पुणे – ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात पुणेकरांनी आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. या वेळी नागरिकांनी नदी प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम हौद, लोखंडी टाक्या आणि मूर्ती संकलन केंद्रांना पसंती दिली.सोमवारी (ता. १४) गणपतीचे आगमन झाले असून, हा उत्सव १२ दिवस चालणार आहे. पण अनेकांच्या घरी दीड दिवसाच्या गणपतीची परंपरा आहे. त्यानुसार आज दुपारनंतर पेठांसह उपनगरांमधील नागरिक विसर्जनासाठी घराबाहेर पडले. महापालिकेकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरात २ हजार ४३३ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.
त्यापैकी ३८२ मूर्ती बांधलेल्या विसर्जन हौदांमध्ये, तर १ हजार ४७५ मूर्ती लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जित करण्यात आल्या. ५७६ नागरिकांनी मूर्ती संकलन केंद्रांकडे मूर्ती दिल्या. तर या वेळी ३ हजार ३२८ किलो निर्माल्यही जमा झाले. नागरिकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही कृत्रिम हौदात मूर्ती विसर्जनास पसंती दिली असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष वारुळे यांनी दिली.
नगररोड-वाघोली भागात सर्वाधिक ९०२ मूर्ती संकलित करण्यात आल्या. यामध्ये ५४७ मूर्ती बांधलेल्या हौदात, तर ३५५ मूर्ती लोखंडी टाक्यांत विसर्जित झाल्या. सिंहगड रस्ता परिसरात ३१५, धनकवडी-कात्रज-आंबेगावमध्ये ४३०, कोंढवा-उंड्रीत २५५, हडपसर-मांजरीत २३८, बिबवेवाडीत ११४ आणि कसबा पेठेत ८४ मूर्तींचे विसर्जन झाले.











