Home Blog Page 193

CID ने चेल्याचे अखेर तोंड उघडलं, मोठा पुरावा हाती!वाल्मिकची आता सुटका नाही?; सूत्रांचा माहितीस दूजोरा

0

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. वाल्मिक कराडसह ९ आरोपी हे तुरुंगात आहे. तर अवादा कंपनी खंडणी प्रकरणी प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याचा खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचं आता निष्पन्न झालं आहे. त्यामुळे कराडसह इतर आरोपींच्या पाय आणखी खोलात गेला आहे.

विशेष म्हणजे वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून ही खंडणी मागितल्याच्या संदर्भात देखील काही महत्वाचे पुरावे सीआयडीच्या हाती लागल्याची शक्याता वर्तवली जात आहे.. यासंदर्भात सीआयडीने अधिकृत सांगितले नसले तरी सूत्रांनी दूजोरा दिला आहे. हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेची तीन दिवसाची सीआयडी कोठडी ही अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. याच तपासातून खंडणी प्रकरणाचे सत्य समोर येणार का पाहणं महत्वाचं असेल.

चौकशीचे ३ दिवस ठरले गेमचेंजर

सुदर्शन घुलेची तीन दिवस सीआयडीने कसून चौकशी केली

– आवाजाचे नमुनेही घेतले.

– वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून खंडणी मागितली का? याचीही चौकशी

– खंडणी कुठे कशी आणि किती मागितली.. याबाबतीतही विचारणा

– यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचीही चौकशी

– तर अवादा कंपनीकडे खंडणी मागतानाचा घटनाक्रम याचीही पडताळणी

– अशा प्रमुख मुद्द्यावर सुदर्शन होण्याची चौकशी

सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नीला कनिष्ठ लिपीकची नोकरी; धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया, नोकरी आधी… 

0

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना केजमधील शिक्षण संस्थेत नोकरी देण्यात आली आहे. केज तालुक्यातील आडस गावातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदाची नोकरी त्यांना देण्यात आली आहे. ही शिक्षण संस्था रमेश आडसकर यांची असून स्वत: रमेश आडसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन अश्विनी देशमुख यांना नियुक्ती पत्र दिलं आहे.

अशातच, सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुखांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. अश्विनी देशमुख यांना नोकरी दिल्याच्या विषयावर मी कुटुंबात आधी चर्चा करणार आणि त्यानंतर त्या बाबत कळवू, असे धनंजय देशमुख म्हणालेत. शिवाय  नोकरी आधी कुटुंबियांना संरक्षण द्या, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली आहे.

नोकरी आधी कुटुंबियांना संरक्षण द्या- धनंजय देशमुख

माझ्या भावाच्या हत्या करणाऱ्याला फाशाची शिक्षा झाली पाहिजे. आज राष्ट्रवादीचे जिल्हा आध्यक्ष राजेश्वर चव्हाण भेटायला आले होते.  त्यांना आम्ही सांगितले की मला सध्या संरक्षणाची गरज आहे. काल (13 फेब्रुवारी) सुदर्शन घुले हा केजचा कोर्टात आला होता. त्यावेळी त्याला समर्थन देण्यासाठी त्याचे समर्थक कोर्टाच्या बाहेर आले होते. जे आम्हाला भीती दाखवतात त्यांचा आधी बंदोबस्त करा, अशी मागणी मी राजेश्वर चव्हाण यांच्याकडे केली आहे. नोकरीच्या आधी माझ्या कुटुंबाला संरक्षण देणे महत्वाचे आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना नोकरी दिल्याच्या विषयावर मी कुटुंबात आधी चर्चा करू त्यानंतर कळवू, अशी भूमिका सध्या धनंजय देशमुख यांनी घेतली आहे. या आरोपीची बी टीम आहे.  ते कायम आमच्या गावाला धमकवतात. गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात.  त्यांचा आधी बंदोबस्त करा अशी मागणी ही धनंजय देशमुख यांनी केली आहे.

सामाजिक बांधिलकी म्हणून नोकरी दिली- रमेश आडसकर

स्वर्गीय संतोष देशमुख आणि आडसकर कुटुंब हे एकच होते. राजकीय क्षेत्रात काम करत असताना वेगळं पण आदर करून त्या कुटुंबाचे नाते निर्माण झाले होते. देशमुख यांची हत्या चुकीच्या पद्धतीने झाली आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून त्याला कुठलाही राजकीय रंग न देता त्यांना नोकरी दिली असल्याचं मत श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे अध्यक्ष रमेश आडसकर यांनी व्यक्त केले आहे.

‘छावा’ नि:शब्द क्लायमॅक्स, विकीचा दमदार अभिनय, रश्मिकाचे डोळे अन् केवळ डोळ्यांनीच क्रूर असा औरंगजेब

0

शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात आपल्यापैकी अनेकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा अभ्यास केलेला असतो. शिवप्रेमींना तसेच ‘छावा’ कादंबरी वाचलेल्या प्रेक्षकांना चित्रपटात पुढे काय घडणार याची कल्पना आधीपासूनच असते. त्यातही बहुतांश प्रेक्षक जेव्हा एखाद्या कथानकाशी भावनिकदृष्ट्या जोडले जातात, तेव्हा या प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर चित्रपट दाखवताना कसं खिळवून ठेवायचं याची सर्वात मोठी जबाबदारी दिग्दर्शकाच्या खांद्यावर असते आता दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी हीच जबाबदारी कशी सांभाळलीये पाहुयात…

चित्रपटाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाच्या बातमीने होते. महाराजांनंतर दख्खनचं हिंदवी स्वराज्य आता कोलमडलेलं असेल, या औरंगजेबाच्या समजाला थेट छेद जातो, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर लुटल्याची बातमी तो ऐकतो आणि ती बातमी ऐकून उध्वस्तही होतो. जोपर्यंत शंभूराजेंना कैद होत नाही तोपर्यंत डोक्यावर ‘ताज’ परिधान करणार नाही असा प्रण घेत औरंगजेब मुकूट बाजूला काढून ठेवतो आणि स्वराज्याच्या दिशेने संपूर्ण फौज घेऊन चालून येतो.

स्वराज्यात आल्यावर पुढची ९ वर्षे महाराज औरंगजेबाच्या सैन्याला सळो की पळो करुन सोडतात…या सगळ्या घटना चित्रपटात अगदी व्यवस्थित आणि इतिहासाबद्दल काहीच माहिती नसणाऱ्या प्रेक्षकांनाही अगदी सहज समजतील अशा मांडण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, महाराजांच्या शोधात दिल्लीहून महाराष्ट्राकडे निघालेला औरंगजेब, दख्खनमध्ये आल्यावर महाराजांच्या शोधात बेहाल झालेला औरंगजेब… शेवटी महाराजांना कैद केल्यावर भलताच आनंदी झालेला औरंगजेब… हे औरंगजेबाच्या भूमिकेचे विविध पैलू अक्षय खन्ना याने अगदी उत्तम साकारले आहेत. राग, चीड, द्वेष, हेवा वाटणे असे सगळे भाव अक्षयच्या डोळ्यात अगदी स्पष्टपणे दिसून येतात. त्याला सिनेमात फारसे संवाद नाहीत पण, केवळ डोळ्यांनीच त्याने पडद्यावर कोणालाही क्रूर वाटेल असा औरंगजेब साकारला आहे.

बुऱ्हाणपूरवर जेव्हा मराठे आक्रमण करतात तेव्हा ‘छावा’च्या रुपात विकी कौशलची पहिली झलक सर्वांना पाहायला मिळते. याच ठिकाणी महाराज थेट सिंहाशी दोन हात करत त्याचा जबडा फाडतात, असा जबरदस्त सीन आहे. संपूर्ण चित्रपट पाहताना विकी कौशल कुठेही खटकत नाही. ही भूमिका केवळ त्याच्यासाठीच राखून ठेवलेली होती, अशी भावना प्रेक्षक म्हणून मनात निर्माण होते. अगदी विकी कौशलला सुद्धा तो पडद्यावर कोणाची भूमिका साकारणार आहे, याची पुरेपूर जाणीव होती. त्यामुळे अभिनेत्याने कोणालाही कुठेच बोट ठेवायला जागा दिलेली नाही.

मात्र, असं रश्मिकाच्या बाबतीत घडत नाही. महाराणी येसूबाईंची भूमिका तिने जशी दिग्दर्शकाच्या नजरेतून पाहिली, ऐकलीये तशीच साकारलीये…यासाठी वेगळी मेहनत घेतल्याचं जाणवत नाही. अनेकदा तिच्या तोंडून संवाद ऐकताना नकळत दाक्षिणात्य अ‍ॅक्सेंट ऐकतोय की, काय असा भास होतो. रश्मिकाची भूमिका अतिशय व्यापक होती, त्यामुळे तिच्या जागी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेला योग्य न्याय देणारी अभिनेत्री नक्कीच अपेक्षित होती. रश्मिकाचे डोळे या भूमिकेसाठी निश्चितच प्रभावी वाटतात पण, संवादातून मात्र ती ऊर्जा आणि स्वराज्याच्या राणीसरकार म्हणून दिसायला हवा होता तो करारीपणा जाणवत नाही.

‘छावा’ची सगळ्यात जमेची बाजू आहे ती म्हणजे याचं संगीत. ‘आया रे तूफान’ आणि ‘जानें तू’ ही दोन्ही गाणी ए. आर. रेहमान यांनी अतिशय उत्कृष्टपणे संगीतबद्ध केलेली आहेत यात काहीच शंका नाही. पण, चित्रपटात शंभूराजे व येसूबाई राणीसरकार यांच्यातील संवाद असो किंवा महाराजांचे लढतानाचे वैयक्तिक सीन याठिकाणी मराठमोळा साज असलेलं बॅकग्राऊंड म्युझिक ( BGM ) अपेक्षित होतं. जे कानांना प्रसन्न करेल आणि त्यामुळे मराठ्यांचा उर अभिमानाने भरून येईल. अनेक दृश्यांमध्ये ते BGM काहीसं मिसिंग वाटतं. याउलट औरंगजेबाच्या प्रत्येक एन्ट्रीला अगदी मुघलशासकाला साजेसं असं BGM वापरण्यात आलं आहे.

‘छावा’मधले सहकलाकार…

लक्ष्मण उतेकरांनी शंभूराजे, महाराणी येसूबाई आणि औरंगजेब यांच्यासह इतर स्टारकास्टवर सुद्धा मोठी मेहनत घेतलेली दिसते. यामध्ये विनीत सिंहला कवी कलशच्या रुपात पाहणं ही सर्वात मोठी पर्वणी ठरते. त्याने कलश यांची भूमिका साकारताना कोणतीही कमी ठेवलेली नाही. शंभूराजे आणि कवी कलश यांची क्लायमॅक्सची जुगलबंदी डोळ्यात पाणी आणते. विनीत सिंहने त्याची भूमिका अगदी चोख निभावली आहे. विनीतने साकारलेल्या भूमिकेचं सर्वात मोठं श्रेय हे संवाद लेखकांचं आहे. इरशाद कामिल आणि ऋषि विरमानी यांनी प्रत्येक संवाद अतिशय विचारपूर्वक लिहिलाय, यामुळेच शेवटची जुगलबंदी पाहताना डोळ्यात नकळत पाणी तरळतं.

याशिवाय संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, आशिष पाथोडे यांनीही त्यांच्या भूमिका चांगल्या वठवल्या आहेत. संतोष साकारत असलेल्या रायाजीच्या भूमिकेचा शेवटचा क्षण प्रेक्षकांना नि:शब्द करून टाकतो. तसेच सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये साकारत असलेल्या भूमिका नेमक्या काय आहेत हाच चित्रपटाचा सर्वात मोठा सस्पेन्स आहे. चित्रपटात प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याची जबाबदारी लक्ष्मण उतेकरांनी अगदी लीलया सांभाळली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सिनेमात कोणीही साकारत नाहीये. याजागी बॅकग्राऊंड व्हॉइस ओव्हर देऊन महाराज शंभूराजेंना वेळोवेळी कसे मार्गदर्शन करतात हे पाहायला मिळतं. ‘छावा’चा पहिला भाग काहीसा संथगतीने जातो. तर, दुसऱ्या भागात म्हणजेच मध्यातरानंतर वेगाने हालचाली होतात. शेवटचा अर्धा तास प्रत्येकाला नि:शब्द करून टाकतो. ‘छावा’ कादंबरीत जसा आहे अगदी तसाच क्लायमॅक्स प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळतो… महाराजांना औरंगजेबाने दिलेला शारीरिक त्रास, तरीही शेवटपर्यंत धर्मासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी लढलेले महाराज या गोष्टी दिग्दर्शकाने अतिशय भावनिकदृष्ट्या मांडल्या आहेत. कुठेही काहीच खटकत नाही… फक्त तो छळ पाहताना अंगावर शहारा अन् डोळ्यात पाणी जरूर येईल. महाराजांचे शेवटचे क्षण आणि येसूबाईंनी तेवढ्याच खंबीरपणे घेतलेले निर्णय याची जोडणी क्लायमॅक्सला अगदी उत्तमप्रकारे केलेली दिसते. शेवटी शंभूराजेंचा एवढा छळ करून औरंजेबाच्या हाती येते ती फक्त हतबलता!

देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था… महापराक्रमी परमप्रतापी, एक ही शंभु राजा था!

शेवटी… या ओळी पडद्यावर दिसतात आणि सिनेमाचा शेवट होतो. हा अभूतपूर्व अनुभव घेण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने व इतिहासप्रेमींनी ‘छावा’ सिनेमागृहांमध्ये जाऊन पाहावा असाच आहे.

शिंदेसेनेचे ‘मिशन पुणे’ थंड, महायुतीत दुय्यम महत्व चा परिणाम? इच्छुकांना हा ‘शब्द’ हवा भेटीगाठीही थंडावल्या

0

राज्यात सगळीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे मिशन टायगर जोरात सुरू असले तरी पुणे शहरात मात्र त्याला ब्रेक लागला आहे. काही माजी आमदारांना थेट शिंदेंकडून विधानपरिषदेचा ‘शब्द’ हवा असल्याची चर्चा आहे.तो मिळत नसल्यानेच सगळे प्रवेश लांबणीवर पडले असल्याचे दिसते आहे. यासाठीच होणाऱ्या भेटीगाठीही थंडावल्या आहेत.

दुसरीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातून अलीकडेच ५ माजी नगरसेवक बाहेर पडले, मात्र त्यांनी शिंदेसेनेचा दरवाजा वाजवण्याऐवजी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे पसंत केले. प्रादेशिकपेक्षा राष्ट्रीय पक्ष चांगला असे त्यांचे त्यावेळचे वक्तव्य होते व त्याचबरोबर खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच असेही त्यांनी शिंदेसेनेला डिवचले होते. त्यावरून बराच गदारोळ झाल्यावर मात्र त्यांनी त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली व शिंदेसेनेबरोबर मनोमीलन असल्याचे जाहीर केले. मात्र ते शिंदेसेनेत आले नाहीत व भाजपमध्ये गेले हे वास्तव कायम राहिले. उद्धव सेनेच्या राहिलेल्या नगरसेवकांपैकीही काहीजण भाजपतच जाणार असल्याची चर्चा आहे.

त्यानंतर शिंदेसेनेतील पुण्यातील प्रवेश जवळपास थांबल्यातच जमा आहेत. माजी शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे यांच्याबरोबरच काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचीही नावे ते शिंदेसेनेत जाणार म्हणून घेतली जात होती. मात्र यातील धंगेकर यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांकडे यात काहीही तथ्य नाही असे स्पष्ट केले, तर मोकाटे व बाबर यांनी यावर काहीच जाहीर भाष्य केलेले नाही, त्याचबरोबर त्यांनी शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांबरोबर होणाऱ्या भेटीही थांबवल्या आहेत. महादेव बाबर यांनी विधानसभा निवडणुकीत उघडपणे पक्षाच्या ( उद्धव सेना) उमेदवाराच्या विरोधात काम केले होते. ज्या आमदारांना प्रवेश करायचा आहे, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे विधानपरिषदेचा शब्द मागितला असल्याचे समजते.

भाजपत प्रवेश करणाऱ्यांची गर्दी वाढत चालली आहे व शिंदेसेनेकडे मात्र कोणीही नाही यावरूनच त्यांचे मिशन पुणे थंड झाले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. काँग्रेसचे काही नगरसेवक पक्ष सोडणार अशी मध्यंतरी चर्चा होती, मात्र तेही भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. तिथूनही शिंदेसेनेत यायला कोणीच इच्छुक नसल्याचे दिसते आहे. राज्याच्या राजकारणात सध्या महायुतीमध्ये शिंदेसेनेला दुय्यम महत्व दिले जात असल्याचा हा परिणाम असल्याचे मत स्थानिक राजकारणातील काही ज्येष्ठांनी व्यक्त केले.

मिशन पुणे यशस्वी होणारच

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा आता लोकनाथ अशी झाली आहे. प्रवेश होणार आहेत, त्यात उद्धवसेनेबरोबरच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यातील काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. माजी आमदारांच्या प्रवेशाची चर्चा वरिष्ठ स्तरावरून सुरू आहे. दिल्लीतील साहित्य संमेलनात शिंदे यांच्या हस्ते काही कार्यक्रम होणार असल्याने त्यानंतर म्हणजे फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात पुण्यात निश्चितपणे प्रवेश होतील.                        – शहरप्रमुख शिवसेना (एकनाथ शिंदे)

अंतरवालीतील साखळी उपोषण स्थगित; CM फडणवीसांचंही केलं कौतुक मनोज जरांगेंचा महत्त्वाचा निर्णय

0

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाबाबत शासनाने चार मागण्यांपैकी दोन मागण्यांबाबत निर्णय घेतला आहे. उर्वरित दोन मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाला पंधरा दिवसांचा वेळ देत मनोज जरांगे यांनी उद्यापासून (ता.15) होणारे साखळी उपोषण सध्या स्थगित केले आहे. ते उपोषण पंधरा दिवस पुढे ढकलले आहे.

अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे यांनी सांगितले, की शासन आरक्षणाबाबत निर्णय घेत नाही, म्हणून गेली दिड वर्ष आंदोलन, उपोषण चालू आहे. या अगोदर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वतीने आमदार सुरेश धस यांनी सांगितले की, आठ मागणी पैकी चार मागणींबाबत तत्काळ निर्णय घेऊ, म्हणून ते सातवे उपोषण स्थगित केले होते. त्या वेळी शासनाने मागणीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

आमच्या चार मागणींपैकी शिंदे समितीला नोंदी शोधण्यासाठी मुदत वाढ मिळाली व हैदराबाद, सातारा, बॉम्बे, गॅजेट लागू करणे या दोन मागणींबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. उर्वरित सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करणे, गुन्हे वापस घेणे बाकी आहे. शासन या बाबत लवकरच निर्णय घेईल, या करिता तीन महिन्यांचा वेळ शासनाने मागितला आहे. तत्काळ पैकी राहिलेल्या दोन मागणींबाबत पंधरा दिवसांत शासनाने निर्णय घ्यावा, काही मागणींमध्ये काही हरकती आलेल्या आहेत. तसेच शासनाने याबाबत विचार केला नाही, तर परत पंधरा दिवसांनंतर साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

शासनाने दोन मागणींबाबत जो निर्णय घेतला आहे, त्या बाबत मुख्यमंत्री फडणवीस व शासनाचे जरांगे यांनी आभार मानले आहेत. मराठा आरक्षणाकरिता शासन जर सहकार्य करत असले, तर आमचं त्यांना सहकार्य राहिल, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. राज्यातील जनतेचे 22 फेब्रुवारी ते 22 मार्च यादरम्यान अडीअडचणीबाबत माहिती घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, असेही जरांगेंनी सांगितले.

दादांची पाठराखण सुरूच! धनंजय मुंडेंना मोठी जबाबदारी, नाराज भुजबळांनाही संधी! या कोअर टीमचा हा उद्देश…

0

मंत्रिमंडळात समावेश केला नसल्याने छगन भुजबळ नाराज आहे. त्यांनी उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.ते भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे विविध आरोपांमुळे धनंजय मुंडे सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धनंजय मुंडे अडचणीत येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंसह छगन भुजबळ यांच्यावर मोठी जबाबादरी दिली आहे.

पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कोअर कमिटीची स्थापना केली आहे. या कमिटीमध्ये धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी, धोरणात्मक निर्णय तसेच जनविकासाच्या योजनांची अंमलबजावणी यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची एक कोअर कमेटी स्थापन केली आहे.

या कमिटीमध्ये एकूण सात जणांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचा या कमेटीत समावेश केला आहे.

अध्यक्ष तटकरे यांनी या कोअर कमेटीचे पत्र प्रसिद्ध केले आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष संघटनेची बांधणी, त्यासाठी आखावे लागणारे कार्यक्रम, धोरणांची आखणी, अंमलबजावणी करणे हा या कोअर टीमचा महत्त्वाचा उद्देश असल्याचे तटकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मंत्रिमंडळातील स्थानवरून मोठा वाद सुरू आहे. भुजबळांचा पत्ता कापण्यात आला आहे. त्यानंतर ते नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सोडून थेट नाशिकला निघून गेले होते. ओबीसी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढे काय निर्णय घ्यायचा याची चाचपणी त्यांनी केली होती. अधून-मधून ते अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करून आपली नाराजी दर्शवत असतात. सोबतच भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन पक्ष सोडण्याचे संकेतही देत असतात. त्यामुळे भाजपचा जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

दिलीप वळसे पाटलांचा समावेश

धनंजय मुंडे सध्या चांगलेच वादात सापडले आहेत. विरोधकांमार्फत रोज त्यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरू आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा केली जात आहे. याच कारणामुळे त्यांना पालकमंत्री सुद्धा करण्यात आलेले नाही. माजी मंत्री व गडचिरोलीचे नेते धर्मराव बाबा आत्राम हेसुद्धा सुद्धा मंत्रिमंडाळात समावेश झाला नसल्याने नाराज आहेत. अनेक खात्यांचा अनुभव गाठीशी असतानाही वळसे पाटील यांनाही मंत्रिमंडळातून लांबच ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बांधणीचे काम या नेत्यांवर सोपवण्यात आले असल्याचे दिसते आहे.

“अजूनही बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम ॲक्टिव्ह…”; संतोष देशमुखांच्या भावाचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले…

0

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा गंभीर आरोप केला आहे.शिवाय या टीमकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले आहेत. तरीही या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

एकीकडे देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुंडाराज उजेडात आला आहे. तर अनेक आरोपींना पोलिसांचंच पाठबळ असल्याचंही उघडकीस आलं होतं. या हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडसह इतर आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. मात्र, कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.

तर याच सर्व आरोपींना मदत करणारी बी टीम अजूनही बीडमध्ये ॲक्टिव्ह असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलं असून पोलिस फरार आरोपींच्या मुसक्या कधी आवळणार आणि देशमुख कुटुंबियांना कधी न्याय देणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

धनंजय देशमुख नेमकं काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, “बीड पोलिसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना अद्याप ताब्यात घेतलेलं नाही. या आरोपींकड पोलिस त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

या बी टीमनेच विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे यांच्यासह इतर आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली आहे. त्यांनीच आरोपींना पळीन जाण्यासाठी गाडी आणि पैसे पुरवले. मात्र, बीड पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत.” शिवाय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना पळून जाण्यासाठी पोलिसांनी मदत केल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात ‘छावा’ची हवा अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधी कमावले दिवशी 14063 शो; 25 कोटी जमा होण्याची शक्यता

0

अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षीत छावा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली. माहितीनुसार सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधीची कमाई झाली आहे. या चित्रपटाचा पहिलाच दिवस खास ठरणार आहे, कारण या चित्रपटाचे हजारो तिकीट अ‍ॅडव्हान्समध्ये बुक झालेले आहेत.

‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सगळ्यांना चित्रपट प्रदर्शनाची उत्सुकता लागली होती. चित्रपटाच्या प्री-बुक केलेल्या तिकिटांच्या विक्रीतून अंदाजे 14 कोटी रुपये मिळण्याची माहिती आहे. देशभरातून या चित्रपटाचे 14 हजार 63 हून अधिक शो असणार आहे. या शोचं अडव्हान्स बुकिंग जवळपास 5 लाख तिकिटांची विक्री अडव्हान्स केली आहे.

अ‍ॅडव्हान्स बुकिंमध्ये 13 कोटींची कमाई केली आहे. तर ब्लॉक सीट्ससह जवळपास 18 कोटी रुपयांचा गल्ला जमा झाला आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपटात 23 – 25 कोटी रुपयांची कमाईने सुरुवात करण्याची शक्यता आहे.

चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत आहे. अक्षय खन्ना या चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगवरुन तरी हा चित्रपटाला चांगली पसंती दिसून येत आहे.

पृथ्वीराज-शिवराज पुन्हा एकाच मैदानात उतरणार; जामनेर आंतरराष्ट्रीय कुस्तीयुद्धास सज्ज ९ देशांचे नामांकित मल्ल

0

जळगावच्या जामनेर तालुक्यात येत्या १६ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कुस्तीयुद्ध रंगणार आहे. देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षेसह भारतातील नामवंत पैलवान आंतरराष्ट्रीय पैलवानांशी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. या दंगलसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऑलिम्पिक विजेता रवी कुमार दिया, ऑलिम्पियन नरसिंग यादव, कॉमनवेल्थ विजेता राहुल आवारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने रंगणार्‍या कुस्तीत ५० महिला खेळाडूंच्या कुस्त्याही खेळविण्यात येणार आहेत. ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री कोळी एस्टोनियाच्या युरोपियन चॅम्पियन मार्टा पाजूलाशी भिडेल. महाराष्ट्र केसरी अमृता पुजारीची गाठ रोमानियन ऑलिम्पियन कॅटालिना क्सेंटशी पडेल.

या स्पर्धेच्या निमित्ताने ९ देशांचे नामांकित मल्ल जामनेर गाठणार असून या महाकुंभाचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ इराणच्या जलाल म्हजोयूबशी पंगा घेणार आहे तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड रोमानियाचा युरोपियन विजेता फ्लोरिन ट्रिपोनशी लढणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरीत पराभवामुळे पेटून उठलेला शिवराज राक्षेही आपली ताकद दाखवण्यासाठी जामनेर गाठणार आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह अनेक महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय पैलवानांना धोबीपछाड देण्यासाठी मैदानात उतरण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. भारतासह फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया, इराण, ब्राझील आणि जॉर्जिया या देशांचे ऑलिंपियन, जागतिक विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उप-महाराष्ट्र केसरी असे नामांकित पैलवान सहभागी होणार आहेत. स्पर्धेत प्रमुख २२ लढतींसह ३०० पैलवानांच्याही कुस्त्या लावल्या जाणार आहेत.

भारताच्या कुस्ती इतिहासात प्रथमच तब्बल ९ देशांचे नामवंत महिला आणि पुरुष मल्ल एकाच मंचावर भिडणार आहेत. स्पर्धेत सहभागी खेळाडूंवर बक्षीसांचा अक्षरशा वर्षाव होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिकांसह मानाची गदा आणि ‘देवाभाऊ केसरी’ हा किताब प्रदान केला जाणार आहे. ही स्पर्धा रविवार, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ८ वाजेपर्यंत चालणार आहे.

स्पर्धेतील प्रमुख लढती

ट्रिपल महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री कोळी वि. युरोपियन चॅम्पियन मार्टा पाजूला (एस्टोनिया),

प्रतीक्षा बांगडी (पहिली महिला महाराष्ट्र केसरी) वि. अंजलीक गोन्झालेझ (वर्ल्ड चॅम्पियन-प्रâान्स),

शिवराज राक्षे (डबल महाराष्ट्र केसरी) वि. गुलहिर्मो लिमा (वर्ल्ड चॅम्पियन),

अमृता पुजारी (महिला महाराष्ट्र केसरी) वि. कॅटालिना क्सेन्टन ऑलीम्पियन – रोमानिया),

सिकंदर शेख (महाराष्ट्र केसरी) वि. घेओघे एरहाण (युरोप चॅम्पियन – मोल्दोवा),

पृथ्वीराज मोहोळ (महाराष्ट्र केसरी) वि. जलाल म्हजोयूब ( आशियाई पदकविजेता – इराण),

हर्षवर्धन सदगीर (महाराष्ट्र केसरी) वि. पै. इमामुक (वर्ल्ड चॅम्पियन – जॉर्जिया),

सुमित मलिक (अर्जुन पुरस्कार, ऑलिंपियन) वि. पै.जस्सा (शेर ए पंजाब),

पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी) वि. पै. जॉन्टी गुज्जर (आंतरराष्ट्रीय विजेता – दिल्ली ),

वेताळ शेळके (भवानी केसरी – महाराष्ट्र) वि. दिनेश गोलिया (आंतरराष्ट्रीय विजेता- हरियाणा),

फ्लोरिन ट्रिपोन (युरोप चॅम्पियन – रोमानिया) वि. महेंद्र गायकवाड़ (उपमहाराष्ट्र केसरी),

भूपिन्दर सिंह (भारत केसरी – पंजाब ) वि. युधिष्ठिर दिल्ली (राष्ट्रीय विजेता-हरियाणा),

कमलजित धूमछडी (रुस्तुम ए हिंद – पंजाब) वि. विक्रांत कुमार (राष्ट्रीय विजेता – हरियाणा),

सतेंदर मलिक (भारत केसरी – हरियाणा ) वि. योगेश पवार (उप महाराष्ट्र केसरी),

बाला रफिक शेख (महाराष्ट्र केसरी) वि. सोनू (िहमाचल केसरी- हरियाणा),

हरियाणा माउली जमदाडे (महान भारत केसरी) वि. मनजीत खत्री (भारत केसरी-हरियाणा),

शिवा चव्हाण (राष्ट्रीय विजेता – महाराष्ट्र) वि. रजत मंडोथी (त्रिमूर्ती केसरी – हरियाणा),

मुन्ना झुंजुर्के (महाराष्ट्र चॅम्पियन) वि. हरिओमी ट्रॅक्टर (राष्ट्रीय विजेता- दिल्ली),

बाळू बोडके (महाराष्ट्र चॅम्पियन) वि. मनजीत मेला (राष्ट्रीय विजेता- हरियाणा),

वेदांतिका पवार (उपमहाराष्ट्र केसरी) वि. शिवानी मेटकर (राष्ट्रीय विजेती),

अपेक्षा पाटील (राष्ट्रीय विजेती ) वि. सोनाली मंडलिक (राष्ट्रीय विजेती).

युक्रेन- रशिया युद्ध घातक वळणावर, रशियाचा युक्रेनच्या अणुभट्टीवर ड्रोन हल्ला

0

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. आता हे युद्ध घातक वळणावर आले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मोठा दावा केला आहे. रशियाने चेर्नोबिल येथील अणुभट्टीवर ड्रोनने हल्ला केल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु रशियाचा ड्रोन अणुउर्जा भट्टीच्या कवचावर पडल्याचे युक्रेनने म्हटले आहे. मात्र, रशियन ड्रोन हल्ल्यानंतर प्लांटमधील रेडिएशनची पातळी सामान्य आहे. दरम्यान, यापूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी यापूर्वीच युक्रेनवर अणुहल्ला करण्याचा इशारा दिला होता.

हा तर दशतवादी हल्ला- झेलेन्स्की
झेलेन्स्की यांनी रशियाने केलेल्या या हल्ल्यास दहशतवादी हल्ला म्हटले आहे. आण्विक स्थळांना लक्ष्य करणे धोकादायक असल्याचे म्हटले. मात्र, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी हल्ल्याची पुष्टी केल्यानंतर अग्निसुरक्षा अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणल्याचे सांगितले.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया साइट एक्सवर सांगितले की, गुरुवारी रात्री रशियाच्या ड्रोनने चेरनोबिलमधील अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेने तातडीने उपाययोजना केली. त्यामुळे गळती रोखली गेली. उच्च-स्फोटक वॉरहेडसह रशियाकडून हा ड्रोन हल्ला झाला. रशियाकडून आतापर्यंत चौथ्या पॉवर युनिटवर हल्ला करण्यात आला.

रशियाच्या हालचालींमुळे चिंता वाढली
युद्धादरम्यान युक्रेनमधील अणु प्रकल्पांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. अणु प्रकल्पांच्या सुरक्षेच्या जोखमीवर भर देताना निष्काळजीपणाला जागा नाही. आयएईएला नेहमीच हाय अलर्ट राहावे लागेल. चेरनोबिल घटना आणि झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पाभोवती अलीकडे वाढलेल्या लष्करी हालचालींमुळे चिंता वाढली आहे. आमच्याकडे चेरनोबिल अणु साइटवर एक टीम आहे, जी परिस्थितीचा तपास करत आहे.

दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्धाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक संदेश अमेरिकेतून दिला आहे. भारत या प्रकरणी तटस्थ नसल्याचे त्यांनी सांगितले. व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी शांततेच्या बाजूने भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.