Home Blog Page 91

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये ठार झालेल्या 5 दहशतवाद्यांची कारस्थानं पाहून तुम्हीही म्हणालं, ‘बरं झालं संपवलं’

0

भारताने 6 आणि 7 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणांवरील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारताने या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव दिलं असून या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तैयबा,  जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांमधील अनेक धोकादायक दहशतवाद्यांचा समावेश आहे. याच ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या नावासंदर्भात मोठा खुलासा समोर आला आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार मयत दहशतवाद्यांचा भारताविरोधातील अनेक कारवायांमध्ये सहभाग होता.

7 मे रोजी पाकिस्तानमध्ये झालेल्या भारतीय हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांचा तपशील खालीलप्रमाणे:

1) मुदस्सर खादियान खास उर्फ मुदस्सर उर्फ अबू जुंदाल

संघटना: लष्कर-ए-तैयबा

मरकझ तैयबा, मुरीदकेचा प्रभारी होता.

पाकिस्तानी लष्कराने त्यांच्या अंत्यसंस्कारात गार्ड ऑफ ऑनर दिला.

पाकिस्तानी लष्करप्रमुख आणि पंजाबच्या मुख्यमंत्री (मरियम नवाज) यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.

जमात-उद-दावाच्या हाफिज अब्दुल रौफ (जागतिक दहशतवादी म्हणून घोषित दहशतवादी) यांच्या नेतृत्वाखाली सरकारी शाळेत त्यांचा दफनविधी पार पडला.

पाकिस्तानी लष्कराचे एक सेवेत असलेले लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे इस्पेक्टर जनरल मुदस्सर खादियान खासच्या प्रार्थना समारंभाला उपस्थित होते.

2) हाफिज मुहम्मद जमील

संघटना: जैश-ए-मोहम्मद

हाफिज मुहम्मद जमील मौलाना मसूद अझहरचा ज्येष्ठ मेहुणा होता.

बहावलपूरमधील मरकझ सुभानअल्लाहचा प्रभारी म्हणून तो कार्यरत होता.

तरुणांना कट्टरपंथी शिकवण आणि जैश-ए-मोहम्मदसाठी निधी संकलनात सक्रिय सहभाग होता.

3) मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्तादजी उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहब

संघटना: जैश-ए-मोहम्मद

मौलाना मसूद अझहरचा मेहुणा होता.

जैश-ए-मोहम्मदसाठी शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतले होते.

जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता.

आयसी-814 अपहरण प्रकरणात वॉन्टेड दहशतवादी होता.

4) खालिद उर्फ अबू आकाश

संघटना: लष्कर-ए-तोयबा

जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता.

अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यातही त्याचा सहभाग होता.

फैसलाबादमध्ये अबू आकाशवर अंत्यसंस्कार पार पडले, ज्यात वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते.

5) मोहम्मद हसन खान

संघटना: जैश-ए-मोहम्मद

मोहम्मद हसन खान हा पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरीचा मुलगा होता.

जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचे समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका मोहम्मद हसन खानकडे होती.

ऑपरेशन सिंदूरविरोधी पोस्ट,  नागपुरात मुक्त पत्रकाराला अटक

0

भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केल्याचं म्हटलं आहे. हे ऑपरेशन करणाऱ्या भारतीय सैन्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या केरळच्या एका मुक्त पत्रकाराला नागपुरात अटक करण्यात आली आहे. देशविरोधी कारवाई केल्याचा आरोप त्यांच्यावर असून त्यांना 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर इतरही आरोप आहेत. नागपुरातील लकडगंज पोलिसांनी एका हॉटेलमधून त्यांना अटक केली. त्यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट करण्याशिवाय त्यांच्यावर इतरही काही आरोप होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेजाज एम. शिबा सिदीक असं या 26 वर्षीय मुक्त पत्रकाराचं नाव आहे.

ते केरळमधल्या एडापल्लीचे रहिवासी आहेत. तसंच डेमोक्रेटीक स्टुडंट असोसिएशनचे सदस्यही आहेत. “मकतूब मीडिया” या केरळमधील न्यूज वेबसाईटसाठी ते लिहितात. तो काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका परिषदेत सहभागी होण्यासाठी ते गेले होते. त्यानंतर केरळला जायला निघाले. पण, त्याआधी मैत्रिणीला भेटायला नागपुरात आले होते.

गेल्या तीन दिवसांपासून ते नागपुरात मारवाडी चौकातील एका हॉटेलमध्ये राहत होते. गुरुवारी 8 मे रोजी मैत्रिणीसोबत याच हॉटेलमध्ये असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्या मैत्रिणीलाही ताब्यात घेतलं होतं. पण, नंतर तिला सोडून देण्यात आलं. ती बिहारची रहिवासी असून नागपुरातल्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिकते. दोघांची इंस्टाग्रामवर दीड महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर तिला भेटण्यासाठी ते नागपुरात आले होते.

लष्कराबाबत आक्षेपार्ह पोस्ट?

भारतीय सैन्यानं 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केल्याचं सांगितलं. रेजाजने त्याविरोधात इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. एका लहान मुलीचा फोटो शेअर करत त्यानं पोस्ट लिहिली होती. यात भारतीय लष्कराबाबत आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली होती, अशी माहिती एफआयआरमधून समोर आली आहे.

तसंच त्यांनी इतरही काही पोस्ट केल्या होत्या. त्यापैकी एका पोस्टमध्ये छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्याविरोधातील ऑपरेशनच्या विरोधात पोस्ट लिहिल्याचीही माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तसंच हातात दोन बंदुका घेतलेली एक पोस्टही त्यांनी इंस्टाग्रामवर टाकली होती, असंही पोलीस सूत्रांनी सांगितलं. या सोशल मीडिया पोस्टबाबत समजल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी लकडगंज पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला हॉटेलमधून अटक केली.

माओवादी विचारांवर आधारित पुस्तके

पोलिसांनी हॉटेलच्या खोलीतून काही साहित्यही देखील जप्त केलं आहे. यामध्ये बंदी घातलेल्या मावोवादी संघटनेच्या विचारांवर आधारित तीन पुस्तके असून नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ असणारे काही पॅम्लेटही जप्त केल्याचं सांगण्यात आलं आहे. यावरून लकडगंज पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 149 अंतर्गत भारत सरकारविरोधात युद्ध पुकारण्याच्या उद्देशानं शस्त्रं गोळा करण्याबाबतचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला आहे. तसंच 192 (दंगल घडवण्याच्या उद्देशानं चिथावणी देणे), कलम 351 आणि कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही रेजाजचं सोशल मीडिया अकाऊंट तपासण्याचा प्रयत्न केला, पण ते अकाऊंट सध्या बंद करण्यात आलं आहे.

एफआयआरनुसार, पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये 3 पुस्तकं मिळाली.

एक पुस्तक जी. एन. साईबाबांशी संबंधित आहे, तर दुसरं पुस्तक लेनिनशी संबंधित आहे.

‘ओन्ली पीपल मेक देअर ओन हिस्ट्री इंट्रोडक्शन बाय एजाज अहमद’ हे तिसरं पुस्तक मिळालं. तसेच इंग्रजीमधील एक पत्रक आढळून असून त्यात नाझरिया जर्नलचा उल्लेख आहे, अशी माहिती समोर आली.

एक बुकलेटही असून त्यात छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात जी कारवाई सुरू आहे त्याविषयी लिहिलं आहे. तसेच भारत सरकार आणि CPI माओवादी यांच्यामध्ये युद्धबंदीची चर्चा घडवून आणणार असल्याचे म्हटले आहे.

हे पत्रक छापण्यासाठी 20 ते 25 हजार जमा करायचे असून दिल्ली ते बस्तर पर्यंत सर्व संघटना, स्टडी सर्कल्समध्ये पोहचवायचे आहेत, असं या FIR मध्ये म्हटलेले आहे.

दोन्ही हातांमध्ये बंदूक घेऊन फोटो पोस्ट केले असून जो शर्ट परिधान करून हे फोटो काढले होते ते शर्टही जप्त करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या विरोधात युद्ध सदृश्य स्थिती निर्माण करण्यासाठी शस्त्र गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रेजाज याला कोर्टात हजर केले असता पोलिसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. पण आरोपीच्या वकिलांनी एखाद्या ऑपरेशनवर प्रश्न उपस्थित करणे हा गुन्हा नाही असा युक्तिवाद केला.

त्यानंतर भारतीय लष्कराविरोधात केलेली पोस्ट आणि दिल्लीमध्ये फ्रंटल ऑर्गनायझेशनी आयोजित केलेल्या परिषदेत वक्ता म्हणून गेल्यानं, त्यांना 13 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती आरोपीचे वकील संदीप नंदेश्वर यांनी दिली.

भारत-पाकिस्तान दोन्हींमध्ये तात्काळ युद्धविराम!; ट्रम्प यांचा दावा दोन्ही देशांनी हा निर्णय घेतला असल्याचं ट्विट

0

भारत-पाकिस्तान संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना दोन्ही देशांकडून तात्काळ युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

आमच्या दीर्घ चर्चेनंतर दोन्ही देशांनी हा निर्णय घेतला असल्याचं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे. तसंच यासाठी दोन्ही देशांचं त्यांनी अभिनंदनही केलं आहे. पण भारताकडून अद्याप यावर अधिकृतरित्या कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाही.

गुहागर बुद्धिस्ट प्रीमियर लीग-२०२५ च्या प्रथम पर्वाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न

0

गुहागर दि. ९ : गुहागर जिल्ह्यातील बौद्ध समाजातील तरुणांच्या कलागुणांना उत्तेजन देऊन त्यांना खेळाचे व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी तसेच गरीब तळागाळातील खेळाडूंना कॅम्प प्रशिक्षण यासाठी गुहागर बुद्धिस्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत खेळाडू सिद्धार्थ सिडकोजी पवार यांच्या शुभहस्ते गुहागर बुद्धिस्ट प्रीमियर लीगच्या प्रथम पर्वाचा उद्घाटन सोहळा दि. ९ मे २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता गोल्डन पार्क मैदान, शृंगारतळी येथे संस्था अध्यक्ष भूषण पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी शृंगारतळी येथील सामाजिक कार्यकर्ते अश्मा रमजान मुजावर, शीतल सिद्धार्थ पवार, बौद्धजन सहकारी संघाचे माजी विश्वस्त, बौद्धजन मागासवर्गीय नागरी पतसंस्थेचे संचालक व सम्यक कोकण कला संस्थेचे माजी महासचिव, बौद्धजन पंचायत समितीच्या शिवडी गटक्रमांक १३ चे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, बौद्धजन सहकारी संघाचे माजी अध्यक्ष व स्वातंत्र्य सैनिक सुनील जाधव, आर्मी सैनिक संघटनेचे एकनाथ सकपाळ, दीपक सकपाळ, निचिता गमरे, तालुक्याचे माजी चिटणीस महेंद्र मोहिते आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.

सदर प्रीमियर लीगचे समालोचन गीतेश गौतम कदम (पेवे), नरेश पवार (तळवली) यांनी अत्यंत लाघवी व प्रभावीपणे सादर केले, समीर पवार (तळवली) व सागर पवार (वेलदूर) व जाधव यांनी पंच म्हणून पारदर्शक पद्धतीने काम पार पाडले. कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष भूषण पवार, चिटणीस मयूर शैलेश गमरे, सागर सिद्धार्थ पवार आणि माजी सैनिक, तालुका संघाचे माजी अध्यक्ष व प्रमुख सल्लागार सुनील जाधव व त्यांचे सहकारी यांचे मोठे योगदान या कार्यक्रमाला लाभले.

सदर प्रीमियर लीगकरता ग्रुप A मधून समता इलेव्हन, रमाई वॉरियर्स, शार्वील इलेव्हन, ब्लु स्टार इलेव्हन तर ग्रुप B मधून अभिनव वॉटर प्युरीफायर्स, सिद्धार्थ इलेव्हन, जिज्ञासा इलेव्हन, आराध्य इलेव्हन या संघाचे संघमालक आपले संघ घेऊन उपस्थित होते, सदर प्रीमियर लीग ९ मे व १० मे अश्या दोन दिवसात होणार असून ग्रामीण भागातील कसलेले खेळाडू आपल्या कौशल्याचे प्रदर्शन दाखवत आहे. प्रेक्षकांकडूनही उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे अनेक सामाजिक, राजकिय कार्यकर्त्यांनी ही सदर प्रीमियर लीगला भेट देऊन सदर उपक्रमाचे कौतुक केले तसेच समाजातील सर्वच स्तरातून सदर प्रीमियर लीगला उस्फुर्त प्रतिसाद मिळून त्याचे कौतुक होत आहे.

पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार तारा भवाळकर यांना प्रदान

0

पुणे येथील नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्यावतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व लोकसाहित्याच्या अभ्यासक तारा भवाळकर यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले आणि कार्यकारिणी सदस्यांच्या वतीने सांगली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना भवाळकर म्हणाल्या की, ”नारायण सुर्वे यांनी साध्या भाषेत सामान्यांच्या दुःखाची कविता लिहिली. त्यांनी फक्त कष्टकऱ्यांवर कविताच लिहिली नाही तर कष्टकरी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष काम केले.”

अकादमीचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले की, ”यंदाचे वर्ष हे नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्ताने अकादमीच्या वतीने राज्यभर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.” याप्रसंगी कवी राजेंद्र वाघ, गदिमा महोत्सवाचे संचालक अरुण गराडे, प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, शब्दसाहित्य विचारमंचचे अध्यक्ष सचिन पाटील, प्रसिद्ध कवी अभिजीत पाटील, कवयित्री लता ऐवळे, कथाकार सुधीर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

काश्मीर ते जैसलमेर ते थेट भुजपर्यंत.. पाकिस्तानचा 26 ठिकाणी ड्रोन अटॅक, भारताकडून ‘करारा जवाब’

0

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले, मात्र त्यानंतरही पाकची खुमखुमी काही थांबलेली नाही. त्यांची आगळीक सुरूच असून पाककडून भारतावर हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे भारत-पाक दरम्यानचा तणाव आता शिगेला पोहोचला आहे. मात्र भारताने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला हाणून पाडला आहे. पाकिस्तानने जैसलमेरमध्ये 9, अमृतसरमध्ये 15 ड्रोन पाडले आणि श्रीनगर विमानतळ आणि अवंतीपोरा हवाई तळालाही लक्ष्य केले. पण पाकड्यांचा प्रत्येक प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला. गुरुवारपेक्षा शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात जास्त ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले आणि गोळीबार सुरू केला आहे. जम्मूमध्ये, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याची पुष्टी केली होती. जम्मू-श्रीनगर, पठाणकोट, फिरोजपूरमध्ये ब्लॅकआऊट झालं. सतत सायरनचा आवाज घुमत आहे. फिरोजपूरमध्ये भारतीय सैन्याने काही पाकिस्तानी ड्रोन पाडले आहेत. यासोबतच पोखरणमध्येही ड्रोन हल्ल्याची बातमी समोर आली आहे. दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनी तिन्ही लष्करप्रमुख, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनएसए अजित डोभाल यांच्यासोबत बैठक घेतली. राजौरीमध्येही ब्लॅकआऊटदरम्यानच फायरिंगचे जोरदार आवाज येत आहेत.

एअरपोर्ट आणि एअरबेसवरीव हल्ल्याचे प्रयत्न अयशस्वी

श्रीनगर विमानतळ आणि अवंतीपुरा येथील हवाई तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. पाकिस्तानने सुमारे 15 ड्रोनने श्रीनगरवर हल्ला केला. मात्र भारतीय लष्कराने विमानतळाजवळ ड्रोन पाडला आणि हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला. तर, अवंतीपोरा येथील ड्रोन हल्ला एअर डिफेन्स गनने पाडला गेला, अनंतनागमधील ड्रोन हल्ला देखील अयशस्वी झाला. आतापर्यंत काश्मीरमध्ये कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. ड्रोन कटानंतर जम्मूच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार सुरू झाला.

भारताने 26 ठिकाणी ड्रोन हल्ले उधळले

पाकिस्तानने शुक्रवारी सलग दुसऱ्या रात्री जम्मू-काश्मीरपासून गुजरातपर्यंत 26 ठिकाणी ड्रोन हल्ले केले. शत्रूच्या हवाई तळांसह महत्त्वाच्या प्रतिष्ठानांवर केलेले हल्ले उधळून लावण्यात आले, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले. पंजाबमधील फिरोजपूर येथे रात्रीच्या अंधारात केलेल्या हल्ल्यात एका कुटुंबातील काही सदस्य जखमी झाले. हल्ल्यात नागरिक जखमी झाल्याची ही एकमेव घटना होती. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या सर्व राज्यांमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला.

सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि सतत लक्ष ठेवले जात आहे आणि घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे संरक्षण मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळील 26 ठिकाणी ड्रोन दिसले. यामध्ये संशयास्पद शस्त्रे वाहून नेणारे ड्रोन समाविष्ट आहेत, असं संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितलं.

या ठिकाणी बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नागरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, जैसलमेर, बारमेर, भुज आणि लक्की नाला यांचा समावेश आहे, असं ते म्हणाले. फिरोजपूरमधील एका निवासी भागाला एका सशस्त्र ड्रोनने लक्ष्य केले, ज्यामध्ये स्थानिक कुटुंबातील काही सदस्य जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितलं.

सुरक्षा दलांनी परिसर रिकामा केला

जखमींवर तात्काळ उपचार करण्यात आले आणि सुरक्षा दलांनी परिसर रिकामा केला. परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आवश्यकतेनुसार कारवाई केली जात आहे, असे प्रवक्त्याने सांगितलं. नागरिकांनी, विशेषतः सीमेजवळ राहणाऱ्यांनी, घरातच राहावे, अनावश्यक हालचाली मर्यादित कराव्यात आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असा सल्ला मंत्रालयाने दिला आहे.

पाकिस्तानी ड्रोन पाडला

पाकिस्तानने केलेला हा ताजा हल्ला अशा वेळी झाला आहे, ज्याच्या फक्त एक दिवस आधीच भारताने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे भारतीय लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानी सैन्याचा प्रयत्न हाणून पाडला होता. पाकिस्तानी ड्रोन पाडल्यानंतर बारामुल्ला जिल्ह्यातील आकाश तेजस्वी प्रकाशाने भरून गेले. जम्मू प्रदेश आणि दक्षिण काश्मीरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि सायरन वाजले, ज्यामुळे केंद्रशासित प्रदेशातील अनेक भाग अंधारात बुडाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेजारच्या पंजाबमधील जम्मू, सांबा आणि पठाणकोट जिल्ह्यातही ड्रोन दिसले असून त्यांना निष्क्रिय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं.

घराचे लाईट बंद करा

श्रीनगरमधील मशिदींमधील लाऊडस्पीकरचा वापर करून, खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिकांना त्यांच्या घरातील दिवे बंद करण्यास सांगण्यात आले.जम्मू आणि पंजाबमधील नागरोटा आणि उधमपूर येथेही ड्रोन दिसल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केलं. जम्मू आणि सांबा जिल्ह्यातील सुचेतगड आणि रामगड सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमेपलीकडून जोरदार गोळीबार सुरू आहे.

अफवांकडे लक्ष देऊ नका

“मी जिथे आहे तिथून, अधूनमधून स्फोटांचे आवाज ऐकू येतात, ” असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी अंधारात बुडालेल्या शहराचा फोटो देखील पोस्ट केला आणि जम्मूमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याचे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते. “जम्मू आणि आसपासच्या सर्व लोकांना माझे नम्र आवाहन आहे की कृपया रस्त्यावर येऊ नका, घरीच राहा किंवा अशा जवळच्या ठिकाणी जा, की जिथे तुम्ही पुढील काही तास आरामात राहू शकाल.” असे दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले. अफवांकडे लक्ष देऊ नका,अफवा पसरवू नका असा सल्ला देतानाच आपण एकत्रितपणे यावर तोडगा काढू, याचा सामना करू असा विस्वास त्यांनी व्यक्त केला.

सलग तीन दिवसांपासून अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्ताची हेकडी उतरवली इस्लामाबाद ते लाहोर फक्त धूर… रात्री काय घडलं ?

0

भारत-पाकिस्तानमध्ये शुक्रवार आणि शनिवारच्या रात्री तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शुक्रवारी संध्याकाळी पाकिस्तानने भारताच्या 26 लोकेशनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानच्या अनेक शहरांना लक्ष्य केलं. भारताने 6 बॅलेस्टिक मिसाईल्स डागल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. तीन एअरबेसवर स्फोट झालेत. त्यानंतर पाकिस्ताने आपली एअर स्पेस बंद केली आहे.

जाणून घ्या मोठ्या अपडेट्स….

1 भारताने पाकिस्तानच्या नूर खान (रावळपिंडी), मुरीद (चकवाल) आणि रफीकी (शोर्कोट) एअरबेसवर प्रभावी हल्ले केले. यामध्ये त्यांचं मोठ नुकसान झालं आहे. पाकिस्तानच्या सैन्य इन्फ्रास्ट्रक्चरला हा मोठा धक्का मानला जात आहे. सीमेवरील तणाव आणखी वाढला आहे.

2 पाकिस्तानने आज दुपारी 12 वाजेपर्यंत आपला एअरस्पेस पूर्णपणे बंद केला आहे. पेशावरला जाणाऱ्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सची फ्लाइट PIA218 ला क्वेटा येथे उड्डाण करताना पाहण्यात आलय.

3 पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह लाहोर आणि अन्य काही मोठ्या शहरात स्फोटाचे आवाज ऐकू आले. पाकिस्तानी सैन्याचा दावा आहे की, भारताने बॅलेस्टिक मिसाइल्स डागले.

4 पाकिस्तानने काल सलग तिसऱ्यादिवशी ड्रोन हल्ले केले. भारताने याला पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम घाटी आणि सियालकोटमध्ये हल्ले करुन चोख प्रत्युत्तर दिलं.

5 सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आलेत. यामध्ये सरसा क्षेत्रात भारताने पाकिस्तानच्या लॉन्ग रेंज मिसाइल यशस्वीरित्या रोखल्याच दिसत आहे. सरसाच्या जिल्हा सूचना अधिकाऱ्याने नागरिकांना घराच्या आतच रहाण्याचा सल्ला दिला आहे.

6 S-400, L-70, Zu-23 आणि शकिल्का सारखी भारताची अत्याधुनिक एअर डिफेन्स प्रणाली सीमेवर तैनात आहे. या सिस्टिमने पाकिस्तानचे ड्रोन हल्ले विफल केले आहेत. त्याशिवाय पाकिस्तानी बॅलेस्टिक मिसाईल्स हवेतच नष्ट केली आहेत.

कंगाल पाकिस्तानला दिलासा, भारताच्या विरोधानंतरही ‘आयएमएफ’चे एक अब्ज डॉलरचे कर्ज

0

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानला दिलासा दिला आहे. दिवाळखोरीत आलेल्या पाकिस्तानला मदतीचा हात दिला आहे. भारताच्या विरोधानंतर आयएमएफने पाकिस्तानला एक अब्ज डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे. भारताने यासंदर्भात घेतलेल्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता. पाकिस्तानला दिला जाणारी मदत ही दहशतवादी कारवायांसाठी वापरली जाईल, असा इशारा भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला दिला.

भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे पाकिस्तानच्या खराब कामगिरीबद्दल चिंता व्यक्त केली. भारताने म्हटले की, पाकिस्तानला जर निधी दिला गेला तर त्याचा गैरवापर होईल. पाकिस्तान हा आयएमएफचा दीर्घकालीन कर्जदार आहे आणि आयएमएफ कार्यक्रमाच्या अटींचे पालन करण्याचा त्यांचा इतिहास खूपच खराब आहे. 1989 पासून पाकिस्तानला आयएमएफकडून कर्ज मिळत आहे. 2019 पासून म्हणजे गेल्या 5 वर्षात आयएमएफने पाकिस्तानला चार वेळा कर्ज दिले आहे. जर पाकिस्तानने मागील कर्जाचा योग्य वापर केला असता तर कर्ज घेण्यासाठी पुन्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे यावे लागले नसते. त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एक बेलआऊट पॅकेज देण्याची गरज नाही. भारताच्या या विरोधानंतरही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला कर्ज दिले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीत भारताने म्हटले आहे की, पाकिस्तान सीमेवर दहशतवादी कारवायांना सतत पाठिंबा देत आहे. दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देत आहे. त्यामुळे त्या देशाला कर्ज देणे हा एक धोकादायक आहे. त्यामुळे कर्ज देणाऱ्या संस्थांची विश्वासार्हतासुद्धा खराब होत आहे. जागतिक मानवी मूल्यांचीही ही थट्टा होत आहे.

भारताने म्हटले की, पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत अप्रत्यक्षपणे लष्करी गुप्तचर कारवायांसाठी वापरली जाईल. तसेच लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांकडे जाईल. पाकिस्तानमध्ये सक्रीय असणाऱ्या या दहशतवादी संघटना भारतात सातत्याने दहशतवादी हल्ले घडवत असतात, असा युक्तिवाद भारताने केला. त्यानंतर ‘आयएमएफ’च्या मतदान प्रक्रियेपासूनही भारत दूर राहिला.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांत तणाव आहे. भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतर दोन्ही देशांकडून हल्ले सुरु आहेत.

पाकिस्तानच्या टार्गेटवर दिल्ली राजधानीत घडामोडी वाढल्या, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष शिगेला सकाळी 11 वाजता लष्कराची प्रेस

0

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मागील तीन दिवसांपासून दोन्ही देशांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले करण्यात येत आहे. काल रात्री पाकिस्तानने भारताच्या विविध भागात ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने लेह-लडाखपासून भुजपर्यंत जवळपास ५० ड्रोनने भारतावर हल्ला केला होता. मात्र भारताने पाकिस्तानचा हा नापाक इरादा हाणून पाडला. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने सडेतोड उत्तर देत सगळे ड्रोन पाडले.

यानंतर शुक्रवारी मध्यरात्री भारताने पाकिस्तानमध्ये घुसून तीन हवाई तळांवर हल्ला केला. इस्लामाबाद, लाहोर आणि रावळपिंडी हवाई तळ उद्ध्वस्त केलं. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने ‘बुनियान उल मर्सूस’ ऑपरेशन लाँच केलं आहे. या ऑपरेशनचा भाग म्हणून पाकिस्ताने थेट भारताची राजधानी दिल्लीवर मिसाईल सोडण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानकडून ‘फतेह २’ हे मिसाईल सोडण्यात आलं. मात्र भारताने हा हल्ला देखील परतवून लावला. भारताने हरियाणाच्या सिरसा परिसरात पाकिस्तानचं हे मिसाईल हाणून पाडलं.

पाकिस्तानने थेट राजधानी दिल्लीवर वाकडी नजर टाकण्याचा प्रयत्न केल्यानं भारतीय प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. भारतीय सैन्य देखील आता जशास तसं उत्तर देण्यास सज्ज झालं आहे. या मिसाईल हल्ल्याचा आता भारत दुप्पट ताकदीने उत्तर देण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दोन्ही देशातील हा संघर्ष दुसऱ्या टप्प्यात जाण्याची शक्यता आहे.

आज सकाळी १० ते ११ च्या दरम्यान, भारतीय सैन्याकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत भारतीय सैन्याची भूमिका स्पष्ट केली जाऊ शकते. तसेच भारत पाकिस्तान संघर्षाची सद्यस्थिती काय आहे, याचा आढावा देखील दिला जाऊ शकतो. भारताचं पुढचं पाऊल काय असू शकतं, याची माहिती देखील या पत्रकार परिषदेतून मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रेस कॉन्फरन्सकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

पाकिस्तानची आता खैर नाही…भारताने एअर मिसाईल सिस्टम केलं सुरु, नेमका प्लॅन काय?

0

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर तणाव सुरुच आहे. जम्मू-श्रीनगरपासून पठाणकोट आणि पोखरण पर्यंत पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले. परंतु, भारताने पाकिस्तानचे ड्रोन्स निकामी केले आहेत. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने भारताच्या 26 शहरांवर हल्ला केला. भारतानेही पाकिस्तानचे मनसुबे उधळून टाकत प्रतिहल्ला केला. याच पार्श्वभूमीवर भारताने 32 विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डॉनॉल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या वाढत्या तणावामुळे चिंता व्यक्त केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग CDS आणि तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांसोबत चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

जम्मू काश्मीरच्या सीमेवरून मोठी कारवाई

भारतीय सेनेकडून सर्जिकल स्ट्राईक सुरु करण्यात आलं आहे. संरक्षण खात्याच्या सूत्रांच्या माहितीनुसार, जम्मू सीमेवरून भारतीय सेनेनं पाकिस्तानचे पोस्ट्स आणि दहशतवादी लॉन्च पॅड्स उडवून टाकले आहेत. याठिकाणी ट्यूब ड्रोनही लॉन्च केलं जातं.