Home Blog Page 210

विराटला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी दुखापत, टीम इंडियाला टेन्शन, कमबॅक कधी?

0

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा नागपुरात खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि फलंदाज यशस्वी जयस्वाल या दोघांचं एकदिवसीय पदार्पण झालं आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा अनुभवी बॅट्समन आणि माजी कर्णधार विराट कोहली या सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनचा भाग नाही. विराटला झालेल्या दुखापतीमुळे टीम इंडियाचं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टेन्शन वाढलं आहे.

विराटच्या गुडघ्याला दुखापत

विराटला दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्याला मुकावं लागलं आहे.विराटला गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे विराट पहिल्या सामन्यात खेळत नाहीय. विराट गुडघ्याच्या त्रासामुळे या सामन्यात खेळणार नसल्याचं कर्णधार रोहित शर्मा याने टॉस वेळेस सांगितलं. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर टीम इंडियासाठी ही चिंताजनक बाब आहे. आधीच जसप्रीत बुमराह हा या मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्यात बुमराहवर चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. अशात विराटमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

हर्षित आणि यशस्वी जयस्वालंच पदार्पण

दरम्यान विराटची ही दुखापत यशस्वी जयस्वाल याच्या पथ्यावर पडली आहे. विराटला दुखापत झाल्याने यशस्वीला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळाली आहे. यशस्वीने यासह टी 20i, कसोटीनंतर आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केलं आहे. तसेच वेगवान गोलंदाज हर्षित राणा याचाही वनडे डेब्यू झाला आहे.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.

करुणा शर्माचा कोर्टात मोठा विजय, धनंजय मुंडेंना झटका, पोटगी देण्याचा आदेश

0

आधीच राजकीय दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कोर्टात करुण शर्मा यांचा मोठा विजय झाला आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अंशत: मान्य केले आहेत. करूणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश फॅमिली कोर्टाने दिले आहेत. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा करुण शर्मा यांचा दावा होता. त्यासाठी मागच्या काही वर्षापासून त्या कायदेशीर लढाई लढत होत्या. आज त्यांना यश मिळालं आहे. फॅमिली कोर्टाने करुणा शर्मा यांचा दावा मान्य केला आहे. करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत हे कोर्टाने मान्य केलय.

कौटुंबिक पती-पत्नीचा विषय असल्याने त्यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात दाद मागितली होती. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याच मान्य केलं. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा सुद्धा आरोप केला होता. पती-पत्नी वेगळे राहत असतील किंवा घटस्फोट झाल्यास पोटगीची रक्कम द्यावी लागते. फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना दर महिना पोटगीपोटी करुणा शर्मा यांना 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

आज त्यांचा मोठा विजय झालाय

धनंजय मुंडे यांच्यावरील घरगुती हिंसाचाराच्या आरोपावर आता फॅमिली कोर्टा काय निर्णय घेतं, हे पहावा लागेल. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी वारंवार काही गोष्टी समोर आणल्या होत्या. त्याचवेळी त्या कायदेशीर लढाई सुद्धा लढत होत्या. आज त्यांचा मोठा विजय झालाय असं म्हणावं लागेल. कारण कोर्टाने त्यांची बाजू मान्य केली आहे.

कोर्टाने आदेशात काय म्हटलय?

1) धनंजय मुंडेंवर करुणा शर्मांनी केलेले आरोप कोर्टाकडून अशत: मान्य.

2) प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार करु नये.

3) धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना महिन्याला 2 लाखाची पोटगी द्यावी.

4) या खटल्याचा 25 हजाराचा खर्च धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना द्यावा.

सुशीलकुमार शिंदेंच्या नातवावरून विनोद केल्याने मराठी कॉमेडियनला मारहाण; 12 जणांविरोधात गुन्हा

0

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण केल्याप्रकरणी सोलापुरात 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आणि अभिनेता वीर पहाडियावर केलेल्या विनोदामुळे प्रणितला 2 फेब्रुवारी रोजी सोलापुरात मारहाण झाली होती. या घटनेनंतर पोलीस दखल घेत नसल्याची तक्रार प्रणितने सोशल मीडियाद्वारे केली होती. अखेर लक्ष्मण मोहन झेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या बारा जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं होतं?
प्रणितच्या टीमने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित संपूर्ण घडलेली घटना सांगितली होती. ‘सोलापुरातील 24 के क्राफ्ट ब्र्युज याठिकाणी 2 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5.45 वाजता प्रणितचा स्टँडअप संपला. त्यानंतर तो चाहत्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी उभा राहिला. चाहत्यांची गर्दी कमी झाल्यानंतर 11 ते 12 जण चाहत्यांच्या वेशात प्रणितजवळ आले. त्यांनी प्रणितला मारहाण करत धमकी दिली. प्रणितला त्यांनी लाथा-बुक्क्यांनी मारलं. हल्ला करणाऱ्यांपैकी तनवीर शेख हा म्होरक्या होत्या. बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या वीर पहाडियाबद्दल विनोद केल्याने मारहाण केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यापैकी एकाने प्रणितला धमकी दिली की, यापुढे वीर पहाडिया बाबावर विनोद करून दाखव.. म्हणजेच यापुढे विनोद केल्यास याहून गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार असल्याची धमकी त्याने दिली’, अशी माहिती प्रणितच्या टीमने दिली.

याविषयी त्यांनी पुढे लिहिलं, ‘याहून धक्कादायक बाब म्हणजे ज्याठिकाणी कार्यक्रम झाला, तिथे कोणतीच सुरक्षाव्यवस्था नव्हती. अनेकदा विनंत्या करूनसुद्धा ते सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार देत आहेत. आम्ही पोलिसांचीही मदत मागितली. मात्र त्यांनीसुद्धा कोणतीच मदत केली नाही.’

वीर पहाडियाचं स्पष्टीकरण
अक्षय कुमारच्या ‘स्कायफोर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वीर पहाडियाने या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “प्रणित मोरेसोबत जे घडलं, त्याबाबत ऐकून मला खूपच धक्का बसला आहे. मी हे स्पष्ट करू इच्छितो की यात माझा कोणताही सहभाग नाही आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा मी निषेध करतो. मी स्वत: नेहमीच ट्रोलिंगकडे गांभीर्याने पाहत नाही, त्यावर हसतो आणि माझ्या विरोधकांशाही प्रेमाने वागतो. त्यामुळे मी कधीच अशा पद्धतीच्या घटनांना प्रोत्साहन देणार नाही. प्रणित आणि त्याच्या संपूर्ण चाहत्यांची मी माफी मागतो. असं कोणासोबतच घडू नये. यासाठी जो कोणी जबाबदार असेल त्याला शिक्षा होण्यासाठी मी स्वत: लक्ष घालेन”, असं आश्वासन वीरने दिलंय.

ही तर लाडक्या बहिणींची फसवणूक, सरकारने गुन्हा केला आहे – बच्चू कडूंचा घणाघाती आरोप

0

ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ जुलै महिन्यात घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या अकाऊंटमध्ये दर महिन्याल 1500 रुपये जमा होता. तर विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास हा हप्ता 2100 करू असं आश्वासनंही महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिलं होतं. मात्र विरोध सातत्याने या योजनेच्या मुद्यावरून सरकारल धारेवर धरत आहेत. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनीही या योजनेवरून सरकारला खडे बोल सुनावले आहेत. ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती,सत्तेत येण्यासाठी करोडो लाडक्या बहिणीची चाचपणी न करता त्यांना पैसे देऊन टाकले, असा आरोप बच्चू कडू यांनी केला. सरकारने मतं घेतली मात्र आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद करणार, ही त्यांची फसवणूक आहे, त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्या लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे असेही बच्चू कडू म्हणाले.

सरकारने गुन्हा केला आहे

काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी लाडकी बहीण योजनेवरू सरकारवर टीक केली होती. लाडक्या बहिणींना ॲडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत, असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. तर काल त्यांनी पुन्हा सरकारला खडेबोल सुनावले. लाडकी बहिण योजनेतून अनेक महिला आता अपात्र ठरल्या जात आहेत. यामध्ये निवडणूक आयोगाने पारदर्शक विचार करून चौकशी केली पाहिजे,असे बच्चू कडू यावर म्हणाले.

डायरेक्ट नेत्याच्या खिशातून पैसे न जाता बजेट मधून सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मत ओढण्याचा प्रयत्न झाला आहे. ही स्कीम लाडक्या बहिणींसाठी नव्हती, तर सत्तेत येण्यासाठी होती. सत्तेत येण्यासाठी करोडो लाडक्या बहिणींची चाचपणी न करता त्यांना पैसे देऊन टाकले, असा आरोपकडू यांनी केला. तुम्ही (सरकारने) निकष न पाहता त्यांच्या खात्यात पैसे टाकले, मग आता म्हणता की त्या पात्र नाहीत. मग त्यांना पैसे द्यायच्या आधी पात्र ठरवायचं ना, पैसे दिल्यावर पात्र कसं ठरवायचं, असा सवाल विचारत हा क्राईम आहे, सरकारने गुन्हा केला आहे, असा घणाघाती हल्ला बच्चू कडू यांनी चढवला. सरकारने मतं घेतली, मात्र आता त्यांचे पैसे बंद करणार ही त्यांची फसवणूक आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्या लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे असेही कडू म्हणाले.

लाडक्या बहिणींकडील कारची सोमवारपासून तपासणी

पुण्यातील लाडक्या बहिणींकडील कारची येत्या सोमवारपासून तपासणी करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडे चारचाकी आढळल्यास, त्यांचं नाव योजनेतून वगळलं जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 75 हजार बहिणींच्या घरात चारचाकी गाड्या आढळल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून पुण्यात ही तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलेकडे चारचाकी गाडी आढळले, तिचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून वगळण्यात येईल. ज्यांच्याकडे वाहने असल्याचं निष्पन्न होईल, त्या बहिणींची नावे रद्द करण्यात येणार आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील 38 बहिणींनी आत्तापर्यंत माघार घेतली आहे. आधी 8 महिलांनी पैसे परत केले होते, त्या पाठोपाठ आता 30 महिलांनी पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आहे.

कॅप्टन रोहितची वनडे सीरिजआधी निवृत्तीबाबत रोखठोक प्रतिक्रिया; “माझ्यासाठी भविष्यातील..”

0

टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी ही मालिका फार महत्त्वाची आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा विदर्भातील नागपूर येथील व्हीसीए स्टेडियममध्ये 6 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच या मालिकेत विजयाने सुरुवात करण्याचा मानस असणार आहे. या पहिल्या सामन्याआधी कर्णधार रोहित शर्मा याने पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधला. रोहितने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. मात्र रोहित निवृत्तीच्या प्रश्ननावरुन चांगलाच संतापलेला दिसून आला.

रोहितने त्याच्याबाबत सुरु असलेल्या निवृत्तीबाबतच्या चर्चांना काहीच अर्थ नसल्याचं म्हटलंय. तसेच इंग्लंड विरुद्धची वनडे सीरिज आणि आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीकडे लक्ष असताना करियरबद्दल आता बोलणं हे अप्रसांगिक असल्याचं रोहितने सांगितलं.

रोहित काय म्हणाला?

“जेव्हा 3 वनडे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलंय तेव्हा माझ्या भविष्यातील योजनांबाबत चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. माझ्या भविष्याबाबत अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. मी त्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी इथे आलेलो नाही. माझ्यसााठी इंग्लंड विरुद्धचे 3 सामने आणि चॅम्पियन्स ट्रॉफी महत्त्वाची आहे. माझं लक्ष या सामन्यांकडे आहे. यानंतर काय होतं हे मी पाहिन”, अंस रोहितने म्हटलं.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा.

रात्री 12 च्या ठोक्याला इन्कम टॅक्सचे अधिकारी संजीवराजे यांच्या बंगल्यातून पडले बाहेर

0

इन्कम टॅक्स विभागाने काल संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापे टाकले. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सातारा, मुंबई आणि पुण्याच्या घरावर ही छापेमारीची कारवाई करण्यात आली. संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा फलटणमधील वजनदार नेते आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत. संजीवराजे नाईक निंबाळकर हे सध्या शरद पवार यांच्या पक्षात आहेत.

लवकरच ते पुन्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच बोललं जातय. त्याआधी ही छापेमारीची कारवाई झाली. संजीवराजे नाईक निंबाळकर आधी अजित पवार यांच्यासोबतच होते. पण विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. आता ते पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाच्या मार्गावर आहेत.

कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन

सातारा फलटण येथे काल आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची तब्बल 17 तास चौकशी करण्यात आली. रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी बंगल्यातून बाहेर पडले. चौकशीनंतर संजीवराजे यांनी घराबाहेर येऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. संजीवराजे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देण्याचं टाळलं. संजीवराजे यांच्या निवासस्थानी अजूनही पोलिसांचा बंदोबस्त आहे. काल सकाळी 6 वाजल्यापासून इन्कम टॅक्स विभागाकडून ही छापेमारीची कारवाई सुरु होती.

‘हे दोन नंबरचे घर नाही’

“काळजीचे काहीही कारण नाही. महाराष्ट्रात काही क्लिअर कुटुंब आहेत. लोकांनी आश्वस्त राहावं. यामध्ये काही निष्पन्न होणार नाही. हाच वेळ इतर लोकांसाठी दिला तर बरे होईल. कोणतीही चौकशी करावी प्रत्येक गोष्टीचे हिशोब उत्तर या ठिकाणी आहे. जुनी घरे आहेत या अशा पद्धतीने टार्गेट करणे योग्य नाही. हा प्रक्रियेचा भाग आहे. झाले ते योग्य झाले. साप साप म्हणून भुई थोपटत होते ते बंद झाले. चौकशीसाठी आलेले लोक सुद्धा रिस्पेक्ट फुल आहेत. त्यांच्यासमोरही लक्षात आले आहे हे दोन नंबरचे घर नाही. संजिवराजे यांच्या जवळ प्रत्येक गोष्टीचे उत्तर आहे” असं रघुनाथ राजे नाईक निंबाळकर म्हणाले.

शरद पवार ’24×7′ चालणारे राजकीय विद्यापीठ निवृत्तीच्या चर्चेने ‘कही खुशी कही गम’!; कोल्हापुरात खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे संकेत

0

कोल्हापुरात खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत वक्तव्य केले. खुद्द पवारही याबाबत अनेकवेळा बोलले आहेत. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुकीच्या राजकारणातून निवृतीचे संकेत त्यांनी दिले.सहा दशकांहून अधिक काळ राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात व समाजकारणात केंद्रस्थानी राहून अनेक नेत्यांच्या राजकारणाचा ‘उदयास्त’ करण्याचे काम पवार यांनी केले आहे.

शरद पवार हे ‘ट्वेंटी फोर बाय सेव्हन’ चालणारे राजकीय विद्यापीठ आहे. जसे ते राजकारणात रमतात तसेच ते साहित्य, संस्कृती, क्रीडा, शेती, माती, पाणी, उद्योग यातही रमतात. पवारांच्या राजकीय, वैचारिक, सामाजिक भूमिकेबाबत मतभेद असणे आणि तो त्या- त्या वेळी व्यक्त होणे, हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, जडणघडणीला धरून आहे. मात्र राजकारणापलिकडचे पवार हे अभ्यासण्यासारखे आहेत.

शेती, सहकार, उद्योग, साहित्य, कला या क्षेत्रातील त्यांची सुरू असणारी अखंड मुशाफिरी, सतत भटकंती, लोकांना समजून घेणे, नवीन काय करता येईल याचा ध्यास घेऊन त्यासाठी पाठपुरावा करणे, ज्या त्या भागात गेले की राजकारणापलीकडे जाऊन तेथील शेती, पाणी, उद्योगाची माहिती घेणे, त्या – त्या क्षेत्रातील लोकांना आवर्जून भेटणे आणि तो परिसर समजून घेऊन आपल्यापरीने त्याच्या विकासासाठी काही योगदान देता येईल का, यावर त्यांचा भर राहतो. याउलट मनाजोगते मंत्रिपद किंवा पालकमंत्रीपद मिळाले नाही म्हणून दिलेल्या जिल्ह्याची जबाबदारी व्यवस्थित पार न पाडणारे मंत्रीही पहावयास मिळत आहेत.

शरद पवारांचे सुसंवादाचे कौशल्य वादातीत –

राजकारणात सर्वांनाच केंद्रस्थानी राहण्याचे भाग्य लाभत नाही. त्यासाठी अपार कष्ट, राजकीय हवेचा पुरेपूर अंदाज घ्यावा लागतो. रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र करावी कागते. अर्थात घरावर तुळशीपत्र ठेवून काम करावे लागते. त्यामुळे कौटुंबिक दुरावा देखील वाट्याला येतो. मात्र पवार यांनी कुटुंब आणि राजकारण यांचा सुरेख मेळ साधला आहे. त्यामुळेच टोकाचे राजकीय मतभेद असताना देखील अजित पवार यांच्या सोबत एकाच व्यासपीठावर येऊनही त्यांच्या बोलण्यातून आणि हालचालीतून मतभेदाची पुसटशी जाणीव देखील उपस्थितांना होत नाही.

उलट अजित पवार यांच्याबाबतीत ती प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे काळ आणि वेळेचे भान, व्यासपीठाचा मान ठेऊन बहुरंगी, बहुढंगी, श्रमजीवी, उद्योगी, भांडवली, सत्ताधारी, विरोधी, समविचारी, परस्परविरोधी विचारधारेच्या लोकांसोबत सुसंवाद ठेवण्याचे कौशल्य पवार यांच्याकडून राजकारण्यांनी शिकणे आवश्यक आहे.

मोजके बोलण्याचे कसबही मोठे –

अलीकडे राजकारणात व्यासपीठ पाहून विचार मांडण्याची प्रथा बंद झाली आहे. व्यासपीठ कोणतेही असो, नेत्यांचा अजेंडा ठरलेला राहतो. राज्यात सर्वपक्षीय वाचाळवीरांचे तर पेव फुटले आहे. कोणीही उठायचे आणि कोणावरही बोलायचे, असा प्रकार सुरू आहे. तारतम्य नावाचा प्रकार हरवला आहे. अभ्यासपूर्ण बोलण्याचा तर दुरान्वयानेही संबंध राहिलेला नाही. कोणाला तरी खुश करण्यासाठी तोंडाचा बाजार करणारी ठराविक मंडळी सर्व पक्षात उदयास आली आहेत. तसेच समाजमाध्यमावर सतत वळवळ करणारी मंडळी देखील अनेक आहेत. मोजकेच आणि समर्पक बोलावे, सवंग लोकप्रियतेसाठी बाष्कळ बडबड करू नये हे त्यांच्या लेखीच दिसत नाही. बडबड न करता अनुल्लेखाने कसे मारावे, हे पवारांकडून शिकावे.

प्रत्येक माणसाला वय, प्रकृती आणि आजारपणामुळे मर्यादा येतात. मात्र त्याचे भांडवल करायचे नसते हे पवारांनी दाखवून दिले आहे. अन्यथा सभा, मोर्चाला हाताला सलाईन लावून, डोक्याला पट्टी बांधून येणाऱ्या चमकू नेत्यांची राज्यात काही कमी नाही. आजाराचा बाऊ न करता, उपचार आणि विश्रांती घेऊन पुन्हा कामात सक्रिय होणारे पवार राज्याने पाहिले आहेत. त्यामुळे आताही ते उपचार घेऊन राजकारणात सक्रिय होतील, यात शंका नाही. काही तरी नवीन करण्याची उमेद, उर्जा त्यांना कधी स्वस्थ बसू देत नाही. मात्र स्वस्थ असणारे नेतेही कधी पवार यांच्यासारखे राबताना दिसत नाहीत.

नेत्यांमध्ये आत्मस्तुतीचा फिव्हर –

सध्या राष्ट्रवादीसह सर्वच पक्षातील ठराविक नेत्यांना ‘आत्मस्तुतीचा फिव्हर’ आला आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात सतत ‘मी’ आढळून येत आहे. खरे तर राजकीय अनुभव आणि कर्तृत्वाने आपले नेतृत्व सिद्ध करायचे असतात. मात्र ज्यांच्याकडे कर्तृत्व नसते ते फुटकळ प्रसिद्धीचा खटाटोप करतात. पवारांना अशा गोष्टींची कधी गरज लागली नाही. त्यामुळे फुकट बडबड करणाऱ्यांनी एकदा आपल्या कर्तृत्वाचा आलेख स्वतःच तपासून पाहणे आवश्यक आहे.

राजकारण्याचं फिरणं मर्यादित झाले आहे. मंत्रालय आणि आपला मतदार संघ यापलीकडे त्यांची धाव गेलेली नाही. विरोधकांची परिस्थितीही काही वेगळी नाही. पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसे विरोधक देखील निवडणूक, अधिवेशन काळात सक्रिय राहतात. आजकाल सर्वपक्षीय नेत्यांचा राज्य दौरा हा प्रचारासाठीच अधिक असतो. त्यातूनही कधी अस्मानी संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी देखील दौरा केला जातो. मात्र या दौऱ्याचा वापर शेतकऱ्याला मदतीपेक्षा सरकारला अडचणीत आणण्यासाठीच केला जात असल्याचे दिसत आहे.

बारावीची ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून परीक्षा! विद्यार्थ्यांनी ताण घेऊ नये, अभ्यासाचे करावे अचूक वेळापत्रक; वेळापत्रक कसे असावे? वाचा…

0

इयत्ता बारावीची परीक्षा पुढील आठवड्यात ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाला शाळा-महाविद्यालय स्तरावर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेत २० गुण आहेत.त्यामुळे टक्केवारी जास्त मिळावी, यासाठी प्रत्येकाने परीक्षा काळातील अभ्यासाचे अचूक नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास करावा, जेणेकरून चांगल्या गुणांनी तो विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकेल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांना आहे.

परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील, बाहेरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक असतील, बैठे पथक व भरारी पथकांचेही परीक्षेवर लक्ष असणार, ड्रोन कॅमेरे, परीक्षा हॉलमध्ये जाताना अंगझडती होईल, अशा बाबींची भीती कोणीही बाळगू नये. प्रत्येक परीक्षेवेळी अशा गोष्टी होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यासंदर्भात कोणताही ताण न घेता चांगला अभ्यास करावा. शांत, निवांत ठिकाणी जाऊन अभ्यास करावा, मोठ्याने वाचून अभ्यास केल्यास जास्त लक्षात राहातो.

आपल्याला लक्षात ठेवायला किंवा पाठांतर करायला कठीण जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांचे वाचन करुन त्यावर स्वत: नोट्‌स (महत्त्वाचे पॉईंट) काढा आणि त्याचे वाचन केल्यास तो प्रश्न कठीण वाटणार नाही. गणितांचा सराव करावा, विज्ञानातील प्रयोग लक्षात ठेवावेत. इंग्रजीची उत्तरे लिहिताना स्पेलिंग चुकणार नाही, याची दक्षता घ्यावी. पास होणे फार कठीण नक्कीच नाही, आता फक्त चांगली टक्केवारी मिळावी यासाठी अभ्यासाचे वेळापत्रक चोख असणे आवश्यक आहे, असा सल्ला शिक्षणतज्ज्ञांनी दिला आहे.

वेळापत्रक तयार करून परीक्षेला सामोरे जावे

विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता अत्यंत प्रसन्न भावनेने परीक्षा द्यावी. जीवनातील ही शेवटची परीक्षा नसून विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी अशा अनेक परीक्षा द्यायच्या आहेत. त्यामुळे कोणीही ताण न बाळगता अभ्यासाचे अचूक नियोजन, वेळापत्रक तयार करून परीक्षेला सामोरे जावे.

– सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

अभ्यासाचे असे हवे वेळापत्रक…

पहाटे साडेपाच ते सकाळी नऊ

सायंकाळी साडेपाच ते साडेसात

दररोज झोप किमान सात तास हवी

रात्री दहा-साडेदहानंतर जागरण शक्यतो नकोच

पुणे मेट्रोच्या नव्या मार्गांबाबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ‘हे’ सुचविले पर्याय; पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी मेट्रोचे वर्तुळाकार मार्ग

0

पुणे मेट्रोचा शहरभर विस्तार होत आहे. जास्तीत जास्त पुणेकरांना मेट्रोने प्रवास करता यावा, यासाठी काही पर्याय समोर येत आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीत नवीन मार्ग सुचवले आहेत. पुण्याचा सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी भविष्याचा विचार करुन वाहतूक नियोजनासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे सूचित केले आहेत, असं मोहोळ यांनी सांगितलं. या संदर्भातील बैठक पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रवण हर्डिकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. महापालिका आयुक्त श्री. राजेंद्र भोसले यांना यासंदर्भातील डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुरलीधर मोहोळ यांनी सुचवलेले मेट्रोचे मार्ग

१) खराडी ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्गिका पुणे महानगरपालिकेने खराडी ते पुणे विमानतळ या मेट्रो विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करावा. हा मार्ग खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या मेट्रो मार्गात समाविष्ट करुन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खडकवासला असा संपूर्ण मार्ग करण्यात यावा.

२) खराडी येथे Interchangeable and Multimodal Transport Hub म्हणून विकसित करावे. खराडी आणि परिसर हा व्यावसायिक आणि राहीवाशीदृष्ट्या झपाट्याने विकसित होत असून Interchangeable and Multimodal Transport Hub साठी खराडी योग्य पर्याय आहे. खराडी येथे हे हब झाल्यास पुणे विमातळावर जाण्यासाठी मेट्रोच्या सर्व मार्गावरुन जाण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. चांदणी चौक ते वाघोली या मार्गावर प्रवास करणारांना खराडी येथून थेट विमानतळ गाठता येईल. तर निगडी ते स्वागरेट या मार्गावरील प्रवाशांना स्वारगेटहून थेट विमानतळाकडे जाता येईल. शिवाय या मार्गावरील प्रवाशांना शिवाजीनगर-खराडी-विमानतळ हाही पर्याय उपलब्ध असेल. तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील प्रवाशांना शिवाजीनगरहून खराडी येथे आणि तेथून थेट विमानतळावर जाता येईल. शिवाय खडवासला-स्वारगेट-हडपसर या मार्गावरील प्रवाशांना थेट विमानतळावर पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे खराडी हब होणे संपूर्ण पुणे शहराच्या दृष्टीने आवश्यक आहे.

३) कात्रज ते हिंजवडी मेट्रो मार्गाचाही विचार व्हावा ! पुण्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूककोंडीची गंभीर समस्या होत असताना मेट्रोच्या नव्या मार्गांचाही तातडीने विचार होणे आवश्यक असून यात कात्रज ते हिंजवाडी या मार्गावर मेट्रोचा विचार करावा, असे सूचित केले आहे. या दोन्ही दरम्यानच्या भागात होणारा विकास, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज आणि भविष्याचे नियोजन या बाबींचा विचार करुन हा मार्ग होणे आवश्यक आहे. हा मार्ग झाल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांसाठी मेट्रोचे वर्तुळाकार मार्ग होऊ शकतील.

४) भूसारी कॉलनी, पीएमपी डेपो ते चांदणी चौक दुमजली उड्डाणपूलाची निर्मिती वनाज ते चांदणी चौक या मार्गावर वाहतूककोंडीचा विषय गंभीर असून वनाज ते चांदणी चौक हा मेट्रो मार्ग साकारताना तो दुमजली स्वरुपात करावा, जेणेकरुन या भागातील सर्वप्रकारची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. नळस्टॉप येथे दुमजली उड्डाणपुलाचा प्रयोग यशस्वी झाला असून वनाज ते चांदणी चौक या दरम्यानही दुमजली पूल आवश्यक आहे. त्यामुळे वनाज ते चांदणी चौक या मार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल.

वाहतूक कोंडी सोडवण्यास ‘मिशन १५’ हाती कोथरुडसाठी ३२५ कोटी निधी: चंद्रकांतदादा अन् अजितदादा यांच्यात सखोल चर्चा

0

कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मिसिंग लिंकससाठी आवश्यक निधी देण्यासंदर्भात निवेदन दिले.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे शहरातील रस्ते विकासामध्ये येणाऱ्या अडथळ्यांविषयी चर्चा करत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरातील रस्ते विकासासाठी आवश्यक तो निधी राज्य सरकारकडून दिला जाईल, अशी ग्वाही दिली.

पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ३३ प्रमुख रस्त्यांपैकी १५ प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी ‘मिशन १५’ हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी एकूण ८७० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, कोथरुड मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ३२५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यापैकी १५० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून अपेक्षित आहे.

पुणे शहराचा वेगाने होत असलेला विस्तार लक्षात घेता, येथील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे रस्ते सुधारणा, पुलांचे बांधकाम आणि वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. याकरिता राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नांतून तांत्रिक व प्रशासकीय अडथळे दूर करून विकासकामांना गती देऊन पुणेकरांच्या सोयीसाठी हे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल, असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.