Home Blog Page 165

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला समोर, काय घडलं सगळं सांगितलं, हा इशारा दिला..

0

Pराज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप होतोय. जयकुमार गोरे या प्रकरणामुळे अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय. काल संजय राऊत यांनी नाव घेऊन, तसंच विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता ज्या महिलेला त्रास दिल्याचा आरोप आहे, ती महिला स्वत: माध्यमांसमोर आली आहे. जयकुमार गोरे यांनी आपल्याला फक्त फोटोच नाही नाही पाठवले, तर मला आणि माझ्या आईला शिव्याही दिल्या होत्या असं ती महिला म्हणाली आहे.

पीडित महिलेनं काय आरोप केले? 

पीडित महिलेनं सांगितलं की, 27 नोव्हेंबर 2016 मी FIR दाखल केला. तेव्हाही त्यांनी मला बदनाम करण्याचे कटकारस्थान केले. 2019 ला त्याने निवडून आल्यावर त्रास होत होता म्हणून, कोर्टाच्या चेंबरमध्ये मला दंडवत घातला आणि माफी मागितली. मला वाटलं आता हा सुधारला असून, आपल्याला त्रास देणार नाही. त्यामुळे मी केस मागे घेतली म्हणून तो सुटला. त्याला कोर्टाने निर्दोष सोडलेलं नाही असं पीडित महिलेनं म्हटलं आहे. मी हे प्रकरण दाखल झाल्यापासून कधीच माध्यमांसमोर आले नाही. पण 25 जानेवारीला एक पत्र आलं, नंतर माझ्या नावाची एक FIR व्हायरल झाली. त्याचे कार्यकर्ते माझ्याबद्दल चर्चा करतात की, आम्ही दुबईला गेलो, याने मला पुण्यात फ्लॅट दिला, मुंबईत फ्लॅट दिला. त्यामुळे मी आता स्वत: उपोषणाला बसण्याचं ठरवलं, कारण हा माणूस कधीपर्यंत माझी अशी बदनामी करणार? असं पीडित महिलेनं मुलाखतीत म्हटलं.

माझ्या नावाने व्हायरल होत असलेलं एक पत्र समोर आलं, ते मी दिलंच नव्हतं. पोलिसांनीही काही केलं नाही, माहिती घेतली नाही, उलट पोलीस मला विचारणा करण्यासाठी आले की, तुम्ही आंदोलनाला बसणार का वगैरे. मात्र, त्यानंतर मला अंदाज आला की, हा विषय त्यानं अजून सोडलेला नाही, आपली बदनामी अजून सुरू आहे. त्यामुळे मी 17 मार्चला उपोषणाला बसणार असल्याचं पत्र दिलं.

मी आता राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अजून काही लोकांना मी पत्र पाठवलं आहे. हा माणूस माझी आणखी किती बदनामी करणार? हा सवाल घेऊन मी आमरण उपोषण करणार असल्याचं या पीडित महिलेनं म्हटलं आहे. त्यानुसार 17 तारखेला आपण विधान भवनासमोरच उपोषण करणार असल्याचं म्हटलं आहे.

जयकुमार गोरे या प्रकरणावर काय म्हणाले?

जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात कोर्टाने आपल्याला निर्दोष मुक्त केल्याचं म्हटलं आहे. तसंच एका युट्यूब चॅनलने दीड वर्षांपासून माझ्यावर टीका करण्याचं काम केल्याचं म्हटलं आहे. खालच्या पातळीवर जाऊन, माझ्यावर, पक्षावर आणि नेतृत्वावर टीका करण्याचं काम या चॅनलने केलं असं जयकुमार गोरे म्हणाले. विधानसभा सभागृहात जयकुमार गोरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. राजकीय वैमनस्यातून सभागृहात उपस्थित असलेल्या लोकांनी हा गुन्हा दाखल केलाय. माझ्या वडिलांचं अस्थीविसर्जन करण्याचीही यांनी वाट पाहिली नाही, त्यापूर्वीच माझ्यावर गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला आणि सगळं नष्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, हे म्हणतात आमच्याकडे पुरावे आहेत, तर तो न्यायालयाचा अवमान आहे असं जयकुमार गोरे म्हणाले. जयकुमार गोरे यांनी याप्रकरणी संजय राऊत आणि एका युट्यूबच्या संपादकाविरोधात हक्कभंगाचा प्रस्तावही मांडला आहे.

पुण्यात पुन्हा आमदारकीची चढाओढ? 27 मार्चला मतदान; संधी दीपक मानकर की जगदीश मुळीक? महायुतीत रस्सीखेच

0

महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेच्या रिक्त निवडणुकीची घोषणा करण्यात आली. मुंबईमध्ये घोषणा होताच पुण्यातील वातावरणामध्ये बदल होत महायुतीतील मित्र पक्षांमध्येच अंतर्गत संघर्ष आणि सुप्त इच्छा व्यक्त करण्यास सुरुवात झाली आहे. मुळात पुणे शहरातील प्रमुख दावेदार असलेल्या दीपक मानकर आणि जगदीश मुळीक यांना लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीही निवडणुकीमध्ये पक्ष आदेश मान्य करत अन्य उमेदवारांचे प्रचार करण्याचे काम करावे लागले. पुणे लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये या दोन्हीही नेत्यांनी आपल्या पक्षाशी बांधिलकी दाखवत पुणे लोकसभेची हक्काची जागा विजयी करण्यास मोलाचे योगदान दिले आहे. परंतु पुणे शहरातील हक्काचा बालेकिल्ला असलेला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ मात्र भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन्ही पक्षांना आपल्या ताब्यात न राखता आल्याने शहराध्यक्ष म्हणून दीपक मानकर आणि स्थानिक भाजपा चे नेतृत्व व माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक या दोघांच्या कारकीर्दीला हा पराभव चिटकून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये पुणे महापालिकेवर सर्वाधिक(२२) नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून देण्यात जगदीश मुळीक यांचे मोलाचे योगदान होते. त्याच जनादाराच्या विश्वासावर स्वतः जगदीश मुळीक यांनी अगोदर पुणे लोकसभा आणि नंतर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली परंतु काही कारणास्तव त्यांच्या पदरी अपयश आले असले तरीसुद्धा पक्ष कार्याला सर्वोच्च मानत आजही जगदीश मुळीक यांच्याकडून भारतीय जनता पक्षाचे काम त्यात हिरारीने केले जात आहे. परंतु वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे माजी आमदार विजयी झाल्याने विधान परिषदेची संधी मिळते की पुन्हा एकदा नव्या संधीची वाट पाहावी लागणार आहे याबाबतचे चित्र काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने जगदीश मुळीक यांना संधी देणे क्रमप्राप्त आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर संपूर्ण पुणे शहरात सर्वात कमी कालावधीमध्ये सर्वात मोठी कार्यकारणी तयार करण्याची किमया दीपक मानकर यांनी केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दीपक मानकर यांना संधी द्यावी असे वाटत आहे. त्याच विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. विधानसभा परिषदेचे काही सदस्य हे विधानसभा निवडणुकीत निवडून आल्याने 5 जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या या 5 रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्चला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पडद्यामागे राजकीय घडामोडींना वेग आल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधानपरिषदेवर असलेल्या 5 आमदारांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामध्ये, शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस राजेश विटेकर, भाजप आमदार प्रवीण दटके, भाजप गोपीचंद पडळकर आणि भाजपा रमेश कराड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. आता, या रिक्त जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार आमश्या पाडवी यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ 7 जुलै 2028 पर्यंत आहे. तर, राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत आह. भाजप नेते आणि आमदार प्रवीण दटके यांचा कार्यकाळ 13 मे 2026 पर्यंत असून आमदार रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर यांचाही कार्यकाळ 13 मे 2026 पर्यंत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे सर्व आमदार विजयी झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर याच महिन्यात निवडणूक होणार आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत संधी मिळावी यासाठी पुण्यात पुन्हा चढाओढीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. भाजपकडून जगदीश मुळीक यांचं नावं चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दीपक मानकर यांची पुन्हा दावेदारी असल्याची माहिती आहे. गतवर्षी विधानपरिषद निवडणुकीत मानकर इच्छुक होते. मात्र त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे यांना संधी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा दीपक मानकर यांनी गेल्यावेळी संधी नाकारली. मात्र यावेळेस आपला विचार करावा, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. दीपक मानकर यांनी अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर ही मागणी केली असल्याची माहिती आहे.

‘अजित पवार हे योग्य निर्णय घेतील’, मानकर

दीपक मानकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “विधानपरिषदेच्या आमदार पदासाठी पक्षाकडे दावा केला आहे. इतके दिवस ज्या पद्धतीने मी पुणे शहराध्यक्ष म्हणून काम करत आहे याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार हे योग्य निर्णय घेतील. पुणे शहरामध्ये पक्ष संघटनेच्या माध्यमातून जे काम मी उभं केलं आहे ते अजित पवार यांना माहिती आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठं काम हे पक्ष संघटनेच्या माध्यमातून पुण्यात करण्यात आलं आहे. सध्या 1500 जणांची कार्यकारणी पुण्यामध्ये कार्यरत आहे”, असं दीपक मानकर यांनी सांगितलं.

“संघटनेच्या माध्यमातून विधानसभा आणि लोकसभेला चांगलं काम केलं आहे. त्यामुळे काम करणाऱ्या माणसाच्या मागे पक्ष हा कायम उभा राहतो. अजित दादांना माझ्या दावेदारीबद्दल मी सांगितलं असून ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असणार आहे. त्यांनी मला संधी दिली नाही तरी मी अजित पवार यांच्या सोबतच राहणार”, अशी प्रतिक्रिया दीपक मानकर यांनी दिली.

अर्भकाचा दफनभूमीतील मृतदेह संशयास्पदरीत्या गायब; “या गंभीर प्रकाराला प्रशासन जबाबदार सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह

0

वैकुंठ स्मशानभूमीसह अन्य स्मशानभूमीमधील अस्वच्छता, गैरसोई उघड होत असतानाच आता रामटेकडी येथील दफनभूमीत दफन केलेला अर्भकाचा मृतदेह संशयास्पदरीत्या गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा स्मशानभूमी, दफनभूमीतील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या घटनेबाबत महापालिकेने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

वैकुंठ स्मशानभूमीमध्ये काही महिन्यांपूर्वी मृतदेहाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तुकडा असल्याचा प्रकार उघडकीस आला होता, त्याचा शोध घेतल्यानंतर तो पावाचा तुकडा असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे स्मशानभूमीची सुरक्षा, तेथील असुविधा व अस्वच्छतेचा प्रश्‍न पुढे आला होता.

या घटनेनंतर आता दफनभूमीमधील दफन केलेला मृतदेहच गायब झाल्याचा गंभीर प्रकार रामटेकडी येथे उघडकीस आला आहे. रामटेकडीतील औद्योगिक वसाहतीजवळ दफनभूमी आहे. या दफनभूमीमध्ये मागील आठवड्यात एक दिवसाच्या अर्भकाचा मृतदेह दफन करण्यात आला होता.

दरम्यान, बुधवारी (ता.६) दफनविधी केलेल्या ठिकाणची माती उकरण्यात आल्याचे निदर्शनास आले, अधिक पाहणी केल्यानंतर तेथे दफन केलेल्या अर्भकाचा संशयास्पदरीत्या मृतदेह गायब झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली. या घटनेनंतर महापालिकेच्या सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

त्यानंतर या घटनेची तातडीने वानवडी पोलिस ठाण्यात महापालिकेच्यावतीने तक्रार देण्यात आली आहे, दफनभूमीच्या ठिकाणी महापालिकेचे सुरक्षा रक्षक असतात. तसेच तेथे सीसीटीव्ही देखील लावण्यात आलेले आहेत. तरीदेखील हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आल्याचे वानवडी पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घटनास्थळाची पाहणी केली. “या गंभीर प्रकाराला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. तेथील सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने संबंधित कुटुंबाची व पुणेकरांची माफी मागावी.’ अशी मागणी जगताप यांनी केली.

‘दफनभुमीत दफन केलेला अर्भकाचा मृतदेह गायब असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तत्काळ वानवडी पोलिस ठाण्यात तत्काळ तक्रार दिली आहे. तेथे सुरक्षा रक्षक असुन सीसीटीव्ही देखील आहेत. या घटनेचा पोलिसांकडुन तपास केला जात आहे.’

           – राकेश वीटकर, सुरक्षा अधिकारी, महापालिका.

कोथरुड सोसायटी व ढोल पथक लीग सुंदर गार्डन सोसायटी विजेती; कोथरूड विधानसभा मतदारसंघ 30 संघ सहभागी

0

कोथरूड सोसायटी अन ढोल ताशा पथक लीग असे सुमारे 30 संघ आमने-सामने…… राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते यांचेही संघ त्यातच स्थानिक पत्रकारांचाही संघ. कोथरूड भागामध्ये अशा पद्धतीने प्रथमताच अत्यंत जिकरीच्या दोन दिवसीय स्पर्धाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील निष्ठावान शिवसैनिक विभाग संघटक उमेश उत्तम भेलके यांच्या मार्गदर्शनात संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ, ट्रस्टतर्फे सुवर्ण महोत्सवी ५०वे वर्षानिमित्त मंडळाचे संस्थापक, मा. नगरसेवक स्व. उत्तमकाका भेलके यांच्या जयंती निमित्त आयोजन करण्यात आले होते. सोसायटी व ढोल ताशा पथक आणि राजकीय पत्रकार सामाजिक अशा तिहेरी स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या चुरशीच्या स्पर्धेमध्ये सुंदर गार्डन सोसायटी प्रथम क्रमांक पटकावत चषकाची मानकरी ठरली.

कोथरूड भागातील स्व. माजी नगरसेवक उत्तम काका भेलके यांच्यामार्फत संपूर्ण कोथरूड विधानसभा मतदारसंघातील सोसायटींसाठी बॉक्स क्रिकेट लीग करंडक आयोजित करण्यात आल्यानंतर या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्साही प्रतिसाद लाभत गेला. त्यातच पुणे शहरात सर्वात प्रथमच ढोल ताशा पथकांची क्रिकेट लीग ही एक वेगळी संकल्पना पुणे शहरांमध्ये सुरू झाल्यामुळे संपूर्ण पुणे शहरात या अनोख्या स्पर्धेची चर्चा सुरू होती. विभिन्न विभागामध्ये स्पर्धा घेतल्या जात असल्या तरी सुद्धा राजकीय आणि सामाजिक स्तरावरील कट्टे यांचीही दखल घेत कोथरूड भागातील नामांकित दोन शितल कट्टा व स्वीकार कट्टा या दोन कट्ट्यांमध्येही चुरशीचा सामना रंगला त्यामध्ये स्वीकार कट्ट्या विजेता झाला. या स्पर्धेबरोबरच सर्व पत्रकार मित्र आणि राजकीय नेते अशा प्रेक्षणीय सामन्यांचे आयोजनही करण्यात आले होते.

कोथरूड भागामध्ये प्रथमच ढोल ताशा पथक आणि सोसायटी एकत्रित खेळवण्यात आलेल्या अभिनव उप्रकमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पुणेशहर प्रमुख गजानन थरकुडे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष माजी नगरसेवक श्याम देशपांडे, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शहराध्यक्ष ॲड. मंदार जोशी, प्रभाकर(अण्णा) मोहोळ, माजी नगरसेवक जयंत भावे, भाजपा कोथरूड विधानसभा समन्वयक नवनाथ जाधव, माजी नगरसेवक अँड. योगेश मोकाटे, पुणे महापालिका शिक्षण मंडळ माजी सदस्य राम बोरकर, आद्यक्रांतिगुरु लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समिती मा.अध्यक्ष विजय डाकले, पुणे शहर भाजपा युवा मोर्चाचे दुष्यंत मोहोळ, कोथरूड राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष गिरीश गुरुनानी, संदीप मोकाटे, जयदीप पडवळ, गोविंद थरकुडे, विनोद मोहिते नितीन शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सुधीर धावडे, किरण उभे, नंदकुमार गोसावी, अनिल बिडलान, अमोल डांगे, अनिरुद्ध खांडेकर, गजानन मांझीरे, अजय भुवड, किशोर मारणे, चेतन भालेकर, संतोष लांडे, गणेश काकडे, सचिन विप्र, विशाल भेलके, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप, वैभव जमदाडे, संतोष गावडे, सागर भेलके यांच्यासह असंख्य प्रतिष्ठित मान्यवरांनी या स्पर्धेमध्ये शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती लावली.

कोथरुड सोसायटी व ढोल पथक लीग या मुख्य स्पर्धात्मक प्रकारामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातील निवडक 10 सोसायटीच्या संघांनाच स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आला तर संपूर्ण पुणे शहरातील 16 ढोल ताशा पथकं सहभागी झाली होती. प्रेक्षणीय सामन्यांमध्ये सुमारे 4 राजकिय/सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या लढती प्रेक्षणीय झाल्या. या अत्यटतीच्या सामन्यामध्ये सुंदर गार्डन सोसायटीने प्रथम क्रमांक ( २५,०००/-) पटकावला तर रमणबाग पथक अटीतटीच्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाची (११,०००/-) मानकरी ठरली. उपांत्य सामन्यामध्ये राजमुद्रा पथक यांना  तृतीय क्रमांक (७,०००/-) तर एकमत सोसायटी यांना चतुर्थ क्रमांक ५,०००/- मिळाला.

मुंबईत मराठी येणं गरजेचं नाही, म्हणणाऱ्या भय्याजी जोशींना राज ठाकरेंनी झोडपून काढलं, म्हणाले, तुम्ही काड्या घालून….

0

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी मुंबईतील मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच भडकलं आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनी त्यांच्या या विधानावर कडाडून टीका केली. भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. जोशी यांच्या विधानाने वादाची ठिणगी पेटली आहे.

दरम्यान, मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी भाषेच्या वापरासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख, राज ठाकरे यांनीही भय्याजी जोशी यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. फसेबूक या सोशल मीडिया नेटवर्किग साईटवरील अधिकृत अकाऊंटवर राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर करत भय्याजी जोशींच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ? असा सवालही राज ठाकरेंनी विचारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं ! असा इशाराही त्यांनी दिला.

काय आहे राज ठाकरे यांची पोस्ट ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं .

देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं…. आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता… भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का ? सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत . हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले . त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये ? या असल्या काड्या घालून ( अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही ) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर 30तारखेला गुढीपाडव्याला बोलूच !, असं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं !, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे.

हत्तींवर ॲसिड हल्ला, मुद्दाम काढण्यात आलेले डोळे…, ‘वनतारा’ दौऱ्यानंतर मोदींची मन हेलावणारी पोस्ट

0

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गुजरात जामनगर स्थित अनंत अंबानी यांचा रेस्क्यू सेंटर ‘वनतारा’ येथे दौरा केला. अनंत अंबानी यांचा ‘वनतारा’ रेस्क्यू सेंटर 3500 एकर जागेत पसरलेला आहे. याठिकाणी जखमी आणि अन्य प्राण्याच्या सुरक्षेची, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. याठिकाणी अनेक हत्ती आहेत. काही हत्ती असे आहेत, ज्यांच्यावर ॲसिड हल्ला झाला आहे. काहींचे मुद्दाम डोळे काढण्यात आलेत. तर काही अपघातात जखमी झाले आहेत. दौऱ्यानंतर मोदी यांनी मन हेलावणारी पोस्ट शेअर करत प्राण्यांची काळजी घेण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे. एवढंच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील मोदींच्या पोस्टवर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

‘वनतारा’ येथील काही हत्तींचे फोटो पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘येथे एक हत्ती आहे, ज्याच्यावर ॲसिड हल्ला झाला आहे. सध्या हत्तीवर उत्तम उपचार सुरु आहे. तेथे असे अनेक हत्ती आहेत, ज्यांचे मुद्दाम अंधळं करण्यात आलं आहे. दुसऱ्या एका हत्तीला भरधाव ट्रकने धडक दिली आहे.’

मोदी पुढे म्हणाले, इतके निष्काळजी आणि क्रूर कसे असू शकतात? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. तर अशा बेजबाबदारपणाचा अंत करूया आणि प्राण्यांवर देखील मायेने प्रेम करुया…’ दौऱ्यानंतर मोदी यांनी एक्सवर फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

मोदी यांच्या ट्विटवर अभिनेता शाहरुख खान याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. किंग खान म्हणाला, ‘प्राणीदेखील प्रेमाचा हक्क आहे. त्यांना काळजी आणि सुरक्षा हवी आहे. त्याच्या आरोग्यासाठी आणि आपल्या विश्वासाठी… पीएम मोदी यांची वनतारा येथील उपस्थिती याचे महत्त्व अधिक दृढ करते. एखाद्या व्यक्तीच्या मनातील शुद्धता त्यांच्या प्राण्यांवरील प्रेमाच्या दिसून येत आहे…’

यावेळी किंग खानने अनंत अंबानी यांचं देखील कौतुक केलं आहे. ‘दुर्दैवी प्राण्यांना अभयारण्य उपलब्ध करून देण्याची वनतरा आणि अनंत यांची वचनबद्धता त्याचाच पुरावा आहे. हे असंच चालू ठेवा बेटा!! सध्या अभिनेत्याची पोस्ट देखील तुफान व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली याने देखील वनतारा आणि अनंत अंबानी यांचं कौतुक केलं आहे. ‘अनंत अंबानी आणि त्यांची वनतारा येथील संपूर्ण टीम वन्यजीव कल्याणात उल्लेखनीय बदल घडवत आहे.’ सध्या विराटची पोस्ट व्हायरल होत आहे.

तू नीच, गलिच्छ माणूस आहेस; रोहित शर्माला वजनावरुन ट्रोल करणाऱ्याला जावेद अख्तरांचे चोख उत्तर

0

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हे कायमच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफाइनल सामन्यात विराट कोहलीने केलेल्या कामगिरीचे कौतुक करत पोस्ट शेअर केली होती. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या. मात्र, रोहित शर्माला जाड म्हणाऱ्या एका यूजरची कमेंट पाहून जावेद अख्तर यांनी राग व्यक्त केला आहे. त्यांनी यूजरला चांगलेच सुनावले आहे.

जावेद अख्तर यांनी विराट कोहली आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयासाठी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर, “पुन्हा एकदा विराटने हे सिद्ध केले आहे की तो आजच्या भारतीय क्रिकेट भवनचा सर्वात मजबूत आधारस्तंभ आहे !!! शुभेच्छा” या आशयाची पोस्ट लिहिली होती. त्यावर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत आनंद व्यक्त केला होता. तर एका नेटकऱ्याने कमेंट करत, “जर विराट सर्वात मजबूत आधारस्तंभ असेल तर रोहित शर्मा कोण आहे? सर्वात वजनदार स्तंभ? भारतीय कॅप्टन वजनदार पाहताना जावेद सर तुम्हाला लाज वाटली पाहिजे” असे म्हटले होते. ही कमेंट पाहून जावेद अख्तर यांना राग अनावर झाला आहे.

जावेद अख्तर यांनी यूजरला उत्तर देत, “तुझे तोंड बंद कर, तू झुरळ आहेस. मी रोहित शर्मा आणि कसोटीच्या इतिहासातील सर्व महान भारतीय क्रिकेटर्सचा आदर करतो. रोहितसारख्या महान खेळाडूच्या सन्मानाविरूद्ध मी कधी बोललो आहे? तू इतका नीच आणि गलिच्छ माणूस आहेस जो मी कधीही न केलेला दावा माझ्यावर बळजबरी लादत आहे. आणि त्यावर बोलून तू तुझा वेळ वाया घालवत आहेस” असे म्हटले.

यापूर्वी काँग्रेस नेता शमा मोहम्मद यांनी भारतीय कॅप्टन रोहित शर्माने वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून रोहित शर्माच्या वजनाची चर्चा सुरु झाली. “रोहित शर्मा हा एक खेळाडू म्हणून जास्त जाड आहे. त्याला वजन कमी करण्याची गरज आहे आणि अर्थातच तो आतापर्यंतचा सर्वात मूळ कर्णधार आहे. त्याच्या इतर खेळाडूंच्या तुलनेत काय आहे? तो सरासरी कर्णधार तसेच सरासरी खेळाडू आहे ज्याला भारताचा कर्णधार होण्याचा बहुमान मिळाला आहे” या आशयाची पोस्ट शमा यांनी केली होती.

महिलेला विवस्त्र फोटो पाठवण्याच प्रकरण, मंत्री जयकुमार गोरेंचा सभागृहात मोठा खुलासा

0

एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवण्याचा आरोप होत असलेल्या मंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधानसभेत त्यांच्यावर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तर दिलं आहे. “2017 मधील सातारा न्यायालयातील प्रकरण 479 चा आधार घेऊन त्या बाबत मीडियामधून माझ्यावर बिनबुडाचे, अश्लाघ्य, आक्षेपार्ह भाषा वापरुन बेछूट आरोप करण्यात आले. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. माझी जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला. राज्याचा मंत्री म्हणून सभागृहात काम करताना चुकीच्या टीकेला तोंड द्यावं लागलं. सभागृहाच्या कामकाजावर परिणाम व्हावा अशी कृती जाणीवपूर्वक केली. सदर गुन्ह्यात न्यायालयाने 2019 मध्येच मुक्तता केली आहे. निकाल सोबत जोडला आहे. सर्व मुद्देमाला नष्ट करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तसा सर्व मुद्देमाल नष्टही केला. न्यायालयाने निकालपत्र दिलं आहे, तरी संजय राऊत यांनी मीडियासमोर येऊन जाणीवपूर्वक माझी बदनामी केली. त्यामुळे त्यांनी माझा व सभागृहाचा विशेषधिकार भंग केला. न्यायालयाचा अवमान केला. सार्वभौम सभागृहाचा आपमान केला आहे. म्हणून मी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडतोय” असं जयकुमार गोरे म्हणाले.

“त्या सोबत एक युट्यूब चॅनल आहे लयभारी, त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून किमान 87 व्हिडिओ क्लिप बनवल्या. माझ्या, माझ्या कुटुंबाची, पक्षाची बदनामी केली. अत्यंत नीच, खालच्या पातळीवर जाऊन सातत्याने अडीच वर्षापासून हे चॅनल टीका करत आहे. या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणता आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, भूमिका मांडली पाहिजे. भाषेचा स्तर राखला पाहिजे. माझी, माझ्या कुटुंबाची बदनामी होईल असं वर्तन या युट्यूब चॅनलने केलेलं आहे. त्या ‘लय भारी’ युट्यूब चॅनलच्या तृषार आबाजी खरात विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मी सभागृहात मांडत आहे” जयकुमार गोरे म्हणाले.

ते निवेदन शासनाने पोलिसांकडे पाठवलं

“सभागृहात माझी मुख्यमंत्री महोदयाना विनंती आहे की, संबंधित प्रकरण चालू झालं. राज्यपालांना कुणी निवेदन दिलं की, त्या संदर्भात ते निवेदन शासनाने पोलिसांकडे पाठवलं. त्यांनी चौकशी केली. ज्यांची निवेदनावर सही होती, त्यांनी एसपीला जबाब दिला की, संबंधित सही माझी नाही. मी तो अर्ज केलेला नाही” अशी माहिती जयकुमार गोरे यांनी सभागृहात दिली.

म्हणून माझ्याविरोधात षडयंत्र

“माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, राज्यपालांना खोट निवेदन देणं, एखाद्या कुटुंबाला, नेतृत्वाला आयुष्यातून उद्धवस्त करण्याचा प्लान करणं हे घातक आहे. या प्रकरणात मी जास्त काही बोलणार नाही. पण याच सभागृहात काही सदस्य आहेत, ज्यांना विधान परिषदेतील पराभव सहन झाला नाही. म्हणून माझ्याविरोधात षडयंत्र केलं” असा दावा जयकुमार गोरे यांनी केला.

जयकुमार गोरे दोषी असेल, तर त्याला फासावर द्या

“जयकुमार गोरे दोषी असेल, तर त्याला फासावर द्या. पण अशा पद्धतीने अर्ज देणं, प्लान करणं. चौकशी केल्यावर संबंधित सांगतात की, मी अर्ज केला नाही. याची चौकशी झाला पाहिजे. कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी जयकुमार गोरे यांनी केली.

भैय्याजी जोशींचं वादग्रस्त विधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेटच प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्रात राहणाऱ्या…

0

मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी केलेल्या वक्तव्यांनी नवा वाद पेटला आहे. “मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असे काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे. मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. इथे अनेक भाषा बोलल्या जातात.” असे वक्तव्य भैय्याजी यांनी केले होते. मात्र यावरूनच वाद पेटला असून संजय राऊतांसह विरोधकांनी या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले. या वक्तव्यावर सरकारची भूमिका काय आहे, ते स्पष्ट करावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी विधानसबेत केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

भय्याजी जोशी यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही. ते पूर्णपणे ऐकून, माहिती घेऊन मी बोलेन.पण सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची , महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. माझ्या वक्तव्यात, त्या संदर्भात भय्याजी जोशी यांचं दुमत असेल असं मला वाटत नाही. तथापि पुन्हा एकदा शासनाच्या वतीने सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषाही मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कोणत्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. कारण जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो, तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो, त्यामुळे तो सन्मान आहेच. म्हणूनच शआसनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीसांनी केला.

काय आहे प्रकरण ?

मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी मुक्ताफळं उधळली. ते घाटकोपर येथील एका कार्यक्रमात मुंबईच्या भाषिक वैशिष्ट्यावर बोलत होते. “मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. तर गिरगावात हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणार्‍या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही.” असं वक्तव्य करून त्यांनी वाद ओढावून घेतला.

बॉलिवूडला रामराम ठोकत अनुराग कश्यपने सोडली मुंबई, ‘या’ शहरात शिफ्ट होण्याचे कारण काय?

0

‘गँग्स ऑफ वासेपूर’ सारख्या अनेक हिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या अनुराग कश्यपने मोठा निर्णय घेतला आहे. अनुराग कश्यपने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे. त्याने बॉलिवूड अतिशय विषारी झाल्याचे म्हणत आता मुंबई देखील सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अनुरागने इतका मोठा निर्णय का घेतला? नेमकं कारण काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

अनुराग कश्यपची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये त्याने दक्षिण भारतात शिफ्ट होण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते. आता समोर आलेल्या माहितीनुसार, अनुराग कश्यप हा मुंबई सोडून जात असून बंगळुरूमध्ये शिफ्ट होत आहे. त्याने हिंदी चित्रपट उद्योगाबद्दलची आपली निराशा या आधी अनेकवेळा व्यक्त केली होती आणि बॉलिवूडला देखील विषारी म्हणत आपली स्पष्ट भूमिका पुन्हा मांडली आहे.

मुलाखतीमध्ये अनुराग कश्यप म्हणाला की, ‘मला फिल्म इंडस्ट्रीतील लोकांपासून दूर राहायचे आहे. हा उद्योग दिवसेंदिवस विषारी बनत चालला आहे. येथील प्रत्येकजण हा अवास्तव असणाऱ्या लक्ष्यांच्या मागे लागला आहे. पुढचा चित्रपट ५०० किंवा ८०० कोटींचा कसा बनेल यासाठी प्रयत्न करत आहे. सर्जनशील वातावरण संपुष्टात आले आहे. मला दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्यांचा नेहमी हेवा वाटतो. इथून निघून बाहेर जाऊन प्रयोग करणे माझ्यासाठी कठीण आहे. मला त्याची किंमत मोजावी लागेल.’

पुढे अनुराग म्हणाला की, ‘माझे मार्जिन कुठे आहे? असे अनेक प्रश्न विचारले जातात. कारण, चित्रपटाच्या अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे चित्रपट सुरु होण्याआधीच आपण हे कसे विकणार आहोत असा प्रश्न लोकांना पडायला लागला आहे. त्यामुळे चित्रपट निर्मितीचा आनंद हरवळून जातो. याच कारणामुळे मला इथून बाहेर पडायचे आहे. पुढच्या वर्षी मी मुंबई सोडून जाणार आहे.’