Home Blog Page 18

“एकत्र दिसणं महत्त्वाचं एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी,,” उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

0

वीस वर्षांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, एकाच मंचावर एकत्र आले. वरळी येथील विजय मेळाव्यामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू सहभागी झाले. यावेळी बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे यांनी आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो असल्याचं म्हटलं.

वरळीत एनएससीआय डोम येथे सुरू असलेल्या या सभेला मराठी प्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. यावेळी संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार हिंदीच्या विषयावरून जोरदार निशाणा साधला. “आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय. भाषेवरून जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो वरवरचा धरुन चालणार नाही. मध्यंतरीच्या काळात आपण सर्वांनीच या नतद्रष्टांचा अनुभव घेतला आहे, वापरायचं आणि सोडून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणारोत. डोक्यावर शिवसेना प्रमुखांचा हात नसता तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत होतं,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीकेचा बाण सोडला.

भाजप ही अफवांची फॅक्ट्री

“भाजप ही अफवांची फॅक्ट्री आहे. मधल्या काळात त्यांनी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा जास्त कडवट, कट्टर, देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय. ९२-९३ मध्ये जे काही घडलं तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांनाही हिंदू म्हणून शिवसैनिकांनी मराठी माणसानं वाचवलं. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले राज ठाकरे?

“आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूंनी एकवटतो, याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. आजचाही मेळावा शिवतीर्थावर मैदानात व्हायला पाहिजे होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. पण पाऊस आहे. आज २० वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर येत आहोत… जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं,” असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र शेतकरी आहे देशातील सर्वाधिक कर्जबाजारी; बळीराजावर तब्बल १२,१९,५१६ कोटींचे कर्ज थकीत

0

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबत नसतानाच देशभरातील शेतकऱ्यांवर १२ लाख १९ हजार ५१६ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर ८,३८,२४९ कोटींचे कर्ज थकीत असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संदसेत दिली होती. ती पुन्हा चर्चेत आली आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, मागील १० वर्षांत तब्बल १,१२,००० शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला आहे.

२०१५ मध्ये १२ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर २०१९ पासून २०२२ पर्यंत आत्महत्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. एनसीआरबीचा २०२३ आणि २०२४ चा अहवाल अद्याप प्रकाशित झालेला नाही, हे येथे उल्लेखनीय आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर कोणत्या बँकेचे किती कर्ज?

महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्रातील शेतकरी देशात सर्वांत जास्त कर्जबाजारी आहे. येथील शेतकऱ्यांवर कमर्शियल बँकेचे ७,९३,७८९ कोटी, सहकारी बँकेचे ३५,४५६ कोटी आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे ९००४ कोटी असे ८,३८,२४९ कोटींचे कर्ज डोक्यावर आहे.

आत्महत्यांही वाढल्या

सततच्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आलेला असतानाच त्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर आणखी उंच होत आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत देशातील शेतकऱ्यांवर १२ लाख १९ हजार ५१६ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे.

आरबीआय आणि नाबार्डने दिलेल्या माहितीवरून सीतारामन यांनी संसदेत ही माहिती दिली होती. थोडक्यात, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या व त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर गगनाला भिडण्याच्या मार्गावर आहे.

शेतकऱ्यांवर कोणत्या बँकेचे किती आहे कर्ज?

कमर्शियल बँकेचे ६,३४,२१६ कोटी,

सहकारी बँकांचे २,६५,४१९ कोटी

आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे ३,१९,८८१ कोटी असे १२ लाख १९ हजार ५१६ कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांवर थकीत आहे.

मात्र, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

कोंढवा अत्याचार प्रकरण : ‘मै वापस आउंगा’ मेसेज तिनेच लिहिला झाले उघड

0

अभियंता तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या प्रकरणातील आरोपीला शुक्रवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले.मात्र, हा आरोपी कुरिअर बॉय नसून पीडित तरुणीचा मित्रच असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. पीडितेने तक्रार देताना ही बाब पोलिसांपासून लपवून ठेवली होती. तसेच या घटनेमध्ये बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नसल्याचे देखील समोर आले आहे.

आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मोबाइलमध्ये काढलेला सेल्फी संबंधित तरुणीनेच एका ॲपच्या माध्यमातून एडिट करून त्याखाली मेसेजही तिनेच लिहिला असल्याचे उघड झाले. तशी कबुली देखील तरुणीने पोलिसांना दिली. मात्र, तरुणाने आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या म्हणण्यावर ती ठाम असल्याने, पोलिस लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास करत आहेत. तर दुसरीकडे तरुणीने बोलवल्यानंतरच आपण तिच्या घरी गेल्याचा दावा या तरुणाने केला आहे.

संगणक अभियंता तरुणीवर कुरिअर बॉयने बलात्कार केल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजली होती. महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत काही संघटनांनी आंदोलनही केले होते. तर पोलिसांनी ही बाबा गांभीर्याने घेत तब्बल २२ पथके दिवस-रात्र तपासासाठी नेमली होती.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेला आरोपी एका मल्टी नॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कामाला आहे. तो मागील एक वर्षापासून तरुणीच्या संपर्कात आहे. दोघांचा परिचय त्यांच्या समाजाच्या समाज मेळाव्यात झाला होता. त्यांचे एकमेकांशी फोनवर तसेच सोशल मीडियाद्वारे सातत्याने संपर्कात आहेत. तसेच तरुणाचे पीडितेच्या घरीही येणे-जाणे होते. तांत्रिक तपासात तो तरुणीला फूड डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून अनेकदा खाद्यपदार्थ ऑर्डर करून पाठवत होता. घटनेच्या दिवशी तो सोसायटीतील सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याचे छायाचित्र पोलिसांनी दाखवल्यावर पीडितेने मात्र त्याला ओळखत नसल्याचे सांगितले.

तिने असे का सांगितले? हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. तो तिच्या सदनिकेत सव्वासातच्या सुमारास जाताना दिसत आहे. तर सदनिकेतून पावणेनऊच्या सुमारास बाहेर पडत आहे. तो बाहेर पडल्यावर सेल्फी एडिट केल्याचे आणि त्याखाली ‘मै वापस आउंगा’ असा मेसेज लिहिल्याचे तांत्रिक तपासात उघड झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो तरुणीच्या सांगण्यानुसारच तिच्या घरी आला होता. दोघांच्या संभाषणाचे काही व्हॉट्सॲप चॅटिंग देखील तरुणाच्या मोबाइलमधून पोलिसांना मिळाले आहे.

पावसाळा संपेपर्यंत जमीन अधिग्रहण कार्यक्रम राबवा; मिसिंग लिंक पूर्ण होईपर्यंत भूतासारखा मागे लागेन!: नामदार चंद्रकांतदादा पाटील

0

पावसाळा संपेपर्यंत कोथरुडमधील मिसिंग लिंकसाठी जमीन अधिग्रहण कालबद्ध कार्यक्रम राबवून पूर्ण करा, अशा सूचना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. तसेच, मिसिंग लिंकचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागेपर्यंत भूतासारखा पाठपुरावा करेन, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.

कोथरुड मिसिंग लिंकबाबत ना. पाटील यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर कुमार आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, भूसंपादन आणि मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वसुंधरा बारवे आदी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला मिसिंग लिंकचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीचा लेखाजोखा ना. पाटील यांच्या समोर मांडला. यामध्ये एरंडवणे रजपूत वाटभट्टीचे रूंदीकरण, एकलव्य महाविद्यालय येथून चांदणी चौक महामार्गाला जोडणारा रस्त्याचे जमीन अधिग्रहण झाले असून, पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम सुरू होईल, अशी माहिती दिली.

कसपटे वस्ती, भीमनगर वसाहत, कर्वेनगर मधील शिवणे खराडी रस्ता, बाणेर-बालेवाडी भागातील मिसिंग लिंकबाबत काय कार्यवाही झाली, असा सवाल मंत्री पाटील यांनी बैठकीत अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. त्यावर सदर भागातील जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर सदर काम पावसाळ्यापूर्वी जलदगतीने कालबद्ध पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या. तसेच, मिसिंग लिंकचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागेपर्यंत भूतासारखा पाठपुरावा करेन, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी 8 9 जुलै रोजी शाळांना सुट्टी! ही सुट्टी अचानक नाही यामागे एक मोठं दीर्घकालीन कारण

0

मुंबई : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्वच शाळांना येत्या 8 आणि 9 जुलै 2025 रोजी दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी अचानक मिळालेली नसून यामागे एक मोठं आणि दीर्घकालीन कारण दडलेलं आहे.

राज्य सरकारच्या विरोधात पुकारण्यात आलेलं शाळा बंद आंदोलन हे या दोन दिवसांच्या सुट्टीमागचं मुख्य कारण आहे . या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ, तसेच राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक व्यापक आणि प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.

खरंतर राज्यातील अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे 8 आणि 9 जुलै रोजी राज्यातील हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत याच कारणांमुळे शाळा बंद असणार आहेत.

गेल्या वर्षी, 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू झालेल्या 75 दिवसांच्या सलग आंदोलनात शिक्षकांनी काही अनुदान मंजूर करण्याची मागणी केली होती. त्याचा परिणाम म्हणून, 10 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या मागणीला मंजुरी मिळाल्याचे जाहीर करण्यात आले होते.

मात्र, 14 ऑक्टोबर 2024 रोजी सरकारकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये (GR) प्रत्यक्ष निधीची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अजूनही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने गंभीरतेने लक्ष दिलेले नाही, असा आरोप शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शाळांना 8 आणि 9 जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

पेशवे 100 वर्ष लढले नसते, तर आज… मोदींनी विकास आणि विरासत हे सूत्र दिलं आहे : अमित शाह

0

“पूर्ण दक्षिण भारत मोगलांमुळे पीडित होता. उत्तर मुगलांच्या आधीन होता. त्यावेळी 12 वर्षाच्या मुलाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा अकल्पनीय पराक्रम होता. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचीच केवळ स्थापना केली नाही. तर राज्यभरातील तरुणांच्या मनात स्वराज्याची कल्पना रुजवली. त्यांच्यानंतर संभाजी महाराज, ताराबाई, धनाजी संताजी यांनी शिवाजी महाराजांची परंपरा पुढे नेली” असं अमित शाह म्हणाले. “स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. पण जेव्हा शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून आले. तेव्हा मराठी साम्राज्याचे दोन तुकडे झालेले. तेव्हा बालाजी विश्वनाथ त्यानंतर श्रीमंत बाजीरावांनी पेशवा बनून शिवाजी महाराजांची मशाल पुढे नेली. बाजीरावांच्या मृत्यूनंतर 10 वर्षातच तंजावूर पासून कटकपर्यंत विराट हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. ही स्वातंत्र्याची लढाई शिवाजी महाराजांनी सुरू केली. पेशव्यांनी 100 वर्ष चालवली. ती लढली नसती तर आज भारताचं मूळ स्वरुप राहिलं नसतं” असं अमित शाह म्हणाले.

“आपली त्वरा आणि रणनीती तसेच वीर साथीदारांच्या सोबत बाजीराव पेशव्यांनी अनेक हरलेली युद्ध जिंकली. पालखेडचा विजय काळजीपूर्वक वाचला तर निजामाच्या विरोधातील हा विजय अकल्पनीय होता. अनेक युद्ध कौशल्याचे अभ्यासू देश आणि विदेशातील सेनानींनी त्यांच्या युद्ध कौशल्यावर बरंच सांगितलं आहे. पण बुंदेलखंड, गुजरात, तंजावूर, मध्यप्रदेशापर्यंत या सर्व स्थानापासून स्वराज्याची ज्योत पेटवल्यानंतर धारमध्ये पवार, बडोद्यात गायकवाड अनेक ठिकाणी चिमणाजींचं सहकार्य घेऊन प्रशासन स्थापन केलं. दीर्घकाळ स्वातंत्र्याची ज्योत पेटत राहील असं काम त्यांनी केलं” असं अमित शाह म्हणाले.

“बाजीरावांचा अश्वारुढ पुतळा तयार केला त्याबद्दल आभार. कोणत्याही व्यक्तीचा जन्म घोड्यासोबत होत नाही. पण बाजीरावांचा झाला. 20 वर्षाच्या कालखंडात त्यांना घोड्यावरून उतरलेलं कोणी पाहिलं नाही. त्यांनी शनिवारवाडा बांधला. त्यांनी चांगलं प्रशासन चालवलं. त्यांनी अनेक सुधारणेची कामं केली. मी इसवी सन 1500 च्यानंतरची युद्ध वाचली. पण मी कुठे अशाच सैन्याचं वर्णन ऐकलं नाही. ज्यात एक शिपाई आणि तीन घोड्यांची व्यवस्था होती. प्रत्येक शिपायाला तीन घोडे होते” असं अमित शाह म्हणाले.

अमर इतिहास त्यांनी लिहिला

“घोडा थकल्यावर दुसऱ्या घोड्यावर बसून शिपाई जायचे आणि विजेसारखे शत्रूवर कोसळायचे. 41 युद्धात कोणी कसे यश मिळवू शकतो हे आश्चर्य आहे. काही लोक त्यांना ईश्वरदत्त सेनापती म्हणतात, काही लोक अजिंक्य योद्धा म्हणतात तर काही लोक शिवष्योत्तम सैनिक म्हणतात. बाजीराव कधीच स्वतसाठी लढले नाही. ते देश आणि स्वराज्यासाठी लढले. कारण ते पंतप्रधान होते. इंग्रजांनी इतिहास विकृत केला. एवढा पराक्रम आणि शक्ती असूनही बाजीराव आजीवन पेशवा होते. स्वराज्यासाठीच ते लढले. 40 वर्षाच्या जीवनात त्यांनी अमर इतिहास लिहिला. कोणीच अनेक शतकं लिहू शकणार नाही असा अमर इतिहास त्यांनी लिहिला” असं अमित शाह म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर याचं उदाहरण आहे

“शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत तयार करण्याची जबाबदारी 140 कोटी भारतीयांची आहे. स्वराज्यासाठी संघर्ष करण्याची गरज होती तेव्हा संघर्ष केला. स्वराज्य टिकवण्यासाठी गरज पडली तर आम्ही संघर्ष करू. ऑपरेशन सिंदूर याचं उदाहरण आहे. पण स्वराज्यासोबत महान भारताची संकल्पानाही शिवाजी महाराजांची संकल्पना आहे” असं अमित शाह म्हणाले.

“संपूर्ण जगात आपणच नंबर वन आहोत असा भारत तयार करणं आपलं लक्ष्य असलं पाहिजे. त्यासाठी पुरुषार्थ, समर्पण, बलिदानाची प्रेरणा घेण्यासाठी उत्तम व्यक्तीमत्त्व कोणी असेल तर श्रीमंत बाजीराव पेशवा हेच आहेत” असं अमित शाह यांनी सांगितलं.

मोदींनी विकास आणि विरासत हे सूत्र दिलं आहे

“मी विनयजींनाही सांगतो, तुम्ही माईकमध्ये सांगितलं, भारताच्या सर्व भाषेत या इतिहासाला भावानुवाद करून भारताच्या सर्व भाषेतील तरुणांना उपलब्ध करून दिला पाहिजे. तुम्ही सल्ला दिला आहे. सल्ले अनेक देतात. मी तुमची मदत करेलच. पण तुम्हीच सुरुवात करा. हे काम लवकर होईल. मोदींनी विकास आणि विरासत हे सूत्र दिलं आहे. आपल्या हजारो वर्षाच्या संस्कृतीत अनेक व्यक्तीत्व झाले आहेत, जे आपल्याला प्रेरणा देत आहेत. त्यांचा इतिहास आजच्या युवांना देण्याची गरज आहे” असं अमित शाह म्हणाले.

कोथरूड शिवसैनिकच बनला ‘ॲम्बुलन्स’ ड्रायव्हर; सजग कार्यकर्त्यामुळे वाचले परप्रांतीय तरुणाचे प्राण

0

कोथरूड : कोथरूड कर्वे रस्त्यावरील शिवसेना शाखे समोर दुचाकी वरील तरुण गंभीर अपघातात जखमी झाला. प्रसंगावधानाने शिवसैनिकाने विनाविलंब स्वतः ॲम्बुलन्स चालवत परप्रांतीय तरुणाचा जीव वाचवण्यास मदत केली. अपघातग्रस्त भागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रुग्णवाहिका तिथे उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु चालक नसल्याने वेळेत उपचार होण्यास येणारी अडचण लक्षात घेऊन शिवसैनिक माजी सदस्य पुणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समिती जयदीप पडवळ यांनी स्वतः वाहन चालवत तरुणाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. योग्य वेळेत उपचार मिळाल्याने तरुणाचा जीव वाचवण्यास मदत मिळाली.

महर्षी कर्वे पुतळ्याजवळ दुचाकीवरून चाललेल्या तरुण दुभाजकाला धडकल्याने डोक्याला जखम झाल्याने गंभीर जखमी झाला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव वाहत असल्याने या तरुणाला तत्काळ तात्काळ जवळील कै. सरस्वती कराड एमआयटी पौड रोड येथे ऍडमिट करण्यात आले. तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे त्या तरुणाचे प्राण वाचले. वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य जयदीप पडवळ, संदिप मोकाटे,  विशाल भेलके, मारुती वर्वे, अजय भुवड,  संतोष लांडे, यश जगताप यांच्यासह कार्यकर्ते तसेच नागरिक व इतरांनी लगेच त्या मुलाला हाॅस्पिटलला घेऊन जायची व्यवस्था केली. जयदीप पडवळ यांनी रुग्णवाहिका चालकाची वाट न पाहता स्वतः रुग्णवाहिका चालवून पेशंट हॉस्पिटल पर्यंत पोहोचवला. सदर एकांत त्यागी हा तरुण कामानिमित्त उत्तर प्रदेशामधून पुण्यात आला होता.

कर्वेनगर शाहु कॉलनीत वारंवार ‘बत्तीगुल’ तातडीने ‘बॅकफिडिंग’ उपाययोजना करा; स्वप्निल दुधाने यांची मागणी

0

कर्वेनगर शाहु कॉलनी परिसरामध्ये सात दिवसांपासुन पाणंद रस्त्यावरील MSEB मेन लाईनचे फॉल्ट झाल्याने ७ ते ८ तास MSEB लाईन बंद होत्या. हे प्रकार सातत्याने घडत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा संपुर्ण परिसर निवासी तसेच शैक्षणिक संस्थांचा व विद्यार्थांचा असल्याने या सर्वांची प्रचंड गैरसोय होत आहे. तातडीने ‘बॅकफिडिंग’ उपाययोजना करावी अशी स्वप्निल दुधाने यांनी कार्यकारी अभियंता एस.एन.डी.टी महावितरण विभाग पुणे यांच्याकडे मागणी केली आहे.

शाहू कॉलनी परिसरामध्ये लेन नं. १ ते ११ विदिशा रेसिडेन्सी, विशाखा रेसिडेन्सी, पिनॅक रेसिडेन्सी, आनंद रेसिडेन्सी, आशा रेसिडेन्सी, बराटे एम्पायर, चिंतामणी रेसिडेन्सी कुठल्याही प्रकारची ‘बॅकफिडिंग’ यंत्रणा (म्हणजेच एका बाजुने असलेला सप्लाय बंद पडला तर दुसऱ्या बाजुने चालु करणे) नसल्यामुळे १० ते १२ तास नागरिकांना सेवा मिळत नाही. रस्ते खोदाई वेळी केबल तुटल्याने वीज खंडित झाली असून ही परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी तब्बल दहा ते बारा तासांचा अवधी लागल्याचे निदर्शनास आले. आपल्या महावितरण विभागाकडुन नागरिकांना कुठल्याही प्रकारची पुर्वसुचना तसेच लाईट गेल्यानंतरही काहीही निरोप, मेसेजस कळविले जात नाही. त्यामुळे संपुर्ण भागामध्ये एक प्रकारचा संताप नागरिकांमध्ये आहे. याबाबत त्वरित आपल्या विभागाकडुन ‘बॅकफिडिंग’ यंत्रणा उभारण्यात यावी अन्यथा नागरिकांसोबत निषेध व्यक्त करुन आपल्या कार्यालयास घेराव घालुन आंदोलन करण्याचा इशारा स्वप्निल लक्ष्मी देवराम दुधाने अध्यक्ष – कोथरूड विधानसभा मतदारसंघ NCP- SP यांनी दिला आहे.

मनपा शाळेच्या इमारतीवर माजी नगरसेवकांचा ‘अनधिकृत ताबा’? शहराध्यक्ष धीरज घाटेंचा नवीन ‘वीजचोरी’ उघड

0

पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक धीरज घाटे यांचे संपर्क कार्यालय व व्यायाम शाळा अधिकृत वापर आणि बेकायदेशीर वीजवापर प्रकरणी कारवाई सुरू असतानाच पुणे महापालिकेच्या अधिकृत इमारतीतील वर्ग खोल्या ताब्यात ठेवून त्याचा वापर करण्यासाठी ही अनधिकृत पणे विजेचा वापर केला असल्याचा ‘धक्कादायक’ प्रकार उघड झाला आहे. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागातून माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या पत्रातून एक गंभीर आणि धक्कादायक बाब उघड झाली आहे. मा. नगरसेविका मनीषा घाटे व भाजप शहराध्यक्ष मा नगरसेवक धीरज घाटे यांनी पुणे मनपा शाळा क्र. ६५ (सर्जेराव साळवे विद्यालय, आंबील ओढा कॉलनी) येथील शासकीय इमारतींवर अनधिकृत ताबा मिळवला असून, वीजचोरी केल्याचे शिक्षण मंडळाच्या लेखी उत्तरामध्ये स्पष्टपणे मांडण्यात आले आहे. यासंदर्भात ‘महावितरण’च्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता पेशवे पार्क उपविभाग कार्यालयांस युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे यांनी तक्रार देत वीज चोरी प्रकरणात शिक्षण मंडळ नव्हे तर माजी नगरसेवक यांचाच प्रत्यक्ष सहभाग आहे असे लेखी कळविण्यात आले आहे.

आंबील ओढा येथील पुणे महापालिका शाळा क्रमांक ६५ मधील दोन मजली इमारतीतील एकूण ३ खोल्यांची चावी मा. नगरसेवक श्रीमती मनीषा घाटे, श्री धीरज घाटेंकडे आहे. त्या खोल्यांमध्ये अभ्यासिका, संगणक कक्ष आणि वर्गखोल्यांचे स्वरूप तयार करून खासगी वापर सुरू आहे अशी माहिती, २७ मे २०२५ रोजी पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या जावक क्र. २२ या पत्रातून प्राप्त झाली आहे. या इमारतीत एकूण ५० खुर्च्या, ४० अभ्यासिका कंपार्टमेंट्स, संगणक व विजेची सोय असून, मनपाच्या कोणत्याही परवानगीशिवाय या खोल्या वापरण्यात आल्या आहेत. विद्युत वापरासंदर्भात कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याने महावितरणच्या कायद्यानुसार (कलम १३५/१२६) सदर बाब वीजचोरी ठरते.

“शाळेच्या नावावर बांधलेल्या इमारतींवर राजकीय दबाव वापरून ताबा मिळवणे आणि विना परवाना वापर सुरू ठेवणे हा गुन्हा आहे. या संदर्भात प्रशासकीय कारवाईची आम्ही मागणी करीत आहोत.” अशी मागणी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे यांनी प्रतिक्रिया देताना केली आहे. “शाळा क्रमांक ६५ आणि १७ या दोन्ही ठिकाणी वीजचोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये मालमत्तेचा अनधिकृत ताबा व शासकीय मालमत्तेचा गैरवापर असून, पुणे मनपाचे प्रशासन, क्षेत्रीय अधिकारी आणि महावितरण यांनी यामध्ये ‘सहकार्य’ केल्याचा संशय आहे.

सत्ताधारी पक्षाच्या पदांचा फायदा घेत वारंवार अनाधिकृत व बेकायदेशीर कार्य केले जात असताना यावर कायदेशीर कारवाई होईल की प्रशासन राजकीय दबावाखाली झुकणार हे पाहणे गरजेचे आहे.” महावितरणचे अधिकारी या प्रभागात वीजचोरांना साथ देत असल्याचे दिसत आहे. या संदर्भात यासंदर्भात पुणे महानगरपालिका मालमत्ता विभाग व शिक्षण विभाग अद्याप मौन बाळगत असल्याचे दिसून येते. नागरिक, राजकीय पक्ष व समाजसेवक आता या प्रकरणात IPC कलम 441 व 447 – अनधिकृत प्रवेश व अतिक्रमण, Public Premises Act, 1971 – सार्वजनिक मालमत्तेचा अनधिकृत वापर, वीज अधिनियम कलम १२६ – बेकायदेशीर वीज वापर व वीजचोरी कायद्यानुसार ठोस कारवाई होईल का, याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत.

सदर प्रकरणात खालील प्रमाणे कायदेशीर कलमानुसार कारवाई करावी अशी मागणी युवक काँग्रेस चे सागर धाडवे यांनी महावितरण आणि पुणे महापालिकेला निवेदनात केली आहे.

पुण्यात ‘पेशवें’च्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण पुण्यातील वंशज रघुनाथ राव हे दत्तक; राणी मस्तानीच्या वंशजांचा बहिष्कार

0

पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एन डी ए येथे गुरुवारी बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे. दरम्यान मस्तानी यांचे वंशज नवाब शदाब अली बहादूर पेशवा नवाब ऑफ बांदा यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं म्हटलं आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला उशिरा आमंत्रण दिलं असून, व्यासपीठावर जागा देणार नसल्याचं आयोजकांनी सांगितले आहे, हा पेशव्यांच्या वंशजांचा अपमान असून, आपण कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पेशव्यांच्या पुण्यातील वंशजांना व्यासपीठावर जागा आहे मात्र आपल्याला खाली बसविण्यात येणार असल्याने आपण नाराज असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “सध्याचे बाजीराव पेशव्यांचे पुण्यातील वंशज रघुनाथ राव हे वाराणसी येथून भासकुटे परिवाराकडून दत्तक घेतले गेले आहेत.त्यामुळे मीच खरा बाजीराव पेशव्यांचा रक्त वंशज आहे. माझ्या पूर्वजांच्य बलिदानाचा गौरवशाली इतिहास आहे. माझे पूर्वज समशेर बहादूर यांनी (1761 ) पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठांच्या वतीने सहभाग घेतला. सत्ताविसव्या वर्षी त्यांचे निधन झाले. माझे पणजोबा नवाब अली बहादूर 1857 मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना साथ देत, लढाई लढले”.

“या सर्व गौरवशाली इतिहासाकडे थोरले बाजीराव पेशवा प्रतिष्ठान समितीचे कुंदन कुमार साठे आणि सहकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. दत्तक वंशजांना मानाचे स्थान देत, व्यासपीठावर स्थान दिले आहे. या कार्यक्रमांचे आमंत्रण देखील दोन दिवसांपूर्वी मला देण्यात आले असून, आपल्याला व्यासपीठावर बसवता येणार नाही, असं सांगितलं आहे,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

“माझा याला विरोध नाही,पण या माध्यमातून ऐतिहासिक सत्य दडपण्याचा आणि अमित शहा यांना भरकटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाह हे इतिहासप्रेमी असून, त्यांनी यावर पुस्तक लिहिले आहे.त्यामुळे हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. श्रीमंत बाजीराव पेशवा आणि मस्तानी साहिबा प्रेम आणि बलिदान यांचे प्रतीक आहे. आम्ही अशा प्रकारचा आमचा अपमान सहन नाही करू शकत. याद्वारे आमच्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान करावा, ही आमची मागणी आहे.आम्हीच बाजीराव पेशव्यांचे रक्त वंशज असून, यासाठी आम्ही डी एन ए चाचणी करायला तयार आहोत. तसेच अशा अपमानामुळे आम्ही कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहोत,” असं त्यांनी म्हटलं आहे.