Home Blog Page 16

विकएन्डला शूटिंग “आनंद देवदेशमुख” कान्स पर्यंत मजल मारणारा हरहुन्नरी दिग्दर्शक अवलिया

0

मुंबई दि. ८ (अधिराज्य) सर्वसाधारण पाहता सिनेमा शुटींग म्हणजे सलग २०-२५ दिवसांचे शूटिंग करीत १-२ शेड्युलमध्ये सिनेमा शूट करणे, परंतु आजवर कधी ऐकलं आहे का की एखाद्या दिग्दर्शकाने आठवड्यातील पाच दिवस नोकरीधंदा सांभाळून प्रत्येक आठवड्यातील शनिवार रविवार शूटिंग करून सिनेमा पूर्ण केला ?.. “नाही ना, तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे होऊच शकत नाही” परंतु ही अशक्य वाटणारी गोष्ट आनंद देवदेशमुख या तडफदार हरहुन्नरी लेखक-दिग्दर्शकाने स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करून दाखवली आहे. “आनंदाचे डोही आनंद तरंग” अस म्हणतात की आनंदाच्या डोहात आनंद तरंग उमटत असले तरी त्या गूढ डोहाच्या तळाशी असलेल्या अव्यक्त व अनाकलनीय वेदना या केवळ त्या डोहालाच माहीत असतात. अशाच एका आनंदाच्या डोहाची व त्यातील आनंद तरंगाची ही कथा.

आनंद देवदेशमुख पुण्यातील सुसंस्कृत परिवारातील IT फिल्डमध्ये नोकरीस असलेला एक श्लाघ्य तरुण, IT क्षेत्रात नोकरी व शिक्षण हे घर-परिवार यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या हेतूने असले तरी मन मात्र सिनेमामेकिंग यात रमलेल असायचं, पण सिनेसृष्टीत उतरण तितक सोपं नाही त्यातच जर तुम्हाला फॅमिली बॅकग्राऊंड किंवा कोणी गॉडफादर नसला तर मात्र या क्षेत्रात टिकाव लागणे मुश्किल.. आनंद देवदेशमुख या तरुणास कोणताही फॅमिली बॅकग्राउंड किंवा गॉडफादर नसताना ही त्याने सिनेक्षेत्रात झेप घेतली व स्वतःच्या कर्तृत्वावर मक्तेदारी मोडत स्वतःचा असा नवीन ठसा उमटवला.

परिस्थिती बेताची असल्याने सिनेसृष्टीचे प्राथमिक धडे शिकण्यासाठी कोणतीही महागडी इन्स्टिट्यूट न लावता किंवा कोणालाही असिस्ट न करता आनंदने स्वतःचा मार्ग निवडला स्वतः स्वतःला प्रशिक्षित करण्याचा; त्यासाठी त्याने शॉर्टफिल्मस पासून आपल्या कारकिर्दीची सुरवात केली; प्रसंगी अडकला, धडपडला पण शेवटी स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीने कोणाच्याही मेहरबानीच्या कुबड्या न घेता स्वतः उभा राहिला. अश्या या तरुणाने जेमतेम चार शॉर्टफिल्म्सच्या लेखन व दिग्दर्शनानंतर थेट झेप घेतली ती फुल लेन्थ सिनेमा मेकिंगमध्ये व त्यातूनच “प्रारब्ध” या सिनेमाच्या कथेने आनंद देवदेशमुखांच्या सिद्धहस्त लेखणीतून जन्म घेतला.

प्रारब्ध म्हणजेच नशीब… मग आनंदने सिनेमातील पात्रांच नशीब लिहिलं की सिनेमाने लेखक-दिग्दर्शक आनंदच? खरच हा यक्षप्रश्न म्हणावा लागेल, कारण या सिनेमाच्या पडद्याआड एक वेगळाच नशीबाचा खेळ सुरू होता. सिनेमाची संहिता तयार झाली, आनंदने अत्यंत मेहनतीने स्वतः ५०% रक्कम जमा करून बाकी ५०% करता काही सहनिर्माते जोडले, प्री प्रोडक्शन, पेपरवर्क झाल शूट ही लागलं आणि देशात लॉकडाऊन लागलं आणि सर्वच बारगळल, सर्व मेहनतीवर पाणी.. त्यात मोठं आर्थिक नुकसान व समोरा कोरोनारुपी दानव, लॉकडाऊन मध्ये जणू पाठीचा कणाच मोडला परंतु तरीही न खचता अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेत पुन्हा एकदा आनंद देवदेशमुख उभा ठाकला व आपलं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचे त्याने ठरवलं परंतु पुन्हा एकदा बजेट उभं करणे कठीण असल्याने आनंद देवदेशमुख पुन्हा एकदा IT क्षेत्रात नोकरीवर रुजू झाले वर्षभर नोकरी करून स्वतःच्या व कुटुंबाच्या पोटाला पिळ मारून पगारातील पै अन पै जमा केला केवळ चित्रपट निर्मितीच्या ध्यासाने; कमीतकमी खर्चातच उत्कृष्ट सिनेमा बनवण्याचं आधीच निश्चित केल्याने सिनेमा निर्मितीला लागतील इतकी रक्कम जमा झाली होती परंतु सलग २०-२५ दिवस शेड्युल त्यानंतर तितकेच दिवस पोष्ट प्रोडक्शन करता, नोकरीवर इतकी मोठी सुट्टी भेटणे अशक्यच व नोकरी सोडवी तर घरचा उदरनिर्वाह कसा चालणार यातूनच एक कल्पना पुढे आली की सोमवार ते शुक्रवार नोकरी करून शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी शुटींग करावं तस पाहता हा टास्क सोप्पा नव्हता परंतु सलग तीन महिने फक्त शनिवार रविवार शूटिंग करत अत्यंत हिंमतीने, शर्थीने व जिद्दीने आनंद देवदेशमुख यांनी “प्रारब्ध” हा सिनेमा पूर्ण केला; जगातील सर्वात सुंदर व भावनिक नाते म्हणजे वडील व मुलगी यांचे नाते, प्रत्येक मुलीचा पहिला हिरो आणि पहिला मित्र म्हणजे तिचे वडील, प्रारब्ध सिनेमा भीमा व त्याची मुलगी मीरा यांच्या हृदयस्पर्शी नात्यावर आधारित आहे, जीवनातील आंतरिक संघर्षावर मात करण्यासाठी झगडणाऱ्या परंतु झगडत झगडत त्या व्यथेत गुरफटत जाणाऱ्या हृदयद्रावक स्थितीतील बाप-लेकीची कथा.. एक दिग्दर्शक म्हणून पहिल्याच प्रयत्नात इतका गंभीर विषय हाताळणे कठीण असलं तरी आनंद देवदेशमुख यांनी अत्यंत बारकाईने अभ्यास करून हा विषय हाताळला आहे व त्याची जाणीव प्रारब्ध सिनेमा पाहताना प्रेक्षकांना होते; जगभरातील नामवंत फिल्म फेस्टिव्हल मध्ये जवळपास ३२ पुरस्कार, दादासाहेब फाळके फिल्म पुरस्कार, भारत गौरव पुरस्कार, कान्समध्ये स्क्रिनिंग असे अनेक मानाचे तुरे आपल्या शिरपेचात रोवत प्रारब्ध सिनेमा यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहे, सध्या हा सिनेमा “प्रारब्ध” या नावाने YouTube वर उपलब्ध आहे, प्रारब्ध व प्रारब्ध सिनेमाचे प्रारब्ध लिहिणाऱ्या आनंद देवदेशमुख यांच्या अद्वितीय कामाची झलक पाहण्यासाठी आवर्जून पहावा असा हा सिनेमा सर्वांनी बघावा असा आहे.

बौद्धजन सहकारी संघाच्या विद्यमाने तथागत गौतम बुद्धांच्या मार्गदर्शनाचा वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन

0

गुहागर दि. ८ (रामदास धो. गमरे) वर्षा ऋतूतील मुसळधार पावसामुळे व त्यातून निर्माण होणारी पूरपरिस्थिती, नैसर्गिक आपत्ती व निसर्गात होणाऱ्या बदलांमुळे भिक्खू संघास बाहेर फिरणे शक्य नसल्याने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांच्या कालावधीत भगवान बुद्धांच्या आदेशानुसार एका ठिकाणी किंवा बुद्धविहारात राहून ध्यानसाधना, चिंतन, मनन, प्रवचन याद्वारे धम्मप्रचार व धम्मप्रसार करण्यास सुरुवात केली भगवान बुद्धांच्या याच मार्गदर्शनानुसारच बौद्धजन सहकारी संघ ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी गाव-मुंबई शाखा व संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत प्रत्येक रविवारी वर्षावास प्रवचन मालिकाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर वर्षावास प्रवचन मालिकेचे आरंभ तथा प्रथम पुष्प मुंबई शाखा अध्यक्ष सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रवचनकार – बौद्धाचार्य सुगंध कदम यांच्या “सुत्तपठण आणि परित्राण पाठाचे महत्व” या विषयाने रविवार दि. १३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ठीक ४:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जुनी बी.डी.डी. चाळ, ३ अ व ४ अ च्या मध्ये, एस.एस.वाघ मार्ग, नायगाव, दादर (पू.) मुंबई येथे होणार आहे.

सदर प्रसंगी संस्कार समितीचे अध्यक्ष संदीप गमरे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थितांचे स्वागत करतील, तर संघाचे सरचिटणीस संदेश गमरे व संस्कार समितीचे चिटणीस सचिन मोहिते हे सूत्रसंचालनाची धुरा सांभाळतील. तसेच प्रमुख विश्वस्त सिद्धार्थ पवार, माजी प्रमुख विश्वस्त संजय पवार, माजी विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, एस. बी. जाधव, के. सी. जाधव, विश्वस्त दीपक जाधव, पांडुरंग गमरे, माजी कार्याध्यक्ष संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे व मुंबई शाखा कार्याध्यक्ष दीपक मोहिते, उपकार्याध्यक्ष अशोक कदम, चिटणीस अजय जाधव, संदेश जाधव, कोषाध्यक्ष प्रदीप कदम, न्यायदान कमिटी अध्यक्ष संजय पवार, विवाह मंडळ अध्यक्ष धम्मवर्धन तांबे, शिक्षण कमिटी अध्यक्ष संजीवन यादव, माजी सरचिटणीस संजय तांबे, सदस्य उत्तम जाधव, अमित पवार, सुरेश गमरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्व विभाग अधिकारी, विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती पदाधिकारी, सर्व उपसमित्या त्यांचे पदाधिकारी, सदस्य, महिला मंडळ, उपासक, उपासिका यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून धम्म कार्यास सहकार्य करावे अशी विनंती बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केली आहे.

मुंढर गावी कृषीदिनानिमित्त चारसूत्री भातशेती लागवड प्रात्यक्षिक व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

0

मुंढर दि. ५ (रामदास धो. गमरे) गुहागर पंचायत समितीच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका कृषी अधिकारी क्षीरसागर यांच्या उपस्थितीत मुंढर ग्रामपंचायत येथे कृषीदिनाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे यांनी प्रभावी व भारदस्त आवाजात सूत्रसंचालन व प्रस्ताविक सादर केले व कार्यक्रमाची रूपरेषा मांडताना कार्यक्रमा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या चारसूत्री भात लागवड व वृक्षारोपण हे उपक्रमांची माहिती दिली. सदर प्रसंगी मुंढर गावचे प्रगतशील शेतकरी विजय भिकू रामाणे यांच्या शेतात चारसूत्री भात लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले तेव्हा गटविकास अधिकारी शेखर भिलारे व तालुका कृषी अधिकारी क्षीरसागर यांनी उपस्थितांस कमी खर्च व कमी खतांचा वापर करून भरघोस उत्पादन देणाऱ्या चारसूत्री भात लागवड पद्धतीची माहिती दिली, कमी खतांचा वापर होत असल्याने जमिनीची सुपीकता व सेंद्रिय कर्ब वाढते, सुधारित / संकरित बियाणे वापरल्याने उत्पादकता वाढते म्हणून शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीस पर्याय असणाऱ्या सेंद्रिय पद्धतीची चारसूत्री भात लागवड करावी असे आवाहन केले, सोबतच एक पेड माँ के नाम (एक झाड आईच्या नावाचे) या अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी गटविकास अधिकारी शेखर भिलारे व कृषी अधिकारी क्षीरसागर यांनी वृक्षारोपणाचे महत्व विदित करताना मातीची धूप थांबून भूजल पातळी स्तर वाढतो, हवेतील कार्बनडायऑक्साईड कमी होऊन ऑक्सिजन पातळी सुधारते, प्रदूषण रोखण्यासाठी होणारी मदत, जलव्यवस्थापन असे अनेक फायदे सांगून वृक्षारोपण किती महत्वाचे आहे हे सोप्या व साध्या भाषेत समजावून दिले.

सदर प्रसंगी कृषी विस्तार अधिकारी सर्जेराव कांबळे, कृषी विस्तार अधिकारी शरद भांड, कृषी विस्तार अधिकारी कृष्णदेव कदम, ग्रा.पं. अधिकारी सुरेश गोरे, सर्व कृषी मंडळ अधिकारी, सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत मुंढर सरपंचा आमिषा अजित गमरे, उपसरपंचा भक्ती धनावडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य मंडळ, माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर शिर्के, माजी सरपंच प्रमोद शिर्के, गुहागर तालुका ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे अध्यक्ष साईनाथ बागूल, कृषी महाविद्यालय खरवतेचे विद्यार्थी, सर्व अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मुंढर जिल्हा परिषद शाळा क्र. १ चे मुख्याध्यापक दशरथ कदम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच उपस्थितीत भरघोस प्रतिसादात सदर कार्यक्रम संपन्न झाला, सरतेशेवटी ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे, प्रगतशील शेतकरी विजय भिकू रामाणे यांचे व उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

कोथरुड ‘मिसिंग लिंक’ मार्गी ८ मीटरच्या रस्त्याचे १२ मीटर रुंदीकरण; ना. चंद्रकांतदादांचा यशस्वी पाठपुरावा

0

पुणे शहरातून कोथरूड वारजे माळवाडी शिवणे कोंढवे धावडे बावधन आणि मुळशी तालुका संपूर्ण पश्चिम पट्ट्यामध्ये दुचाकी द्वारे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रजपूत वितभट्टी हा ‘मिसिंग लिंक’ नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन चार चाकी वाहतूक असलेल्या या अरुंद रस्त्यावर प्रशासनाच्या वतीने फक्त दुचाकीसाठी वाहतूक निर्णय घेऊन या प्रश्नाकडे बगल देण्याचे काम केले होते. सर्वसामान्य नागरिकांना हा बदल इतका अंगवळणी पडला होता की केवळ दुचाकी वापर अशी मानसिकता करून या भागातील नागरिक नित्य कर्म करत असतानाच कोथरूड मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळताना दिसत असून, कोथरुडमधील एरंडवणे येथून नदीपात्रातील रस्त्या मार्गे शहरात जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील रजपूत वीटभट्टी परसरातील रस्ता प्रशस्त झाला आहे. त्यामुळे सदर भागातील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे.

कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आग्रहाची भूमिका घेतली होती. मतदारसंघतील मिसिंग लिंकचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांसोबत सातत्याने बैठका घेऊन मार्ग काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे गतीमान झालेल्या महापालिकेने मिसिंग लिंकमधील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात रजपूत वीटभट्टी परिसरातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भागातील ८ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जमीन हस्तांतरण होऊन रस्याचे रुंदीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे ८ मीटरच्या रस्ता १२ मीटर झाला असून, सदर रस्ता वाहतुकीसाठी अतिशय प्रशस्त झाला आहे. त्यामुळे कोथरुडकरांची मोठी सोय झाली आहे.

हा प्रलंबित प्रश्न सोडविण्यामध्ये महापालिका प्रशासन, स्थानिक नागरिक, माजी नगरसेवक यांची मोलाची साथ मिळाल्याबद्दल नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच, उर्वरित टप्प्यातील रस्त्याचे रूंदीकरण लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मुळशी तहसीलदार दादांच्या ‘स्वीय’चे चोखंदळ मनसुबे; शासन आदेश झालेल्या मिनल भामरेंना चार्जच मिळेना

0

पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे तालुका म्हणून गणल्या जाणाऱ्या मुळशी तहसीलदार पदावर घेत असलेल्या अधिकाऱ्यांची मागे सुरू असलेली चर्चा थांबते ना थांबते तोच नव्याने पुण्याचे पालकमंत्री यांचे स्वीय सहाय्यक यांच्या दबावामुळे शासन आदेश झालेला असतानाही संबंधित अधिकाऱ्याला रुजू होऊ न देण्याच्या पडद्यामागील हालचालीमुळे नवीन चर्चेचा विषय बनला आहे. शासकीय प्रक्रियानुरूप शासन आदेश क्र. बदली-२०२५/प्र.क्र.१५२/ई-३ महसूल विभाग मंत्रा#लय यांच्यामार्फत दिनांक : ३० जून, २०२५ रोजीच श्रीमती मिनल भामरे तहसिलदार (रजा राखीव), विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे यांची बदली तहसिलदार मुळशी, जि.पुणे या रिक्त पदावर करण्यात आली होपरंतु आजपर्यंत श्रीमती मिलन भामरे यांनी पदभार न स्वीकारल्याने मुळशी तहसीलदार पदासाठी पालकमंत्री दादांच्या ‘स्वीय’सहाय्यकाचे बंधू प्रेमासाठी चोखंदळ मनसुबे सुरू असून शासन आदेश झालेल्या मिनल भामरेंना त्यामुळेच चार्जच मिळेना अशा स्थानिक पातळीवर नव्या चर्चा चालू झाल्या आहेत.

राज्यामध्ये सध्या महाविद्यालयीन प्रवेश आणि शासकीय नोंदी यांचा वाढता रेटा लक्षात घेऊन राज्य शासनाच्या वतीने अतिरिक्त कारभार देण्यात आलेले या पदावरती श्रीमती मीनल भामरे यांची तात्काळ नियुक्ती करण्यात आली आहे तशा प्रकारचे शासकीय आदेशही निघालेले असताना पदमुक्त असलेल्या श्रीमती भामरे यांनी पदभार न स्वीकारणे चर्चेचा विषय बनला आहे. मुळात मुळशी तहसीलदार पदावर काम केलेल्या अधिकाऱ्याने केलेल्या कृत्यामुळे मुळशी तालुक्यात चर्चा सुरू असतानाच राजकीय दबाव नव्या पदभार स्वीकारण्यास अडचण ठरत आहे. पालकमंत्री यांचे स्वीय सहाय्यक बंधुप्रेमामुळे या पदभार स्वीकृतीला अडसर ठरत असून त्यामुळेच संबंधित प्रकार घडत असल्याची चर्चा सध्या मुळशी तालुका तहसील कार्यालयामध्ये सुरू आहे. प्रशासकीय पातळीवर शासकीय कामांना होणारा विलंब आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांवरती रखडलेल्या सह्या या सर्व गोष्टींमुळे मुळशी तहसीलदार नियुक्ती तात्काळ होणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशात तात्काळ पदस्थापनेच्या पदावर तात्काळ रुजू होऊन revenue@maharashtra.gov.in या ईमेलद्वारे / टपालाद्वारे शासनास त्वरीत कळवावे म्हटले असले तरीसुद्धा या महत्त्वाच्या पदावर श्रीमती भामरे आजही रुजू झाल्या नाहीत याबाबत प्रांत अधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. तर संबंधित अधिकारी यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही. मुळात राज्यात माहितीचे सरकार सत्तेत आल्यापासून विभिन्न खात्याचे मंत्री आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांचे लागेबांधे आणि मैत्रीपूर्ण संबंधामुळे असंख्य विभागांमध्ये या नियुक्त्या रखडत असतानाच मुळशी तहसीलदार या पदाची रखडलेले नियुक्ती सर्वसामान्यांच्या दृष्टीने हानिकारक आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ‘शासकीय कर्मचारी विलंब प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४ (४) व ४(५) मधील तरतुदींनुसार तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिका-यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने तात्काळ पदभार स्वीकारणे क्रमप्राप्त असते परंतु नियुक्ती आदेश होऊनही ‘अधिवेशन काळ’ही अतिरिक्त कारभारावर सुरू असून महसूल विभागाने यावर तात्काळ निर्णय घेण्याची गरज आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियमांनुसार विहित कालावधीत संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी पदावर रुजू न झाल्यास कारवाई करण्याचाही अधिकार असताना मुळशी तहसीलदार पदाबाबत कोणताही निर्णय होत नाही ही आश्चर्याची बाब आहे. तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रूजू न झाल्यास ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लघंन करणारी असल्यामूळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुध्द शिस्तभंग कारवाईची तरतूद असतानाही १२ दिवस या पदाबाबत निर्णय प्रलंबित आहे.ती.

0

‘रामराज्या’चा पोक्त कारसेवक… सशक्त… व्यासंगी राष्ट्रभक्त! उपलब्ध कटीबद्ध वचनबध्द!

0

राष्ट्रभक्तीचा वारसा आणि विचारांचा वसा घेऊन लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आणि हिंदुत्वादी विचारांशी जोडलेली नाळ हैदराबाद मुक्ती संग्रामात वडील स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर वामन देशपांडे यांच्या संस्कारपीठात झालेली जडणघडण यामुळेच कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये राम राज्याचा पुरस्कार करणारा सशक्त व्यासंगी कारसेवक म्हणून शाम देशपांडे यांचा नामउल्लेख केला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पक्की बांधणी असल्याने त्याच विचारांनी प्रवृत्त झालेल्या श्याम देशपांडे यांच्या कार्यामुळे कोथरूडचा गाभा असलेल्या डहाणूगर कॉलनीचा कायापालट करण्यामध्ये याच संगे विचारांची दूरदृष्टी आणि व्यासंगी विचार यामुळे कोथरूडला एक नवा दर्जा निर्माण झाला. अशा सशक्त व्यसंगी राष्ट्रभक्त श्याम देशपांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुणे महापालिकेत काम करताना रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज आणि अन्य नागरी सुविधा नगरसेवकाकडून अपेक्षित असतात, त्यात अडकून न पडता विकासकामांना वेगळ्या टप्प्यावर नेण्याचा प्रयत्न करत लोकसहभाग वाढवून कोथरूड भागाचा शाश्वत विकास करण्यासाठी अनमोल योगदान आहे. पुण्यात सर्वात प्रथम UTWT तंत्रज्ञान युक्त रस्ते डहाणूकर कॉलनीत तयार केले असून गेल्या दहा वर्षांपासून कोणतीही दुरुस्ती न करावी लागणे हे दूरदृष्टी विचार कृतीत आणण्याचे काम श्याम देशपांडे यांच्या मार्फत करण्यात आले. जनसेवेची आव्हाने, समाजकारणाचा दृष्टीकोन नेहमी नाविन्यपूर्वक आणि शाश्वत काम प्रभागातील सुविधांपुरते मर्यादित न ठेवता  पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना PMPLचा मोफत पास देण्याची व्यवस्था….. दहावी-बारावीच्या गुणवंत विद्याथ्यांना शिष्यवृत्तीची कल्पक योजनाही करण्यामध्ये मोलाचे योगदान आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानामध्ये ‘गीतरामायण’ या कल्पनेवर आधारित ‘थीमपार्क’ साकारल्याने अभिनव संकल्पनेचे कोथरुडकरांनी मनापासून केलेले कौतुक केले आहे.

शांत प्रवृत्तीचे आणि समस्या सामोपचाराने सोडविण्यात रस असला तरीही  पुण्याच्या पर्यावरणावर घाला घालणाऱ्या ‘बीडीपी’ विरोधात रस्त्यावर उतरून ८० हजार सह्यांची मोहीम राबवून आंदोलन करून पुण्यातील टेकड्या वाचविल्या. अण्णाभाऊ साठे सभागृह आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये ‘हे राम नथुराम’च्या प्रयोगांना संरक्षण देत विचारांसाठी ठाम राहण्याचे काम फक्त श्याम देशपांडे यांनीच केले. पुण्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या कोथरुडच्या संस्कृतीला, परंपरेला आणि स्वभावाला साजेसा असा नगरसेवक बनण्याचा प्रयत्न केला आहे. गेली २० वर्षाहून अधिक काळ नागरिकांना २४ तास, ३६५ दिवस सहज उपलब्ध असणारा महापालिका आणि मतदार यांच्यामधील दूत ही त्यांची ओळख आहे.

उद्याच्या बदलत्या कोथरुडसाठी विचारांवर ठाम असलेला, पण स्वतःला अपडेट करीत कोथरुडला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणारा, भविष्यातील समस्यांवर आजच तोडगा शोधणारा जनसेवक आहे. यालाच अनुसरून Vision कोथरूड + + समोर ठेवत शाश्वत कोथरूडच्या विकासाची ध्येयधोरणे मांडली आहेत….

  • कोथरूडचा Happiness Index करून नागरी जीवन भौतिक सुविधांबरोबर मानसिक समाधानाने समृद्ध होईल
  • Participatory Development Program, समितीद्वारे कोथरूडचा विकास आराखडा अंमलबजावणी.                              (शासकीय अधिकारी व मान्यवर नागरिक ह्यांची एकत्र कृती समिती)
  • १०,००० नागरिकांसाठी एक आठवडा बाजार सुरू (एक वस्ती-एक बाजार)
  • कोथरूड मधील eWaste मॅनेजमेंटसाठी प्रभावी यंत्रणा
  • BOT तत्वावर कोथरूड हा CCTV देखरेखीखाली अन् प्रत्येक घरात MNGL द्वारे पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा.
  • सोलरद्वारे वीजनिर्मिती प्रकल्प, सोसायट्यांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी समिती करणे.
  • पर्यावरण समतोल राखण्यास टेकड्यांवर वृक्षारोपण Quality of Life सुधारण्यास पर्यावरणप्रेमी कृती समिती.

लोकसंख्या घनतेत होणारी वाढ लक्षात घेऊन शाश्वत वाहतूक विकास

(वाहतूक व्यवस्था सक्षम व सुरक्षित करण्यासाठी, सार्वजनिक वाहने व पादचाऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी व्हिजन)

कोथरुड दळणवळण विषयक आगळावेगळा दृष्टीकोन देणारा आराखडा

रस्त्यांची पुनर्रचना

पौड रस्ता (४२ मीटर)                                  कर्वे रस्ता (४२ मीटर)

कर्वे पुतळा ते आशिष गार्डन (३५ मीटर).          डीपी रस्ता (३० मीटर)

मयूर कॉलनी रस्ता (२४ मीटर)                   भेलकेनगर ते आझाद चौक ते संगम चौक रस्ता (२१ मीटर)

• चौकांचा विकास 

१. आशिष गार्डन चौक         २. भेलकेनगर चौक

३. आझाद चौक                  ४. गीताई मॉल चौक

५. शिवाजी पुतळा चौक        ६. कोकण एक्स्प्रेस चौक

उड्डाणपुल / भूयारी मार्ग : १) करिष्मा सोसायटी चौक २) कर्वे पुतळा चौक ३) आयडीयल कॉलनी लिंक रोड

कर्वे पुतळा चौक ते आशिष गार्डन रस्ता

डीपी रोड ३६ मीटर. प्रचंड वाहतूक असलेला प्रमुख अंतर्गत रस्ता. झाडे, लेन मार्किंग, पार्किंग आणि पादचाऱ्यांसाठी आकर्षक पदपथ आवश्यक, सर्व सुविधा, विशेषतः एमएनजीएलची पाईपलाईन भूमिगत असेल. रस्त्यांवर योग्य असे दिशादर्शक, माहिती आणि पथदिवे असतील.

मयूर कॉलनी (डीपीरोड) राजाराम पथ

डीपी रोड २४ मीटर कमी वाहतूक असलेला प्रशस्त रस्ता प्रस्तावित ग्रीन कॉरिडॉर, हा पर्यावरणपूरक असा असेल. या ठिकाणी सौरउर्जेवर चालणारे दिवे, ऑक्सिजनचा पुरवठा करणारे झाडे, रेनवॉटर हार्वेस्टिंग वगैरे सुविधा असतील. नागरिकांना चालण्यासाठी अत्यंत आकर्षक असे रस्ते या ठिकाणी असतील, पौड फाट्याशी हा रस्ता जोडण्यात आल्यानंतर हा रस्ता कवें सत्ता आणि पौड रस्त्याला समांतर रस्ता म्हणून काम करेल.

भेलके नगर चौक ते संगम चौक, आझाद नगर चौक रस्ता

डीपी रोड २० मीटर. प्रचंड वाहतूक असलेला अरुंद रस्ता. सत्याच्या दोन्ही बाबूला मार्केट पादचारी आणि वाहनचालक यांच्यासाठी यासाठी फेररचना आवश्यक. चालता येण्याजोगे पदपथ आवश्यक.

कुमार परिसर, स्व. श्रीकांत ठाकरे पथ

डीपी रोड ३० मीटर कमी वाहतूक असलेला प्रशस्त स्ता प्रस्तावित ग्रीन कॉरिडॉर, हा पर्यावरणपूरक असा असेल. या ठिकाणी सौरउर्जेवर चालणारे दिवे, ऑक्सिजनचा पुरवठा करणारे इण्डे, रेनवॉटर हार्वेस्टिंग वगैरे सुविधा असतील, नागरिकांना चालण्यासाठी अत्यंत आकर्षक असे रस्ते या ठिकाणी असतील. त्यांच्या विरंगुळ्यासाठी काही सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील,

करिष्मा सोसायटी चौकात (Split) उड्डाणपूल

 

– आयडियल कॉलनी चौक पौड फाट्याला जोडणारा भूमिगत सबवे

 

– कर्वे पुतळा चौकात वाय आकाराचा फ्लायओव्हरअर्बन वॉकिंग ट्रेल

अर्बन वॉल्कवे ट्रेल्स म्हणजे असे मार्ग जिथे सकाळी किंवा संध्याकाळी जास्तीत जास्त नागरिक चालण्यासाठी किंवा जॉगिंगसाठी जातात. अशा रस्त्यांना झाडांचे हिरवे आच्छादन असेल. आयडियल कॉलनीतील मैदानासारख्या मोकळ्या जागा, मैदाने किंवा उद्याने असतील. अशा रस्त्यांसाठी खास सुविधा निर्माण केल्या जातील. या ठिकाणी सौरउर्जेवर चालणारे दिवे, योग्य दिशादर्शक, सुरक्षिततेसाठी पोलिस चेकपोस्ट आणि कला सादरीकरण वगैरे गोष्टी विकसित करण्यात येतील. आतापर्यंत किती चालणे झाले आणि नेहमी हे अंतर चालण्यासाठी लागणारा कालावधी, अशी माहिती या ठिकाणी पुरविण्यात येईल.

उपलब्ध कटीबद्ध वचनबध्द!

पुण्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या कोथरुडच्या संस्कृतीला, परंपरेला आणि स्वभावाला साजेसा असा जनसेवक बनण्याचा प्रयत्न  शाम देशपांडे आतापर्यंत करीत आहेत. गेली २० वर्षाहून अधिक काळ नागरिकांना २४ तास, ३६५ दिवस सहज पणे उपलब्ध असणारा जनसेवक ही ओळख निर्माण केली आहे. महापालिका आणि मतदार यांच्यामधील केवळ दूत आहे, याची पूर्ण जाणीव कायम ठेवून उपलब्ध कटीबद्ध वचनबध्द नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

साहित्यिक कलावंत संमेलन एक व्यापक साहित्य चळवळ : डॉ . सदानंद मोरे

0

साहित्य कलावंत प्रतिष्ठान आयोजित साहित्यिक कलावंत संमेलनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त लोगोचे अनावरण व वारजे मित्र पाक्षिकाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना डॉ. मोरे सर म्हणालेत, वारजे ह्या उपनगरात मा. दिलीप बराटे व त्यांच्या सहविचारी सहकाऱ्यांनी 25 वर्षांपूर्वी सुरू केलेली ही साहित्य चळवळ आज महाराष्ट्रातील एक व्यापक चळवळ म्हणून ओळखली जाते.

संस्था सुरू करणे सोपे असते पण समाजाला सोबत घेऊन अव्याहतपणे 25 वर्ष संस्थेचे काम सुरू ठेवणे खूप अवघड आहे. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान एका निष्ठेने ते काम करीत आहे. अशा संस्था समाजात काम करतात म्हणून सांस्कृतिक चळवळ आणि साहित्यिक वातावरण निर्माण होत राहते. समाजाला चांगल्या विचारांनी बांधून ठेवण्याचे काम करीत असतात .पुढे अनेक वर्षे ही संस्था काम करीत राहील हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ संपादक मा. यमाजी मालकर उपस्थित होते. साहित्य संस्थेचे मुखपत्र असणे खूप महत्त्वाचे आहे.

एक वैचारिक भूमिका घेऊन समाज प्रबोधनासाठी प्रतिष्ठान पंचवीस वर्षे काम करीत आहे ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. वारजे हे एका जिल्ह्याची लोकसंख्या असलेला परिसर आहे. या भागाची सांस्कृतिक व साहित्यिक भूक भगविण्याचे काम संस्था करीत आहे याचा आनंद वाटतो. पाक्षिक सुरू करणे सोपे आहे पण ते वाचणाऱ्या वाचकांपर्यंत योग्य पद्धतीने वितरण होणे महत्त्वाचे आहे असे मत मा. मालकर यांनी व्यक्त केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. दिलीप बराटे यांनी प्रतिष्ठान स्थापने मागची भूमिका विशद केली. पूर्वी वारजे हे छोटे उपनगर होते .या भागातील काही साहित्यिक मंडळी एकत्रित येऊन उपेक्षित आणि दुर्लक्षित साहित्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या विचारातून आम्ही सर्वांनी 2000 मध्ये साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानची स्थापना केली.

आज संस्था रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत काम करते आहे याचे मलाही समाधान वाटते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी परिसरातील अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. वारजेचे माजी सरपंच मा. श्रीकृष्ण बराटे, सामाजिक कार्यकर्ते मा.आप्पा दांगट, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. शैलेश त्रिभुवन, खजिनदार मा. संजय भामरे, उपाध्यक्ष मा.राजेंद्र वाघ, जेष्ठ सदस्य मा. के.डी. पवार,मा. अविनाश जाधव ,मा.सतीश सुरवसे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सुप्रसिद्ध चित्रकार मा. जयदीप कडू यांनी लोगो तयार केला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव श्री वि.दा. पिंगळे यांनी केले तर आभार वारजे मित्र पाक्षिकाचे मुख्य संपादक श्री देवेन्द सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. पावश्या गणपती विरंगुळा केंद्र वारजे पुणे या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.

मराठा समाजाने जातनिहाय जनगणनेत ओबीसी नोंद केल्यास…; समीर भुजबळांचा मोठा इशारा

0

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जातनिहाय जनगणनेत मराठा समाजाने ओबीसी म्हणून नोंद केल्यास त्याचा विरोध करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिला.त्यांच्या या इशाऱ्यामुळे नजिकच्या काळात नवा वाद चिघळण्याची शक्यता आहे. जातनिहाय जनगणनेबाबत समता परिषदेच्या माध्यमातून जनजागृती आणि परिषदेचा विस्तार करण्यासाठी भुजबळ यांनी दोन दिवसांचा विदर्भ दौरा केला. त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी जिल्हानिहाय संवाद साधला. जनगणनेबाबत सजग राहण्याची सूचना केली. यावेळी बापू भुजबळ, ईश्वर बाळबुधे, दिवाकर गमे आदी उपस्थित होते.

शिक्षेची तरतूद अन् कारवाई

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना समीर भुजबळ म्हणाले, ‘मराठा समाजातील नागरिकांनी ओबीसी म्हणून नोंद केली तरी, त्यांना पुरावा द्यावा लागेल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक योजनेचा मराठा समाजाला लाभ मिळत आहे. जातनिहाय जनगणनेत चुकीची माहिती देणाऱ्यांना शिक्षेची तरतूद असल्याने कारवाई होऊ शकते. ‘जनगणनेत चुकीच्या नोंदी ग्राह्य धरल्यास ओबीसींची लोकसंख्या वाढेल. तीनशे पन्नास जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. यात विमुक्त भटक्यांचा समावेश झाल्याने ओबीसींना प्रत्यक्षात १९ टक्केच लाभ मिळेल. चुकीच्या नोंदींची माहिती दिसून आल्यास जनगणनेवर आक्षेप घेण्यात येतील, असेही भुजबळ यांनी सांगितले.

‘तो’ आरोप समीर भुजबळांनी फेटाळला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेची घोषणा केल्यानंतर गावोगावी जनजागृतीचे परिषदेमार्फत काम केले जाणार आहे. गणना यशस्वी करण्यासाठी जिल्हानिहाय आढावा घेऊन कार्यकर्त्यांना सज्ज करण्यात येत आहे. समता परिषदेने ओबीसींच्या हक्कासाठी वेळोवेळी आंदोलने केली. विविध उपक्रम राबवून जनजागृती केली. खासदार असताना दोन हजार नऊ साली जातनिहाय जनगणनेचा मुद्दा रेटून धरला. यानंतर जातनिहाय गणना झाली पण, सत्ता बदलल्यानंतर अनेक त्रुटी असल्याचे कारण समोर करून ती जाहीर केली नाही, याकडेही समीर भुजबळ यांनी लक्ष वेधले. छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी समता परिषद दबावाचे राजकारण करते, हा आरोप समीर भुजबळ यांनी फेटाळून लावला.

राज्यात मेगाभरती! मंत्रालयात राखीव ५० जागा बिगर आदिवासींनी बळकावल्या भरती प्रक्रियेचे नियम बदलणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

0

राज्यातील विविध शासकीय पदांचा भारतीसंबंधीचा जुना आकृतिबंध आणि जुने नियुक्ती नियम यात आगामी दीडशे दिवसांच्या उद्दिष्ट कार्यक्रमांतर्गत सुधारणा करून या रिक्त पदांसाठी राज्य शासन ‘मेगाभरती’ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात केली. आमदार सदस्य भीमराव केराम यांनी मंत्रालयात आदिवासींच्या विविध विभागातील राखीव ५० जागा बिगर आदिवासींनी बळकावल्या असल्याचे निदर्शनास आले असून अवर सचिव, कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, लिपिक, टंकलेखक, उच्च श्रेणी लघु टंकलेखक आदी पदांवर हे अधिकारी आणि कर्मचारी काम करीत असल्याचे लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणले. या चर्चेत सदस्य डॉ. नितीन राऊत, नाना पटोले, भास्कर जाधव, सुरेश धस यांनीही उपप्रश्न उपस्थित करत सहभाग घेतला.

चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जात वैधता प्रमाणपत्राशिवाय कोणालाही राखीव जागांवर सेवेत घेतले जात नसल्याचे स्पष्ट केले. ” या संदर्भात न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरलेले आहे, त्यांना त्यांची नियुक्ती रद्द न करता, अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. मागील काळात शासनाने ७५ हजार पदभरतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार एक लाखांपेक्षा जास्त पदांची भरती करण्यात आली. राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील ६,८६० पदांवर जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेले कार्यरत आहे. मात्र त्यांना २० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. अशा पदांबाबत शासनाने मानवतापूर्ण दृष्टीने विचार करीत ही पदे अधिसंख्य केली. या पदांवर कार्यरत असलेल्यांना बढती मिळणार नाही. पण शासन त्यांना पदावरून कमीही करणार नाही. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही पदे व्यपगत होतील. अनुसूचित जमाती प्रवर्गातील बिंदूनामावलीनुसार एकही राखीव पद रिक्त ठेवण्यात येणार नाही,” असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

“अधिसंख्य असलेली ६ हजार ८६० पदे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी भरती करण्याकरिता रिक्त झालेली आहे. त्यापैकी १३४३ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पदांवर भरती केलेली आहे. उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ब्लॉक चेन पद्धतीवर अभिलेख आणण्याबाबत शासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी करताना कागदपत्रे तपासणे सोयीचे होईल. तसेच जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना सक्षम करण्यात येत आहे. अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत सचिवांचा गट तयार करण्यात येईल. या गटाच्या माध्यमातून अभ्यास करून कार्यवाही करण्यात येईल,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयाने सफाई कामगारांची पदे वारसा हक्काने भरण्याबाबत असलेली स्थगिती उठवलेली आहे. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार ही पदे वारसा हक्काने भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या पदांसाठीही भरतीही करण्यात येणार आहे,असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

अक्कलकुवा तालीक्यातील नेवासा अंकुश विहीर येथील बाबावाडी अंगणवाडी केंद्रावर मयत असलेल्या मदतनीस महिलेच्या नावावर अन्य महिलेने काम करून शासनाची फसवणूक केल्याचा मुद्दा आमश्या पाडवी यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याप्रकरणी दोषी आढळणाऱ्या बाळ विकासप्रकल्प अधिकारी आणि उपमुख्याधिकारी याना निलंबित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.