Home Blog Page 121

टीव्हीच्या आणखी एका सुनेचा संसार मोडणार ? दिव्यांका त्रिपाठीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

0

काही दिवसांपूर्वीच टीव्ही अभिनेत्री मुग्धा चाफेकर आणि रवीश देसाई हे वेगळे झाले. आपण घटस्फोट घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. तर अभिनेता अमन वर्मा आणि वंदना ललवानी यांनीही 9 वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय घेतलाय. या सर्व पार्श्वभूमीवर आता आणखी एका टीव्ही अभिनेत्रीच्या नात्यात दुराव आल्याच्या चर्चा सुरू झाल्याने गोंधळ माजला आहे.टीव्हीवरची नामवंत अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही तिच्या पर्सनल लाईफमुळे बरीच चर्चेत असते. सध्या ती छोट्या पडद्यापासून दूर असली तरी आजही तिचे लाखो चाहते आहेत. दिव्यांकाचं लग्न अभिनेता विवेक दहियाशी झालं. 8 जुलै 2016 साली दोघांनी सप्तपदी घेतल्या. गेल्या 9 वर्षांपासून एकत्र असलेलं हे जोडपं सध्या बरंच चर्चेत आलं आहे. त्या दोघांमध्ये काहीह आलबेल नसून दोघंही लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यामुळे टीव्हीच्या आणखी एका स्टारचा संसार मोडणार असल्याच्या अफवांना पीक आलं होतं.

पण आता या सर्व बातम्यांवर दिव्यांकाचा पती आणि अभिनेता विवेक दहिया याने मौन सोडलं आहे. घटस्फोटाच्या बातम्यांबद्दल विवेक नेमकं काय म्हणाला ?

घटस्फोटाच्या चर्चा फेटाळल्या

या सर्व बातम्यांवर विवकेने प्रतिक्रिया दिली आहे. ‘ खूप मजा येत्ये, मी ते पाहिलं. मी आणि दिव्यांका हसत होतो. आईस्क्रीम खात खात आम्ही ( बातम्या) वाचत होतो. हे जर अजून जास्त वेळ चाललं असतं तर आम्ही पॉपकॉर्न देखील मागवलं असतं. हे फक्त एंटरटेनमेंट आहे, बाकी काहीच नाही. मी देखील यूट्यूब व्लॉगिंग करतो, क्लिकबेल्ट काय असतं ते मला माहीत आहे. त्यामुळे हे जे बिझनेस मॉडेल आहे, ते मला नीट माहिती आहे. खळबळजनकग थंबनेल टाकलं की लोकं येतातच, ते व्हिडीओ पाहतात. पण त्यात काहीच नसतं. तुम्हाला काही अनरिअल दिसलं तर व्ह्यूज वाढवू नका. फालतू न्यूज असतात, त्या तर येतच राहतात, हे खोटं मनोरंजन आहे ‘ अशा शब्दांत प्रतिक्रिया देत विवकेने या सर्व (घटस्फोटाच्या) बातम्या फेटाळून लावल्या.

9 वर्षांपासून दोघं एकत्र

दिव्यांका आणि विवेकची जोडी चाहत्यांना खूप आवडते . ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेच्या सेटवरून त्या दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. या शोमध्ये दिव्यांका मुख्य भूमिकेत होती. तर त्यामध्ये विवेक हा एका पोलिस निरीक्षकाच्या भूमिकेत दिसला. दोघांनी एकत्र काम केले. मग हळूहळू ते मित्र बनले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. 9 वर्षांपूर्वी त्यांनी एकमेकांशी थाटामाटात लग्न केलं.

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दिव्यांका टीव्हीवरील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. बनू में तेरी दुल्हन सारख्या शोमधून तिला ओळख मिळाली. यानंतर, त्याचा ‘ये है मोहब्बतें’ हा शो देखील सुपरहिट झाला. सध्या ती टीव्हीपासून दूर आहे.

राज्यात दोन भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू, बस अन् ट्रकची समोरासमोर धडक

0

राज्यात मंगळवारी दोन भीषण अपघात आले. बुलढाणा जिल्ह्यात बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर दुसरा अपघात सांगली – मिरज पंढरपूर कोची फाट्याजवळ झाला. ट्रक टेम्पोच्या भीषण अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला. पंढरपूर महामार्गावरील कुची फाटा येथे मागून येणाऱ्या 18 चाकी ट्रकने महिलांनी भरलेल्या टेम्पोला जोराची धडक दिल्याने अपघात झाला.

मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाची आमसरी फाट्याजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. खामगाव ते नांदुरा महामार्गावर भीषण अपघात बसमधील 10 ते 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली. जखमींना खामगावच्या सामान्य रूग्णालय हलविले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु केले आहे.

पंढरपूर महामार्गावरील अपघातात तीन ठार
मिरज तालुक्यातील म्हैशाळ येथील महिला द्राक्षबाग तोडणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील खेरडी गावांमध्ये गेले होते. ते रात्री परतताना कवठेमंकाळ पंढरपूर महामार्गावरील कुची फाटा येथे मागून येणाऱ्या 18 चाकी ट्रकने महिलांनी भरलेल्या टेम्पोला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात तीन महिलांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर इतर आठ महिला आणि चालक जखमी झाले आहेत.

अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये यात भारती कांबळे, रेखा कांबळे, राणी वडर, या महिलांचा समावेश आहे. अपघातात ट्रकची धडक इतकी जोराची होती की धडकेत टेम्पो पलटी होऊन काही महिला टेम्पोतून बाहेर फेकल्या गेल्याचे गेल्या होत्या. घटनास्थळाहून ट्रक चालकाने पळ काढला आहे. याबाबत कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात ट्रक चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिला मिरज तालुक्यातील म्हेशाळ या गावातील आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? राज्यात आणखी एक आघाडी, विरोधी पक्षाची कमतरता दूर करण्यासाठी तीन बडे नेते एकत्र

0

महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील बंडखोरीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मोठा फटका बसला. तिन्ही पक्षांना मिळूनही ५० आमदारांचे संख्याबळ गाठता आले नाही. राज्यात सत्ताधारी पक्षाविरोधात विरोधकांची धार कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील तीन बड्या नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्या तिघांनी त्यासाठी पुण्यात येत्या रविवारी ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’चे आयोजन केले आहे.

कोणते तीन नेते एकत्र
राज्यात महाविकास आघाडी विरोधात आहे. शिवसेना उबाठा, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडीत आहे. परंतु या तिन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीत मोठे संख्याबळ मिळवता आले नाही. त्यामुळे विरोधकांची धार कमी झाली आहे. आता विरोधी पक्षांची स्पेस भरून काढण्याच्या निर्धाराने तीन बडे नेते एकत्र येणारे आहेत. राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर यांची एकत्रित आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान निर्माण करणार आहे.

युवा संघर्ष निर्धार परिषदचे आयोजन
राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर यांच्या एकत्रित आघाडीचा पुण्यात मेळावा होणार आहे. येत्या रविवारी ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ होणार आहे. त्यात सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग ही आघाडी फुंकणार आहे. त्याची चुणूक त्या आघाडीच्या टॅगलाईनमधून दिसून आली. या परिषदेत सत्ताधाऱ्यांना तिन्ही नेते घेरण्याचा प्रयत्न करणार आहे.

खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार.! या टॅगलाईन खाली “युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५” चे आयोजन राज्यात करण्यात आले आहे. राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ही आघाडी सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे करणार का? हे येत्या काळातच दिसून येणार आहे.

रॉबर्ट वाड्रा हाजीर हो! ईडीने पाठवले पुन्हा समन्स, शिकोहपूर येथील जमिनीचे काय आहे प्रकरण?

0

काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पु्न्हा समन्स पाठवले आहे. यापूर्वी वाड्रा यांना 8 एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होता. त्यानंतर त्यांना आज, 15 एप्रिल रोजी कार्यालयात हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. शिकोहपूर जमीनप्रकरणात ही चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेने गेल्या वर्षी मनी लॉड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्यांनी यापूर्वी वाड्रा यांना चौकशीसाठी बोलवले होते. पण ते त्यावेळी हजर झाले नाही. त्यामुळे ईडीने त्यांना आज कार्यालयात हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स पाठवले. आज वाड्रा हजर होतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिकोहपूर येथील जमिनीचे काय प्रकरण?

अंमलबजावणी संचालनालयाने हरियाणा राज्यातील शिकोहपूर येथील जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लॉड्रिंगप्रकरणात दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. यापूर्वी 8 एप्रिल रोजी वाड्रा यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी ते हजर न झाल्याने आता त्यांना पुन्हा आज हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा वाड्रा यांच्या स्काईलाईट हॉस्पिटॅलिटीशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात तपास करत आहेत.

शिकोहपूर येथील जमिनीचे काय प्रकरण?

अंमलबजावणी संचालनालयाने हरियाणा राज्यातील शिकोहपूर येथील जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लॉड्रिंगप्रकरणात दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. यापूर्वी 8 एप्रिल रोजी वाड्रा यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी ते हजर न झाल्याने आता त्यांना पुन्हा आज हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा वाड्रा यांच्या स्काईलाईट हॉस्पिटॅलिटीशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात तपास करत आहेत.

वाड्रा यांचे ते वक्तव्य चर्चेत

काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाड्रा एका कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी राजकारणात प्रवेशाची इच्छा जाहीर केली. लोकांची इच्छा असेल तर आपण पूर्ण ताकदीने उतरून काम करू असे ते म्हणाले. त्यांनी यापूर्वी सुद्धा अशी इच्छा व्यक्ती केली.

पुण्यात पुन्हा खळबळ यामुळं प्रेग्नंट महिलेने आयुष्य संपवलं; चिठ्ठीने गूढ…. नवी सुरवातही धोक्यात!

0

पुणे : आयुष्यात एक कटु अनुभव पाठीशी तिने आपल्या तान्ह्या बाळासाठी पूर्ण नवी सुरवात करण्याचा संकल्प केला! अगोदर आयुष्याच्या जोडीदाराची पारख केली नंतर रेशीम गाठी बांधल्या परंतु नियतीच्या नशिबात काही वेगळंच होतं! पुन्हा तोच अनुभव आणि तीच प्रकरणा या सर्वांना कंटाळून अखेर तिने पोटातील निष्पाप जीवासह आपल्या आयुष्याचा शेवट केला. पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुणे जिल्ह्यात नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत धायरी परिसरात घडली. शिल्पा मल्लिकार्जुन चलवादी (वय २६, रा. गजानन संकुल, धायरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पत्नीचा शारिरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी मल्लिकार्जुन मऱ्याप्पा चलवादी (वय २६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शिल्पा यांना आधीच्या पतीपासून एक मुलगा आहे. मात्र, पतीसोबत होणाऱ्या वादामुळे ती विभक्त झाली होती. त्यानंतर मल्लिकार्जुन याच्याशी शिल्पाचे प्रेमसंबंध जुळले. मल्लिकार्जुन ठेकेदार आहे. दोन वर्षांपूर्वी दोघांनी विवाह केला. त्यानंतर शिल्पा मुलासह मल्लिकार्जुन याच्यासोबत धायरीत राहायला आली. शिल्पा गरोदर होती. शुक्रवारी (११ एप्रिल) तिने मुलाला बहिणीकडे सोडले. रुग्णालयात तपासणी करायला जाते, असे तिने सांगितले. त्यानंतर ती धायरीतील घरी आली. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, शिल्पाचा संपर्क होत नसल्याने बहिणीने याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली. शिल्पाने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी शिल्पाने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर शिल्पाचे वडील भीमाप्पा चौडप्पा चलवादी (वय ५३, रा. रेल्वे उड्डाणपुलाजवळ, मुंढवा) यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड तपास करत आहेत.

नितीन गडकरींचा गडचिरोली नक्षलविरोधी ‘मेगा प्लॅन’! परिस्थिती अत्यंत बिकट होती ‘ही’ संख्या 1 लाख करायचीय

0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गडचिरोलीमधील नक्षलवाद संपवण्यासाठी मेगा प्लॅन सांगितला. मुंबईत आयोजित कार्यक्रमात गडचिरोलीसाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाचे सुरु असलेले उपक्रम गडकरी यांनी सांगितले. गडकरी म्हणाले, गडचिरोली येथून एक रस्ता काढायचे आहे. जो थेट विशाखापट्टणम पोर्टला जोडला जाईल. रायपूर ते विशाखापट्टणम एक एक्सप्रेस बांधत आहोत. रस्ते झाले की त्या भागाचा विकास होतो. चित्र बदलते. दावोस येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसाठी गुंतवणूक आणली आहे. साडेसहा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक या भागांत येत आहे. यामुळे जगातील सगळ्यात चांगले लोखंड या ठिकाणी तयार होईल. या प्रकल्पात 80 टक्के स्थानिक मुलांना काम मिळावे, असे सांगितले असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

गडचिरोलीमध्ये होत असलेल्या बदलाबाबत नितीन गडकरी म्हणाले, या भागात असलेल्या नक्षलवाद्यांना मी देखील भेटलो होतो. त्यांची समजावले होते. त्यांना काम दिले. काम मिळाल्याने तीन हजार नक्षलवादी कामाला लागले. त्यांनी नक्षल अँक्टिव्हिटी त्यांनी सोडल्या. जल, जंगल यातून कसा विकास होईल यासाठी प्रयत्न करत आहोत. मी राजकारण करतच नाही. 90 टक्के हेच समाजकारण करतो. गडचिरोलीला 500 विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल बांधणार आहे.

29 वर्षांपूर्वी गडचिरोलीत असलेल्या नक्षलवादाची आठवण गडकरी यांनी सांगितले. गडचिरोली हे नक्षलवादी गाव म्हणून ओळखले जात होते. परिस्थिती अत्यंत बिकट होती. मी निवडणुकीसाठी तेथील एका भागात प्रचारासाठी गेली होतो. त्यावेळी पोलिसांनी मला घेरले. चहा पिण्यासाठी पण पोलिसांनी तंबू दिला नाही. परंतु आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. आज या ठिकाणी 1200 शिक्षक आहेत. 30 हजार विद्यार्थी शिकत आहेत. आता 30 हजार विद्यार्थी संख्या 1 लाख करायची आहे, असा संकल्प गडकरी यांनी जाहीर केला.

आपल्या आवडत्या कामाबद्दल नितीन गडकरी यांनी प्रथम सांगितले. ते म्हणाले, देशात सुरु असलेली रस्ते , टनेल या गोष्टी प्रसिद्ध होतात. मात्र कृषी विभागात मला काम करायला आवडते. परंतु ते काम प्रसिद्ध होत नाहीत. मुंबई पुण्याची शक्ती वाढली तरी 65 टक्के जनता अजूनही खेड्यात आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करायचे आहे. 29 वर्षांत आपण कोणाचा एकही रुपये कोणाचा घेतला नाही.

चेन्नईला विजयामुळे ‘इम्पॅक्ट’ ऑक्सिजन; महेंद्रसिंह धोनी आणि शिवम दुबे जोडीने विजयश्री खेचून आणला

0

आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला पुन्हा एकदा विजयाची चव चाखली आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं. मात्र त्यानंतर सलग पाच पराभवांचं तोंड पाहीलं होतं. आता लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करून पुन्हा एकदा विजयाची चव चाखली आहे. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 7 गडी गमवून 166 धावा केल्या आणि विजयासाठी 167 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान तसं पाहिलं तर या मैदानावर खूपच कठीण होतं. शाईक रशीद आणि रचिन रविंद्रने चांगली सुरुवात केली. 52 धावांची भागीदारी केली आणि पहिली विकेट गमावली. त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि रविंद्र जडेजा काही खास करू खले नाहीत. विजय शंकरची विकेटही झटपट पडली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघावर दडपण वाढलं. पण महेंद्रसिंह धोनी आणि शिवम दुबे या जोडीने विजयश्री खेचून आणला.  महेंद्रसिंह धोनी फलंदाजीला आला तेव्हा 30 चेंडूत 55 धावांची गरज होती. मात्र महेंद्रसिंह धोनी आपला जुना अंदाज दाखवला आणि फिनिशरची भूमिका बजावली.

महेंद्र सिंह धोनी आणि शिवम दुबे यांनी 55 धावांची विजयी भागीदारी केली. यावेळी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 11 चेंडूत नाबाद 26 धावांची खेळी केली. तर शिबम दुबेने संथ पण सावध खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. शिवम दुबने 37 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार मारत नाबाद 43 धावांची खेळी केली. चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी दिलेलं 167 धावांचं आव्हान 5 गडी गमवून 19.3 षटकात पूर्ण केलं. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या पारड्यात 2 गुणांची कमाई झाली आहे. पण अजूनही गुणतालिकेत तळाशी आहे. प्लेऑफचं गणित सोडवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सला 7 पैकी 6 सामन्यात विजय मिळवणं भाग आहे.

लखनौ सुपर जायंट्सकडून ऋषभ पंतने मोठी खेळी केली. एकीकडे एडम मार्करम आणि निकोलस पूरन स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने डाव सावरला. त्याने 49 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 63 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे संघाला 166 धावांपर्यंत मजल मारता आली. मिचेल मार्शने 30, आयुष बदोनीने 22, अब्दुल समदने 20 धावा केल्या. तर शार्दुल ठाकुरने शेवटी येत 4 चेंडूत 6 धावांची खेळी केली.

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या मुलींना योग्य घर मिळेना; म्हणाले…. ‘सवलत नव्हे, तर हक्क म्हणून सुविधा द्या!’

0

माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड दिल्लीत विशेष गरजा असलेल्या त्यांच्या दोन मुलींसाठी आरामदायक घर शोधण्यासाठी धडपडत आहेत. न्या.चंद्रचूड यांना ३० एप्रिल रोजी सरकारी निवासस्थान रिकामे करायचे आहे. ते म्हणाले की, ‘आमच्या दोन सुंदर मुलींच्या विशेष गरजांसाठी घर मिळणे कठीण झाले आहे. प्रत्येक सार्वजनिक जागा सारखीच असते.’

दिव्यांगांप्रति दु:ख व्यक्त करताना माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, ‘आपल्या समाजाने दिव्यांगांना अज्ञान व दडपशाहीची वागणूक दिली आहे.’

दोन्ही मुली आहेत दुर्मीळ आजाराने त्रस्त

न्यायमूर्ती चंद्रचूड आणि पत्नी कल्पना दास यांनी प्रियंका आणि माही या दोन मुलींना दत्तक घेतले आहे. मुलींना ‘नेमालाइन मायोपॅथी’ या दुर्मीळ आजाराने ग्रासले आहे.

आव्हानांबाबत केली चर्चा

मिशन ॲक्सेसिबिलिटीने आयोजित केलेल्या दिव्यांगांचे अधिकार आणि त्यापुढे काय? या चर्चेत न्या. चंद्रचूड यांनी दिव्यांग मुलींच्या दुर्मीळ आजाराच्या कारणांवर चर्चा केली. कुटुंबासमोरील आव्हानांबद्दल यावेळी त्यांनी चर्चा केली.

मुलींमुळे माझा पूर्ण दृष्टिकोनच बदलला

न्या. चंद्रचूड म्हणाले की, त्यांच्या मुलींनी त्यांच्या कुटुंबाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, त्यांना शाकाहाराची ओळख करून दिली आहे. प्राणी आणि पर्यावरणाबद्दल खोल आदर निर्माण केला आहे. केवळ या दृष्टिकोनातून, दिव्यांग व्यक्तींसाठी सर्वोच्च न्यायालयात ‘मिट्टी कॅफे’ सुरू झाला. अपंगत्व हा अडथळा नाही, हे आम्हाला दाखवायचे होते. ते सन्मानीय जीवन जगण्यास सक्षम आहेत, हे यातून दाखविण्याचा प्रयत्न होता.

दिव्यांगांना सवलत नव्हे, तर हक्क म्हणून सुविधा द्या

माजी सरन्यायाधीशांनी दिव्यांग-संबंधित प्रकरणांना प्राधान्य देण्यासाठी न्यायालयांना आवाहन केले. दिव्यांगांप्रति सहानुभूतीप्रत खंडपीठाची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. दिव्यांग व्यक्तींना सवलत म्हणून नव्हे तर हक्क म्हणून सुविधा दिल्या जाव्यात. ते पूर्णतः दुर्लक्षित जीवन जगतात. दिव्यांग व्यक्तींच्या हक्क (आरपीडब्ल्यूडी) कायद्याचा पुनर्विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

सिंहगड पहिल्या दिवशीच चालकांनी केला चक्काजाम; पालक संतप्त संस्थेकडून थेट सुट्टी जाहीर

0

सिंहगड इन्स्टिट्यूट वारजे कॅम्पस शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी थेट संपाचं हत्यार उपसत चक्काजाम करत प्रवेशद्वारावरच हे आंदोलन केल्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला असून सकाळी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी बसच न आल्याने थेट शाळेच्या आवारात आलेल्या पालकांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

सिंहगड इन्स्टिट्यूटची आज नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात असल्याने अनेक पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची नियोजन केले होते. सकाळी वेळेवर संस्थेच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या गाड्याच न पोहोचल्याने थेट पालकांनी शाळेच्या आवारात जाण्याचा निर्णय घेत संस्थेला जात विचारण्याचा प्रयत्न केला परंतु पालक शाळेच्या आवारात पोहोचल्यावर त्यांना चालकांच्या आंदोलनाची कल्पना मिळाली. याबाबत संतप्त पालकांनी प्रशासनाला विचारणा करण्याचा प्रयत्न केला परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे पालकही कमालीचे निराश झाले आहेत.

संस्थेच्या वतीने चालकांच्या संपाची कल्पना असतानाही संबंधित पालकांना कोणताही निरोप देण्यात न आल्याने सर्व पालकांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. संस्थेकडे कामाला असलेले चालक संप करण्याची कल्पना संस्थेला असल्या शिवाय संबंधित कर्मचारी कुठलेही संपाचे हत्यार उगारु शकत नाहीत. संस्थेच्या चालकांचे विषय शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच संपवणे आवश्यक असताना नाहक पालकांना त्रास देण्याचे हेतूनेच हे कृत करण्यात आल्याचे पालकांकडून सांगितले जात आहे.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी ‘बौद्ध भन्तेंकडून बुद्ध वंदना आणि धम्मदेसना’ अभिवादनासाठी उसळला जनसागर

0

महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कोथरुड मधील निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच, जमलेल्या सर्वांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरातील अनेक मान्यवर आणि आंबेडकर प्रेमी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देताना ना. पाटील म्हणाले की, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजापूर्ते मर्यादित नसून, ते सर्वांचेच आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांतून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन करुन; आपल्या सर्वांमध्ये स्वराज्य, स्वभाषा आणि स्वधर्माबाबतचे स्फुल्लिंग चेतवले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच समाजातील प्रत्येक घटकाला समानतेचा अधिकार मिळाला. त्यामुळे अशा महापुरुषाची जयंती प्रत्येकाच्या घरी झालीच पाहिजे, अशी भावना यावेळी ना. पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या जयंती कार्यक्रमात बौद्ध भन्ते धम्मदर्शना, भन्ते हर्षवर्धन, भन्ते संघानंद, भन्ते बुद्धभूषण, भन्ते आर्याजी यांनी विशेष उपस्थिती लावली. या भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन करून बुद्ध वंदना सादर केली. तसेच सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन; धम्मदेसना दिली‌. या कार्यक्रमास शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये माजी आयपीएस अशोक धिवरे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, रिपाइंचे नेते परशुराम वाडेकर, ॲड. मंदार जोशी, पल्लवी जावळे, अतुल साळवे, नगरसेवक अविनाश साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, दादांच्या या अभिनव पुढाकाराचे आंबेडकर प्रेमींकडून कौतुक करण्यात आले.