Home Blog Page 147

कु. रुची राजेश मोहितेने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला

0

गुहागर दि. १८ (रामदास धो. गमरे) महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळच्या वतीने आयोजित ऋतुरंग २०२४ या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत गिमवी विभाग क्र. ३ चे अध्यक्ष राजेश मोहिते व विभागीय महिला हिशोब तपासनीस सौ. शुभांगी राजेश मोहिते या उभयतांची सुकन्या कु. रुची राजेश मोहिते हिने प्रथम क्रमांक पटकावून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

सेमी इंग्लिश माध्यम, प्राथमिक शाळा मार्गताम्हणे, चिपळूण या शाळेत इयत्ता ४ थी मध्ये शिकणारी कु. रुची राजेश मोहिते ही लहानपणीपासूनच कलासक्त असून अभ्यासू व मेहनती आहे, चित्रकलेत पारंगत रुची अभ्यासासोबतच कलेची आवड जोपासत आपल्या आईवडिलांचे, शाळेचे, गावाचे, विभागाचे, तालुक्याचे नाव उंचावत आहे त्यामुळे बौद्धजन सहकारी संघ, विभाग क्र. ३ च्या वतीने कु. रुची राजेश मोहिते व तिच्या पालकांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले आहे.

महाबोधी महाविहार बोधगया मुक्ती साठी बौद्ध महामोर्चाची तहसीलदार कार्यालयात धडक

0

पनवेल दि. १९ (रामदास धो. गमरे) बौद्ध धम्मियांचे श्रद्धास्थान महाबोधी महाविहाराचे (बोधगया, बिहार) संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात हवे परंतु अधिनियम बी.टी. १९४९ मुळे सदर महाविहार बौद्ध व हिंदू अश्या उभय धर्मियांच्या ताब्यात आहे, जे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १३, १४, १५, २५, २६ चे पूर्णतः उल्लंघन करणारे आहे तसेच अनुचित पद्धतीने बौद्धांच्या धार्मिक हक्कांवर अतिक्रमण करणारे आहे तरी असे अतिरेकी अधिनियम रद्द करण्यासाठी जगभरातील भन्तेजीने मोठं आंदोलन उभे केले आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी बौद्धजन पंचायत समितीच्या सर्व शाखा, गटप्रतिनिधी, विविध राजकिय, सामाजिक, धार्मिक संघटना, जयंती महोत्सव समिती तसेच तमाम बौद्ध बंधू-भगिनींनी प्रभाकर कांबळे, दिनेश जाधव, मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रांत कार्यालय येथे महामोर्चा काढून बोधगया मुक्ती आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला.

सदर प्रसंगी भन्तेजी पूर्ण रोशन आणि भन्तेजी अश्वमेघ, बौद्धजन पंचायत समितीचे खजिनदार नागसेन गमरे, विश्वस्त मंडळ, विभाग प्रतिनिधी आणि सर्व पदाधिकारी महिला मंडळ, सभासद नथुराम साखरे, हरिभाऊ पवार, भगवान कांबळे, जिनावास कदम, दीपक जाधव, शरद जाधव, उद्देश पवार, सुरेखा साखरे, दिलीप कदम, बबन पवार, सखाराम कदम, कमलाकर कांबळे, प्रल्हाद जाधव, सुगंध कदम, रमेश गमरे, आशिष कदम, विठोबा पवार, ऍड. संदीप साळवे, राजेश गाडे, आम्रपाली गाडे, सतीश गमरे, राजेश लोखंडे, जि. बी. कदम, अनंत साळवी, रुके, प्रभाकर जाधव, आणि सर्व शाखा पदाधिकारी सदस्य, महिला मंडळ, आर. पी. आय. पनवेल महानगर पालिका क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे, पत्रकार निलेश सोनावणे, मुलगंध श्री विहार ट्रस्ट चे अध्यक्ष दिनेश जाधव, शक्ती संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड, परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे, मोहन गायकवाड, माजी नगरसेवक प्रकाश विनेदार, एकनाथ गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे महेंद्र मोरे, कोमोठे रिपाई शहर अध्यक्ष मंगेश, स्वाभिमानी युथ रिपब्लिकन सेने रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे, रायगड जिल्हा रिपब्लिकन सेना उपाध्यक्ष सुधीर पवार, प्रबुद्ध सामाजिक संस्था अध्यक्ष कुणाल लोंढे, नरेंद्र गायकवाड, संदीप भालेराव, मिलिंद कांबळे, सोरटे, बाबू गायकवाड, अनुराधा, शारदा शिरोळे, राज सदावर्ते, कामगार नेते अनिल जाधव, राहुल गायकवाड, राजेश खंडागळे, रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव धडक मोर्चा काढून सरकारने लवकरात लवकर अन्यायकारक अधिनियम बी.टी. १९४९ हटवून महाबोधी महाविहाराचा संपूर्ण ताबा बौद्घ धम्मास द्यावा असे सरकारला सूचित केले.

सरतेशेवटी सर्व आंदोलनकर्त्यांनी बोधगया मुक्ती आंदोलनास आपला जाहीर पाठिंबा दर्शवून सभा तहकूब करून सरकारी नियमानुसार शांततेत आपापल्या गंतव्यस्थानी प्रस्थान केले.

महाराष्ट्रातील लाडके गायक भार्गवदास जाधव यांच्या पत्नी जयश्री उर्फ भारती जाधव कालवश

0

मुंबई दि. १९ (रामदास धो. गमरे) सम्यक कोकण कला संस्था, महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक सदस्य तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष महाराष्ट्राचे लाडके गायक, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ४३९ घणसोली या शाखेचे अध्यक्ष, बौद्धजन सेवा संघ नायशी, मुंबई शाखेचे अध्यक्ष, नायशी गावचे सुपुत्र मा. भार्गवदास जाधव यांच्या सुविद्य पत्नी सौ. जयश्री उर्फ भारती भार्गवदास जाधव (नाईस्कर) मुक्काम गाव नायशी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

कालकथित जयश्री उर्फ भारती भार्गवदास या सोज्वळ मनाच्या, हसतमुख, सर्वसमावेशक, मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाच्या होत्या त्यांच्या अंत्ययात्रेत समाजातील सर्वच थरातील मान्यवर तसेच सम्यक कोकण कला संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कलावंत, चिपळूण तालुका बौद्ध हितसंरक्षण समिती या समितीची संपूर्ण कार्यकारिणी, विविध पक्षातील, सामाजिक, राजकीय, कला संघटनांचे विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यांच्या अचानक जाण्याने समाजात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यामागे त्यांचे पती भार्गवदास जाधव, दोन मुली, दोन जावई, पुतणे, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

दिवंगत जयश्री उर्फ भारती भार्गवदास जाधव यांचा जलदानविधी, पुण्यानुमोदन व शोकसभेचा कार्यक्रम रविवार दि. २३ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता पंचवटी को. ऑप. हौसिंग सोसायटी, सेक्टर ५, घणसोली, नवी मुंबई येथे शाखा क्र. ४३९ चे उपाध्यक्ष दिलीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासद, कार्यकर्त्यांनी, विविध आंबेडकरी संघटना, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संघटनांच्या सदस्य तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आदर्शांस श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती बौद्धजन सेवा संघ नायशी गाव व मुंबई शाखेच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केली आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय!; सुरक्षेच्या कारणास्तव…. सरकारी वकीलाची कोल्हेंची माहिती

0

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांंचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. वातावरण चांगलंच तापलं. दरम्यान हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आलं आहे, तसेच एसआयटी देखील गठीत करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात सीआयडीनं आरोपपत्र देखील दाखल केलं असून, न्यायालयीन सुनावणीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला आता बीड जिल्हा सत्र न्यायालयात चालवला जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज न्यायालयाऐवजी बीड न्यायालयात चालवला जावा असा विनंती अर्ज करण्यात आला होता, या विनंती अर्जासाठी काल बीडच्या न्यायालयात दोन्ही पक्षाचे वकील हजर होते. काल युक्तिवाद झाल्यानंतर आज या प्रकरणात न्यायालयानं निकाल दिला आहे. या निकालानुसार  इथून पुढे  सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालवला जाणार आहे. यासंदर्भात सरकारी पक्षाचे वकील बाळासाहेब कोल्हे यांनी माहिती दिली.

आतापर्यंत काय -काय घडलं?

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यात वातावरण चांगलंच तापलं. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी राज्यभरात मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केलं. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली. मात्र या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आलं. या प्रकरणात एसआयटी देखील स्थापन करण्यात आली. त्यानंतर सीआयडीनं या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं. वाल्मिक कराड हाच या घटनेचा मास्टर मांईड असल्याचं सीआयडीच्या आरोप पत्रात म्हटलं आहे. दरम्यान आरोप पत्र सादर केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो  सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वातावरण चांगलंच तापलं, आता या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे.

राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यास मविआचं पत्र; उद्या काळ्या फिती लावून कामकाज! नेमकं कारण काय?

0

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हे सभागृहाचे कामकाज करताना पक्षपाती व एकांगीपणे कामकाज चालवत आहेत. सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नाही. विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेते यांचे हक्क डावलले जात असल्याने त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे, राम शिंदे यांना सभापती यांना पदावरुन दुर करण्यात यावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानपरिषदेतील सभापती आणि तालिका सभापती चित्रा वाघ यांच्यावर देखील एककलमी कार्यक्रमाचे गंभीर आरोप करत दोघांनाही पदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आमदारांनी आपल्या सहीचे पत्रही सभापतींना पाठवले आहे.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 183 (ग) व म.वि.प. नियम 11 नुसार आम्ही पुढील प्रस्तावाची सूचना देत आहोत. “महाराष्ट्र विधानपरिषदेचे मा. सभापती प्रा.राम शिंदे हे सभागृहाचे कामकाज करताना पक्षपाती व एकांगीपणे कासकाज चालवत आहेत. सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नाही, विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेते यांचे हक्क डावलले जात असल्याने त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. तरी मा. सभापती यांना पदावरुन दूर करण्यात यावे.”, असा मजकूर दानवे यांनी दिलेल्या पत्रातून लिहिण्यात आला आहे.

विश्वास ठराव रेटून मांडला- दानवे

विधानपरिषदेतही महाविकास आघाडीचे आमदार संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. विधानपरिषदेत विरोधक आमदारांनी सभात्याग करून ते सभागृहाबाहेर आले होते. विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध 5 मार्च रोजीच अविश्वास प्रस्ताव दिला होता. मात्र, काल हा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. त्यावरूनही विरोधी पक्षातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, आज कुठेही सभागृहाच्या कार्यक्रमात नसताना भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी गोऱ्हे यांच्यावर विश्वास ठराव मांडला आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांचा त्यांना माज आहे, रेटून त्यांनी गोऱ्हे बद्दलचा विश्वास ठराव  मंजूर करून घेतला. आम्हाला कुठली बोलण्याची संधी त्यांनी दिली नाही, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी विरोध दर्शवला.

मविआचे उद्या काळ्या फिती लावून कामकाज

लोकशाही असल्याने विरोधी पक्षाच्या एका जरी आमदाराला भूमिका मांडू दिली पाहिजे. सभागृहात मुख्यमंत्री होते, विधान परिषद अध्यक्ष होते. मात्र, विरोधी पक्षातील आमदारांना बाजू मांडू दिली नाही. त्यामुळे, सभापती यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी अविश्वास ठराव मांडला असून आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, उद्या विधान परिषदेचे कामकाज देखील काळ्याफिती लावून करणार आहोत. उपसभापती जेव्हा सभापतीच्या खुर्चीवर बसतील तेव्हा एकही महाविकास आघाडीचा आमदार सभागृहात बसणार नाही, अशी भूमिका मविआच्या आमदारांनी घेतली आहे.

महाराष्ट्राचा मणिपूर बनवण्याचा प्रयत्न – आदित्य ठाकरे

दरम्यान, विरोधी पक्षातील शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही सभागृहातील वादावर भूमिका मांडली. दोन्ही सभागृहात मनमानी कारभार सुरु आहे. आम्ही प्रश्न विचारले तर मंत्रीच नसतात, मग बोलून, विषय मांडून फायदा तरी काय? वरच्या सभागृहात अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला तरी रेटून नेण्याचं काम हे सत्ताधारी लोकांककडून केलं जातय. महाराष्ट्राचे मणिपूर बनवण्याचा प्रयत्न हे सरकार करतय, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मंत्र्यांच्या बेजबाबदार विधानांवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान; “राजधर्माचे पालन…संयम बाळगणे गरजेचे”

0

नागपूरमध्ये दंगल उसळल्यानंतर सरकारमधील काही मंत्री चिथावणीखोर विधाने करत असल्याबाबतचा आरोप विरोधकांनी केला आहे. मंत्र्यांच्या या विधानांवर मुख्यमंत्र्यांनी अंकुश लावावा, अशी मागणी होत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

“जेव्हा आपण मंत्री असतो तेव्हा संयमानेच बोलले पाहिजे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन करण्याबाबत विधान केले होते. त्यामुळे आपले विचार, आपल्या आवडी-निवडी या बाजूला ठेवल्या पाहिजेत. आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे. संविधानाने आपल्याला कुणाहीबरोबर अन्याय न करता वागण्याची जबाबदारी टाकली आहे. मंत्र्यांनी बोलत असताना संयम बाळगला पाहिजे. आपल्या बोलण्याने कुठेही तेढ निर्माण होणार नाही, हा प्रयत्न केला पाहिजे”, असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

लोकमत वृत्तसंस्थेच्या एका पुरस्कार सोहळ्यात नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही मुलाखत घेतली. जयंत पाटील यांनी फडणवीस यांना प्रश्न विचारत असताना राजकीय परिस्थितीवरून चिमटेही काढले. त्याला फडणवीस यांनी दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी सरकार मधील काही मंत्री बेजबाबदार विधाने करत असल्याचा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला होता.

जयंत पाटील यांचा रोख नितेश राणे यांच्याकडे होता. मात्र त्यांनी कोणत्याही मंत्र्यांचे नाव न घेता प्रश्न विचारला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कधी कधी तरूण मंत्री बोलून जातात. अशावेळी मी त्यांच्याशी संवाद साधतो. त्यांना समजावून सांगतो. मंत्री असल्यामुळे संयम बाळगूनच बोलले पाहिजे, असा सल्ला त्यांना देतो.

मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री

दरम्यान बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानभवनात माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांमधील लाडका मंत्री आहे. त्यामुळे कोणाला चिंता करण्याची गरज नाही.

दरम्यान गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनीही स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणात एक आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानावर चहुबाजूंनी टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला, असे म्हटले. या विधानानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बाजू सावरून धरली होती. तसेच मंत्रीपदावर असताना विचारपूर्वक आणि संयम बाळगून विधान करायला हवे, असे ते म्हणाले होते.

नागपुरात हिंसाचार प्रकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उडी औरंगजेबाचा मुद्दा आता कालबाह्य; संघाची मोठी भूमिका

0

महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेला वादविवाद वादविवाद शमण्याची चिन्हं नाहीत. याच मुद्द्यावरून एका अफवेमुळे सोमवारी नागपुरात हिंसाचार झाला. या सर्व प्रकरणात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उडी घेतली आहे. संघाचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सुनिल आंबेकर यांनी बंगळुरू इथे संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पत्रकार परिषदेत नागपूर हिंसाचाराविषयी भाष्य केलं आहे. २१ ते २३ मार्चदरम्यान या सभेचं आयोजन केलेलं आहे.

दरम्यान, सोमवारी झालेल्या नागपूर हिंसाचाराचा संघाने निषेध केला आहे. तर मुघल सम्राट आता प्रासंगिक नाही असं विधान संघाचे सुनिल आंबेकर यांनी केलं आहे.

आरएसएसचं म्हणणं काय?

३०० वर्षांपूर्वी मृत्यूमुखी पडलेला औरंगजेब आजच्या काळात प्रासंगिक होता का आणि त्याची कबर हटवली पाहिजे का असा प्रश्न आंबेकरांना विचारला असता “तो प्रासंगिक नाही”, असं उत्तर दिलं आहे.

“मला वाटते की कोणत्याही प्रकारचा हिंसाचार हा समाजासाठी चांगला नाही. पोलीस याची दखल घेतच आहेत आणि आम्हीही त्याचा तपशील जाणून घेऊ,” असं वक्तव्य त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत केलं आहे.

नागपूर शहरातील विविध भागांत सोमवारी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन केले होते. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी धार्मिक मजकूर असलेला कापड जाळल्याचा आरोप करत दगडफेक आणि जाळपोळ झाल्याने हा हिंसाचार फोफावला.

या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “हा हिंसाचार पूर्वनियोजित होता. आम्हाला दगडांनी भरलेली ट्रॉली आणि शस्त्रास्त्रे सापडली आहेत, जी आम्ही जप्त केली आहेत. हिंसाचार करणाऱ्यांनी निवडक घरं आणि संस्थांना लक्ष्य करण्यात आलं होतं.”

आरएसएसच्या बैठकीत भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच आणि वनवासी कल्याण आश्रम अशा इतर ३२ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होतील. यावेळी बांग्लादेशाबाबत आणि आरएसएसच्या पुढील वाटचालीबाबत दोन ठराव मंजूर केले जातील अशी माहितीही आंबेकर यांनी दिली आहे.

“बांग्लादेशच्या ठरावात देशात काय घडत आहे आणि त्याबाबत काय केलं पाहिजे यावर चर्चा होईल. बांग्लादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत तर सर्वजण जागरूक आहेत. हिंदू जगात कुठेही असले तरी त्यांचा अभिमान आणि संवेदनशीलता याचा आदर झालाच पाहिजे अशी आमची इच्छा असल्याचे आंबेकर म्हणाले.

या बैठकीत दुसरा ठराव आरएसएसला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबाबत असेल. “हा एक मोठा प्रवास आहे. या ठरावात समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाईल आणि भविष्यात संघ कोणते कार्यक्रम हाती घेईल याची माहिती देण्यात येईल असं आंबेकर यांनी सांगितलं. या शताब्दी वर्षात संघ सामाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचून संघाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवेल असेही ते म्हणाले. “संघाच्या कार्यक्रमांमध्ये सर्व स्तरातील लोकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्नही केला जाईल असेही त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी विशेषत: ‘पंच परिवर्तन’ या कार्यक्रमाचा उल्लेख केला ज्यामध्ये समानता आणि बंधुता वाढवणे, पर्यावरण अनुकूल जीवनशैली स्वीकारणे, कौटुंबिक मूल्यांचे पुनरूज्जीवन करणे, नागरी जबाबदारीला प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे.

“या कार्यक्रमात देशभरातील संघ कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाबद्दल आणि त्यांच्या प्रदेशातील स्थितीबाबत बोलण्याची संधीही मिळणार आहे. त्यांच्यासाठी प्रशिक्षण सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या वेबसाईट्सद्वारे संपर्क साधणाऱ्या तरूणांची संख्या आता १.२ लाखांहून अधिक आहे”, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी संघातर्फे पोर्तुगीजांशी लढणाऱ्या १६व्या शतकातील महिला शासक अब्बक्का चौटा यांना आदरांजली वाहण्यात येईल.

दंगलच्या वेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग अन्…; नागपूर पोलीस आयुक्तांचा पत्रकार परिषदेत मोठा खुलासा

0

नागपूरमधील हिंसाचाराचा सूत्रधार मानल्या जाणाऱ्या फहीम शमीम खानला पोलिसांनी अटक केली आहे. तो २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. या दंगल प्रकरणी नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मोठे खुलासे केले आहे.

यावेळी बोलताना नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल म्हणाले की, नागपुरात झालेल्या दंगली प्रकरणी एकाचे नाव पुढे येत आहे. त्या संदर्भात माहिती तपासून घेतो आहे. त्याचा रेकॉड आहे का? हे देखील तपासले जात आहे. त्याने कुठल्या पोस्ट केल्या आहे का? आंदोलनात भाग घेतला आहे का? हे तपासण्याचे काम करत आहोत.

ते म्हणाले की, आम्ही फहीम खानचा रोल तपासत आहोत. त्याचा हा प्लॅन आधीच होता का? हे तपासत आहोत. यामागे राष्ट्रीय राज्यस्तरीय किंवा लोकल काही लिंक आहेत का हे देखील तपासत आहे. कायदा आणि संस्था अबाधित राखण्याकरता आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत.

नागपूरात सोमवारी रात्री झालेल्या दंगल प्रकरणी आतापर्यंत सहा एफआयआर दाखल झाले आहेत. सर्व प्रकरणात कारवाई सुरू आहे. ज्या लोकांची नावे ह्या प्रकरणात समोर आले आहेत. त्यांना शोधण्याचा काम सुरू करण्यात आले आहे. सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओच्या आणि फोटोच्या आधारे देखील लोकांची चौकशी केली जात आहे. दंगलखोरांनी केलेल्या दगडफेकीच्या दरम्यान एक महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार पुढे आली आहे. या संदर्भात कारवाई सुरू असून लवकरच माहिती दिली जाईल, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे.

पोलीस आयुक्त म्हणाले की, नागपुरात उसळलेली दंगल ही पूर्वनियोजित होती असं आतापर्यंतच्या तपासातून पुढे आले आहे. एकाच वेळी शहरातील काही भागात अशा प्रकारच्या घटना घडल्या. त्यात पेट्रोल बॉम्ब वापरण्यात आले अशी माहिती पुढे येत आहे. यासंदर्भात अधिक चौकशी केल्यानंतरच स्पष्टपणे बोलणं योग्य असेल, असं पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल म्हणाले आहेत.

दगडफेकीच्या घटनेत अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झालेली आहे. त्यामध्ये महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. प्राथमिक तपासात दंगल घडवण्यामागे षडयंत्र दिसून येत आहे. या प्रकरणात कुणीतरी लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला हे देखील दिसून येत आहे. सोशल मीडियावर लोकांना भडकवले त्याचा तपास सुरू आहे. तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घटना घडल्या आहेत. तीनही पोलिसांचे अधिकारी या प्रकरणात तपास करत आहेत, असं त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत एफआयआरमध्ये पुढे आलेले नावं नागपूरची आहेत. मात्र या प्रकरणात बाहेरील लोकांची लिंक देखील उघड होते आहे. यावर आता बोलले संयुक्तीक होणार नाही. संचारबंदी कधीपर्यंत लागू राहील हे सांगणं आत्ताच कठीण आहे. मात्र परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. दंगलीचा पॅटर्न कोणता आहे. हे शोधत आहोत, दगडफेक झाली, आधी दगड नव्हते, ते कुठून आलेत. याचा तपास सुरू आहे.

कुराणच्या ‘आयत’ लिहिलेल्या चादरी जाळल्या नाही; नागपूर हिंसाचाराबाबत फडणवीसांची माहिती

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(19 मार्च 2025) नागपूर हिंसाचाराबाबत विधानसभेत महत्वाची माहिती दिली आहे. ‘नागपूर हे नेहमीच शांतताप्रिय शहर राहिले आहे. 1992 च्या जातीय तणावाच्या काळातही शहरात दंगल झाली नाही. मात्र यावेळी काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हिंसाचार भडकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत सोडणार नाही. ते कोणत्याही कबरीत लपले तरी त्यांना कबरीतून बाहेर काढून कारवाई करू,’ असा इशारा फडणवीसांनी यावेळी दिला.

कुराणच्या आयत जाळल्या नाही…

कुराणच्या आयत लिहिलेल्या चादरी जाळल्यामुळे हिंसाचार भडकल्याचा आरोप केला जातोय. याबाबत सीएम फडणवीस म्हणाले की, ‘कुराणच्या आयत लिहिलेल्या चादरी जाळल्या गेल्या नाहीत. काही लोकांनी अफवा पसरवल्या, त्यामुळे नागपूरची परिस्थिती बिघडली. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असून, खोट्या बातम्यांमुळे हा हिंसाचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नागपुरात हिंसाचार पसरवण्यास जो कोणी जबाबदार असेल, त्याला सोडले जाऊ नये, अशा सक्त सूचना मी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. नागपूरची शांतता आणि सद्भावना कोणत्याही किंमतीत बिघडू दिली जाणार नाही,’ असा पुनरुच्चार त्यांनी केला.

हिंजवडीत चौघांचा आगीत होरपळून मृत्यू..! नावे अन् फोटो आले समोर

0

हिंजवडीतील व्योम ग्राफिक्स या ‘आयटी’ कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला (टेम्पो ट्रॅव्हलर) अचानक आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले. पुढील बाजूस बसलेले कर्मचारी आणि चालक पेटत्या बसमधून बाहेर पडले, मात्र मागील दरवाजा उघडला न गेल्याने अडकून पडलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. फेज एकमधील विप्रो सर्कलजवळ बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

या दुर्घटनेत सुभाष सुरेश भोसले (वय ४२, रा. वारजे), शंकर शिंदे (५८, रा. नऱ्हे), गुरुदास लोकरे (४०, रा. हनुमाननगर, कोथरूड), राजू चव्हाण (४०, वडगाव धायरी) यांचा मृत्यू झाला तर, जनार्दन हुंबर्डेकर (चालक, ५७, रा. वारजे), संदीप शिंदे (३७, रा. नऱ्हे), विश्वनाथ जोरी (५२, रा. कोथरूड), विश्वास लक्ष्मण खानविलकर (पुणे), प्रवीण निकम (३८), चंद्रकांत मलजी (५२, रा. दोघेही कात्रज) जखमी झाले. विश्वास कृष्णराव गोडसे, मंजिरी आडकर, विठ्ठल दिघे, प्रदीप बाबुराव राऊत बसमधून सुखरूप बाहेर पडले.

बुधवारी (दि. १९) सकाळी आयटी पार्क फेज दोनमधील व्योम ग्राफिक्स (तिरुमाला इंडस्ट्रिअल इस्टेट) कंपनीचे बारा कर्मचारी घेऊन मिनी बस (एमएच १४ सीडब्लू ३५४८) पुण्याहून हिंजवडी आयटी पार्ककडे येत होती. फेज एकमधील विप्रो सर्कलपासून पुढे आल्यावर सकाळी आठच्या सुमारास चालकाच्या पायाखालील बाजूस अचानक आग लागली. चालक आणि पुढील बाजूस बसलेले कर्मचारी खाली उतरले, मात्र दरवाजा वेळेवर उघडला गेला नसल्याने मागील बाजूस असणाऱ्या चौघांचा होरपळून मृत्यू झाला आणि सहाजण जखमी झाले. जखमींना पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे.

केवळ दोन मिनिटांचे अंतर…

कंपनीपासून दोन मिनिटांच्या अंतरावर असतानाच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बसचालकाच्या पायाखाली अचानक आग लागल्याचे लक्षात येताच बस दुभाजकाच्या बाजूला उभी करून, चालक आणि समोर बसलेले कर्मचारी तातडीने बाहेर पडले. बसने पेट घेतल्याचे दिसताच परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी. बसच्या मागील दरवाजाच्या यंत्रणेत काही दोष होता का, याचाही तपास सुरू आहे.

– कन्हैया थोरात, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी.