Home Blog Page 108

मुंबई पलटणचा विषय हार्ड, सलग चौथ्या विजय तिसर्‍या स्थानी झेप, हैदराबादसह हे 3 संघ आले गॅसवर

0

‘हिटमॅन’ रोहित शर्मा याच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मधील 41 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 7 विकेट्सने विजय मिळवला. ट्रेंट बोलट याच्या धारदार बॉलिंगच्या जोरावर मुंबईने आधी हैदराबादला त्यांच्याच होम ग्राउंडवर 143 धावांवर रोखलं. त्यानंतर मुंबईने 15.4 ओव्हरमध्ये 144 धावांचं आव्हान पूर्ण केलं. मुंबईकडून रोहित शर्मा याने 46 बॉलमध्ये 8 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 70 रन्स केल्या तर. मुंबईने यासह सलग चौथा तर एकूण पाचवा विजय मिळवला. मुंबईने 26 बॉलआधी विजय मिळवल्याने त्याचा फायदा नेट रनरेटमध्ये झाला.

मुंबईने तिघांना पछाडलं

मुंबई इंडियन्सने हैदराबाद विरूद्धच्या मोठ्या आणि एकतर्फी विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली. मुंबई ताज्या आकडेवारीनुसार, पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी पोहचली आहे. मुंबई या सामन्याआधी सहाव्या स्थानी होती. मुंबईच्या खात्यात आता 9 सामन्यानंतर 5 विजयासह 10 पॉइंट्स आहेत. मुंबईचा नेट रनरेट हा +0.673 असा आहे. मुंबईने या विजयासह लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मागे टाकलं. या तिन्ही संघांनीही प्रत्येकी 5-5 सामने जिंकले आहेत. मात्र मुंबईने नेट रनरेटच्या जोरावर या तिघांना पछाडलं.

हे 3 संघ गॅसवर

हैदराबादचा हा या मोसमातील सहावा पराभव ठरला. हैदराबाद यासह या स्पर्धेतून बाहेर होण्याचा उंबरठ्यावर आहे. हैदराबाद या पराभवानंतर नवव्या स्थानी आहे. हैदराबादचा नेट रनरेट हा -1.361 असा आहे. सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे तिन्ही संघांनी प्रत्येकी 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. या तिन्ही संघांनी प्रत्येकी उर्वरित 6 सामने जिंकले तरी त्यांचे 16 गुण होतील. मात्र एकही सामना गमावला तर स्पर्धेतून बाद झालेच समजा. त्यामुळे आता राजस्थान, चेन्नई आणि हैदराबाद या तिन्ही संघांचा कट टु कट हिशोब आहे.

पलटणची तिसऱ्या स्थानी झेप

राजस्थान, हैदराबाद आणि चेन्नई या तिन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 सामने गमावले तरी त्यांचे 12 पॉइंट्स होतील. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी 12 पॉइंट्स पुरेसे नाहीत. इथून एक सामना गमावणं प्लेऑफमधून बाहेर होण्यासारखंच असणार आहे. विशेष म्हणजे हैदराबाद विरुद्ध चेन्नई यांच्यात एक सामना होणार आहे. तर चेन्नईला राजस्थान विरुद्ध एक सामना खेळायचा आहे. त्यामुळे या तिघांपैकी 2 संघ स्पर्धेतून बाहेर होणार, इतकं मात्र निश्चित आहे.

भारताचा ‘वॉटर स्ट्राईक’ सिंधू करार थांबवला पाकिस्तानचे ८५% पाणी बंद ६१ % लोकसंख्या पाण्याच्या थेंबास तडपणार? 

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (२३ एप्रिल २०२५) संध्याकाळी झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या (सीसीएस) आपत्कालीन बैठकीनंतर पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेण्यात आले आहेत . पाकिस्तानला स्पष्ट संदेश देत भारताने सिंधू पाणी करार (१९६०) तात्काळ प्रभावाने स्थगित केला. सिंधू नदीला पाकिस्तानची जीवनरेखा म्हटले जाते. केंद्रातील मोदी सरकारच्या या निर्णयानंतर सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्यावर भारताचे नियंत्रण असेल आणि तेथील लोक पाण्यासाठी तहानतील. आता हा करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानवर मोठा परिणाम होणार आहे.

सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या (झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज) चार देशांमधून जातात. पाकिस्तानची संपूर्ण लोकसंख्या (सुमारे २१ कोटी) पाण्यासाठी या नदीवर अवलंबून आहे. सप्टेंबर १९६० मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानी लष्करी जनरल अयुब खान यांच्यात सिंधू पाणी करार झाला. पाकिस्तानची ८० टक्के शेती जमीन (सुमारे १.६ कोटी हेक्टर) सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.

यातील ९३ टक्के पाणी सिंचनासाठी वापरले जाते. जे देशाच्या शेतीला शक्ती देते. ही प्रणाली २३७ दशलक्षाहून अधिक लोकांना आधार देते. ज्यामध्ये सिंधू खोऱ्यातील ६१ टक्के लोकसंख्या पाकिस्तानमध्ये राहते. कराची, लाहोर आणि मुलतान सारखी पाकिस्तानची प्रमुख शहरे सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पाकिस्तानचे तारबेला आणि मंगला सारखे वीज प्रकल्प या नदीवर अवलंबून आहेत.

या करारानुसार, भारत सिंधू नदी प्रणालीतील फक्त २० टक्के पाणी वापरू शकतो आणि उर्वरित ८० टक्के पाणी पाकिस्तानला देतो. भारत आपल्या पाण्याच्या फक्त ९० टक्के वापर करतो. या कराराअंतर्गत, दोन्ही देशांदरम्यान दरवर्षी सिंधू जल आयोगाची बैठक घेणे बंधनकारक आहे. हा करार थांबवून, भारत पाकिस्तानला जाणारा सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबवेल. ज्यामुळे पाकिस्तान पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तहानेल.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारताने पाकिस्तानला सिंधू पाणी कराराचा आढावा घेण्यासाठी नोटीस दिली होती. पाकिस्तान आधीच आर्थिक संकट आणि दुष्काळाचा सामना करत आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या २३% आणि त्यांच्या ३४% कामगार वर्गाची लोकसंख्या सिंधूच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या एकूण पाण्यापैकी ८५% पाणी सिंधू आणि तिच्या उपनद्यांमधून येते. आंतरराष्ट्रीय कायद्यात युद्ध घोषित करण्याचे एक वैध कारण म्हणून पाण्याचे वळण पाहिले जाते.

गंगा आणि ब्रह्मपुत्रेच्या खालच्या किनाऱ्यावर असलेल्या बांगलादेशच्या बेकायदेशीर सरकारलाही हा इशारा आहे. भारताच्या उत्तरेकडील पाण्याच्या प्रवाहापैकी २०% पाणी तिबेटमधून वितळणाऱ्या हिमनद्यांवर अवलंबून आहे. प्रश्न असा आहे की चीन पाण्याचा प्रश्न द्विपक्षीय ठेवण्यासाठी आपल्या मित्र राष्ट्राच्या मदतीला येईल का?

भारताच्या पहलगाम हल्ल्यानंतर मोठ्या 5 उपाययोजना पाकिस्तानचं पाणी थांबवलं अन् ही तंबी: वाचा सविस्तर

0

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी घडलेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी घटकांचे हात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सिंधू जल करार स्थगित ठेवणे, अटारी-वाघा एकत्रित सीमा तपासणी चौकी तत्काळ बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यावर बंदी घालणे आणि दोन्ही देशांच्या उच्चायोगांतील सैन्य सल्लागारांना हकालपट्टी देणे तसेच इतर काही उपाय अमलात आणण्याचे ठरवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळच्या सुरक्षा विषयक समितीच्या (सीसीएस) बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. बैठकीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि कॅबिनेट सचिव डॉ. टी. व्ही. सोमनाथन उपस्थित होते. बैठक सुमारे दोन तास चालली.

बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन निर्णयांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. सीसीएसने हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून पीडित कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली आणि जखमींच्या तातडीने उपचारासाठी निर्देश दिले.

मिस्री म्हणाले, “जगभरातील अनेक सरकारांनी या दहशतवादी हल्ल्याचा कठोर निषेध करत भारताशी एकजूट व्यक्त केली आहे. दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेच्या भूमिकेचे हे प्रतिबिंब आहे.”

त्यांनी स्पष्ट केलेल्या महत्त्वाच्या उपाययोजना पुढीलप्रमाणे आहेत :

१. सिंधू जल संधि (१९६०) तात्काळ स्थगित – पाकिस्तानने सीमापार दहशतवादास अखंडनीयपणे पाठिंबा थांबविल्याशिवाय करार पुन्हा प्रभावी करण्यात येणार नाही.

२. अटारी-वाघा एकत्रित तपासणी चौकी बंद – पाकिस्तानमध्ये वैध व्हिसावर गेलेले प्रवासी १ मेपूर्वीच या मार्गे परतू शकतील.

३. सार्क व्हिसा सवलत योजना रद्द – पाकिस्तानी नागरिकांना या योजनेअंतर्गत भारतात येण्यास मनाई. याअंतर्गत पूर्वी दिलेले सर्व व्हिसा रद्द समजले जातील. सध्या अशा व्हिसावर भारतात असलेल्यांना ४८ तासांत देश सोडावा लागेल.

४. सैन्य सल्लागार अवांछित (परसोना नोन ग्रेटा) व्यक्ती जाहीर – नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगातील लष्कर, नौदल व वायूदल सल्लागारांना एक आठवड्यात भारत सोडण्याचे आदेश; इस्लामाबादातील भारतीय सल्लागारांना देखील परत बोलावले जाईल. सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही दोन्ही उच्चायोगांतून परत घेतले जाईल.

५. उच्चायोगातील कर्मचारीसंख्या कपात – सद्य ५५ वरून ३० पर्यंत मर्यादित; १ मेपासून अंमलात येईल.

परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, सीसीएसने देशातील एकूण सुरक्षास्थितीचा आढावा घेतला असून सर्व सुरक्षा दलांना उच्च सतर्कतेवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. “हल्लेखोरांना कायद्याच्या कचाट्यात ओढले जाईल आणि त्यांना आश्रय-मदत देणाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल,” असे मिस्री यांनी ठामपणे सांगितले. तसेच “तहव्वुर राणा यांच्या अलीकडील प्रत्यार्पणानंतर, भारत दहशतवादी कटामध्ये सामील असलेल्या सर्वांचा शोध घेण्यास वचनबद्ध आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दहशतवादी हल्ल्याने देश संतप्त, रॉबर्ट वाड्रांचं वादग्रस्त विधान; देशात हिंदू , मुस्लीम आणि ख्रिश्चनांमध्ये एक….. अशा गोष्टी अराजकता…..

0

जम्मू-काश्मीरमधील पहलगामध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. ज्यामुळे अवघा देश हादरला आहे, शिवाय सर्वचस्तरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला जात असून, संतप्त भावना उमटत आहेत. भारतानेही या हल्ल्याचा बदला घेतला जाईल असा सूचक इशारा दिलेला आहे.

दरम्यान, हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पर्यटकांना हल्लेखोर दहशतवाद्यांनी आधी त्यांचे नाव, धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्याचे समोर आले आहे. ही बाब समोर आल्यानंतर देशभर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावाई आणि खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरणही अधिकच तापलं आहे. भाजपने रॉबर्ट वाड्रांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसला धारेवर धरत, जाब विचारला आहे.

रॉबर्ट वाड्रांनी नेमकं काय म्हटलं? –

रॉबर्ट वाड्रा यांनी एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, मी आपल्या सरकारबाबत अतिशय चिंतेत आहे. सर्वात आधी या हल्ल्यात जीव गमावलेल्या २८ जणांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. याचबरोबर अनेकजण जखमी देखील झाले आहेत, मी त्यांच्याबाबत सहानुभूती व्यक्त करतो आणि अपेक्षा करतो की ते लवकरात लवकर बरे होतील.

पुढे वाड्रा म्हणतात, आपला आवाज उठवण्यासाठी दहशतवादी हल्ले करणे कमकुवत पद्धत आहे. असं मला वाटतं. यामुळे त्यांचा मुद्दा समोर येत नाही, तर ते निष्पाप लोकांना मारत आहेत. ही एक कमकुवत पद्धत आहे. मला वाटतं की सर्व सरकाराना एकत्र येवून अशाप्रकारच्या घटना आणि संघटनांविरोधात लढायला हवं. तथापि याबद्दल माझे जरा वेगळे मत आहे. ही काँग्रेस आणि माझ्या कुटुंबाची विचारसरणी नाही.

रॉबर्ट वाड्रा म्हणाले, आपण बघतो की आपल्या देशात सरकार हिंदुत्वाबाबत बोलते. जेव्हा तुम्ही मशिदीबाबत बोलतात किंवा तुम्ही अशी किंवा तशी प्रार्थना करू शकत नाही, असं म्हणतात तेव्हा अल्पसंख्याकांना अस्वस्थ वाटते. अशाप्रकारची गोष्टी अराजकता, सांप्रदायिकता वाढवतात. जर तुम्ही ही दहशतवादी घटना बघितली तर ते लोक पर्यटकांचे आयडी चेक करत होते. ते असं का करत होते, कारण आपल्या देशात हिंदू , मुस्लीम आणि ख्रिश्चनांमध्ये एक विभाजन झालेलं आहे.

याशिवाय, मी व्हिडीओ फुटेज बघितले आहेत की, चर्च जाळली गेली आहेत. काय घडत आहे? आपल्या देशात सांप्रदायिक भावना का दुखावल्या जात आहेत? हे फूट निर्माण करत आहेत. अशा संघटनांना वाटत आहे की मुस्लिमांसाठी हिंदू धोका आहेत. आपल्याला हे नकोय. तुम्ही बहुतांश हिंदू-मुस्लिमांना विचारा, ते एकमेकांची मदत करतात. कोविडमध्ये त्यांनी असं केलंय. ते राजकारण नाही समजत. निवडणूक जिंकणारं राजकारण त्यांना नाही समजत. आयडी बघून मारण्याचा मेसेज आहे. हा मेसेज पंतप्रधानांसाठी आहे. मुस्लिम आणि अल्पसंख्याकांना कमकुवत वाटत आहे. दोन आठड्यांआधी मला ईडीने बोलावलं होतं, कारण मी मुस्लिमांच्या बाजूने बोललो होतो. असंही रॉबर्ट वाड्रांनी म्हटलेलं आहे.

‘फुले’ चित्रपटाची नवीन रिलीज डेट आली; वादाच्या भोवऱ्यात अडकलेला चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

0

प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘फुले’ या बायोपिक चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. मूळतः ११ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची रिलीज डेट, ब्राह्मण समाजाच्या आक्षेपांमुळे पुढे ढकलण्यात आली होती.आता हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता राजकुमार रावने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे.

‘फुले’ चित्रपटात प्रतीक गांधीने महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारली आहे, तर पत्रलेखाने सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली आहे. अनंत महादेवन दिग्दर्शित हा चित्रपट ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित आहे. चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनानंतर, काही समुदायांनी चित्रपटात ब्राह्मण समाजाचे चित्रण चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप केला होता. या वादामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनात विलंब झाला आणि सेंसर बोर्डाने काही दृश्ये हटवण्याचे निर्देश दिले.

चित्रपटाच्या ट्रेलरनंतर, ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी चित्रपटात जातीयतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. त्यांनी मागणी केली की, चित्रपटात ब्राह्मण समाजाच्या योगदानाचेही चित्रण केले जावे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, चित्रपटाच्या निर्मात्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. सेंसर बोर्डाने चित्रपटातील काही दृश्ये आणि संवाद हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी, इमरान हाश्मी यांच्या ‘ग्राउंड झीरो’ या चित्रपटाशी स्पर्धा होणार आहे. या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर होण्याची शक्यता आहे. ‘फुले’ चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी रोहन-रोहन यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे, आणि आता २५ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महायुतीत धुसफूस; युतीत राहायचं तर राहा, नाहीतर बाहेर पडा, भाजपचा शिंदे सेनेला इशारा

0

ऐकलंत, महायुतीत निधी वाटप आणि विकासकामांवरुन धुमशान रंगलंय. त्यातच आता भाजपनं थेट शिंदे सेनेच्या आमदाराला झापलंय. महायुतीत राहायचं असेल तर राहा अन्यथा बाहेर पडा, असा इशाराच ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंनी शिंदे गटाला दिलाय.तर बहुमत मिळाल्याने माज करु नये, असा पलटवार शिंदे गटाने केलाय. महायुतीत शिंदे गट अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच एकनाथ शिंदेंनी आपल्याला डावललं जात असल्याची तक्रार अमित शाहांकडे केल्याचंही म्हटलं जातंय.. त्यापार्श्वभुमीवर अतुल सावेंनी शिंदे गटाला हा इशारा दिलाय. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे? पाहूयात……

महायुतीऐवजी महाविकास आघाडीच्या आमदारांना झुकतं माप दिल्याचा आरोप

तक्रार करणाऱ्यांमध्ये भाजपचे 2 तर शिंदे गटाचे 1 आमदार

आमदारांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांकडून कामाला स्थगिती

हदगावचे आमदार बाबुराव कोहळीकरांचेही पत्रातून सावेंना खडेबोल

सावेंच्या दौऱ्यावेळी जाब विचारण्याचाही दिला इशारा

एवढंच नाही तर या प्रकरणात आता शिंदे गटाचे मंत्री उदय सामंतांनीही उडी घेत सावेंच्या अधिकारांवरच बोट ठेवलंय. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी अवस्था शिंदे गटाची झाल्याचं म्हटलं जातंय. त्यातच फडणवीसांचे निकटवर्तीय असलेल्या सावेंनी शिंदे गटाला दिलेला इशारा ही भाजपची भूमिका आहे की अतुल सावेंची? हा प्रश्न अनुत्तरीत आहे… मात्र आता सावेंनी इशारा दिला असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

पहलगाम हल्ल्याबाबत मोठी माहिती या दहशतवाद्यांनीच 2024 मध्ये हा हल्ला… सर्च ऑपरेशन केलं होतं, मात्र….

0

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला, या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे, तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज जम्मू काश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी संपूर्ण देशभरातून होत आहे.

जम्मू काश्मीरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान या घटनेच्या 24 तासानंतर आता मोठा खुलासा झाला आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला घडवून आणणारे दहशतवादी गेल्या एक वर्षापासून जम्मू काश्मीरमध्येच होते. याच दहशतवाद्यांनी 2024 मध्ये पुंछमध्ये वायु सेनेच्या ताफ्यावर देखील हल्ला केला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै 2024 मध्ये या दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमध्ये शिरकाव केला होता. त्यानंतर श्रीनगरच्या डाचीगाम जंगलात त्यांनी आश्रय घेतला. डिसेंबर 2024 मध्ये सुरक्षा दलानं या भागात सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं, मात्र त्यावेळी यातील तीन दहशतवादी पळून गेले होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी जे दहशतवादी वाचले होते, त्यांनीच आता पहलगामध्ये दहशतवादी हल्ला केला आहे. त्यांना पाकिस्तानमधून देखील मदत मिळाल्याची माहिती समोर आली आहे. ‘अबू तालाह’ हा या हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर येत आहे. त्याने पाकव्याप्त काश्मीरमधून या दहशतवाद्यांना हल्ल्याचा आदेश दिल्याची माहिती देखील समोर आली आहे. या हल्ल्यानंतर आता डाचीगाम जगलामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे, या जंगलामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची शंका आहे.

दरम्यान दुसरीकडे या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. अशा हल्ल्याला भारत घाबरणार नाही, दहशतवाद्यांना जशाच तसे उत्तर देऊ, दहशतवादी हल्ल्याला असं उत्तर दिलं जाईल की संपूर्ण जग बघेल, या हल्ल्याचे पडद्यामागचे जे सूत्रधार आहेत, त्यांना देखील शिक्षा होणार असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

पहलगाममध्ये अडकलेल्यांची सध्याची स्थिती काय?; 24 तास मदत कक्ष सुरू, कोण कोण सुरक्षित सविस्तर नावे जाहीर हेल्पलाईन क्रमांक जारी

0

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. दहतवाद्यांनी नावं विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्या आहेत. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. असे असतानाच आता जम्मू-काश्मीरला फिरायला गेलेल्या महाराष्ट्रातील इतर पर्यटकांची काय स्थिती आहे, असे विचारले जात आहे. सर्व पर्यटकांना सुखरुप आणण्यासाठी सरकारने आपले प्रयत्न चालू केले आहेत. सरकारने हेल्पलाईन नंबरही जारी केले आहेत.

जालना जिल्ह्यातील साबळे कुटुंब सुरक्षित

मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील राजूर गणपती येथील मनोज साबळे, पत्नी आणि छोटा मुलगा हे 3 जण सध्या जम्मू काश्मीर अडकले आहेत. ते सुखरूप असल्याची माहिती आहे. काल ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता, त्या ठिकाणावरून अगदी काही अंतरावरच हे दाम्पत्य होतं. त्यामुळे या घटनेचा सर्व प्रसंग त्यांनी काल आपल्या आई-वडिलांना सांगितला. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे त्यांचं कुटुंब सध्या चिंताग्रस्त अवस्थेत आहे. या घटनेचा प्रसंग सांगत असताना साबळे यांच्या परिवाराला अश्रू अनावर झाले. साबळे दाम्पत्य सध्या सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.

ठाण्यातील 37 पर्यटक सुरक्षित

दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील काही पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकले आहेत. जिल्ह्यतील 40 पर्यटक पहलगाम येथे होते. या हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. इतर 37 पर्यटक सुरक्षित आहेत. मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत केली जात आहे.

कोण कोण सुरक्षित

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मिर येथे सुरक्षित असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांची यादी मिळाली आहे. 23 एप्रिल 2025 दुपारी 2 वाजेपर्यंत मिळालेली ही माहिती आहे. अनुष्का मोने (35 वर्षे), ऋचा मोने (18 वर्षे), मोनिका जोशी (45 वर्षे), ध्रुव जोशी (16 वर्षे), कविता लेले (46 वर्षे), हर्षल लेले (20 वर्षे), भुषण अशोक गोळे (39 वर्षे), ज्योती अशोक गोळे (36 वर्षे), आरव भुषण गोळे (8 वर्षे), विनोद विश्वास गोळे (41 वर्षे), माधुरी विनोद गोळे (41 वर्षे), विहान विनोद गोळे (11 वर्षे), स्वाती विश्वास गोळे (36 वर्षे), अतुल प्रकाश सोनवणे (42 वर्षे), प्रियंका अतुल सोनवणे (34 वर्षे), अनन्या अतुल सोनवणे (12 वर्षे), अर्णव अतुल सोनवणे (8 वर्षे), नंदकुमार म्हात्रे (65 वर्षे), निलिमा म्हात्रे (65 वर्षे), निशांक म्हात्रे (31 वर्षे), प्रमदा पाटील (30 वर्षे), सुजन पाटील (63 वर्षे), आशा पाटील (60 वर्षे), नेहा ठाकूर (35 वर्षे), मनोज ठाकूर (39 वर्षे), विहान ठाकुर (07 वर्षे), संजय म्हात्रे (58 वर्षे), स्वाती म्हात्रे (49 वर्षे), नेत्रा भूषण पांगेरकर (37 वर्षे), भूषण इंद्रनाथ पांगेरकर (40 वर्षे), इंद्रायणी इंद्रनाथ पांगेरकर (65 वर्षे), श्लोक भूषण पांगेरकर (12 वर्षे), विहान देवेन ढोलम (05 वर्षे), गौरव सांगळे (37 वर्षे), दिपाली सांगळे (35 वर्षे), स्वाती सांगळे (40 वर्षे), वेद सांगळे (07 वर्षे), शुभ क्षीरसागर (10 वर्षे), मनाली प्रणय ठाकूर (28 वर्षे), प्रणय ठाकूर (29 वर्षे).

हेल्पलाईन क्रमांक जारी

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पहलगाम येथे आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तत्काळ 9372338827 आणि 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी.

त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी चोवीस तास मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत डेस्क स्थापित करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकेल. त्यांना काही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

दूरध्वनी क्रमांक: 0194-2483651, 0194-2457543, व्हॉट्सॲप क्रमांक: 7780805144, 7780938397 अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

दहशतवाद्यांनी हल्ला कॅमेऱ्यात केला रेकॉर्ड; AK-47 मधून सतत गोळ्यांचा वर्षाव मृत्यू झालेल्यांची संपूर्ण यादीच आली समोर

0

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पूर्ण तयारीने हा हल्ला केला. हा संपूर्ण हल्ला मुंबईवरील 26/11 हल्ल्याच्या धर्तीवर नियोजित होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पहलगामच्या जंगलात 5 ते 6 पाकिस्तानी दहशतवादी लपून बसले होते. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांनी परिसरात फिरून रेकी केली आणि योग्य वेळ साधत निष्पाप लोकांवर हल्ला केला.

हल्ल्यापूर्वी केलेली हायटेक तयारी…

गुप्तचर संस्थांनुसार, दहशतवाद्यांनी आपल्या बॅगांमध्ये सुकामेवा, औषधे आणि संपर्क साधने आणली होती. यावरून असे दिसून येते की, दहशतवादी हे एका दीर्घ कारवाईच्या तयारीने आले होते.

पहलगाममधील बेसरन हा परिसर चारी बाजूने डोंगरांनी वेढलेला आहे. ज्याच्या मधोमध एक प्रचंड मोठं गवताळ मैदान आहे. या भागात फक्त पायी किंवा घोड्यावरून पोहोचता येतं. पहलगाम शहर ते बेसरन हे अंतर 6 किमी आहे. हा संपूर्ण परिसर पर्वत आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे आणि खूप उंचावर आहे. येथे वाहनेही पोहोचू शकत नाहीत. हे पर्यटक आणि ट्रेकर्सचे आवडते ठिकाण आहे. या भागात सुरक्षा दलांची तैनाती नाही.

AK-47 मधून सतत गोळ्यांचा वर्षाव

हल्ल्यादरम्यान तीन ते चार दहशतवाद्यांनी AK-47 ने सतत गोळीबार केला. यातील दोन दहशतवादी पश्तो भाषेत बोलत होते, ज्यावरून ते पाकिस्तानी असल्याची पुष्टी होते. त्यांच्यासोबत दोन स्थानिक दहशतवाद्यांचीही ओळख पटली आहे. त्यांची नावे आदिल अहमद ठाकूर (गुरी, बिजबेहरा) आणि आसिफ शेख (मोंघामा, त्राल) अशी देण्यात आली आहेत.

पाहा हल्ल्यातील मृत आणि जखमींची संपूर्ण यादी

या हल्यात जे 26 जण मृत झाले आहेत तर 17 जण हे जखमी झाले आहेत. त्यांची आता संपूर्ण यादीच समोर आली आहे.

दहशतवाद्यांनी हल्ला कॅमेऱ्यात केला रेकॉर्ड

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक किंवा दोन दहशतवाद्यांनी बॉडी कॅमेरे देखील घातले होते, ज्याद्वारे त्यांनी संपूर्ण हल्ल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे. या फुटेजचा वापर दहशतवादी प्रचारासाठीही केला जाऊ शकतो

पर्यटकांनी सांगितले की, जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा तिथे कोणत्याही सुरक्षा दलाच्या तुकड्या हजर नव्हत्या. त्यामुळे हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना घनदाट जंगलात पळून जातं आलं. हत्याकांडानंतर दहशतवाद्यांनी जगंलात आसरा घेतला असल्याचं बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी परिसरातील मोबाइल नेटवर्क आणि सुरक्षा दलांची बॅकअप टीम कधीपर्यंत येऊ शकते या गोष्टी लक्षात घेऊनच या संपूर्ण हल्ल्याचं नियोजन करण्यात आलं होतं.

संपूर्ण देश शोकसागरात बुधवारी दुपारी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू असताना दहशतवाद्यांचा भारतीय सैन्यावर गोळीबार

0

जम्मू काश्मिर: पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २८ पर्यटकांच्या मृत्यूने अख्खा देश शोकसागरात बुडलेला असताना बुधवारी सर्च ऑपरेशनदरम्यान कुलगाममधील तंगमर्ग येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर गोळीबार केला. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील तंगमर्ग भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली आहे. संशयास्पद हालचालींबद्दल विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर, सैन्याने घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या जम्मू काश्मिरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात निष्पाप २८ नागरिकांचे जीव गेले. यात सहा महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश आहे. भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश शोकसागरात असताना बुधवारी दुपारी पुन्हा दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

नेमकं काय झालं?

पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली, असे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येते. दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील तंगमार्ग भागात गोळीबार सुरू असल्याचे वृत्त आहे. भारतीय सैन्याने बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. चिनार कॉर्प्सच्या अधिकृत निवेदनानुसार, या कारवाईत दोन अतिरेकी ठार झाले. २३ एप्रिल २०२५ रोजी, अंदाजे २-३ दहशतवाद्यांनी बारामुल्ला (उत्तर काश्मीरमधील) येथील उरी नाला येथील क्षेत्रातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, असे चिनार कॉर्प्सने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.