राज्यात ऑगस्टमध्ये पावसाची पाठ पुन्हा सप्टेंबरचीही चिंता! मराठवाडा-विदर्भ दुष्काळ सावट १७ जिल्हे अपुरा पाऊस नोंद

0
52

पुणे: राज्यात ऑगस्ट कोरडा गेला असतानाच, आता सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. 1 जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस नोंदला गेला असून, काही दिवसांत टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) सोमवारी सप्टेंबरचा हवामान अंदाज जाहीर करण्यात आला. सप्टेंबरमध्ये देशात आणि राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचे ‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी यावेळी सांगितले. डॉ. महापात्रा म्हणाले, ”ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाचा पूर्व भाग वगळता देशाच्या इतर भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता जास्त आहे. सप्टेंबरमध्ये देशात सरासरीच्या ९१ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता असून, या महिन्यातील पावसाची राष्ट्रीय सरासरी १६८ मिलीमीटर आहे. ”महाराष्ट्रातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या विभागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता सर्वाधिक असून, मराठवाडा व विदर्भात कमाल तापमान, तर कोकण व मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते.

अधिक वाचा  दुष्काळाचा मुद्दा मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा महत्त्वाचा, मुंबईला गणेशोत्सवात आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे

– डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, हवामानशास्त्र विभाग

स्थिती चिंताजनक

राज्यात जुलैमध्ये सरासरीपेक्षा ४० टक्के जास्त पावसाची नोंद झाली होती. ऑगस्टमध्ये मात्र स्थिती विरुद्ध होऊन सरासरीपेक्षा ४६ टक्के कमी पाऊस नोंदला गेला. या महिन्यात मराठवाड्यात मासिक सरासरीपेक्षा ६९ टक्के कमी, विदर्भात ५८ टक्के कमी, मध्य महाराष्ट्रात ४६ टक्के कमी, तर कोकणात ३३ टक्के कमी पाऊस नोंदला गेला. ऑगस्टमध्ये राज्यातील एकाही जिल्ह्याने पावसाची सरासरी गाठली नाही. या महिन्यात सरासरीपेक्षा ६० टक्क्यांहून कमी पाऊस झालेले जिल्हे पुढीलप्रमाणे: अहिल्यानगर, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर.

अधिक वाचा  गणेशोत्सवात मेट्रोचा मोठा धमाका! अनंत चतुर्दशीला ४१ तास सेवा अन् यंदा मध्यरात्री २ वाजेपर्यंत सेवा; वाहतूक कोंडीपासून सुटका

ऑगस्टमध्ये पावसाची ओढ का?

ऑगस्टमध्ये कमी दाबाची क्षेत्रे गुजरात, राजस्थानपर्यंत पोहचू न शकल्यामुळे मध्य आणि पश्चिम भारताला या क्षेत्रांचा लाभ मिळाला नाही. ऑगस्टमध्ये देशात सरासरीपेक्षा १६.३ टक्के पाऊस कमी नोंदला गेला. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या मध्य भारतात सरासरीपेक्षा १६.२ टक्के कमी, तर दक्षिण भारतात २७ टक्के कमी पाऊस झाला.