महापालिका उपायुक्तांकडून आपला तो बाब्या अन् विरोधकाचे ते कारटं भेदभाव? राजकीय ‘आज्ञाधारी’ अधिकारी पदमुक्त करा; युवक काँग्रेसची मागणी

0
12

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांनी विविध आरोग्य कोठ्यांवर अचानक भेटी देऊन कामात कसूर करणाऱ्या सफाई सेवकांवर केलेल्या कारवाईत भेदभाव केला जात असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे यांनी केला आहे.

उपायुक्त माधव जगताप यांनी आंबील ओढा आरोग्य कोठी येथे अचानक भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. या कारवाईत तब्बल १९ कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आज्ञापत्रक काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकाच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचे नाव असल्याने त्यानंतर राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात सुरू झाली. त्यानंतर मूळ कारवाई बदलून संबंधित कर्मचाऱ्यांना केवळ नोटिसा बजावण्यात आल्याचा आरोप धाडवे यांनी केला आहे.

अधिक वाचा  बंगाल उपसागर कमी दाब पट्टा कायम राज्यात १२ जिल्हे वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज अन् पोषक वातावरण

याउलट, विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील बोंबील मार्केट आरोग्य कोठीतील ३ कर्मचारी आणि लक्ष्मी नगर आरोग्य कोठीतील ६ कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

एकाच प्रकारच्या कथित कसुरीसाठी दोन वेगवेगळे निकष का? युवक काँग्रेसचा सवाल

याबाबत बोलताना युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे म्हणाले, “मनपा कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त असलीच पाहिजे. मात्र शिस्तीच्या नावाखाली गरीब सफाई सेवकांवरच कारवाई आणि राजकीय जवळीक असलेल्या कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय, हे योग्य नाही. प्रशासनाने सर्वांसाठी समान नियम लागू केले पाहिजेत.”तसेच, केवळ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या वरिष्ठ मोकादम, आरोग्य निरीक्षक आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांच्या जबाबदारीचीही चौकशी करावी, अशी मागणी धाडवे यांनी केली आहे.

अधिक वाचा  राज्यात ८१०० रिक्त जागांसाठी पोलिसांची भरती, महाराष्ट्र पोलिस दलात नोकरी मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न होणार पूर्ण

“उपायुक्तांनी फक्त सफाई सेवकांवरच लक्ष केंद्रित न करता आपल्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्डे, अनधिकृत बांधकामे, राजकीय दबावामुळे होत असलेली अतिक्रमणे आणि टेंडरमधील कथित अनियमितता याकडेही लक्ष द्यावे,” अशी मागणीही त्यांनी केली.

आंबील ओढा आरोग्य कोठीतील कर्मचाऱ्यांवरील कारवाईमध्ये राजकीय दबावामुळे बदल करण्यात आला असेल, तर त्याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तसेच बोंबील मार्केट व लक्ष्मी नगर येथील निलंबित कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने कारवाईचा सामना करावा लागत आहे, त्याच निकषांनुसार आंबील ओढा येथील कर्मचाऱ्यांबाबतही निर्णय घ्यावा, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे.

सफाई कर्मचाऱ्यांमध्ये भेदभावाची भावना निर्माण होईल अशा पद्धतीचा कारभार सहन केला जाणार नाही. निलंबित कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेत रुजू करून न घेतल्यास युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सागर धाडवे यांनी दिला आहे.

अधिक वाचा  वारजे स्मशानभूमी ढिसाळ कारभाराचा फटका प्रतिष्ठित्यांचे विधीही ‘स्थलांतरित’ची नामुष्की; यांनीच रस्ता अडवल्याचा आरोप