Home Blog Page 171

शरद पवारांची ‘शॅडो कॅबिनेट’: हर्षवर्धन पाटील मोठ्या भूमिकेत महाराष्ट्र पिंजून काढा आणि…. दिले हे आदेश

0

मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शॅडो कॅबिनेटची निर्मिती करण्यात आली असून त्या माध्यमातून राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच पक्षाच्या नेत्यांवर विभागवार जबाबदारी देण्यात आली असून त्या नेत्यांना महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची मुंबईत बैठक पार पडली. त्यामध्ये पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर चर्चा करण्यात आली.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीला सर्व आमदारांची आणि खासदारांची उपस्थिती होती. पक्ष वाढीसाठी काही प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. जयप्रकाश दांडेगावकर, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, रोहित पवार, एकनाथ खडसे, हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाने जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे.

या नेत्यांनी प्रत्येक महिन्यात जिल्ह्यांचे दौरे करून आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला संधी देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. जिथे रिक्त पद असतील तिथे पद भरली जाणार आहेत. पदाधिकारी बदलायची जर गरज वाटत असेल तर पदाधिकारी देखील बदलले जातील.

पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी नव्या उमेदीने कामाला लागण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या आहेत. पुढच्या तीन महिन्यात महाराष्ट्र पिंजून काढा आणि त्याचा अहवाल द्या असे आदेश पवारांनी नेत्यांना दिले आहेत.

कोणाकडे कोणती जबाबदारी?

मराठवाडा- राजेश टोपे आणि जयप्रकाश दांडेगांवकर

विदर्भ- राजेंद्र शिंगणे आणि अनिल देशमुख.

कोकण- जितेंद्र आव्हाड आणि सुनिल भुसारा.

प. महाराष्ट्र- हर्षवर्धन पाटील .

उत्तर महाराष्ट्र- हर्षवर्धन पाटील.

या बैठकीबाबत पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय झाले. त्यामध्ये सरकारच्या पहिल्या 100 दिवtसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवणारी टास्क टीम तयार करण्यात आली. तसंच विभागनिहाय जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं असून 7-8 मार्चपासून या नेत्यांना विभागनिहाय दौरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय हा महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होईल. या अधिवेशनात विरोधी पक्ष नेतेपदाबाबत जो प्रस्ताव दिला जाईल त्यावर सरकारनंही विचार करावा असा ठराव या बैठकीत मांडण्यात आला आहे.”

युवक अध्यक्षपदी फहाद अहमद

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी फहाद अहमद यांची निवड करण्यात आली आहे. फहाद अहमद यांनी नुकतीच पक्षाकडून अणुशक्तीनगर विधानसभेची निवडणूक लढली होती. फहाद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती आहेत. त्यांची युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेस तंत्रज्ञानच आधारस्तंभ! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला विकासाचा रोडमॅप

0

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या धोरणांमुळे राज्य हे देशाच्या स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. जेव्हा आपण ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहतो, तेव्हा तंत्रज्ञान हा विकासाचा मुख्य आधारस्तंभ असतो. फिनटेक आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्सला गती देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी  दिली आहे. मुंबई टेक वीक 2025चा आज (28 फेब्रुवारी) शुभारंभ झाला. या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी  महाराष्ट्राच्या विकासाचे भविष्यातील रोडमॅप आणि राज्य सरकारच्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  कौशल, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत एम.एम.आर.डी.ए. आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. एम.एम.आर.डी.ए. ने एन.पी.सी.आय. ला मुंबईतील बीकेसी येथे त्यांच्या जागतिक मुख्यालयाच्या उभारणीसाठी भूखंड प्रदान केला. आपले सरकार व्हॉट्सअँप चॅटबॉट संदर्भात माहिती तंत्रज्ञान विभाग आणि मेटा यांच्यामध्ये तसेच  कौशल, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता  विभाग आणि TEAM सोबत नॉलेज AI हब संदर्भात सामंजस्य करार झाला. त्याचबरोबर उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक संग्रहालयाची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.

आगामी वर्षांत तीन मोठ्या पायाभूत सुविधाकडे विशेष लक्ष

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, वॉर रूममुळे प्रकल्पांच्या निर्णय प्रक्रियेला वेग मिळला आहे. पूर्वी मुंबईत एखादा प्रकल्प सुरू करण्यासाठी 18 विविध सरकारी यंत्रणांची परवानगी घ्यावी लागायची, त्यामुळे प्रकल्पांना विलंब होत असे. वॉर रूमच्या माध्यमातून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी एकत्र आणले आणि त्वरित निर्णय घेण्यास सुरुवात केली. याच कारणामुळे मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू यासारख्या प्रकल्पांना गती मिळाली, असे फडणवीस म्हणाले.

आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र सरकार तीन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. यात वाढवण बंदर  हा प्रकल्प मुंबईच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडविणारा आहे. हा पोर्ट सध्याच्या जे.एन.पी.टी.पेक्षा तीनपट मोठा असून, 20 मीटर खोल बंदर असल्यामुळे जगातील सर्वात मोठी जहाजे येथे थांबू शकतील. भारताला जागतिक सागरी व्यापारात महत्त्वाचे स्थान मिळवून देणारा हा बंदर प्रकल्प असेल. त्याच बरोबर  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व नव्या स्मार्ट सिटीची उभारणीवर लक्ष केंद्रित करणार आहे. हे विमानतळ पूर्ण झाल्यावर आजूबाजूला एक नवीन व्यापारी आणि तंत्रज्ञान केंद्र विकसित केले जाणार आहे. ही नवी शहरे मुंबईच्या तुलनेत तीनपट मोठी असतील आणि उद्योगांसाठी उत्तम संधी उपलब्ध करतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा आणि गोदावरी जलप्रकल्प हाती घेतले जात आहेत. या प्रकल्पांमुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेती उत्पादन वाढणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

भविष्यात 70% गुन्हे हे सायबर गुन्हे असतील

राज्यातील सायबर सुरक्षा उपाययोजना संदर्भात उत्तर देताना  फडणवीस म्हणाले की, आज जगभरातील गुन्हेगारी सायबर जगतात शिफ्ट होत आहे. भविष्यात 70% गुन्हे हे सायबर गुन्हे असतील. त्यामुळे नवी मुंबईत भारतातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र उभारले आहे. सर्व बँका, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांना या यंत्रणेशी जोडले असल्याने आता कोणत्याही आर्थिक फसवणुकीवर तत्काळ कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 2000 ते 2014 दरम्यान महाराष्ट्रात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुंतवणूक कमी झाल्यामुळे अनेक आयटी कंपन्या बंगळुरू आणि हैदराबादकडे वळल्या. मात्र, अटल सेतूसारख्या प्रकल्पांमुळे नवी मुंबई आता एक नवे तंत्रज्ञान केंद्र बनत असल्याचे त्यांनी सांगितले.  मुंबईच्या भविष्यातील विकास आराखड्यावर भाष्य करताना श्री.फडणवीस यांनी सांगितले की, आजच्या मुंबईत व्यावसायिक जागांची कमतरता असल्यामुळे  नवी मुंबई, नवीन ठाणे आणि वाढवण येथे नवीन शहरे उभारली जाणार आहे. त्यामुळे उद्योगांना अधिक जागा उपलब्ध होईल आणि मुंबईतील दडपण कमी होईल, असेही ते म्हणाले.

मनोज कुमार शर्मांकडे मोठी जबाबदारी, यशस्वी यादवांना सायबरमध्ये बढती, 13 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

0

मुंबई : एकीकडे राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असताना आता 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. तशा पद्धतीचा जीआर राज्याच्या गृहखात्याने काढला आहे. त्यामध्ये मनोज कुमार शर्मा यांची राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते. त्याचसोबत आर बी डहाळे यांची राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनीतून राज्य गुन्हे अभिलेख केंद्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदावर बदली करण्यात आली आहे.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी यशस्वी यादव यांची सायबर सेलच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदावरून पदोन्नती झाली असून त्यांच्याकडे आता सायबर सेलच्या अपर पोलिस महासंचालकपदाचा पदभार असणार आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या?

मनोज कुमार शर्मां- विशेष पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था

आर बी डहाळे – विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अभिलेख केंद्र

शोक मोराळे – विशेष पोलिस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग

राजीव जैन –  विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल

निखील गुप्ता – अपर पोलिस महसंचालक, कायदा आणि सुव्यवस्था

सूरेश मेखला – अपर पोलिस महसंचालक, आर्थिक गुन्हे शाखा

यशस्वी यादव – अपर पोलिस महासंचालक, सायबर सेल

सुहास वारके – अपर पोलिस महासंचालक, कारागृह आणि सुधारसेवा

अश्वती दोर्जे – अपर पोलिस महासंचालक, महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग

छेरिंग दोर्जे – अपर पोलिस महासंचालक, विशेष अभियान

के एम मल्लिकार्जुन – अपर पोलिस महासंचालक, प्रशासन

अभिषेक त्रिमुखे – अपर पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग

श्रेणिक लोढा – अपर पोलिस अधीक्षक, खामगाव बुलढाणा

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका

राज्यात नवीन सरकार आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्यांचे आदेश निघाले. त्यानुसार आतापर्यंत अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

कोकणमध्ये फिरण्याचा प्लॅन नकोच; कोकणपट्ट्यात 5 जिल्ह्यांना IMD चे पुढील 3 दिवस Yellow Alert जारी 

0

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवत असून मुंबईसह राज्यातील 5 जिल्ह्यांना तापमानाचे तीव्र इशारे देण्यात आले आहेत. राज्यातील बहुतांश भागांत फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. पुढील काही दिवसांत तापमानात मोठी वाढ होणार असून राज्यभरातील नागरिकांना उष्णतेच्या झळा जाणवणार असल्याचे हवामान विभगाने सांगितले.

राज्यात आता पावसाची शक्यता ओसरली असून पुढील 5 दिवस कोरडे हवामान राहणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या चार दिवसात तापमान 36-38 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. कोकणातही किमान व कमाल तापमानात कमालीची वाढ झाली असून येत्या 3 दिवसांत 2-3 अंशांनी कमाल तापमानात वाढ होणार असल्याचं सांगण्यात आलंय. विदर्भात येत्या तीन दिवसांत तापमान चढेच राहणार असून त्यानंतर तापमान 2-4 अंश सेल्सियसने वाढणार आहे.

सर्वाधिक तापमानाच्या नोंदी

कोकण गोवा  सामान्य तापमानाच्या तुलनेत 3-5 अंश सेल्सियसहून अधिक तापमानाची नोंद करण्यात आली. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही भागात तापमानाचा पारा 1-3 अंशांनी अधिक होता. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावाने देशात इशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये 1-3 अंशांने तापमानात वाढ झाली. कोकण गोव्यात 3-5 अंशांनी तापमान चढे होते. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 35-39 अंशांवर राहिला. विदर्भासह कोकणात सर्वाधिक तापमानाच्या नोंदी झाल्या. 23 फेब्रुवारीला रत्नागिरीत सर्वाधिक 38.4 अंश तापमानाची नोंद झाली. कोकणात सामान्य तापमानाहून साधारण 5 अंश सेल्सियसने अधिक तापमानाची नोंद झाली.

हवामान विभागाचा अंदाज काय?

सध्या नव्याने चक्राकार वाऱ्यांसह पश्चिमी चक्रावात तयार होत असून हिमालयीन प्रदेशातून आर्द्रता कमी होत जाणार असून अरबी समुद्रात 25-28 तारखेपर्यंत सक्रीय राहणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. याचा परिणाम महाराष्ट्रावरही अल्प प्रमाणात झाला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी राहणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार, काही भागात ढगाळ वातावरण होते. काही भागात तापमात उर्वरित राज्याच्या तापमानाच्या तुलनेत कमी वाढ झाली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आता कोकण-गोव्यात 25 फेब्रुवारीपर्यंत प्रचंड उष्ण आणि आर्द्रता राहणार असून घामाच्या धारा आणि उकाड्याने नागरिक हैराण होणार आहेत. दक्षिण कोकण पट्ट्यात येत्या 3 दिवसांत प्रचंड उष्णता जाणवणार असल्याचं सांगण्यात आलंय.

राज्यात पुढील दोन दिवस तापमानाचे यलो अलर्ट

प्रादेशिक हवामान विभागाने राज्यात मुंबई, पालघरसह कोकण पट्ट्यात तीव्र हवामानाचे इशारे दिले आहेत. पाच जिल्ह्यांना उष्ण आणि आर्द्र हवामानाचे यलो अलर्ट देण्यात आले असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये तीव्र तापमान बदलामुळे नागरिकांना उष्णतेच्या चटक्यासह आर्द्र हवामानामुळे उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे. राज्यातील बहुतांश भागांत फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत उष्णतेचा प्रभाव अधिक आहे. पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पुणे विभागाचे हवामान विभागाचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी X माध्यमावर पोस्ट करत अंदाज वर्तवला आहे.

राज्यात रविवारी सर्वाधिक तापमानाच्या नोंदी

शहादा, नंदुरबार – 42.3°

करजत, रायगड – 39.9°C

INS शिवाजी, लोनावळा (पुणे) – 39.8°C

मुंबई सांताक्रूझ – 37.7°C

औरंगाबाद – 37.2°C

चंद्रपूर – 37.2°C

अकोला – 39.5°C

सोलापूर – 39.4°C

तळेगाव (पुणे) – 38.7°C

रत्नागिरी AWS – 38.2°C

पालकमंत्रीपद बंडखोरांच्या तलवारी म्यान? घोडे गंगेत न्हाले,  मुख्यमंत्र्यांची शिष्टाई कामी? पडद्यामागे काय घडामोडी?

0

नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. नाशिकमध्ये दादा भुसे आशावादी आहेत तर दुसरीकडे आदिती तटकरे यांच्या जागेवर ऐवजी भरत शेठ गोगावले यांचा दावा कायम आहे. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्याने भाजपासाठी ही मोठी संधी आहे. त्यासाठीचे मोठे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे भाजप नाशिकचे पालकमंत्री पद सहजासहजी सोडेल असे वाटत नाही. गेल्या दोन दिवसांपासून गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री असल्याचे संकेत भाजपाच्या गोटातून देण्यात येत आहे. तर आज तशी बॅनरबाजी पण करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रायगड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

एकाच वाहनातून प्रवास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर आहेत. दोघांनी महाड येथील चवदार तळ्याला भेट दिली. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला जात असताना फडणवीस यांनी त्यांच्या वाहनात एकनाथ शिंदे, भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांना सोबत घेतले. चार जणांनी एकाच वाहनातून प्रवास केल्याने पालकमंत्री पदावर तोडगा निघण्याची शक्यता वाढल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आता एकनाथ शिंदे अथवा अजितदादा यापैकी कोण तोडग्यावर राजी होते आणि एक पाऊल मागे घेते हे लवकरच समोर येईल.

गिरीश महाजन यांचे बॅनर चर्चेत

गेल्या दोन दिवसांपासून भाजप नेते गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री असल्याचे संकेत भाजपाच्या गोटातून समोर येत आहेत. तर आज मंत्री गिरीश महाजन यांचे नाशिकमध्ये लागलेले बॅनर चर्चेत आले आहे. हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री आशयाचे बॅनर शहरात लागले आहे. पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाही समर्थकांकडून बॅनरबाजी सुरू आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा नाशिकचा कारभार गिरीश महाजन यांच्याकडे येणार अशी भाजपच्या गोटात चर्चा सुरू आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होणार अशी चर्चा असतानाच ही बॅनरबाजी होत आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांसह इतर ठिकाणच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

वारजे साहित्य कट्ट्या तर्फे मराठी भाषा गौरव दीनचे आयोजन.. मराठी स्वाक्षरी अभियानात नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

0

वारजे : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वारजे साहित्य कट्ट्याच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी स्वाक्षरी अभियानात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांनी एकमेकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देत मराठीतून स्वाक्षरी केल्या.

माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिलाच मराठी भाषा गौरव दीन असल्याने वारजे परिसरातील नागरिकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मराठी भाषा ही आपली मातृभाषा असून तीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळे आपली मातृभाषा टिकावी आणि ती आणखी समृद्ध व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करावा असे आवाहन बाबा धुमाळ यांनी यावेळी केले.

डी. के. जोशी, नंदकुमार बोधाई, मानसी नलावडे, सुरेश जाधव, महादेव गायकवाड, एस. आर. पाटील, वि दा पिंगळे, राजेंद्र वाघ, महेश कुलकर्णी, अनिल गायकवाड, आप्पा लंगडे, जयंत मोहिते यावेळी उपस्थिती होते.पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती अंतर्गत चालणारा वारजेतील साहित्य कट्टा हा पुणे शहरातील सर्वात जास्त मराठी भाषा संवर्धनासाठी उपक्रम राबवणार कट्टा असून सातत्याने साहित्य विषयक कार्यक्रम या कट्ट्यावर राबवले जात असतात. वारजेतील नवोदित साहित्यिक, कवी, कलावंतांना हक्काच व्यासपीठ मिळावं म्हणून बाबा धुमाळ व दिपाली धुमाळ यांच्या पाठपुराव्यातून या साहित्य कट्टा वारजेची निर्मिती झाली आहे.

याच महिन्यात साहित्य कट्टा वारजे ने घेतलेले दुसरे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले होते. जेष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी या संमेलनाचे अध्यक्ष भूषवले होते. मोठ्या उत्साही वातावरणात हे एकदिवसीय संमेलन वारजेकरांच्या उपस्थिती संपन्न झाले होते. असे एक दिवसीय साहित्य संमेलन घेणारा वारजे साहित्य कट्टा हा एकमेव साहित्य कट्टा आहे.

वनाझ परिवार शिव मंदिरामध्ये शिवभक्तांचा महापूर…  महाशिवरात्री उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

0

तमाम कोथरूडवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या वनाझ परिवार शिव मंदिरामध्ये गेली दोन दिवस महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी भल्या पहाटे पाच वाजल्यापासून शंभू महादेवाच्या लघुरुद्र अभिषेकाला सुरुवात झाली. आळंदी येथील वारकऱ्यांच्या साथीने व वनाझ

परिवार भजनी मंडळाच्या साथीने सकाळी ९ वाजता पालखी ला शिव मंदिरातून सुरुवात करून आझाद नगर गुजरात कॉलनी वनाझ कॉर्नर पौड रोड मार्गे पुन्हा वनाझ परिवारामध्ये अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मंदिर आणि परिसरामध्ये केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेतले. मंदिर आणि गाभाऱ्यामध्ये देखील सुंदर सजावट करण्यात आली होती. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ९ वाजता ह भ प यशवंत महाराज फाले यांचे काल्याचे किर्तन पार पडले तर ११ वाजता महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. कोथरूड आणि परिसरातील सुमारे ५००० भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

दिवसेंदिवस वनाझ परिवार शिव मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांच्या पत्नी सौ. मोनिका मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसेचे सरचिटणीस ॲड. किशोर शिंदे, कोथरूड पोलीस स्टेशनचे एपीआय बालाजी सानप साहेब यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या उत्सवाला आवर्जून उपस्थित होते. समस्त वनाझ परिवारातील असंख्य महिला भगिनी ,ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांच्या सहकार्याने हा महाशिवरातील उत्सव यशस्वीरित्या पार पडला अशी माहिती वनाझ शिवशंभो सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरूड उपविभाग अध्यक्ष संजय काळे यांनी दिली.

प्रतिष्ठानचे उत्सव प्रमुख युवराज गायकवाड,कार्याध्यक्ष दीपक कुल, सचिव विकास जाधव, जनार्दन सातपुते, बाबासाहेब गायकवाड, मिलिंद देशपांडे, यतिन घरत, विशाल उभे, महेश यादव,श्याम सुर्वे,विकास पंदिरे,संतोष बाईत ,महेश कांबळे‌ आणि सल्लागार विनायक पवार, केदार घाटे यांच्या प्रयत्नातून महाशिवरात्री उत्सव यशस्वी करण्यात आला.

वेदम स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी भारतातील संगणक विज्ञान शिक्षणात क्रांतीसाठी सज्ज

0

 

पुणे: वेदम स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी (SOT) एक प्रीमियर अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम लॉन्च करत आहे, जो भारतातील संगणक विज्ञान शिक्षणाचे पारंपरिक नियम बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे.  उद्योगसज्ज पदवीधर घडवण्यावर भर देणाऱ्या वेदमचा अभ्यासक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने तयार केला गेला आहे आणि पहिल्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळेल. विद्यार्थी यूजीसी-मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बी.टेक इन कंप्युटर सायन्स ही पदवी मिळवतील.

“कोडिंग पहिल्याच दिवसापासून सुरू होते” या तत्त्वावर आधारलेले वेदम पारंपरिक संकल्पनांपासून वेगळा दृष्टिकोन स्वीकारतो आणि वास्तविक जगातील समस्यांचे निराकरण करण्यावर भर देतो. विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रमात 1,00,000 हून अधिक ओळींचे कोडिंग करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे ते 2029 आणि त्यापलीकडील तंत्रज्ञान क्षेत्रासाठी सुसज्ज होतील.वेदमच्या नेतृत्वानुसार, संस्थेचे ध्येय कठोर कोडिंग अभ्यासक्रम आणि उद्योगातील आघाडीच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन यांच्या मदतीने समस्या सोडवणारे आणि नवप्रवर्तक घडवणे हे आहे.

“वेदम स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीद्वारे आम्ही भारतातील संगणक विज्ञान शिक्षणासाठी एक नवीन मापदंड निश्चित करू इच्छितो. कठोर, व्यावहारिक कोडिंग अभ्यासक्रम आणि उद्योगातील दिग्गजांकडून मार्गदर्शन यांच्या संयोगाने, आम्ही विद्यार्थ्यांना नवप्रवर्तन व उत्कृष्टता साध्य करण्यासाठी आवश्यक कौशल्यांनी सज्ज करत आहोत. आमचा भर भविष्यातील तंत्रज्ञान घडवणाऱ्या समस्यासोधक पिढीच्या जडणघडणीवर आहे,” असे पीयूष नांग्रू, सह-संस्थापक आणि सीओओ, वेदम यांनी सांगितले.

सर्जनशीलता आणि नाविन्य वाढवण्यासाठी अत्याधुनिक सुविधा वेदम SOT विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी परिसर उपलब्ध करून देतो, जिथे सर्जनशीलता, सहयोग आणि नाविन्याला चालना मिळते. संस्थेच्या सुविधांमध्ये समाविष्ट आहे:

प्रेरणादायी वर्गखोल्या – सहयोग आणि सर्जनशील विचारांना चालना देण्यासाठी

ब्रेकआउट लॅब्स – प्रत्यक्ष प्रयोगांसाठी

कोडिंग डेन्स – सखोल विचार व कोडिंग मॅरेथॉनसाठी

हँगआउट क्षेत्रे – विद्यार्थी-विद्यार्थी शिकण्यास आणि नेटवर्किंगसाठी

Apple MacBooks – प्रत्येक विद्यार्थ्याला उत्कृष्ट कोडिंग अनुभव देण्यासाठी

ही संस्था केवळ टॉप ५% अर्जदारांना निवडते, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रतिस्पर्धात्मक पण सहयोगी वातावरणात शिकण्याचा अनुभव मिळेल.

जागतिक संधी आणि उद्योगसज्जता

वर्गातील शिक्षणापलीकडे, वेदम विद्यार्थ्यांना Google Summer of Code, आंतरराष्ट्रीय टेक कॉन्फरन्स आणि ग्लोबल हॅकाथॉन यांसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी संधी देते. उच्च दर्जाच्या प्लेसमेंट तयारीवर भर असल्याने, विद्यार्थी जगभरातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सहज नोकरी मिळवू शकतील.

वेदम स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी भारताच्या तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रात एक नवीन पर्व सुरू करण्यास सज्ज आहे. नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि उद्योग-केंद्रित शिकवणीच्या मदतीने, पुढील पिढीचे नवप्रवर्तक आणि तंत्रज्ञान नेते घडवण्याचे वेदमचे उद्दिष्ट आहे.

उद्योजकांची पुढाकार घेतलेली संस्था वेदम स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी ही आशिष मुञ्जाल, पीयूष नांग्रू आणि अंकुर जैन या अनुभवी उद्योजकांनी स्थापन केली आहे. Series C फंडिंग प्राप्त उच्च शिक्षण क्षेत्रातील एका कंपनीचे ६ वर्षांपेक्षा जास्त काळ यशस्वीपणे संचालन केल्यानंतर, ज्यामध्ये १०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले, त्यांनी वेदमच्या माध्यमातून भारतातील संगणक विज्ञान शिक्षणाचे भविष्य बदलण्याचा संकल्प केला आहे.

स्वारगेट शिवशाही बस बलात्कार प्रकरणातील आरोपी अखेर सापडला; कुठे लपला होता?

0

स्वारगेट बसस्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून बेड्या ठोकण्यात आल्या. दत्तात्रय गाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी दत्तात्रय गाडे याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते. तसेच गावकऱ्यांनी त्याला गावात पहिल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी गुनाट या गावातच त्याचा शोध घेण्याची ठरवले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. आणि गुनाट गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू झाला. ड्रोनच्या माध्यमातून उसाच्या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र सायंकाळपर्यंत तो सापडला नव्हता. अखेर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला.

दरम्यान स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेला दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १३ पथके रवाना करण्यात आली होती. तसेच डॉगस्कॉड, ड्रोनच्या साहाय्यानेही आरोपीची शोधमोहीम सुरु आहे. घटनेच्या दोन दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी न सापडल्याने, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

बलात्कार केल्यानंतर आरोपी गाडे थेट जन्मगाव असलेल्या शिरूर तालुक्यातील गुणाट गाव परिसरात गेल्याची माहिती समोर आली होती. इतकच नाही तर आरोपी याच परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची ही शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत

होती. त्या दृष्टीने पोलिसांनी श्वान पथक बोलावून त्या मार्फत आरोपीचा शोध घेतला जात होता. अखेर शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांच्या हाताला लागला. त्याला घेऊन पोलिसांची पथक आता पुण्याच्या दिशेने निघाले आहे.

वाल्मिक गँगचा बाजार उठणार, हत्येचा संपूर्ण तपशील या दोषारोप पत्रातून उलगडणार आरोपपत्रातले 2 महत्त्वाचे मुद्दे

0

बीड :  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अखेरीस पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे.  दोन महिन्यानंतर पोलिसांनी 1500 पानाचं हे आरोपपत्र  बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात सीआयडीने दाखल केलं आहे. या आरोप पत्रात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सत्य समोर येणार आहे.

बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्येने महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. राज्यभर आंदोलनं झाली, संतोष देशमुख कुटुंबाने आक्रमक भूमिका घेतली. आता मात्र, या हत्येचा संपूर्ण तपशील या दोषारोप पत्रातून उलगडणार आहे. सीआयडीच्या तपासानुसार, खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचा सहभाग आहे का? हे तपासातून स्पष्ट होईल. “या प्रकरणात सात आरोपींनी कशा प्रकारे कट रचला, हत्या केली आणि त्याचा गुन्हेगारी इतिहास काय आहे, यासंबंधी पुरावे चौकशीतून समोर येणार आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची नियुक्ती

आरोपींनी हत्येसाठी वापरलेली शस्त्रं कोणती? हल्ला कसा झाला? हत्येची वेळ आणि ठिकाण कोणतं? हेही दोषारोप पत्रातून उघड होईल. तसंच, आरोपी फरार होण्यात कोणाच्या मदतीने यशस्वी झाले आणि त्यानंतर ते कुठे लपलं होतं? याचाही तपास करण्यात आला आहे. याशिवाय, कुठल्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला? याचाही तपास सीआयडीने केला आहे. याच प्रकरणाशी संबंधित खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांमध्ये काही संबंध आहे का? याचाही तपास करण्यात आला आहे.

डिजिटल पुराव्यांमधून (CDR डेटा) कोणाशी संपर्क झाला? वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेच्या संघटित गुन्हेगारीतील आणखी काही बाबीसमोर येणार का? आरोपींनी खंडणीमधून मिळवलेल्या संपत्तीचा तपास कोणत्या टप्प्यावर आहे? “आम्हाला न्याय हवा! हा गुन्हा फक्त एका व्यक्तीने नाही, तर एका मोठ्या टोळीने केला आहे. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे.”

संतोष देशमुख हत्या प्रकरण दोषारोप पत्रातील ठळक बाबी

1. बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात CID ने 1500 पानी दोषारोप पत्र दाखल केले.

दोषारोप पत्रातून हत्येच्या कटाचे सत्य समोर येण्याची शक्यता.

हत्येचा मूळ कारण आणि गुन्हेगारी कनेक्शन स्पष्ट होणार

2. संतोष देशमुख यांची हत्या – कारण आणि पद्धत

खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यामुळे हत्या केल्याचा आरोप.

अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या कशी करण्यात आली याचे तपशील.

हत्येसाठी वापरलेली शस्त्रे आणि गुन्ह्याची पद्धत समोर येणार.

3. हत्येचा कट आणि आरोपींचा सहभाग

सात आरोपींनी कट कसा रचला आणि अंमलात आणला याचे पुरावे.

आरोपींच्या सहभागासंदर्भातील डिजिटल पुरावे आणि सीडीआर.

हत्याकांडामध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे याचा तपास.

4. वाल्मीक कराड आणि इतर आरोपींची भूमिका

वाल्मीक कराड आणि विष्णू चाटेचा हत्येत सहभाग आहे का?

खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या प्रकरण यांचा परस्पर संबंध

वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेच्या संघटित गुन्हेगारीचा तपास

5. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी व सहकारी

आरोपींनी फरार होण्यासाठी कोणी मदत केली?

आरोपी फरार झाल्यानंतर कुठे होते आणि त्यांनी काय केले?

आरोपींनी याआधी कोणते गुन्हे केले याची माहिती

6. पोलीस प्रशासनातील भूमिकेची चौकशी

पोलीस अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली का?

CID च्या तपासातून पोलिसांची भूमिका दोषी ठरणार का?

7. खंडणी प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार

वाल्मिक कराडने खंडणीतून मिळवलेल्या संपत्तीचा तपास

आर्थिक व्यवहार, जमिनीच्या खरेदी-विक्रीचा शोध.

8. आरोपींच्या संघटित गुन्हेगारीचे प्रकार

हत्येशिवाय अन्य गुन्हेगारी कृत्ये घडली होती का?

आरोपींनी अन्य कोणते मोठे गुन्हे केले आहेत याचा शोध

हे सर्व मुद्दे दोषारोपपत्राच्या माध्यमातून समोर येण्याची शक्यता आहे