Home Blog Page 117

धनंजय मुंडेंसाठी प्रार्थना करा नामदेव शास्त्री यांचं आवाहन गालावरून वारं गेलं; वाणी बंद, पदावर येऊन समाज सेवा घडावी

0

भगवान गडाचे महंत नावदेवशास्त्री यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी सर्वांनी मिळून प्रार्थना करा, असं महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडेंच्या गालावरून वारं गेलं आहे. चांगली वाणी बंद पडली आहे. पहिल्या पदावर येऊन धनंजय मुंडे यांच्या हातून समाजाची सेवा घडावी असं नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे. तसेच भगवान गडासोबत छेडछाड करू नका असंही ते यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे आता नामदेव शास्त्री यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भगवान बाबा जेव्हा मारतात. तेव्हा त्या काठीचा आवाज येत नाही, असंही नामदेव शास्त्री यांनी यावेळी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले नामदेवशास्त्री?

मी जेव्हा फेटा बांधण्यासाठी गेलो तेव्हा मला फोन आला होता. आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपूत्र धनंजय मुंडे या कार्यक्रमाला येणार होते. ते दोन तास हेलीकॉप्टरच्या शेजारी बसले मात्र त्यांना क्लेअरन्स मिळाला नाही. त्यामुळे त्यांना येता आलं नाही. त्यांचा दौरा रद्द झाला. मला तर असं वाटतं की जे त्यांच्या गालावरून वारं गेलं आहे, सगळ्यांनी मिळून भगवान बाबांना प्रार्थना करा, एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे, ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाजकल्याण त्यांच्या हातानं घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलू या, असं नावदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गडावर सर्वजण एकोप्याने राहतात, आमच्यात खडे टाकू नका, ज्यांचं कल्याण करायचं आहे, त्यांनी या. हा वारकरी संप्रदाय आहे. जातीपातीच्या पलिकडचा संप्रदाय आहे. पण दुसरा शब्द सांगताना सांगून जातो. गडासोबत छेडखानी करू नका, भगवान बाबा जेव्हा पाहातातना तेव्हा आईच्या डोळ्यातून आलेलं प्रेम असं पाझरतं. पण जेव्हा ते मारतातना तेव्हा त्या काठीचा आवाज येत नाही पण जीवन उद्ध्वस्त होतं. हजारो लोकांनी हे पाहिलेलं आहे, असंही यावेळी नामदेवशास्त्री यांंनी म्हटलं आहे.

बापरे पुणेकरांसाठी ही चिंतेची बाब! तापमानानं विदर्भाला टाकलं मागं! लोहगाव परिसर सर्वोच्च तापमानाची नोंद

0

पुणे शहर आणि जिल्ह्यात यंदा उन्हाच्या तीव्र झळा सध्या जाणवत आहेत. आजच्या तापमानाच्या नोंदींनी तर पुणेकरांची नक्कीच झोप उडणार आहे. कारण पुण्यातील तापमानानं चक्क सर्वाधिक तापमान असलेल्या विदर्भालाही मागं टाकलं आहे. पुण्यातील लोहगावात सर्वाधीक तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात उन्हामुळं लाही लाही होत आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान विदर्भातील अकोला जिल्ह्यात नोंदवण्यात आलं आहे. यामध्ये अकोल्यात ४३.७ अंश तापमानाची नोंद झाली. तर ब्रह्मपुरी, चंद्रपूरमध्ये ४२.४, यवतमाळमध्ये ४२.२, वाशिममध्ये ४१ अंश तर नागपूरमध्ये ४० अंश तापमानाची नोंद झाली आहे.

तसंच मराठवाड्यात सर्वाधिक तापमानाची नोंद बीडमध्ये झाली आहे. त्यानुसार, बीडमध्ये ४२.४ अंश डिग्री सेल्सिअस तापमान आहे. तर परभणीत ४१.५, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४१.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव तसंच पश्मिच महाराष्ट्रातील सांगली, सातारा इथं पारा ४० अंशाच्यावर पोहोचला आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्राचा विचार करता पुण्यातील लोहगावमध्ये ४३ अंश तापमानाची नोंद झाली आहे. हे पुणे जिल्ह्यताली आत्तापर्यंतच सर्वाधिक तापमान आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पुण्यातील या तापमानाच्या नोंदीनं मागे टाकलं आहे. त्यामुळं पुणेकरांसाठी ही नक्कीच चिंतेची बाब आहे.

तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : ससूनची दीनानाथ रुग्णालयासह डॉ. घैसास यांना ‘क्लीन चिट’

0

ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने दिलेल्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांच्यावर कोणताही ठपका ठेवलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात रुग्णालयाला तात्पुरता दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. ६ पानांचा हा अहवाल पुणेपोलिसांना सादर करण्यात आला आहे.

अधिकच्या माहितीनुसार, या अहवालात दीनानाथ रुग्णालयातील उपचार प्रक्रियेबाबत समितीकडून स्पष्ट भूमिका घेतली गेली असून, कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय दुर्लक्ष झाले नसल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी या अहवालातील चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर ससून रुग्णालयाकडून पुन्हा अभिप्राय मागवला आहे.

तत्पूर्वी, या प्रकरणात सुरुवातीपासूनच तनिषा भिसे यांचे कुटुंबीय रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत होते. विशेषतः तनिषाच्या नणंदेने प्रसारमाध्यमांसमोर उपचारप्रक्रियेतील त्रुटी व संपूर्ण घटनाक्रम मांडला होता. पोलिस प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली होती.

तर या घटनेनंतर भिसे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. भविष्यात अशी दुर्लक्षाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. “आमचा रोष केवळ एका व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण ढिसाळ व्यवस्थेवर आहे,” असे स्पष्ट मत कुटुंबीयांनी मांडले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास व निर्णय ससून रुग्णालयाच्या अंतिम अभिप्रायानंतर घेतला जाणार आहे.

ब्लुमबर्गचे पहिले भारतीय सल्लागार ठरले सुरेश प्रभू

0

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी सल्लागार मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. ब्लुमबर्गच्या सल्लागार मंडळावर नियुक्ती होणारे ते पहिले व एकमेव भारतीय ठरले आहेत. या मंडळावर इंडोनेशियाचे माजी राष्ट्रपती जोको विदोदो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ आणि अनेक उद्योग नेत्यांचा समावेश आहे.

सुरेश प्रभू हे सहा वेळा खासदार आहेत. त्यांनी वाजपेयी सरकार आणि पंतप्रधान मोदींच्या पहिल्या दोन कार्यकाळात कॅबिनेट मंत्री म्हणून अनेक खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे. प्रभूंनी उद्योग, वीज, पर्यावरण आणि वन, रेल्वे, नागरी विमान वाहतूक, वाणिज्य आणि उद्योग आणि खते आणि रसायने अशी अनेक कॅबिनेट विभागांची जबाबदारी सांभाळली आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी जी-७ आणि जी-२० या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये प्रधानमंत्र्यांचे शेर्पा प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. जी-७ आणि जी-२० शिखर परिषदेसाठी भारत सरकारच्या अधिकृत अजेंडाला आकार देण्यात प्रभूंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
श्री. प्रभू हे एक नामांकित चार्टर्ड अकाउंटंट आहेत, आणि सध्या हरियाणातील सोनीपत येथील ऋषिहूड विद्यापीठाचे कुलपती आहेत. ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अभ्यागत प्राध्यापक देखील आहेत.

ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी हे जागतिक अर्थव्यवस्थेच्या भवितव्याबद्दल संवाद आणि वादविवादाचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. अमेरिकेच्या माजी वाणिज्य सचिव जीना रायमोंडो आणि इटलीच्या पंतप्रधान आणि युरोपियन सेंट्रल बँकेचे अध्यक्ष असलेल्या मारियो द्राघी यांनी काल एका नवीन सल्लागार मंडळाची घोषणा केली.
“ब्लूमबर्गच्या बोर्डाचे नेतृत्व करणे हा सन्मान आहे. जागतिक नेत्यांमध्ये परस्पर संवाद वाढविण्याच्या माइक ब्लूमबर्ग यांच्या मिशनमध्ये योगदान देण्याची संधी मला या नियुक्तीने मिळाली आहे.जग भू-राजकीय अनिश्चितता, तंत्रज्ञानातील गतिमान बदल आणि वाढत्या हवामान संकटाच्या या काळातून जात असताना, जागतिक समृद्धीसाठी समान आधार शोधणे आणि उभारणी करणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे,” असे अमेरिकेच्या माजी वाणिज्य सचिव जीना रायमोंडो म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, “जागतिक वाणिज्यातील लवचिकता कशी मजबूत करता येईल आणि या आव्हानांवर दीर्घकालीन उपायांवर सहकार्य कसे करता येईल यावर चर्चा करण्यासाठी मी माझ्या सहकारी बोर्ड सदस्यांना बोलावण्यास उत्सुक आहे.”

ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमीची स्थापना २०१८ मध्ये झाली असून, ही बहुराष्ट्रीय सीईओ, सार्वजनिक अधिकारी, नवोन्मेषक (इनोव्हेटर) आणि वित्तपुरवठादारांची एक जागतिक संस्था आहे. सिंगापूर, बीजिंग, पनामा सिटी, डब्लिन, माराकेश आणि साओ पाउलो येथे मेळावे आयोजित केले जातात.

बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, औद्योगिक विकासालाही चालना मिळण्यास मदत; पालकमंत्री अजित पवारांचा तरुणांसाठी मोठा निर्णय

0

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा हा विविध कारणांमुळे चर्चेत आहे. बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. बीडमध्ये हत्या, खून, अत्याचार, आत्महत्या अशा अनेक घटना वारंवार घडताना दिसत आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील जनतेला एक आनंदाची बातमी दिली आहे. बीडमध्ये लवकरच तरुणांना रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

अजित पवार यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी..! असे म्हटले आहे. बीडमध्ये लवकरच तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यासाठी टाटा टेक्नॉलॉजी कंपनी जिल्ह्यात तब्बल १९१ कोटी रुपये खर्चून एक नवीन प्रशिक्षण केंद्र (सीआयआयआयटी) उभारण्यात येणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले?

बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनवण्यासह रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनींग’ अर्थात (सीआयआयआयटी) स्थापनेच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं जात आहे. बीडचा पालकमंत्री या नात्यानं मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीनं जिल्ह्यासाठी १९१ कोटी रुपये खर्चून नवीन सीआयआयआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन सेंटरमधून दरवर्षी ७ हजार युवकांना जागतिक दर्जाचं औद्योगिक, तांत्रिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यातून बीड जिल्ह्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, ही अत्यंत समाधानाची बाब आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.

दरम्यान बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिक चिंतेत होते. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तरुणांना नवी उमेद देणारी बातमी दिली आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे जिल्ह्यातील हजारो तरुणांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळेल. त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. टाटा टेक्नॉलॉजीसारख्या प्रतिष्ठित कंपनीने बीडमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासालाही चालना मिळण्यास मदत होणार आहे.

वक्फ सुधारणा कायद्या या तरतुदींना ‘स्थगिती’चा सर्वाेच्च विचार; ७२ याचिकांवर सुनावणी गुरुवारीही पुन्हा सुनावणी होणार

0

वक्फ सुधारणा कायद्यातील काही वादग्रस्त आणि महत्त्वाच्या तरतुदींना स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार आहे. न्यायालयांनी वक्फ म्हणून घोषित केलेल्या मालमत्तांचा तो दर्जा काढून घेण्याचा अधिकार, केंद्रीय वक्फ परिषद व राज्य वक्फ मंडळांमध्ये बिगर मुस्लीम सदस्यांचा समावेश अशा वादग्रस्त तरतुदींबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, त्यासंदर्भात कोणताही अंतरिम आदेश देण्यापूर्वी त्याबाबत सविस्तर सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला बुधवारी केली.

सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजयकुमार आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर एकूण ७२ याचिकांवर सुनावणी झाली. गुरुवारीही या याचिकांवर सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, मुस्लीम संघटना, काही याचिकादारांतर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, राजीव धवन, अभिषेक सिंघवी आणि सी. यू. सिंह यांनी बाजू मांडली. त्यानंतर या कायद्यातील काही तरतुदींबाबत अंतरिम आदेश देण्याचा विचार असल्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी सांगितले.

सरन्यायाधीश खन्ना म्हणाले की, न्यायालयांनी वक्फ म्हणून मान्य केलेल्या मालमत्तांचा दर्जा काढून घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कायद्यासंदर्भातील सुनावणी सुरू असताना तो दर्जा रद्द करता येणार नाही. वक्फ मालमत्ता वादग्रस्त किंवा शासकीय मालकीची असल्याचे आढळल्यास जिल्हाधिकारी ती वक्फ मालमत्ता नाही असे जाहीर करू शकतात.

हस्तक्षेप करण्याचे संकेत

सरन्यायाधीश खन्ना यांनी सांगितले की, संसद, विधिमंडळांनी कायदा मंजूर केल्यानंतरच्या पहिल्या टप्प्यावर न्यायालये त्या गोष्टींत सहसा हस्तक्षेप करत नाहीत. मात्र वक्फ सुधारणा कायदा हा अपवाद ठरू शकतो.

ते’ योग्य ठरेल का?’

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, अनेकदा लोकांकडे मालमत्तेविषयी कागदपत्रे नसतात. पण ती वर्षानुवर्षे विशिष्ट धर्माच्या गोष्टींसाठी वापरली जाते. अशांमध्ये वक्फ मालमत्ताही आहेत व त्यांची रितसर नोंदणी झाली आहे. त्यामुळे त्यांचा दर्जा काढून घेणे योग्य ठरेल का?

...तर तुम्हाला ते चालेल का?

वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालय व सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यामध्ये असा संवाद झाला.

सर्वोच्च न्यायालय : वक्फ बोर्डामध्ये मुस्लिमेतर सदस्य चालणार असतील, तर मग हिंदू धार्मिक ट्रस्टमध्ये मुस्लिम सदस्य घेतलेले तुम्हाला चालतील का? याबद्दल मोकळेपणाने आम्हाला सांगा.सॉलिसिटर जनरल तुषार मेहता : केंद्रीय वक्फ परिषदेवर पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्त जास्तीत जास्त २ मुस्लिमेतर सदस्य असतील.

न्यायालय : वक्फ सुधारणा कायद्यानुसार, २२ सदस्यांपैकी फक्त ८ मुस्लिम असतील. उर्वरित बहुसंख्य बिगरमुस्लिम सदस्य असणार आहेत. त्यामुळे साहजिकच मुस्लिमांची तिथे अल्पसंख्य राहणार आहे. मग ते वक्फ बोर्डाच्या धार्मिक स्वरूपाशी कसे सुसंगत ठरेल?

कोथरूड 17 एप्रिलची एकच चाहूल; नातं रक्ताचं अविरत मैत्रीचं अनोख पाऊल! ३२व्या ‘रक्तदान यागा’चं उद्घाटकही मैत्रीचंच; राम बोरकरांचा गौरवास्पद उपक्रम 

0

कोथरूड विधानसभा मतदारसंघ 17 एप्रिल म्हटलं की म्हणजेच हिंदुत्वनिष्ठ स्व.शिरिष तुपे स्मृती दिन..!  एकच चाहूल लागते ती म्हणजे नातं रक्ताचं अविरत मैत्रीचं हे ब्रीद वाक्य मनाशी कायम ठेवत राम बोरकर यांनी सलग बारा वर्ष सुरू ठेवलेलं रक्तदानाचं अनोख पाऊल! यंदा ३२व्या ‘रक्तदान यागा’चं उद्घाटकही मैत्रीच असून कोणताही मान्यवर उद्घाटक न बोलवता कोथरूड विधानसभा मतदारसंघातील सर्व मान्यवर मित्रपरिवार यांच्याच हस्ते उद्घाटन ठेवून राम बोरकर नवा अनोखा गौरवास्पद पायंडा सुरू केला आहे. सामाजिक कार्याचे संस्थापक स्वर्गीय शिरीष तुपे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सलग ३२ व्या वर्षी संपन्न होणाऱ्या, या भव्य रक्तदान यागाचे औपचारीक उदघाटन. नातं मैत्रीचं किती नितळ आणि निस्वार्थ याची जाणीव 3 दशक एरंडवणा भागातील नागरिकांना यात आहेच कारण या भागात स्वा.वीर सावरकर मित्र मंडळ (ट्रस्ट) एरंडवणे व राम बोरकर मित्र परिवाराच्या वतीने “मैत्री” रक्ताची जपुया ! चला “ रक्तदान ” करूया ! या संकल्पाने …मैत्रीचं ….रक्ताचं जपत अविरत कै. शिरिष तुपे यांच्या स्मरणार्थ सलग ३२व्या वर्षी भव्य रक्तदान यागाचे (शिबिराचे) आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहरातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक आणि सांकृतिक क्षेत्रात भरीव योगदान असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थीत दि. १७ एप्रिल रोजी शिबिराचे उद्घाटनही मित्र परिवाराच्या साक्षीनेच सकाळी ११.३० वाजता स्वा.वीर सावरकर मित्र मंडळ (ट्रस्ट) एरंडवणे येथे केले जाणार आहे.

रक्तदानाचे काम गेली 32 वर्ष अविरतपणे करताना असंख्य मित्र जुळत ‘सक्रिय’ सहभागी होत गेल्यामुळेच आज प्रत्येक रक्तदान शिबिराचे आयोजन करताना नवीन मित्र जुळत जातात ही खरे तर कै. शिरीष तुपे यांची पुण्याई आणि मैत्रीच्या नात्याला अनन्य साधारण महत्व आहे याची जाणीव करून देणारी घटना. हीच हिंदुत्वनिष्ठ स्व.शिरिष तुपे स्मृती दिन..! निमित्त ‘रक्तदान यागा’चं संयोजनास कायम नवचैतन्य आणि उर्मी हे या रक्तदान शिबिराचे वैशिष्ठ असल्याचे संयोजक राम बोरकर यांनी सांगितले. या वेळी हा कार्यक्रम सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत होणार आहे.

१७ एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालय निसर्ग हॉटेल जवळ एरंडवणा गावठाण पुणे ४ . सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून वाढत्या तापमानाचा विचार करून रक्तदान याग आयोजन समितीने शिबिरामध्ये विशेष खबरदारी घेत स्प्रिंगलर आणि कुलर याचीही व्यवस्था केली आहे. दरवर्षीप्रमाणे या वेळेस ही आपण या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे. वेळे अभावी प्रत्यक्ष भेट शक्य झाली नाही म्हणून हेच आग्रहाचे निमंत्रण समजून या कार्यक्रमास आपली उपस्थिती नोंदवावी हि नम्र अशी विनंती राम बोरकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.

पडळकरांचा सुपडासाफ करण्यास अजितदादांचा अत्यंत शांत डावपेच; मोहराही सापडला ‘मायक्रो’ प्लॅनिंग सुरू फिल्डिंग लावायला सुरुवात

0

जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राज्याच्या राजकारणात चर्चेत आले तेच मुळात पवार कुटुंबियांवर टीका करून. मागच्या सहा ते सात वर्षांपासून संधी मिळेल तिथे ते ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करायचे.

कधी कधी तर ही भाषा अत्यंत खालच्या स्तरावरची असायची.

आजही पडळकर यांचा टीकेचा सूर नरमला असला तरी टीकेच्या केंद्रस्थानी शरद पवार किंवा अजित पवार हमखास असतातच. 2019 मध्ये त्यांनी भाजपकडून बारामती विधानसभेची निवडणूक देखील लढली होती. या सगळ्या टीकांवर, “त्याचं डिपाझिट जप्त झालं आहे. त्याला का मोठं करता”, असं म्हणत अजित पवार मात्र फारसे कधी उत्तर द्यायचे नाही.

पण आता अजित पवार यांनी अत्यंत शांतपणे पडळकर यांच्याविरोधात फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने जतचे माजी आमदार विलास जगताप आणि तमनगौडा रवी पाटील या दोघांचीही भाजपमधून हकालपट्टी झाली होती. पडळकर यांच्या याच कट्टर विरोधकांना अजित पवार ताकद देणार आहेत.

विलास जगताप यांच्यासह तमनगौडा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या दोघांच्याही पक्षप्रवेशामुळे जत तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार आहेत. पडळकर यांचे उपद्रव मूल्य बघता मुख्यमंत्री फडणवीस त्यांना बाजूला करतील ही शक्यता कमी आहे. पण अजित पवार यांनाही पडळकर यांच्याबद्दल निश्चित राग आहे. त्यातूनच ते पडळकर विरोधी गटाला मजबूत करत आहेत.

विलास जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद काय आहे?

जतमधील लक्षणीय धनगर समाजामुळे गोपीचंद पडळकर यांना इथे जनाधार मिळाला. राष्ट्रीय समाज पक्ष, भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि भाजप अशा विविध पक्षांच्या माध्यमातून राजकारण करत ते जतमध्ये स्थिरावले. 2019 मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून सांगली मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली.

पडखळकरांच्या उमेदवारीची भाजपच्या संजयकाका पाटील यांना उघड मदत झाली होती. त्यामुळे संजयकाका पाटील यांनीही पडळकर यांना पुरक भूमिका घेण्यास सुरूवात केली. इथेच विलास जगताप अस्वस्थ व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी पडळकर यांनी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण त्यांचे लक्ष जत मतदारसंघात लागले होते.

पडद्यामागे घडामोडी घडल्या आणि 2019 मध्ये विलास जगताप यांचा पराभव झाला. काँग्रेसचे विक्रम सावंत आमदार झाले. जगताप यांच्या ताकदीला खो बसला. हाच संघर्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बघायला मिळाला. जगताप यांनी संजयकाका विरोधी भूमिका घेतली. त्यांनी थेट अपक्ष विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.

त्यावेळी पडळकर विधान परिषदेवर आमदार होते. सोबतच संजय काका पाटील पराभूत झाले तर आपल्याला विधानसभेची निवडणूक सोपी जाईल, असा जगताप यांचा होरा होता. संजयकाका पराभूत झाले, पण गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेची निवडणूक लढवायची म्हणून शड्डू ठोकला. त्यामुळे जगताप यांची अडचण झाली.

अशात लोकसभेला घेतलेल्या भूमिकेमुळे उमेदवारी कापली जाऊ शकते हे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी तमनगौडा रवी पाटील यांना घोड्यावर बसवले. त्यांनी भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे असे म्हणत पडळकरांविरोधात मोहीमच सुरू केली. पडळकर हे भुमिपूत्र नाहीत त्यामुळे त्यांना उमेदवारी नको असे त्यांचे म्हणणे होते.

पाटील आणि जगताप यांनी मुंबईत धडक देत पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. पण पक्षाने पडळकर यांन तिकीट जाहीर केले. त्यामुळे चिडून पाटील यांनी बंडखोरी केलीच. त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील जतमध्ये गेले. पण बंडखोरी थांबली नाही. त्यांच्या उमेदवारीला विलास जगताप यांचेही पाठबळ मिळाले.

यानंतर देखील पडळकर जवळपास 38 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. निवडणूक संपताच विलास जगताप आणि तमनगौडा पाटील यांच्यावर कारवाई झाली. आता याच दोघांना अजित पवार राष्ट्रवादीत घेणार आहेत. पडळकर विरोधी गटाला ताकद देण्याची अजित पवार यांनी खेळी खेळलेली दिसून येते.

अजित पवार यांनी अत्यंत शांततेत खेळलेल्या या डावपेचाला आता पडळकर कसे उत्तर देतात, आगामी निवडणुकीत पडळकर विरुद्ध जगताप या वातावरणात कोण बाजी मारणार? अशा गोष्टी बघणे महत्वाचे ठरणार आहे.

पुणे पोलिसांना डॉ. घैसास पळून जाईल याची भीती घेतला ‘हा’ मोठा निर्णय?; रोज येथे हजेरी लावण्याचा सूचना

0

पुण्यातील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा देखील दिला आहे. मात्र, आता पुणे पोलिसांनी या डॉक्टरला पोलीस प्रोटेक्शन दिले असल्याचे समोर आले आहे.

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप करण्यात आले आहेत, याप्रकरणी वेगवेगळ्या स्तरावर चार चौकशी समिती नेमल्या गेल्या. तीन समितांनी आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला असून बुधवारी येणाऱ्या ससून रुग्णालयाच्या समितीच्या अहवालानंतर आता या प्रकरणाच्या कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे.

पुण्यात तनिषा भिसे या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला, भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या त्या पत्नी होत्या. त्यामुळे या घटनेमुळे राज्यातील वातावरण तापले होते, आत्तापर्यंत या प्रकरणात वेगवेगळ्या स्तरावर चार समित्यांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत. या समित्यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून रुग्णालय प्रशासनालाही जबाबदार धरले गेल्याचे सांगण्यात येत आहे.

तनिषा भिसे यांच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज असताना 10 लाख रुपयांची मागणी डॉ. सुश्रुत घैसास यांनी केल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी केला आहे. त्यासोबतच 10 लाखांची पूर्तता न केल्यानेच डॉ. घैसास यांनी उपचार केले नाही, असे भिसे कुटुंबाचे म्हणणे आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी  डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन दिला असल्याचे समोर आले आहे. यापुढे डॉ. घैसास यांच्या सोबत सातत्याने पुणे पोलिसांचा एक कर्मचारी असणार आहे. त्यासोबतच घैसास यांना रोज पुण्यातील अलंकार पोलीस चौकी येथे हजेरी लावण्याचा सूचना देखील पोलिसांकडून देण्यात आल्याचे समोर आले आहे. घैसास हे कुठेही पळून जाऊ नये या दृष्टिकोनातून ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत डॉ. घैसास यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलीस प्रोटेक्शनची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कुणाल कामराला मोठा दिलासा; बजावलेल्या नोटीसीतील मोठी चूक पथ्यावर शिंदे प्रकरणी अटकेपासून संरक्षण हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

0

शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंनात्मक गाण्यातून टीक केल्यानंतर शिवसैनिक स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर चांगलेच संतापले होते. यावेळी, कुणाल कामराला दिसेल तिथं ठोकणार, मारहाण करणार अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली होती. त्याच अनुंषगाने त्याला फोनही केला. मात्र, तो चेन्नईत होता. त्यामुळे, येथील खार पोलीस ठाण्यात कुणाल कामराविरुद्ध शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा नोंद केला आहे. त्यावरुन, जबाब नोंदविण्यासाठी कुणाल कामराच्या अटकेची मागणी होत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने कुणाल कामराला मोठा दिलासा दिला आहे. पोलिसानी बजावलेल्या नोटीसचा संदर्भात 35(3) अंतर्गत कुणाल कामराला पहिली नोटीस पाठवण्यात आली होती. ज्याचा अर्थ होतो की, त्याच्या अटकेची गरज नाही, असे मुंबई उच्च न्यायलायाने म्हटले आहे. त्यामुळे, कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण मिळालं असून आता तो जिथं आहे, तेथील पोलीस स्टेशनमध्ये आपला जबाब नोंदवू शकणार आहे.

कुणाला कामरा यांना शिवसेना कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. तसेच, मुंबईत आल्यास त्यांच्या जीवाला धोका असल्याचंही कामरा यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे, जर कुणाल कामरा मुंबईत आले तर त्यांच्या सुरक्षेची हमी, मुंबई पोलिसांनी घ्यावी. कामराच्या जीविताला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये याकरिता, योग्य काळजी घेणार का? असा सवाल न्यायालयाने सरकारी वकिलाना विचारला. त्यावर, प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे, असे सरकारी वकिलांनी म्हटले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांच्या द्विसदस्य खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

उच्च न्यायालयात आणि कुणाल कामराच्या प्रकरणात सुनावणी पार पडली. त्यावेळी, न्यायालयाने कामराच्या वकिलांना उद्देशून काही सूचना केल्या आहेत. आम्ही जर तुम्हाला तिथे जाऊन जबाब नोंदवण्याची परवागी देत आहोत मग काय हरकत आहे? असे न्यायालयाने म्हटले. तर, कुणाल कामरा मुंबईत कधी येतात असा सवालही उच्च न्यायालयाने विचारला. तसेच, आम्ही तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने जबाब नोंदवण्यासाठी सहकार्य करण्याबाबत सूचना करू शकतो. आपण जबाब नोंदवा, पण अटक करण्याची गरज नाही, हे तर पोलिसांनीही आपल्या समन्समध्ये म्हटलं आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यालयाने आज झालेल्या सुनावणी नोंदवले. त्यामुळे, कुणाला कामराला अटकेपासून संरक्षण मिळालं आहे.

जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नाही

दरम्यान, कुणाल कामराचा जबाब नोंदवण्याच्या मागणीवर मुंबई उच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. मात्र, त्यासाठी कामराच्या अटकेची गरज नसल्याचे स्पष्ट केलं. तसेच, दाखल गुन्ह्यासंदर्भात जबाब नोंदवण्यासाठी खार पोलिसांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. तुम्ही व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे जबाब घ्या किंवा चेन्नईला जाऊन जबाब नोंदवा. तेथील स्थानिक पोलिसांना आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यास सांगतो, असे न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.