Home Blog Page 179

मोदींचा ‘मन की बात’ मध्ये लठ्ठपणा साठी ‘हा’ सल्ला; मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या चौपट! दरमहा १० % कमी….

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११९ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात वेगाने वाढणाऱ्या आरोग्याशी संबंधित समस्येवर भाष्य केले आहे. पंतप्रधान म्हणाले, ‘डेहराडून येथे राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटनादरम्यान मी एक अतिशय महत्त्वाचा विषय उपस्थित केला ज्यामुळे देशात एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. विषय म्हणजे लठ्ठपणाची झपाट्याने वाढणारी समस्या आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे अनेक प्रकारचे आजार होतात. आपण एकत्रितपणे छोट्या प्रयत्नांनी या आव्हानाचा सामना करू शकतो. यासाठी पहिले पाऊल म्हणजे तुम्ही दरमहा १० टक्के कमी तेल वापरण्याचा निर्णय घ्या. हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तेल खरेदी करताना पूर्वीपेक्षा १० टक्के कमी तेल खरेदी करणे. लठ्ठपणा कमी करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असेल.

पंतप्रधान म्हणाले, एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनण्यासाठी आपल्याला लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागेल. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की दर आठ व्यक्तींपैकी एक व्यक्ती लठ्ठपणाने ग्रस्त आहे. शिवाय, गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाच्या घटना दुप्पट झाल्या आहेत. त्याहूनही चिंताजनक बाब म्हणजे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या चौपट वाढली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)म्हटले आहे की २०२२ मध्ये जगभरात सुमारे २.५ अब्ज लोक जास्त वजनाच्या समस्येने ग्रस्त होते. हे आकडे खूप गंभीर आहेत, ज्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांमध्ये वाढ होऊ शकते.ते म्हणाले की तेल हे लठ्ठपणाचे सर्वात मोठे कारण आहे. म्हणून, सर्वप्रथम, दर महिन्याला तुमच्या जेवणातील तेलाचे प्रमाण १० टक्के कमी करा. जर तुम्ही हळूहळू या गोष्टी कमी केल्या तर तुमचे वजन कमी होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लठ्ठपणा वाढवणाऱ्या पदार्थांचा वापर जेवणात करू नका. शुद्ध सात्विक गोष्टींचे सेवन करा. पंतप्रधान मोदींनी यापूर्वीही अनेकदा लठ्ठपणा कमी करण्यास सांगितले आहे. पण लठ्ठपणा कसा कमी करायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यावर अनेक तज्ज्ञांनी उपाय सांगितले आहेत.

भारतातील सर्वांत श्रीमंत 5 बाबा, ज्यांची संपत्ती जाणून व्हाल थक्क

0

भारतात हिंदू धर्माचा प्रचार, प्रसार करणारे अनेक संतबाबा आहेत. भारतात काही बाबा असे देखील आहे जे कायम त्यांच्या अनुयायांना योग्य मार्गदर्शन करणाताना दिसतात. अनेक ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबा अध्यात्मीक ज्ञान देत असतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. भारतात असे काही बाबा आहेत, ज्यांची संपत्ती देखील फार तडगी आहे. त्यांच्या संपत्तीचा आकडा देखील थक्क करणारा आहे.

बाबा रामदेव : योग गुरु बाबा रामदेव आयुर्वेद, व्यवसाय, राजकारण आणि कृषी क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जातात. रामदेव बाबा यांनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडची सुरुवात केली. रिपोर्टनुसार, त्यांची संपत्ती जवळपास 1,600 कोटी आहे.

श्री श्री रविशंकर : श्री श्री रविशंकर यांचे 151 देशांमध्ये अंदाजे 300 दशलक्ष अनुयायी आहेत. सोशल मीडियावर त्यांचे अनेक अध्यात्मीक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. श्री श्री रविशंकर हे आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक आहेत. रिपोर्टनुसार, त्यांच्याकडे आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रे, आरोग्य आणि फार्मसी केंद्रांसह अंदाजे 1000 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

सद्गुरु जग्गी वासुदेव: सद्गुरुंनी ईशा फाउंडेशनची स्थापना केली आहे. एवढंच नाही तर, 13 एप्रिल 2027 रोजी सद्गुरूंना प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांची अंदाजे एकूण संपत्ती 18 कोटी रुपये आहे.

आसाराम बापू: परदेशात त्यांचे एकूण 350 आश्रम आहेत. याशिवाय त्यांच्याकडे 17 हजार बालसंस्कार केंद्रे आहेत. 2021 पर्यंत आसाराम बापूंच्या ट्रस्टची वार्षिक उलाढाल 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली होती.

प्रेमानंद महाराज : प्रसारमाध्यमातील बातम्यानुसार प्रेमानंद महाराज यांच्याकडे कोणतीही खाजगी मालमत्ता नाही.त्याच्याकडे कोणत्याही स्वरुपाची अचल संपत्ती नाही. प्रेमानंद महाराज यांनी स्पष्ट केलेय की त्यांच्याकडे खाजगी कार देखील नाही.ही कार त्यांच्या सेवकांची आहे.जे ते प्रवास करताना वापरतात.

प्रेमानंद महाराज म्हणतात की जेथे ते राहतात त्याचे वीजबिल देखील भक्तच भरतात, प्रेमानंद महाराज अनेकांना पायी पदयात्रा करताना दिसतात. परंतू काही वेळा ते ऑडी कारमध्ये बसलेले ही दिसतात. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत असतात.

“आम्हालाच महायुतीत काही मिळत नाही, आणखी राज ठाकरेंना घेतले तर…”; लोकसभेत त्यांचा काही फायदा झालेला नाही. यांनी व्यक्त केली खंत?

0

एकीकडे बीड, परभणी, कृषी विभागातील घोटाळा, ईव्हीएम मशीन यांसारख्या विषयांवरून विरोधक महायुती सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे महायुती मात्र आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. बड्या नेत्यांच्या भेटी गाठी वाढत चालल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत महायुती आणि मनसे युतीत असणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच महायुतीतील एका मित्रपक्षाने यावर नाराजी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. विधानसभा निवडणुकीचे निकाल मागे टाकून आता पुढील महापालिका निवडणुकीच्या तयारीला राज ठाकरे लागले आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याबाबतचा आपला विरोध कायम ठेवला आहे.

आम्हालाच महायुतीत काही मिळत नाही, आणखी राज ठाकरेंना घेतले तर…

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकदा भेटले ते ठीक. मात्र, त्यांना वारंवार भेटणे हे काही बरोबर नाही. राज ठाकरे यांना महायुतीत घेणे बरोबर नाही. त्यांचा महायुतीला काही फायदा होत नाही. ते आले तर आम्हाला काय मिळणार? मित्रपक्षांनी आम्हाला विचारात घेतले पाहिजे. आम्हाला आत्ताच काही मिळत नाही. राज ठाकरे आल्यावर काहीच मिळणार नाही. लोकसभेत त्यांचा काही फारसा फायदा आम्हाला झालेला नाही. राज ठाकरे हे आमचे चांगले मित्र आहेत. त्यांना महायुतीबरोबर घ्यायचे वगैरे चर्चा सुरू आहेत. पण त्यांना घेऊ नये असे आमचे मत आहे. आम्ही असताना राज ठाकरेंची आवश्यकता नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. राज ठाकरेंच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जाणे अयोग्य आहे असे नाही पण मला वाटते की, राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला आले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी सारखे जाणे काही योग्य नाही. महाराष्ट्रात महायुतीची ताकद वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे याचा आम्हाला आनंद आहे.

दरम्यान, राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेला सुरुवात केली, तेव्हा शासनाच्या तिजोरीत निधी होता. आता तिजोरीतील पैसे संपत चालले आहेत. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना निकष लावण्यात येत आहेत, असे सांगत रामदास आठवले यांनी महायुतीलाच घरचा आहेर दिला. तसेच महापालिकेच्या निवडणुका कधीही होतील. त्या पार्श्वभूमीवर महायुतीतील पक्षांनी एकत्र निवडणूक लढावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यात महायुतीचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये १० ते १२ जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे. आम्हाला लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक यात एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे आमची ही अपेक्षा आहे. तसेच नवी महामंडळे स्थापन केली जातील, त्यातील तीन अध्यक्षपदे तरी आम्हाला मिळाली पाहिजेत, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

पुण्यात गुन्हेगारांचा उच्छाद! मध्यरात्री कुरकुटे हॉस्पिटल गल्लीत घुसून दहशत टोळक्याने केली वाहनांची तोडफोड

0

पुणे शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. वडगाव शेरी भागात शनिवारी मध्यरात्री एका टोळक्याने वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

यात्रेच्या दरम्यान हाणामारीचा प्रकार

वडगाव शेरीतील ग्रामदेवतेची वार्षिक यात्रा दोन दिवस सुरू होती. यात्रेदरम्यान अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्रीच्या वेळी काही तरुण जोरजोरात आरडाओरडा करत परिसरातून जात होते. यावेळी ऋषीकेश पवळे यांनी त्यांना हटकले. त्यामुळे संतप्त झालेल्या टोळक्याने रात्री एकच्या सुमारास कुरकुटे हॉस्पिटलजवळील गल्लीत घुसून दहशत माजवायला सुरुवात केली.

वाहनांची तोडफोड आणि शिवीगाळ

टोळक्याकडे लाकडी दांडके होते. त्यांनी परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. दोन रिक्षा आणि १० ते १२ दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी गोंधळ पाहून घराबाहेर येण्यासही घाबराट दर्शवली. टोळक्याने वाहनांच्या काचा फोडल्या, काही गाड्यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, तसेच लोकांना शिवीगाळही केली.

स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ही घटना घडल्यानंतर वडगाव शेरीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी अशा प्रकारच्या घटनांमुळे परिसरातील लोकांनी स्वतःची सुरक्षा वाढवावी लागेल, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. अनेकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

पोलीस तपास आणि आरोपींना अटक

घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. काही आरोपी पसार झाले होते, मात्र पोलीस पथकाने झडती घेत काही जणांना ताब्यात घेतले आहे. चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी सांगितले की, “या प्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांची ओळख पटवून अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.”

शहरातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय

पुण्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटना वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच शहरात अशाच प्रकारच्या तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. गुन्हेगारांना कठोर शिक्षा न मिळाल्यास अशा प्रकारच्या घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी जलदगतीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

टीम इंडियाला सुखद धक्का, जसप्रीत बुमराह दुबईत दाखल; बुमराहला पाहून भारतीय चाहतेही सुखावले

0

भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी दुबईतील आंतरराष्ट्रीय मैदानावर दाखल झाला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहने चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून माघार घेतली होती. त्याच्या जागी हर्षित राणाला संघात जागा देण्यात आली. पण आता कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या सामन्यापूर्वी बुमराह दुबईमध्ये दाखल झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून विश्रांती घेत असलेल्या बुमराहला आज आपल्याला दुबईमध्ये पाहाता येणार आहे. बुमराच्या आगमनामुळे पाकिस्तानी चाहत्यांची चिंता नक्कीच वाढली आहे.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह मैदानाबाहेर गेला. त्यानंतर बुमराह इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत पुनरागमन करेल असे सांगितले जात होते. पण दुखापत गंभीर असल्यामुळे शेवटच्या क्षणी जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून वगळण्यात आले आणि भारतीय संघाला मोठा धक्का बसला. बुमराहसारखा गोलंदाज संघाबाहेर असणे ही भारतीय संघासाठी धक्कादायक गोष्ट होती.

चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतल्यानंतर बुमराहने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे त्याच्या पुनर्वसन प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर बुमराह वर्कआऊट करताना देखील पाहायला मिळाला. त्यानंतर बुमराह लवकरच पुनरागम करेल अशी चाहत्यांना खात्री बसली आणि आता बुमराहला दुबईत पाहून भारतीय चाहते सुखद धक्का बसला आहे.

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: दिवसभर सभामंडप ‘हाउसफुल’ कवी संमेलनाचा 11 तासाचा विक्रम

0

नवतरुणी तिचे सौंदर्य, सौंदर्यातील विविध छटा, प्रेम प्रकरण, प्रेमभंग, यापासून ते निसर्गातील विविध छटा निसर्गाचे विविध रूप, शेतकऱ्यांची व्यथा, शाळा, आपले गाव, शहर आदीचे वर्णन करणाऱ्या कवितांनी आज दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीतील सयाजीराव गायकवाड सभामंडपात कवी संमेलनाने तब्बल 11 तासाहून अधिक काळ सुरू राहण्याचा विक्रम केला. राज्यभरातून आलेले नवकवी आणि त्यांना दाद देणारे काव्यप्रेमींनी दिवसभर सयाजीराव गायकवाड सभामंडप हाउसफुल झाला होता. रात्री दहा पर्यंत या मंडपात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी ओसंडून वाहत होती.

दिल्लीत भरलेल्या ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या श्रीमंत सयाजीराव गायकवाड सभामंडप, व छ. संभाजी महाराज विचारपीठ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे त्यांच्या अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते या संमेलनाचे उद्घाटन खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते झाले यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रदीप पाटील, आयएएस. रोहिणी भाजीभाकरे, युवराज नळे,निखिल आण्णा घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी देहू येथून आलेले तुकाराम महाराज यांचे वंशज ह. भ. प. रामदास महाराज यांच्यासह देहुतील इतर वारकऱ्यांचे सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

11 तासाहून अधिक काळ चाललेले या कवी संमेलनात राज्यभरातून आलेल्या 110हून अधिक नवकवींनी आपल्या कविता सादर केल्या. यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलाला कोणी मुलगी देत नाही अशी व्यथा मांडण्यापासून ते तरुणींचे सौंदर्य, तिचा सहवास मिळावा यासाठी अतुर झालेल्या प्रेमींच्या मनातील भावना, निसर्ग, रानातील सौंदर्य आदी विषयांवर कवींनी आपल्या मनातील भावना आपल्या कवितांमधून व्यक्त केल्या. तर दुसरीकडे भारतात सध्या सुरू असलेल्या विविध धार्मिक विचारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर, महापुरुषांच्या विचारावर काहींनी कविता सादर केल्या.

कविता सादर करणाऱ्यांमध्ये राज्यातील प्रामुख्याने रमेश रेळेकर, विक्रम शिंदे, प्रा. नितीन नाळे, अँड. जयश्री तेरकर, मीना महामुनी, बाळासाहेब गिरी, जितेंद्र सोनवणे, प्रतिभा मगर. कृष्णा साळुंखे, युसुफ सय्यद. आणि बेळगाव येथून आलेले रवींद्र पाटील यांच्यासह ११० हून अधिक कवींनी कविता सादर केल्या.

कोलेस्ट्रॉल डायबिटीज ८४ औषधं ‘नॉन-स्टँडर्ड क्वालिटी’ या कॅटेगिरीत गुणवत्ता चाचणीत अपयशी, शासन अलर्ट जारी

0

देशभरात औषध नियंत्रण अधिकाऱ्यांनी केलेल्या औषधांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालात धक्कादायक बाब पुढे आली आहे. गॅस, कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीजसाठी दिली जाणारी तब्बल ८४ औषधं गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरल्याचं या अहवालात सांगण्यात आले आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२४ करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार विविध कंपन्यांची ८४ औषधं गुणवत्तेच्या निकषावर अपयशी ठरली आहेत. यामध्ये गॅस, उच्च कोलेस्ट्रॉल, डायबिटीज आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे. या औषधांना ‘नॉन-स्टँडर्ड क्वालिटी’ या कॅटेगिरीत ठेवण्यात आलं आहे.

सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनद्वारे नियमितपणे बाजारातील औषधांची तपासणी केली जाते आहे. बाजारातून निकृष्ट आणि बनावट औषधं हद्दपार करणे आणि या औषधांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारा संभाव्य परिणाम टाळणं हा या मागचा उद्देश आहे.

सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशने नुकताच काही मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत. त्यानुसार, प्रत्येक ड्रग इन्स्पेक्टरला महिन्याला किमान १० औषधांची तपासणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे ही औषधं त्याच दिवशी प्रयोगशाळेत पाठवावे असे निर्देशही देण्यात आलं आहेत.

बाजारातील औषधांची काटेकोरपणे तपासणी करण्याच्या या निर्णयामुळे औषध उद्योगात पारदर्शकता वाढेल आणि नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधं मिळतील असा विश्वासही व्यक्त केला जातो आहे.

गुंडांच्या टोळ्या तुम्हीच पोसल्या, गज्या मारणे टोळीवरून मोहोळांवर धंगेकरांचा बोचरा वार

0

कुख्यात गुंड गजानन मारणे याचा भाचा आणि मारणे टोळीतील गुंडांनी कोथरूड मध्ये एका युवकाला बेदम मारहाण केली. हा तरुण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील कर्मचारी असल्याचे समोर आले. पुण्यातील या गुंडगिरीवरून माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे. पेरले तेच उगवले..! असे म्हणत धंगेकरांनी मोहोळांवर टीकास्त्र सोडले आहे.

शिवजयंतीच्या दिनी कोथरूड परिसरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीसमोरून मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणारा देवेंद्र जोग हा आपली बाईक घेऊन गेला. त्यावर मिरवणुकीसमोरून गेला, याचा राग आल्याने चार जणांनी त्याला थांबवलं आणि शिवीगाळ करत वाद घातला. यातच देवेंद्र जोगला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जखमी झालेल्या देवेंद्र जोगला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त करत पोलिस आयुक्तांना या घटनेबाबत कडक कारवाई करण्याची सूचना केली. या घटनेनंतर पुण्यातील गुंडगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला.

धंगेकरांचा बोचरा वार…

काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी गुंडगिरीच्या मुद्यावर मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे. रविंद्र धंगेकर यांनी ‘पेरले तेच उगवले..!’असे नमूद करत म्हटले की, जेव्हा माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना गुंडांच्या या टोळ्या त्रास देतात तेव्हा याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणाऱ्या खासदारांनी स्वतःच्या ऑफिस मधील मुलाला मारहाण झाल्यानंतर मात्र अचानक आक्रमक भूमिका घेतली असल्याचे त्यांनी म्हटले.

रविंद्र धंगेकर यांनी पुढे म्हटले की, पुण्यनगरीच्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल खासदारांनी खरंतर आत्मपरीक्षण करायला हवं. या गुंडांच्या टोळ्या आपणच पोसलेल्या आहेत. आपणच निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना धमकवण्यापासून तर पैसे वाटप करण्यापर्यंत या टोळ्यांचा वापर केला.आज याच गुंडांच्या टोळ्या माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना सर्वत्र त्रास देत आहेत. फरक फक्त इतकाच आहे की, आज ते तुमच्या ऑफिसपर्यंत पोहचलेत म्हणून आपण जागे झालात असा टोलाही रविंद्र धंगेकर यांनी लगावला.

पोलिसांचा वचक नाही?

काही महिन्यांपूर्वीच पुण्यात पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर कुख्यात गुन्हेगार, गुंड तसेच या टोळीचे नामचीन गुंड यांची परेड पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडली. मात्र त्यानंतरही गुंडा गजानन मारणे याच्या टोळीतील सदस्यांनी कोथरूड भागात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्याचे मालक या नावाने सोशल मिडीयात रील्स टाकून मारणे यांची दहशत वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे पोलिसांचा गुंडांवरील वचक कमी होऊ लागला आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे.

महापालिकेच्या शाळेत रमले शैक्षणिक वर्ष 2005- 06 चे माजी विद्यार्थी

0

वारजे, ता. 23 : कै.गुलाबराव तुकाराम वांजळे या प्रशालेत माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2005- 06 मधील अहिरे पुनर्वसन महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाची रुपरेषा आखली.

विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा आणि मुख्याध्यापकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या सत्कारातून विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आपले प्रेम व आदर व्यक्त केला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदीप उर्फ बाबा धुमाळ आणि प्रमुख पाहुणे दिलीप कदम होते. वारजे विभागातील मनपा शाळेत अशा प्रकारचा माजी विद्यार्थी मेळावा प्रथमच आयोजित केला आहे. असे गौरवोद्गार शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष धुमाळ यांनी या वेळी काढले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिलीप कदम यांनी या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या प्राथमिक शाळेशी नाळ जोडून ठेवल्याबद्दल
त्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी यावेळेस कथन केल्या. प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका पद्मजा पेठकर यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थी प्रमुख आणि अहिरे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष किरण वांजळे यांनी महापालिकेतील माजी विद्यार्थी संघटनेच्या रोपाचे वट वृक्षात रूपांतर करण्याचे या प्रसंगी शब्द दिला. या कार्यक्रमात सर्व ज्येष्ठ शिक्षकांनी आपल्या मनोगतातून शाळेतील सुंदर आठवणींना उजाळा दिला. तसेच विद्यार्थी सुद्धा लहानपणापासूनच्या प्राथमिक शाळेतील कितीतरी आठवणीमध्ये रममाण झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा सुतार या विद्यार्थिनीने केले. सारीका खाडे ,ज्योती कदम, किरण वांजळे , अशोक ढोले, अजय इंगळे, स्वप्नील कुंभार, स्वप्निल मापारे, गौरी मोरे, सीता सरकते, निलेश मालवीय, प्रतिभा गावडे, अविनाश समगीर, बाळू राठोड या विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नातून हा स्नेहा मेळावा यशस्वीपणे पार पडला. यावेळी इयत्ता पहिलीपासूनच्या शिक्षिका निशा बेंगळे या मुख्याध्यापिका पदावरुन सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त सर्व आजी माजी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या भेटी घडवून आणाव्यात याविचाराने प्रेरित होऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. किरण वांजळे यांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केले.

हट्टी अन् व्यवसायिक हितार्थ भूमिका घेणाऱ्यांना मोठा धक्का; बालभारती-पौड फाटा रस्त्याची स्थगिती कोर्टाने उठवली

0

वेताळ टेकडीवरून बालाभारती ते पौड फाटा या प्रस्तावित रस्त्याचा प्रचंड विरोध झाल्यानंतरही मार्ग अखेर मोकळा झाला असून या प्रकल्पावर गत दीड वर्षांपासूनची स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. कर्वे रोड, पौड रोड, लॉ कॉलेज रोड आणि सेनापती बापट रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने बालभारतीपासून थेट पौड फाट्यापर्यंत रस्ता प्रस्तावित केला. महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार, हा रस्ता बालभारती येथून सुरु होता. वेताळ टेकडीवरून विधी महाविद्यालयाच्या पाठीमागून केळेवाडी येथील पौड फाट्याजवळ संपतो. यासाठी 252 कोटी 13 लाख रुपये खर्च प्रस्तावित केला. सर्वसामान्य पुणेकरांच्या हितासाठी आपली भूमिका न घेता विशिष्ट वर्गासाठी चेतना जागृत करणाऱ्या समुदायाला उच्च न्यायालयाने चपराक दिली असल्याने अखेर आमचा लढा यशस्वी झाला असून तातडीने सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करावे यासाठी पुणे महापालिका स्तरावरती पाठपुरावा सुरू केला असून पुणे महापालिकेसह पुणेकरांच्या हितार्थ आम्ही देखील कॅव्हेट करणार आहोत अशी माहिती पुणे महापालिका माजी विरोधी पक्ष नेते उज्वल केसकर यांनी न्यूजमेकरशी बोलताना सांगितले.

 सदरील रस्ता टेकडीवरून जाणार असल्याने येथील पर्यावरणाची हानी होणार असल्याचा दावा करत पर्यावरण प्रेमी नागरिक आणि संघटनांनी यास विरोध केला. पाण्याचे झरे आटतील, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होईल, पुण्यातील टेकड्या, जैवविविधता नष्ट केली जात आहे असे आरोप या रस्त्याच्या विरोधात हजारो नागरिकांनी मोर्चा देखील काढला होता. नागरिकांच्या विरोधामुळे सत्ताधाऱ्यांनीही या रस्त्याबाबत सावध भूमिका घेतली होती. पण महानगरपालिका या रस्त्यासाठी आग्रही होती. या कामासाठी सप्टेंबर 2023 मध्ये निविदा प्रक्रिया सुरु केली जाणार होती, पण नागरिकांचा विरोध वाढल्याने हे काम थांबवण्यात आले. त्याचवेळी हा प्रकल्प पर्यावरण विरोधी असल्याचा आरोप करत नागरी चेतना मंचाने उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली. त्यामध्ये या कामावर स्थगिती देण्यात आली होती. या रस्त्याला विरोध करणारी पर्यावरण प्रेमी आणि चेतना मंचची याचिकाही फेटाळून लावली आहे. या आदेशामुळे पुणे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. हा रस्ता करताना महापालिकेने योग्य प्रक्रियेचा अवलंब केला आहे, असे निरिक्षण नोंदवत न्यायालयाने रस्त्याला हिरवा झेंडा दाखवला आहे. आता या काही रस्त्याचा काही भाग जमिनीवरून तर काही भाग हा उन्नतमार्ग (इलोव्हेटेड) असणार आहे. या उन्नत मार्गामुळे टेकडी फोडावी लागणार नाही असा दावा महापालिकेने केला आहे.

आपला परिसर संस्थेच्या वतीने निकाल लागल्यानंतर तातडीने पुणे महापालिका आयुक्त मा.डॉक्टर राजेंद्र भोसले यांना सविस्तर मागणीचे निवेदन दिले आहे यामध्ये पौड फाटा बालभारती रस्ता करण्याबाबत मुंबई हायकोर्ट यांचे आदेश PIL 14/2022 ची प्रत देऊन पौड फाटा बालभारती रस्ता तातडीने सुरू करण्यासंदर्भामध्ये योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. मेहरबान हायकोर्टामध्ये याचिका प्रलंबित होती परंतु मनाई आदेश नव्हता, राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीच्या अभावी हा रस्ता रखडला होता असे स्पष्ट सांगत या रस्त्याचा तयार डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) हा रस्ता व्हावा यासाठी आम्ही आग्रही असून पुणेकरांच्या हितासाठी संस्थेच्या वतीने सुप्रीम कोर्टात कॅव्हेटही दाखल करण्याची तयारी सुरू करण्यात आल्याची कल्पना देण्यात आली आहे. होतो.

पौड फाटा बालभारती या रस्त्याचे काम सुरू होणार होते परंतु काही राजकीय नेत्यांनी यात खोडा घातला आणि प्रशासनाने साथ दिली असल्यामुळेच फक्त मनाई  आदेशावरती संपूर्ण प्रक्रिया थांबवण्याचा घाट प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. पुण्याची परिस्थिती वाहतुकीची परिस्थिती बिकट होत चालली आहे. पुणेकरांना हा रस्ता हवा आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय करून सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते पालकमंत्री अजितदादा पवार मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील माधुरीताई मिसाळ आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या रस्त्याचा शुभारंभ करावा ही विनंती निवेदनात करण्यात आली आहे.