Home Blog Page 156

25 वर्षांची ओळख, 60 व्या वर्षी प्रेमाची कबुली, आमीर खानची नवी गर्लफ्रेंड किती शिकलीय?

0

नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेला आमीर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण म्हणजे त्याची नवीन गर्लफ्रेन्ड. गौरी स्प्रॅट असं तिचं नाव असून ती आमीर खानच्या प्रोडक्शन कंपनीत काम करते.गेल्या 25 वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखत आहेत तर दीड वर्षांपासून ते एकमेकांसोबत राहत आहेत. आमीर खानने त्याच्या 60 व्या वाढदिवसाच्या वेळी गौरीची ओळख करुन दिली.

गौरी स्प्रॅट ही एक अँग्लो-इंडियन असून तिचे वडील तामिळ-ब्रिटिश तर आई पंजाबी-आयरिश वंशाची आहे. ती बंगळुरूमध्ये राहते आणि आमिर खानच्या प्रोडक्शन कंपनीत काम करते. गौरीला सहा वर्षांचा मुलगाही आहे. आमिरने गौरीची त्याच्या कुटुंबीयांशी ओळख करून दिली आहे. त्यांना या दोघांचे रिलेशन मान्य आहे.

गौरी स्प्रॅटचे शिक्षण किती?

गौरी स्प्रॅट ही उच्च शिक्षित असून माउंटन स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स लंडनमधून फॅशन, स्टाइलिंग आणि फोटोग्राफीमध्ये FDA  पदवी प्राप्त केली आहे.

आमिर खान आणि त्याची या आधीची पत्नी किरण राव यांनी 16 वर्षांच्या लग्नानंतर 2021 मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता. या निर्णयासाठी किरण राव यांनी आपल्या वैयक्तिक स्पेसला जबाबदार धरले होते. घटस्फोटानंतरही दोघांमध्ये घट्ट मैत्री आणि कौटुंबिक नाते कायम असून ते त्यांचा मुलगा आझादचे सहपालक आहेत.

घटस्फोट होऊनही आमिर आणि किरण यांनी त्यांच्या नात्यातील सकारात्मक पैलू जपले आहेत. किरणने सांगितले की आमीर हा तिचा मित्र आणि गुरु आहे आणि ते एकमेकांच्या कुटुंबाला आपले मानतात. आमीरच्या आईला किरण अजूनही तिची सासू मानते तर आमीरची मुले जुनैद आणि इरा हे तिचे मित्र आहेत.

आमिरच्या वैवाहिक आयुष्यातील प्रवास

आमिर खानने याआधी दोन वेळा विवाह केला आहे. 1986 मध्ये त्याने पहिल्या पत्नी रीना दत्त हिच्याशी लग्न केले होते. मात्र, 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2005 मध्ये त्याने किरण रावशी दुसरे लग्न केले, परंतु 2021 मध्ये त्यांचेही लग्न संपुष्टात आले. आता गौरीसोबतच्या नात्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.

पडद्यामागे काहीतरी मोठं घडतंय ”पक्षाच्या हिताचा निर्णय एकत्रित मिळून घेऊ” पवार भेटीनंतर जयंत पाटलांचं विधान

0

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरु आहेत. जयंत पाटील पक्षावर नाराज आहेत, ते भाजपमध्ये जातील किंवा अजित पवारांसोबत जातील; असं बोललं जात आहे.त्यातच त्यांनी शुक्रवारी बारामती येथे शरद पवारांची भेट घेतली.

शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला संबोधित करताना जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी एक विधान केलं होतं. त्या विधानामुळे ते भाजपच्या वाटेवर आहेत, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. पाटील म्हणाले होते की, माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. या विधानानंतर शुक्रवारी पुन्हा जयंत पाटील बारामतीला गेले आणि शरद पवारांची भेट घेतली.

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मी नाराज नाहीये. मला बाहेर बोलायची चोरी झालीय. मी भाषण केलं होतं, ते काढून बघा. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आला होता, त्यांच्यासमोर भाषण करताना सांगितलं की, कालांतराने मोबदला वाढला तर लोक मावेजा घेतात आणि गप्प बसतात. तुम्ही शेवटपर्यंत ठाम आहात का? राजू शेट्टींनी हे आंदोलन हातात घेतलं म्हटल्यावर काही विषय नाही. आंदोलनाला पाठिंबा आहे, हीच भावना होती.

पाटील पुढे म्हणाले की, माझ्या भाषणातून मी नाराज आहे आणि पक्ष बदलणार असं म्हटलं जात आहे. एका तासामध्ये मी त्यावर स्पष्टीकरण दिलेलं होतं. प्रसारमाध्यमांनी ठरवलेलं दिसतंय की मला कुठेतरी ढकलायचं. आमच्या पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांची संख्या कमी असली तरी पवारांवर प्रेम असलेले लाखो लोक आहेत. जो काही पक्षाच्या हिताचा निर्णय आहे, तो आम्ही एकत्रित मिळून घेऊ.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी बोलताना जयंत पाटील हे सर्वांनाच हवेहवेसे वाटतात, असं विधान केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, राजकारणामध्ये मी सगळ्यांशीच चांगले संबंध ठेवले आहेत. पवार साहेबांकडून मी ते शिकलो आहे. त्यामुळे मी सर्वांना हवाहवासा वाटतो, त्यात गैर काही नाही.

दादा खिंडकरने ओंकार सातपुतेला का मारलं? धनंजय देशमुख यांनी सांगितलं, परमेश्वर सातपुतेंनाही दिलं उत्तर

0

संतोष देशमुख खून प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ज्या नेत्यांनी देशमुख खून प्रकरणात आवाज उठवला, त्यांच्याशी संबंधित लोकांचे जुने व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. यात सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांच्याशी संबंधित लोकांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तसेच धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर याने ओंकार सातपुते नावाच्या तरुणाला मारहाण केली होती, त्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर खिंडकर पोलिसांना शरण आला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी दादा खिंडकरवर गंभीर आरोप केले होते आणि अनेक प्रश्न उपस्थित केले होते. माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरसिंह पंडित यांनीच दादा खिंडकरच्या गुन्हेगारी कृत्याला बळ दिलं, असा आरोप सातपुते यांनी केला होता. शिवाय खिंडकरच्या कुटुंबाविषयी आणि संतोष देशमुख खून प्रकरणाविषयीसुद्धा भाष्य केलं होतं.

परमेश्वर सातपुते यांना धनंजय देशमुख यांनी चोख उत्तर दिलं असून दादा खिंडकरने ओंकार सातपुतेला का मारलं, याचाही खुलासा केला आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी देशमुख बोलत होते. ते म्हणाले की, याबाबतीत आम्ही एक शब्दही बोलणार नव्हतो. खिंडकर यांनी परवाच पत्रकारांना सांगितलं होतं की, ते प्रश्न गावातले आहेत. संतोष देशमुख यांच्या न्यायाचा मुद्दा भरकटला नाही पाहिजे. त्यामुळे आम्हीदेखील या विषयात बोललेलो नाही. काल पहाटे तीन वाजता केस झाली. त्यानंतर ते ११ वाजता खिंडकर हजर झाले. त्यामुळे तो विषय संपला होता. परंतु त्यानंतर परमेश्वर सातपुते यांची जी पत्रकार परिषद झाली, त्यातही आमचा काही रस नाही.

देशमुख पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात एवढं आंदोलन पेटलेलं असताना आणि सगळे न्यायाच्या भूमिकेत असताना सातपुते यांनी चुकीचं विधान केलं आहे. त्यांनी या मुद्द्याच्या आडून आम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रय़त्न केला आहे. त्यांनी मोठी चूक केली आहे. दादासाहेबांबद्दल बोलताना त्यांनी, लग्नाबद्दल प्रश्न उपस्थित केले. बीडला दत्त मंदिरामध्ये लग्न झालं होतं, पत्रिका छापलेल्या होत्या. तरीही त्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे. मी व्हॉट्सअॅपवर त्यांना विचारलेलं आहे. ते विचार करुन बोलले नाहीत.

दादा खिंडकर यांनी केलेल्या मारहाणीबद्दल बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, कुणीही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही. जशी केस पुढे जाईल, तसं सगळ्या गोष्टी पुढे येतील. दीड वर्षांपूर्वीचं प्रकरण उकरुन काढलेलं आहे. दादा खिंडकर यांनी तीन महिन्याच्या कालावधीत न्यायाच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गोष्ट केलेली नाही. मी पोलिसांना याबाबत बोललो आहे. दादा खिंडकरच्या पत्नीला ओंकार सातपुतेने शिव्या दिलेल्या होत्या, चुकीचं बोलला होता, त्या कारणामुळे हे भांडण झालेलं होतं, हे मला प्रथमदर्शनी कळतंय. तपासामध्ये आणखी खुलासे होऊ शकतात.

देशमुख पुढे म्हणाले, परमेश्वर सातपुते यांनी संतोष अण्णांचा विषय बोलायला नव्हता पाहिजे. कुठलंही कुठे कनेक्शन जोडण्याचं काम सातपुते यांनी केलं आहे. माझे साडू आणि मेव्हणीविषयी जे काही बोलले आहेत, त्याबद्दल आम्ही जाब विचारणार आहोत. यानंतर पुन्हा अशा पद्धतीने नाव घेतलं तर आम्ही बोलू देणार नाहीत. त्यांच्यावर किती गुन्हे दाखल झाले आहेत, ते आता पुढे आलेलं आहे. महिलांच्या आडून गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सातपुते केलेला आहे. त्यांनी पीडित कुटुंबाला मध्ये आणलं आहे आणि या गावच्या लेकीविषयी चुकीच्या पद्धतीने बोलले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत.

धक्कादायक! पोलिस ठाण्यालगत झोपलेल्या एकाचा डोक्यात दगड घालून खून

0

शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या संरक्षक भिंतीलगत असलेल्या फुटपाथवर झोपलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा (वय 50) डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघड झाली. याबाबत लातूर येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लातुरतील एका संशयीत व्यक्तीला (वय 55) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगितले, मयत अनोळखी व्यक्ती ही मानसिक स्थिती बरी नसलेला असून, तो दिवसभर भिक्षा मागून पोट भरत होता. दरम्यान, तो रात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्यालागत असलेल्या फुटपाथवर एका टपरीच्या आडोशाला झोपत होता. शुक्रवारी पहाटे रात्री 2 ते 5 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने अंधाराचा फायदा घेत मोठा दगड झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात घातला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या काही नागरिकांना दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी ठाण्याबाहेर येत पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. घटनास्थळी लातूर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत सावंत, पोलिस निरीक्षक दिलीप सागर यांनी भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मयत व्यक्तीची ओळख पटली नव्हती.

याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

जागेच्या कारणावरून क्षुल्लक वाद; काढला काटा…

लातुरतील प्रकाशनगर भागातून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची कसून चौकशी सुरु असून, त्याने हा खून केल्याचे समोर आले आहे. मयत आणि मारेकरी हे दोघेही मनावर परिणाम झालेले असून, भिक्षा मागून चरितार्थ चालवितात. फुटपाथवर झोपण्याच्या जागेच्या कारणावरून त्याच्यात क्षुल्लक वाद झाला होता. हा राग मनात ठेवून गुरुवारी रात्री झोपलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याने पळ काढला, असे पोलिस निरीक्षक दिलीप सागर म्हणाले.

चार दिवसामध्ये घडल्या दोन घटना…

चार दिवसांपूर्वी झोपलेल्या एका व्यक्तीला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची घटना औसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या घटनेतील व्यक्ती हा भिक्षा मागून जगत होता. यातील संशयीत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ताजी असतानाच लातुरात पोलिस ठाण्यालागच्या फुटपाथवर झोपलेल्या एका अनोळखी व्यक्तीचाही डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे.

नाना पटोले यांची एकनाथ शिंदे अन् अजित पवार यांना CM पदाची ऑफर, बावनकुळेंनी दिला टोमणेवजा सल्ला

0

आज धुळवडीच्या मुहुर्तावर काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रि‍पदाची खुली ऑफर दिली आहे. “आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. वेळ आली तर, सध्या दोघांमध्ये मुख्यमंत्रीपदाची जी शर्यत सुरू आहे, तर एकाला काही दिवस आणि एकाला काही दिवस, असे दोघांनाही मुख्यमंत्री करू. ते भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही त्या दोघांनाही आलटून-पालटून कशा प्रकारचे मुख्यमंत्री बनवायचे, ते बनवायचा निर्णय घेऊ,” असे विधान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले होते. यावर आता भारतीय जनतापक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत पटोले यांना टोमणावजा सल्ला दिला आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांच्याकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत या तुम्हाला मुख्यंत्री करतो, अशी ऑफर देण्यात आली आहे? असे विचारले असता, बावनकुळे म्हणाले, “नाना पटोले यांना होळीच्या दिवशी चांगला सल्ला आहे. विरोधी पक्षाचे मॅन्डेट आहे. विरोधीपक्ष म्हणून पाच वर्ष काम करा. पुन्हा जनतेचा विश्वास मिळवा आणि जनतेमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवा. हेच त्यांच्यासाठी योग्य आहे.” बावनकुळे पत्रकारांसोबत बोलत होते.

बावनकुळे पुढे म्हणाले, “अशा ऑफर्स वैगेरे महायुतीचे कुणी नेते ऐकत नाही. आमच्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या डबल इंजिन सरकाचा १४ कोटी जनतेच्या विकासाचा संकल्प आहे. आम्ही विकासाला पुढे नेण्यासाठी काम करत आहोत. अशा ऑफरसाठी काम करत नाही.” एवढेच नाही, तर “त्यांनी विरोधीपक्षात राहून सरकारला चांगल्या सूचना द्याव्यात आणि विकासासाठी मदत करावी. आज होळीच्या दिवशी, सर्व मनभेद मतभेद बाजूला सारून आपण एकत्रितपणे महाराष्ट्र पुढे नेऊया, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.

“मनातून काही जात नाही…”

नुकतेच अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषदेत घेतली होती. यावेळी बोलताना, “गेल्यावेळी आम्ही तिघे होतो, आता खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. यावर, अजितदादांनी “मनातून काही जात नाही ते…”, असे विधान केले होते. तेव्हा पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला होता.

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ३३७ कोटींचा बॉम्ब; हिशोबच लागत नाही भाजपकडून प्रश्नांची सरबत्ती, विषय पुन्हा तापला

0

ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात यंदा ६०० कोटी रुपयांची वाढ झाली. त्यामुळे अर्थसंकल्प ५ हजार कोटींच्या पुढे गेला. पालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकार वाढत असताना दुसरीकडे पालिकेतील भ्रष्टाचाराचे आकडेदेखील वाढू लागल्याचा आरोप होऊ लागला आहे. मागील पाच वर्षांत पालिकेचं लेखापरीक्षण झालेलं नाही. त्यामुळे ३३७ कोटी रुपयांचा हिशोबच लागत नाही. २०१९-२० पर्यंतचाच लेखा परीक्षण अहवाल सादर झालेला आहे. या सगळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केली आहे. तर सगळ्याचा हिशोब मिळेल, असं मोघम उत्तर ठाण्याचे खासदार आणि शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी दिलं आहे.

गेल्या ५ वर्षांत पालिकेचं लेखा परीक्षण झालेलं नाही. २०१९-२० नंतर सरकारकडून मिळालेल्या करोना निधीची माहिती पालिकेकडे नाही. नगरविकास खात्याकडून आलेला निधी आणि केंद्र सरकारकडून मिळालेलं अर्थसहाय्य यांचीही माहिती मिळत नाही. तब्बल ३३७ कोटी रुपयांचा हिशोबच लागत नाही, असा आरोप होत आहे. विशेष म्हणजे भाजप आमदारांकडून भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना शिवसेनेचे नेते कोणताही घोटाळा झाला नसल्याचं म्हणत सारवासारव करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. ठाणे महापालिका एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. हा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी आता भाजपनं कंबर कसली आहे. त्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह ठाण्यातील सगळेच आमदार सक्रिय झाले आहेत.

निधी आला तो कुठे गेला? म्हणजे ही काय लूट करण्याची सूट आहे का?, असे सवाल भाजप आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केले. त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. पालिकेचे अधिकारी अंदाधुंदपणे, मस्तवालपणे कसेही काम करणार, कसेही वागणार, मनमर्जी करणार, यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. हा प्रकार निषेधार्ह आहे. या सगळ्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केळकर यांनी केली. गेल्या ५ वर्षांत आलेल्या निधीचं काय झालं, असा सवाल त्यांनी विचारला. अधिकाऱ्यांवर जाब विचारा. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.

यावर बोलताना सगळ्याचा हिशोब मिळेल, अशी मोघम प्रतिक्रिया ठाण्याचे खासदार आणि माजी महापौर नरेश म्हस्केंनी दिली. या सगळ्या बातम्या पसरलेल्या असतात. ग्राम पंचायतीचाही हिशोब मिळतो, महापालिकेचाही मिळेल. विरोधक चुकीच्या पद्धतीनं टीका करण्यासाठी सगळं करत आहेत, असं त्रोटक उत्तर त्यांनी दिलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी हपापाचा माल गपापा म्हणत या सगळ्यावर भाष्य केलं. कशाचीही हिशोब मिळणार नाही. इकडे ३० बाईक ऍम्ब्युलन्स सडत पडल्या आहेत. त्याचाही हिशोब कोणाकडे नाही, असं आव्हाड म्हणाले.

ऑडिट न करण्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराचं प्रमाण, त्याचे मार्ग प्रमाणापलीकडे वाढले असल्याचं अभ्यासक नितीन देशपांडे म्हणाले. भ्रष्टाचार वाढल्यामुळेच ऑडिट रिपोर्ट तयार होत नाही. ऑडिट रिपोर्ट तयार न होणं ही सामान्य करदात्यांची फसवणूक आहे. याला आयुक्त जबाबदार आहेत. ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर गेल्या ५ वर्षांचा ऑडिट रिपोर्ट नाही. जर रिपोर्ट नाही तर मग बजेटला नेमका नियम काय आहे? असा सवाल त्यांनी केला.

काँग्रेसच्या बड्या नेत्यावर गोळीबार, हल्लेखोरांकडून तब्बल १३ राउंड फायर; राजकारणात मोठी खळबळ

0

शिमला : देशभरात रंगपंचमी, धुळवडीचा उत्साह आहे. सर्वत्र धुळवड साजरी केली जात असताना अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी काँग्रेस आमदार बंबर ठाकूर यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या गोळीबारात त्यांच्या पायाला गोळी लागली. या गोळीबारात काँग्रेसचे माजी आमदार ठाकूर यांचे पीएसओ संजीव कुमार हेही जखमी झाले आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये होळी, रंगपंचमीच्या दिवशी माजी काँग्रेस आमदार बंबर ठाकूर यांच्यावर गोळीबार झाला. बंबर ठाकूर काँग्रेसचे नेहमीच चर्चेत राहणारे माजी आमदार आहेत. आधी अनेक वादात त्यांचं नावही आलं आहे. बिलासपूरमध्ये माजी आमदार बंबर ठाकूर यांच्या घरावर एकूण १३ राउंड फायर केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

गोळीबाराची घटना माजी आमदाराच्या घराजवळच घडली. यात ठाकूर आणि पीएसओ संजीव कुमार यांच्या पाठीत, पोटात गोळी लागली. ठाकूर यांच्यावर सुरुवातीला बिलासपूरमध्ये उपचार करण्यात आले आणि नंतर त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी आयजीएमसी शिमला इथे पाठवण्यात आलं आहे, तर त्यांच्या पीएसओला गंभीर अवस्थेत एम्स बिलासपूरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तसंच या गोळीबारात माजी आमदार आणि त्यांच्या पीएसओशिवाय आणखी काही लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

माजी आमदाराच्या मुलाने दिली गोळीबाराच्या घटनेची माहिती

काँग्रेस माजी आमदार बंबर ठाकूर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी, तसंच त्यांना अटक करण्यासाठी एक टीम तैनात केली आहे. बंबर ठाकूर यांचा मुलगा ईशान सिंहने फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी गोळीबाराच्या घटनेची माहिती दिली आहे. आपल्या वडिलांवर गोळीबार झाला आहे. यात त्यांना गोळी लागली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या मुलाने दिली आहे.

सरपंच हत्या प्रकरणानंतर पोलिसांवरही जातीवादीचे आरोप पोलीस अधीक्षकांचा निर्णय: नो पाटील, नो देसाई, आता फक्त…

0

बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्हा राज्यभरात चर्चेत आला. या संपूर्ण प्रकरणाला पुढे जातीयवादाचा रंग मिळाला. देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा विषय भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी सातत्यानं लावून धरला. बीड जिल्ह्याच्या पोलीस दलातील बिंदू नामावलीचा मुद्दा धस यांनीच उपस्थित केला होता. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला. जिल्ह्यातील पोलीस दलात एकाच जातीचं वर्चस्व असल्याचं धस यांनी सांगितलं होतं. पोलीस दलातील अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मर्जीतील असल्याचा विषयदेखील धस यांनीच समोर आणला.

बीड पोलीस दलातील जातीवादाचा विषय ताजा असताना पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीडमध्ये पोलिसांच्या नेमप्लेटवर केवळ नाव असेल, आडनाव नाही, असा निर्णय काँवत यांनी घेतला आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांवर देखील जातीवादीचे आरोप झाले. त्यानंतर बीड पोलीस अधीक्षकांनी हे पाऊल उचललं आहे. नेमप्लेटवरील आडनाव काढून टाकल्यानं कोणता कर्मचारी कुठल्या जातीचा आहे हे लक्षात येणार नाही, हा यामागचा हेतू आहे.

खाकी घातल्यानंतर जिल्ह्यामध्ये काम करताना आम्ही कुठलाही भेदभाव करत नाहीत. कुठली जात आहे, कुठला पक्ष आहे, हे आम्ही पाहत नाहीत कायद्याप्रमाणे आम्ही काम करतो, असं पोलीस अधीक्षक काँवत यांनी सांगितलं. ‘आमच्या विभागातील कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांची आडनावं बघून लोक जातीबद्दल चर्चा करतात. आमची नेमप्लेट पाहून जनता आमच्यावर विश्वास ठेवत नाही. आम्ही चांगलं काम करत असूही नेमप्लेटवरील आडनाव पाहून त्यावरुन जात शोधली जाते. त्यामुळे खाकी गणवेशावरील नेमप्लेटमधून आम्ही आडनाव काढून टाकलं आहे. फक्त नाव ठेवलेलं आहे. यामुळे हा पोलीस या जातीचा आहे अशी शंका आता घेता येणार नाही,’ अशा शब्दांत काँवत यांनी नेमप्लेटवरुन आडनाव काढून टाकण्यामागील आपला हेतू सांगितला.

सर्व जनता आम्हाला समान आहे. आम्ही कुठला पक्ष, जात पाहत नाही. कायद्याप्रमाणे आम्ही काम करतो. त्यामुळे आम्ही सर्व पोलिसांना पहिलं नाव असलेली नेम प्लेट दिलेली आहे. पोलिसाचं आडनाव बघून तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीचं मत परिवर्तन होऊ नये यासाठी आम्ही केवळ पहिलं नाव असलेली नेम प्लेट दिली आहे, अशी माहिती काँवत यांनी दिली. आम्ही निष्पक्षपणे लोकांना सेवा देणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

अजितदादांचा काँग्रेसला मोठा दणका; ‘स्थानिक’च्या निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये ताकद वाढणार; दोन बडे नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

0

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं, काँग्रेस हा राज्यात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. तर दुसरीकडे महायुतीला मोठा दणका बसला, अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर महायुतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार पुनरागमन केलं. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आणि पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सत्ता आली. महायुतीच्या राज्यात तब्बल 232 जागा निवडून आल्या, तर महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांना केवळ 50 जागांवरच समाधान मानावलं लागलं.

विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीसाठी आणखी एक विषय डोकेदुखी ठरत आहे. तो म्हणजे महाविकास आघाडीमधील अनेक नेते सध्या महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. ही गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडीसमोर आहे. त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे आणि काँग्रेसचे नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासोबतच मीनल खतगावकर या देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काँग्रेसकडून भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर नायगाव विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता खतगावकर कुटुंब राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्या उपस्थित लवकरच हा पक्षप्रवेश होणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर आता भास्करराव पाटील खतगावकर देखील राष्ट्रवादीत जाण्याची शक्यात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

शेअर बाजाराचा फुगा फुटत आहे इतिहासातील सर्वात मोठी घसरण; 1929 सारखी परिस्थिती होणार; शेअर बाजाराबाबतचा मोठा अंदाज

0

जागतिक बाजारात प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारही वाईट टप्प्यातून जात आहे. जगात व्यापारयुद्ध सुरू झाले आहे. यामुळे देशातील आणि जगातील बाजारपेठेत भूकंप झाला आहे. दरम्यान, रिच डॅड पुअर डॅड पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक आणि गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी आणखी एक भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी म्हटले आहे की शेअर बाजाराचा फुगा फुटत आहे आणि इतिहासातील सर्वात मोठी मंदी येणार आहे.

1929चा विक्रमही मोडणार!

कियोसाकीने इतिहासातील सर्वात मोठ्या घसरणीचा इशारा दिला असून यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी मंगळवारी त्यांच्या X खात्यावर एक पोस्ट शेअर करताना सांगितले की, जागतिक बाजारपेठांमध्ये प्रचंड गोंधळ आहे.

यामुळे इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक मंदी येऊ शकते. युनायटेड स्टेट्स, जर्मनी आणि जपानमधील आर्थिक संकटांमुळे ही मंदी 1929 च्या शेअर बाजारातील घसरणीपेक्षा भयंकर असू शकते अशी भीती आहे.