पुणे : वारजे परिसरातील मुठा नदीपात्रालगत सुरू असलेल्या सेवा रस्ता आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. रस्त्याचे काम अद्याप पूर्णत्वास गेले नसल्याने अनेक ठिकाणी कच्चे रस्ते, मातीचे ढिगारे, खड्डे आणि वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. दुसरीकडे, या कामाचे श्रेय घेण्यासाठी स्थानिक पातळीवर स्थानिक नगरसेवकांची राजकीय चढाओढ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, प्रत्यक्षात काम कधी पूर्ण होणार आणि नागरिकांना दिलासा कधी मिळणार, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. वारजे नदीपात्र परिसरातील सेवा रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. काही भागात रस्त्याचे डांबरीकरण झाले असले तरी जोडरस्ते आणि अंतर्गत मार्गांची अवस्था अद्याप खराबच आहेत. नागरिकांना मुख्य रस्त्यावर ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.
रस्ता तयार होण्याआधीच नागरिकांचा त्रास वाढला
कामाच्या ठिकाणी माती व दगडांचे ढिगारे, उखडलेले मार्ग आणि पाण्याचे साचलेले डबके यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वारांसाठी विशेषतः हा मार्ग धोकादायक ठरू शकतो. रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशामुळे आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या अडथळ्यांमुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मुख्य रस्त्यालगत वाहतूक सुरू असतानाच सेवा रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीचे नियोजन आणि सुरक्षिततेचे उपाय प्रभावीपणे करण्याची गरज आहे. कामाचा कालावधी वाढत गेल्यास परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
श्रेयासाठी राजकीय फलक; काम मात्र अपूर्ण
विशेष म्हणजे, कामाच्या परिसरात विविध राजकीय जाहिरात फलक आणि श्रेय घेणारे संदेश झळकत आहेत. त्यामुळे “काम पूर्ण करण्यापेक्षा त्याचे श्रेय घेण्याची घाई अधिक आहे का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांकडून विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी प्रयत्न सुरू असताना प्रत्यक्ष कामाची गती मात्र नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे दिसत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे श्रेयवादाची लढाई बाजूला ठेवून प्रशासनाने कामाच्या गुणवत्तेला आणि वेळेत पूर्णत्वाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.
महापालिका प्रशासनाची भूमिका काय?
रस्ता आणि उड्डाणपुलाचे काम कोणत्या टप्प्यावर आहे, निर्धारित मुदत काय आहे, विलंबाचे नेमके कारण काय आणि नागरिकांना पूर्ण वाहतूक सुविधा कधी उपलब्ध होणार, याबाबत महापालिका प्रशासनाने स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे.
विकासकामांची घोषणा आणि त्याचे राजकीय श्रेय घेण्यापेक्षा काम पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित, खड्डेमुक्त आणि सुरळीत वाहतूक सुविधा देणे महत्त्वाचे आहे. वारजेकरांना सध्या आश्वासनांपेक्षा प्रत्यक्षात पूर्ण झालेला रस्ता हवा आहे.











