Home Blog Page 17

समुद्रात रायगडच्या कोरलई इथं संशयास्पद पाकिस्तानी बोट?; बोटीतून व्यक्ती उतरल्याचा संशय ‘कोम्बिंग’ सुरू 

0

रायगडच्या मुरूड तालुक्यातील कोरलई इथं खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.संशयास्पद बोट आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे. सगळीकडे तपासणी अन् नाकाबंधी लावण्यात आली आहे. बोटीची तपासणीही करण्यात येत आहे. बोट कुणी आणि का इथं लावली, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. बोटीमधून काही व्यक्ती समुद्रात उतरल्याचा संशय आहे. बोटीबाबत माहिती मिळताच जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी आणि झाडाझडती सुरू आहे.

बोटीतून अनेकजण उतरले –

रायगडमधील कोलाई बंदरात खोल समुद्रात आढळलेली ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या बोटीतून काही व्यक्ती उतरल्याचा संशय असून पोलिसांनी रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. रायगड पोलिस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, बाँब शोधक आणि नाशक पथक अशा सर्व यंत्रणा पोहोचल्या.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

सुरक्षा यंत्रणाकडून मध्यरात्रीपासूनच संशयास्पद ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली. कोरलईच्या लाईट हाऊसपासून साधारण दोन नोटिकल मैल अंतरावर ही बोट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या सर्व घटने बाबत पोलिस यंत्रणा काहीही बोलायला तयार नाही. जिल्हा प्रशासनाकडूनही अद्याप कोणताही माहिती देण्यात आलेली नाही.

पंढरपूरहून परतणार्‍या वारकरी दाम्पत्यावर काळाचा घाला; टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार

0

पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणार्‍या श्रीगोंदा तालुक्यातील वारकरी दाम्पत्याच्या दुचाकीला एका टँकरने जोराची धडक दिली. यात पतीचा जागीच मृत्यू झाला, तर रुग्णालयात उपचारादरम्यान पत्नीची प्राणज्योत मालविली. हा भीषण अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण येथे रविवारी सकाळी घडला. मल्हारी बाजीराव पवार (वय 57) पंखाबाई मल्हारी पवार (वय 50 रा. येळपणे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) अशी मृतांची नावे असून, या दुर्घटनेमुळे येळपणे गावावर शोककळा पसरली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार पती-पत्नी हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूरकडून पुणे दिशेकडे दुचाकीने (एमएच 16 एजी 2343) चालले होते. आषाढी एकादशी असल्याने पवार दाम्पत्य पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपल्या गावाकडे माघारी निघाले होते. दरम्यान सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भिगवण येथील रवींद्र सेल्स या दुकानासमोर त्यांच्या गाडीला टँकरने जोरदार धडक दिली. यामध्ये पवार जागीच ठार झाले, तर पंखाबाई यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक पळून गेला असुन, भिगवण पोलिस त्याचा तपास करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.

दरम्यान, मृत दाम्पत्यावर येळपणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

पुण्यात दाम्पत्याचा 7 वर्षांचा संसार 15 दिवसात संपुष्टात; यामुळेच 6 महिन्यांचा फेरविचार कालावधी का वगळला?

0

सव्वातीन वर्षांपासून एकमेकांशी पटत नसल्याने वेगळे राहणाऱ्या उच्चशिक्षित दाम्पत्याने परस्पर संमतीने घटस्फोट मिळण्यासाठी केलेल्या अर्जावर अवघ्या १५ दिवसांत पुणे कौटुंबिक न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. पती-पत्नी 18 महिन्यांपेक्षा अधिक काळ विभक्त राहत असल्यामुळे सहा महिन्यांचा फेरविचार कालावधी वगळण्यात आला. या दाम्पत्याला मूलबाळ नाही. पतीने पत्नीला तिचे स्त्रीधन आणि पाच लाख रुपये परत केले. त्यानंतर न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे 18 महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्याचा फेरविचार कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दोघे सव्वातीन वर्षे वेगळे राहत असल्याने फेरविचाराचा कालावधी वगळण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली. न्यायाधीश बी. डी. कदम यांनी ही मागणी मान्य केली.

काय आहे प्रकरण?

सुजय आणि सावनी (नावे बदलली आहेत) या दाम्पत्याचा विवाह नोव्हेंबर 2018 रोजी झाला. सुरुवातीला काही काळ सुरळीत संसार केला. त्यानंतर पटेनासे झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर दोघे मार्च 2022 पासून वेगळे राहू लागले. दोघेही नोकरी करतात. आता एकत्र येणे शक्य नव्हते. त्यामुळे दोघांनी ॲड. विजय आगरवाल यांच्यामार्फत घटस्फोटासाठी अर्ज केला.

ॲड. आगरवाल यांना ॲड. श्वेता बराथे आणि ॲड. नयन गिल्डा यांनी मदत केली. या दोघांना अपत्य नाही; तसेच पतीने पत्नीचे स्त्रीधन आणि पाच लाख रुपये परत केले. त्यानंतर पुणे फॅमिली कोर्टाने हा अर्ज मंजूर केला.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार

या प्रकरणात पुणे कौटुंबिक न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका जुन्या निर्णयाचा आधार घेतला. त्या निर्णयात असे म्हटले होते की, “परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी पती-पत्नी जर 18 महिने एकमेकांपासून वेगळे राहत असतील, तर सहा महिन्याचा फेरविचार कालावधी वगळता येतो.”

वकील आगरवाल यांनी युक्तिवाद केला की सुजय आणि सावनी हे सव्वातीन वर्षे वेगळे राहिले आहे, त्यामुळे फेरविचार कालावधीची गरज नाही. न्यायाधीश बी. डी. कदम यांनी त्यांची मागणी मान्य केली.

पुणे बाजार समितीत धक्कादायक घडामोड! दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा तडकाफडकी राजीनामा

0

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता.7 जुलै) मोठी घडामोड घडली. बाजार समितीचे सभापती दिलीप काशिनाथ काळभोर यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय आणि सहकारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. काळभोर यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवण्यात आला आहेपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप काळभोर यांची 9 मे 2023 रोजी बिनविरोध निवड झाली होती. मात्र,आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामापुणे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगतापयांच्याकडे दिला आहे.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद माजी सभापती प्रकाश जगताप, ज्येष्ठ संचालक रोहिदास उंद्रे, संचालक राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, रामकृष्ण सातव, सुदर्शन चौधरी यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक उपस्थित होते.

दिलीप काळभोर यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, माझ्या कार्यकाळात बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसोबतच बाजार विकासासाठी विविध योजना राबवल्या. तसेच समितीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यरत राहून अनेक निर्णय राबवल्याची माहितीही त्यांनी दिली.

तसेच आपल्या सभापतीपदाच्या कार्यकाळात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात पारदर्शकता व शिस्त निर्माण करण्यात मोठे योगदान दिले. या पुढेही बाजार समितीच्या विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग ठेवणार असल्याचंही यावेळी काळभोर यांनी सांगितलं.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांचे स्वाक्षरीचे अधिकार काढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. यावेळी बाजार समितीतील 18 संचालकांपैकी 10 संचालकांनी ठरावाच्या बाजूनं मतदान केलं होतं. तसेच सभापतीसह सात संचालकांनी सभात्याग तर एक संचालक गैरहजर राहिला होता.

या निर्णयाविरोधात सभापती दिलीप काळभोर यांनी पणन संचालकाकडे अपील केले होते. या ठरावाला तत्कालीन पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्थगिती दिली होती. परंतु, यामुळे सभापती आणि संचालकांमधील तणाव उघड झाला होता.

तसेच, ऑगस्ट 2024 मध्ये काळभोर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल झाला होता, जो आवश्यक संचालकांच्या अनुपस्थितीमुळे नामंजूर झाला होता. या घटनांनी काळभोर यांच्यावरील दबाव वाढवला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

निवडणुकांचे राज्यात लवकरच धुमशान; जिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक आयोगासोबत बैठक, कार्यकर्ते लागले कामाला

0

Election eeराज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे धुमशान होत आहे. गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक पुढाऱ्यांना वनवास होता. अनेक पालिकांवर प्रशासन राज आले होते. त्यांचा वनवास आता संपेल. कार्यकर्त्यांना जल्लोष करता येणार आहे. आरे आवाज कुणाचा हा नारा पुन्हा घुमणार आहे. राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कवायत सुरू केली असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा तयारी सुरू केली आहे. काय आहे अपडेट?

जिल्हाधिकाऱ्यांची लवकरच बैठक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. मराठीच्या मुद्दा तापवून मुंबई, ठाणे महापालिकेसह इतर पालिकेच्या निवडणुकीची गोळाबेरीज सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मिनी मंत्रालयाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारू सुद्धा उधळणार आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला राज्यात विविध निवडणुकांचे धुमशान पाहायला मिळले.

राज्य निवडणूक आयोगाने त्यासाठी पावलं टाकली आहेत. आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीसाठीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे समजते. 10 जुलै रोजी ही बैठक होईल. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी त्याला उपस्थित असतील. गुरुवारी दुपारी 12 वाजता ही बैठक होईल. त्याविषयीचे परिपत्रक निवडणूक आयोगाने काढले आहे. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी बैठकीबाबतचे पत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना पाठवले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगूल वाजला

येत्या काही काळात राज्यातील 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्या, 248 नगरपरिषदा, 42 नगरपंचायती आणि 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होतील. त्याची प्रशासकीय स्तरावर जय्यत तयारी सुरू आहे. या निवडणुकीच्या पूर्वतयारीचा विभागनिहाय आढावा 10 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. पण या बैठकीत महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आढावा नसेल. राज्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतील. त्याविषयीचे परिपत्रक निवडणूक आयोगाने काढले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात निवडणुकांचा धडाका सुरू होईल, असे चित्र आहे.

पोलिसांकडून मनसे नेते पहाटे 3 वाजता घरातून उचलले; पदाधिकाऱ्यांची मध्यरात्री धरपकड यांना दिल्या नोटिसा?

0

राज्यात सध्या मराठी-हिंदी भाषेचा वाद पाहायला मिळत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदरमध्ये एका गुजराती व्यापाराला मारहाण केल्यावरुन मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मीरा-भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यातच आता काल रात्रीपासून पोलिसांनी मनसेच्या अनेक प्रमुख नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले जात आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांना काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच दुसरीकडे मनसेच्या सर्व नेत्यांना कलम 163 अन्वये नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.

आज मीरा-भाईंदर येथे मनसेकडून आंदोलन आणि मोर्चाची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मनसैनिकांना नोटिसा जारी केल्या आहेत. मनसेचे सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना मीरा-भाईंदर येथे जमू नये, अशा प्रकारची नोटीस बजवण्यात आली आहे. त्यासोबतच वसई-विरारमधील मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी पहाटे तीन वाजता घरातून उचलून ताब्यात घेतले आहे.

मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

भाईंदरमधील मराठी मोर्चाच्या संभाव्य पार्श्वभूमीवर वसई-विरारमधील पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील, माजी नगरसेवक प्रफुल पाटील, वसई-विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर यांच्यासह शेकडो मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वसई, विरार, नालासोपारा पोलिसांनी घरातून उचलून पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवले आहे. त्यासोबतच मनसे नेते संदीप देशपांडे आणि माजी आमदार राजू पाटील यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

राजू पाटील, संदीप देशपांडेंना मीरा-भाईंदर परिसरात येण्यास बंदी

मनसे नेते राजू पाटील आणि संदीप देशपांडे या दोघांनाही पोलिसांची नोटीस मिळाली असून, त्यांना मीरा-भाईंदर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. आजच्या मनसे मोर्चामुळे मीरा-भाईंदरमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी मनसेतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. संदीप देशपांडे यांच्या नोटीसीत त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत 14 गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भाषिक वाद, नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका, तसेच तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवत ही नोटीस बजावण्यात आली आहे. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना देखील मोर्चामध्ये सहभागी होऊ नये यासाठी पोलिसांची नोटीस देण्यात आली आहे, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये.

मनसे नेते राजू पाटील आणि संदीप देशपांडे या दोघांनाही पोलिसांची नोटीस मिळाली असून, त्यांना मीरा-भाईंदर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. याअगोदर अविनाश जाधव यांनाही नोटीस देण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची घोषणा, “दोघे भाऊ महाराष्ट्र द्रोह्यांना फेकून देऊ”

0

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एक नवा अध्याय लिहिला गेला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येत मराठी अस्मितेचा जागर केला आणि सत्ताधारी महायुती सरकारला थेट आव्हान दिलं. वरळीतील एनएससीआय डोममध्ये आयोजित विजयी सभेत ठाकरे बंधूंनी एकजुटीचं प्रदर्शन करत मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार जाहीर केला. ही घटना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

भाषेच्या लढ्याला मोठं यश

महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्र मागे घेतल्यानंतर मराठी भाषेच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य करताना सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. “मराठी भाषेला कमकुवत करण्याचा डाव होता, पण आमच्या एकजुटीने तो हाणून पाडला,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना, “महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवणाऱ्यांना आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना आता जनता धडा शिकवेल,” असा इशारा दिला. मराठी सक्तीच्या मुद्द्यावर काही जणांनी कोर्टात धाव घेतली असली, तरी मराठी जनतेचा आवाज दडपता येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्ताधाऱ्यांना दिलं खुलं आव्हान

या सभेचा सर्वात महत्त्वाचा क्षण होता तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना दिलेलं खुलं आव्हान. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं, “आम्हाला वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं सत्ताधाऱ्यांचं धोरण होतं. पण आता आम्ही दोघे भाऊ एकत्र आलोय, आणि यांना फेकून देण्याची वेळ आली आहे!” त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करताना सांगितलं की, “बाळासाहेबांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे. आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत, आणि आम्ही हिंदुत्व कधीच सोडलं नाही.” या वक्तव्यातून त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा खणखणीतपणे समाचार घेतला.

एकजुटीवर विशेष भर

उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या एकजुटीवर विशेष भर दिला. “बऱ्याच वर्षांनंतर मी आणि राज एका राजकीय व्यासपीठावर एकत्र आलोय. आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची गरज नाही, आम्ही एकत्र आलोय आणि एकत्र राहणार,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं. राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सत्ताधारी सरकारवर टीका करताना, “मुंबई आणि महाराष्ट्र आम्ही मिळवला, आणि यापुढेही आम्ही लढत राहू,” असं म्हटलं.

ठाकरे बंधूंच्या या एकजुटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ही एकजूट सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते. राजकीय विश्लेषकांच्या मते, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने मराठी मतांमध्ये मोठी फाळणी टळणार आहे. यामुळे शिवसेना आणि मनसे यांच्या समर्थकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.

मराठी जनतेला आवाहन

या सभेत मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा संदेश देण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी मराठी जनतेला आवाहन केलं की, “आपण एकजुटीने लढलो तर कोणताही अडथळा आपल्याला रोखू शकत नाही.” त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करताना म्हटलं, “आमच्या आजोबांनी भोंदूपणाविरोधात लढा दिला, आणि त्याच विचारांना पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्र आलोय.”

ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक एकजुटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युगाची सुरुवात झाली आहे. मराठी अस्मितेचा जागर करताना सत्ताधाऱ्यांना आव्हान देणारी ही एकजूट आगामी काळात काय परिणाम घडवून आणेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मराठी जनतेसाठी हा क्षण निश्चितच प्रेरणादायी आहे, आणि यामुळे राज्याच्या राजकारणात नवं पर्व सुरू होण्याची शक्यता आहे.

समीप पंढरीचा आनंद… गगनभेदी टाळ-मृदंग गजर चिखलात रंगला भक्तीचा सोहळा… रिंगणाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले

0

पंढरी समीपचा आनंद… गगनभेदी टाळ-मृदंग गजर… दाटून आलेले ढग… ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष आणि पाद्यस्पर्शी चिखलात देहभान विसरून नाचणारे वारकरी, अशा भक्तिरसात ओथंबलेल्या वातावरणात वाखरीजवळ उभ्या आणि गोल रिंगणात अश्वांनी दौड मारत लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. वाखरीत सकल संतांची मांदियाळी मुक्कामी आहे. भंडीशेगाव येथील तळावर पहाटे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी महापूजा केली. त्यानंतर कांदेनवमी असल्याने तळांवर कांदेभज्यांची न्याहरी झाली. दुपारचे जेवण करून सोहळा एक वाजता पालखी सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला. निघाल्यापासूनच उन्हाची तिरीप होती. भंडीशेगाव ओलांडल्यानंतर ढगांनी आभाळ भरून गेल्याने उकाडा वाढला. वारकरी घामाघूम झाले होते मात्र, हरिनामाने त्यांच्या पायाला बळ मिळत होते. तीनच्या सुमारास माउलींचा पालखी सोहळा वाखरीजवळ उभ्या रिंगणासाठी थांबला. मधोमध पालखी रथ थांबला. लगेचच दिंड्यांमधून रिंगण लावण्यात आले.

भोपळे दिंडीचा मानकरी धावत निघताच रिंगणाला प्रारंभ झाला. २७ नंबर दिंडीपासून अश्व धावत रथाकडे निघाले. त्यावेळी ‘माउली माउली’चा जयघोष शिगेला पोचला. अश्व रथाच्या डाव्या बाजूने मागे काही दिंड्यांमध्ये गेला. तेथून परत फिरून रथातील पालखीजवळ आले, त्यानंतर त्यांना विश्वस्तांनी हार घातला. प्रसाद दिला. तेथून दोन्ही अश्व धावत पुढे २७ दिंडीपर्यंत गेला. उभ्या रिंगणानंतर पालखी सोहळा चार वाजता गोल रिंगणात पोचला. गोलाकार दिंड्या रिंगणात जाऊ लागल्या. सव्वाचारला पालखी गोलाकार फिरून रिंगणात मधोमध आली. त्यानंतर पालखीजवळ पताकाधारींची दाटी झाली.

त्यानंतर लावलेल्या रिंगणातून भोपळे दिंडी मानकऱ्यांनी पताका घेऊन दोन फेऱ्या मारल्या. त्यानंतर दोन्ही अश्व रिंगणात धावू लागले. दोन्ही अश्वांनी वेगात तीन फेऱ्या पूर्ण केल्या. या वेळी उपस्थित लाखो भाविकांच्या मुखातून माउली माउलीचा जयघोष झाला. त्यानंतर उडीचा खेळ रंगला.पावसामुळे रिंगणाच्या जागेमध्ये चिखल झाला होता. त्यात वारकरी बेभान झाले होते. दिंड्यांमध्येही वारकरी खेळ खेळत होते. यावेळी आमदार नीतेश राणे यांनी रिंगणाला भेट दिली. माउलींचा गोल रिंगणाचा सोहळा पाहण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील मोठ्या संख्येने भाविक वाखरीत आल्यामुळे सर्व संतांच्या सोहळ्यातील वारकरी आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीने संतांचे वैभव पाहायला मिळाले. जिकडे पाहावे तिकडे वारकरीच दिसत होते.

वाखरीत जमला वैष्णवांचा मेळा

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव यांसह अनेक संतांच्या पालख्यांचा आज वाखरीत मुक्काम आहे. त्यामुळे वाखरीला पंढरीचे रूप आले होते. वाखरीत एकाच ठिकाणी सकल संतांचे दर्शन होत असल्याने परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. उद्या या सर्व पालख्या पंढरीत प्रवेश करणार आहे. एकादशीला आपली वारी पांडुरंगाच्या चरणी रुजू करणार आहेत.

श्री विठ्ठल दर्शन रांगेत ६० हजार भाविक

पंढरपूर, ता. ४ ः आषाढी वारीच्या निमित्ताने सावळ्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीने वारकरी पंढरीत दाखल होऊ लागले आहेत. अनेक संतांच्या पालख्या आज पंढरीत दाखल झाल्या आहेत. तर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उद्या (ता. ५) पंढरीत विसावणार आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी अवघे काही तास उरले असतानाच पंढरीत लाखो भाविकांनी गर्दी आहे. शुक्रवारी रात्री सुमारे पाच लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शन रांगेत सुमारे ६० हजार भाविक उभे आहेत. विठ्ठल दर्शनासाठी १० ते ११ तास लागत आहेत.

रविवारी आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे १८ ते २० लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. त्या दृष्टीने यंदा प्रशासनाने आषाढी वारीचे नियोजन केले आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारीच्या तयारीची पाहणी केली.

हिंजवडी मेट्रो चाचणी यशस्वी प्रकल्पाचे ८७ % काम पूर्ण; हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावर पहिला टप्पा

0

माण, हिंजवडी ते शिवाजीनगर यांना जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाइन ३ या प्रकल्पाची पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) शुक्रवारी घेतलेली चाचणी यशस्वी झाली. माण डेपो ते पीएमआर अशा चार स्थानकापर्यंत ही चाचणी झाली. या प्रकल्पाचे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम अंतिम टप्प्यात असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.

पीएमआरडीएने टाटा आणि सीमेन्स समूहाच्या नेतृत्वाखालील पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. प्रकल्पाच्या कामास २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरवात झाली. या कामाची मुदत मार्च २०२६ पर्यंत आहे.

एकूण २३.३ किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गावर २३ स्थानके आहेत. महामेट्रोने हाती घेतलेल्या मेट्रो मार्गांसह ही मेट्रो एकसंध असणार आहे. त्यामुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी जलद, सुरक्षित वाहतुकीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. चार आधुनिक मेट्रो ट्रेनचा संच आला आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये तीन पूर्णपणे वातानुकूलित डबे आहेत. त्याची एकूण प्रवासी क्षमता अंदाजे एक हजार आहे. या गाड्या ताशी ८० किलोमीटर वेगाने धावणार आहे.

आज मेट्रोची माण डेपो ते पीएमआर दरम्यानच्या चार स्थानकापर्यंत पहिलीच चाचणी घेण्यात आली. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे पुणे मेट्रो लाइन ३ कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोचली आहे. या मेट्रो लाइन ३ चे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येणार असून पुणे शहरासह संबंधित मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.

मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

0

मराठी भाषेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर आलेत. मराठी विजय मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी मराठी भाषेची गळचेपी, सरकारकडून हिंदी लादण्याचा होणारा प्रयत्न, नेत्यांचं शिक्षण यासह अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सन्माननिय उद्धव ठाकरे असं म्हणत सुरुवात केली. व्यासपीठावर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेच होते.

बाळासाहेब ठाकरे, राज्यातली जनता यांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचं काम फडणवीसांनी केलं असं राज ठाकरे म्हणाले. मराठीकडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही. महाराष्ट्र आणि मुंबईला कोण हात लावायला येतं बघतोच अशा शब्दात राज ठाकरे यांनी इशारा दिला.

मोर्चा निघायला हवा होता

खरंतर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा एकवटतो याचं चित्र उभा राहिलं असतं. मोर्चाच्या नुसत्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. खरंतर आजचाही मेळावा शीवतीर्थावर मैदानात व्हायला पाहिजे होता, मैदान ओसंडून वाहिलं असतं. पण पाऊस आहे त्यामुळे तुम्हाला इथं यावं लागलं.

मराठीकडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही

आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता. कोणी कमी हसलं का, कोणी बोलतायत का, आपल्याकडे गोड विषय़ सोडून इतर गोष्टीतच रस असतो अनेकांना. आजचा हा मेळाव्याला कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा आहे. मराठीकडे वेड्यावाकड्या नजरेनं बघायचं नाही कोणी.

तुमची सत्ता विधानसभेवर, आमची रस्त्यावर

प्रश्नच अनाठायी होता, कुठून अचानक हिंदीचं आलं कळलं नाही. हिंदी कशासाठी हिंदी? कोणासाठी, लहान मुलांवर जबरदस्ती करतायत तुम्ही. कुणाला विचारायचं नाही, तज्ज्ञांना विचारायचं नाही. आमची सत्ता, बहुमत आहे आम्ही लादणार… तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात… आमच्याकडे रस्त्यावर सत्ता आहे.

भुसेंचं ऐकून घेतलं पण ऐकणार नाही

एक पत्र लिहिलं, दोन पत्रं लिहिली… नंतर दादा भुसे माझ्याकडे आले. मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो ते समजून घ्या, ऐकून घ्या. मी म्हटलं दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मराठीच्या विषयात तुम्ही तिसरी भाषा लादताय, कुठली त्रिभाषा सूत्र आणलं. त्रिभाषा सूत्र फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातल्या दुव्यासाठी. आज कोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा इंग्रजीतच सगळं होतं. मग मला म्हणाले केंद्रीय शिक्षण धोरण सांगायला लागले. इतर कोणत्याही राज्यात नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला. दक्षिणेतली राज्ये विचारत नाहीत. विनाकारण आणलेला विषय होता. भुसेंना विचारलं मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार कोणती तिसरी भाषा आणणार आहेत?

भाषा कोणतीही असो श्रेष्ठच असते

हिंदी भाषिक राज्ये आर्थिकदृष्ट्या मागास, हिंदी भाषा नसलेली राज्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम, हिंदीवाले इकडे येतायत. आणि हे म्हणतायत हिंदी शिका, कोणासाठी शिकायचं. भाषेबद्दल वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही असो श्रेष्ठच असते. एक भाषा उभा करायला खूप परिश्रम लागतात. लिपी उभी करायला प्रचंड ताकद लागते. अशाच भाषा उभा राहत नसतात. अमित शहा म्हणाले इंग्रजी येते त्याला लाज वाटेल. तुम्हाला येत नाही.

महाराष्ट्राला मुंबईला हात घालून दाखवा

इंग्रजांनी सव्वाशे वर्षे राज्य केलं. मराठा साम्राज्य अटकेपर्यंत गेलं, आम्ही मराठी लादली? हिंदी दोनशे वर्षापूर्वीची भाषा आहे. कशासाठी आणि काय करायचंय नेमकं, यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का, यासाठी भाषेला डिवचू, महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्याली त्यांनी पुढे यावं, महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून दाखवावा.

कुठे शिकले याचा काय संबंध

आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. माघार घेतली ना, मग वेगळ्या ठिकाणी प्रकरण वळवायचा प्रयत्न सुरू केला. काय तर म्हणे ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमात शिकले. ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमात शिकली. दादा भुसे मराठीमध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले ना? फडणवीस इंग्रजीत शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकले याचा काय संबंध?

आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली

कोणा कोणाची मुलं परदेशात शिकतायत याच्या याद्या आहेत आमच्याकडं. त्यांच्यातल्या एक एका मंत्र्यांचं हिंदी ऐका फेफरं येईल फेफरं. पण कोण कुठे शिकले असे प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात. आमची मुलं इंग्रजी मिडीयमध्ये शिकली, हो शिकली. आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे इंग्रजी मीडियमममध्ये शिकलेत. या दोघांवर मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? लालकृष्ण अडवाणी, ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायची का, कॉन्वेंट स्कूलमध्ये शिकलेत.

इंग्रजी शाळेत शिकले तरी मातृभाषेचा अभिमान

दक्षिणेकडील राज्यांमध्ये तामिळ, तेलगुच्या प्रश्नावर दक्षिण भारतात उभा राहतात. त्यांना कुठं शिकलात विचारत नाहीत. हिब्रू भाषेत शिकेन आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेन. दक्षिणेतील जयललिता, स्टालिन, कनिमोझी, उदयनिधी, पवन कल्याण, कमल हासन, विक्रम, सूर्या, ए आर रेहमान हे सगळे इंग्रजी मीडियममध्ये कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेत. आपल्या संरक्षण खात्यात वेगवेगळ्या राज्याच्या रेजिमेंट आहेत. तिथं भाषेचा प्रश्न कुठे येतो. शत्रू दिसला की एकत्र मिळून तुटून पडतात.

मराठी माणूस एकत्र आलात, तुम्हाला जातीत विभागतील

तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलायत. पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. मराठी माणसाला एकत्र येऊ देणार नाहीत. जातीपातीत विभागायला सुरुवात करतील. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मारलं. अजून काही केलंच नाही. जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे, चूक त्यांची असली पाहिजे. असली गोष्ट कराल तेव्हा व्हिडीओ काढू नका. आपल्याआपल्यातच त्याला कळलं पाहिजे. मारणारा सांगत नसतो, मार खाणारा सांगत नसतो. उठसूठ कुणाला मारायचं नाही.

मराठीचं बाळकडू

मराठीचं बाळकडू आमच्यासाठी बाळकडूच होतं. आमच्या धमण्यांमध्ये आलं कुठून, मराठीसाठी कडवट का झालो, यासाठी बाळासाहेबांसोबतचे अनेक प्रसंग आहेत. १९९९ मध्ये शिवसेना भाजपचं सरकार येणार की नाही अशी स्थिती होती. पवारसाहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली होती, वेगवेगळे लढले होते. त्या वादात काहीच होईना, एके दिवशी मातोश्रीला बसलो असताना दुपारी दोन गाड्या आल्या. पुण्याचे प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आले. मी त्यांना सांगितलं बाळासाहेबांची झोपायची वेळ आहे. जावडेकर म्हणाले मुख्यमंत्री पदाचा विषय झालाय. सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री करायच ठरलंय. हे त्यांना सांगायचंय. मी म्हणलं काका उठ, मी एकेरीच हाक मारायचो, मी पुन्हा म्हणलं काका उठ, खाली जावडेकर आणि मंडळी आलेत. ते म्हणतायत मुख्यमंत्री पदाचा विषय झालाय. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय. बाळासाहेब म्हणाले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही. मला त्यावेळी समजलं की मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली.

बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकारण्याची अपेक्षा

मराठीसाठी कोणत्याही स्थिती तडजोड होणार नाही. त्यामुळे यापुढे तुम्ही सतर्क रहावं. मराठीसाठीची एकजूट कायम रहावी. महाराष्ट्रात बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकारावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.