मुंबई : राज्यात मोसमी पावसाच्या खंडामुळे खरीप हंगाम धोक्यात आल्याने ५ ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.पंचनामे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असले तरीही टंचाई निवारणाच्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी होईल. दरम्यान, देशातून मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला पश्चिम राजस्थानातून १९ सप्टेंबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. देशभरात १ जून ते १४ सप्टेंबरदरम्यानच्या १५ टक्के पावसाची तूट तर महाराष्ट्रात हे प्रमाण १६ टक्के आहे.
मोसमी पावसाने ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये ओढ दिल्यामुळे राज्यभरातील खरीप हंगाम अडचणीत आला असून, लोकप्रतिनिधींकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यावर मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय आपत्ती निधीच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार दुष्काळी स्थितीचे पंचनामे ५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
ग्रामीण भागातील मंत्र्यांनी पावसाअभावी खरीप हंगामाची स्थिती अत्यंत बिकट असल्याचे सांगितले. महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपली आहेत. कमी दिवसांत येणारी मूग, मटकी, चवळी यांसारखी कडधान्ये पिके वाया गेली आहेत. सिंचनाची सोय नसलेल्या ठिकाणी पिकांची काढणी करून काही हाती लागेल, अशी स्थिती नाही. उसाची वाढ खुंटली आहे. उसाच्या नव्या लागणी पाण्याअभावी अडचणीत आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, अशी एकमुखी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
कर्जत, शिरुरमध्ये ४३ दिवसांपासून पाऊस नाही
यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात जूनमध्ये पाऊस सक्रिय झाला नव्हता. जुलैमध्ये चांगला पाऊस पडल्यामुळे पेरण्यांनी सरासरी गाठली. धरणे भरली. पण, ऑगस्टपासून सप्टेंबरमध्यापर्यंत पावसाने मोठी ओढ दिली आहे. एकूण २० जिल्ह्यांतील ८६ तालुक्यांत ३० दिवसांपर्यंत पावसाचा खंड पडला आहे. उत्तर महाराष्ट्रात ३१, पश्चिम महाराष्ट्रात १७, मराठवाड्यात १६, विदर्भात २२, असा एकूण ८६ तालुक्यांत पावसाचा खंड पडला आहे. आहिल्यानगरमधील कर्जत आणि पुण्यातील शिरुरमध्ये ४३ दिवसांहून जास्त खंड पडला आहे, तर खामगाव (बुलढाणा), संगमनेर (आहिल्यानगर), परांडा (धाराशिव), देवळाली, कळवण (नाशिक), इंदापूर (पुणे), फलटण (सातारा) आणि माळशिरस (सोलापूर) येथे ४० दिवस खंड पडला आहे. ३० दिवसांहून जास्त खंड पडलेले तालुके २७ असून, २५ ते ३० दिवस खंड पडलेले तालुके २६ आहेत.
कृषीमंत्री सोमवारपासून पाहणी दौर्यावर
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे सोमवारपासून मराठवड्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करणार आहेत. अकोला, वाशीम, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत पहिल्या टप्प्यात पाहाणी करतील. दुसर्या टप्प्यात अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत पाहणी करणार आहेत.राज्यात पावसाचा मोठा खंड पडला आहे. अनेक ठिकाणी महिनाभर पाऊस पडला नाही. टंचाई निवारणाच्या उपाययोजना तातडीने सुरू केल्या जातील. एनडीआरएफच्या निकषांनुसार ५ ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे पंचनामे सुरू होतील. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
पावसाच्या परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून?
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात होता. त्यामुळे काही भागांत ऑगस्टच्या तुलनेत चांगल्या पावसाची नोंद झाली.
पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागांत हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, देशातून मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला पश्चिम राजस्थानातून १९ सप्टेंबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.
सरासरी १७ सप्टेंबरला पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. १५ ऑक्टोबरपर्यंत देशातून पाऊस माघारी जातो. गेल्या वर्षी १४ सप्टेंबर रोजी मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती.











