Home Blog Page 148

चहल-धनश्री वर्मा घटस्फोट खटल्यात हाय कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

0

सध्या टीम इंडियाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. कौटुंबिक न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आलाय. घटस्फोटाचा खटला कौटुंबिक न्यायालयात दाखल केल्यानंतर दोघांना पूनर्विचारासाठी सहा महिन्यांचा किमान कालावधी दिला जातो. हा किमान कालावधी रद्द करावा अशी विनंती युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघांनी केली होती. पण कौटुंबिक न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळून लावली होती. आता मुंबई उच्च न्यायालयाने सहा महिन्यांचा किमान कालावधी रद्द करण्याच्या मागणीची दखल घेतली आहे.

आगामी आयपीएलमधील चहलची कमिटमेंट लक्षात घेऊन उद्या घटस्फोटाच्या याचिकेबद्दल निर्णय घ्या, असे निर्देश न्यायाधीश माधव जामदार यांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयाला दिले आहेत. आगामी आयपीएलपूर्वी तातडीनं घटस्फोट मिळवण्यासाठी दांपत्यानं कुटुंब न्यायालयाच्या निकालाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. चहल आणि धनश्री वर्मा यांनी परस्पर सहमतीनं घटस्फोटासाठी याचिका दाखल केलीय.

कधीपासून वेगळे राहत होते?

डिसेंबर 2020 मध्ये चहल आणि धनश्री वर्मा यांनी लग्न केलं होतं. जून 2022 पासून दोघे वेगळे राहतायत. हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 बी नुसार, पाच फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटासाठी अर्ज करताना त्यांनी पूनर्विचारासाठी बंधनकारक असलेला सहा महिन्यांचा किमान कालावधी रद्द करण्याची विनंती केली होती. 20 फेब्रुवारीला कौटुंबिक न्यायालयाने दोघांची मागणी अमान्य केली.

कौटुंबिक न्यायालायने मागणी का फेटाळलेली?

करारानुसार युजवेंद्र चहल धनश्री वर्माला कायमस्वरुपी पोटगी म्हणून 4.75 कोटीची रक्कम द्यायला तयार झालेला. यातले 2.37 कोटी रुपये आधीच दिले होते. उर्वरित रक्कम दिलेली नाही. यामुळे कराराच अनुपालन होत नाहीय. म्हणून किमान कालावधी रद्द करण्याची त्यांची मागणी फेटाळून लावली. पण आता उच्च न्यायालयाने वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय बदललाय.

टेरिफ वॉरमध्ये भारताची उडी, मोदी सरकारचा 200 दिवसांचा मास्टर प्लॅन, कोणकोणत्या देशांना बसणार फटका?

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येताच टेरिफ वॉर सुरु केले. ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर रेसीपोल्कल टेरिफ लावले. आता या टेरिफ वॉरमध्ये भारतानेही उडी घेतली आहे. भारत जगातील प्रमुख देशांना हादरा देणार आहे. त्यासाठी 200 दिवसांचा प्लॅन तयार केला आहे. सध्या अमेरिका, चीन, कॅनडा, मॅक्सिको, युरोपमधील देशांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी भारत सर्वांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. भारत स्टील प्रॉडक्टवर टेरिफ वाढवण्याचा विचार करत आहे. सरकार 200 दिवस हे टेरिफ लावणार आहे. यामुळे चीन, जपान, दक्षिण कोरियला धक्का बसणार आहे. या देशांमध्ये भारत 70 टक्के स्टील आयात करतो.

भारत का घेत आहे निर्णय?
वाणिज्य मंत्रालयाचे डायरेक्ट्रेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीज (डीजीटीआर) ने याबाबत म्हटले आहे की, आयात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन काही स्टील प्रोडक्ट्सवर 200 दिवसांसाठी 12 टक्के सेफ्टी चार्ज लावला जाणार आहे. डीजीटीआरने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फॅब्रिकेशन, पाईप उत्पादन, उत्पादन, भांडवली वस्तू, ऑटो, ट्रॅक्टर, सायकल आणि इलेक्ट्रिकल पॅनेलसह विविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिश्रधातू नसलेल्या आणि मिश्र धातुच्या स्टील उत्पादनांच्या आयातीत अचानक वाढ झाल्याची चौकशी सुरू केली होती.

चौकशीची झाली मागणी?
इंडियन स्टील असोसिएशनच्या सदस्यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर ही तपासणी करण्यात आली. आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया, एएमएनएस खोपोली, जेएसडब्लू स्टील, जेएसडब्लू स्टील कोटेड उत्पादने, भूषण पॉवर अँड स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या कंसोर्टियमचे सदस्य आहेत. महासंचालनालयाच्या तपासणीत आढळले की, भारतात या उत्पादनांच्या आयातीत अचानक लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे देशांतर्गत उद्योगांना गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. स्टीलच्या किंमतीत वाढ झाल्यास त्याचा परिणाम देशातंर्गत बाजारवर होणार आहे. यामुळे भारत आता 12 टक्के सेफ्टी चार्ज लावणार आहे.

चीन, जपानवर होणार परिणाम
उद्योग जगतानुसार, चीन, जपान, दक्षिण कोरियात मागणी मागणी कमी झाली आहे. 2021-22 मधील 22.93 लाख टन वरून (ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024 आणि 2021-24 पूर्वीची तीन आर्थिक वर्षे) 66.12 लाख टन इतकी आयात वाढली. चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम या देशांतून आयातीत वाढ झाली आहे. यासंदर्भात सरकारने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, या शुल्काचा उद्देश आयात वाढीपासून भारतीय देशांतर्गत उद्योगाचे संरक्षण करणे आहे.

वेलकम बॅक… पृथ्वीने तुम्हाला मिस केलं; नरेंद्र मोदींकडून सुनीता विल्यम्सचं स्वागत

0

कोणत्याही अडथळ्यांशिवाय अखेर सुनीता विल्यम्सचं पृथ्वीवर आगमन झालं आहे. तब्बल नऊ महिन्यानंतर सुनीता पृथ्वीवर आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीताचं स्वागत केलं आहे. मोदींनी एक ट्विट करून तिला वेलकम बॅक म्हटलं आहे. भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स एका छोट्या मिशनवर अंतराळात गेली होती. पण तांत्रिक बिघाडामुळे हे मिशन लांबलं. ते इतकं की सुनीताला अंतराळात नऊ महिने म्हणजे 286 दिवस राहावं लागलं आहे. मोदींनी ट्विट करून या अंतराळवीरांच्या सहास आणि धैर्याचं कौतुक केलं आहे.

तुमचं स्वागत आहे. #Crew9! पृथ्वीने तुम्हाला मिस केलं होतं. ही साहस, हिंमत आणि असीम मानवीय भावनांची परीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि #Crew9च्या अंतराळवीरांनी पुन्हा एकदा दृढतेचा वास्तविक अर्थ काय असतो हे आपल्याला दाखवून दिलं आहे. विशाल अज्ञाताच्या समोरचा अतुट संकल्प नेहमीच लाखो लोकांना प्रेरणा देईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अन् मार्च महिना उजाडला
सुनीता आणि तिचा क्रू मेंबर बुच विल्मोरने गेल्या वर्षी 5 जून रोजी बोइंगच्या स्टारलाइनर क्रू कॅप्सूलमधून उड्डान केलं होतं. हे मिशन केवळ एक आठवडा चालणार होतं. पण स्टारलाइनरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे मिशन वाढलं. नासाला चालकाविहिन अंतराळ यान परत आणावं लागलं. त्यानंतर स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगनचा वापर करून सुनीताच्या परतीची व्यवस्था करावी लागली. कॅप्सूलमधील काही समस्यांमुळे तिचं आगमनही थोडं लेट झालं. त्यामुळेच सुनीताला परत येण्यासाठी मार्च महिना उजाडला.

योगदान अतुलनीय
जोपर्यंत सुनीता आणि विल्मोर खाली उतरले तोपर्यंत पृथ्वीच्या चारही बाजूने 4,576 वर्तुळे पूर्ण केली होती. एकूण 121 मिलियन मैल म्हणजे 195 मिलियन किमीचा हा प्रवास होता. सुनीता ला ट्रेलब्लेझर आणि एक आयकॉन असं मोदींनी संबोधलं आहे. तसेच अंतराळ विश्वातील तिच्या योगदानाचंही मोदींनी कौतुक केलं आहे.

सुनीताने दाखवून दिलं
अंतरिक्ष अन्वेषण हे मानवी क्षमतांच्या सीमांना पुढे नेणे, स्वप्न पाहण्याचे धाडस करणे आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचे धाडस ठेवण्याबद्दल आहे. सुनीता विलियम्स, एक ट्रेलब्लेझर आणि एक आयकॉनने तिच्या संपूर्ण करिअरमध्ये या भावनेचे उदाहरण घालून दिलं आहे, असं सांगतानाच त्यांनी चालक दलाच्या सुरक्षित परत येण्याची खात्री करणाऱ्या टीमच्या अथक प्रयत्नांचे देखील कौतुक केले आहे.

नागपूर हिंसाचारातील मास्टरमाईंडचे नाव पहिल्यांदा समोर, कोण आहे तो? जाणून घ्या सविस्तर

0

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन राजकारण तापले आहे. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाकडून देण्यात आला आहे. त्यातच नागपुरात दोन दिवसांपूर्वी मोठा हिंसाचार उफाळला. नागपुरात दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. आता नागपुरातील या संपूर्ण हिंसाचारामागे नेमकं कोण आहे, याचा नाव पहिल्यांदाच समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंडचे नाव पहिल्यांदा समोर आले आहे. नागपुरात झालेल्या हिंसाचारामागे फहीम खान असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. फहीम खान याने लोकांना भडकवण्याचे काम केले. त्यानंतर ही हिंसा घडली. नागपूरमधील गणेशपेठ पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या तक्रारीमध्ये उघड झाले आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे.

तक्रारीत नेमकं काय?
या तक्रारीनुसार जमावाने अंधाराचा फायदा घेत महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. औरंगजेबाच्या थडग्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. तसेच औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी, लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आणि धार्मिक शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने जमावाने कुऱ्हाडी, दगड, काठ्या आणि इतर धोकादायक शस्त्रांचा वापर केला.

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन नागपुरात सोमवारी रात्री हिंसाचार झाला. या हिंसाचारादरम्यान, समाजकंटकांकडून पोलिसांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आलं. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, या हिंसाचारादरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याची माहितीही समोर आली आहे. अंधाराचा फायदा घेत काही आरोपींनी इतर महिला पोलिसांनाही शिवीगाळ करत अश्लील शेरेबाजी केली.

नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ४६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील काही आरोपींनी चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर महिला पोलिसासोबत हा प्रकार केला. हिंसाचारातील आरोपींनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला स्पर्श करुन वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही महिला पोलिसांना जमावातील काही लोकांनी शिवीगाळ देखील केल्याची माहिती समोर येत आहे.

चांदणी चौक सुरू पादचारी पुल चुकीच्या आराखड्याचा; मा. नगरसेवक दिलीप वेडेपाटीलांचा जनआंदोलनाचा इशारा 

0

चांदणी चौक येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात होत आहे. तथापि, सध्या प्रस्तावित आराखडा नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीचा आणि कमी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः, पुलाची रचना ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, लहान मुले आणि महिलांसाठी वापरण्यास कठीण असल्यामुळे हा पूल निरुपयोगी ठरू शकतो. परिणामी, नागरिक महामार्ग थेट ओलांडण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढू शकते.

याशिवाय, या ठिकाणी पुणे मेट्रोचे काम प्रस्तावित असून भविष्यात मेट्रो स्थानक देखील या परिसरात उभारले जाणार आहे. त्यामुळे हा पादचारी मार्ग भविष्यातील वाहतूक व्यवस्थेशी सुसंगत असावा. मेट्रो स्थानकाशी थेट जोडणी असलेला पूल, लिफ्ट किंवा एस्केलेटरची सुविधा आणि नागरिकांसाठी अधिक सुलभ पर्याय असणे गरजेचे आहे. आपण तातडीने या पुलाच्या आराखड्याचा पुनर्विचार करून प्रत्यक्ष पाहणी करावी व आवश्यक सुधारणा करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. अन्यथा, स्थानिक नागरिकांच्या वतीने आम्हाला जनआंदोलन करण्याचा इशारा  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे व्यवस्थापक मा. संजय कदम यांना नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या वतीने पत्राद्वारे देण्यात आला.

‘मी वक्तव्यावर ठाम, माफी नाहीच’ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं स्पष्टीकरण; तेसुद्धा कायम धर्माचाच आधार घेतात

0

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केलं होतं. “औरंगजेब क्रूर शासक होता, आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत आपण वक्तव्यावर ठाम असून माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे.

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

“मी महायुती सरकारच्या कारभाराची तुलना औरंगजेबाच्या कारभाराशी केली. त्याचा मोठा संदर्भ आहे. मी असाच संदर्भ देऊन बीडमध्ये देखील बोललो होतो. आता या विषयाच्या संदर्भात भाजपाचे नेते आणि त्यांचे मित्रपक्ष त्यांना औरंगजेब म्हणण्यात का गुंतले आहेत? हे मला काही समजत नाही. औरंगजेब क्रूर होता, हेच माझं म्हणणं होतं आणि मी देखील तेच म्हटलं होतं. यात औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा काही विषय नाही”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

“मी जे विधान केलं ते विधान राज्यकारभाराच्या अनुषंगाने होतं. औरंगजेब ज्या क्रूर पद्धतीने राज्यकारभार चालवत होता, त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कारभार चालला आहे, असं विधान केलं होतं. त्या विधानावर मी अद्यापही ठाम आहे. जसं औरंगजेबाने जिझिया कर लावला होता, तसाच कर आता महाराष्ट्रातील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस लावत आहेत. शाळेच्या वह्या, पुस्तकावर कर लावला, स्मशान भूमीतील लाकडांवरही कर लावला आहे. त्यामुळे ही सर्व कार्यप्रणाली त्याच प्रकारची आहे”, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत.

“आमची ही राजकीय टीका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जेव्हा टीका केली तेव्हा शब्दांचा तोल कुठेही गेलेला नाही. फडणवीस हेच औरंगजेब आहेत असं मी बोललेलो नाही. त्यांनी तशीच वेशभूषा करावी आणि ते तसेच आहेत असं मी म्हटलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर मी व्यक्तिगत टीका केलेली नाही. राज्य कारभारावर टीका केलेली आहे आणि ती टीका करणं हा आमचा अधिकार आहे. तसेच मी केलेली टीका अतिशययोक्ती नाही. आता ही महाराष्ट्राच्या अस्मितेवरची टीका असल्याचं भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष म्हटलं. मात्र, जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या होते, तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही का? स्वारगेटच्या बसस्थानकात अत्याचाराची घटना घडते तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही का?”, असे सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केले.

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले होते?

“औरंगजेब हा क्रूर शासक होता. औरंगजेबाने स्वत:च्या वडिलांना जेलमध्ये टाकलं. तसेच औरंगजेब हा नेहमी धर्माचा आधार घ्यायचा. औरंगजेब हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीस हे देखील तेवढेच क्रूर आहेत. ते देखील कायम धर्माचा आधार घेतात. त्यामुळे दुर्देवाने औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार हा सारखाच आहे”, असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं.

बदल्यांचा धडाका सुरुच! ‘या’ 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपूर, संभाजीनगरचे कारभारी बदलले

0

राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यापासून पोलीस प्रशासनामध्ये मोठे बदल केले जात आहेत. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, अत्याचाराच्या वाढत्या घटना तसेच आता नागपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली आहे. अशातच आता राज्याच्या पोलीस यंत्रणेत मोठे बदल करण्यात आले असून 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.

कोणत्या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या?

1. आंचल गोयल (IAS:RR:2014) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त नागपूर यांची मुंबई शहर, मुंबई येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. अंकित (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. श्रीमती मीनल करनवाल (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांची जिल्हा परिषद, जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

4 कवली मेघना (IAS:RR:2021) प्रकल्प संचालक, ITDP, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड यांची जिल्हा परिषद, नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. करिश्मा नायर (IAS:RR:2021) प्रकल्प संचालक, ITDP, जव्हार आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर यांची नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6. रणजित मोहन यादव (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, कुरखेडा उपविभाग, गडचिरोली यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली येथे आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

नागपूर भालदारपुरा परिसर हिंसाचारात जमावाची महिला पोलिसशी अश्लील चाळे विवस्त्रचा प्रयत्न मोठा अनर्थ टळला

0

नागपूर : भालदारपुरा परिसरात हिंसाचार करणाऱ्या जमावाने अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून, तिचा विनयभंग केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

काय घडलं नेमकं?

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री हिंसाचार उसळल्यानंतर सुमारे पाचशे जणांचा जमाव घोषणा देत दगडफेक करीत होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस उपायुक्त निकेतन कदम, पोलिस उपायुक्त शशिकांत सातव आणि पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांच्यासह पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, नितीन राजकुमार, पोलिस उपनिरीक्षक, पाच कर्मचारी व दंगल नियंत्रण पथकातील महिला पोलिस तिथे गेले.

जमावाने पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. त्यांना शिवीगाळ केली. पोलिसांवर हल्ला चढविला. त्यांना मारहाणही केली. एका जमावाने महिला पोलिसाला पकडले. तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करीत अश्लील चाळे केले. वेळीच महिला पोलिसाने स्वत:ची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर जमावाने पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली.

सशस्त्र पोलिस २४ तास गस्तीवर

दरम्यान, नागपूरमध्ये महाल परिसरात सोमवारी उसळलेल्या दंगलीनंतर महाल, मोमीनपुऱ्याशिवाय शहरातील अतिसंवेदनशील अकरा व संवेदनशील एकोणीस ठिकाणी पोलिसांचे ‘फिक्स पॉइंट’ लावण्यात आले आहेत. या परिसरात सशस्त्र पोलिस २४ तास गस्त घालत आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने गांधीगेट परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी औरंगजेबाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. यावेळी मुस्लिमांच्या प्रतीकांचा अवमान झाल्याचा आरोप करत मुस्लिम समाजातील व्यक्तींनी पोलिसांत तक्रार केली.

हा कथित प्रकार वाऱ्यासारखा पसरल्यानंतर काही समाजकंटकांनी महालात दगडफेक आणि जाळपोळ केली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसावर हल्ला केल्याने घटनेचे गांभीर्य वाढले. सर्व नेत्यांनी शांततेचे आवाहन केले. रात्री उशिरा तणाव निवळू लागला.

कारवाई करा : विहिंप

आम्ही कुठलेही धार्मिक साहित्य जाळले नाही. तशी अफवा पसरविणाऱ्यांवर आणि दंगल घडवून धार्मिक स्थळावर हल्ला करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने मंगळवारी पत्रकार परिषदेत घेत केली.

अखेर सुनिता विल्यम्सचं सुखरूप आगमन; 9 महिन्यांनी पृथ्वीवर रोमांचक पुनरागमन सुखरूप परतली भारत की बेटी

0

भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतले. आज पहाटे ( भारतीय वेळेनुसार) 3.30 च्या सुमारास फ्लोरिडाच्या किनारी त्यांचे सुखरूप आगमन झाले. 9 महिन्यांपेक्षा अधिक काळा अंतराळात घालवून परत आलेल्या या दोघांची ऐतिहासिक अंतराळ मोहीम यशस्वी रित्या पूर्ण झाली. त्यामुळे अमेरिकेतच नव्हे तर भारतातही उत्साहाचं वातावरण आहे.

सुनिता आणि बुच हे दोघेही आता स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परतले. अंतराळवीरांचे SpaceX कॅप्सूल बुधवारी (19 मार्च, 2025) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सोडल्यानंतर काही तासांनी मेक्सिकोच्या आखातात पॅराशूटद्वारे उतरले. फ्लोरिडामधील टालाहसीच्या किनारपट्टीवर हा स्प्लॅशडाउन झाला. अंतराळ संस्था नासाने अंतराळवीरांच्या लँडिंगचा व्हिडिओही जारी केला आहे.

https://x.com/ANI/status/1902118787844853772

नासाने शेअर केला व्हिडीओ

या पुनरागमनासंदर्भात नासाने एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला. स्पेस स्टेशनवरून परत आलेल्या चारही अंतराळवीरांनी अभिवादनही केलं.

https://x.com/ANI/status/1902132963762172410

यासंदर्भात नासाने चारही अंतराळवीरांचा पृथ्वीवर लँडिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. यात स्पेस स्टेशनवरून परतलेले अंतराळवीर अभिवादन करताना दिसत आहेत. “पृथ्वीवर परतल्यानंतर Crew9 ची पहिली झलक आपल्याला पहायला मिळत आहे! आता रिकव्हरी पथके ड्रॅगनमधून बाहेर येण्यासाठी क्रूची मदत करतील. दीर्घकाळाच्या मोहिमेवरून परतल्यानंतर सर्व क्रू सदस्यांसाठी असलेली ही एक मानक प्रक्रिया आहे,” असे नमूद केलं.

जूनमध्ये स्पेस स्टेशनवर गेल्या होत्या सुनिता विल्यम्स

 

सुनिता विल्य्म्स आणि बुच विल्मोर या दोघांनीही  गेल्या वर्षी 5 जून रोजी केप कॅनवेरल येथून बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केले. ते आठ दिवसांच्या मिशनसाठी गेले होते मात्र, अंतराळ यानामधून हीलियमची गळती आणि वेग कमी झाल्यामुळे ते जवळपास नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकले. अथक प्रयत्नांनंतरही त्यांचं पृथ्वीवर पुनरागमन वारंवार लांबत होतं. अखेर आज पहाटे ते यशस्वीरित्या पृथ्वीवर लँड झाले आणि त्यांच्या कुटुंबियांसह जगभरातल सर्वांचांच जीव भांड्यात पडला.

सुनीता विल्यम्स अंतराळात या देवाची मूर्ती घेऊन गेली? कुंभमेळ्याचे एक छायाचित्र पाठवले… बहिणीकडून गुपित उघड

0

अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार आहे. त्यामुळे अमेरिकेतच नव्हे तर भारतातही उत्साहाचं वातावरण आहे. भारतातील तिच्या पूर्वजांच्या गावात तर सर्वच जण देव पाण्यात घालून तिच्या येण्याची वाट पाहत आहेत. सुनीताच्या नातेवाईकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. सुनीताची चुलत बहीण फाल्गुनी पंड्याने खास मुलाखत दिली आहे. मीडियाला दिलेल्या या मुलाखतीत तिने पूजा अर्चा आणि हवन केल्याचीही माहिती दिली आहे. तिच्या वडिलोपार्जित गावात खुशीचं वातावरण पसरलं आहे. तिच्या मोठ्या भावानेही गावात पूजापाठ सुरू असल्याचं सांगितलं आहे.

सुनीता विलियम्सची चुलत बहिणी फाल्गुनी पंड्याने न्यू जर्सीतील एका मुलाखतीत बरीच माहिती दिली आहे. आम्ही सुनीताच्या परत येण्याबद्दल खूप उत्साहित आहोत. सुनीता सुखरूप यावी म्हणून आम्ही मंदिरात पूजा आणि हवन करणार आहोत.सुनीता तिच्या सोबत अंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात गणेशाची मूर्ती घेऊन गेली होती. तिने मला अंतराळ केंद्रावर गणेशाचं एक छायाचित्र पाठवलं होतं. 2007 मध्ये आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो होतो, तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर सुनीता आणि तिच्या वडिलांनी अमेरिकेत पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. सुनीताला भारतीय जेवण खूप आवडते. आम्ही पुन्हा भारतात येणार आहोत, असं फाल्गुनी पंड्याने सांगितलं.

कुंभमेळ्याचे फोटो पाठवले

सुनीता विलियम्स गुजरातची मुलगी आहे. तिच्या पूर्वजांचे गाव असलेल्या झूलासनमध्ये गावकरी सुनीताच्या पृथ्वीवर परत येण्याचा उत्सव साजरा करत आहेत. सुनीताचे वडील नेहमीच गुजरातपासून अमेरिकेपर्यंतचा त्यांचा प्रवास सांगत असतात. जेव्हा मी कुंभ मेळ्याच्या दौऱ्याला भारतात आले होते, तेव्हा सुनीता कुंभमेळ्याबद्दल खूप उत्सुक होती. मी तिच्याकडे कुंभमेळ्याचे काही छायाचित्रे पाठवली, आणि तिने अंतराळातून कुंभमेळ्याचे एक छायाचित्र पाठवले. ती छायाचित्रं खूप सुंदर होती. सुनीता नेहमीच तरुण सशक्तीकरणात विश्वास ठेवते. मागील आठवड्यात मी तिला फोन केला होता, ती 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परत येणार आहे, यावर ती खूप उत्साहित होती. आम्ही काही दिवसांमध्ये तिला भेटण्याचा विचार करत आहोत. पृथ्वीवर परतल्यानंतर ती पुनर्वास केंद्रात जाईल, जिथे आम्ही तिच्याशी भेटू, असं फाल्गुनी म्हणाली.

गुजरातमध्ये उत्साह

सुनीता विलियम्स 9 महिने अंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावरून शेवटी पृथ्वीवर परत येत आहेत. तिच्या परत येण्याच्या बातमीने कुटुंबाचा आनंद गगनाला भिडला आहे. ती सुखरुप परत यावी म्हणून गावात यज्ञ आणि पूजा आयोजित केली जात आहे. सुनीता विलियम्सच्या मोठ्या भावाने दिनेशने याबद्दल माहिती दिली. सुनीता 9 महिने अंतराळात होती. घरातील सगळ्यांना तिची चिंता लागली होती. कुटुंबातील सगळे दु:खी होते. वर्तमानपत्रात सुनीताच्या संदर्भात काही बातम्या येत होत्या, तेव्हा आम्ही चिंतित होतो. पण आता (19 मार्च) सुनीताची सुरक्षित परत येण्याची बातमी मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे, असं दिनेश म्हणाला.

जोपर्यंत सुनीता विलियम्स सुरक्षितपणे पृथ्वीवर येत नाही, तोपर्यंत मला थोडी चिंता आहे. घरातील अनेक लोक मला विचारतात आणि मी त्यांना सर्व काही व्यवस्थित माहिती देतो. पण जेव्हा सुनीता पृथ्वीवर सुरक्षितपणे येईल, तेव्हाच माझे मन शांत होईल. सुनीतासाठी, झूलासन गावासाठी, गुजरात आणि संपूर्ण जगासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे, असंही दिनेशने सांगितलं.

गावात आनंद

सुनीता विलियम्सच्या अंतराळातून परत येण्याच्या बातमीनंतर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील झूलासन गावातही आनंदाचे वातावरण आहे. सगळे लोक देवाकडे प्रार्थना करत आहेत, ती सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येवो, असं साकडं देवाला घातलं जात आहे. झूलासन गावात तिच्या स्वागताची तयारी चालली आहे. सुनीता नक्कीच गावात येईल, अशी या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. सुनीता तीन वेळा गावाला येऊन गेली आहे. पहिली वेळ 2006 मध्ये आणि दुसरी वेळ 2012 मध्ये. पण ती परत आल्यावर आम्ही तिचं भव्य स्वागत करू, असंही ग्रामस्थ म्हणाले.