्या सामन्यांसह फायनलचा देखील समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या स्पर्धेचे सुधारीत वेळापत्रक आज संध्याकाळपर्यंत जाहीर केले जाऊ शकते. त्यामुळे आयपीएल स्थगित झाल्यानंतर मायदेशी परतलेल्या खेळाडूंच्या उपलब्धतेबद्दल आता चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

बीसीसीआयच्या एका सुत्राने माहिती देताना म्हटले की, ” आयपीएल स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थ करण्यात आल्याने, आयपीएलचा फायनलचा सामना आता २५ ऐवजी ३० मे रोजी खेळवला जाऊ शकतो. ही स्पर्धा आता मर्यादीत ठिकाणी खेळवली जाऊ शकते. आज रात्रीपर्यंत सर्व संघांना वेळापत्रक पाठवले जाईल.”

बीसीसीआयने पंजाब किंग्ज संघाला वगळता इतर सर्व संघातील खेळाडूंना येत्या मंगळवारपर्यंत आपापल्या ठिकाणी हजर राहण्यासाठी सांगितलं आहे. कारण शुक्रवारपर्यंत आयपीएल स्पर्धा पुन्हा एकदा सुरू केली जाऊ शकते. काही संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य मायदेशी परतले आहेत. आता त्या खेळाडूंना पुन्हा बोलवण्याचे आदेश बीसीसीआयने फ्रँचायझींनी दिले असल्याचे म्हटले जात आहे.

गुरूवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्यातील पहिल्या डावातील १० षटकं झाल्यानंतर बीसीसीआयने हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आधी स्टेडियमच्या लाईट्स बंद करण्यात आल्या. त्यानंतर प्रेक्षकांना मैदानाबाहेर पाठवण्यात आलं आणि हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेवटी ही स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे खेळाडू आपल्या मायदेशी परतले आहेत. आता परदेशात गेलेल्या खेळाडूंना परत आणण्याचं मोठं आव्हान बीसीसीआय आणि फ्रँचायझींसमोर असणार आहे.

पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रविराम… राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना या मागणीसाठी पत्र; म्हणाले…

0

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, रविवारी दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात पंतप्रधान मोदी यांच्याकडे सध्याची परिस्थिती, ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ला यावर चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी त्यांच्या पत्रात म्हणाले की, “संसदेचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलवण्यात यावे या विरोधकांच्या एकमताने करण्यात आलेल्या मागणीचा पुनरुच्चार ते करतात. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनी जाही NEW केलेला आजचा शस्त्रविराम यावर चर्चा करावी हे लोकांसाठी आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्यासमोर येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठीचा आपला सामूहिक निर्धार दाखवून देण्याची ही एक संधी असेल.” राहुल गांधी यांच्यासह राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील एक वेगळे पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

यापूर्वी २८ एप्रिल रोजी दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी पत्र लिहिले होते.

पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारच्या निर्णयांना अधिकृतपणे पूर्ण पाठिंबा जाहीर केला होता. पण आता पक्षातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता काँग्रेस पक्ष सध्याच्या परिस्थितीबाबात सरकारला प्रश्न विचारणे सुरू करेल. विशेषतः भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून सरकारला घेरले जाऊ शकते.

“भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाटाघाटींमध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप होणार नाही याची सरकारने नेहमीच काळजी घेतली आहे. मग ट्रम्प यांनी शस्त्रविरामाची घोषणा कशी केली? येत्या काळात आम्ही हे प्रश्न उपस्थित करू,” असे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

काँग्रेसकडून मागणी केली जात असतानाच राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी देखील सरकारला विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली आहे. “पंतप्रधानांना विनंती आहे की त्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावावे आणि पहलगाम हल्ल्यापासून ते शस्त्रविराम याची तारीखेनुसार माहिती द्यावी,” असे ते म्हणाले आहेत.

आज सीजफायर तोडून दाखवाच… DGMOचा निर्वाणीचा इशारा; नाव सांगणार नाही पण आम्ही…

0

भारत आणि पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर गोळीबार अथवा हल्ला न करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी हा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानने काल शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. कालही सीमेवर सीजफायर झालं. त्यामुळे भारतीय सैन्याने पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. आज रात्री जर पाकिस्तानने सीजफायरचं उल्लंघन केलं तर आम्ही पाकिस्तानला तगडं उत्तर देणार आहोत, असा इशाराच भारतीय सैन्याने दिला आहे. भारतीय सैन्याची आज अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद झाली. यावेळी पाकिस्तानचं कसं कंबरडं मोडलं याची माहिती देण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानच्या कुरापतींचीही माहिती देण्यात आली आहे.

भारतीय सैन्याने पाकिस्तानला कसा धडा शिकवला याची माहिती देतानाच पाकिस्तानचं किती मोठं नुकसान झालंय याची माहितीही दिली आहे. नाव सांगणार नाही, पण आम्ही पाकिस्तानचे हायटेक फायटर पाडले आहेत. तसेच आपल्या एअरबेसवर पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पाकिस्तानचा हल्ला हा नाकाम केला आहे, असं भारतीय सैन्याने म्हटलं आहे.

काही तासातच कराराचं उल्लंघन

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत मोठी माहिती दिली. काल दुपारी पाकिस्तानच्या डीजीएमओनी दुपारी 3.35 वाजता आमच्याशी संपर्क साधला. त्यामुळे 10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता दोन्ही देशांनी सीजफायर आणि एअर इंट्रजनला पूर्णविराम दिला. पाकिस्तानच्या डीजीएमओने दिलेल्या प्रस्तावानंतरच हा निर्णय घेण्यात आला. तसेच येत्या 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पाकिस्तानच्या डीजीएमओशी पुन्हा चर्चा होणार आहे. त्यात करार अधिक मजबूत आणि दीर्घकालिक करण्यात येणार आहे. परंतु, नैराश्याने ग्रासलेल्या पाकिस्तानी सैन्याने काही तासातच कराराचं उल्लंघन केलं आहे. क्रॉस बॉर्डर फायरिंग आणि ड्रोनचं आक्रमण करून ते आमच्या सहमतीचं पालन करणार नसल्याचं दिसून आलं आहे, असं राजीव घई म्हणाले.

पाकिस्तानला सज्जड ताकीद

त्यांनी केलेल्या उल्लंघनाचा आम्ही त्याच शब्दात उत्तर दिलं आहे. तसेच पाकिस्तानने काय उल्लंघन केलं याची माहिती आम्ही पाकिस्तानच्या डीजीएमओला हॉटलाईनवरून दिली आहे. तसेच पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर कडक शब्दात उत्तर दिलं जाईल, असा इशाराही पाकिस्तानला देण्यात आला आहे, अशी माहिती राजीव यांनी दिली. तसेच पाकिस्तानने कोणत्याही प्रकारचं उल्लंघन केल्यास त्यांना तात्काळ जशास तसे उत्तर देण्याचे आदेश आमच्या आर्मी प्रमुखांनी आम्हाला दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

हल्ले परतवून लावले

हवाई दलाचे डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशन्स एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनीही या ऑपरेशन्सची माहिती दिली. 8 मे रोजी भारतीय हवाई दलाने लाहोर येथील पाकिस्तानी देखरेख रडार साईट्सला निशाणा बनवलं. आम्ही ठरवून पाकिस्तानला उत्तर दिलं. त्यानंतर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले. आम्ही हे सर्व ड्रोन हल्ले उधळून लावले. पाकिस्तानी ड्रोन आणि मानवरहीत प्रणालीने भारतीय एअरबेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या एअर डिफेन्स सिस्टिम आधीच तयार होत्या. त्यामुळे आम्ही पाकचे हल्ले परतवून लावले, असं अवधेश कुमार भारती म्हणाले.

जिथे नुकसान होईल तिथेच…

पाकिस्तानला जिथे अधिक जखम होईल, अधिक नुकसान होईल, अशाच ठिकाणी आम्ही हल्ले चढवले. आम्ही वेगवान आणि संतुलित उत्तर दिलं. त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई दलाचे अड्डे, कमांड सेंटर्स, सैन्य ढाचा आणि एअर डिफेन्स सिस्टिमला निशाणा बनवलं. भारतीय हल्ल्यात पाकिस्तानचे चकलाला, रफीक आणि रहीम यार खान आदी महत्त्वाच्या एअरबेसचा समावेश होता. त्यानंतर सरगोधा, भुलारी आणि जैकबाबाद आदी प्रमुख सैन्य ठिकाण्यांवरही आम्ही हल्ले चढवले. आमच्याकडे या सर्व सैन्य ठिकाणांना निशाणा साधण्याची संपूर्ण क्षमता आहे. त्यापुढेही आम्ही जाऊ शकतो, असंही भारती यांनी सांगितलं.

पाकिस्तानला मदत तुर्कीला भोवणार, तुर्कीए, अझर बैझानवर बहिष्कार; भारतीय ट्रॅव्हल इंडस्ट्रीची भूमिका

0

मुंबई : वसुदेव कुटुंबकम् या सुत्रावर चालणारा भारत देश हा सर्वच देशांशी चांगले संबंध ठेवून आहे. मात्र तरीही जेव्हा केव्हा भारत आणि पाकिस्तानचा विषय येतो तेव्हा काही भारताविरुद्ध कुरापती करायला तयार असतात. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. मात्र या कुरापतीखोर पाकिस्तानला या काळात चीन, तुर्कीये, अझर बैझान या देशांनी पाठिंबा दिला. त्यामुळे आता भारतातल्या पर्यटकांनी या दोन्ही देशांवर बहिष्कार घातला आहे.

कायमच सहनशील, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा भारत देश. वसुदेव कुटुंबकम् हे भारताचं सूत्र आहे, त्यामुळे सर्वांप्रती आपली प्रेम आणि आपुलकीची भावना असते. मात्र असं असलं तरी मुद्दा जेव्हा भारत पाकिस्तानचा येतो तेव्हा अनेक देश भूमिका घ्यायला कचरतात. विशेषत: मुस्लीम देश. तुमच्यात पडायचं नाही, असा पवित्रा घेत काही देशांनी तटस्थ भूमिका घेतली. मात्र तुर्कीये आणि अझर बैझान या दोन देशांनी उघड उघड पाकिस्तानला पाठिंबा दिलाय. यानंतर भारतीयांमध्ये संतापाची लाट पसरलीय.

सर्वांनी पर्यटनासाठी तुर्कीये आणि अझर बैझानमध्ये जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. आमच्याकडून पैसे कमवायचे आणि आमच्याविरोधात वापरायचे, असा करंटेपणा करणारे हे देश आता बॅन असतील, असा एकमुखी निर्णय ट्रॅव्हल  कंपन्यांनीही घेतलाय. पर्यटकांनीही आपली तिकिटं रद्द केली. भारतातल्या अनेक मोठ्या ट्रॅव्हल एजन्सींनी तुर्की आणि अजरबैजानचे सगळे टूर पॅकेजेस आणि बुकिंग या रद्द केल्या आहेत. दहशतवादाला समर्थन देणा-या देशांमध्ये जाण्यासाठी पर्यटकांना प्रोत्साहन देणार नाही, अशी भूमिका भारतीय ट्रॅव्हल इंडस्ट्रीनं घेतली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाक दहशतवाद्यांना पोसतोय, याचे पुरावेही जगाला दिले. अशा काळात जगातले इतर देश पाठिशी उपस्थित राहावेत इतकी माफक अपेक्षा असताना तुर्कीये आणि अझर बैझान या देशांनी पाकला साथ दिली.  खरं तर, तुर्कीयेची ही जुनी खोड आहे. या देशाला भारतानं कायम मदत केली आहे.

संकटकाळी भारताची तुर्कीयेला मदत :

– 2023 च्या विनाशकारी भूकंपावेळी पंतप्रधान मोदींनी NDRF ची दोन पथकं आणि कुशल डॉक्टर्स पाठवले

– पण काश्मीरच्या मुद्द्यावरून तुर्कीये पाकच्या मागे उभा राहिला

– इतकंच काय, 1965 आणि 71 मध्येही तुर्कीयेकडून पाकिस्तानला लष्करी मदत

– इस्लाम राष्ट्र म्हणून तुर्कीयेचा पाठिंबा तसंच तुर्की आणि पाकिस्तानमध्ये संरक्षण संबंध

–  चीन आणि तुर्कीयेकडून पाकिस्तानला शस्त्र पुरवठा

पाकिस्तान आणि अझर बैझानचे पारंपरिक संबंध आहेत. त्यामुळे तो कायम पाकिस्तानच्या पाठिशी राहिला आहे. तुर्कियेला दरवर्षी सुमारे साडे तीन लाख ते ४ लाख भारतीय पर्यटक भेट देतात. 2024 पासून भारतीय पर्यटकांचा ओघ तिकडे वाढला होता मात्र आता दोन्ही देशांच्या भूमिकांमुळे भारतीयांनी त्यावर बंदी घातली आहे.

राजकोटच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या सुरक्षेसह रचनेबाबत काय काळजी घेण्यात आली? शिल्पकार अनिल सुतार म्हणाले…

0

काही महिन्यांपूर्वी राजकोटमध्ये कोसळलेल्या राजकोटचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता नव्याने पुन्हा एकदा दिमाखात उभा राहिला आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने देशभरात महाराष्ट्राची नाचक्की झाली. मात्र आता मागच्या चूका जाणून घेत या नव्या पुतळ्याचे शिल्पकार अनिल सुतार यांनी पुतळ्याची मजबुती, रचना आणि टिकाऊपणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

छत्रपती शिवरायांचा हा 40 फुटांचा भव्य पुतळा 26 ऑगस्ट 2024 ला दुपारी 1 च्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. पंतप्रधान नरेंद्र मोंदींना पुतळा पडल्याबद्दल माफी मागावी लागली. त्यानंतर वर्षभराच्या आत 83 फुटांचा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला. योग्य देखभाल न केल्याने गंज आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे पडलेल्या या पुतळ्यानंतर राजकीय वतावरणही तापले होते. जगविख्यात शिल्पकार आणि पद्मश्री राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल सुतार यांनी छत्रपती शिवरायांचा तब्बल 83 फूट उंचीचा पुतळ्याची उभारणी केलीय. या पुतळ्याच्या सुरक्षेबाबत आणि रचनेबाबत काय काळजी घेण्यात आलीय?

नव्या पुतळ्याबाबत पुतळ्याचे शिल्पकार काय म्हणाले?

आयआयटीचे अभियंते आणि जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे शिल्पकारही या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी होते. या पुतळ्याची रचना इतकी भक्कम आहे की, वादळं, पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तींचाही विचार करून तो तयार करण्यात आला आहे. जमिनीपासून 93 फूट उंचीचा हा पुतळा असून त्यावर 10 फूट उंचीचा चबुतरा आहे. त्यामुळे हा पुतळा एकूण 103 फूट उंचीचा आहे, जो देशातील सर्वात उंच शिवपुतळा ठरतो.

अनिल सुतार म्हणाले, “मागील वेळचा पुतळा का कोसळला, याचा अभ्यास केला. त्यामध्ये केवळ लोखंडाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे काही महिन्यांतच त्याला गंज लागून कमकुवत झाला आणि वादळात कोसळला. त्यांनी पुढे सांगितले की, “या वेळेस आम्ही अशा चुकांची पुनरावृत्ती होऊ दिली नाही. नवीन पुतळा उभारताना आम्ही ब्राँझ आणि झिंक यांसारख्या धातूंचा वापर केला आहे. हेच धातू आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्येही वापरत आहोत.”नवीन पुतळ्याची रचना अशी करण्यात आली आहे की, तो चक्रीवादळासारख्या तीव्र हवामानातही ताठ उभा राहील. त्याची उंची देखील लक्षणीय आहे.

सुतार यांनी सांगितले, “महाराजांच्या मूळ पुतळ्याची उंची 60 फूट असून तलवारीपर्यंत त्याची एकूण उंची 93 फूट आहे. त्यासोबत 10 फूट उंचीचा चबुतरा देखील आहे.” डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याबद्दल बोलताना अनिल सुतार म्हणाले, “हा एक भव्य प्रकल्प आहे. त्यासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.” नवा पुतळा अधिक मजबूत, हवामान बदलांना तोंड देणारा, आणि दीर्घकाळ टिकणारा असा उभा राहिल्याने प्रशासन आणि जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आता या भव्य पुतळ्याच्या माध्यमातून शिवरायांची शौर्यगाथा आणि इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ऑपरेशन सिंदूर सुरुच! भारतीय सैन्य दलाचं मोठं पाऊल, 20 ठिकाणी छापे, धक्कादायक माहिती समोर

0

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांविरुद्धची मोहीम तीव्र केलीआहे. दरम्यान, राज्य तपास यंत्रणेला एक मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे टाकून स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांची चौकशी सुरू आहे.

पाकिस्तानच्या कुरापतीनंतर भारतीय सैन्य दल सतर्क

राज्य तपास संस्थेने (SIA) एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीर पोलिस काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी सहकाऱ्यांवर आणि ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGW) वर लक्ष ठेवून आहेत. तांत्रिक गुप्तचर यंत्रणेने उघड केले आहे की काश्मीरमधील अनेक स्लीपर सेल पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या मालकांशी थेट संपर्कात होते आणि व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल इत्यादी मेसेजिंग अॅप्सद्वारे सुरक्षा दल आणि प्रतिष्ठानांबद्दल संवेदनशील आणि धोरणात्मक माहिती पुरवण्यात गुंतलेले होते. हे दहशतवादी सहकारी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कमांडर्सच्या आदेशानुसार ऑनलाइन कट्टरपंथी प्रचारात देखील सहभागी होते, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि अखंडतेला धोका निर्माण झाला होता. दरम्यान, सध्या पाकिस्तानच्या कुरापतीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दल सतर्क झालं आहे.

20 ठिकाणी छापे, आक्षेपार्ह साहित्य जप्त

दक्षिण काश्मीरमधील सर्व जिल्ह्यांमध्ये सुमारे 20 ठिकाणी छापे टाकण्यात आले. छाप्यादरम्यान, मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे आणि संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की या संस्था दहशतवादी कटात सक्रियपणे सहभागी आहेत आणि भारताच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला आव्हान देण्यासाठीच नव्हे तर असंतोष, सार्वजनिक अव्यवस्था आणि सांप्रदायिक द्वेष निर्माण करण्यासाठी देखील भारतविरोधी कारवाया करत आहेत.

भारताने घेतला पहलगाम हल्ल्याचा बदला

22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांच्या या भ्याड कृत्याने संपूर्ण देश हादरुन गेला होता. सर्वजण दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत होते. यानंतर, भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका घेतली आणि ऑपरेशन सिंदीर अंतर्गत, पाकिस्तान आणि पीओकेवर हल्ला केला आणि 9 दहशतवादी अड्डे नष्ट केले होते.

नऊ दहशतवादी तळांवरील १०० हून अधिक दहशतवादी ठार; ऑपरेशन सिंदूरबद्दल भारतीय लष्कराने दिली सविस्तर माहिती

0

जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान या हल्ल्याला प्रत्त्युत्तर देत भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूरट मोहिम राबवली आहे. ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. दरम्यान आज ऑपररेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पाकिस्तान आणि पाकिस्तान व्यप्त जम्मू आणि काश्मीर येथील ९ दहशतवादी तळांवरील १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती डीजीएमओकडून देण्यात आली.

ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देण्यासाठी आज(११ मे) रोजी तीन्ही सेना दलांच्या डीजीएमओंनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूरचा उद्देश हा दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करणे हाच होता. या अंतर्गत ९ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते, भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून या ठिकाणे निवडण्यात आली होती, ज्यापैकी काही पीओके मध्ये तर काही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात होती. लष्करच्या मुरीदके येथील तळाला देखील यामध्ये लक्ष्य करण्यात आले.

यावेळी डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, या ९ दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यामध्ये १००हून अधिक दहशतवादी ठार झाले, ज्यामध्ये यूसुफ अजहर, अब्दुल मलिक रऊफ आणि मुदासिर अहमद अशा दहशतवाद्यांचा देखील समावेश होता, जे आयसी८१४ चे अपहरण आणि पुलवामा स्फोटात सहभागी होते. यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उलंघन करण्यात आले आणि शत्रूची प्रतिक्रिया अनिश्तित आणि घाबरलेले होती, ज्यामध्ये दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात नागरिक, गावे आणि गुरुद्वारा अशा धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आले. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक मृत्युमुखी पडले. भारतीय वायु दलाने या हल्लात महत्त्वाची भूमिका बजावली आणि यापैकी काही तळांवर हल्ला केला तसेच भारतीय नौदलाने देखील मदत केली.

एअर मार्शल ए.के. भारती यांनी देखील यावेळी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, ८ आणि ९ मेच्या रात्री २०.३० वाजेपासून आपल्या शहरांवर ड्रोन आणि मानवरहित हवाई वाहनांनी मोठा हल्ला करण्यात आला, हा हल्ला श्रीनगरपासून सुरू होऊन नलियापर्यंत होता… आम्ही तयार होतो आणि आपली हवाई सुरक्षा तयारीने जमिनीवर किंवा शत्रूने लक्ष्य केलेल्या ठिकाणांना कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली… एका संतुलित प्रतिक्रियेअंतर्गत आम्ही पुन्हा एकदा गुजरांवाला येथे सैन्य तळांवर, देखरेख रडारांना लक्ष्य केले… ड्रोन हल्ले सकाळपर्यंत सुरू होते, ज्यांना आम्ही प्रत्युत्तर दिले. हे ड्रोन हल्ले लाहोरच्या जवळून केले जात होते, शत्रूने त्यांच्या नागरी विमानांना देखील लाहोरहून उड्डाण करण्याची परवानगी दिली होती, फक्त त्यांचे विमानच नाहीत तर आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांना देखील अशी परवानगी देण्यात आली होती, जे खूपच असंवेदनशील होते आणि आम्हाला अधिक काळजी घ्यावी लागली.

ऑपरेशन सिंदूर काय आहे

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर नावाने मोहिम राबवली होती. या मोहिमेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हल्ले एअर स्ट्राइक करण्यात आल्या. या हल्ल्यात किमान १०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली होती. यापूर्वी भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना लक्ष्य करत हे ऑपरेशन चालवण्यात आले .

ऑपरेशन ‘सिंदूर’मधून भारताच्या हाती काय लागलं? तीन मोठे उद्दिष्ट पूर्ण

0

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवलं, भारतानं केलेल्या एअर स्टाईकमध्ये 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, या हल्ल्यामध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून देखील भारतावर मिसाई हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भारतानं हा हल्ला परतून लावला. त्यानंतर भारतानं प्रत्यु्त्तर म्हणून केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसानं झालं, पाकिस्तानचे अनेक एअरबेस आणि रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली. दरम्यान आता दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे, मात्र जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, ते सर्व उद्देश पूर्ण झाल्याचं भारतानं म्हटलं आहे.

भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं, पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तामध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला, या हल्ल्यामध्ये 9 दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त करण्यात आले. 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला. भारतानं केलेल्या या कारवाईमुळे देशाची तीन प्रमुख धोरणात्मक उद्दिष्टे यशस्वीरित्या साध्य झाली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई पाकिस्तानला लष्करी, राजकीय आणि मानसिक आघाड्यांवर योग्य प्रत्युत्तर असल्याचे सिद्ध झाली आहे.

दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या लोकांना आणि पाकिस्तानला कडक इशारा दिला होता, आम्ही त्यांचा शोध घेऊन त्यांना कडक शिक्षा करू असं म्हटलं होतं. त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अचूक एअर स्ट्राईक करून पाकिस्तानमधील बहावलपूर, मुरीदके आणि मुझफ्फराबाद सारख्या ठिकाणी असलेले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.

राजकीय आघाडी

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू नदी जल कराराला स्थगिती दिली, दरम्यान आता जरी युद्धविराम झाला असला तरी देखील जोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरू राहातील तोपर्यंत सिंदू नदी जल कारारावरची स्थगिती कायम राहील असं भारताच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे, यातून भारताची कुटनीती दिसून येते.

पाकिस्तानवर मानसिक दबाव

भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भाराताच्या ताकदीची कल्पाना पाकिस्तानला आली आहे, भारत आपल्या घरात घूसून हल्ला करतो हे पाकिस्तानला कळून चुकलं आहे, त्यामुळे हा पाकिस्तानवर मोठा मानसिक दबाव असणार आहे.

पाकिस्तान ‘विजयी’चा रात्री पाकिस्तानला संबोधित करताना शहबाज यांचा दावा! म्हणाले, ‘भारताने मशि‍दींवर…’

0

भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेले असून दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने 6 आणि 7 मे च्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेजवळील शहरांवर ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न भारतीय संरक्षण यंत्रणांकडून हाणून पाडले जात आहेत. 10 मे रोजी भारत-पाकिस्तानमध्ये शस्रसंधीसंदर्भात चर्चा झाल्यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये पाकिस्तानने शस्रसंधीचं उल्लंघन करत पुन्हा हल्ले सुरु केला. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानेच पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी रात्री साडेअकरा वाजता पाकिस्तानमधील नागरिकांना संबोधित केलं. या भाषणामध्ये शरीफ यांनी अनेक बिनबुडाचे आरोप केले. शरीफ यांनी भारतानेच पाकिस्तानवर युद्ध लादल्याचा हास्यास्पद दावा आपल्या भाषणात केला.

या देशांचे मानले आभार

प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी भारत आणि पाकिस्तानमधील शस्रसंधीच्या निर्णयासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून चीन, सौदी अरेबिया, तुर्किए, ब्रिटन, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख आणि अन्य प्रभावशाली व्यक्तींसहीत सहकारी देशांचे आभार मानले. भारताने शस्रसंधीसंदर्भात भाष्य करताना केवळ भारत आणि पाकिस्तानमध्येच याबद्दल चर्चा झाल्यानंतर शस्रसंधीचा निर्णय झालेला, असं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. या ठिकाणीही शहबाज यांनी भारताच्या भूमिकेविरोधातच भूमिका घेतल्याचं दिसून आलं.

आपला विजय झाल्याची घोषणा

युद्धात अधिक नुकसान होईल या भीतीने भारताला फोन करुन यु्द्धबंदीची मागणी करण्याचा पाकिस्तानने चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात त्याप्रमाणे या संघर्षात पाकिस्तानचा विजय झाल्याचं जाहीर केलं. शहबाज शरीफ यांनी, “हा आपल्या धोरणांचा आणि सन्मानाचा विजय आहे. एखाद्या समजूतदार देशाकडून शत्रूला जशी वागणूक दिली पाहिजे तेच आम्ही केलं. हा केवळ संरक्षण दलांचा नाही तर देशातील सर्व 24 कोटी नागरिकांचा विजय आहे,” असं शाहबाद शरीफ म्हणाले. शहबाज यांनी खोटा दावा करताना भारताच्या राफेल विमानांना पाकिस्तानच्या हवाई दलाने टार्गेट केलं आणि त्यांचा हल्ला परतवून लावल्याची बतावणी केली.

भारताबद्दल नको ती विधानं

शहबाज शरीफ यांनी लष्करी तळ आणि पाणी साठ्यांजवळ भारताने हल्ला केल्याचा दावा केला. “आम्ही शत्रूला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना जी भाषा कळते त्याच भाषेत आम्ही उत्तर देण्याचं ठरवलं आहे. आता जे काही टेबलवर बसून बैठक होणार होती ती गाठभेट आता केवळ युद्धाच्या मैदानात होईल,” अशा शब्दांमध्ये शहबाज शरीफ यांनी फुशारक्या मारल्या.

बिनबुडाचे दावे

शाहबाज शरीफ यांनी बिनबुडाचे आरोप करताना, “आपल्या अहंराकारमध्ये बुडालेल्या भारताने कारण नसताना आपली (पाकिस्तानची) क्षेत्रीय अखंडता आणि संप्रभुताला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. ड्रोन आणि मिसाईल्सच्या माध्यमातून निर्दोष लोकांना, मशि‍दींना आणि नागरी वस्ती असलेल्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. त्यांनी आपल्या धैर्याची परीक्षा घेतली,” असा दावा केला. मात्र भारतीय सेनेने यापूर्वी केवळ दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत असं स्पष्ट केलं आहे. शहबाज शरीफ यांनी 12 मिनिटांच्या भाषणात युद्धासंदर्भात वाटेल ते दावे आणि खोटी माहिती दिली.

पाकिस्तानी सार्वभौमत्वाचा चीनला पुळका; तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही चीन नेहमीच तुमच्या पाठीशी उभा

0

इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असताना चीनने पाकिस्तानला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. पाकिस्तानचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता जपण्यासाठी चीन नेहमीच पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहील, असे आश्वासन चीनने दिले आहे. ही माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने जारी केलेल्या एका निवेदनाद्वारे समोर आली आहे.

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि चीनचे परराष्ट्र मंत्री यांच्यात झालेल्या दूरध्वनीवरील संभाषणादरम्यान चीनने ही भूमिका स्पष्ट केल्याचे समजते. नुकत्याच पार पडलेल्या “ऑपरेशन सिंदूर” आणि त्यानंतरच्या शस्त्रसंधीच्या चर्चा व कथित उल्लंघनांमुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अभूतपूर्व पातळीवर पोहोचला आहे. अशा अत्यंत संवेदनशील परिस्थितीत चीनने पाकिस्तानच्या बाजूने दिलेले हे विधान आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री सर्व परिस्थितीत टिकणारी म्हणून ओळखली जाते. दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून सामरिक आणि आर्थिक संबंध दृढ आहेत. चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका (CPEC) हा त्याचाच एक भाग आहे. भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये चीनचा वाढता प्रभाव आणि पाकिस्तानला असलेला त्याचा उघड पाठिंबा हा भारतासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे.

पाठिंब्याचा अर्थ

पाकिस्तानला बळ: चीनच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानला नैतिक आणि राजनैतिक बळ मिळण्याची शक्यता आहे.

भारताला इशारा?: भारत-पाकिस्तान तणावात चीन तटस्थ भूमिका न घेता थेट पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिल्याने, हा भारतासाठी एक अप्रत्यक्ष इशारा मानला जाऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय दबाव: संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानला चीनचा सक्रिय पाठिंबा मिळू शकतो.

चीनच्या या स्पष्ट भूमिकेमुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे. एकीकडे अमेरिका आणि पाश्चात्त्य देश या प्रदेशात शांतता राखण्याचे आणि दहशतवादाला विरोध करण्याचे आवाहन करत आहेत. तर चीनने पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा उपस्थित करत त्याला पाठिंबा देणे, हे या प्रदेशातील सत्तासंतुलनावर परिणाम करणारे ठरू शकते.

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे म्हटले आहे. मात्र या चर्चेतील चीनने पाकिस्तानला दिलेले सार्वभौमत्वाच्या रक्षणाचे आश्वासन हेच सध्याच्या परिस्थितीत सर्वाधिक लक्ष वेधून घेणारे ठरले आहे.