Home Blog Page 30

पुणे मेट्रोच्या लोखंडी साहित्याचा ढीग अजूनही मुठा नदीपात्रात; खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असतानाही हलगर्जीपणा

0

खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असतानाही भिडे पुलाजवळील (डेक्कन) नदीपात्रात पुणे मेट्रो प्रकल्पाचे स्टील साहित्य अजूनही पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी वाढल्याने गुरुवारी संध्याकाळपर्यंत ८७३४ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या परिस्थितीतही नदीपात्रातील मेट्रोच्या कामाचे साहित्य तसंच असल्याने संभाव्य धोका निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (महा-मेट्रो) जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनावणे म्हणाले, “पावसाळ्याचा विचार करून ठेकेदाराला आधीच साहित्य हटवण्याचे निर्देश दिले होते. आता पुन्हा त्याला तत्काळ आणि प्राधान्याने हे साहित्य हटवण्याचे आदेश दिले जातील.”

महा-मेट्रो पादचारी पूल उभारत आहे, जो पेठ भागांमधून डेक्कन मेट्रो स्टेशनपर्यंत थेट प्रवेशासाठी असेल. या पुलाच्या माध्यमातून प्रवासी नारायण पेठ व अलका टॉकीज चौक परिसरात सहज जाऊ शकणार आहेत. परंतु, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढत असताना तिथे धातूच्या साहित्याचा ढीग असणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे तातडीने कारवाईची गरज आहे.

पुण्यात सततच्या पावसामुळे पाणी साचले, वाहतूक कोलमडली; शहर ठप्प

0

गुरुवारच्या पहाटेपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पुणे शहरात जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागांत पाणी साचल्यामुळे रस्ते ओसंडून वाहू लागले, परिणामी वाहतूक ठप्प झाली. झाडे पडण्याच्या घटना घडल्या. भारतीय हवामान विभागानुसार (IMD) १९ जून रोजी मध्यरात्रीपासून दुपारी ५.३० वाजेपर्यंत पुण्यात ५४.२ मिमी पावसाची नोंद झाली.

हिंजवडी, मुंढवा, कोथरूड, हिंगणे आणि धायरी-सिंहगड रोड परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. काही भागांत घरात पाणी घुसले. साईनगर (हिंगणे) येथे वनविभागाची भिंत कोसळल्यामुळे घरात पाणी शिरले, असा आरोप नागरिकांनी केला.

साईनगरचे रहिवासी गोविंद गोरे म्हणाले, “मागील वर्षी आमच्या घरामागील भिंत कोसळली होती. अनेक वेळा तक्रार करूनही दुरुस्ती झाली नाही. गुरुवारी सकाळी ८ वाजता पावसाचा जोर वाढल्यामुळे घरात पाणी घुसले. रात्री पाऊस वाढल्यास येथे राहणे अत्यंत धोकादायक ठरेल.”

शिवशंभो नगरमधील व्हीआयआयटी कॉलेजच्या मागील गल्ली क्रमांक ३ येथे सिटी टॉवर इमारतीजवळ मोठा खड्डा पडल्याने जमिनी खचण्याची भीती निर्माण झाली आहे.

पाषाणच्या पंचवटी परिसरात निशिगंध इमारतीसमोर झाड कोसळून २२ वर्षीय C-DAC विद्यार्थिनी काजल जखमी झाली. एक चारचाकी आणि दुचाकीचे नुकसान झाले. फायर ब्रिगेडने तत्परतेने काजलची सुटका करून औंध येथील साई श्री रुग्णालयात दाखल केले.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला
पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी १ वाजता १९२० क्यूसेक्सने सुरू असलेला विसर्ग रात्री ११ वाजता १५,०९२ क्यूसेक्स इतका करण्यात आला.

खडकवासला धरणात मागील २४ तासांत ७३ मिमी पावसाची नोंद झाली असून १.६६ टीएमसी (साधारणतः ८४%) पाणीसाठा झाला आहे. इतर धरणांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

  • पानशेत: ११६ मिमी पाऊस, २.४६ टीएमसी (२३.१३%)
  • वरसगाव: ११३ मिमी पाऊस, ४.१६ टीएमसी (३२.४५%)
  • टेमघर: ९० मिमी पाऊस, ०.४० टीएमसी (१०.८४%)
  • एकूण साठा: ८.६८ टीएमसी (२९.७८%)

(मागील वर्षी याच दिवशी ३.६२ टीएमसी म्हणजे १२.४३% साठा होता)

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, विशेषतः मुठा नदीकाठी राहणाऱ्यांना. पाण्याचा प्रवाह अधिक वाढू शकतो, आणि हवामान पाहून आणखी विसर्ग होण्याची शक्यता आहे.

जूनमध्ये पुण्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद
IMD च्या आकडेवारीनुसार, पुण्यात यंदा जून महिन्यात आत्तापर्यंत २३२ मिमी पाऊस पडला आहे, जो सामान्य सरासरी १६६.३ मिमी पेक्षा अधिक आहे. सलग दुसऱ्या वर्षी जून महिन्यात २०० मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. (२०२४ मध्ये: २५२ मिमी)

१९ जून रोजी (१२ ए.एम. ते ५.३० पी.एम.) क्षेत्रनिहाय पावसाचे मिमीमध्ये वितरण:

  • शिवाजीनगर: 54.2
  • पाषाण: 64.2
  • लोहगाव: 52.8
  • चिंचवड: 90.0
  • लावळे: 96.0
  • मगरपट्टा: 49.0
  • कोरेगाव पार्क: 0.5
  • एनडीए : 86.0

दोन मराठी लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर

0

यंदाच्या वर्षी दोन मराठी साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सुरेश सावंत यांना त्यांच्या “आभाळमाया” या बालकविता संग्रहासाठी बालसाहित्य पुरस्कार, तर प्रदीप कोकरे यांना त्यांच्या “खोल खोल दुष्काळी डोळे” या कादंबरीसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमीतर्फे बुधवारी २४ भाषांमधील बालसाहित्य पुरस्कार आणि २३ भाषांमधील युवा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, “प्रदीप कोकरे हे वास्तववादी लेखन करणारे लेखक आहेत. त्यांचे साहित्य गरीब, बेरोजगार, उपेक्षित आणि वंचित घटकांचे जीवन प्रतिबिंबित करते. सामाजिक प्रश्नांवर थेट भाष्य करणारे त्यांचे लेखन हे केवळ त्यांचेच नव्हे, तर संपूर्ण मराठी साहित्यक्षेत्रासाठी गौरवाची बाब आहे.”

सुरेश सावंत हे मराठी बालसाहित्याचे ज्येष्ठ लेखक आणि कवी असून त्यांची भाषा साधी, मनमोकळी आणि मुलांना सहज समजणारी आहे. “आभाळमाया” या संग्रहात निसर्ग, आकाश, स्वप्नं आणि बालपणाच्या भावविश्वावर आधारित कविता आहेत.

प्रदीप कोकरे यांनी आपल्या कादंबरीबद्दल सांगितले की, “माझी कादंबरी आजच्या तरुण पिढीच्या अस्मितासंकटांवर आधारित आहे. कथानायक एका लहानशा गावातून शिक्षणासाठी मुंबईत येतो आणि त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, ज्यातून त्याच्या अस्तित्वासंदर्भातील प्रश्न उभे राहतात. संपूर्ण कादंबरीत त्याच्या भावना कवितेच्या रूपात व्यक्त होतात. ही कादंबरी यशवंतराव चव्हाण केंद्र फेलोशिप २०२२ अंतर्गत पूर्ण केली. साहित्यातील संमेलने होतात, पण प्रत्यक्ष तरुणांच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही.”

पुणे मनपाच्या नागरी आरोग्य केंद्रांचा राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोच्च गौरव

0

पुणे महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी ले. पृथक बाराटे रुग्णालय, वारजे या केंद्राने ‘कायाकल्प’ राज्यस्तरीय पुरस्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती गुरुवारी अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली.

या पुरस्काराचे उद्दिष्ट सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रण यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान करणे आहे. या विजयाबद्दल वारजे येथील आरोग्य केंद्राला ₹२ लाखांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

ले. बाबुराव शेवाळे रुग्णालय हे PMC चे आणखी एक नागरी आरोग्य केंद्र यामध्ये प्रथम उपविजेते ठरले असून, त्यांना ₹१.५ लाखांचे पारितोषिक मिळाले आहे. यासोबतच महापालिकेच्या आणखी १५ नागरी आरोग्य केंद्रांना कायाकल्प उपक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रत्येकी ₹५०,००० ची प्रोत्साहनपर पारितोषिके प्रदान करण्यात आली आहेत.

या पुरस्कार मूल्यांकन प्रक्रियेत PMC द्वारा चालवली जाणारी एकूण ११ नागरी आरोग्य सुविधा केंद्रे (UCHCs) देखील गौरवण्यात आली असून, प्रत्येक केंद्राला ₹१ लाख असे एकूण ₹११ लाखांचे बक्षीस देण्यात आले.

“ही मान्यता म्हणजे पुणे महापालिकेच्या स्वच्छ, सुरक्षित आणि कार्यक्षम आरोग्यसेवा पुरवण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे,” असे PMC च्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

भाजपचे ‘मिशन मुंबई’ ६ महिन्यापासून जोरदारच; शिंदे, ठाकरे अन् काँग्रेस  तयारीत आसपासही नाही!

0

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसात केली जाणार आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपने गेल्या सहा महिन्यापासून जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपने प्रचार यंत्रणा राबविण्यात मोठी आघाडी घेतली आहे. येत्या काळात मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने ‘मिशन मुंबई’ अ‍ॅक्टिव्ह केले आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपला या अभियानाचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून गेल्या काही दिवसापासून युद्धपातळीवर रणनीती आखली जात आहे. भाजपने (BJP) येत्या काळात ‘घर घर चलो अभियानाच्या’ माध्यमातून मुंबई शहर पिंजून काढण्याचा निर्धार केला आहे. या ‘घर घर चलो अभियाना’तंर्गत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले काम सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोचविण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई शहरातील जवळपास 227 प्रभागात कार्यकर्ते व यंत्रणा कामाला लागली आहे.

पीएम नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होऊन 11 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यांनी देशभरात केलेलं काम त्यासोबतच राज्य सरकारकडून करण्यात आलेली विकास कामे सर्वसामान्य नागिरकापर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईतील नेतेमंडळींच्या विभागावर बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकीला डॉक्टर, वकील, सीए, माजी सैनिक, साहित्यिक मंडळी वैविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींना मार्गदर्शन करीत आहेत.

भाजपने सुरु केलेल्या ‘घर घर चलो अभियान’च्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने केलेली कामे शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रचार पत्रकांचे वाटप करण्यात येत आहे. त्यासोबतच नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. त्यासाठी विभागस्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

यंत्रणाचा डिजिटल प्रचारावर भर

महापालिका निवडणुकीसाठी भाजपने डिजिटल प्रचारावर भर दिला आहे. भाजपने मंडळ स्तरावर प्रचाराचे नियोजन केले आहे. त्यावर सध्या भर दिला जात असून प्रभावी प्रचार करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासोबतच सरकारने केलेले काम नागिरकापर्यंत पोंहचविण्यात कोणते मंडळ किती प्रभावी ठरते. यासाठी स्पर्धा होणार असून प्रचारासाठी डिजिटल माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे.

त्यासोबतच ‘एक पेड माँ के नाम’ ही एक अभिनव योजना ५ जूनपासून राबवली जात आहे. या माध्यमातून वृक्षारोपणाची योजना राबवली जात असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पालिका निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात या निमित्ताने करीत पावसाळयाच्या दिवसाची संधी साधली आहे.

मायक्रो प्लॅनिंगमध्ये भाजपची आघाडी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने गेल्या काही दिवसापासून बूथनिहाय व प्रभागनिहाय बांधणी सुरु केली आहे. यामध्ये भाजपने ‘मिशन मुंबई’ अ‍ॅक्टिव्हपणे राबवत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे शिंदेंची शिवसेना व महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अथवा काँग्रेसने मायक्रो प्लॅनिंग केलेले दिसत नाही. त्यामुळे निवडणूक घोषणेपूर्वीच भाजपने यामध्ये इतर पक्षांच्या तुलनेत मोठी आघाडी घेतली आहे.

महायुती सरकारची खास योजना; सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते ‘स्थानिक’च्या निवडणुकीपूर्वी अधिकारी होणार!

0

राजकीय कार्यकर्त्यांसाठी खासकरून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी नवी संधी चालून आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होण्यापूर्वी कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून संधी मिळणार आहे.शिवाय यापूर्वी केवळ कागदपत्रांवर शिक्कामोर्तबापुरते मर्यादित राहणाऱ्या या पदाला आता अधिक अधिकार बहाल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांना आता गुन्ह्यांमध्ये ‘पंच’ म्हणून काम करता येणार आहे. साक्षांकनासह अन्य १३ अधिकार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा विचार करता, विशेष कार्यकारी अधिकारी पदाला अधिक महत्त्व प्राप्त होण्याची चिन्हं आहेत. पक्षाशी निष्ठावान, प्रामाणिक आणि सातत्याने जनतेच्या संपर्कात राहणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या वरिष्ठांकडून या संधीसाठी प्राधान्य मिळू शकते. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आतापासूनच या पदासाठी प्रयत्नांची शर्थ सुरू केली असून, अंतर्गत हालचालींना वेग आला आहे, अशी माहिती राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

आजवर प्रत्येक 1000 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी असत मात्र, आता राज्य सरकारने नवीन जीआर काढून प्रत्येक 500 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या संख्येने विशेष कार्यकारी अधिकारी राज्यात नेमले जाणार आहे. पूर्वी जिल्हास्तरीय यादी पालकमंत्र्यांमार्फत शासनाला पाठवली जात होती. मात्र, नव्या निर्णयानुसार अंतिम मान्यता महसूलमंत्र्यांकडे देण्यात आली आहे. हे खाते सध्या राज्य सरकारमध्ये भाजपकडे असल्यामुळे भाजपच्या आमदारांची प्रभावी भूमिका राहील, असे चित्र दिसू शकेल.

विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी इच्छुकांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवर आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावली जात आहे. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने विशेष कार्यकारी अधिकारी पदी कोणाची वर्णी लागते, याला आता महत्व प्राप्त झाले आहे. निवडणुकांपूर्वीच कार्यकर्त्यांना ही संधी मिळणार आहे.

प्रारंभी राज्य सरकारने जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्षपद महसूलमंत्र्यांकडे दिले होते. पालकमंत्र्यांना सदस्य, तर जिल्हाधिकाऱ्यांना सदस्य सचिव करण्यात आले. मात्र त्यामुळे महायुतीचे उरलेले दोन घटकपक्ष शिवसेना व राष्ट्रवादी गटात अस्वस्थता पसरली होती. राज्य शासनाने या आदेशात तातडीने सुधारणा करत अध्यक्षपद पुन्हा पालकमंत्र्यांकडे सोपवले. मात्र, अंतिम निर्णयाचे अधिकार महसूलमंत्र्यांकडेच ठेवण्यात आले आहेत.

विशेष कार्यकारी अधिकाऱ्याच्या अधिकारात वाढ केल्यामुळे या पदाला नव्याने राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. डिसेंबर २०१५ मधील शासन निर्णयानुसार यापूर्वी या पदाधिकाऱ्यांना केवळ साक्षांकनाचे अधिकार होते. आता त्यांना निवडणूक प्रक्रियेतील सहकार्य, पंच म्हणून भूमिका, विविध सरकारी कामांमध्ये सहभाग आदी अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप वाढण्याची भीती काही विरोधकांनी व्यक्त केली आहे. तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये पंच म्हणून सहभागी झाल्याने याचा राजकीय फायदा घेतला जाऊ शकतो, अशीही शंका वर्तवली जात आहे.

शिवसेना ठाकरे गटात मोठी हालचाल! सर्व आमदार, खासदारांना महत्त्वाचे निर्देश आगामी निवडणुकीबाबत चर्चा होणार का?

0

मुंबईत महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या घडामोडी घडत आहेत. कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळेच राजकीय वर्तुळात बैठकांचा धडका चालू आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटकपक्षांना गळती लागली आहे. ठाकरे गट, काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मात्र डिनर डिप्लोमसीची मदत घेतली जात आहे. त्यांनी आपल्या आमदार आणि खासदारांना खास जेवणासाठी आमंत्रित केलंय.

नेमकं काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी आपल्या आपल्या पक्षाच्या सर्व आमदार आणि खासदार यांना जेवणासाठी आमंत्रित केलंय. उद्या म्हणजेच 20 जून रोजी मुंबईतील ताज लँड्समध्ये डिनर डिप्लोमसीचा हा कार्यक्रम होणार आहे. ठाकरेंनी सर्वच आमदार आणि खासदारांना या जेवणासाठी बोलावलं आहे.

डिनर डिप्लोमसीचं कारण काय?

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात अनेक घडामोडी घडत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक माजी आमदार, नेत्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी काळात काही खासदारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तशा बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. विशेष म्हणजे ठाकरे पक्षातील खासदार शिंदे गटात जाणार असून त्यासाठी चाचपणी केली जातेय, अशीही माहिती सूत्रांकडून आली होती. त्यामुळे ठाकरेंनी दिलेल्या या जेवणाच्या आमंत्रण कार्यक्रमात या विषयावर काही चर्चा होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

आगामी निवडणुकीबाबत चर्चा होणार का?

राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यासाठी रणनीती आखली जात आहे. ठाकरे यांच्या पक्षासाठी तर मुंबईची पालिका निवडणूक फारच प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे काहीही झालं तरी ही निवडणूक जिंकायचीच असा निश्चय ठाकरे गटाने केला आहे. तसेच ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक यासारख्या महापालिकाही ठाकरे गटासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे आमदार खासदारांसोबतच्या डिनर डिप्लोमसीमध्ये उद्धव ठाकरे याविषयीही काही मार्गदर्शन करणार का? असे विचारले जात आहे.

ज्ञानोबा – तुकोबांचा पालखी सोहळा; पुण्यातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग…

0

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोहळा प्रस्थानावेळी वाहतूक वळविण्यासोबत पर्यायी मार्गाबाबतचे आदेश जिल्हाधि कारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

२२ जूनला सासवड येथे मुक्कामी असणार आहे. यावेळी पहाटे दोन वाजल्यापासून ते २४ जूनच्या रात्री १२ पर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवेघाट व बोपदेवघाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक खडी मशीन चौक-कात्रज-कापूरहोळ मार्गे, तसेच सासवडकडून पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे वळविण्यात येणार आहे, तर २४ व २५ जूनला जेजुरी आणि वाल्हे येथे मुक्काम असल्याने २४ जून रोजी पहाटे २ पासून ते २५ जूनला रात्री १२ वाजेदरम्यान पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-नीराकडे तसेच नीराकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव-नीरामार्गे वळविण्यात येणार आहे.

२६ जूनला लोणंद येथे मुक्काम असल्याने पहाटे दोनपासून ते सायंकाळी पाचपर्यंत पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-निराकडे, तसेच नीराकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सासवड-जेजुरी-मोरगाव मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच २६ ते २८ जून दरम्यान लोणंद येथून फलटणकडे पालखी प्रस्थान करणार असून, या कालावधीत फलटण लोणंद येथून पुण्याकडे जाणारी, तसेच पुण्याहून फलटण व लोणंदकडे जाणारी वाहतूक शिरवळमार्गे वळविण्यात येणार आहे.

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

२३ जूनला यवत येथे मुक्कामी असणार असून, २३ जूनला पहाटे दोन रात्री ते १२ पर्यंत पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक वाघोली-केसनंद-राहू-पारगाव-चौफुला, तसेच सोलापूरकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-राहू-केसनंद-वाघोली या मार्गे वळविण्यात येणार आहे, तर २४ जूनला वरवंड येथे मुक्कामी असल्याने पहाटे दोन ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक थेऊर फाटा-केसनंद-राहू-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ, तसेच सोलापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक कुरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-राहू-वाघोली-पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.

तसेच २५ जूनला उंडवडी येथे मुक्कामी असेल. यावेळी पहाटे दोन वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ, तसेच सोलापूरहून पुण्याकडे जाणारी जाणारी वाहतूक कुंरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-चौफुला-पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच पहाटे दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड रस्ता बंद करण्यात येणार असून, दरम्यान या मार्गावरील वाहतूक भिगवणमार्गे बारामती आणि बारामतीकडून येताना भिगवणमार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येतील. बारामतीहून पाटसकडे जाणारी वाहतूक बारामती-लोणीपाटी-सुपा-चौफुला-पाटस, तसेच पाटसहून बारामतीकडे जाणारी वाहने पाटस-चौफुला-सुपा-लोणीपाटी-बारामतीकडे येतील.

पालखी २६ जूनला उंडवडी ते बारामती दरम्यान बारामती शहरात मुक्कामी असणार असून, पहाटे दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड रस्ता बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक भिगवणमार्गे बारामती आणि बारामतीकडून भिगवणमार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येतील. २७ जूनला पालखी सणसर येथे मुक्कामी असणार असून, पहाटे दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती वाहतुकीचा रस्ता बंद करण्यात येणार असून, वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती अष्टीकडे, तसेच बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण कळसमार्गे जंक्शनकडे वळविण्यात येणार आहे.

२८ जूनला निमगाव केतकी येथे मुक्कामी असणार असून, पहाटे २ ते २९ जूनला रात्री १२ वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती-कळंब-बावडा-इंदापूर, बारामती-भिगवण-इंदापूर, तसेच इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक इंदापूर-बावडा-कळंब-बारामती आणि इंदापूर-भिगवण-बारामती यामार्गे वळविण्यात येणार आहे

२९ जूनला इंदापूर येथे मुक्कामी असून, पहाटे दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर-कळस-जंक्शन मार्गे बारामती किंवा लोणी-देवकर-भिगवण मार्गे बारामतीकडे यामार्गे वळविण्यात येणार आहे.

३० जूनला पहाटे ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक अकलूज-बावडा-नातेपूते बारामती, तसेच अकलूजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरिता इंदापूर मुख्य महामार्गाचा वापर करावा. ३० जूनला इंदापूर शहरातील जुना पुणे-सोलापूर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून, वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बाह्यमार्गाने वळविण्यात येणार आहे.

१ जुलैला सराटी येथे मुक्कामी असून, पहाटे २ ते रात्री १२ पर्यंत, तसेच ३ जुलैला पहाटे २ ते दुपारी १२ वाजेपर्यंत इंदापूर अकलूज रोडवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. इंदापूर ते अकलूज या मार्गावरील वाहने इंदापूर-हिंगणगाव-टेंभुर्णी-गणेशगाव-माळीनगर-अकलूज आणि अकलूज ते इंदापूर मार्गावरील वाहतूक अकलूज-नातेपूते-वालचंदनगर-जंक्शन-भिगवण या मार्गे वळविण्यात येणार आहे.

पुढच्या आषाढीला अजित पवार पांडुरंगाची शासकीय पूजा करतील; अमोल मिटकरींचं स्फोटक वक्तव्य

0

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे. पुढच्या आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी सपत्नीक करावी, असं विठ्ठलाला साकडं घातल्याची प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे. अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातील आरोग्यनगर भागातील निवासस्थानी रूपनाथ महाराजांची पालखी आली होती. यावेळी अमोल मिटकरी यांनी पालखीत रूपनाथ महाराज आणि विठ्ठलाकडे साकडं घालतांना अजितदादांना लवकरच राज्याचे मुख्यमंत्री करा, असे साकडे घातले. तसेच अमोल मिटकरी यांनी रूपनाथ महाराजांच्या पालखीचे सहपरिवार स्वागत केलं‌. त्यांनी त्यांच्या पत्नीसह पालखीत फुगडी देखील खेळली.

अमोल मिटकरींचं स्फोटक वक्तव्य

अमोल मिटकरी म्हणाले की, मी पांडुरंगाच्या चरणी एकदाच साकडे घातले होते. आज पालखीचे प्रस्थान होत आहे. ज्ञानोबारायांची पालखी आळंदीवरून निघाली आहे. काल तुकोबारायांची पालखी निघाली. आता आमच्या जिल्ह्यातील पालखी निघत आहेत. या पालखीची आरती करताना आम्ही एकच साकडे घातले की, यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल. पण पुढच्या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा ही राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नीक करावी, हे साकडे मी पांडुरंगाला घातले आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, मिटकरींच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरून महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमोल मिटकरींनी याआधीही बोलून दाखवली होती इच्छा

मागील वर्षी देखील अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा बोलून दाखवली होती. अमोल मिकटरी म्हणाले होते की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहाव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यामध्ये महिलांसाठी ई -पिंक रिक्षा योजना आहे. मोफत शिक्षणाची सुविधा आहे. शेतकऱ्यांना मोफत विजबील आहे आणि सर्वात महत्वाची लाडकी बहिण योजना राबवण्यात आली आहे. याच योजनेच्या भरोशावर 2024 ची विधानसभा निवडणूक जिंकून अजितदादा पुढच्यावर्षी मुख्यमंत्री होतील आणि बाप्पाची पूजा करतील, असे त्यांनी म्हटले होते.

नारायण राणेंची मोठी कबुली “होय बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”

0

आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील, असा कयास बांधला जात आहे. शिंदेसेना शिंदे गट व उद्धवसेना हे दोन्ही पक्ष वर्धापनदिनाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. विशेष करून मुंबईत पालिका निवडणुकीपूर्वी या सोहळ्यांना महत्त्व आहे. यातच भाजपा नेते नारायण राणे यांनी एक कबुली दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, मी मान्य करतो बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख यांच्यामुळेच मी मोठा झालो. मला हे दिवस दिसले. त्यामुळे बाळासाहेब हेच माझे गुरू आणि सर्वस्व आहेत. ओरिजनल शिवसेना कायदेशीर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे त्यांची (उद्धव ठाकरे) शिवसेना राहिलेली नाही. त्यांचे दुकान बंद. बाळासाहेब कट्टर हिंदुत्ववादी होते. त्यांनी कधी पदासाठी आणि पैशांसाठी तडजोड केली नाही. यांनी पदासाठी तडजोड केली. यांनी बाळासाहेबांची विचारधारा यांनी सांभाळली नाही, आजही सांभाळत नाहीत, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

यांचा कसला वर्धापन दिन? एकनाथ शिंदेंना शुभेच्छा

शिवसेना तर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे यांचा कसला वर्धापन दिन? उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो, वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा काही केले नाही आणि आता तर त्यांचे दुकान बंद झाले आहे. ते धडपडत आहेत. बाळासाहेबांची खरी विचारधारा त्यांनी टिकवलेली नाही. त्यांच्याकडून महाराष्ट्राचे कोणतेही भवितव्य घडणार नाही. कोणत आहेत ते? आमदार किती, खासदार किती? देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सक्रीय राजकारणात त्यांचा काही रोल नाही, या शब्दांत नारायण राणे यांनी निशाणा साधला.

दरम्यान, त्यांचे लक्ष आता फक्त मुंबई महापालिकेवर आहे. २६ वर्षे दुकान मांडले. जेवढा भ्रष्टाचार करायचा तेवढा केला. आता परत शक्य नाही. महानगरपालिका जिंकणे पूर्वीच्या शिवसेनेला (आताचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शक्य नाही. आता आम्ही आहोत इकडे. आम्ही कसे देऊ? असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.