Home Blog Page 120

नाशिकमध्ये अनधिकृत दर्गा तोडायला सुरुवात, पोलिसांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड

0

नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्ग्याच्या तोडकामाला आज पहाटेपासून सुरुवात झालेली आहे. आपलं म्हणणं मांडण्यासाठी दर्गा ट्रस्टला दिलेली मुदत आज संपली. त्यामुळे दर्ग्याच्या उर्वरित बांधकामाच्या तोडकामाला सुरुवात झाली आहे. याआधी हाच अनधिकृत दर्गा हटवताना निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, नाशिक पोलिसांनी काठे गल्ली परिसरात मोठा बंदोबस्त लावला आहे. पोलिसांकडून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येत आहे. अनधिकृत दर्ग्याच्या उर्वरित तोडकामाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी अनधिकृत दर्गा हटवण्याची प्रोसेस सुरु झाली. त्यावेळी धर्मगुरुंनी मध्यस्थी करुन अजून अवधी हवा अशी विनंती केली हो

15 एप्रिल रोजी ही मुदत संपल्यानंतर पोलीस बंदोबस्तात महापालिकेकडून तोडक कारवाई सुरु झाली आहे. जिथे ही कारवाई सुरु आहे, तिथे 100 मीटरच्या परिसरात बॅरिकेडींग करण्यात आली आहे. आतमध्ये जायची कोणाला परवानगी नाहीय. आज दुपारपर्यंत हा अनधिकृत दर्गा हटवण्याचं काम पूर्ण होईल. मागच्यावेळी दर्गा हटवण्याची कारवाई सुरु झाली. त्यावेळी दोन्ही बाजूकडून जमाव जमला होता. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आज अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.

मात्र, जमाव 400 च्या वर होता

दरम्यान हा दर्गा हटवण्याची कारवाई सुरु होण्याआधी रात्रीच्या वेळी नाशिकच्या काठे गल्ली परिसरात दगडफेक झाली. तीन ते चार पोलीस या दगडफेकीत जखमी झाले आहेत. पाच वाहनांचेही नुकसान झाले आहे. वीजपुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावाने दगडफेक केली. वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा उडल्यानं तणाव निर्माण झाला होता. रात्रीच्या वेळी 500 पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र, जमाव 400 च्या वर होता. पालिकेने न्यायालयाच्या आदेशाने अनधिकृत दर्ग्याला 1 एप्रिलला नोटीस बजावली होती. स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या, अन्यथा तोडकामाचा दिला होता इशारा. नाशिक पोलिसांनी परिसरातील वाहतूक मार्गतही केला बदल

पुणे कोथरूडमधील व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या; विमानतळावर अपरहण मृतदेह राष्ट्रीय महामार्ग- ३३ वर फेकून फरार

0

पुण्यातील व्यावसायिकाची बिहारमध्ये निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घोसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माननपूर गावाजवळ १२ एप्रिल रोजी सकाळी या व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आला होता त्यामुळे एकच खळबळ उडाली.पोलिस तपास करत असता हा व्यावसायिक पुण्याचे असल्याचे उघड झाले. १४ एप्रिलला मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. लक्ष्मण साधू शिंदे असं या व्यावसायिकाचे नाव असून ते पुण्यातील एक प्रसिध्द व्यावसायिक होते. त्यांचा भंगाराचा मोठा व्यवसाय आहे.

पुण्यातील व्यावसायिकाची बिहारच्या पाटण्यात हत्या करण्यात आली. गळा दाबत ५५ वर्षीय व्यावसायिक लक्ष्मण साधू शिंदे यांची हत्या केली. लक्ष्मण शिंदे हे पुण्यातील कोथरूडमध्ये राहत होते. सायबर चोरट्यांनी कंपनीच्या कामासाठी मेल करत त्यांना पाटण्यात बोलून घेतले आणि त्यांची हत्या केली. कंपनीचे काही टूल्स आणि मशीनरी स्वस्त भावात विकत देतो असा मेल आरोपींनी लक्ष्मण शिंदे यांना पाठवला होता. स्वस्तात मशिनरी मिळेल यासाठी शिंदे बिहारला गेले होते. पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यामध्ये शिंदे बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबाकडून देण्यात आली होती. सोमवारी पाटण्यात त्यांचा मृतदेह सापडला.

तीन दिवसांपूर्वी जहानाबादमधील बंधुगंज एकंगरसराय रस्त्यावर घोसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माननपूर गावाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी हा मृतदेह बेवारस असल्याचे समजून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मृतदेहाची ओळख पटताच एकच खळबळ उडाली. सायबर चोरट्यांनी व्यावसायिकाला पाटण्याला बोलावले होते. त्यानंतर एअरपोर्टवरून त्यांचे अपरहण करण्यात आले. अपरहणानंतर त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिला त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी शिंदे यांचा मृतदेह जहानाबाद जिल्ह्यातील घोसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झुंकी आणि मानपूर गावादरम्यान येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग- ३३ वर फेकून फरार झाले.

सुरूवातील पोलिसांना शिंदे यांचा मृत्यू रस्ते अपघातामध्ये झाला असावा असे वाटले. पण मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले. सध्या या हायप्रोफाईल हत्या प्रकरणाचा तपास पाटणा, जहानबाद आणि नालंदा पोलिस संयुक्तपणे करत आहेत. बिहारच्या स्पेशल टीमने या प्रकरणी ५ संशयितांना ताब्यात घेतले आहे. हत्या झाल्यानंतर बिहार पोलिसांच्या विशेष पथकाने ५ संशयितांना जेहानबाद आणि नालंदा या जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांची बिहार पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. शिंदे यांचा मृतदेह आणण्यासाठी पुणे पोलिस बिहारमध्ये दाखल झाले आहेत.

कृषी क्षेत्रात स्मार्ट प्रकल्पाला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार

0

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाला कृषी क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रतिष्ठित स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कृषी व्यवसाय आणि ग्रामीण विकासात प्रकल्पाच्या अनुकरणीय योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या समारंभात प्रकल्पाच्या वतीने अधीक्षक कृषी अधिकारी श्री. विलास रेणापूरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रकल्प संचालक श्री. हेमंत वसेकर (भा.प्र.से.) व अतिरिक्त प्रकल्प संचालक श्री. उदय देशमुख यांनी स्मार्ट प्रकल्पातील अधिकारी व सहभागी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे अभिनंदन केले.
विविध कृषी व्यवसायांसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPC) अनुदान रुपाने बळकटी देऊन ग्रामीण भागातील शेतीनिष्ठ समुदायाचे जीवनमान उंचावण्यात स्मार्ट प्रकल्पाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कृषी मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी, चांगल्या बाजारपेठेची उपलब्धता सुलभ करण्यासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये शाश्वत शेती पद्धतींना चालना देण्यासाठी स्मार्टने नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत.
ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी, दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणीसाठी आणि प्रगत तंत्रज्ञान आणि धोरणात्मक भागीदारीद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करण्यात स्मार्ट प्रकल्पाचे योगदानाबद्दल या पुरस्काराच्या रुपाने पावती मिळाली आहे. स्कॉच पुरस्कार प्रकल्पाच्या महत्त्वपूर्ण कामगिरीला मिळालेली पोहोच असून, कृषी व्यवसाय विकसित करण्याला आणि ग्रामीण सक्षमीकरणाला चालना देऊ पाहणाऱ्या इतर राज्यांसाठी एक स्मार्ट प्रकल्प हे एक उत्तम उदाहरण ठरू शकतो.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पात बिगर फळबाग प्रकल्पांना २ कोटींपर्यंत, तर फळबाग व संबंधित प्रकल्पांना ३ कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. असा मोठ्या प्रमाणावर अनुदान देणारा राज्यातील एकमेव स्मार्ट प्रकल्प आहे. यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी व्यवसाय वाढविण्यासाठी व पतपुरवठा मिळणे सुकर होत आहे, असा विश्वास स्मार्टचे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी व्यक्त केला.
स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत काढणीपश्चात तंत्रज्ञानासाठी, गोदाम व प्रक्रिया उद्योगांसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (सीबीओ) मंजूर रकमेच्या ६० टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात आगाऊ अनुदान दिले जाते. तसेच विभागीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन व साहाय्याने ग्रामीण रोजगार वाढीसाठी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उपयुक्त अशा प्रकल्पांना प्राधान्य दिले जाते.
स्मार्ट प्रकल्पात खरेदीदार- विक्रेता संमेलन, क्षमता बांधणी, शेतकऱ्यांसाठी बाजार माहितीचे विश्लेषण, ४०० एफपीसींमधून महिलांचा सहभाग, बँकांच्या सहकार्याने अर्थसाहाय्य, निर्यात सुविधा उभारणीला चालना, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर अशा उपक्रमांना उल्लेखनीय यश मिळत आहे.
विविध ११ शासकीय विभागांच्या प्रकल्प अंमलबजावणी कक्षांच्या (P.I.U.) माध्यमातून स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येते. त्यापैकी कृषी संचालक- आत्मा श्री. अशोक किरनळ्ळी यांचे अधिनस्त प्रकल्प अंमलबजावणी कक्ष- कृषी अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करण्यात येत आहे. स्मार्ट प्रकल्पातून प्राथमिक प्रक्रिया उद्योग, गोदाम व शीतगृहांसाठी ८५८ उत्पादक भागीदारी प्रकल्प करण्यात आले आहेत. तसेच, ९६ एफपीसींचे १२ विविध पिकांसाठी १०६ विविध बाजारांशी लिंकिंग करण्यात आले असून, आतापर्यंत ५७,८६० टन मालाची विक्री होऊन १७३ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. शेतमालासाठी ७६७ खरेदीदार निश्चित करण्यात आले आहेत. स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत राज्यातील ८५८ एफपीसींच्या विविध कृषी व्यवसायांसाठी ८९८ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

पुणे तिथे काय उणे! प्लास्टिकची बंदूक दाखवून २५- ३० तोळे लुटून आरोपी फरार; मालकही बघत राहिला

0

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धायरी येथील श्री ज्वेलर्स या दुकानावर तीन दरोडेखोरांनी भरदिवसा दरोडा टाकत २५ ते ३० तोळे सोने लुटल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी प्लास्टिकच्या पिस्तुलाचा धाक दाखवत ही लुट केली असल्याचं तपासात समोर आलं आहे.

दुकानाचे मालक विष्णू दहीवाळ यांनी यासंदर्भात तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपी फरार झाले असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात आरोपींनी थरारक दरोडा टाकला. नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धायरी परिसरात श्री. ज्वेलर्सचे दुकान आहे. हे दुकान विष्णू दहीवाळ यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे. या दुकानात तीन दरोडेखोरांनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने प्रवेश केला.नंतर प्लास्टिकच्या बंदूकीचा धाक दाखवून आरोपींनी ज्वेलर्सच्या दुकानातून २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने लुटले.

सोने लुटल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. आरोपी फरार होत असतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी सोने चोरून पळ काढताना दिसत आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील पोलीस चोरट्यांचा शोध घेत असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत 3 धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार; कॅबिनेटमध्ये 7 मोठे निर्णय

0

राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे 7 निर्णय घेण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये, गृह, महसूल, नगरविकास आणि विधी व न्याय विभागाच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागातील सर्वाधिक 3 निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात, नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींस मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा. नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ करून कर वसूलीसाठी व्हावी यासाठी अभय योजना लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तर, लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 7 निर्णय

विधि व न्याय विभाग

चिखलोली-अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करणार व त्याअनुषंगाने पदे मंजूर

गृह विभाग

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कैद्याच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणास मंजूरी.

नगरविकास विभाग

नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या हस्तांतरणांसाठीच्या नियमांमध्ये बदलास मान्यता

नगरविकास विभाग

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा.

नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ करून कर वसूलीसाठी व्हावी यासाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय

नगरविकास विभाग

नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींस मान्यता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करणार.

महसूल व वन विभाग

भूमिसंपादन, पुनर्वसन पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम-30(3), 72 व 80 मध्ये भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा करताना आकारण्यात येणार्या व्याजदरांच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय

उच्च व तंत्रशिक्षण विभाग

लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय

मोठी बातमी ! विनोद कांबळीच्या मदतीला गावस्कर धावले, प्रत्येक महिन्याला आयुष्यभर देणार इतकी रक्कम…

0

आजारपणामुळे खंगलेल्या आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या विनोद कांबळीसाठी खुद्द लिटल मास्टर सुनील गावस्कर धावून आले आहेत. सुनील गावस्कर यांच्या CHAMPS फाऊंडेशनच्यावतीने कांबळीला मदत केली जाणार आहे. गावस्कर यांची ही संस्था कांबळीला प्रत्येक महिन्याला 30000 रुपये देणार आहे. विशेष म्हणजे कांबळीला आयुष्यभर ही रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम त्याला घर खर्चासाठी दिली जाणार आहे. तसेच त्याचा वैद्यकीय खर्चासाठी वर्षाला आणखी 30000 रुपये दिले जाणार आहेत. वैद्यकीय खर्चाची रक्कमही आयुष्यभरासाठी दिली जाणार आहे. म्हणजे कांबळीला आयुष्यभरासाठी ही मोठी मदत होणार आहे. सुनील गावस्कर यांच्या CHAMPS फाऊंडेशनची सुरुवात 1999मध्ये झाली होती. गरजवंत क्रिकेटपटूंना मदत करणे हा या फाऊंडेशनचा हेतू होता.

विनोद कांबळीला दर महिन्याला 30 हजार रुपये देण्यात येणार आहे. 1 एप्रिलपासूनच ते दिले जाणार आहेत. म्हणजे पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही रक्कम दिली जाणार आहे. 53 वर्षीय विनोद कांबळी जोपर्यंत जिवंत असेल तोपर्य्तं त्याला हे पैसे देण्यात येणार आहेत. याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

जानेवारीत भेट, एप्रिलमध्ये मदत

11 जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विनोद कांबळी आणि सुनील गावस्कर यांची भेट झाली होती. यावेळी कांबळीने गावस्कर यांच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं होतं. त्यावेळी कांबळी अत्यंत भावूक झाला होता. त्या भेटीनंतर आता गावस्कर यांच्या संस्थेने हा मोठा निर्णय घेतला आहे. अवघ्या तीन महिन्यातच हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रकृती ढासळल्याने निर्णय

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विनोद कांबळीची प्रकृती खूपच खालावली होती. त्याला यूरिन इन्फेक्शन झालं होतं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कांबळीची तब्येत बिघडल्याचं ऐकल्यानंतर गावस्कर यांनी त्याला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. वानखेडे स्टेडियमवर दोघांचीही भेट झाली होती. त्यानंतर गावस्कर यांनी कांबळीच्या दोन्ही डॉक्टरांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याला मदत करण्याचा गावस्कर यांनी निर्णय घेतला.

मदत मिळणारा कांबळी दुसरा

सुनील गावस्कर यांच्या CHAMPS फाऊंडेशनकडून खेळाडूंना मदत केली जाते. आता या फाऊंडेशनकडून मदत घेणारा कांबळी हा दुसरा क्रिकेटपटू आहे. याआधी माजी क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांना गावस्कर यांच्या फाऊंडेशनने मदत केली होती.

‘ज्यांनी लंगोट घातला नाही, ते…’, कुस्ती पंच नितीश काबलिये निलंबन प्रकरणावर पृथ्वीराज मोहोळची प्रतिक्रिया

0

आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेच्या कुस्ती सामन्याच्यावेळी चुकीचा निर्णय दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्यावतीने काबलियेंवर कारवाई करण्यात आली आहे. याच सामन्यानंतर शिवराज राक्षेनं काबलियेंना लाथ मारली होती. 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती अंतिम सामन्यातील निर्णयावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. अहिल्यानगर येथे ही कुस्ती स्पर्धा पार पडली होती. या कुस्ती स्पर्धेतील विजेता महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ या विषयावर बोलला आहे.

“कुठल्याही खेळाडूला शिट्टी कानावर पडण्याची प्रतिक्षा असते. मी डाव मारुन मोकळा झालेलो. पंचांनी शिट्टी वाजवली म्हणून मी कुस्ती सोडून दिली. जर रेफरीने शिट्टी वाजवली नसती, दोन सेकंद थांबले असते, माझा पाय त्या पैलवानाच्या छातीवर होता. पंचांनी शिट्टी वाजवल्यामुळे मी सामना सोडून दिला, जल्लोष सुरु केला” असं पृथ्वीराज मोहोळने सांगितलं.

‘माझा डाव 100 टक्के बरोबर’

तुझा डाव बरोबर होता का? या प्रश्नावर पृथ्वीराज म्हणाला की, “माझा डाव बरोबर होता. होल्ड माझा होता. अख्खा महाराष्ट्र बघत होता. माझी होल्डवर प्रतिक्रिया होती. खालच्या पैलवानाची प्रतिक्रिया नव्हती” चौकशी समितीने पंचांना दोषी धरलय. पंचांचा निर्णय चुकीचा म्हणायचा का? “माझा डाव यशस्वी होता. कुस्ती संघटनेचा निर्णय आहे. आपण प्लेयर आहे. प्लेयरच काम लढणं आहे. माझा डाव 100 टक्के बरोबर होता”

या स्पर्धेसाठी पैलवान रक्ताच पाणी करतात

“पंचांनी शिट्टी वाजवल्यानंतर खेळाडूची काय चूक आहे. जे पैलवान नाही, ज्यांनी लंगोट घातला नाही, ते या वादाला ग्लो देत आहेत” असं मत पृथ्वीराजने व्यक्त केलं. परत कुस्ती सामना होणार म्हणत होते. तेव्हा मी म्हटलेलं, “मी तयार आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मी भरपूर तयारी केली होती. या स्पर्धेसाठी पैलवान रक्ताच पाणी करतात” असं पृथ्वीराज म्हणाला.

‘चोलामंडलम’कडून संभाजीनगर जिल्ह्यास दोन अत्याधुनिक ॲम्बुलन्स सुपूर्त

0

छत्रपती संभाजीनगर– सामाजिक बांधिलकीचे भान राखत चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यातर्फे सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास दोन अत्याधुनिक व सुसज्ज रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) नुकत्याच हस्तांतरित करण्यात आल्या. या ॲम्बुलन्समध्ये स्कॅनिंग मशीनसह अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे देण्यात आली असून, जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे.

या विशेष कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. महाराष्ट्र राज्य कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) श्री. विनयकुमार आवटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, निवासी जिल्हाधिकारी श्री. विनोद खिराळकर, उपजिल्हाधिकारी श्री. प्रवीण फुलारे, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. अभय धानुरकर, जिल्हा कृषी अधीक्षक श्री. प्रकाश देशमुख, विभागीय बँक व्यवस्थापक श्री. मंगेश केदार, तसेच कृषी उपसंचालक श्री. दीपक गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सूर्यनारायण, श्री. शंकर नारायण, श्री. महेंद्र त्रिपाठीश्री. अभिजीत नादोडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमात पुढाकार घेतला. या दोन्ही ॲम्बुलन्स छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या दर्जात मोलाची भर घालतील आणि आपत्कालीन सेवा अधिक गतिमान होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बीड जिल्हा रुग्णालयात भयंकर परिस्थिती, प्रसुतीवेळी तीन महिलांचा मृत्यू, डॉक्टरांना वाचवण्यासाठी राजकीय धडपड?

0

बीडच्या जिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी एका मातेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता चौकशीसाठी त्रिसदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे. छाया पांचाळ असं मृत मातेचे नाव होते. या मातेच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. याची दखल घेत पाच सदस्य समिती समोर छाया पांचाळ यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

मात्र, या चौकशी समिती समोर जाण्याआधीच स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडून कागदपत्रे बदलल्याची चर्चा रुग्णालयात सुरू आहे. तसेच डॉक्टरांना वाचविण्यासाठी काही राजकीय नेत्यांनीही फिल्डिंग लावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

छाया पांचाळ या मातेचे मृत्यू प्रकरण ताजे असतानाच सोमवारी सकाळी आणखी एका मातेची प्राणजोत मालवली. सलग दुसऱ्या दिवशी जिल्हा रुग्णालयात झालेल्या मातेच्या मृत्यूमुळे जिल्हा रुग्णालयात नेमकं चाललय काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आठवड्यातील हा तिसरा माता मृत्यू आहे.

जिल्हाशल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन झाल्यानंतर जिल्हा रुग्णातील आरोग्य सेवा सध्या कोलमडली आहे. डॉक्टर संजय राऊत यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सकाचा पदभार आहे. मात्र, आठवडाभरात तीन मातांचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा ही व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येते आहे.

आवादा एनर्जी प्रकल्पात चोरी करणारी टोळी जेरबंद

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे कारण ठरलेल्या आवादा एनर्जी प्रकल्पावर एका टोळीकडून चोरी करण्यात आली होती. या गुन्ह्याची उकल बीड पोलिसांनी केली असून दहा पैकी चौघांना अटक केली आहे. या टोळीवर बीड पोलिसांकडून मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. 11 मार्च रोजी मसाजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पावर चोरी झाली. त्यानंतर 7 एप्रिल रोजी त्याच परिसरातील विडा येथील आवादा कंपनीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून मारहाण करत 11 लाख रुपयांचे साहित्य चोरी करण्यात आले होते. या दरम्यान चोरट्यांनी लाखो रुपयांचे साहित्य लंपास केले होते.

पोलिसांनी याचा तपास करत या टोळीतील दहा पैकी चौघांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चार गुन्हे उघड झाले असून या टोळीवर विविध ठिकाणी 27 गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत असून टोळीवर मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला गेलाय.

लाडकी बहीण योजनेत आठ लाख महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळणार

0

राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेतील अटीनुसार दोन योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनाचा हप्ता आता कमी मिळणार आहे. या महिलांना नमो शेतकरी योजनेच्या रक्कमेनंतर शिल्लक राहणारी रक्कम मिळणार आहे. राज्यात आठ लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचे छननीनंतर स्पष्ट झाले.

का घेतला निर्णय
नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे. या महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये या महिन्यापासून मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेतील अटीनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही. नमो शेतकरी योजनेत महिलांना सहा हजार रुपये वर्षाला मिळतात. तसेच केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये मिळतात. म्हणजेच या महिलांना शासकीय योजनेचे वर्षाला बारा हजार रुपये मिळत आहे. यामुळे या महिलांना आता वर्षाला राहिलेले सहा हजार रुपयेच लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 500 रुपये मिळणार आहे.

राज्य सरकारने 2023 मध्ये केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो महासन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेतून शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. म्हणजेच चार महिन्याला केवळ दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर म्हणजे 30 एप्रिल रोजी मिळणार आहे. त्यावेळी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 9 हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले. मात्र एप्रिलचा 10 हप्ता मिळालेला नाही. तो 30 एप्रिल रोजी मिळणार आहे.