Home Blog Page 145

दिशा सालियान मृत्यूप्रकरणात दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले…

0

सुमारे पाच वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियान या तरुणीच्या मृत्युप्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत युवासेनाप्रमुख आणि राज्या सरकारमधील माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या मुद्य्यावरून आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. एकीकडे या प्रकरणाच्या चौकशीवरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून आग्रही मागणी होत असतानाच दुसरीकडे ठाकरे गटानेही आपल्या युवानेत्यावर होत असलेल्या आरोपांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी समोर येत या आरोपांबाबत कोर्टात उत्तर देऊ अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांचे वडील आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचं घराणं, आमच्या घराण्याचा सहा सात पिढ्या ह्या जनतेसमोर आहेत. त्यामुळे या विषयात काही तथ्य नाही आहे. दूर दूर तक कोई संबंध नही, म्हणतात त्याप्रमाणे या प्रकरणाशी दुरान्वयानेही संबध नाही आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिशा सालियान प्रकरणावरून बेछूट आरोप करत असलेल्या विरोधकांनाही इशारा दिला. राजकारण जर या वाईट बाजूने न्यायचं असेल, तर मग मात्र सगळ्यांचीच पंचाईत होईल, कारण खोट्याचा जर तुम्ही नायटा करणार असाल, तर ते तुमच्यावरही बुमरँग होऊ शकेल, हेच या लोकांना सांगतो, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, दिशा सालियान प्रकरणी झालेल्या आरोपांबाबत आपली बाजू मांडताना आदित्य ठाकरे म्हणाले की, पाच वर्षे सातत्याने बदनामीचा प्रयत्न होत आहे हे प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे कोर्टातच बोलू. माझ्यावरून सभागृह बंद पाडले जात आहे. पाच वर्षापासून हेच चालू आहे. पण कोर्टात जे होईल ते होईल. पाच वर्षापासून मी यावर मुद्द्याचं बोलत आलेलो आहे आणि बोलत राहणार, असे आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितले होते.

‘बेंझिन केमिकल आणले, वारजेतून काडीपेटी घेतली अन् ..’ चालकाने असा रचला कट

0

हिंजवडीतील ‘आयटी’ कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागून चार जणांचा बळी गेल्याची घटना बुधवारी घडली होती. चोवीसतासानंतर हा अपघात नव्हे तर घातपात आहे, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. दिवाळीचा बोनस आणि मजुरांचे काम सांगितल्याचा राग झाल्याने चालकानेच गाडीतील कामगारांना संपवल्याचे गुरुवारी सायंकाळी उघकीस आले आहे. जनार्दन हंबर्डीकर या चालकास पोलिसांनी अटक केली आहे.

हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील टप्पा दोनमधील व्योम ग्राफिक्स (तिरुमाला इंडस्ट्रिअल इस्टेट) कंपनीचे बारा कर्मचारी घेऊन बुधवारी सकाळी मिनी बस (एमएच १४ सीडब्लू ३५४८) पुण्याहून हिंजवडी आयटी पार्ककडे निघाले होते. त्यावेळी बुधवारी सकाळी आठच्या सुमारास चालकाच्या पायाखालील बाजूस अचानक आग लागली. मात्र, दरवाजा वेळेवर उघडला नसल्याने मागील बाजूस असणाऱ्या चौघांचा होरपळून मृत्यू झाला आणि सहाजण जखमी झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींची प्रकृती स्थिर आहे.

बेंझिन केमिकल आणले, वारजेतून काडीपेटी घेतली

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी माहिती दिली. त्यात घातपात असल्याचे उघड झाले आहे. विशाल गायकवाड म्हणाले, ‘अपघात झाल्यानंतर पोलिसांनी आग कशामुळे लागली. याचा तपास सुरु केला. त्यावेळी शॉर्ट सर्किटने आग लागली नसल्याचे आढळून आहे. मग कामगारांशी आणि कंपनीत चौकशी केली त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. कामगारांशी असलेला वाद आणि दिवाळीमध्ये बोनस न दिल्याने आणि वेतन कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिली आहे, अशी माहिती उघड झाली आहे. नियोजनबद्द कट रचून त्याने हा प्रकार केला आहे. आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. तसेच वारजे येथून काडेपेटी घेतली होती. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही गाडीतील सीट खाली आणून ठेवल्या होत्या. हिंजवडीजवळ आल्यावर कंपनी काही अंतरावर असताना त्याने काडीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या, उडी मारली. केमिकलमुळे बसमध्ये आगीचा भडका उडाला.

कशामुळे घडले ?

१) हंबर्डीकर यांचे कंपनीतील त्यांच्या सहकाऱ्यांशी सतत वाद होत होते. दररोजच्या प्रवासातील समस्या आणि सहकारी कर्मचाऱ्यांशी वैयक्तिक संघर्षांमुळे तणाव वाढत असल्याचे इतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी केलेल्या तपासात आढळले.

२) हंबर्डीकर याने काडी पेटवून रासायनिक स्फोट घडवून गाडीला आग लावली. स्फोट होण्यापूर्वीच चालक गाडीतून बाहेर उडी मारली होती.

यांचा गेला नाहक बळी

वाहन पेटवून झालेल्या अपघात सुभाष सुरेश भोसले (वय ४२, रा. वारजे), शंकर शिंदे (५८, रा. नऱ्हे), गुरुदास लोकरे (४०, रा. हनुमाननगर, कोथरूड), राजू चव्हाण (४०, वडगाव धायरी) यांचा मृत्यू झाला तर, जनार्दन हुंबर्डेकर (चालक, ५७, रा. वारजे), संदीप शिंदे (३७, रा. नऱ्हे), विश्वनाथ जोरी (५२, रा. कोथरूड), विश्वास लक्ष्मण खानविलकर (पुणे), प्रवीण निकम (३८), चंद्रकांत मलजी (५२, रा. दोघेही कात्रज) जखमी झाले. विश्वास कृष्णराव गोडसे, मंजिरी आडकर, विठ्ठल दिघे, प्रदीप बाबुराव राऊत बसमधून सुखरूप बाहेर पडले होते.

सुषमा अंधारे आणि चित्र वाघ यांचे कमरेखालचे वार? अंधारे म्हणाल्या, ‘लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात’, चित्रा वाघ यांचं तसं उत्तर; “जिचा नवरा लेकराची DNA चाचणी…”

0

विधिमंडळात 20 मार्च रोजी दिशा सालियन मृत्यू प्रकरण चांगलेच गाजले. दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेनंतर आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव दिशाच्या मृत्यू प्रकरणाशी जोडले जात आहे.त्याचेच पडसाद सभागृहात उमटले. आमदार तथा माजी मंत्री अनिल परब यांनी मंत्री संजय राठोड यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा उल्लेख केल्यानंतर परब आणि आमदार चित्रा वाघ यांच्यात चांगलीच जुंपली. त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. आता याच टीकेला चित्रा वाघ यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंना काय उत्तर दिलं?

चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारे यांचे कुठेही नाव घेतलेले नाही. मात्र अंधारे यांनी केलेल्या टीकेलाच वाघ यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर ट्वीट करत आपलं मत मांडलं आहे. “फक्त भाषणात नाही तर प्रत्यक्षात दाखवून द्यावं लागत स्त्री काय आहे. फार हलक्यात घेतात महिलांना. आम्ही काहीही बोलू शकतो ही त्यांची मानसिकता आज ठेचली आणि आमच्या नादी लागलात तर रोजचं ठेचणार,” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

‘बसमध्ये जनार्दनचे सख्खे भाऊजी’, पुणे जळीतकांडात नवा ट्वीस्ट;जनार्दनला नाहक गोवलं जातय पत्नी आणि भावाचा आरोप

0

पुण्यातील हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला बुधवारी आग लागल्याची घटना घडली. यात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. सुरुवातीला शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र यानंतर हे जळीतकांड बसचालकानेच घडवून आणल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी चालक जनार्दन हुंबर्डीकरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

एकीकडे ५७ वर्षीय बसचालकावर जळीतकांडाचा आरोप होत असताना, या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. जनार्दन हुंबर्डीकरला नाहक गोवलं जात असल्याचा आरोप त्याच्या पत्नी आणि भावाने केला आहे. त्यांनी पोलिसांच्या तपासावर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. हुंबर्डीकर पूर्णपणे शुद्धीत नसताना पोलिसांनी त्यांचा जबाब कसा नोंदवला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

शिवाय ज्या बसला आग लागली, त्यात आरोपी जनार्दनचे सख्खे भाऊजी देखील होते, असं असताना जनार्दनने रिस्क कशी घेतली? असा सवालही कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. न्यूज १८ लोकमतशी संवाद साधताना जनार्दन हुंबर्डीकरच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, आरोपी जनार्दन हुंबर्डीकर हे पूर्णतः शुद्धीत नसताना पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवलाच कसा? ज्या बसला आग लागली, त्यामध्ये आरोपी जनार्दनचे सख्खे भाऊजी देखील होते. त्यामुळे ते आग कशी लावतील?

तसेच घटनेत वाचल्यांपैकी काहीजणांना खरचटले देखील नाही, त्यामुळे पेटत्या बसमधून ते सुखरूप बाहेर कसे पडले? आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार जनार्दन यांनी बसला आग लावली असेल, तर त्यासाठी वापरलेलं केमिकल आणताना त्यांना कंपनीतील कुणीच का रोखले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करत हुंबर्डीकरच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

शिवाजी महाराज जयंती नाचून नव्हे वाचुन साजरी करा! मोरया मित्र मंडळाचा ५वा उपक्रम; शिवचरित्रकार प्रसाद मोरेंचे व्याख्यानही

0

छत्रपती शिवाजी महाराज जंयती नाचुन नाही वाचुन मोरया मित्र मंडळाचा वेगळा स्तुत्य उपक्रम शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रसिद्ध युवा शिवशंभूव्याख्याते प्रसादजी मोरे यांनी उद्गार काढले मोरे यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान श्री सरस्वती विद्या मंदिर शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होते.

मोरया मित्र मंडळ कर्वेनगर पुणे यांच्या वतीने कर्वेनगर ते डेक्कन भागामधील सर्व शाळांमध्ये जाऊन राष्ट्रवीर छत्रपती संभाजी आणि साधू पुत्र शंभू हे शंभू चरित्र भेट देण्यात आले. तसेच पुणे मनपा साह्यक आयुक्त दिपक राऊत, विजय नायकल , पोलिस उपायुक्त संभाजी कदम, वरीष्ठ पोलिस निरीक्षक वारजे पोलिस स्टेशन विश्वजीत काइंगडे तसेच इत्यादीना शंभू चरित्र भेट देण्यात आले.

ह्या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक केदार वसंत मारणे यांनी केले होते. यावेळी ते म्हणाले मोरया मित्र मंडळ सतत सामाजिक उपक्रम राबवत असते , गेल्या ५ वर्षा पासून शिवाजी महाराज जयंती नाचून नाही वाचुन साजरी करावी हि संकल्पना पुढे आली कारण

शिवाजी म्हणजे
शि –  शिका
वा – वाचा
जी – जिंका

म्हणून शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिवाजी महाराज कळावे म्हणून आम्ही हि पुस्तके त्याच्या पर्यंत पोहचवत आहोत.आम्हाला शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या विचारांची पिढी निर्माण करायची आहे.म्हनुन त्यांच्यावर संस्कार व्हावेत म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहे. शिवचरित्र हे प्रेरणादायी आहे भविष्यात विद्यार्थी शिवचरित्राचं वाचणं केल्यानंतर जग जिंकल्या शिवाय राहणार नाही असं वाटतं तसेच या वर्षी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट आल्यामुळे संभाजी महाराजमय वातावरण निर्माण झाले आहे या गोष्टीचा फायदा घेऊन संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पुस्तके भेट दिली आहे. कारण पुढील पिढीला छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा इतिहास अधिक माहिती व्हायला हवा असे मत मांडले.

हे शिवचरित्र भारत इतिहास संशोधक मंडळाचे आजीवन सदस्य  इतिहास संशोधक मंडळ सभासद मंगेश नवघणे व केदार मारणे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सा मंडळाचे अध्यक्ष रोहिदास जाधव, पौर्णिमा केसवड,अनिल आठवले, देवेंद्र दांडेकर, सागर जगताप, गिरीश भागवत,मयुर बनकर , विनायक उभे मुख्याध्यापक किरण कोल्हे,शिक्षक कैलास सरतापे, नीला कुलकर्णी आदी शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांना हा उपक्रम खूप आवडला ते म्हणाले मोरया मित्र मंडळाचा खूप छान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असेच उपक्रम भविष्यात सर्व मंडळांनी राबविले पाहिजेत .

बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली

0

बीड : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या टोळीवर मकोका लावल्यानंतर आता आणखी एका सहा जणांच्या गुन्हेगारी टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या टोळीत तीन महिलांचाही समावेश आहे. एकीकडे बीडमधील गुन्हेगारीचा वाढता आलेख समोर येत असतानाच बीडमधील गुन्हेगारीची नवनवी प्रकरणे दररोज समोर येत आहेत. बीडच्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्याबाहेर आज एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र, एका महिलेनं संतप्त होऊन पोलीस ठाण्यासमोरच अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतल्याने आता हे प्रकरण काय असा सवाल उपस्थित झाला आहे. तर, इथेही पोलिसांकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब समोर आली आहे.

संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्या असून बीडच्या पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेत गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये, मारहाण केल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. बीडच्या शिरुर कासार येथील खोक्याभाईच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे बीडच्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्याबाहेर आज एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळून नेल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली होती. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या पालकांना युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. मात्र, एक महिना उलटला असला तरी यात हलगर्जीपणा होत असल्याने संतप्त झालेल्या पीडित आईने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टाळला आहे. दरम्यान, या प्रकरणाची अधिक माहिती पोलिसांकडून घेतली जात असून पुढील प्रक्रिया केली जाते आहे.

बीडमध्ये आणखी 6 जणांवर मकोका

बीड पोलिसांनी आणखी 6 जणांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल खेला आहे. गुन्हेगारी टोळीतील आरोपींमध्ये दीपक ऊर्फ सलीम नारायण भोसले, सोमीनाथ ऊर्फ नाज्या दिलीप काळे , मुद्दसर मन्सुर पठाण , सोनी ऊर्फ अनिता गोरख भोसले, शशिकला दीपक भोसले आणि संध्या कोहीनुर भोसले यांचा समावेश आहे. या टोळीने बीड, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात विविध गंभीर गुन्हे केले आहेत.

बीडमधील मुकादमांवर सर्वाधिक गुन्हे

बीड जिल्ह्यामधल्या दादागिरीचा त्रास केवळ बीड जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नसून संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा त्रास झाला आहे. याचं कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ऊस तोडीसाठी बीड जिल्ह्यातून टोळ्या जात असतात. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये या टोळ्यांच्या मुकादमांकडून ट्रक मालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. संपूर्ण राज्यात अशा पद्धतीने फसवणूक झालेले अडीच हजार गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 90% गुन्हे हे बीड जिल्ह्यातील मुकादमांवर दाखल आहेत.

महाराष्ट्रातील शाळेत CBSE पॅटर्न, 2025-26 शैक्षणिक वर्षांपासून अभ्यासक्रम लागूच्या हालचाली सुरु: सरकारचा मोठा निर्णय!

0

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना लवकरच  सीबीएससी अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबतच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे.

येत्या 2025-26 या शैक्षणिक वर्षांपासूनच सीबीएससी अभ्यासक्रम लागू करण्याबाबत हालचाली सुरु होत्या. दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी विधान परीषदेत यासंदर्भात माहिती दिली.  विधान परीषदेत विचारलेल्या प्रश्नाला मंत्री दादा भूसे यांनी लेखी उत्तर दिले. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली का? असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता. सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.

1 एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्यात येणार, असल्याची माहिती देण्यात आली.

अजितदादांची पावर वाढणार! चार माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार; आगामी स्थानिक निवडणुकामुळे माजी आमदारांना घेण्याचा निर्णय

0

भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटातील नाराज नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आता घरोबा करण्याचा जवळपास निश्चित केला आहे. सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री -माजी आमदार आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत.  तशी एक बैठक देखील पार पडली आहे. त्यामुळे लवकरचं पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट भक्कम करण्यासाठी व्यूह रचना सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन अजित पवार पक्ष आणि नाराज असलेल्या जिल्ह्यातील माजी आमदारांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजित घोरपडे, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख अशा दिग्गज नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

प्रमुख नेत्यांची गुप्त बैठक

विधानसभा निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल झालेले आणि जयंत पाटलांचे कट्टर विरोधक मानले जाणारे निशिकांत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यातूनच दोन दिवसांपूर्वी मिरजेत शासकीय विश्रामगृहात निशिकांत पाटलांच्या प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप,माजी मंत्री अजित घोरपडे ,माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख या प्रमुख नेत्यांची गुप्त बैठक पार पडली. ज्यामध्ये अजित पवार गटात प्रवेश करण्याबाबत चर्चा झाली असून अधिवेशनानंतर अजित पवारांबरोबर चर्चा होऊन त्यांचा पक्षप्रवेश होईल. असं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

विलासराव जगताप यांनी भाजपाला रामराम करत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपा विरोधात काम केलं. तर माजी मंत्री अजित घोरपडे यांनी विधानसभेला अजित पवार गटाच्या संजयकाका पाटलांना साथ दिली. तर शिराळ्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक पक्षासोबत राहिले होते. तर आटपाडीचे नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी शरद पवार गटात दाखल होऊन अपक्ष म्हणून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. मग आता या चारी नेत्यांना पक्षाच्या आधाराची गरज आहे. त्यामुळेच की काय आता त्यांनी भाजप ऐवजी सत्तेतल्या राष्ट्रवादीतल्या अजित पवार पक्षात जाण्याचे सोयीचं वाटत आहे.

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अजित पवारांशी चर्चा करून या चारही नेत्यांचा पक्षप्रवेश होईल. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात लवकरच अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गट अधिक प्रबळ होईल अशी चर्चा सुरू झाली आहे आणि जयंत पाटलांना त्याच्या माध्यमातून चेकमेट मिळेल असेही बोलले जात आहे.

केंद्रीय मंत्र्याच्या दोन भाच्यांचा एकमेकांवर गोळीबार; एक मृत तर एक गंभीर; आईच्याही हाताला गोळी लागली

0

केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या दोन भाच्यांनी जगतपूर गावात एकमेकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर केंद्रीय मंत्र्यांचा दुसरा भाचा गंभीर जखमी झाला असून त्याच्या आईच्या हाताला गोळी लागली. कुटुंबातील वादातून हा गोळीबार झाल्याचे समोर आले आहे.

नित्यानंद राय यांचे भाचे विश्वजित आणि जयजीत यादव हे बिहारमधील जगतपूर गावात राहत होते. दोघेही शेतकरी. सुरूवातीला दोघांमध्ये पाण्यावरून वाद सुरू झाला. दोघांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. त्यानंतर दोघांमध्ये धाकटा असलेल्या जयजीतने विश्वजितवर गोळीबार केला. त्यानंतर विश्वजितनेही भावावर गोळ्या झाडल्या.

गोळीबारामध्ये त्यांच्या आईच्या हातालाही गोळी लागली. परिसरातील नागरिकांना त्यांनी रुग्णालयात दाखल केले. पण रुग्णालयात नेण्याआधीच विश्वजितचा मृत्यू झाला. तर जयजीतची प्रकृतीही गंभीर आहे. भाजपचे आमदार डॉ. एन. के. यादव यांच्या रुग्णालयात दोघांवर जयजीत व त्याची आई हिना देवी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिस अधिक्षक प्रेरणा कुमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी या घटनेबाबत आम्हाला माहिती मिळाली. घरगुती वादातून दोघांनी एकमेकांवर गोळीबार केला. दोघांमध्ये वाद सुरू असतानाच आई तिथे आलली. त्यामुळे त्यांच्या हातालाही गोळी लागली, अशी माहिती प्रेरणा कुमारी यांनी दिली.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली. केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या भाच्यांनीच एकमेकांवर गोळीबार केल्याने पोलिसांचीही धावपळ उडाली. भाच्यांकडे पिस्तुल कुठून आले, त्याचा परवाना होता का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास हाती घेण्यात आला आहे. तपासानंतर नेमकं काय घडलं, हे स्पष्ट होईल.

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 2024चा सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024 च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा केली आहे. ज्येष्ठ शिल्पकार यांना राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. राम सुतार यांनी भारतातील सर्वाधिक उंच असणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ हा पुतळा घडवला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा केली. 25 लाख रुपये, मानपत्र व शाल, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राम सुतार यांनी संसदेच्या आवारतील राजीव गांधी, गोविंदवल्लभ पंत आणि जगजीवनराम, मौलाना आझाद, इंदिरा गांधी , राजीव गांधी अशा अनेक मूर्ती घडवल्या आहेत. फक्त भारतातच नव्हे तर युरोपातील अनेक देशांमध्ये देखील राम सुतार यांनी साकारलेली शिल्पं उभी आहेत.

कोण आहेत राम सुतार?

राम सुतार यांचा जन्म धुळ्यातील गोंडूर या गावी 19 फेब्रुवारी 1925 मध्ये झाला. त्यांनी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्टमधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सुरुवातील अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनविण्याचे काम सरकारी नोकरीत राहून केले. पुढे 1960 मध्ये त्यांनी आपला स्वतंत्र स्टुडिओ उभारला.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार आहे. 1996 मध्ये शिवसेना युती सरकारच्या काळात पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पू ल देशपांडे यांना देण्यात आला होता. लता मंगेशकर, आशा भोसले, बाबासाहेब पुरंदरे, रतन टाटा, सचिन तेंडुलकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. गेल्यावर्षी अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.