Home Blog Page 97

कर्वेनगर मानवी साखळीचे @90पूर्ण; प्रशासकीय असहकारापुढे लोकप्रतिनिधी हतबल? परिस्थितीही ‘जैसे थे’च!

0

कर्वेनगर विकास आराखडा एक फसलेला प्रयोग अशी विनोदाने घेतली जाणारी उक्ती! खरोखरच सत्यात उतरते की काय अशी शंका निर्माण होऊ लागले आहे. कारणही तसेच आहे पुणे शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी महत्त्वाचा समजलेला शिवणे खराडी रस्ता पुणे महापालिका प्रशासनाने गुंडाळला पण याच विकास आराखड्यातील रस्त्यावरती विकसित झालेल्या कर्वेनगरमध्ये मात्र रखडलेल्या रस्त्याचा नागरिकांना त्रास होत असून दिवसेंदिवस ही मोठी गंभीर समस्या बनत चालली आहे. मुळात नित्याच्या वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या कर्वेनगरवासियांच्या नशिबी कर्वेनगर आणि सनसिटी सिंहगड रोड यांना जोडणारा उड्डाणपूल आल्यामुळे तब्बल ४० सोसायटींकडून एकत्र येत प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या कर्वेनगरमधील मानवी साखळीला @90पूर्ण झाले असले तरीसुद्धा प्रशासकीय असहकारापुढे चारही लोकप्रतिनिधी हतबल झाले असून आजही राजाराम पुल ते वारजे माळवाडी या रस्ते १०० फुटी डीपी रस्त्याची परिस्थिती मात्र परिस्थितीही ‘जैसे थे’च! आहे.

शिवणे ते खराडी या महत्वकांक्षी प्रकल्पातील राजाराम पुल ते वारजे माळवाडी या रस्ते १०० फुटी डीपी रस्त्याच्या कामाचा वेळोवेळी पाठपुरावा केल्याने सत्यात उतरत असला तरी परंतु भविष्यातील वाहतूक समस्या टाळण्यासाठी हा उड्डाणपूल पूर्ण होण्यापूर्वी कर्वेनगर हद्दीमधिल शिवणे ते खराडी या रस्त्याचे काम पूर्णत्वास जाणे, काळाची गरज बनले आहे. या अनुषंगाने आपल्या कर्वेनगर प्रभागातील 2 फेब्रुवारी दरम्यान जन आक्रोशाची चाहूल देत मानवी साखळीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या मानवी साखळीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, जागरूक नागरिक आणि स्वयंसेवक न्याय्य मागणी करण्यात आली परंतु या सर्व गोष्टीला पुणे महापालिका प्रशासकीय विभागाच्या वतीने वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आले असून आज या घटनेला 90 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला तरी एक स्क्वेअर फुटही जागा या रस्त्यासाठी अधिकारी करण्यात आलेली नाही. 

90 दिवसांपूर्वी  तब्बल 2 किमी लांब मानवी साखळीमध्ये महिला वर्ग तसेच प्रत्येक सदनिकेतील नागरिकांनी उपस्थिती दर्शवत या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले त्यावेळी पथ विभागाचे प्रमुख यांनी जनसमुदायाला अस्वस्थ केले असले तरी पुणे महापालिकेच्या सुस्त प्रशासनाच्या समोर हतबल अन् निराश होण्याशिवाय सध्या कोणताही पर्याय राहिला नाही की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. कर्वेनगर भागात कायमच घराणेशाहीच्या पाठिंब्यावर या भागातील लोकप्रतिनिधित्व पाहण्यास मिळालेल आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर सुरू झालेली ही घराणेशाहीची परंपरा आजतागायत पाहण्यास मिळत असली तरी सुद्धा या कर्वेनगरवाशियांच्या नशिबी यातून काही लाभदायक प्रकल्प मिळालेत असे कुठेही पाहण्यास मिळत नाही. माजी कृषिमंत्री शशिकांतभाऊ सुतार, कै.नानासाहेब बराटे यांच्यासह आजही याच घराणेशाहीतून दोनदा तीनदा नगरसेवक पद आपल्याकडेच राखण्यात यशस्वी झालेल्या ‘दबंग’ नगरसेवकांनाही या भागातील प्राथमिक समस्या सोडवण्यात यश आले नाही.

अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या कोथरूड परिसराचा उशिराने पुणे महापालिकेत समावेश झाल्यानंतर सुद्धा विकास होत असताना केवळ ‘निष्क्रिय’ निवडीमुळे पदरी निराशा आली आहे का? लोकप्रतिनिधी आणि गावकरी यांच्यामध्ये ‘तडजोडी’चे तंत्र सुरू आहे का? अशी चर्चा स्थानिक नागरिकांनी सुरू केली आहे. पुणे महापालिकेमध्ये एरंडवणासह कर्वेनगर चा पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश झाला असला तरी विकासाच्या बाबतीत अत्यंत मागास असलेला हा भाग फक्त गावकऱ्यांची सोय असा बनत चालला असून विकास आराखड्यातील आरक्षणे आजही फक्तं कागदावरच जिवंत आहेत. प्रत्येक आरक्षणामध्ये वेळोवेळी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी मूळ जागा मालकांसाठी सौम्य भूमिका घेतल्यामुळे कर्वेनगर हे पुणे महापालिकेत समाविष्ट असले तरी फक्त आणि फक्त रहिवास लोक वस्ती म्हणूनच याचा उल्लेख केला जात आहे.

अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेच्या मार्गे दुधाने लॉन्स येथील श्री विठ्ठेश्वर देवस्थान ते वेदांतनगरी पर्यंत ही मानवी साखळी नागरिकांनी आपली भूमिका मांडली. याप्रसंगी पुणे मनपाचे पथ विभागाचे मुख्य श्री. अनिरुद्ध पावसकर यांनी उपस्थित राहून निवेदनाचा स्वीकारही केला आणि दालनात दोन-तीन बैठकाही पार पडल्या परंतु नागरिकांना मात्र यातून काहीही मिळाले नाही आणि आज तगायत ९० दिवसानंतर एकाही जागेचा ताबा मिळाला नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा बनून आपण सक्रिय असल्याचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सहभागी दाखवलं परंतु आजही कोणतीही प्रगती न झाल्याने मानवी साखळीमध्ये साध्य काय झालं हा प्रश्न कायम आहे.

१२ वी च्या विद्यार्थ्यांना आज ‘या’ ९ वेबसाईट्सवर निकाल सर्वांत जलद पाहणे शक्य; Digital गुणपत्रिका संग्रह शक्य

0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दि. ५ मे, २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. या संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

१) https://results.digilocker.gov.in

२) https://mahahsscboard.in

३) http://hscresult.mkcl.org

४) https://results.targetpublications.org

५) https://results.navneet.com

६) https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

७) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hse-12-results

८) https://www.indiatoday.in/education-today/results

९) https://www.aajtak.in/education/board-exam-results

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाच्या प्रकटनामध्ये देण्यात आली आहे.

काही महिन्यांतच ‘स्थानिक’च्या निवडणुका; 10 मे रोजी ही मोठी यादी जाहीर? निवडणुकीआधी भाजपचा मोठा निर्णय 

0

आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनेच्या पुनर्रचनेला गती दिली आहे. त्याअंतर्गत राज्यभरातील भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांची यादी येत्या 10 मे रोजी जाहीर केली जाणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. पुण्यात नुकतीच पार पडलेली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली. या बैठकीत संघटनेच्या पुढील दिशा आणि कार्यपद्धतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यभरातील जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या निवडीसंदर्भात अंतिम निर्णय भाजपच्या कोअर कमिटीच्या दोन दिवसात होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल.

काही महिन्यांनी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

राज्यात महापालिकांपासून ग्रामपंचायतींपर्यंत विविध स्तरांवर निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेला अधिक बळकट देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व उभे करण्यासाठी भाजपकडून संघटनेत पुनर्रचना केली जात आहे. यादीनंतर स्थानिक पातळीवर पक्ष अधिक सक्रिय आणि संघटित स्वरूपात काम करेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप संघटनेवर अधिक काम करणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिले.

काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आपला पक्ष वाढवा, चंद्रशेखर बावनकुळे यांचा अजब सल्ला

काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आपला पक्ष वाढवा, असा अजब सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. आपला पक्ष संघटना वाढविण्यासाठी सर्वच पक्ष पक्षप्रवेश करून घेत असतात. विरोधकांमध्ये स्वतःचा पक्ष वाढविण्याची क्षमता आता राहिली नाही, काँग्रेसमध्ये काही शिल्लक राहिले नाही. शरद पवार साहेबांकडे कोणी जायला तयार नाही, उद्धव ठाकरेंचे शिवबंधन तर सगळे विसरून गेले आहेत. त्यांना त्यांचा पक्ष संभाळता येत नाही. आपल्या पक्षात पक्ष प्रवेशाच्या रांगा लावा, असे बावनकुळे म्हणाले.

राज्यात सत्तापक्षांचे ‘प्रॉक्सी वॉर’ बहुमत आहे पण सरकार स्थिर आहे? कोण कोणाला गिळणार…, ठाकरेसेनेचं सूचक विधान

0

“महाराष्ट्र सरकारकडे बहुमताचा आकडा आहे, पण सरकार स्थिर आहे काय? याबाबत शंका आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. “सरकार स्थिर नाही आणि सरकारचे मानसिक स्वास्थ्यही बरे नाही असे एकंदरीत रोजच्या घडामोडींवरून दिसते,” असा टोला ‘सामना’च्या ‘कोण कोणाला गिळणार?’ या मथळ्याखालील अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. “देवेंद्र फडणवीस हे सध्या मुख्यमंत्री आहेत. त्याच वेळी अजित पवार यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे व तसे त्यांनी उघडपणे बोलून दाखवले. अजित पवार सहावेळा उपमुख्यमंत्री झाले हा विक्रम आहे, पण इतका तगडा गडी अद्याप मुख्यमंत्री झालेला नाही व भाजपसोबत राहिले तर त्यांच्या मनातली मुख्यमंत्रीपदाची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. अमित शहा सवतीच्या पुतण्याला मुख्यमंत्री का करतील? हा साधा प्रश्न आहे” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘आपण आता मुख्यमंत्री नाही’ हे स्वीकारायला शिंदेंचं मन…

“‘कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावे असे वाटते आहे, पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही,’ अशी कबुली अजित पवार यांनी शनिवारी पुन्हा दिली. अजित पवार हे असे बोलले तरी फडणवीस यांना त्यांच्यापासून धोका नाही. अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव सोहळा आयोजित केला होता. महाराष्ट्रात या पक्षाचे काम अजित पवार बघतात. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराची टूम त्यांनी काढली. मात्र वरळीच्या जांबोरी मैदानात झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यात तसे कोणी फिरकलेच नाहीत. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री या ‘गौरव सोहळ्या’त फिरकले नाहीत हे समजण्यासारखे आहे, पण जिते-जागते-ताजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गौरव सोहळ्यावर बहिष्कार टाकला व आपला प्रतिनिधी त्या कार्यक्रमास पाठवला. शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री म्हणून सत्कार सोहळ्यास येणे टाळले. कारण ‘आपण आता मुख्यमंत्री नाही’ हे स्वीकारायला त्यांचे मन तयार नाही,” असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

फडणवीस यांचा सत्कार ‘माजी’ की ‘आजी’ म्हणून केला ते…

“विधानसभा निवडणुकीनंतरही आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांना त्यांच्या ‘पक्षप्रमुखां’नी म्हणजे अमित शहांनी सांगितले होते, पण फडणवीस यांनी वाढलेले ताट हिसकावून घेतले. तेव्हापासून हे महाशय दाढीला गाठ बांधून फिरत आहेत. ‘‘पुन्हा मुख्यमंत्री होऊनच दाखवतो,’’ अशाच तोऱ्यात ते फिरत असतात. खरे म्हणजे शिंदे हे स्वतःला ‘माजी’ म्हणवून घ्यायला तयार नसतील तर त्यांनी स्वतःला सदैव ‘भावी मुख्यमंत्री’ असे म्हणवून घ्यायला हरकत नाही. एकंदरीत महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारमध्ये गोंधळ आहे. या गोंधळात महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. अजित पवारांच्या गटाने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यास दोन माजी मुख्यमंत्री हजर राहिले. त्यापैकी एक नारायण राणे हे शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. नंतर त्यांनी बरेच पक्ष बदलले, पण मुख्यमंत्री काही झाले नाहीत. याचा अर्थ शिवसेनाप्रमुखांनी अनेक दगडांना शेंदूर फासला व देव बनवले. ‘‘शिवसेना नसती तर पोलिसांनी आपले एन्काऊंटरच केले असते. शिवसेना होती म्हणून वाचलो’’ अशी कबुलीच राणे यांनी पूर्वी दिली आहे. दुसरे उपस्थित राहिलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपद संरक्षण खात्याच्या आदर्श घोटाळ्यात गेले. आता ते भाजपमध्ये गेले आहेत. अशा मुख्यमंत्र्यांचा (माजी) सत्कार अजित पवार गटाने केला. फडणवीस यांचा सत्कार ‘माजी’ की ‘आजी’ म्हणून केला ते समजले नाही, पण ‘ताजे’ माजी मुख्यमंत्री आले नाहीत व अजित पवार यांचा सोहळा फिका पडला,” असा खोचक टोमणा ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.

ज्यांनी कामाख्यादेवी मंदिरात 56 रेडे कापून बळी दिले ते…

“शरद पवार व अजित पवारांच्या भेटीगाठी वाढल्या असे सांगतात, पण शरद पवार अजित पवारांच्या राजकीय ‘गौरव’ कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत हा एक महत्त्वाचा संदेश महाराष्ट्राला मिळाला आहे. गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाला सर्वच माजी मुख्यमंत्री आले असते तर बरे झाले असते असे फडणवीस म्हणाले. इतर सर्व माजी मुख्यमंत्र्यांचे सोडा, सरकारमधले ताजे ताजे माजी मुख्यमंत्रीही का आले नाहीत ते आधी सांगा. ताज्या माजी मुख्यमंत्र्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचेच आहे व त्यासाठी ते काहीही करतील. प्रकाश आंबेडकरांनी इशारा दिला आहे की, ‘‘शिंदे-पवारांनी सावध रहावे. अजगर कधी गिळेल ते कळणार नाही.’’ आंबेडकरांनी फडणवीस यांना अजगराची उपमा दिली, पण ज्यांनी कामाख्यादेवी मंदिरात 56 रेडे कापून बळी दिले ते अजगराच्या डोक्यावर हल्ला करायला मागेपुढे पाहणार नाहीत,” असं सूचक विधान अग्रलेखात केलं आहे.

कोण कोणाला गिळणार एवढेच

“महाराष्ट्रातील सत्तापक्षांमध्ये एक प्रकारचे ‘प्रॉक्सी वॉर’ चालले आहे. प्रत्येक जण एकमेकाला आजमावीत आहेत. अजित पवार यांनी अर्थखात्यात शिस्तीचा बांबू उगारला आहे, तर मुख्यमंत्र्यांनी ठेकेदाराच्या वर्चस्वाला चाप लावल्याने ताजे माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या लोकांच्या घशाला कोरड पडली. संजय शिरसाट या मंत्र्याने अजित पवारांना ‘शकुनी’ म्हटले. सामाजिक न्याय खात्याचा निधी ‘लाडक्या बहिणीं’साठी वळवला. त्यामुळे सामाजिक न्याय खात्यात फक्त एक मंत्र्याचा बंगला, गाडी व दोन चपराशी उरले. सामाजिक न्याय खाते बंद करण्याची मागणीच संबंधित मंत्र्याने करावी व अजित पवारांना ‘शकुनी’ म्हणावे इथपर्यंत राज्याच्या सरकारमधील युद्ध पोहोचले आहे. आता शकुनीमामाने आयोजित केलेल्या गौरव सोहळ्यास जाण्याचे ताज्या ताज्या माजी मुख्यमंत्र्यांनी टाळले. प्रश्न इतकाच आहे की, अजित पवारांना आज जे ‘शकुनी’ म्हणतात, ते उद्या फडणवीस यांना दुर्योधन म्हणायला मागेपुढे पाहणार नाहीत. आंबेडकर म्हणतात, ‘तो गिळण्या’चा क्षण जवळ येत आहे. कोण कोणाला गिळणार एवढेच पाहायचे,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

पंजाबच्या विजयाने ३ संघांचं प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात, मुंबई-गुजरातही टेन्शनमध्ये; वाचा काय आहे नवं समीकरण?

0

आयपीएल २०२५ आता प्लेऑफच्या दिशेने जात आहे. त्यामुळे प्लेऑफसाठी पात्र ठरण्याकरता सर्वच संघ प्रयत्नशील आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता प्लेऑफ गाठण्यासाठी ८ संघांमध्ये लढत होणार आहे. पंजाबचा संघ लखनौविरूद्ध सामन्यानंतर दुसऱ्या स्थानी पोहोचला. तर केकेआरच्या विजयाचाही लखनौला धक्का बसला आहे.

पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना २३६ धावा करत २३७ धावांचे आव्हान लखनौला दिले. पण लखनौचा संघ २० षटकांत फक्त २०० धावाच करू शकला, यासह पंजाबने ३७ धावांनी दमदार विजय मिळवला. या विजयासह पंजाब संघाने टॉप-४ मध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. ११ सामन्यात १५ गुणांसह पंजाब दुसऱ्या स्थानी आहे. तर लखनौचा संघ १० गुणांसह सातव्या स्थानी आहे. आरसीबीचा संघ १६ गुणांसह पहिल्या स्थानी आहे.

पंजाब किंग्सच्या विजयाने ३ संघाच्या प्लेऑफच्या आशांना बसला धक्का

पंजाब किंग्सच्या विजयामुळे ८ पैकी ३ संघांना पात्र ठरण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघांचा समावेश आहे.

सनरायझर्स हैदराबाद

पंजाब किंग्सचा संघ विजयामुळे १५ गुणांवर पोहोचला आहे. केकेआरविरूद्धचा त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला होता. पण आता पंजाब किंग्सचा संघ १५ गुणांवर पोहोचल्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ सर्व 4 सामने जिंकूनही त्यांच्यापुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे आता हैदराबादच्या प्ले ऑफ च्या आशांना पूर्णविराम लागला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाताला प्लेऑफ गाठण्यासाठी आता सर्व सामने काही करून जिंकावे लागतील. याचबरोबर पंजाबने उर्वरित ३ सामन्यांपैकी एकच सामना जिंकावा अशी प्रार्थना करावी लागेल. याचबरोबर केकेआरला त्यांचा नेट रन रेटही सुधारावा लागणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स

लखनौला प्लेऑफ गाठण्याकरता उर्वरित सर्व सामने जिंकायचे होते. पण पंजाबबरोबरचा सामना त्यांनी मोठ्या फरकाने गमावला आहे. त्यामुळे पंजाब संघ अजून एक सामना जिंकला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.

आरसीबीने उर्वरित ३ सामन्यांपैकी १ सामना जिंकल्यास प्लेऑफसाठी पात्र ठरतील. मुंबई इंडियन्सला प्लेऑफकरता ३ पैकी २ सामने जिंकावे लागतील. तिन्ही सामने जिंकले तर टॉप-२ मध्ये राहता येईल. गुजरातला ४ पैकी २ सामने जिंकावे लागतील. पंजाबला ३ पैकी १ सामना जिंकावा लागेल. दिल्लीला प्लेऑफकरता ४ पैकी ३ सामने जिंकावे लागतील

नवा नियम पुन्हा मोठी अडचण?! आताच मतदार झालात तरी ‘स्थानिक’ च्या निवडणुकीत नसेल मतदानाचा हक्क!

0

विधानसभा निवडणुकांसाठी निश्चित करण्यात आलेली मतदार यादीच आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी वापरली जाण्याची शक्यता असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही अशी सद्य:स्थिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता असून, त्यासाठीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. राज्य आयोग या निवडणुकीसाठी मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (मुख्य निवडणूक अधिकारी) मंत्रालयातील कार्यालयातून घेत असते. त्यानुसार राज्य आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी उपयोगात आणलेली मतदार यादी ही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे पत्राद्वारे मागितली आहे. त्याच यादीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होतील, हे लक्षात घेता विधानसभा निवडणुकीपासून नंतरच्या काळात ज्यांची मतदार म्हणून नोंदणी झालेली असेल त्यांना मतदान करता येणार नाही.

सूत्रांनी सांगितले की, आधीच्या काळातही तसे घडलेले आहे. त्याशिवाय या निवडणुकांसाठी आवश्यक असणाऱ्या ईव्हीएम मशीनची मागणीही राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. राज्य आयोगाला सहकार्य करण्याचीच आमची भूमिका असेल, आम्ही लवकरच विधानसभा निवडणुकीतील मतदारांची यादी त्यांच्याकडे सुपूर्द करू, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले.

विधानसभा निवडणुकीनंतर ७ लाख नवमतदारांची नोंदणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेष रस असलेले राजकीय पक्ष आणि या पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते हे ‘आपल्या’ मतदारांची नोंदणी करवून घेत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास सात लाख नवमतदारांची नोंदणी झाल्याचे समजते. मात्र विधानसभा निवडणुकीत वापरलेल्या मतदार याद्याच याही निवडणुकांत वापरण्यात येतील असा अंतिम निर्णय झाल्यास हे नवमतदार मतदानापासून वंचित राहणार आहेत. तसेच, ‘आपले’ मतदार वाढविण्यासाठी उत्साहात असलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होण्याचीही शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोग विधानसभा मतदार याद्यांनुसारच मतदानावर ठाम राहिले, तर काही राजकीय पक्ष हे नवमतदारांनाही मतदानाचा हक्क द्या यासाठी राज्य आयोगावर दबाव आणण्याची शक्यता आहे.

यादीत राज्य आयोग बदल करू शकत नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर असते. मात्र, मतदार यादीमध्ये मतदार नव्याने जोडण्याचा अधिकार त्यांना नसतो. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आलेल्या यादीमध्ये ते बदल करू शकत नाहीत.

अजितदादांची भाजपच्या ताब्यातील ‘बालेकिल्ला’ परत मिळवण्यास धडपड… पण ग्राऊंडवर आव्हानांचा डोंगर उभा !

0

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेही आम्ही स्वबळावर लढू म्हणत आपला स्वाभिमानाचा बाणा दाखविला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने स्वबळाची भाषा सुरु केली आहे. त्याचीच री ओढत राष्ट्रवादी काँग्रेसनेही आम्ही स्वबळावर लढू म्हणत आपला स्वाभिमानाचा बाणा दाखविला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सद्यस्थिती पाहता संघटना मजबूत करण्याचे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांपुढे आहे.

पिंपरी-चिंचवड शहर म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी अत्यंत भावनिक अन् जिव्हाळ्याचा विषय आहे. अजित पवार हे 1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे गेले. त्यावेळी पिंपरी-चिंचवड शहर हे बारामती मतदारसंघाचा भाग होते. अजित पवार यांनीही त्यानंतर शहरात लक्ष घातले. शहराला राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला बनवले.

2017 पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महापालिकेत स्वबळावर सत्तेत होता. पण 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची घोडदौड 36 नगरसेवकांवर येऊन ठेपली. राष्ट्रवादीची 14 वर्षांची एकहाती सत्ता भाजपने उलथवून टाकली. याचे शल्य अजित पवार यांना आहे. शहरातील आपले वर्चस्व पुन्हा मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजित पवार यांच्यासमोर आव्हानांचा डोंगरही उभा आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शहरातील 2 वगळता इतर सर्वच नगरसेवक अजित पवार यांच्यासोबत राहिले. मात्र, विधानसभा निवडणुकीवेळी भोसरी विधानसभा मतदारसंघातील अस्वस्थ झालेले माजी नगरसेवक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सहभागी झाले. माजी स्थायी समितीचे सदस्य अजित गव्हाणे यांनी पुढाकार घेतला होता.

शहरातील अध्यक्षानेच पक्ष बदलल्याने भोसरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात होता. आता यातील अनेक जण पुन्हा अजित पवार यांच्याकडे जाण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप पक्षाने भूमिका घेतली नाही. याशिवाय आज घडीला शहर पातळीवर नेतृत्व करणारा चेहराही पक्षाकडे नाही. पक्षबांधणी देखील वेगाने होताना दिसत नाही. ही अडचण अजित पवार कसे सोडविणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

याशिवाय सध्या राज्यभर गाजत असलेले वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण हेही पिंपरी-चिंचवडमधीलच आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र हगवणे याचे नाव राष्ट्रवादीशी जोडण्यात आले आहे. अजित पवार यांनी हगवणेची पक्षातून हकालपट्टी करत त्याच्या आणि पक्षाचा काहीही संबंध नाही’, असे वारंवार स्पष्टीकरण द्यावे लागले. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसला ‘डॅमेज इमेज’ रोखता आली नाही. आगामी काळात हे रोखण्यासाठी पक्ष काय पर्याय पुढे आणतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महाराष्ट्राचे दोन सर्वात मोठे पक्ष अखेर एकत्र? डोंबिवलीतून सूर जुळण्याआधी कार्यकर्त्यांचं मनोमिलन युती शुभारंभ?

0

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूच्या युतीची जोरदार चर्चा आहे.. राज ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी साद घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला. तेव्हापासूनच आगामी निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा रंगली. मात्र त्यानंतर युतीबाबत दोन्ही बाजूंनी टोलवाटोलवी सुरु झाली. त्यामुळे ठाकरे बंधूंचं मनोमिलन कधी होणार असा प्रश्न सा-यांनाच पडला. ठाकरे बंधू एकत्र आले नसले तरी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन सर्वात मोठे पक्ष अखेर एकत्र आले आहेत.   शिवसेना आणि मनसे यांची युती झाल्याची चर्चा रंगली आहे. याला कारण ठरले आहे ते डोंबिवलीतील आंदोलन आणि आदित्य ठाकरे यांचे एक विधान.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे मनसेशी युती करण्यासाठी अनुकूल आहेत. महाराष्ट्र हितासाठी कोणी सोबत येत असेल तर स्वागत असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. डोंबिवलीत पलावा पुलासाठी मनसेसोबत शिवसेना UBTच्या नेत्यांनी आंदोलन केलं. हे आंदोलन त्याचाच एक भाग असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. आदित्य ठाकरेंनी मनसेसोबत युतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढं टाकल्याचं सांगण्यात येतंय. ठाकरेंची शिवसेना जर अनुकूल असेल तर मनसेही फारसे आढेवेढे घेणार नाही असं दिसू लागलंय.

गेल्या 7 वर्षांपासून डोंबिवलीच्या कटाई नाका इथल्या पुलाचं काम रखडलंय. त्यामुळे या परिसरात वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय  त्याच पार्श्वभूमीवर या पुलासाठी 31 मेची डेडलाईन देण्यात आली होती. मात्र, डेडलाईन देऊनही पूल सुरु न झाल्यानं शिवसेना UBT आणि मनसेनं एकत्र येऊन आंदोलन केलं. यावेळी शिवसेना-मनसेचा विजय असो अशा घोषणा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यामुळे डोंबिवलीतील युतीच्या पुलानंतर आता ठाकरे बंधूंचेही सूर जुळणार का. आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार का.. याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा चेन्नईतून श्रीलंकेला पळण्याचा प्रयत्न? कोलंबो विमानतळावर विमानाची तपासणी

0

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्च ऑपरेशन राबवून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. याचदरम्यान गुप्तचर यंत्रणेला अशी माहिती मिळाली होती की, या हल्ल्याशी संबंधित काही संशयित दहशतवादी चेन्नईवरून कोलंबोला पळण्याच्या तायरीमध्ये आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चेन्नईवरून कोलंबोकडे रवाना झालेल्या श्रीलंका एअरलाईन्सची फ्लाइट UL122 या विमानाची कोलंबोच्या बंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा दलाकडून तपासणी करण्यात आली.

गुप्तचर यंत्रणेला अशी माहिती मिळाली होती की, या हल्ल्याशी संबंधित काही संशयित दहशतवादी चेन्नईवरून कोलंबोला पळण्याच्या तायरीमध्ये आहेत. माहिती मिळाल्यानंतर लगेचच कोलंबोच्या बंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला अलर्ट करण्यात आलं होतं. विमान विमानतळावर पोहोचताच या विमानातील प्रवाशांची तपासणी करण्यात आली.

श्रीलंकेच्या पोलीस प्रवक्त्यानं याबाबत माहिती देताना सांगितलं की, आम्हाला अशी माहिती मिळाली होती की, चेन्नईवरून कोलंबोला येणाऱ्या विमानामध्ये पहलगाम हल्ल्याशी संबंधित काही संशयित दहशतवादी देखील आहेत. त्यानंतर आम्ही या विमानातील प्रवाशांची तपासणी केली. त्यानंतर या विमानाला पुढील उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात आता मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानसोबत सुरू असलेली सर्व प्रकारची आयात निर्यात बंद करण्यात आली आहे, अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे, तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पाकिस्तानचा जळफळाट

दरम्यान भारतानं केलेल्या या कारवाईनंतर आता पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानच्या नेत्यांकडून विखारी वक्तव्य सुरू आहेत. युद्धाच्या पोकळ धमक्या देण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तान आता त्याच्या मित्र राष्ट्रांची मदत घेण्याच्या तयारीमध्ये आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती पाकिस्तानने आपल्या मित्र राष्ट्रांना केल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानवर प्रचंड दबाव वाढला आहे.

पुरंदरमध्ये मोठा राडा; विमानतळावरुन शेतकरी -पोलीस आमनेसामने, लाठीचार्जमध्ये महिलेचा मृत्यू! गावकऱ्यांनी ड्रोन सर्वे बंद पाडला

0

पुणे : पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोन सर्वे शासनाकडून करण्यात येतोय. मात्र बाधित सातही गावातील शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्वेला विरोध केला आहे . शेतकऱ्यांच्या मनात रोष वाढतच चालला आहे. याच रोषातून आज आंदोलक शेतकरी आणि पोलीस आमनेसामने आले. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, या मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. तसेच मोठा फौजफाटादेखील तैनात करण्यात आला आहे .

पुरंदरच्या विमानतळासाठी सुरू असणाऱ्या ड्रोन सर्वेला आलेल्या अधिकाऱ्यांना गावातील लोकांनी ड्रोन सर्वे बंद करण्यास भाग पाडलं होतं. यानंतर आज प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. ड्रोन्स सर्वे करण्यात येणार होता. मात्र आजही सात गावातील नागरिकांनी या सर्वेला विरोध केला. यानंतर पोलीस आणि आंदोलकांच्या मध्ये झटपट झाली. पोलिसांनी अश्रू धुराचा मारा करत लाठी चार्ज केला. या लाठीचार्जमध्ये कुंभारवळण गावामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून अंजनाबाई कामटे ( वर्ष 60) असे महिलेचे नाव आहे.

परिसरातील लोक आता संतप्त

या लाठीचार्ज मध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत. तर या लाठीचार्ज दरम्यान एका महिलेचा देखील मृत्यू झाला आहे. यानंतर या परिसरातील लोक आता संतप्त झाले आहेत. दरम्यान प्रशासन आणि पोलीस हे आता या भागातून माघारी गेले असून असून शेतकरी मात्र आक्रमक आहेत. मृत महिलेचा मृतदेह पोलीस स्टेशनमध्येच ठेवणार असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे.

कोणती सात गावे निश्चित केली?

या प्रकल्पासाठी वनपुरी, एखतपूर, उदाचीवाडी, कुंभारवळण, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव ही सात गावे निश्चित करण्यात आली आहेत. एकूण सुमारे २७०० हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध केला आहे.