Home Blog Page 164

संतोष देशमुखांचा पोस्टमार्ट्म रिपोर्ट समोर! पायखालची जमीनही हादरून जाईल; अत्यंत धक्कदायक माहिती समोर

0

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळेस काढलेले फोटो हे चार्जशीटमधून समोर आल्यानंतर अवघा महाराष्ट्र हा हादरून गेला. ज्यामुळे राज्यात संपाची लाट निर्माण झाली. ज्यानंतर मंत्री धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. असं असताना आता संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल देखील चार्जशीटमधून समोर आला आहे. संतोष देशमुख यांना किती निर्घृण पद्धतीने मारण्यात आलं हेच या अहवालातून समोर येत आहे.

संतोष देशमुखांचा पोस्टमार्टम रिपोर्ट पाहून तुम्हीही जाल हादरून

खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच संतोष देशमुख यांच्या शरीराच्या बहुतांशी भागावर अत्यंत गंभीर स्वरूपाच्या अशा जखमा आहेत. संतोष देशमुख यांना एवढ्या अमानुषपणे मारहाण करण्यात आली की, त्यांचं अवघं शरीर हे काळं-निळं पडलं होतं. त्यांच्या नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण झाल्याचे अहवालामधून समोर आलं आहे.

पोस्टमार्टम अहवालातील महत्त्वाचे मुद्दे- 

  • सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे हे आता        उजेडात आले आहेत.
  • मारहाणीची तीव्रता दाखवणारा अत्यंत धक्कादायक शवविच्छेदन अहवाल हा समोर आला आहे.
  • सरपंच संतोष देशमुख यांना अत्यंत हाल-हाल करून मारण्यात आले. संतोष देशमुख यांची हत्या ही जबर                 मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • संतोष देशमुख यांच्या नाकातून रक्त येईपर्यंत मारहाण करण्यात आल्याचं अहवालात नमूद करण्यात आला आहे.
  • जबर मारहाणीमुळे देशमुख यांचे संपूर्ण शरीर काळनिळं पडल्याचे अहवालात नमूद
  • संतोष देशमुख यांच्या शरीरावर बहुतांश भागात गंभीर स्वरूपाच्या जखमा.
  • संतोष देशमुख यांच्या हनुवटी, कपाळ दोन्ही गालावर गंभीर स्वरूपाच्या जखमा.
  • देशमुख यांच्या पोटावर बेदम मारहाण केल्याने नाकातून रक्तस्त्राव
  • याशिवाय छाती, गळ्यावर आणि गळ्याच्या समोर अत्यंत गंभीर जखमा
  • छातीवर उजव्या आणि डाव्या बाजूला तसेच बरगड्यांवर गंभीर स्वरूपाची मारहाण ज्यामुळे अंतर्गत जखमा.
  • संतोष देशमुख यांच्या डाव्या खांद्यावर मोठ्या जखमा. तसेच दंड., कोपरा, मनगट, हाताच्या मुठीवरही गंभीर              स्वरूपाच्या जखमा.
  • संतोष देशमुख यांना करण्यात आलेल्या मारहाणीमुळे हात काळानिळा पडला असून त्यांच्या पोटऱ्याही काळ्या-       निळ्या पडल्या आहेत.
  • संतोषथ देशमुख यांच्या डाव्या खांद्यावर गंभीर स्वरूपाच्या मारहाणीच्या जखमा.
  • मांडी, गुडघा, नडगी आणि बरगड्यांवर बेदम मारहाण
  • गंभीर स्वरूपाच्या मारहाणीमुळे संतोष देशमुख यांची पाठ काळी निळी
  • संतोष देशमुख यांना केलेल्या जबर मारहाणीमुळे त्यांच्या शरीरात जवळपास दोन ते अडीच लिटर रक्त साचलं            होतं.
  • संतोष देशमुख यांना अडीच ते तीन तास जबर मारहाण झाल्याची अहवालातून माहिती.

कोर्टासमोर 1400 पानांचं चार्जशीट

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ सीआयडीने 1400 पानांच्या दोषारोप पत्रामध्ये सादर केले आहेत. हे फोटो देखील समोर आले. मात्र, आता संतोष देशमुख यांच्या किती क्रूरतेने मारण्यात आलं त्याचा शवविच्छेदन अहवालच समोर आला आहे.

चार्जशीटमध्ये शवविच्छेदन अहवालाबाबतची माहिती देण्यात आली आहे. गंभीर स्वरूपाच्या मारहाणीमुळे जवळपास दोन ते अडीच लिटर रक्त हे संतोष देशमुख यांच्या शरीरामध्ये साचले होते. संतोष देशमुख यांना जवळजवळ अडीच ते तीन तास मारहाण सुरू होती या गंभीर मारहाणीमुळेच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्याची माहिती अहवालामधून समोर आली आहे.

‘स्वत:ची घालवली आमची पण घालवली’…या अपमानाने सुदर्शन घुले पेटला; हत्येच्या 24 तास आधी गँगमध्ये भांडणं

0

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या पाच गोपनीय साक्षीदारांचे जवाब महत्त्वाचे ठरले. ते जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले आहेत. ज्यामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येचा कट कसा कुठे आणि कधी रचला हे स्पष्ट झालंय.. संतोष देशमुख हत्या प्रकरणात हा जबाब मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे.गोपनीय साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार हत्येच्या एक दिवस अगोदर विष्णू चाटेने तिरंगा हॉटेलवर सुदर्शन घुलेची  चांगलीच शाळा घेतली होती. स्वतःची इज्जत घालवलीस व आमची पण घालवलीस, असे म्हणत संताप व्यक्त केला. ही बाब चार्जशीटमधून समोर आली आहे.

आवादा कंपनीच्या बाहेर सरपंच संतोष देशमुख यांनी मस्साजोगकर ग्रामस्थांच्या मदतीने सुदर्शन घुलेला हाकलून दिले होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे वाल्मिक कराडच्या गँगला त्यांच्या टोळीची दहशत कमी होण्याची भीती वाटत होती. आज एकाने केले उद्या कोणी टोळीतील सदस्यांना घाबरणार नाही, त्यामुळे विष्णू चाटेने घडलेला प्रकाराबद्दल सुदर्शन घुलेला भेटण्यासाठी बोलवले आणि त्याची कानउघडणी केली.

नेमका विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेमध्ये काय संवाद झाला?

विष्णू चाटे : आम्ही कमवायचे आणि तुम्ही वाटोळे करायचे, स्वतःची इज्जत घालवलीस व आमची पण घालवलीस… तुला प्लान्ट बंद करायला पाठवले होते, तो तुम्ही बंद केला नाही, उलट हात हालवत परत आला.

सुदर्शन घुले : आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो. तेथे संतोष देशमुख आला व त्याने आम्हास कंपनी बंद करु दिली नाही तसेच मस्साजोगच्या गावातील लोकांनी आम्हाला हाकलून लावलं.

विष्णू चाटे: वाल्मीक अण्णांचा निरोप आहे की, कामही बंद केले नाही. खंडणीही दिली नाही. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. इतरांना संदेश जाईल की, आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर काय परिणाम होतात. वाल्मिक अण्णांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा.

तिरंगा हॉटेलमध्ये झाली होती भेट

8 डिसेंबरला सायंकाळी 7 ते 8 च्या सुमारास विष्णु चाटे आणि सुदर्शन घुलेची भेट नांदुर फाटा येथे तिरंगा हॉटेलमध्ये येथे झाली होती.

पप्पांनी सांगितलं काही बरे वाईट झाले तर आई व विराजची काळजी घे, विष्णू चाटेचा फोन आलाय: वैभवीचा जबाब

0

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर आरोप निश्चिती करून सदर दोषारोपपत्र गुन्हे अन्वेषण विभाग आणि विशेष तपास पथकाने बीडच्या न्यायालयात सादर केले आहे. या दोषारोपपत्रातून नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. दोषारोपपत्रात देशमुख यांना मारतानाचे मारेकऱ्यांचे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. त्यानंतर आता दोषारोपत्रातील देशमुख यांची लेक वैभवीचा पोलीस जबाबही समोर आला आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे मूळ आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशमुख यांनी खंडणी प्रकरणात मध्यस्थी केल्यानेच वाल्मिक आणि त्याच्या टोळीला राग आला होता. एका साध्या सरपंचाने आपली खंडणी रोखली, याचा राग मनात धरूनच कराड गँगने त्यांची हत्या केल्याचे दोषारोपपत्रातून समोर आले आहे. याचसंदर्भातील सरपंच देशमुख यांना आलेल्या विष्णू चाटेच्या फोनसंबंधीचा जबाब वैभवीने पोलिसांना दिला आहे.

लातूरला आले, खूप अस्वस्थ होते, मी सारखं विचारत होते, पप्पा काय झालंय…?

वैभवीने पोलिसांना सांगितले, माझे काका-काकू आणि आजी-आजोबा मस्साजोगला राहायचे परंतु शिक्षणासाठी माझ्या आई आणि भावासोबत मी लातूरला राहायचे. त्यामुळे माझे पप्पा नेहमीच आम्हाला भेटण्यासाठी लातूरला यायचे. ०७ डिसेंबर २०२४ रोजी रात्री उशिरा माझे पप्पा मस्साजोग येथून लातूरला आले होते. त्या दिवशी ते बरेच अस्वस्थ असल्याचे मला दिसले. दुसऱ्या दिवशीपण पप्पा मला चिंतेत असल्याचे दिसले. मी त्यांना काय झाले म्हणून विचारले तेव्हा त्यांनी मला जवळ घेऊन सांगितले की, बाळा चांगला अभ्यास कर…

त्यानंतरही मी त्यांना खोलात जाऊन विचारले. त्यावर ते काही सांगण्यास तयार नव्हते. परंतु मी त्यांना वारंवार विचारणा केली की, मला सांगा पप्पा काय झाले. तेव्हा त्यांनी मला ०६ डिसेंबर २०२४ रोजी आवादा कंपनीमध्ये वाल्मिक अण्णांची माणसे खंडणी मागण्याकरीता आणि कंपनी बंद करण्याकरिता कंपनीत आल्यानंतर मी त्यांना अडविले होते.

त्यामुळे त्यांना खूप राग आला होता. वाल्मिक कराड हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असून त्याचा बीड जिल्ह्यात दबदबा आहे. त्याला खूप माणसे घाबरतात. तसेच त्याच्या जवळचा माणूस विष्णु चाटे हा मला सारखा फोन करुन ठार मारण्याची धमकी देत आहे. त्यामुळे मला टेन्शन आले आहे. माझे काही बरे वाईट झाले तर आई व विराजची काळजी घे, असे म्हणाले होते. त्यानंतर मी पप्पांना धीर दिला. काही काळजी करू नका. तुम्ही स्वत:साठी नाही तर गावासाठीच सगळं करताय, असे म्हणाल्याचे वैभवीने पोलिसांना सांगितले.

लाडक्या बहिणींनो, बॅंक बॅलेन्स तपासलात का? महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आलंय गिफ्ट!

0

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना सरकारकडून गिफ्ट देण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती. पण आता बॅंकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

1500 रुपयांवरच मानावं लागणार समाधान

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशानात देण्याच्या घोषणेपासून सरकारनं घूमजाव केलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशानात 2100 रुपये देण्याचं आश्वासन कधीच दिलं नसल्याचं महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरेंनी सांगितलंय. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना निवडणुकीत गेंमचेंजर ठरली. राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यावर लाडक्या बहिणांना 1500 रुपयांवरून 2100 रुपये दिले जातील असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. मागील अधिवेशनात तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपयांसदर्भातली घोषणा करणार असल्याची माहिती दिली होती. मात्र आता यावरून सरकारने घूमजाव केलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केली नाही. तो जाहीरनामा 5 वर्षांसाठी असल्याचं आदिती तटकरेंनी सांगितलंय.

विरोधकांकडून टीका

तर महायुती सरकारने जाहिरनाम्यात दिलेली आश्वासनं खोटी होती ते हळू हळू स्पष्ट होत असल्याचं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनिल प्रभू यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय. तर सरकारच्या या घुमजाववरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी सरकारवर टीका केलीय.

लाडकी योजनेच्या 83% लाभार्थी विवाहित महिला

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या सुमारे 2.5 कोटी लाभार्थ्यांमध्ये जवळपास 83% लाभार्थी विवाहित महिला आहेत. अविवाहित महिला लाभार्थ्यांपैकी 11.8% आहेत तर विधवांचा वाटा 4.7% आहे. घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिला एकत्रितपणे 1% पेक्षा कमी लाभार्थ्यांचे आहेत, असे आकडेवारीवरून दिसून येते. घटस्फोटित महिला एकूण लाभार्थ्यांपैकी 0.3%, सोडून दिलेल्या महिला 0.2% आणि निराधार महिला 0.1% आहेत. 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे एकूण लाभार्थ्यांपैकी 29% होती. त्यानंतर 21-29 वयोगटातील गट 25.5% होता तर 40-49 वयोगटातील गट लाभार्थ्यांपैकी 23.6% होता. खरंच, 78% लाभार्थी 21-39 वयोगटातील होते आणि 22% लाभार्थी 50-65 वयोगटातील होते. 60-65 वयोगटातील लाभार्थींचा वाटा जवळजवळ 5% होता. “60-65 वयोगटातील जवळजवळ 5% महिलांना लाभ मिळाला आहे.

‘छावा’ची २२ व्या दिवशीही डरकाळीच ऑस्कर विजेत्या ‘RRR’ लाही टाकलं मागे; कमाई ५०० कोटीच्या अगदीजवळ

0

विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘छावा’ हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होऊन २२ दिवस उलटले आहे. या चित्रपटाच्या बंपर कमाईने अनेक सिनेमांना मागे टाकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट सर्वांचे मन जिंकत आहे. पण या सिनेमाने नव्याने रिलीज झालेल्या सिनेमांना मागे टाकले आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट २२ दिवसांत थिएटरमध्ये हिट झाला आहे. शुक्रवारी ‘छावा’च्या कमाईत मोठी वाढ झाली. ‘छावा’च्या २२ व्या दिवसाच्या कलेक्शनने देशातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘आरआरआर’ चित्रपटाच्या कलेक्शनला मागे टाकले आहे, त्या सिनेमाने तिसऱ्या शुक्रवारी फक्त ४.५ कोटी रुपये कमावले होते.

आता ‘छावा’ ५०० कोटींच्या अगदी जवळ

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘छावा’ चित्रपटाने २२ व्या दिवशी ७.२४ कोटी रुपये कमावले आहेत. एकूणच, या चित्रपटाने ४९०.७९ कोटी रुपयांची कमाई केली. याचा अर्थ हा चित्रपट आता ५०० कोटींच्या अगदी जवळ पोहोचला आहे. आता ‘छावा’ सनी देओलच्या ‘गदर २’ ला कधी मागे टाकेल हे याची उत्सुकता सिनेप्रेमींना आहे.

‘छावा’ ने जगभरात किती कमाई केली?

‘छावा’ जगभरात खूप लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटाने जगभरात ६६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. जर फक्त परदेशातील कमाईबद्दल बोलायचे झाल्यास तर सिनेमाने ८२ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

सिनेमाच्या कास्टबद्दल बोलायचे झाल्यास या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. याशिवाय अभिनेता अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारलीय. छावा सिनेमात संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, मनोज कोल्हाटकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये यांसारख्या मराठी कलाकारांच्याही भूमिका आहेत.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रदीप चंद्रन; बहुतांश सेवा विदर्भात पुणे विभागात पहिलांदाच कामाची संधी

0

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद गेल्या अकरा महिन्यापासून रिक्त होते. याठिकाणी अखेर राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबई येथील उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त विकास आयुक्तपदी कार्यरत असणारे एम. जे. प्रदीप चंद्रन यांची महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदीप चंद्रन हे २०१२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते उद्योग संचालनालयात कार्यरत होते. त्यापूर्वी ते अमरावती येथे आदिवासी विभाग विभागाचे अतिरिक्त आयुक्त, भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, वस्त्रउद्योग विभागाचे आयुक्त, गौन खनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे.

चंद्रन यांची बहुतांश सेवा ही विदर्भात झाली आहे, त्यानंतर त्यांना मुंबईमध्ये नियुक्ती देण्यात आली. पुणे महसूल विभागात त्यांना पहिलांदाच कामाची संधी मिळाली आहे. पुणे महापालिकेत यापूर्वी २०१२ च्या बॅचचे डॉ. कुणाल खेमणार, रवींद्र बिनवडे या दोघांनी अतिरिक्त आयुक्तपदी काम केले आहे. त्यानंतर आता प्रदीप चंद्रन हे देखील त्यांच्याच बॅचचे आहेत.

पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाच्या तीन जागा आहेत, त्याठिकाणी खेमणार, बिनवडे आणि विकास ठाकणे हे तिघे कार्यरत होते. त्यांच्या बदलीनंतर पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यानंतर दोन जागा रिक्त असूनही मार्च २०२४ पासून तेथे कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती होत नव्हती. यासाठी शहरातील लोकप्रतिनिधींनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता.

काही दिवसांपूर्वी अपर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झालेले महेश पाटील यांना महापालिकेच्या अपर आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आलेली आहे. ते अतिरिक्त आयुक्त म्हणूनच काम पाहणार असल्याची चर्चा महापालिकेत आहे. त्यानंतर आता रिक्त असलेल्या एका जागेवर प्रदीप चंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बीडमधील खोक्या भाईचा आका कोण? सुरेश धस कनेक्शन काय? कोण आहे हा सतीश भोसले? 

0

बीडमधील मारहाणीचे आणखी दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान याप्रकरणी सतीश भोसले नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु आहे. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला आहे. एका व्यक्तीला बेदम मारहाण करतानाचा शिरुरमधील धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सतीश भोसले हा एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. दरम्यान या प्रकरणी सतीश भोसलेसह 4 जणांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ जुना असून 19 फेब्रुवारी रोजी सतीश भोसलेनं आणखी एकाला मारहाण केल्याचा दावा अंजली दमानियांनी केला आहे. तसंच सतीश भोसले हा सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही दमानियांनी केला आहे.

दरम्यान या मारहाणीच्या घटनेनंतर बावी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत… सतीश भोसलेला अटक करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या भाऊचे अनेक व्हिडीओ सध्या समोर येत आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याची पार्श्वभूमी देखील काहीशी गुन्हेगारीची असल्याची दिसत आहे.

एका व्हिडीओत सतीश भोसले उर्फ खोक्या भाऊ कारमध्ये पैसे फेकताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओत खोक्या भाऊ हा हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत आहे.  एखाद्या हिरोला देखील लाजवेल अशी खोक्या भाऊ एन्ट्री मारत आहे. तिसऱ्या व्हिडीओत लाईफ हो तो खोक्या भाई जैसी… म्हणत खोक्या भाऊ फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्ज़रियस लाईफ जगतोय..

खोक्या भाई कोण?

– सतीश भोसले बीडच्या शिरूर शहराजवळीस पारधी वस्तीवर राहतो

– सतीश भोसले मित्रांसोबत लॅविश लाईफ जगतो

– गेल्या काही वर्षांपासून सक्रिय राजकारणात सहभाग

– भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक

– शिरूर कासार परिसरात सतीश भोसलेची खोक्या पार्टी नावानं दहशत

– गोल्डमॅन म्हणूनही स्थानिक पातळीवर सतीश भोसलेची ओळख

– मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याचे अनेक कारनामे समोरआले आहेत.

सतीश भोसलेनं केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान खोक्या भाईला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.

वाल्मिक भोवती फास आणखी घट; काही तरी मोठं घडणार, एसआयटीने बीड न्यायालयात अर्जही केल्याची चर्चा

0

बीड:   संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडभोवती कायद्याचा फास आता आणखी घट झाला आहे. कराडची संपूर्ण संपत्तीची माहिती घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.  वाल्मीक कराडची राज्यभर असलेली कोट्यावधींची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटी कडून हालचाली सुरू झाली आहे.  आरोपी वाल्मीक कराडची संपत्ती राज्याच्या बाहेर देखील आहे. कराडच्या नावे आणि पत्नी मंजिली कराड त्याचबरोबर दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि मुलगा गणेश यांच्या नावावर आहे. वाल्मिक कराडने सन 2020 ते 2024 मध्ये खरेदी केल्याचं समोर आलं आहे.

बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या संपती बाबत माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. राज्य आणि राज्याच्या बाहेर वाल्मिक कराडची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. मात्र ही संपत्ती आता त्याला गमवावी लागणार कां? वाल्मीक कराडने मोठे मोठे प्लॉट, रो हाऊस आणि कोट्यावधी रुपयांची जमीन नेमकी कोणत्या उद्योगांमधून कमवली याची देखील चौकशी होणार आहे. वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीने आता बीडच्या न्यायालयामध्ये अर्ज देखील केला असल्याची चर्चा आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

 वाल्मिक कराडची संपत्ती तरी किती? 

1)आरोपी वाल्मिक कराडची पुणे, लातूर, परळी, केज इतर ठिकाणी रो हाऊस

2) केजमध्ये 2500 चौरस फुटांचा प्लॉट आणि एक बंगला किंमत 1 कोटी 69 लाख रुपये.

3) बीडच्या दगडवाडी मध्ये शेत जमीन किंमत 48 लाख 26 हजार रुपये.

4) मौजे तडोळी येथे 12 एकर शेत जमीन 20 लाख 27 हजार रुपये.

5) परळी रोडवर अंबाजोगाई 380 चौ. मी. बांधकाम

6) अंबाजोगाई मध्येच 419 चौ. मी. बांधकाम किंमत कोट्यावधी रुपये.

7) याच वाल्मीक कराडचे बीडच्या दगडवाडी स्टोन क्रेशर युनिट

8) दगडवाडी गावात 48 लाखांची शेत जमीन

9) परळीतील वडगावात साडेचार एकर शेत जमीन किंमत 13 लाख रुपये.

10) वडगावातच आणखी एक प्लॉट किंमत दीड लाख रुपये.

11) बीडच्या सिरसाळा गावात 581 चौ.मी खुला प्लॉट किंमत साडेसात लाख रुपये

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार  कराडने कोट्यावधी रुपयांची संपत्ती कमवली आहे. इतकी संपत्ती कराडकडे कुठून आली कुठून आणि त्याचा उद्योग तरी काय आहे? यावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.  कराडसह पत्नी मंजिली कराड, ज्योती जाधव आणि मुलगा गणेश कराडच्या नावे आहे मात्र या संपत्ती वरती आता टाच येणार ? हे पाहण महत्वाचं असेल.

विधानपरिषदेच्या 5 रिक्त जागेवर निवडणूक कार्यक्रम जाहीर; भाजप 3, राष्ट्रवादी आणि शिवसेना 1 जागा रिक्त

0

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर आता विधानपरिषदेच्या 5 जागांसाठीची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे, आता विधानपरिषदेच्या या 5 जागांवर कोणाचा नंबर लागणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 27 मार्च रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. भाजपच्या 3, राष्ट्रवादी अजित पवार 1 आणि शिवसेना शिंदे गटाच्या 1 आमदारांसाठी ही निवडणूक पार पडणार असून या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार केवळ आमदारांना असणार आहे. सध्या, राज्यात भाजप महायुतीला मोठं बहुमत असल्याने या जागांवर पुन्हा संबंधित पक्षाचेच उमेदवार विजयी होतील. मात्र, राजकीय पक्षांकडून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधानपरिषदेवर असलेल्या 5 आमदारांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामध्ये, शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस राजेश विटेकर, भाजप आमदार प्रवीण दटके, भाजप गोपीचंद पडळकर आणि भाजपा रमेश कराड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. आता, या रिक्त जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार आमश्या पाडवी यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ 7 जुलै 2028 पर्यंत आहे. तर, राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत आह. भाजप नेते आणि आमदार प्रवीण दटके यांचा कार्यकाळ 13 मे 2026 पर्यंत असून आमदार रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर यांचाही कार्यकाळ 13 मे 2026 पर्यंत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे सर्व आमदार विजयी झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर याच महिन्यात निवडणूक होणार आहे.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम ?

अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 मार्च ते 17 मार्च

अर्जाची छाननी 18 मार्च रोजी होणार

अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 20  मार्च

27 तारखेला विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे.

विधान परिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ :- एकूण 78 

महायुती – 32  (भाजप 19 शिवसेना 6 राष्ट्रवादी 7)

महाविकास आघाडी – 17 (शरद पवार 3 काँग्रेस 7 उबाठा 7)                             अपक्ष 3

एकूण सदस्य संख्या – 78

विद्यमान सदस्य संख्या – 52

रिक्त सदस्य संख्या – 26 (स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे जागा अधिक रिक्त आहेत)

पोलिस स्टेशनमध्ये  12 च्या ठोक्याला बर्थडे सेलिब्रेशन; या पोलिसांचा प्रताप रील स्टारही लाजेल असे ड्रोन चित्रिकरण

0

पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावर बर्थडे सेलिब्रेशन करण्याची, रात्री 12च्या ठोक्याला फटाक्यांचे बार लावण्याची अन् सेलिब्रेशनच्या नावाखाली धांगडधिंगा घालण्याची जणू प्रथाचं झाली आहे. बरं हा सगळा धिंगाणा बहुतांश वेळी पोलिसांनी नजरेस पडत नाही. हे बर्थडे सेलिब्रेशन धन दांडग्यांचे असल्याने पोलिस त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यापर्यंत ही खबर पोहचू न देण्यासाठी हा खटाटोप सुरु असतो, हे उघड आहे. पण आता तर एका पोलीस शिपायाने हा सगळा राडा केला, तो पण थेट पोलिस स्टेशनच्या दारातचं.

अगदी एखाद्या रीलस्टारला लाजवेल असं ड्रोनद्वारे या बर्थडे सेलिब्रेशनचं चित्रीकरणही केलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालतोय. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस शिपाई प्रवीण पाटीलने हा प्रताप केला आहे. ज्यामुळं आख्ख्या पोलिस खात्याची मान शरमेने खाली गेली आहे. आता पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे या प्रकरणी काही कठोर कारवाई करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

बुधवारचा दिवस संपताना अन् गुरुवारची सुरुवात होताना, प्रवीण पाटीलची मित्रमंडळी सांगवी पोलिस स्टेशन समोर जमू लागली. त्यात पोलिस स्टेशनमधील इतर सहकारी ही सहभागी झाले. केक, आकर्षक फटाके, ड्रोन अशी सगळी सोय करण्यात आली. मग काय बाराच्या ठोक्याला प्रवीणसह मित्र मंडळी पोलिस स्टेशन समोरील रस्त्यावर आले. रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून बर्थडे सेलिब्रेशन सुरु झालं.

ड्रोनने चित्रिकरण, अफलातून व्हिडीओ एडिटिंग

दोघांनी फटाक्यांची फायर गण बाहेर काढली, दुसरीकडे स्काय शॉट आणि सुतळी बॉम्ब फुटू लागले. ही आतषबाजी बराचवेळी सुरु होती. जमाना रील्सचा आहे म्हटल्यावर याचं चित्रीकरण होणार नाही असं कसं होईल. मग हा सगळा कार्यक्रम ड्रोनद्वारे चित्रित करण्यात आला. भलेभले रीलस्टार सुद्धा लाजतील इतकं अफलातून एडिटिंग ही करण्यात आलं. मग काय दिवस उजाडताच हे व्हिडीओ प्रवीण अन् सहकाऱ्यांसह मित्र मंडळींच्या स्टेट्सवर अपलोड होऊ लागले.

पिंपरी चिंचवड शहरात रात्री बाराच्या ठोक्याला धांगडधिंगा घालून बर्थडे सेलिब्रेशन करण्याचं फॅड आहेच. पण गुरुवारी रात्री साजरा झालेला बर्थडे हा पोलिसाचा असेल असं कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. बरं, पोलिस स्टेशनच्या दारात हे सगळं होत असताना, इतर पोलिसांचे कान अन् डोळे बंद होते का? असा प्रश्न आता सर्वांना पडलाय. बरं या महाशयांनी हा व्हिडीओ स्टेट्सला ठेवला. त्यामुळं पोलिस वर्दीचा कसा गैरफायदा घेऊ शकतात, हे समाजासमोर आलं.

पोलिस आयुक्त काय कारवाई करणार?

आता नेहमीप्रमाणे ही बाब पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यापर्यंत कोणी पोहचू दिलीच नाही. पण एबीपी माझाच्या हाती हा व्हिडीओ लागला अन् पिंपरी चिंचवड पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. हा व्हिडीओ पाहून वरिष्ठांनाही धक्का बसला. पण या व्हिडीओमुळं अख्ख्या पोलिस खात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला. त्यामुळं पोलिस खात्याची मान शरमेने खाली गेली. आता पोलीस आयुक्त चौबे साहेब या पोलिस महाशयावर काय कठोर कारवाई करणार?  यानिमित्ताने रात्री बाराच्या ठोक्याला धांगडधिंगा घालत, साजरे होणारे बर्थडे सेलिब्रेशनची प्रथा कायमस्वरूपी बंद पाडणार का? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.