Home Blog Page 139

वारजे बदललयं ‘नव्या उंबरठ्यावर’ सुशील सुसंस्कृत विनयशील ‘भूषणा’वह नेतृत्वालाही खुणावतंय!

0

वारजे माळवाडी आज हे नाव घेतलं की जो अभिमान स्वाभिमान आणि सन्मान संपूर्ण पुणे शहरात मिळतो त्यामागचं कारण म्हणजे होय वारजे बदललय! पुण्याच्या पश्चिम दिशेला सांस्कृतिक सामाजिक आणि वैचारिक विचारांची पेरणी ज्या साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाली त्याच वटवृक्षाच्या छत्रछायेखाली सुशील सुसंस्कृत आणि विनयशील भूषणावह भारतभूषण शरदआबा बराटे युवा नेतृत्वाचा उदय होत आहे. बदललेल्या वारजेच्या नव्या उंबरठ्यावर या नेतृत्वाने आपल्या घरातूनच मिळालेल्या प्रगल्भ वारश्याच्या जीवावर नव्या वारजे माळवाडीची नस ओळखत आपला कार्य आरंभ केला असून ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली घराघरात या नव्या नेतृत्वाच्या चर्चा पोहोचवण्यामध्ये यशही मिळवले आहे. अशा या विनयशील नेतृत्वास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

वारजे माळवाडी चे नाव घेतलं की त्याबरोबर संपूर्ण पुणे शहरात जे नाव घेतले जातात ते म्हणजे दिलीपभाऊ बराटे यांचे! कारणही तशीच आहेत कारण वारजे घडत असताना वाढत असताना ज्या मूलभूत गोष्टींची गरज आवश्यक होती त्या सर्व गोष्टी करण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट अन दूरदृष्टी या नव्या नेतृत्वाने अगदी जवळून पाहिली अन आत्मसातही केली आहे. गावाचा विकास होताना सांस्कृतिक वैचारिक विकासही किती महत्त्वाचा आहे याची जाण घरातच झाल्यामुळे वारजे माळवाडी घडताना त्याची सांस्कृतिक ठेवणंही त्याच उच्च कोटीची व्हावी यासाठी झटलेल्या घरातूनच भारतभूषण बराटे या नेतृत्वाचा कार्यारंभ झाला आहे. सुरुवातीची काळामध्ये या नवख्या तरुणाकडे फक्त तरुणाईची साथ आहे असे वाटत असतानाच आपल्या नेतृत्व कौशल्याच्या साथीने आज या नवतरुणाने समाजातील दिन -दुबळ्या चेहऱ्यावरती हास्य उमटवले असून परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी ध्येय धोरणांची अंमलबजावणी करण्याकडेही मोठा कल दिला आहे. वारजे माळवाडी परिसरामध्ये उच्च विद्याभूषित अन प्रगल्भ लोकांची मांदिआळी वाढत असताना त्यांच्या वैचारिक आणि व्यासंगी विचारांना व्यासपीठ देण्याचे काम एकीकडे सुरू केले तर दुसरीकडे पुणे शहरातील सर्वाधिक अकुशल कष्टकरी लोकवस्ती म्हणून या भागाची नव्याने ओळख तयार होत असताना त्यांच्या समस्या सोडवण्यालाही प्रथम प्राधान्य देण्यात धन्यता मानली.

महाराष्ट्राच्या मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र यासारख्या भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतरणांनी लोकवस्ती वाढत असतानाच त्यांच्या सोयी सुविधांसाठी प्रसंगी स्वखर्चातून मदतीसाठी धावणारे नेतृत्व म्हणून या नेतृत्वाकडे पाहिले जात आहे. सुरुवातीला पारंपरिक विरोधकांना शह देण्यासाठी हा कार्यारंभ झाला असल्याची चर्चा संपूर्ण परिसरामध्ये असतानाच आपल्या वैचारिक बैठकीने ही वाटचाल बदललेल्या वारजे माळवाडीच्या घराघरात पोचले असून वारजे माळवाडीच्या “नव्या उंबरठ्याचं नव नेतृत्व!” म्हणूनही सध्या चर्चेत आहे. पारंपारिक राजकीय हेवेदावे करण्यापेक्षा परिसराच्या विकासासाठी नव्या योजना नव्या संकल्पना आणि नवतरुणांना एकत्र घेत एक नव अभियान सुरू करण्यात या नेतृत्वाला यश प्राप्त झाले आहे. वारजे माळवाडीच्या प्रगल्भ विकासासाठी 1970पासून झटत असलेल्या आपल्या वडीलधारी मंडळींच्या शिदोरीच्या परंपरेतून नव्या विचाराची पक्की बांधीलकी भारतभूषण बराटे यांनी केली आहे.

पुणे शहरातील शैक्षणिक परंपरेचा वारसा वारजे माळवाडी भागातही जपला जावा, परिसरामध्ये बहुमजली इमारतीमधील मुलांप्रमाणेच कष्टकरी आणि मध्यमवर्गीय मुलांनाही शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी भारतभूषण बराटे यांचे विशेष प्रयत्न असतात. सर्वसामान्य लोकांची आपुलकीने चौकशी करणे त्यांच्या अडीअडचणी सोडवणे प्रसंगी स्व- अर्जित पैशाचा वापरही करण्याची गरज पडली तरी सुद्धा नव्या पिढीच्या भवितव्याकडे या नेतृत्वाने कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. सर्वसाधारणपणे राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी कोणताही फायदा बघूनच इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु असते परंतु घराण्याचा वारसा आणि विचारांची पक्की बांधणी या दुग्धशर्करा योगाच्या जीवावर भारत भूषण बराटे नव्या वारजे माळवाडीचे नव नेतृत्व तयार झाले असून ज्येष्ठ, महिला, विद्यार्थी आणि तरुणांना या नेतृत्वामध्ये विकासाची कास दिसत असल्याने जनाधार दिवसेंदिवस वाढतच आहे.

दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेनिस कोर्टचे २५ लक्ष निधी नूतनीकरण आणि अद्ययावतकरण नूतनीकरण सोहळा उत्साहात संपन्न!

0

पुणे महापालिकेमध्ये प्रशासक्रात सुरू झाल्यानंतरही आपल्या भागातील शासकीय सोयी सुविधा अद्यावत ठेवण्यासाठी कर्वेनगर भागातील माजी नगरसेविका लक्ष्मी वहिनी दुधाने यांच्या वतीने कायमच पाठपुरावा केला लोकांच्या करुरूपी पैशातून तयार करण्यात आलेल्या या सोयीसुविधा अद्यावत न ठेवल्यास त्याचे नुकसान होण्याची भीती लक्षात घेऊन वापरात ठेवण्यासाठी त्यांच्याकडून कायमच प्रयत्न केले जातात. पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता नसतानाही आपल्या कल्पक विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आदर्शवत काम करत लक्ष्मी वहिनी दुधाने यांनी कर्वेनगर मध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नागरी सुविधांसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा मिळवण्यासाठी फक्त पदाची अपेक्षा न करता लोक सेवार्थ आयुष्य व्यथित करण्याच्या हेतूनेच आजही दुधाने वहिनी प्रभागांमध्ये कार्यरत असल्याचे प्रतीत होत आहे. पुणे मनपाच्या वतीने कर्वेनगर भागामध्ये विकसित केलेल्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन सिंथेटीक टेनिस कोर्टचा ची निर्मिती करण्यात आली होती परंतु प्रशासक काळामध्ये याकडे दुर्लक्ष होत हा अत्यंत अत्यावशक प्रकल्प किरकोळ निधी अभावी बंद अवस्थेत जाण्याच्या मार्गावर असतानाच स्वप्निल दुधाने यांनी पुणे महापालिका प्रशासक आणि संबंधित विभागाकडे योग्य पाठपुरावा करत पूर्ववत नव्या तंत्रज्ञानाने युक्त असे नवीन कोर्ट तयार करण्यात आले. स्थानिक नागरिकांना याबाबत मोठे कुतूहल असतानाच त्याच उत्साहामध्ये संबंधित दोन सिंथेटीक कोर्टचा उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

आपल्या प्रभागातील आणि पर्यायाने शहरातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी आपण २०१७ साली लोकप्रतिनिधी या नात्याने पहिल्याच टर्ममध्ये पुणे मनपाच्या वतीने स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल विकसित केले आहे. या ठिकाणी सन २०१७ आणि सन २०२० साली विकसित केलेल्या दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेनिस कोर्टचाही समावेश असून या टेनिस कोर्टचे नूतनीकरण आणि अद्ययावतकरण होणे, काळाची गरज बनले होते. याचसाठी वेळोवेळी पाठपुरावा करत तब्बल २५ लक्ष रुपये निधी मंजूर करून आणत आपण या कामाचा शुभारंभ केला होता.

गेल्या आठ वर्षांपासून अनेक खेळाडूंनी या ठिकाणी सराव करत आपल्या पुणे शहराचा नावलौकिक वाढवला आहे. आज खेळाडूंच्याच शुभहस्ते नूतनीकरण सोहळा संपन्न होत असताना अनेक खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. गेल्या तब्बल चार दशकांपासून टेनिस खेळाडूंना प्रशिक्षण देणारे दत्तात्रय शिंदे आणि अनेक वर्षांपासून त्यांचा वारसा जपत खेळाडू या क्रिडा संकुलात घडवणारे प्रशिक्षक रोहित शिंदे उपस्थित होते. यावेळी सर्व क्रीडाप्रेमी आणि पालक वर्गाला आपल्या पाल्याला खेळातही प्राविण्य प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देत पुणे शहराला नवी ओळख निर्माण करून देण्यात योगदान द्यावे, अशी विनंती केली.

नवीन पिढीमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम निर्माण करणे आपलीच जबाबदारी -वि.दा. पिंगळे

0

आज मुलांची घरातील भाषा आणि शाळा-महाविद्यलयातील ज्ञानाची भाषा यात भिन्नता आढळते. इंग्रजी माध्यमात शिकणारे विद्यार्थी मराठी मातृभाषेपासून दूर जाताना दिसत आहेत. मातृभाषेचे महत्त्व घरातूनच सांगणे आवश्यक आहे. नवीन पिढीला मराठी भाषेवर मनस्वी प्रेम करायला शिकवावे लागेल. त्यांना मातृभाषेत विचार करू देणे आणि अभिव्यक्त होऊ देणे ही काळाची गरज आहे, असे मत प्रसिद्ध कवी, लेखक, वक्ते,शिक्षक आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह वि.दा. पिंगळे यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले विद्यानिकेतन संस्था पुणे, बचपन वर्ल्ड फोरम, पुणे आणि समाजसुधारक कै.सौ. शैलाताई रतन माळी स्मारक समिती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय सत्यशोधक बालकुमार मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून वि.दा. पिंगळे बोलत होते.

ज्ञान प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक रतन माळी, संस्थेच्या अध्यक्षा आणि या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा स्मिता वाघ, सचिव प्राचार्य रवींद्र वाघ, आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते जयंत हिरे, युनिकॉर्न रिएॅलिटीच्या उपाध्यक्षा रूपाली पवार, मणिकर्णिका ग्रुपच्या अध्यक्षा मनीषा राऊत, रोटरी क्लबच्या सहाय्यक प्रांतपाल अर्चना गोजमगुंडे, स्वाती पिंगळे, कै.सौ. शैलाताई रतन माळी स्मारक समिती पुणेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेतील बालक, संमेलानाचे अध्यक्ष वि.दा. पिंगळे तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना वि.दा. पिंगळे म्हणाले की, मुलांमध्ये मातृभाषेविषयी आस्था निर्माण करण्यासाठी घरातील मोठ्या व्यक्तींनी मराठीत बोलले पाहिजे. भाषेविषयी प्रमे निर्माण करण्यासाठी पुस्तक वाचन हा एक महत्वाचा मंत्र आहे. यातून नवीन पिढी मराठी भाषेतील उत्तम ग्रंथाचा शोध घेईल, तेव्हा त्यांच्या हातात अनुभवांचा मोठा खजिना पडल्याशिवाय राहणार नाही. हे साहित्य त्यांना जगण्याची प्रेरणा आणि भविष्याची ऊर्जा देईल. कारण उसवलेल्या माणसाचे आणि समाजाचे आयुष्य शिवण्याचे सामर्थ्य साहित्यात असते. पुरुषार्थ नाकारून जीवनाच्या रणांगणावरून पळून जाणाऱ्या भित्र्या समाजाला जगण्याचे, लढण्याचे बळ देण्याचे काम साहित्य करते. अज्ञान, दारिद्र्य, विषमता, अंधश्रद्धा आणि जातीयतेच्या अंधार कोठडीत बंदिवान असणाऱ्यांच्या मनात आत्मसन्मानाचे, अन्यायाविरोधात लढण्याचे शंख फुंकण्याचे काम साहित्य करते. स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, उच्च-निच, ज्ञान-अज्ञानाचा भेदभाव नाहिसा करून विश्वबंधुत्वाचे स्नेहबंध निर्माण करण्याचे काम साहित्य करते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले. महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या अध्यक्षा आणि या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा स्मिता वाघ यांनी संमेलन आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली. महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक रतन माळी यांनी संस्थेच्या कार्याचा आढाव घेतला. या एकदिवसीय संमेलनाच्या उद्घटनानंतर एकपात्री सादरीकरण, कथाकथन, परिसंवाद, कवी संमेलन असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम झाले.

भयंकर… बरण्यांमध्ये छिन्नविछिन्नावस्थेतील 6-7 अर्भक, पुणं हादरलं; महिला आयोगाची दखल नेमकी घटना काय?

0

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. त्यातच आज पुण्यातील दौंडमध्ये कचऱ्यात बरणीमध्ये 6 ते 7 मृत अर्भक आढळले. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे.

दौंडच्या बोरावकेनगर परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये 6 ते 7 मृत अर्भकांचे अवशेष आढळून आले. त्यामुळेस्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. दौंड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

कशी उघडकीस आली घटना?

आज सकाळी ही घटना उघडकीस आली. काही स्थानिकांनी बोरावके नगर परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात संशयास्पद वस्तू पाहिल्या. नागरिकांना संशय आल्यावर त्यांनी जवळून पाहणी केली. त्यांना प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये मृत अर्भकांचे अवशेष दिसले. यात काही अर्भकांचे अवयवही आढळले अशी माहिती समोर आली आहे. ही माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ दौंड पोलीस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि वैद्यकीय विभागाला माहिती दिली.

दौंड पोलिसांकडून चौकशी सुरू

दौंड पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हे मृत अर्भक कुणाचे आहेत, ते कचऱ्यात कसे आले आणि यामागील कारण काय आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी परिसरातील रुग्णालयं आणि दवाखान्यांची चौकशी सुरू केली आहे. या अर्भकांचे अवशेष वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्यांचे वय आणि मृत्यूचं नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.

दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा अवैध गर्भपात, अर्भकांची तस्करी किंवा वैद्यकीय कचऱ्याच्या चुकीच्या विल्हेवाटीचा मुद्दा चर्चेत आला आहे. तज्ञांच्या मते, अशा घटना घडण्यामागे अनेक कारणं असू शकतात. बेकायदेशीर गर्भपात असो किंवा रुग्णालयांकडून नियमांचं उल्लंघन झालं आहे का हे पाहावं लागणार आहे.

महिला आयोगानं घेतली दखल

पुणे जिल्हा प्रशासन आणि राज्य महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. “दौंड पोलिसांनी तपास सुरू केला असून, रुग्णालयांची चौकशीही सुरू आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होईल.” असं महिला आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करून स्पष्ट केलं आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

सध्या हे प्रकरण संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेलं आहे. हे अर्भक कोणाचे होते? त्यांचा मृत्यू कसा झाला? आणि त्यांना कचऱ्यात टाकण्यामागील उद्देश काय होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतरच मिळतील

‘मन मैं नथुराम..!”, FIR दाखल होताच कॉमेडियन कुणाल कामराने शेअर केला नवा Video; पुन्हा डिवचलं

0

मुंबई : स्टँडअप कॉमेडिनय कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका विडंबनात्मक काव्याच्या माध्यमातून खिल्ली उडवल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. कुणाल कामराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी कामराचा शो झालेल्या स्टुडिओत जाऊन तोडफोड केली होती. त्यानंतर काही वेळापूर्वी कामराने आणखी व्हिडीओ बनवत कालच्या तोडफोडीवर हम होंगे कंगाल एक दिन असे म्हणत टीका केली आहे. कुणाल कामरा याने त्याच्या स्टँडअप स्कीटमध्ये विकसीत भारतातील बेरोजगारी, दंगली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर  भाष्य केले आहे. या व्हिडीओनंतर सत्ताधारी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. आधीच एकनाथ शिंदेंवरील काव्यामुळे कामराच्या अडचणी वाढल्या आहेत.

कुणाल कामराला पोलिसांचं समन्स

खारच्या युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेने कामराच्या कॉमेडी शोच्या निषेधार्थ तोडफोड केली. कुणाल कामरा याचा शो याच हॉटेलमध्ये पार पडला होता. हा शो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. शिवसेना शिंदे गटाने केलेल्या राड्यानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा रात्रीच मुंबईतून पळून गेला. दरम्यान खार पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावले आहे. प्रकरणाच्या तपासासाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आलंय.

कुणाल कामरा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात

या आधीही कुणाल कामरा हा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पत्रकार अर्णब गोस्वामीला ट्रोल केल्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला होता. तसेच कुणाल कामराने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर त्याच्या कार्यक्रमातून टीका केली आहे.

महाराष्ट्र सरकारचं केंद्र सरकारला पत्र, केली मोठी मागणी;’राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व किल्ले…’

0

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना वारसा जतनाचे संरक्षकपद हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे. महान मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले शौर्य, लवचिकता आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचे चिरस्थायी प्रतीक आहेत. पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहणाऱ्या या ऐतिहासिक चमत्कारांचे राज्यातील लोकांसाठी प्रचंड सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व आहे. त्यांच्या समर्पित जतनाची गरज ओळखून, महाराष्ट्राचे आशिष शेलार यांनी गजेंद्र सिंह शेखावत यांना पत्र लिहून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) अंतर्गत केंद्र संरक्षित किल्ले महाराष्ट्र सरकारकडे अधिक संवर्धन आणि विकासासाठी हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे.

महाराष्ट्रात 54 केंद्र संरक्षित आणि 62 राज्य संरक्षित किल्ले आहेत. 24 मार्च 2025 रोजीच्या त्यांच्या पत्रात आशिष शेलार यांनी राज्य संरक्षित किल्ल्यांच्या व्यापक

संवर्धनाचे प्रयत्न हाती घेत महाराष्ट्राच्या वारशाच्या रक्षणात सक्रिय भूमिकेवर भर दिला आहे. 18 फेब्रुवारीला रोजी झालेल्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करत, प्रचंड ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व असलेल्या मराठा काळातील किल्ल्यांच्या संवर्धनात सक्रिय सहभाग घेण्याचा आपला दृढ हेतू व्यक्त केला.

आशिष शेलार यांनी महाराष्ट्राच्या अलिकडच्या पुढाकारावर प्रकाश टाकला, ज्यामध्ये त्यांनी ‘भारताचा मराठा लष्करी लँडस्केप’ या थीमखाली 12 ऐतिहासिक किल्ल्यांना प्रतिष्ठित युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी आयकोमॉस, पॅरिस येथे एका शिष्टमंडळाचे नेतृत्व केलं होतं. या किल्ल्यांमध्ये तामिळनाडूतील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. शिष्टमंडळात एएसआयचे अतिरिक्त महासंचालक (संवर्धन आणि जागतिक वारसा) जान्हवीज शर्मा होते.

आशिष शेलार यांनी अधोरेखित केलं की महाराष्ट्राचे पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालय त्यांच्या पॅनेलवर समाविष्ट कंत्राटदार आणि वारसा संवर्धनात तज्ज्ञ असलेल्या संवर्धन वास्तुविशारदांमार्फत संवर्धनाचे काम करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. सरकार, ‘महा वारसा’ आणि ‘वैभव संगोपन’ योजनांसारख्या उपक्रमांद्वारे वारसा-अनुकूल पर्यटन उपक्रम हाती घेऊ शकते आणि किल्ल्यांच्या देखभालीसाठी सीएसआर देणगीदारांना सहभागी करून घेऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांचे एकेकाळी गड असलेले हे किल्ले लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत. भविष्यातील पिढ्यांसाठी त्यांचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे,” असं आशिष शेलार म्हणाले. त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना जलद कारवाई करण्याचे आणि किल्ले महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश एएसआयला देण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे लक्ष केंद्रित संवर्धन प्रयत्न सुनिश्चित होतील. “या वारसा स्थळांचे संरक्षण करण्यात आम्हाला खूप अभिमान आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचा वारसा जपून ठेवू,” असे ते म्हणाले.

भाजप आमदारावर अजित पवार संतापले; एक मिनिट… असं चालत नाही! ही पद्धत नाही! पाराही चढला

0

मुंबई: विधिमंडळ अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या आमदारानं विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पारा चढलेला पाहायला मिळाला. भाजपचे आमदार नारायण कुचेंनी सर्वशिक्षण अधिकार योजनेच्या अंतर्गत आठवीचे वर्ग का मंजूर केले नाहीत, असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना अर्थमंत्री संतापले. प्रश्न विचारण्याची ही पद्धत नाही, अशा शब्दांत अर्थमंत्री अजित पवारांनी त्यांचा संताप व्यक्त केला.

‘मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं, आठवीचा वर्ग मंजूर करण्याचं शासनाचे धोरण नाही. पण त्याच उत्तरात म्हटलंय की मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम आणि अटी २००९ मधील तरतुदीनुसार आठवीचे वर्ग मंजूर करण्यात आले. खाली मंत्री महोदयांनी सांगितलं की वित्त विभाग त्याला अनुदानासाठी परवानगी देत नाही. तर राज्याचे अर्थमंत्री, ओबीसी विभागानं आठवी, नववी, दहावी विनाअनुदानित तत्त्वावर मंजुरी दिलेली आहे. तर अर्थमंत्र्यांना आमची विनंती आहे की तुम्ही आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गाला अनुदानित म्हणून किती दिवसात मंजुरी देण्यात येईल या प्रश्नाचं उत्तर द्यावं,’ असं भाजप आमदार नारायण कुचे म्हणाले.

या प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्र्यांचा पारा चढला. ‘अध्यक्ष महोदय, मी तपासून या प्रश्नाला उत्तर देईन. मला यातलं काहीही माहिती नाही. आता एकदम वित्त विभागानं सांगावं असं नसतं,’ असं अजित पवार म्हणाले. त्यावर मागून काही आमदारांचा आवाज उठवला. ते अजित पवारांना उत्तर देण्यास सांगत होते. त्यांचा आवाज ऐकून अजित पवार आणखी संतापले. ‘एक मिनिट.. असं चालत नाही. ही पद्धत नाही प्रश्न विचारण्याची,’ अशा शब्दांत अर्थमंत्र्यांनी आमदारांना खडसावलं.

अर्थमंत्री बोलत असताना अन्य आमदारांचा आवाज वाढल्यानं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करण्यात आला. त्यांनी आमदार कुचे यांनाही समज दिली. ही प्रश्न विचारण्याची पद्धत नाही, असं नार्वेकर कुचे यांना उद्देशून म्हणाले. त्यानंतर कुचेंनी त्यांचा प्रश्न पुन्हा मांडला. ‘चारवेळेस पत्रं दिली. आठवी, नववी, दहावीच्या वर्गाला तुम्ही मान्यता द्या. वित्त विभागाकडून काहीही प्रतिसाद मिळत नाही. माझी हात जोडून विनंती आहे. हे विद्यार्थी ऊसतोड कामगारांची मुलं आहेत. यांना आठवी, नववीच्या मुलांसाठी परवानगी द्या, हीच आमची विनंती आहे. आम्ही यात काय वाईट बोलतोय?,’ असा सवाल कुचे यांनी विचारला.

आमदार कुचे अतिशय आर्तपणे प्रश्न मांडत असल्याचं विधानसभा अध्यक्षांच्या लक्षात आलं. अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यांची समजूत काढली. ‘तुम्ही पोटतिडकीनं विषय मांडताय, ते बरोबर आहे. पण संबंधित मंत्र्यांना आपण उत्तर देण्याची संधी द्यायची की नाही?, असा सवाल त्यांनी कुचेंना विचारला.

ड्रग्जच्या व्यापारात ‘सामील’चा निलेश ओझा यांचा आरोप; आदित्य ठाकरेंची एका वाक्यात ही प्रतिक्रिया, “त्यांना…”

0

दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सध्या चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. यानंतर हे प्रकरणत पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशा सालियनची आत्महत्या नाही तर हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी केला आहे. यानंतर आज दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेऊन लेखी तक्रार केली आहे.

सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वकील निलेश ओझा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. आदित्य ठाकरे यांचा ड्रग्जच्या व्यापारात सहभाग असल्याचा आरोप निलेश ओझा यांनी केला. तसेच दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरे देखील आरोपी असल्याचा खळबळजनक आरोप वकील निलेश ओझा यांनी केला. या आरोपावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलत असताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी दिशा सालियन प्रकरणाबाबत वकील निलेश ओझा यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत प्रश्न विचारला. यावर आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे म्हणाले की, “त्यांना काय आरोप करायचे ते करुद्या. त्यांना काय बोलायचं ते बोलूद्या. मी याआधीही म्हटलं होतं की त्यांना जे बोलायचं ते बोलूद्या.”

“आम्ही आज मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्याकडे तक्रार दिली. आता आमच्याकडून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. आम्ही केलेली तक्रारच एफआयआर आहे. आता पुढची जबाबदारी पोलिसांची आहे. आता पोलीस आरोपींवर कधी कारवाई करतात हे पाहावं लागेल. आम्ही जी तक्रार दिली तिच एफआयआर आहे. यामध्ये आदित्य ठाकरे, दिनो मोरया, सूरज पांचोली, तसेच त्यांचे सुरक्षा रक्षक, परमबीर सिंह, सचिन वाझे, रिया चक्रावर्ती हे सर्व लोक आमच्या तक्रारीनुसार आरोपी आहेत”, असं वकील निलेश ओझा यांनी म्हटलं.

“दिशा सालियन प्रकरणात जेव्हा आदित्य ठाकरे यांचं नाव आलं, तेव्हा परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अशी स्टोरी सांगितली की आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केले. यामध्ये कोणताही राजकीय नेता त्या ठिकाणी आलेला नव्हता असं परमबीर सिंह यांनी सांगितलं होतं, म्हणजे परमबीर सिंह यांनी आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न केल”, असा आरोप निलेश ओझा यांनी केला.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

वकील निलेश ओझा यांनी माध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. आदित्य ठाकरे यांचा ड्रग्सच्या व्यापारात सहभाग असल्याचा आरोप निलेश ओझा यांनी केला. तसेच दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरे देखील आरोपी असल्याचा गंभीर आरोप वकील निलेश ओझा यांनी केला आहे.

शिंदे नंतर आता अजितदादांचा नंबर… काँग्रेसचे सात टर्म आमदारांचे सुपुत्र गळाला; पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पायघड्या पडल्या

0

विधानसभा निवडणूक संपताच महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यादृष्टीने महाराष्ट्रभरात महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये पक्षप्रवेश सुरू आहेत. यातही राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये नेत्यांचा ओघ जास्त आहे. शिवसेनेने तर महाराष्ट्रभरात ऑपरेशन टायगर राबवले. यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात माजी आमदार, पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश संपन्न झाले. पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळविला आहे.

विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या तत्कालीन आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. शिवसेनेचे दोन वेळचे माजी आमदार सुजित मिणचेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून पुन्हा शिवसेनेत परतले. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे हेही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचारात सक्रिय राहिले. सत्यजित कदम हेही भाजपमधून शिवसेनेत आले.

कोकणात माजी आमदार राजन साळवी आणि सुभाष बने यांचाही वाजतगाजत शिवसेना प्रवेश झाला. पुण्यात काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनीही पक्षप्रवेश केला. मराठवाड्यात वैजापुर-गंगापुर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

आता एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपली ताकद वाढवायला सुरूवात केली आहे. राधानगरीतून विधानसभा निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढविलेले बिद्री साखर करखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. त्यापाठोपाठ अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यात लक्ष घातले आहे.

सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख, अजित घोरपडे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. अलिकडेच त्यांची मिरजेत माजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासोबत बैठक झाली. स्वत: अजित पवार हेही या नेत्यांच्या संपर्कात आहेत. साताऱ्याच्या दक्षिण भागात ताकद वाढविण्यासाठी अजित पवार यांनी माजी मंत्री आणि काँग्रेसचे सात टर्म आमदार राहिलेल्या विलासकाका उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह उंडाळकर यांना पायघड्या अंथरल्या आहेत.

अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला

0

नांदेडमध्ये दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर आज पुन्हा एकदा पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. माजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दलाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला. हे राज्य पुढे जावो, छत्रपती शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच राज्य पहिल्या क्रमांकावर राहिलं आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी नेहमी राज्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे, असे म्हणत अजित पवारांनी पक्षप्रवेशावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी, गेल्या काही महिन्यांतील घडलेल्या घटनांचा अनुल्लेखाने संदर्भ देत त्यांनी कार्यकर्त्यांना मोलाचा सल्लादेखील दिला आहे. राजकीय नेत्यांबद्दलची जनतेमध्ये असलेली अनास्था खुद्द अजित पवारांच्याही तोंडी पाहायला मिळाली. अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिलेले नाही, त्यामुळे पाया पडायच्या नादात पडू नका असे अजित पवारांनी यावेळी म्हटले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत दायमा यांच्यासोबत अनेक लोक पक्षप्रवेश करत आहेत, राजेश विटेकर ही संघटना वाढविण्याचे प्रयत्न करत आहे. त्यांच्या उपस्थित अनेक जण पक्ष प्रवेश करत आहे. केंद्रात आज स्थिर सरकार आले आहे, राज्यात महायुतीचे सरकार आहे. आपण लाडक्या बहिणींची चर्चा केली, काम करताना आपण पारदर्शकपणे भूमिका घेतली पाहिजे, त्यामुळे तसे सांगणे गरजेच असते काही वेळा लोकांना वाईट वाटते, असे म्हणत 2100 रुपयांच्या संदर्भाने अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली.

वक्तव्य जपून करा

सेवा दलाच काम अधिक पुढे कसे घेऊन जाता येईल याचा विचार करावा लागेल, आता नवी पिढी फार कमी येत आहे, यापूर्वी अनेक जण यायचे. उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे, मी काल नांदेडला जाऊन आलो, अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पण, आपल्याला सामंजस्याने भूमिका घ्यायची आहे. आपण महायुतीत आहे, त्यामुळे तसेच काम करायचं आहे. काम करताना चुकीच वक्तव्य तुमच्या तोंडून बाहेर पडता कामा नये, बोलता बोलता चुकीचा शब्द बाहेर पडतो. त्यामुळे प्रॉब्लेम होतात, ते व्हायला नको, असा सल्लाही अजित पवारांनी दिला. आपल्याला आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे आहोत हे सांगता आले पाहिजे. विरोधी पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत अपयशी पडताना पाहायला मिळत नाही. विरोधी पक्ष सभागृहात उपस्थित राहत नाही, लोकशाही आहे त्यांचा अधिकार आहे, असे म्हणत विरोधकांनाही अजित पवारांनी टोला लगावला.

आपण लाडक्या बहिणींच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभे राहिले पाहिजे,आपण एकमेकांच्या संपर्कात राहिलो पाहिजे. अनेक लोक पक्षात येऊ पाहत आहेत पण येणाऱ्यांची जनमानसात भूमिका चांगली पाहिजे. आधीच कोणी चुकी केली असेल आणि मग त्याचा विचार असेल की सत्ताधारी पक्षात जाऊ असे असेल तर असे होणार नाही. नाहीतर उद्या पेपरात फोटो यायचा अमुक पक्ष प्रवेश झाला, असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांचेही कान टोचले.

पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत

उद्या जर आपला माणूस चुकला तर कायदा आहे. डॉ. बाबासाहेबांचा कायदा आहे, कोणीही सुटणार नाही. आपण भाषणात जे काही सांगू ते कृतीत आले पाहिजे. आपण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आहोत, आपण सगळेजण सारखे आहोत असे समजून काम करूया. पाया पाड्याच्या नादात पडू नका, अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिलेले नाही. त्यामुळे पाया पडायच्या नादात पडू नका, असा मोलाचा सल्लाही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.

डीपीडीसीवर संधी असेल

आमचा पदर बिदर फाटून गेलेला आहे, काही बोलू नका मी स्वतः त्याची किंमत मोजलेली आहे. आता ज्या निवडणुका येतील सर्व निवडणुकीत आपल्याला यश मिळेल असा प्रयत्न करू. पण पराभव झाला तरी खचून जाऊ नका. लोकसभेत आपली एकच जागा आली, तरी विधानसभेत आपण खचलो नाही. आपल्याकडे वित्त विभाग आहे, महत्त्वाची खाती आपल्याकडे आहेत. तुम्हाला असे कधीच वाटणार नाही की आपण आगीत उठून फुफूट्यात पडलोय. आपण तीन पक्षाचं सरकार असलो तरी पालकमंत्री असेल पण डीपीडीसीवर आपण सगळे असू. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत होईल, असे आश्वासनही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिले.