Home Blog Page 92

पाकिस्तानने फतेह-1 हे मिसाइलला भारताचे 6 बॅलिस्टिक मिसाइलने उत्तर, पाकिस्तानी 3 एअरबेसवर मोठे स्फोट, पाक लष्कराचा दावा

0

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढला आहे. शुक्रवारी (9 मे) रात्रीपासून पाकिस्तानने भारतातील 26 शहरांमधील नागरी भागात ड्रोन हल्ले सातत्याने करत आहे. याशिवाय पाकिस्तानने रात्री उशिरा फतेह-1 हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागलं. पण भारतीय संरक्षण यंत्रणेने ते वेळीच हवतेच नष्ट केलं. दरम्यान, यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या अनेक एअरबेसवर बॅलिस्टिक मिसाइलने हल्ला चढवल्याचा दावा करत आहे.

तथापि, भारत सरकारने अद्याप या हल्ल्याची पुष्टी केलेली नाही. दरम्यान, पाकिस्तानने भारताविरुद्ध “ऑपरेशन बनायन उल मरसूस” (एक अतूट भिंत)  सुरू केलं आहे.

यावेळी पाकिस्तानी लष्कराने दावा केला आहे की, भारताने 6 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यानंतर पाकिस्तानने त्यांचा एअरबेस बंद केला आणि NOTAM जारी केला. तथापि, भारत सरकारने अद्याप या हल्ल्याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही.

पाकिस्तानी सैन्याने काय म्हटले?

पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, भारताकडून सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. भारताने जालंधरमधील आदमपूर एअरबेसवरून ही क्षेपणास्त्रे डागली. जनरल अहमद यांनी भारताच्या या कारवाईला विरोध केला आहे आणि ते बेजबाबदार आणि अत्यंत धोकादायक म्हटले आहे. जर भारताचा हा आक्रमक पवित्रा असाच चालू राहिला तर परिस्थिती अधिक तणावपूर्ण होईल असंही त्यांनी म्हटलंय.

पाकिस्तानी हवाई तळावर स्फोट

भारताने तीन हवाई तळांवर हल्ला केल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. रावळपिंडी, इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये अनेक मोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. ज्यांचे पडसाद दूरवर जाणवले, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि ते घराबाहेर पडले.

पाकिस्तानातील रावळपिंडी येथील नूर खान एअरबेसजवळ स्फोट झाला आहे. पंजाब प्रांतातील झंग, शोरकोट येथील रफीकी एअरबेसजवळ स्फोट झाला आहे. चकवालमधील मुरीद बेसजवळही स्फोट झाल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केले

भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आता आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. रावळपिंडी आणि रफीकी हवाई तळांवर झालेल्या स्फोटांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पाकिस्तानकडून थेट दिल्लीवर पहाटे ‘मिसाईल अटॅक’, तुमच्या शहरात हल्ला झाला तर काय करावं? सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

0

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमाभागावर सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. पाकिस्तानकडून काल भारताच्या 15 शहरावर हल्ल्याचा प्रयत्न केला गेला. तर आज दिल्लीसह 5 शहरांवर मिसाईल अटॅक करण्यात आला होता. मात्र, इंडियन एअर फोर्सने हा हल्ला यशस्वीरित्या परतवून लावलाय. पाकिस्तानने थेट दिल्लीला टार्गेट केल्याने आता मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. मात्र, नागरिकांनी भयभीत न होता, संयमाने सामना केला. मात्र, जर आता तुमच्या शहरावर हल्ला झाला तर तुम्ही काय काय केलं पाहिजे? जाणून घ्या सरकारकडून आलेल्या महत्त्वाच्या सूचना…

धोक्याच्या क्षेत्रात हवाई हल्ल्याचे सायरन

शत्रूचे क्षेपणास्त्र असो किंवा लढाऊ विमान… जर त्यांनी भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असेल, तर भारतीय हवाई दलाची रडार प्रणाली ताबडतोब ते शोधून काढतात. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून सैन्याला त्वरित कारवाई करण्याची परवानगी मिळते. एकदा धोका ओळखला गेला की, क्षेपणास्त्राचा मार्ग आणि वेग यांचे विश्लेषण केले जाते आणि संभाव्य लक्ष्य क्षेत्रांचे नकाशे तयार केले जातात. हल्ला अपेक्षित असण्याच्या काही सेकंद आधी, नागरिकांना सावध करण्यासाठी आणि आश्रय घेण्यासाठी धोक्याच्या क्षेत्रात हवाई हल्ल्याचे सायरन वाजवले जातात. दरम्यान, वायुसेना जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रे आणि इतर संरक्षण प्रणाली वापरून येणाऱ्या धोक्याला निष्प्रभ करण्यासाठी इंटरसेप्शन सिस्टम सक्रीय करते.

तुमच्या शहरावर एअरस्ट्राईक झाला तर तुम्ही करावं?

जेव्हा एखादा मोठा धोका उद्भवणार असतो. जसे की हवाई हल्ला किंवा क्षेपणास्त्र हल्ला, तेव्हा सायरन वाजवला जातो. एअर सायरन रेड अलर्ट देताच, गर्दीच्या ठिकाणांपासून ताबडतोब सबवे किंवा भुयारी मार्गात आश्रय घ्यावा. मोठ्या शहरांमध्ये बांधलेले भुयारी मार्ग हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. त्यामुळे भुयारी मार्गाला फार धोका नसतो, रॉकेट किंवा क्षेपणास्त्रांचा परिणाम होत नाही. हवाई हल्ला झाल्यास, जर तुम्ही मोकळ्या जागेत असाल तर ताबडतोब कमी उंचीच्या उड्डाणपुलाखाली किंवा सबवेखाली आश्रयला जा. जर तुम्ही इमारतीच्या आत असाल तर लाल सायरन वाजताच मुख्य प्रवेशद्वारापासून दूर जा.

ताबडतोब सुरक्षित ठिकाणी जावं

इमारतीच्या कोणत्याही भागात जिथे फक्त एकच थर असलेली भिंत असेल किंवा जिथे सर्व बाजूंनी खिडक्या असतील तिथे उभे राहू नका. इमारतीच्या त्या भागात जावे जिथल्या भिंती अतिशय मजबुत आहेत, आश्रयासाठी बाथरूम किंवा पायऱ्यांखालील जागा सुरक्षित मानली जाते. सायरनच्या आवाजात होणारी वाढ आणि घट ही एक धोक्याची सूचना म्हणून काम करते. जेव्हा सायरन 1 ते 3 मिनिटे वाजतो तेव्हा लोकांनी ताबडतोब सुरक्षित ठिकाणी जावे. सायरनचा एकच आवाज, जो वर किंवा खाली येत नाही आणि सुमारे एक मिनिट टिकतो, त्याचा अर्थ असा की धोका टळला आहे आणि आता बाहेर पडणे सुरक्षित आहे.

सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा

दरम्यान, सायरन वाजताच घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक आणि गॅस उपकरणे, वीजेसह, बंद करा. सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करा. अन्न, पाणी आणि प्रथमोपचार साहित्यासह आपत्कालीन किट तयार ठेवा. अफवांवर लक्ष देऊ नका आणि फक्त सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा.

भारत सरकारची भूमिका ठरली ‘आमच्या अटी मान्य करा अन्यथा…’ भारताचं ठरलं, पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा

0

नवी दिल्ली : दहशतवाद्यांवर भारताने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून आगळीक करत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाची स्थिती आहे. तर, आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित संरक्षण अधिकाऱ्यांच्या स्वतंत्रपणे बैठका पार पडल्या. पंतप्रधान मोदी यांनी देखील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी चर्चा केली. भारत सरकारने आपली भूमिका ठरवली असून पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. हे ऑपरेशन अद्याप संपले नाही. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर बिथरलेल्या पाकिस्नाकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जोरदार गोळीबार केला. पाकिस्तानकडून डागण्यात आलेले ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावण्यात आले. पाकिस्तानच्या सगळ्या प्रकारच्या आगळीकीला भारतीय सुरक्षा दलाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

भारताचं पाकिस्तानबाबत काय ठरलं?

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असतानाच, भारताने पाकिस्तानला थेट आणि स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे . “तणाव लवकरात लवकर कमी करा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे भारताने सुनावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता तरी पाकिस्तानने “शहाणपणाचा मार्ग” निवडावा आणि त्यांच्या देशातून दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यावर लक्ष केंद्रित करावं, अशी भूमिका भारताने घेतली आहे. “दहशतवाद ही या सगळ्या संघर्षाची मुळं आहेत आणि ती मुळासकट उपटणं हेच खरे समाधान आहे,” असा स्पष्ट संदेश भारताने दिला आहे.

भारताने केलेली कारवाई ही दहशतवाद्यांविरोधात होती, कोणत्याही पाकिस्तानच्या लष्करी तळावर किंवा सामान्य नागरिकांवर नव्हे, हे देखील यावेळी ठामपणे सांगण्यात आलं. भारतीय लष्कराने अत्यंत अचूक आणि टप्प्याटप्प्याने योजना आखत ही कारवाई केली असून, यात वापरलेली तंत्रज्ञानही पूर्णतः देशी आहे, असं सरकारच्या सूत्रांनी सांगितलं.

पाकिस्तानकडूनच युद्धजन्य परिस्थिती

दरम्यान, पाकिस्तानमधील काही मंत्री आणि नेत्यांकडून सुरू असलेली भीती आणि अफवांची लाट, ही केवळ स्थानिक जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठीचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया भारताकडून आली आहे. “पाकिस्तान सरकार आणि लष्कर आता प्रचंड दबावाखाली आहेत असल्याचे भारताचे मत आहे. पाकिस्तानमध्ये महागाई, बेरोजगारी, PTI समर्थकांचा विरोध, अशा वेगवेगळ्या कारणांनी सगळीकडे असंतोष आहे. त्यामुळे लोकांचे लक्ष हटवण्यासाठी आणि रोष कमी करण्यासाठी पाकिस्तानी सत्ताधारी, लष्कराकडून युद्धजन्य वातावरण तयार करत आहेत,” असा आरोप भारताकडून करण्यात आला आहे.

ते दहशतवादी सोपवा, भारताची मागणी…

भारताने पाकिस्तानकडून हाफिज सईद, मसूद अझहर आणि रऊफ अझगर यांचं तात्काळ भारताकडे प्रत्यार्पण करण्याची मागणी पुन्हा एकदा उचलून धरली आहे. “दहशतवाद्यांना आश्रय देणं बंद करा, ‘प्रॉक्सी वॉर’ थांबवा आणि शेजारधर्म पाळा,” असा सक्त इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.

पाकिस्तानमध्ये सध्या गंभीर आर्थिक संकट, आंतरराष्ट्रीय कर्जाचा डोंगर, आणि राजकीय अस्थिरता आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने आपला देश सावरण्यावर लक्ष केंद्रीत करावं, अशी भारताची भूमिका आहे.

हल्ला होण्यापूर्वी नेमका सायरन कधी वाजतो?; जीव वाचण्यास किती वेळ? सायरनचं कामं नेमकं कसं असतं?

0

सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने ७ मे रोजी देशव्यापी मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले होते. या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वत:चा बचाव करायचा याचं प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी काही सायरन देखील वाजवण्यात आले. सायरन वाजल्यावर किंवा ज्यावेळी युद्धजन्य परिस्थिती असेल त्यावेळी सायरन वाजल्यास काय करावे? याचे प्रशिक्षण देण्यात आले.

नुकत्याच झालेल्या मॉक ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन देखील वाजवण्यात आला. हा सायरन वाजवण्याचा उद्देश म्हणजे नागरिकांना हवाई हल्ल्यासारख्या परिस्थितीत आपला जीव कसा वाचवायचा हे शिकवणं असा होता. मात्र तुम्हाला माहितीये का, मिसाईल अॅटक, एअर स्ट्राईक होण्यापूर्वी कधी वाजवला जातो सायरन? आणि स्वतःला जीव वाचण्यासाठी किती मिळतो वेळ? चला जाणून घ्या…

हल्ला होण्यापूर्वी कधी वाजतो सायरन?

समजा जेव्हा हवाई हल्ल्याचा धोका निर्माण होतो तेव्हा नागरिकांना सतर्क आणि सुरक्षिततेचा इशारा दिला जातो. यासाठी एक महत्त्वाची यंत्रणा सज्ज असते, ती म्हणजे एअर रेड सायरन. एअर रेड सायरनचा आवाज एका विशिष्ट प्रकारचा असतो. हा सायरन जेव्हा वाजवला जातो तेव्हा मिसाईल अॅटक, एअर स्ट्राईकचा धोका असतो. कधीकधी नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही हा सायरन वाजवला जातो. हल्ला होण्यापूर्वी साधारण हा सायरन ६० सेकंदापर्यंत वाजतो. या सायरनचा अर्थ असा की लोकांनी सुरक्षित स्थळी धाव घेण्याची गरज आहे. आजही विमानतळांवर आणि हवाई दलात हवाई हल्ल्याचे सायरन वाजत असल्याचे ऐकायला मिळते.

सायरनचं कामं नेमकं कसं असतं?

हल्ला करताना ज्यावेळी शत्रूच्या बाजूने कोणतेही रॉकेट, लढाऊ विमान किंवा क्षेपणास्त्र आपल्या देशाच्या हवाई क्षेत्रात एन्ट्री करतात तेव्हा हवाई दलाचे रडार लगेच ते पकडते आणि यावरून आपल्याला शत्रूबद्दल माहिती मिळते. शत्रू देशाने डागलेल्या क्षेपणास्त्राची दिशा आणि त्याचा वेग लक्षात घेऊन हल्ल्याच्या संभाव्य भागात रेड अलर्ट जारी केला जातो. यामुळे, हल्ल्याच्या संभाव्य ठिकाणी काही वेळ आधीच सायरन वाजवला जातो आणि लोकांना फक्त एक मिनिटभर स्वतःला जीव वाचण्यासाठी वेळ मिळतो.

भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL स्थगित, उर्वरित सामने केव्हा होणार? Bcci कडून मोठी अपडेट

0

भारत-पाकिस्तान यांच्यात गेल्या 2 दिवसांपासून एकमेकांवर ड्रोन हल्ले सुरु आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील या वाढत्या तणावाचा परिणाम क्रिकेट स्पर्धांवरही झाला आहे. दोन्ही देशातील आयपीएल (IPL 2025) आणि पीएसएल (PSL 2025) स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमातील उर्वरित सामने हे आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित सामने केव्हा होणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आता या उर्वरित सामन्यांच्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

आयपीएलचा 18 वा मोसम सुरक्षिततचेच्या कारणामुळे स्थगित करण्यात आला आहे. या मोसमातील 57 सामने यशस्वीरित्या खेळण्यात आले. मात्र 8 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील सामना हा फलड्स लाईट्समुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर आता उर्वरित सामने आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती आयपीएलकडून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण 16 सामने होणं बाकी आहेत. हे सामने केव्हा होणार? याबाबतची अपडेट जाणून घेऊयात.

बीसीसीआय उपाध्यक्ष काय म्हणाले?

“आयपीएलचा 18 वा मोसम एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यानंतर सद्य परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर संबंधित यंत्रणांसह चर्चा केली जाईल. त्यानंतर स्पॉन्सर, फ्रँचायजी आणि ब्रॉडकास्टर्ससह चर्चा करुन उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल”, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली.

पाकिस्तानशी लढताना मुंबईतील जवानाला वीरमरण; मुख्यमंत्र्यांची ट्विटद्वारे श्रद्धांजली कुटुंबियांना अश्रू अनावर

0

पाकिस्तानने पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने त्याचं उत्तर म्हणून पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. त्यानंतर पुन्हा पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्याने भारताने उत्तराखातर पाकिस्तानच्या मुख्य शहरांना टार्गेट केलं. आता भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं असून दोन्हीकडून गोळीबार सुरू आहे. भारताने पाकिस्तानला दणका देत त्यांचे ड्रोन्सदेखील पाडले. पाकिस्तानी चौक्या उध्वस्त केल्या. पाकिस्तानच्या कुरापतींना उत्तर देताना भारताने त्यांना सळो की पळो कारून सोडलंय. मात्र या युद्धात भारताचे दोन जवान धारातीर्थी पडलेत. युद्धात भारताच्या आणखी एक जवानाला वीरमरण आलं आहे.

भारताने आणखी एक सुपुत्र गमावला

यापूर्वी पाकिस्तानने पूछ येथे केलेल्या हल्ल्यात जवान दिनेश शर्मा यांना वीरमरण आलं होतं, पाकिस्तानच्या गोळीबारात ते जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला. देशासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं. आता भारताच्या आणखी एका जवानाला वीरमरण प्राप्त झालं आहे. मुंबईतील घाटकोपर येथील कामराजमगर येथे राहणाऱ्या मुरली श्रीराम नाईक या जवानाचं जम्मू काश्मीरजवळ झालेल्या गोळीबारात निधन झालं आहे. शहिद मुरली नाईक हे मूळचे आंध्रप्रदेश येथील रहिवासी होते.

आज ९ मे रोजी पहाटे ३ वाजता मुरली नाईक यांना वीरमरण आलं. मुरली नाईक हे आपल्या कुटुंबासोबत घाटकोपर येथील कामराज नगर येथे राहत होते. त्यांचे घर पुनर्विकासात गेल्याने त्यांचं कुटुंब सध्या आंध्रप्रदेश येथे राहण्यास गेले आहेत. आता मुरली यांच्या निधनाची बातमी ऐकताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर घाटकोपर येथे त्यांचे बॅनर लावले आहेत. त्यांना स्थानिक आणि मित्रपरिवाराकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. नाईक हे सत्यसाई जिल्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवासी होते. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करत शहिद मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कोथरूडला चौकात भीमसैनिकाचे फलक; …आमचं जगणं मान्य करा! समाजवस्तीवर समाजकंटक पुढाऱ्यांचा अन्याय नको

0

कोथरूड पुणे महापालिकेचे अत्यंत आखीव- रेखीव विकसित झालेलं उपनगर म्हणून याकडे पाहिले जात असले तरीसुद्धा या कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये रखडलेल्या रस्त्यांबाबत विद्यमान आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी बैठक घेतली आणि याच बैठकीचा फायदा घेत भीमनगर विकास आराखड्यातील रस्ता या दोन वर्षांपूर्वी बंद झालेल्या विषयाला पुन्हा लागेबांधे असलेल्या चमूने पुन्हा सुरुवात करत या परिसरामध्ये प्रस्ताव अधिग्रहणासाठी कारवाई करण्यासाठी नोटीस लावल्या आहेत. पुणे झोपडपट्टी निर्मूलन विभाग आणि पुणे महापालिका यांच्या वतीने या वस्तीमध्ये दौरे वाढल्यानंतर भयभीत झालेल्या भिमनगर झोपडप‌ट्टी धारक रहिवाशांनी या भागामध्ये फलक लावत संपूर्ण प्रकरणाची माहिती जगजाहीर केली आहे.

एरंडवणे स. न.४१/४, ४५, ४६/७ शिला विहार कॉलनीतील रस्ता करण्यासाठी  दि. १४/०८/२०२४, दि. १०/०३/२०२५ व दि. १७/०३/२०२५ रोजी नोटीस देऊन घोषित झोपडपट्टी धारकांना घरी खाली करण्यास सांगण्यात आले आहे. या भागात राहत असलेले झोपडप‌ट्टीधारक हे महाराष्ट्र शासनाने गलिच्छ वस्ती निर्मुलन द्वारे घोषित असून स. न. ४१/४, ४५, ४६/७ शिला विहार कॉलनी, कोथरूड, पुणे येथील ७/१२ चे उताऱ्यावर कब्जेदार म्हणुन नोंदीही आहेत. शासनाच्या नियमानुसार ‘भक्ती एंटरप्राईजेस’  दाखल प्रस्तावास वेगवेगळ्या झोपडप‌ट्टी धारकांनी लेखी हरकती नोंदविलेल्या आहेत.  भक्ती एंटरप्राईजेस या संस्थेने आहे त्या जागेवरतीच शिला विहार कॉलनी मध्येच इमारतीचे बांधकाम करण्याचे अमिष दाखवुन झोपडप‌ट्टी धारकांचा विश्वास संपादन करून करारनामे व प्रतिज्ञापत्राद्वारे लेखी संमती घेतली आहे. भक्ती एंटरप्राईजेस या संस्थेने चांगल्या सोयी सुविधा तसेच इमारत बांधकाम होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात इतरत्र राहण्यास घरभाडे डिपॉझीटची रक्कम देणार असल्याचे मान्य केल्यामुळे त्यांचे समवेत करारनामे व प्रतिज्ञापत्र करून दिलेले होते. परंतु पुणे महापालिकेतील नगरसेवकाला हाताशी धरून आर्थिक उलाढालीकरून कार्यक्षेत्रापासुन ७ ते ८ कि.मी. पुणे शहरापासून लांब इमारत बांधुन राहाण्यास तसेच व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायासाठी जागा देत असल्याचा प्रस्ताव दाखल केला. या नगरसेवकाविरूद्ध पुणे महानगरपालिका व झोपडपट्टी पुनर्विकास कार्यालयाकडे तकारी केलेल्या होत्या परंतु या तकारीची दखलही घेतली नाही. भक्ती एंटरप्राईजेस यांनी बेकायदेशीरपणे पुनर्वसनाची योजना राबवत झोपडपट्टी पुनर्वसन गैरपद्धतीने मंजुर करून घेऊन त्याची अंमल बजावणी केल्याने या भागातील विकास आराखड्यातील रस्ता आणि झोपडपट्टी पुनर्वसन हे दोन्हीही प्रश्न गंभीर बनले विद्यमान आमदार महाराष्ट्र राज्य चे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ‘मिसिंग लिंक’बाबत पुन्हा एकदा सक्रिय भूमिका घेतल्यानंतर याचा फायदा उठवण्यासाठी पुन्हा एकदा हा समाजकंटक ‘चमू’सक्रिय झाला आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे. मुळात सदरील योजना राबविताना एएसआरए(ASRA) भक्ती एंटरप्राईजेस या भागिदारी संस्थेने तसेच पुणे महानगरपालिकेची दिशाभुल करून योजना मंजुर करून घेताना कायद्याचे व नियमांचे उल्लंघन केल्याने कठोर कारवाई होणे आवश्यक असताना प्रशासकीय अधिकारी मात्र पुन्हा झोपडपट्टी धारकांवरतीच अन्याय करत असल्याने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील चौकांमध्ये समाज बांधवांच्या वतीने निषेध करण्यासाठी फलक लावले आहेत.

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन मध्ये योग्य ती दखल घेऊन भक्ती एंटरप्राईजेस या भागिदारी संस्थेने विकासक यांचे विरूद्ध असा भा.द.वि कलम ४२०, ४६७,४३८,४७१, (३४) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता. योग्य ती कागदपत्रांच्या सबळ पुरावा गोळा करून त्यांचे विरूद्ध चार्जशिट दाखल केलेली आहे. पौड फाटा ते थोरात उद्यान या नवीन डीपी रोडची अंतर रूंदी मर्यादा १८ मिटर होती, पौड फाटा ते अरमान इमारत पर्यंत योग्य आहे तसेच गोपाल विहार इमारत ते थोरात उद्यान पर्यंत रोडची रूंदी मर्यादा योग्य आहे पण भिमनगर वस्तीमध्ये रोडची रूंदी मर्यादा जास्त करून झोपडप‌ट्टीधारकांना चुकीच्या पद्धतीने दिशाहीन(बेघर) करून वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्वसन प्रकल्पामध्ये स्थलांतरीत केले आहे. वस्तीतील ‘बौद्ध विहार’ रस्ताबाधित होत नसतानाही पाडून सामाजिक तेढ निर्माण केला. गणेश मंदीर, श्रीकृष्ण मंदीर हे मंदीर देखील पाडण्यात आले. या दोन्ही मंदीरासाठी पिंपळाच्या झाडाशेजारी नविन बांधण्यास जागा उपलब्ध होती तरी विकासकाने वस्तीमधील रोडलगतची घरे पाडुन तेथे गणेश मंदीर, श्रीकृष्ण मंदीर, बौद्ध विहार बांधले व तेथील झोपडप‌ट्टी धारकांना पुनर्वसन प्रकल्पातील ७व्या मजल्यावर विस्थापित केले. वसुधा हिताशा या इमारतीत स्थलांतरीत प्रकल्पग्रस्तांना स्वःताची मालकी हक्काची घरे मिळतील असे सांगुन स्थलांतरीत केले. भक्ती एंटरप्राईजेस या विकासकाने पुनर्वसन प्रकल्पामध्ये वस्तीमधील काहीना एजंट नेमून खोट्या (तोतया) लोकांना गावाकडून व इतर स्थानावरून बोलावून त्यांचे खोटे आधारकार्ड, रेशनकार्ड, तात्पुरत्या स्वरूपाचा लाईट मिटर व चाळीमधल्या रिकाम्या जागेत छोट्या झोपडया बांधुन व घराला अतिरिक्त दारे पाडुन व त्यांना झोपडपट्टीचे सदस्य दाखवून पुनर्वसन धारकांची संख्या पुनर्विकासकाने वाढविली आहे.

पुणे महानगरपालिकेचे वसाहत अधिकारी यांनी वस्तीबाहेरील लोकांना पात्रता दाखवुन व त्यांचे खोटे पुरावे तयार करून व त्याच्याकडुन प्रत्येकी ३ लाख रूपये लाच घेवून एसआरए प्रकल्पामध्ये घर दिले व त्यांची फसवणुक केली असून अनेक नियमबाह्य व बेकायदेशीर पद्धतींचा वापर करून विस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा ही आरोप लेखी तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर Indian Railway अलर्टवर; ब्लॅकआउट, इमरजन्सीनंतर अनेक ट्रेन रद्द

0

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कर्मचाऱ्यांना एक महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाने सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाकिस्तान गुप्तचर यंत्रणा भारतीय सैन्य रेल्वेची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर ब्लॅकआउट आणि इमरजन्सीची स्थिती पाहता भारतीय रेल्वेने अनेक ट्रेन रद्द केल्या आहेत. काही ट्रेन रीशेड्युलदेखील केल्या आहेत. या रेल्वेची एक यादी पाहुयात.

रेल्वे बोर्डाकडून करण्यात आलेल्या निवेदनानुसार, सैन्याच्या विशेष रेल्वेगाड्यांबद्दलची माहिती उघड करू नका. ही माहिती उघड करणे हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरू शकतो, असा संदेश रेल्वे बोर्डाकडून सर्व रेल्वे विभागांच्या प्रमुख मुख्य संचालन अधिकाऱ्यांना हा संदेश पाठवण्यात आला आहे. तसंच, कोणत्याही अननोन कॉल्स आणि संदेशांला रिप्लाय देऊ नये. याची माहिती लगेचच वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांना दिलेले आदेश

अननोन नंबरवर आलेल्या कॉलपासून सतर्क राहा

सैन्याच्या रेल्वे गाड्याबाबत माहिती उघड करू नका

कोणत्याही अननोन फोनचा संपर्क झाल्यास लगेच रिपोर्ट करा.

संचार प्रोटोकॉलचा पालन करणे गरजेचे

याशिवाय, रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ब्लॅकआउट आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे काही रेल्वे सेवांवर परिणाम होईल अशी माहिती उत्तर पश्चिम रेल्वेने दिली आहे. या परिस्थितीमुळे, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेतच, परंतु काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही 9 मे 2025 रोजी सहलीचे नियोजन करत असाल तर काळजीपूर्वक विचार करा. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शशी किरण म्हणाले की, सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेच्या कामकाजात बदल करण्यात आले आहेत. ब्लॅकआउट परिस्थिती आणि आपत्कालीन व्यवस्थेमुळे, रेल्वेला काही गाड्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द कराव्या लागल्या आहेत आणि काही गाड्यांचे वेळापत्रक बदलावे लागले आहे.

या गाड्या 9 मे 2025 रोजी धावणार नाहीत.

ट्रेन क्रमांक 14895 – भगत की कोठी ते बाडमेर रद्द

ट्रेन क्रमांक 14896 – बारमेर ते भगत की कोठी रद्द

ट्रेन क्रमांक 04880 – मुनाबाव ते बाडमेर रद्द

ट्रेन क्रमांक 54881 – बाडमेर ते मुनाबाओ रद्द

या गाड्या उशिराने धावतील.

गाडी क्रमांक 14807 – जोधपूर ते दादर एक्सप्रेस 9 मे रोजी जोधपूर येथून 05.10 ऐवजी 08.10 वाजता (3 तास उशिराने) निघेल.

ट्रेन क्रमांक 14864 – जोधपूर ते वाराणसी सिटी एक्सप्रेस 9 मे रोजी जोधपूर येथून 08.25 ऐवजी 11.25 वाजता (3 तास उशिराने) निघेल.

भारतीय विद्यार्थ्यांसाठी Alert… सर्वात कठीण परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; केलं ‘हे’ आवाहन

0

भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा तणाव शिगेला पोहचला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये 8 मे च्या रात्री हवाई हल्ल्यांच्या भितीने संपूर्ण ब्लॅक आऊट पाळण्यात आला. भारत सरकारकडून या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. याच युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने शिक्षण क्षेत्रासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतातील सर्वात कठीण परिक्षांपैकी एक असलेली चार्टर्ड अकाउंटंट्सची परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

…म्हणून पुढे ढकलण्यात आल्या परीक्षा
भारतामधील चार्टर्ड अकाउंटंट्ससंदर्भातील नियम करणाऱ्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’कडून महत्वाची घोषणा करणारं पत्रकच जारी करण्यात आलं आहे. देशातील तणावपूर्ण परिस्थिती आणि सुरक्षेसंदर्भातील चिंता तसेच सध्याच्या घडामोडी लक्षात घेत ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ने सीए फायनलच्या परीक्षांचे पेपर पुढे ढकलले आहेत. सीए फायनल्सबरोबरच इंटरमीडिएट आणि पीक्यूसी परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ने घेतल्याचं पत्रकातून स्पष्ट केलं आहे.

या तारखांचे पेपर पुढे ढकलले
नियोजित वेळापत्रकानुसार ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’कडून घेण्यात येणाऱ्या या परीक्षा 9 मे 2025 ते 14 मे 2025 दरम्यान घेतल्या जाणार होत्या. मात्र या सर्वच परीक्षा आत पुढे ढकलण्यात येत असल्याचं ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ने जाहीर केलं आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’चे सह-सचीव सीए आनंद कुमार चतुर्वेदी यांच्या नावाने विद्यार्थ्यांसाठी सूचना देणारं पत्रक जारी करण्यात आलं आहे.

भारताचा कुरापतीखोर पाकिस्तानला धडा, अमेरिका का म्हणाला थँक यू इंडिया !

0

भारतीय हल्ल्यामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. आता तर पाकिस्तानच्या अर्थखात्याने चक्क जगभरात कटोरा फिरवला आहे. जगातील मित्र राष्ट्रांकडे त्यांनी आर्थिक मदत मागितली आहे. दुसरीकडे भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदला चांगलाच दणका दिला. दहशतवादी अब्दुल रऊफ अझहर या हल्ल्यात मारला गेला. तो दहशतवादी मसूद अझहर याचा भाऊ होता. भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये तो मारल्या गेला. अब्दुल रऊफ अझहर हा जैशचा वरिष्ठ कमांडर होता. कंधार विमान अपहरण प्रकरणात त्याचा हात होता. त्यात मसूद अझहर याला सोडावे लागले होते. त्यानेच पुढे मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता.

मसूदच्या भावाचा भारताने खात्मा केल्याने अमेरिकेतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. अमेरिकेच्या प्रशासनातील माजी अधिकारी आणि मुत्सद्दी एली कोहेनिम यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तानला ही सणसणीत चपराक मानण्यात येत आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी भारताचे आभार मानले आहे.

भारताच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची पोस्ट काय?

अमेरिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि मुत्सद्दी एली कोहेनिम यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे. त्यांनी भारताच्या पीएमओ कार्यालयाला ही पोस्ट टॅग केली आहे. त्यात दीर्घ काळापासून डेनियल पर्लसाठी आम्ही न्यायाच्या प्रतिक्षेत होतो. त्याला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे मारले होते. मी वैयक्तिक पातळीवर भारताचे आभार मानते. डॅनियल पर्लचे अखेरचे शब्द आम्हाला लक्षात आहे. तो म्हणाला होता की, माझे वडील यहुदी आहे. माझी आई यहुदी आहे. मी पण यहुदी आहे. आपले शब्द अखेरपर्यंत इतिहासात कायम राहतील. मसूद अझहरच्या भावाला भारताने टिपल्याने त्यांनी वैयक्तिक पातळीवर धन्यवाद म्हटले आहे. इस्त्रायलमधील प्रमुख वृत्तपत्र द येरूशलम पोस्ट याने हे वृत्त ठळकपणे अधोरेखित केले आहे

पाकिस्तानी लष्कर तळावर हल्ले

पाकड्यांनी भारतीय सीमालगतच्या शहरांना टार्गेट केल्यानंतर आज भारताने सकाळपासूनच पाकिस्तानमधील अनेक शहरांवर हल्ले चढवले. नागरी भाग सोडून लष्करी तळावर भारताने हल्ले केला. मुझ्झफराबादमधील लष्करी तळ भारताने पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. या ड्रोन हल्ल्यात हा तळ बेचिराख झाला. तर 1971 नंतर पहिल्यांदाच भारताने कराचीतील बंदरावर ताबडतोब हल्ला चढवला आहे.