Home Blog Page 194

एकनाथ शिंदेंचा फडणवीसांना शह, मुख्यमंत्र्यांच्या वॉररुमच्या धर्तीवर समांतर या रुमची स्थापना

0

महायुती सरकार सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुप्त संघर्ष सुरु असल्याच्या चर्चा सातत्याने ऐकायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बहुतांश बैठकांना एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावलेली नाही. पालकमंत्री पदाच्या वादानंतरही एकनाथ शिंदे हे नाराज होऊन साताऱ्याला आपल्या गावी निघून गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली होती. यानंतरही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात संघर्ष सुरु असल्याची चर्चा आहे. याचा प्रत्यय आता आणखी एका गोष्टीच्या निमित्ताने आला आहे. राज्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉररुममधून आढावा घेतला जातो. मात्र, आता एकनाथ शिंदे यांनी याच धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र को-ऑर्डिनेशन रुम स्थापन केली आहे. एकनाथ शिंदे यांचे हे पाऊल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शह असल्याचे मानले जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या को-ऑर्डिनेशन रुमच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात वादाचा दुसरा अंक सुरु झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका वगळता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलावलेल्या बहुतांश विभागाच्या बैठकांना दांडी मारली आहे. फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या अगदी स्वत:च्या विभागाच्या बैठकांनाही शिंदे हजर राहिले नव्हते. फडणवीस यांनी बोलावलेली 100 दिवसांची आढावा बैठक असो किंवा अलीकडे आयोजित करण्यात आलेली महापालिकांसंदर्भातील बैठक असो, एकनाथ शिंदे कोणत्याही बैठकांना हजर नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज असल्याची चर्चा रंगली होती.

एकनाथ शिंदेंच्या को-ऑर्डिनेशन रुममधून काय काम होणार?

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे नगरविकास, म्हाडा, एमएसआरडीसी, एसआरए, गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती आहेत. या खात्यांच्या सर्व प्रकल्पांचा एकनाथ शिंदे यांच्या को-ऑर्डिनेशन रुममधून आढावा घेतला जाईल. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना आणि सचिवांना वॉर रुमच्या बैठकांप्रमाणे को- ऑर्डिनेशन रुमच्या बैठकांनाही हजर राहावे लागेल. यामुळे सरकारी अधिकाऱ्यांची ओढाताण होऊ शकते. त्यामुळे एक समांतर सत्ताकेंद्र तयार होऊ शकते. परिणामी ही को ऑर्डिनेशन रुम एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमला शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याची सूत्रे असताना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून अनेक गरजू आणि गरीब रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली होती. मात्र, आता मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे हा कक्षही एकनाथ शिंदे यांच्या हातातून गेला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाच्या प्रमुखपदी पुन्हा एकदा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचं नाव जाहीर होताच भाजपचा वार सुरु; मुख्यमंत्रिपदास 10जण शर्यतीत पण प्रदेशाध्यक्ष

0

हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष करून काँग्रेसने पक्षातील अनेक दिग्गजांना धक्का दिला आहे. युवा नेत्याला संधी देण्यात येणार असे बोलले जात होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात वेगळेच नाव जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हीच संधी साधत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना खोचक टोला लगावला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे पहिल्या फळीतील दहा नेते मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत होते. आपलीच सत्ता येणार आणि मुख्यमंत्री होणार या थाटात ते वावरत होते. मात्र,विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे यांपैकी एकानेही प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली नाही. इतकी वाईट परिस्थिती काँग्रेसवर ओढावली असल्याचे टीका त्यांनी केली.

प्रदेशाध्यक्ष कोणाला करायचे हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मात्र काँग्रेसच्या दाहा मुख्य नेत्यांनी अध्यक्षपद स्वीकारले नाही हे दुर्भाग्यपूर्ण आहे. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारायला कोणी तयार नाही, त्यमुळे कोणाल तरी बकरा करण्यासाठी नाव शोधत असल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने मला सांगितले होते असा दावाही यावेळी बावनकुळे यांनी केला.

काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याला मुख्यमंत्री व्हायचे होते. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच त्यांनी मंत्रिमंडळ तयार करून खाजगीत खातेवाटपसुद्धा केले होते, याकडे लक्ष वेधून त्यांनी कोणाचेही नाव न घेता माजी प्रदेशाध्यक्षांवर निशाणा साधला. महाराष्ट्राचे नेतृत्व आणि प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी कोणी तयार नाही इतकी वाईट परिस्थिती काँग्रेस पक्षाची झाली आहे. यापुढे काँग्रेसला गळती लागल्याचेही दिसेल असे सूचक वक्तव्यसुद्धा बावनकुळे यांनी केले.

…म्हणून साळवी यांचा शिंदेसेनेत प्रवेश

महाविकास आघाडी ही अविचारी होती. त्यांचा अजेंडा विकासाचा कधीही नव्हता. केवळ सत्तेसाठी व मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे सेनेने अभद्र युती केली होती. त्यामुळे ठाकरे यांच्याकडे असलेले नेते आता शिंदे यांच्याकडे जात आहे. ठाकरे गटाने हिंदुत्वाचा विचार सोडल्यामुळे लोक शिंदेसेनेकडे जात असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीवर बावनकुळे यांनी काँग्रेसचा एकही बडा नेता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हता, एवढी दुर्दशा काँग्रेसची झाली असल्याची टीका केली होती. त्यावर सत्ता मिळाली की, अनेकांच्या डोक्यात हवा जाते. त्यांचा लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो असं प्रत्युत्तर काँग्रेसचे नवनियुक्त विधानसभेचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही तसेच झाले आहे. ते दुसऱ्याला कमी लेखत आहेत. मात्र, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आले नाही असे सांगून काँग्रेसचे नवनियुक्त विधानसभेचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला यापेक्षा चांगले दिवस येतील, अशी आशा व्यक्त केली.

रणवीर अलाहबादियाला सुप्रिम कोर्टाकडून दिलासा नाही; नेमकं काय आहे प्रकरण?

0

प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहबादियाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. दोन-तीन दिवसांत हे प्रकरण सूचीबद्ध केलं जाईल, असं सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटलंय. आसाममध्ये पोलिसांनी रणवीरसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रणवीरचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी CJI कडे लवकर सुनावणीची मागणी केली होती.

‘बीअर बायसेप्स’ या ऑनलाइन टोपणनावाने प्रसिद्ध असलेला युट्यूबर रणवीर अलाहबादियाने त्याच्याविरुद्ध विविध राज्यांमध्ये दाखल केलेल्या अनेक एफआयआरविरुद्ध दिलासा मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला आईवडिलांबद्दल अश्लील प्रश्न विचारला होता. त्यावरून त्याच्याविरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल झाले आहेत. रणवीने वकील अभिनव चंद्रचूडमार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेद्वारे त्याने वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याच्याविरुद्ध नोंदवलेले एफआयआर एकत्र करण्याची मागणी केली. गुवाहाटी पोलिसांनी त्याला आणि शोमध्ये सहभागी झालेल्या इतरांनाही समन्स बजावले आहेत. अटकेच्या भीतीने रणवीरने अटकपूर्व जामीनदेखील मागितला आहे.

या याचिकेवर लवकर सुनावणीची विनंती रणवीरच्या वकिलांकडून करण्यात आली होती. मात्र सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने ही विनंती नाकारली आहे. सरन्यायाधीशांनी तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या खटल्यासाठी आधीच तारीख निश्चित करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे खन्ना यांनी रणवीरच्या लीगल टीमला अधिक माहितीसाठी न्यायालयाच्या रजिस्ट्रीशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.

समय रैनाच्या शोमध्ये रणवीरने आईवडिलांबद्दल विचारलेल्या अश्लील प्रश्नावरून देशभरात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला. याविरोधात गुवाहाटीच्या एका रहिवाशाने औपचारिक तक्रार दाखल केली. त्यानंतर आसाम पोलिसांनी अश्लीलता आणि सार्वजनिक नैतिकतेशी संबंधित कलमांखाली रणवीरविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणात रणवीरसह समय रैना, आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह, अपूर्वा मखिजा यांचा समावेश आहे. या सर्वांविरोधात गुवाहाटीमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलंय.

आसाम पोलिसांचं पथक सध्या रणवीर, समय रैना आणि इतरांना समन्स बजावण्यासाठी मुंबईत आहे. समय रैनालाही चार दिवसांत आसाम पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र समय त्याच्या शोनिमित्त परदेशात असल्याने चौकशीला हजर राहण्यासाठी त्याने अतिरिक्त वेळ मागितला आहे.

अंगावर काटा अन् डोळ्यात पाणी आणणारा क्लायमॅक्स; ‘छावा’ पाहून नेटकरी भावूक, वाचा सविस्तर

0

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट अखेर आज (14 फेब्रुवारी) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर पाहून प्रेक्षक प्रभावित झाले होते. आता थिएटरमध्ये ‘छावा’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. विकी कौशलच्या करिअरमधील सर्वांत जबरदस्त परफॉर्मन्स.. अशा शब्दांत प्रेक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. गेल्या काही दिवसांत ‘छावा’ची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा कमालीची झाली होती. त्यामुळे हा चित्रपट कमाईचे नवे विक्रम रचण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिलेल्या प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, ते जाणून घेऊयात..

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ‘छावा’ला पाचपैकी साडेचार स्टार्स रेटिंग दिली आहे. ‘इतिहास, भावना, देशभक्ती या सर्वांचं उत्कृष्ट मिश्रण. विकी कौशलची जबरदस्त कामगिरी. आताच्या पिढीतील सर्वोत्तम अभिनेता म्हणून त्याने आपलं स्थान निश्चित केलंय. तर कथाकार म्हणून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरही यशस्वी ठरले आहेत,’ असं त्यांनी लिहिलंय.

‘दहा ऑस्कर पुरस्कार वितळवून त्याची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बनवा आणि त्या मूर्तीने अभिनेता विकी कौशलचा सन्मान करा’, अशा शब्दांत एका युजरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘छावामध्ये विकी कौशल चमकतो. इतर कलाकार ठीक आहेत. चित्रपट मोठा वाटतो आणि पार्श्वसंगीत त्या काळातील वाटत नाही, पण सर्वकाही योग्य आहे. शेवटची वीस मिनिटं तुम्हाला हादरवून सोडतात आणि त्याचा परिणाम थिएटरबाहेर पडल्यानंतरही राहतो’, असं एका युजरने लिहिलंय. ‘प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पहावा’, असंही काहींनी म्हटलंय. ‘अंगावर काटा आणणारा आणि डोळ्यात पाणी आणणारा क्लायमॅक्स’, अशा शब्दांत प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई भोसलेंच्या भूमिकेत आहे. अभिनेता अक्षय खन्नाने यात औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने तलवारबाजी आणि घोडेस्वारीचंही प्रशिक्षण घेतलं आहे.

प्रत्येक विवाहित महिलेला वाटतेय आपलीच कथा.. गुगलवर सर्वाधिक सर्च होतोय ‘हा’ चित्रपट

0

अरेंज्ड मॅरेज, लग्नापूर्वी सर्वकाही छान पण लग्नानंतरचा सासुरवास पाहून प्रत्येक विवाहित महिलेला जणू ही आपलीच कथा पडद्यावर मांडली की काय, असा प्रश्न पडू लागतोय. अत्यंत कमी बजेटच्या या चित्रपटाने सोशल मीडियावर बरीच चर्चा घडवून आणली आहे. सध्या गुगलवर हा चित्रपट सर्वाधिक सर्च केला जातोय. त्याचप्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्मवरही त्याला सर्वाधिक ओपनिंग मिळाली आहे. हा चित्रपट आहे ‘मिसेस’. आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री सान्या मल्होत्रा यात मुख्य भूमिकेत आहे. ‘मिसेस’ या चित्रपटाला 150 मिलियन स्ट्रीमिंग मिनिटांसह ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा ओपनिंग वीकेंड मिळाला आहे. या चित्रपटाने प्रीमिअरपासूनच देशभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हा चित्रपट गुगलवर 4.6/5 च्या युजर्सच्या रेटिंगसह आणि 7.3 आयएमडीबी रेटिंगसह सर्वाधिक सर्च केला गेलेला चित्रपट ठरला आहे.

आरती कडव या मराठमोळ्या दिग्दर्शिकेनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटाच्या कथेचं आणि कथा सादरीकरणाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून खूप कौतुक होत आहे. सान्याने यात दमदार भूमिका साकारली आहे. सान्या नेहमीच चौकटीबाहेरच्या भूमिका साकारताना दिसते. त्यामुळे तिची चित्रपट निवड किती परफेक्ट आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यामध्ये सान्यासोबच निशांत दहिया, कंवलजित सिंह यांच्याही भूमिका आहेत. ‘द ग्रेट इंडियन किचन’ या मल्याळम चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.

प्रशिक्षित डान्सर आणि डान्स शिक्षिकेची ही कथा आहे. अरेंज्ड मॅरेजनंतर ती घरकामात इतकी व्यग्र होते की ती स्वत:चं अस्तित्त्व, स्वत:ची स्वप्नं, स्वत:चं स्वातंत्र्य सर्वकाही गमावून बसते. लग्नानंतर विवाहित महिलेनं कसं राहिलं पाहिजे आणि घरातील कामं कशी केली पाहिजेत, याबद्दल समाजाने ठरवलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात ती अक्षरश: खचून जाते. सोशल मीडियावर आणि विशेषत: महिलांमध्ये या चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. दैनंदिन आयुष्यातील अनेक प्रसंग त्यात जसंच्या तसं दाखवण्यात आल्याचं अनेकांनी म्हटलंय. त्यामुळेच प्रेक्षकांना हा चित्रपट आपलासा वाटतोय. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये क्लोजिंग चित्रपट म्हणून ‘मिसेस’ची निवड झाली होती. तिथेच सान्याला तिच्या दमदार अभिनयकौशल्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

पुण्यात आजवरची सर्वात मोठी एक अमानवी क्रूर कारवाई, एका झटक्यात 465 एकरवरील 2845 अनधिकृत पाडकाम?

0

पुण्यातील पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर म्हटले जाते, परंतु या भागातील चिखली आणि कुदळवाडीमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोठी कारवाई सुरू आहे. आतापर्यंत 465 एकर जमिनीवरील 2845 अनधिकृत बांधकामे आणि टिन शेड हटवण्यात आले आहेत. या भागात अनेक छोटे-मोठे व्यवसाय सुरू होते, जिथे लाखो लोकांना रोजगार मिळाला होता. पण महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे सुमारे एक ते दोन लाख लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. चिखली-कुदळवाडीमध्ये 8 फेब्रुवारीपासून ही मोहीम सुरू आहे आणि सोमवारपर्यंत ती सुरू ठेवण्याची योजना आहे.

नदी प्रदूषण आणि वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनांमुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. या कारवाईमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कारण, या भागातील बहुतेक भंगार गोदामं होती. ज्यावर हजारो कुटुंबांची उपजीविका अवलंबून होती.

स्थानिक व्यावसायिक आणि कामगारांनी या कारवाईला विरोध केला होता. त्यांचं म्हणणं आहे की, ते गेल्या 25 वर्षांपासून या भागात व्यवसाय करत होते आणि महानगरपालिकेला करही भरत होते, मग अचानक एवढी मोठी कारवाई का करण्यात आली? त्यांनी असाही आरोप केला की, स्मार्ट सिटी प्रकल्पात भंगार गोदाम हा अडथळा मानला जात होते.

व्यापारी आणि कामगारांनी केला विरोध

लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले की, ही एक अमानवी आणि क्रूर कृती आहे, ज्यामुळे हजारो लोक बेघर आणि बेरोजगार झाले आहेत. या नुकसानीची भरपाई महानगरपालिका आणि प्रशासन करणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेण्याचेही सांगण्यात आले आहे.

राष्ट्रवादी माजी आमदार तुकाराम बिडकरांचे अपघाती निधन विदर्भातील राष्ट्रवादीचा माळी समाजाचा मोठा चेहरा हरपला

0

राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या दुचाकीचा अपघात झाला यात त्यांचे निधन झाले आहे. माजी आमदार दुचाकीने जात असताना एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती.या अपघातात तुकाराम बिडकर गंभीर स्वरूपात जखमी झाले होते, त्यांना बिडकर यांचा अपघात अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी जवळ झाला होता. बिडकर त्यांच्यावर अकोलामधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याचदरम्यान त्यांचा मृत्यू झालाय.

अकोला जिल्ह्यातील अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मुर्तीजापुरचे माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड यांचे अपघातात निधन झाले. अकोलामधील शिवणी शिवर गावाजवळील पेट्रोल पंपासमोर एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अकोला विमानतळावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बावनकुळे यांना विमानतळवर भेटले होते. बावनकुळे यांना भेटून बिडकर दुचाकीने घरी येत होते.

बिडकर यांची दुचाकी शिवर गावाजवळ आली असताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू टेम्पोने धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तुकाराम बिरकड यांनी 2004 ते 2009 या काळात आमदारकी भुषवली होती. मुर्तीजापूर मतदारसंघाचे आमदार होते. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा माळी समाजातील मोठा चेहरा होते. आमदार होण्याआधी तुकाराम बिडकर अकोला जिल्हा परिषदेत सभापती होते.

शरद पवार हे परिपक्व नेतृत्व त्यांनी राज्य संस्कृती दाखवली, यांनी विकृती दाखवली; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

0

राजकारणात मन मोठं असावं लागतं, पण मला एक पुरस्कार काय मिळाला आणि यांची जळफळाट सुरू झाली असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शरद पवारांनी राज्याची संस्कृती दाखवली, पण उद्धव ठाकरेंनी विकृती दाखवली असं एकनाथ शिंदे म्हणाले. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे माध्यमांशी संवाद साधत होते.

शरद पवार यांच्यावर अविश्वास दाखवणे हे दुर्दैव आहे. पवार साहेब परिपकव नेतृत्व आहे. एक पुरस्कार दिला तर एवढा जळफळाट व्हायचं कारण काय? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला. राजकारणात मोठं मन हवं. आपण कमरेखाली कधीही वार केले नाहीत, कोणाबद्दल वाईट कधी बोललो नाही असंही ते म्हणाले.

ठाकरेंनी विकृती दाखवली

एकनाथ शिंदे म्हणाले की, “महादजी शिंदे यांचा अपमान काही लोकांनी केला, साहित्यिकाचा अपमान केला. ज्यांना शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री केलं त्यांनीच हा अपमान केला. शरद पवार यांनी राजकारणापलीकडे काम केलं आहे. पवार साहेब यांनी राज्याची संकृती दाखवली, तर या माणसांनी विकृती दाखवली. ही त्यांची खेकडा वृत्ती आहे, ही पोटदुखी आहे. हे कंपाउंडरकडून औषध घेतात. पोटदुखी थांबण्यासाठी चांगल्या डॉक्टरकडून औषध घ्या.”

घरात बसून काम होत नाही, हे शरद पवार यांनी सुद्धा आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मी काय काम केलं याची माहिती शरद पवारांनाही आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावला. दिल्लीसमोर गुडघे टेकणार नाही म्हणायचे आणि आता दिल्लीत काय करताय? असा प्रश्नही शिंदे यांनी ठाकरेंना विचारला.

ठाकरे गटाचे तीन खासदार शिंदेंच्या मंत्र्यांच्या घरी भोजनासाठी उपस्थित राहिल्याबद्दल ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, हे आपल्या खासदारांवर अविश्वास दाखवत आहेत. आधी माझ्यावरसुद्धा असात अविश्वास दाखवाला होता, माझं सुद्धा खच्चीकरण केलं होतं.

राजन साळवींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मातोश्रीशी एकनिष्ठ समजल्या जाणाऱ्या कोकणातल्या राजन साळवींनी आज ठाकरेंना रामराम करत शिंदेंचा झेंडा हाती घेतला. ठाण्यातल्या आनंदाश्रमात त्यांनी मशाल खाली ठेवत धनुष्यबाण हाती घेतला. ठाकरेंसाठी आता आऊटगोईंग नवं राहिलं नसलं तरी साळवींचा शिवसेनाप्रवेश सोहळा मात्र त्यांना जबदरदस्त झटका देणारा होता. आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करत साळवींनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंचा हात धरला. पक्षप्रवेशानंतर बोलताना साळवी भावूक झाल्याचं दिसून आलं. जुनी शिवसेना सोडावी लागतेय यासाठी दु:खाचे अश्रू तर जुन्हा सहकाऱ्याच्या शिवसेनेत प्रवेश होतोय म्हणून आनंदाचे अश्रू डोळ्यांत असल्याचं साळवी म्हणाले.

विजय वडेट्टीवारांवर काँग्रेसची मोठी जबाबदारी;वडेट्टीवार यांचे काँग्रेसमधील महत्व पुन्हा एकदा अधोरेखित

0

विधानसभा निवडणुकीपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील नियुक्त्या अखेर काँग्रेस पक्षाने आज (ता. 13फेब्रुवारी) जाहीर केल्या आहेत. त्या मागील अडीच वर्षांपासून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळणारे विजय वडेट्टीवार यांच्याकडे काँग्रेस पक्षाने आणखी एक महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमधील वडेट्टीवार यांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होते.

माजी विरोधी पक्षनेते असलेल्या विजय वडेट्टीवार यांची काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. गेली पाच वर्षांपासून हे पद संगमनेरचे आमदार आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे होते. मागील खेपेला विरोधी पक्षनेतेपदाची इनिंग खेळणारे वडेट्टीवार यांच्याकडे आता विधीमंडळ पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाच्या एनएसयूआय या संघटनेतून विजय वडेट्टीवार यांनी महाविद्यालयीन शिक्षणापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र, पुढे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे वडेट्टीवार यांना १९९८ मध्ये शिवसेनेने विधान परिषदेवर संधी दिली. त्यानंतर २००४ मध्ये ते चंद्रपूरच्या चिमूरमधून विधानसभेवर निवडून आले.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली वडेट्टीवार यांनीही २००५ मध्ये शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये आल्यानंतर तीन वर्षांनंतर त्यांना मंत्रिपद मिळाले होते. तेव्हापासून ते काँग्रेससोबत आहेत. पुढे राणेंनी काँग्रेस सोडली पण वडेट्टीवार हे काँग्रेससोबत कायम राहिले.

पुढे २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते आणि वडेट्टीवार यांच्याकडे विधानसभेतील उपनेतेपद देण्यात आले होते. पुढे विखे पाटील हे भाजपसोबत गेल्यानंतर वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते झाले होते. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर पुन्हा एकदा विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते करण्यात आले होते. आता काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर विधीमंडळ पक्षनेतेपदाची जबाबदारी टाकली आहे.

आगामी काळात काँग्रेस पक्षातील वरिष्ठ आणि कनिष्ठ नेत्यांना सोबत घेऊन वडेट्टीवार यांना काम करावे लागणार आहे. काँग्रेस पक्षाची परिस्थिती तोळामोसाची असताना मोठ्या अवघड परिस्थितीत वडेट्टीवार यांच्याकडे ही जबाबदारी आली आहे. या माध्यमातून त्यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत पक्षाची ताकद दाखवून द्यावी लागणार आहे.

मविआत मित्रपक्षांनी दगा दिल्याने विधानसभेत दारुण पराभव, जयंत पाटील स्पष्टच बोलले

0

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत अपयशाला सामोरे जावे लागेल. महाविकास आघाडीत जागा वाटपापासून वाद सुरू असल्याचे दिसून आले होते. त्याशिवाय, लहान घटक पक्षांना जागा सोडताना मविआने हात आखडता घेतल्याचे म्हटले जाते. आता, मविआतील विसंवादावर भाष्य करण्यात आले आहे.विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी दगा दिल्याने पराभव स्वीकारावा लागला असल्याचे वक्तव्य शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केले.

जयंत पाटील यांनी म्हटले की, निवडणुकीत आम्ही ‘इंडिया आघाडी’त होतो. डाव्या पक्षांच्या मतांमुळे ‘इंडिया’चे महाराष्ट्रात 31 खासदार निवडून आले. आम्ही प्रामाणिकपणे काम केले असल्याचे पाटील यांनी सांगितले. परंतु विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आम्हाला मदत केली नाही. मित्रपक्षांनी दगा दिला, त्यामुळे आमचा पराभव झाला, अशा शब्दात भाई जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली.

शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा अलिबाग येथील ‘पीएनपी’ नाट्यगृहाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पाटील यांनी इंडिया आघाडीतील पक्षांवर पराभवाचे खापर फोडले.

विधानसभा निवडणुकीत डाव्या प्रागतिक पक्षांच्या आघाडीने महाविकास आघाडीकडे 20 जागांची मागणी केली होती. मात्र, मविआने एवढ्या जागा सोडण्यास नकार दिला. त्याच्या परिणामी काही मोजक्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या. तर, दुसरीकडे जी जागा शेकापला सोडण्यात आली, त्यातील काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती झाल्या. रायगडमधील बालेकिल्ल्यात शेकापला अपयशाला सामोरे जावे लागले. सांगोला ही एकच जागा शेकापला जिंकता आली.