Home Blog Page 140

दिशा सालियन प्रकरणी मोठं ट्विस्ट; हे सर्व पुरावे एक -दोन वर्षांमध्ये समोर सतीश सालियन यांचं सर्वात मोठं वक्तव्य

0

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. या प्रकरणात त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप केले आहेत.त्यामुळे राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. दिशा सालियन प्रकरणात तिच्या वडिलांवर दबाव होता असा आरोप करण्यात येत आहे. मात्र याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले सतीश सालियन?

मागच्या पाच वर्षांमध्ये तुमच्यावरती दबाव होता का? आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर तुम्ही सर्व सांगितलं होतं तर तुम्ही गप्प का असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की नेमकं काय घडलं याची कल्पना मला नव्हती, मला हे सर्व नंतर काळलं. मला आधीपासून या प्रकरणातील पुराव्यांबाबत माहिती नव्हती. हे सर्व पुरावे एक -दोन वर्षांमध्ये समोर आले आहेत. मी एसआयटीला म्हटलं होतं की, तुम्हाला जी काही कारवाई करायची आहे ती करा. माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता असं सतीश सालियन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज सतीश सालियन यांनी या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी पोलीस आयुक्तांकडे नेमकी काय मागणी केली याबाबत त्यांचे वकील निलेश ओझा यांनी माहिती दिली आहे. ‘दिशाचे वडील सतीश सालियान यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली. आदित्य ठाकरेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. परमबीर सिंग, सचिन वाझेलाही आरोपी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे’, असं यावेळी निलेश ओझा यांनी म्हटलं आहे.

आरोप -प्रत्यारोपाला उधाण

या प्रकरणात सतीश सालियन यांनी जी याचिका दाखल केली आहे, त्या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला उधाण आलं आहे.

लोकसभेत वित्त विधेयक २०२५ मंजूर, हा कर झाला रद्द; इतर ३४ बदलांचाही समावेश

0

वित्त विधेयक लोकसभेत २०२५ मंजूर झाले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सुधारित वित्त विधेयक २०२५ सादर केले. या सुधारणांमध्ये ऑनलाइन जाहिरातींवरील ६ टक्के डिजिटल कर किंवा ‘गुगल कर’ रद्द करणे समाविष्ट आहे.याशिवाय, इतर ३४ दुरुस्त्या समाविष्ट आहेत. आता हे विधेयक राज्यसभेत सादर केले जाणार आहे.

या विधेयकाला जर राज्यसभेतही मंजुरी मिळाली, तर हे विधेयक पूर्ण होईल. २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात एकूण ५०.६५ लाख कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे, जो चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत ७.४ टक्के वाढ आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, ‘जाहिरातींसाठी ६ टक्के समानीकरण शुल्क रद्द करण्याचा मी प्रस्ताव ठेवतो. आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीतील अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी, ऑनलाइन जाहिरातींवरील समानीकरण शुल्क रद्द केले जाणार आहे.

पुढील आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित भांडवली खर्च ११.२२ लाख कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे, यामध्ये १५.४८ लाख कोटी रुपयांचा प्रभावी भांडवली खर्च समाविष्ट आहे. अर्थसंकल्पात ४२.७० लाख कोटी रुपयांचे एकूण कर महसूल संकलन आणि १४.०१ लाख कोटी रुपयांचे एकूण कर्ज घेण्याचा अंदाज आहे. केंद्र पुरस्कृत योजनांसाठी लक्षणीय वाटप करण्यात आले आहे, १ एप्रिल २०२५ पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी ५,४१,८५०.२१ कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. चालू आर्थिक वर्षासाठी वाटप केलेल्या ४,१५,३५६.२५ कोटी रुपयांपेक्षा ही लक्षणीय वाढ आहे.

आर्थिक वर्ष २६ साठी राजकोषीय तूट

केंद्रीय क्षेत्रातील योजनांसाठी, आर्थिक वर्ष २६ साठी १६.२९ लाख कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत, २०२४-२५ मधील १५.१३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात एकूण २५,०१,२८४ कोटी रुपये राज्यांना हस्तांतरित केले जातील, जे २०२३-२४ च्या प्रत्यक्ष आकड्यांपेक्षा ४,९१,६६८ कोटी रुपयांची वाढ दर्शवते. शिवाय, आर्थिक वर्ष २६ साठी राजकोषीय तूट ४.४% असण्याचा अंदाज आहे,हे चालू आर्थिक वर्षाच्या ४.८% च्या तुटीपेक्षा कमी आहे.

PCMC स्मार्ट सिटीचे इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

0

मुंबई : स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येकी 25 टक्के आपला हिस्सा देतात. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रोजेकटला गतिमान करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी यांच्यासाठी एकत्रित काम करणारे सॉफ्टवेअर आवश्यक होते. या इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअरचे काम मे 2025 मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी  मिसाळ यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.

आमदार अमित गोरखे आणि आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर  देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या. आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने  जीआयएसईआरपीच्या दृष्टीने 112 कोटी रुपयांची वेगळी निविदा का काढली ?  काम संथ गतीने होत असल्याने 92 लाख रुपयांचा दंड ठोठावला अशा परिस्थितीत कंपनीकडे असलेला डेटा किती सुरक्षित आहे? असा प्रश्न विचारला होता, त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की. 2019 साली अटॉस इंडिया ला काम देण्यात आले आहे, स्मार्ट सिटी आणि महापालिकेचे सर्व विभाग यांना एकत्र आणण्याचे ट हे काम आहे, पूर्वी महापालिकेच्या सर्व विभागाचे काम स्वतंत्रपणे चालत असे आता ते सर्व विभाग एकत्रित येतील आणि स्मार्ट सिटी शी सुद्धा कनेक्ट असतील.  पूर्वीच्या सॉफ्टवेअर मध्ये जीआय तंत्रज्ञान नव्हते नवीन मध्ये आहे आणि ते 320 लेयर मध्ये काम करते यामुळे महापालिकेचा डेटा पूर्णपणे सुरक्षित असेल. प्रॉपर्टी टॅक्स साठी या सॉफ्टवेअर मार्फत सर्वे करण्यात आला, यात ई ऑफिस सुविधा आहे. यात प्रत्येकाचे डॅश बोर्ड आणि लोंग इन वेगळे असल्याने सुरक्षा, गोपनीयता अधिक चांगल्या पद्धतीने होणार आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी अटॉस इंडिया प्रा. लि. ला गुजराती कंपनी नसेंट टेक्नॉलॉजी सोबत का निविदा भरावी लागली? असा प्रश्न उपस्थित करत यात घोटाला असल्याचा आरोप केला. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, निविदेच्या अटी शर्ती प्रमाणे या दोन कंपन्या एकत्र आलेल्या आहेत. तीन वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र झाले नाही यामुळे दंड आकाराला असून काम मे 2025 पर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले.

2014 मध्ये शिवसेनेसोबत युती का तुटली? अखेर 10 वर्षांनी फडणवीसांनी केला गौप्यस्फोट..

0

शिवसेनेसोबत 2014 मध्ये युती का तुटली? अखेर 10 वर्षांनी फडणवीसांनी केला गौप्यस्फोट…शिवसेना-भाजपची ही युती का तुटली, याची इनसाइड स्टोरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत राजकीय गौप्यस्फोट केला. चार जागांवरून युती तुटली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले.

मुंबईत राजस्थान ग्लोबल फोरमच्यावतीने सिक्कीमचे राज्यपाल ओम माथुर यांचा सत्कार सोहळा पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात 2014च्या विधानसभा निवडणुकीचा घटनाक्रम सांगितला. ओम माथुर यांच्याकडे भाजपकडून महाराष्ट्राची जबाबदारी होती. युती राहिली असती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता. पण, युती तुटली आणि भाजपचा मुख्यमंत्री झाला असल्याच्या आशयाचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेना 147 आणि भाजप 127 जागांवर निवडणूक लढवणार भाजपचा शिवसेनेला प्रस्ताव होता. मात्र, शिवसेना 151 जागांवर अडून बसले. जागा वाटपावरून शिवसेनेसोबत चर्चा सुरू होती. आम्ही त्यांना जास्त जागा द्यायला सुद्धा तयार होतो. मात्र त्यांनी आपल्या मनात 151 चा आकडा पकडला होता असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

अन् युती तुटली….

फडणवीस यांनी पुढे म्हटले की, त्यावेळी ओमप्रकाश माथूर हे महाराष्ट्र प्रभारी होते यांनी अमित शहा यांच्या सोबत बोलणं केलं. त्यावेळी अशा प्रकारे अशाप्रकारे चालणार नाही, अमित शहा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बोलणं केलं. त्यानंतर ठरलं की आम्ही 127 आणि ते 147 असा फॉर्म्युला ठरला तर होईल, नाहीतर युती राहणार नाही.

अमित शाह आणि ओम माथूर आत्मविश्वास होता की पक्ष अधिक जागांवर विजयी होऊ. या विश्वासाच्या जोरावर आम्ही शिवसेनेला अल्टीमेटम दिलं आणि सांगितलं की 147 वर तुम्ही लढणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही 127 लढू. युती 200 हून अधिक जागांवर विजयी होईल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री होईल असे सांगण्यात आले.

मी माफी मागणार नाही… पलंगाखाली लपणार नाही अजित पवार जे बोलले तेच मी….; कुणालने पुन्हा चिमटे काढले 

0

कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे गाणे गायले. त्यामुळे शिंदे गट संतापला आणि त्यांनी कामरांच्या स्टुडिओवर हल्ला केला. कामरांवर गुन्हा दाखल झाला आहे, पण कामरांनी पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणावर माफी मागण्यास नकार दिला आहे.

मी माफी मागणार नाही… अजित पवार जे बोलले तेच मी बोललो; कुणाल कामराने काढले चिमटे

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारं गाणं गायलं आहे. त्यामुळे शिंदे गटात संतापाची लाट पसरली आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या गाण्याचा निषेध म्हणून कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला. त्यानंतर कामराच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आज दिवसभर या घटनेचे पडसाद उमटले होते. याच दरम्यान आपण पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याचं कुणाल कामरानने म्हटलं आहे. आता कुणालने एक स्टेटमेंट काढलं असून त्यात त्याने मी माफी मागणार नाही. तसेच मी बेडखाली लपून बसणाऱ्यांपैकीही नाही, असं सांगतानाच अजित पवार जे बोलले तेच मी बोललोय, असा दावा कुणाल कामराने केला आहे.

कुणाल कामराने चार पानांचं एक ट्विट केलं आहे. त्यातून त्याने आपली भूमिका जाहीर केली आहे. या ट्विटमधून कामराने सत्ताधाऱ्यांना आणि शिंदे गटाला उपरोधिक चिमटे काढले आहे. कुणालने त्याच्या खास शैलीतून अत्यंत मार्मिक शब्दात या पत्रातून चिमटे काढले आहेत.

तितकेच मूर्खपणाचे

हॅबिटॅट हा एक मनोरंजनाचा मंच आहे. सर्व प्रकारच्या जागांसाठीचं ते एक व्यासपीठ आहे. हॅबिटॅट (किंवा इतर कोणतेही स्थळ) माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही. तसेच माझं बोलणं आणि कृती यावरही कोणतं नियंत्रण नाही. कोणताही राजकीय पक्षही नाही. एका विनोदी कलाकाराच्या शब्दावरून एखाद्या ठिकाणावर हल्ला करणे तितकेच मूर्खपणाचे आहे. तुम्हाला दिलेले बटर चिकन आवडले नाही म्हणून टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटवण्याचाच हा एक प्रकार आहे, असा चिमटा कुणालने काढला आहे.

धमकी देणाऱ्या “राजकीय नेत्यां”साठी…

बोलण्याचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांची स्तुती करण्यासाठी नाही, आजची माध्यमं आपल्याला तसे भासवत असले तरी. सार्वजनिक जीवनातील बलाढ्य व्यक्तीवरील विनोद सहन करण्याची तुमची असमर्थता माझ्या हक्काचे स्वरूप बदलू शकत नाही. मला माहीत आहे त्यानुसार, आपल्या नेत्यांची आणि आपल्या राजकीय व्यवस्थेच्या तमाशाची थट्टा करणे कायद्याच्या विरोधात नाही. तरीही, माझ्याविरुद्ध केल्या गेलेल्या कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी मी पोलीस आणि न्यायालयांना सहकार्य करण्यास तयार आहे, असं त्याने म्हटलंय.

मग एल्फिस्टन पूल पाडण्याची गरज

पण ज्यांनी एका विनोदाने दुखावल्यावर तोडफोड करणे योग्य ठरवले, त्यांच्यावर कायदा योग्य आणि समान रितीने लागू होईल का? आणि आज हॅबिटॅट येथे पूर्वसूचना न देता आलेल्या आणि हॅबिटेटवर हातोडा मारणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे का? असा सवाल त्याने केला आहे. पूर्व सूचना न देता हॅबिटॅटवर हातोडा टाकता? का तर मी तिथे कार्यक्रम करतो म्हणून. कदाचित माझ्या पुढील कार्यक्रमासाठी, मी एल्फिन्स्टन पूल किंवा मुंबईतील इतर कोणत्याही इमारतीची निवड करेन. मला वाटतं मग त्यालाही त्वरित पाडण्याची गरज आहे, असा चिमटा त्याने काढला आहे.

माझा नंबर लीक करणाऱ्यांसाठी…

अनोळखी कॉल माझ्या व्हॉईसमेलवर जातात. तिथे तुम्हाला तेच गाणं ऐकायला मिळतं आणि ते तुम्हाला मुळीच आवडत नाही. हे तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल याची मला खात्री आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच या तमाशाचे प्रामाणिकपणे वृत्तांकन करणाऱ्या माध्यमांनी लक्षात ठेवावं की भारतात पत्रकार स्वातंत्र्य 159 व्या क्रमांकावर आहे, असं तो म्हणाला.

माफी मागणार नाही

मी जे बोललो तेच अजित पवार (पहिले उपमुख्यमंत्री) यांनी एकनाथ शिंदे (दुसरे उपमुख्यमंत्री) यांच्याबद्दल बोलले होते. मला या जमावाची भीती वाटत नाही आणि मी हे शांत होण्याची वाट पाहत माझ्या पलंगाखाली लपणार नाही, असा टोलाही त्याने लगावला आहे

आजचा दिवस महत्त्वाचा! ‘स्थानिक’च्या बिगुलआधी अजित पवार की शरद पवार, राष्ट्रवादी कुणाची? निर्णयाची शक्यता

0

नवी दिल्ली :  विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने जोरदार मुसंडी मारत 41 जागा जिंकल्या आहे. तर शरद पवार गटाला पराभवाचा धक्का पचवावा लागला. पण अजूनही राष्ट्रवादी कुणाचीही हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. अशातच आता 25 मार्च रोजी सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीच्या पक्षासंदर्भात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. पक्ष नाव आणि चिन्ह या संदर्भात जयंत पाटील यांच्या वतीने जी याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर 25 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या द्विसदस्य खंडपीठामुळे ही सुनावणी होणार आहे दुपारी बारानंतर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार यांनी काका शरद पवारांची साथ सोडून महायुतीत सामील झाले होते. अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळांसह प्रमुख नेत्यांनी वेगळा गट स्थापन केला होता. पण या गटानेही राष्ट्रवादी आपलीच असल्याचा दावा केला. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. कोर्टाने घड्याळ चिन्ह वापरण्यास अजित पवार गटाला अटी आणि शर्थी घालून दिल्या होत्या. तर शरद पवार गटाला स्वतंत्र्यपणे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं होतं.

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली. तर शरद पवार गटाने तुतारी वाजवणाऱ्या माणूस चिन्हावर निवडणूक लढवली. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर विधानसभा निवडणुकीत वारं बदललं. अजित पवार गटाने सर्वाधिक ४१ जागा जिंकल्या होत्या. तर शरद पवार गटाला फक्त ७ जागांवर समाधान मानावं लागलं. अजित पवार गटाने महायुतीत राहुन दमदार कामगिरी केली. तर महाविकास आघाडीसोबत लढून शरद पवार गटाने सर्वात कमी जागा जिंकल्या. आता स्थानिक निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे, त्याआधी राष्ट्रवादी कुणाची? याचा निर्णय सुप्रीम कोर्टात लागण्याची शक्यता आहे.

‘तुम्ही खुर्च्या उबवताय?’ दंगेखोरीकडे डोळेझाक हे धोरण? ठाकरे सेनेचा सवाल; म्हणाले, ‘स्वतःच्या कॅबिनेटपासून…’

0

“नागपुरातील दंगलखोरांना सोडणार नाही व त्यांच्याकडूनच नुकसानभरपाई वसूल करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मात्र दंगलखोरांवर कारवाई करणार म्हणजे ते नक्की काय करणार? खरे दंगलखोर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत व कारवाईचा बडगा सगळ्यात आधी त्यांच्यावरच उगारला जायला हवा. औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी चिथावणी देणारे मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत. हे मंत्री, भाजपचे आमदार, मिंधे गटातील बाटगे हिंदुत्ववादी यांनी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवले व त्यातून नागपुरात दंगलीची ठिणगी पडली,” असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

भाजपवाल्यांचा मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा ठरवून प्रयत्न

“खोटे नरेटिव्ह निर्माण करायचे व लोकांत गोंधळ उडवायचा हे भाजप आणि त्यांच्या लोकांचे धोरण आहे. पाच वर्षांपूर्वी सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केली. या आत्महत्येस ‘हत्या’, ‘खून’ वगैरे ठरवून भाजपवाल्यांनीच मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात रिया चक्रवर्ती भरडली गेली. तिच्यावर ठपका ठेवून तुरुंगात ढकलले. आता सीबीआयने सुशांतसिंह प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला. या प्रकरणात संशयास्पद असे काहीच आढळले नसल्याचे सीबीआयने त्यांच्या अहवालात म्हटले व रिया चक्रवर्तीला क्लीन चिट दिली, पण मग रिया चक्रवर्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलून जी बदनामी केली गेली, तुरुंगवास भोगायला लावला त्याची भरपाई कोणी करायची? येथेही सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात गुन्हे दाखल करणे, याचिका दाखल करणे वगैरे प्रकार केले, पण त्यापेक्षाही भयंकर प्रकार भाजप व त्याच्या भाडोत्र्‍यांनी केले,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

‘फेकाड्या’ लोकांनाही सोडू नका

“कंगना राणावतसारख्यांना तर मुंबईत राहणे म्हणजे पाकिस्तानात राहण्यासारखे भासत होते. मग आता सीबीआयने सुशांतसिंह प्रकरणात घेतलेल्या भूमिकेवर त्यांना काय वाटते? दंगलखोरांना सोडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणतात. तसे या ‘फेकाड्या’ लोकांनाही सोडू नका. महाराष्ट्राचे समाजजीवन खतम करण्याचे काम या लोकांनी चालवले आहे. औरंगजेब, सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन या मृतांचा बाजार भरवून राजकारण करण्याचा षंढपणा वाढला आहे. मुख्यमंत्री चिंता व्यक्त करतात की, नागपूरच्या दंगलीवरून राजकारण होत आहे? मुख्यमंत्री महोदय, राजकारण नक्की कोण करत आहे आणि दंगलीच्या आगीत तेल कोण टाकत आहे? याचा शोध खरेच घेतला तर सत्य समोर येईल,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

हे कसे चालेल?

“मुख्यमंत्र्यांनी पुढे जाहीर केले की, जे कोणी देशभक्त आहेत त्यांना हात लावला जात असेल तर सहन केले जाणार नाही. जे कोणी कायदा हातात घेतील, पोलिसांवर हात टाकतील त्यांना सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांची भूमिका कठोर आहे, पण देशभक्त कोण व देशद्रोही कोण हे ठरवायचे कोणी? औरंग्याची कबर तोडा असे सांगणारे तुमच्याच मंत्रिमंडळात आहेत. देशभक्तीचे प्रमाणपत्र हेच लोक देणार व दंगलींना प्रोत्साहनही तेच देणार हे कसे चालेल?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

स्वतःच्या कॅबिनेटपासून कारवाई सुरू करा

“नागपूरचा हिंसाचार ही महाराष्ट्रात मोठ्या दंगली घडवण्याची पूर्वतयारी आहे. लोकांची माथी भडकवणे व हिंसाचार करणे शक्य आहे याची राजकीय चाचपणी नागपुरात झाली. दंगलीचे रॉकेट यशस्वीपणे उडाल्यावर मुख्यमंत्री म्हणतात, ‘‘दंगलखोरांना सोडणार नाही,’’ मात्र जे दंगलखोर मंत्रिमंडळात बसून मुख्यमंत्र्यांना, कायद्याला आव्हान देतात, ‘‘मुख्यमंत्र्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. आम्ही हवा तसा धुडगूस घालू, आगी लावू, आमचे कोण काय वाकडे करणार?’’ असे उघडपणे बोलतात त्यांचे काय? त्यांच्याकडे दुर्लक्ष करून वर मुख्यमंत्री शहाजोगपणे सांगतात की, दंगलखोरांना सोडणार नाही. खरे तर दंगलखोरांना न सोडण्याची कारवाई मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कॅबिनेटपासून सुरू करायला हवी,” असा खोचक सल्ला ठाकरेंच्या सेनेनं दिला आहे.

...मग खुर्च्या उबवताय कशाला?

“धनंजय मुंडे यांच्या लोकांनी बीड जिल्ह्यात गुंडगिरी आणि दडपशाहीचा उत्पात माजवला व त्यातून खून, खंडण्यांचे गुन्हे वाढले. मुख्यमंत्र्यांना मुंडेंवरील कारवाईबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले तर त्यांनी उत्तर काय दिले? “उगाच हवेत तीर मारू नका. धनंजय मुंडेंविरोधात काही पुरावे असतील तर घेऊन या. कारवाई करतो,’’ असे ते म्हणाले. म्हणजे पोलीस काहीच करणार नाहीत. खून पडल्यावर आवाज जनतेने उठवायचा आणि पुरावेही जनतेनेच गोळा करून द्यायचे. मग तुम्ही खुर्च्या उबवताय कशाला? अदानीसारख्यांची संपत्ती वाढवायला?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

...तर तुमची ही ‘सोडणार नाही’ची भाषा निरर्थक

“राज्यात सरकारात आणि सरकारबाहेर वाढलेल्या दंगेखोरीवर कारवाई करण्याऐवजी त्याकडे डोळेझाक करणे हेच सरकारी धोरण आहे. भ्रष्टाचारावर कारवाई नाही आणि दंगलखोरांवरही कारवाई नाही. सगळाच वरवरचा मामला. राज्याचे मुख्यमंत्री दंगलीचे गुन्हेगार काखेत घेऊन फिरत आहेत आणि पुन्हा सांगत आहेत की, दंगलखोरांवर कारवाई करू. चोर घरातच आहे आणि मालक बाहेर उगाच बोभाटा करीत आहे. दंगली भडकवणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करणार नसाल तर तुमची ही ‘सोडणार नाही’ची भाषा निरर्थक आहे,” असं म्हणत ठाकरेंच्या सेनेनं फडणवीसांना सुनावलं आहे.

माझी गोष्ट सोडून द्या, पण ‘…त्याने पंगा घेतलाय’, कुणाल कामराच्या कॉमेडीवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

0

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने सोमवारी आपल्या युट्यूब चॅनेलवर ‘नया भारत’ नावाचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. ज्यात त्याने देशातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. त्याने काही बॉलिवूड गाण्यांचा आधार घेत पंतप्रधान मोदींसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जहरी टीका केली. या टीकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. कुणाल कामराचा व्हिडीओ ज्या स्टुडिओमध्ये शूट झाला होता, त्या स्टुडिओची शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. शिवाय कुणाल कामराने शिंदेंचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी होत आहे.

यावरून आता राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. स्वत: कामराने एक्स अकाऊंटवर निवेदन जारी करत आपण माफी मागणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडींवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कुणाल कामराच्या कॉमेडीमागं कोण आहे, हे पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते एका मराठी चॅनेलशी संवाद साधत होते.

कुणाल कामराने केलेल्या विनोदी गाण्यावर प्रतिक्रिया विचारली असता एकनाथ शिंदे म्हणाले, “लोकशाहीत अभिव्यक्ती स्वतंत्र गरजेचं आहे. पण त्याचा अर्थ बदलून कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाला तरी चुकीचं ठरवणं, चुकीचं आहे. माझी गोष्ट सोडून द्या, पण त्याने पंतप्रधान मोदी, सुप्रीम कोर्टाचे सर न्यायाधीश, अर्थमंत्री निर्मला सितारामन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील तो बोलला आहे. काही उद्योगपतींवरही तो बोलला आहे. तुमच्यासारख्या अनेक पत्रकारांचा देखील त्याने पंगा घेतला आहे. काही एअरलाईन्सने तर त्याला बॅन केलं आहे. असं वातावरण खराब करणाऱ्या आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तीच्या मागे कोण आहे? हे पाहावं लागेल.”

शिवसैनिकांनी केलेल्या स्टुडिओच्या तोडफोडीवर एकनाथ शिंदे म्हणाले, “एकनाथ शिंदे खूप संवेदनशील माणूस आहे. मी कोणत्याही अॅक्शनवर रिअॅक्शन दिली नाही. माझ्यावर तर कित्येक आरोप लावले. अडीच वर्षांपासून आरोपच आरोप केले जातायत. आताही आरोप करतायत. आता तर त्यांना लोकांनी दाखवून दिलंय, मी आरोपांचं उत्तर कामातून देतो, त्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलं. तरीही ते सुधारत नाहीयेत. मी तोडफोडीचं समर्थन करत नाही, ती कार्यकर्त्यांची भावना आहे.”

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी महामोर्चाचे आयोजन; आनंदराज आंबेडकरांची आंबेडकरी तोफ कडाडली

0

महाड दि. २१ (रामदास धो. गमरे) “बौद्ध धम्मियांचे श्रद्धास्थान महाबोधी महाविहाराचे (बोधगया, बिहार) संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात हवे परंतु अधिनियम बी.टी. १९४९ मुळे सदर महाविहार बौद्ध व हिंदू अश्या उभय धर्मियांच्या ताब्यात आहे, जे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १३, १४, १५, २५, २६ चे पूर्णतः उल्लंघन करणारे आहे तसेच अनुचित पद्धतीने बौद्धांच्या धार्मिक हक्कांवर अतिक्रमण करणारे आहे, हिंदूंच्या मंदिरात हिंदूच पुजारी आणि त्यांचे व्यवस्थापन, ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये ख्रिश्चन फादर आणि त्यांचे व्यवस्थापन, मुसलमानांच्या मस्जिद, दर्ग्यामध्ये मुस्लिम मौलवी आणि त्यांचेच व्यवस्थापन असताना बौद्ध विहारात ब्राम्हणांच अतिक्रमण का ? सरकारने निर्माण केलेला बी. टी. १९४९ हा काळा कायदा रद्द करून महाबोधी महाविहारात ब्राम्हणी कर्मकांडामुळे बुद्धाची जी अवहेलना होते ती थांबावी व आंदोलनासाठी आलेल्या बौद्ध भिख्खू संघावर जो अन्याय होत त्यांची उपेक्षा करीत त्यांना घाणीत बसवले जात आहे हे अन्याय बंद होऊन जागतिक स्तरावर बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी महाविहार बिहार बौद्ध व्यवस्थापनाच्या ताब्यात दयावे याकरता बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, जयंती उत्सव मंडळ या सर्वांच्या सहकार्याने धडक महामोर्चा सम्राट अशोक यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शनिवार ५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता राणीची बाग ते आझाद मैदान या मार्गे आगेकूच करीत मंत्रालयावर धडक देणार” अशी सिंहगर्जना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी ९८ वा चवदार तळे सत्याग्रह महाड क्रांतीदिनी महाड येथे अध्यक्षीय भाषणात केली.

अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच पाणी ही देखील माणसाची मूलभुत गरज आहे परंतु तळागाळातील अस्पृश्य, मागासवर्गीय लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाड चवदार तळे येथे मोठी क्रांती घडवली होती, अखंड विश्वाच्या इतिहासात प्रथमच पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला अशी नोंद असलेला भारत हा एकमेव देश आहे, आजमितीस महाड क्रांतीदिनास ९८ वर्षे झाली असून सालाबादप्रमाणे याही वर्षी ९८ वा चवदार तळे सत्याग्रह महाड क्रांतीदिन गुरुवार दिनांक २० मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता क्रांतिभुमी महाड येथे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस हारपुष्प अर्पण करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली. संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार व चिटणीस मनोहर बा. मोरे व सहकाऱ्यांनी अत्यंत सुमधूर वाणीने धार्मिक पूजापाठ संपन्न केला, सदर सभेच्या सुरवातीस भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिक दलांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी नेत्रदीपक परेड संचालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली, सदर कार्यक्रमास रायगड जिल्ह्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद कृष्णाजी येवले हे प्रमुख पाहुणे म्हणून व उपसभापती विनोद मोरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते, सदर प्रसंगी महाड तालुका चिटणीस सखाराम जाधव यांनी आपल्या पहाडी आवाजात सूत्रसंचालन केले तर सरचिटणीस राजेश घाडगे यांनी लाघवी शैलीत प्रस्तावना सादर केली तसेच महाड तालुका अध्यक्ष व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अशोक जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तद्नंतर कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, माजी कार्याध्यक्ष व पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर मोरे, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, उपसभापती विनोद मोरे आदी मान्यवरांनी शुभेच्छापर आपले विचार व्यक्त करून उपस्थितीतांना मार्गदर्शन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात आनंदराज आंबेडकरांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना प्रजासत्ताक भारत देशातील प्रत्येक नागरिकास समान हक्क दिला असताना आजही देशात अनेक अराजारकता माजली आहे, लेकीबळींवर अत्याचार होत आहेत, गरिब व मागासवर्गीयांचे बळी घेतले जातात मात्र सरकार त्याकडे जणू कानाडोळाच करीत आहे, सम्राट अशोकाने भारतात चोऱ्याऐंशी हजार लेण्यांची निर्मिती केली, ठिकठिकाणी विहार बांधली ती गेली कुठं हा प्रश्न उपस्थित झाल्यावर आपल्या लक्षात येईल की त्या सर्व लेणी व विहारांवर सनातनी मनुवाद्यांनी अतिक्रमण करून मूळ बुद्ध स्तूप, मुर्त्या यांना शेंदूर पासून त्यांचे हिंदू देव देवींच्या रुपात रूपांतर करून विहारांवर हिंदू मंदिर बांधून बुद्धाची अवहेलना केली आहे. सद्यस्थितीत बुद्धाचे विचार या देशातून नष्ट करण्यासाठी महाबोधी महाविहारावर अतिक्रमण करून तिथे ही कर्मकांड करण्यात येत आहेत, मागील दोन महिने महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी चाललेले आंदोलन दबावतंत्र वापरून चिरडण्याचे काम सरकार करीत आहे, म्हणून अन्यायी बी.टी. १९४९ अधिनियम बाजूला सारून बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे” असे प्रतिपादन करीत सर्व बौद्धधर्मियांनी महामोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

सदर कार्यक्रमास विठ्ठल जाधव, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, उपसभापती विनोद मोरे, श्रीधर साळवी, यशवंत कदम, आनंद शिर्के, भगवान तांबे, रवी जाधव, रवींद्र शिंदे व्यवस्थापन मंडळाचे सर्वच सदस्य, विश्वस्त मंडळ, महिला मंडळ व विविध संघटनेचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरतेशेवटी सदर अभिवादन सभा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर; अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे पद येणार? ही नावे आघाडीवर!

0

विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची नियुक्ती चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. विधानसभा उपाध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून उद्यापर्यंत (मंगळवार, ता.25 मार्च) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. उपाध्यक्षपदाची निवड 26 मार्च रोजी होणार आहे. महायुतीमध्ये उपाध्यक्षपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी आमदार राजकुमार बडोले आणि अण्णा बनसोडे यांची नावे चर्चेत आहेत, त्यातून अजितदादा कोणाला संधी देतात, हे पाहावे लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीत तब्बल 234 पेक्षा जास्त आमदार निवडून आल्याने महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर आले आहे. सर्वाधिक 123 आमदार निवडून आलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपपुख्यमंत्री झाले. विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ॲड राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे.

विधानसभेचे अध्यक्षपद भाजपकडे गेल्याने महायुतीमधील कोणत्या पक्षाकडे उपाध्यक्षपद जाणार याची राजकीय वर्तुळाला उत्सुकता आहे. मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवाळ यांच्याकडे विधानसभेचे उपाध्यक्षपद होते.

त्यांची नियुक्ती महाविकास आघाडी सरकारने केली हेाती. मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी युतीसोबत गेल्याने झिरवाळ यांच्याकडे उपाध्यक्षपद कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे उपाध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे जाणार, याची उत्सुकता आहे.

महायुतीमध्ये विधानसभेचे अध्यक्षपद भाजपकडे आहे, तसेच विधान परिषदेचे सभापतिपदही भारतीय जनता पक्षाकडे आहे. उपसभापतीपद मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असणार आहे. त्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्षपद पुन्हा एकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता आहे, तशी चर्चाही मध्यंतरी हेाती. मात्र त्याची अद्याप अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही. मात्र, सत्ता वाटपाच्या सूत्रानुसार ते राष्ट्रवादीकडे येण्याची अधिक शक्यता आहे.

विभाग आणि सामाजिक समतोल साधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे विदर्भाला देण्याची शक्यता राजकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. ते पद भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांना हे पद देण्याची चर्चा आहे. दुसरीकडे गेली दोन टर्म पिंपरी मतदारसंघातून निवडून आलेले अण्णा बनसोडे यांच्या नावाचीही चर्चा आहे.

अण्णा बनसोडे यांनी कायम उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण केलेली आहे. ते आजपर्यंत अजितदादांसोबत कायम राहिले आहे, ते मंत्रिपदासाठी इच्छूक होते. मात्र, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीने दोन मंत्रिपदे दिल्याने तिसरे मंत्रिपद देणे अशक्य होतं, त्यामुळे अण्णा बनसोडे यांना विधानसभेचे उपाध्यक्षपद देण्यात येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, अजित पवारांच्या धक्कातंत्राचा विचार करता या दोन नावव्यतिरिक्त एखादे नवे नावही पुढे येऊ शकते.