
LIC ने “वन मॅन ऑफिस” चे अनावरण केले

डीएसपी निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स फंड योजनेचा शुभारंभ

पुणे: डीएसपी म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी डीएसपी निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स फंड ही नवीन गुंतवणूक योजना आणल्याची घोषणा केली आहे. हा फंड मुदतमुक्त श्रेणीतील असून तो निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांकाआधारे आपली वाटचाल करणार आहे. खासगी बँकिंग क्षेत्रातील समभागांत गुंतवणूकीवर हा फंड प्रामुख्याने आपले लक्ष केंद्रीत करणार आहे.
बँकिंग क्षेत्राबद्दल आशावादी दृष्टीकोन असलेले गुंतवणूकदार या फंडात गुंतवणूक करू शकतात. निर्देशांकात सुमारे ८० टक्के वाटा असलेल्या चार सर्वात मोठ्या खासगी बँकांच्या समभागांमध्ये गुंतवणूकीची संधी या खास दृष्टीकोनामुळे मिळते. निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांकात मोठ्या बँकांचे झालेले केंद्रीकरण ही एक लाभाची बाजू असू शकते, अशी डिएसपीची धारणा आहे. ग्राहक अन्य लहान समकक्ष बँकांपेक्षा मोठ्या बँकांवर विश्वास ठेवतात आणि त्यांना प्राधान्य देतात. या धारणेमुळे कर्जवितरणात उच्च वाढ, भांडवलाची सहज उपलब्धता आणि मोठी आर्थिक उलाढाल आदी बाबींमुळे या मोठ्या बँकाना टिकून राहता येते, तसेच आणखी वृध्दी साध्य करता येते.
गेल्या दोन दशकात भारतीय खासगी बँकांचा बाजारातील हिस्सा दुप्पट झाला आहे. या बँकांनी २००१ पासून अतिशय जोरदार कामगिरी करताना त्यांचे ताळेबंदपत्रक अतिशय भक्कम राखताना नफ्यातही सातत्य राखले आहे. परंतु निफ्टी फिप्टी या निर्देशाकांच्या तुलनेत गत काही वर्षात खासगी बँकांच्या समभागांनी तुलनात्मक
दृष्टीकोनातून काहीशी निराशाजनक कामगिरी केलेली आहे. त्यांचे सध्याचे मूल्यांकन दहा वर्षाच्या सरासरी पातळीच्याही खाली घसरलेले आहे. त्यामुळे येथून उसळी घेण्यासाठी हे क्षेत्र एक गट म्हणून सज्ज असल्याचे दिसत आहे.
निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्समध्ये मोठ्या बँकांचे झालेले केंद्रीकरण ही फायदेशीर बाब ठरु शकते, अशी आमची धारणा आहे. ग्राहकांचा विश्वास, भांडवलाची सहज उलपब्धता आणि आर्थिक व्यवहारांचे मोठे प्रमाण यामुळे भारतातील प्रमुख बँका जागतिक पातळीवरील प्रवाहांप्रमाणेच सातत्यपुर्ण वाढ दाखवू शकतात. हा फंड गुंतवणूकदारांना भारताच्या खासगी बँकिंग क्षेत्राच्या भविष्यकालीन वाढीमध्ये सहभागी होण्यासाठी एक सुव्यवस्थित दृष्टीकोन प्रदान करतो, अशी टिप्पणी डीएसपी म्युच्युअल फंडाचे सीएफए आणि पॅसिव्ह इनव्हेस्टमेंट अँड प्रॉडक्टस विभागाचे प्रमुख अनिल घेलानी यांनी केली.
खासगी क्षेत्रातील बँकांच्या समभागांमध्ये थेट गुंतवणूकीऐवजी डीएसपी निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स फंड खासगी बँकींग क्षेत्रात अतिशय करसक्षम पध्दतीने गुंतवणूकीची मार्ग प्रदान करतो. कारण म्युच्यूअल फंडाच्या माध्यमातून या क्षेत्रात गुंतवणूक केल्यानंतर समभागांत फेरसंतुलन साधले असता अथवा प्राप्त होणाऱ्या लाभांशावर भांडवली नफा कर लागू होत नाही. त्याचबरोबर विविध निर्देशांकांतील घटकांचे सध्याचे मूल्यांकन हे त्यांच्या सरासरी पातळीपेक्षाही खाली आहे. त्यामुळे गुंतवणूदारांना या समभागांत प्रवेश करण्याची आकर्षक संधी प्रदान झालेली आहे, असे मत डीएसपी म्युच्यूअल फंडाचे फंड व्यवस्थापक दिपेश शहा यांनी व्यक्त केले.
डिएसपी निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स फंड योजनेची ऑफर (एनएफओ) १४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान गुंतवणूकीसाठी खुली आहे. आपल्या वित्तीय उद्दीष्टांच्या अनुरुप गुंतवणूकदार या फंडात एकरकमी अथवा नियमित गुंतवणूक योजना अर्थात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करु शकणार आहेत.
SWAMIH फंडाअंतर्गत 50,000 घरे पूर्ण- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गृहखरेदीदारांना घरांच्या चाव्या केल्या सुपूर्द

पुणे : अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नागरिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांनी निवडक गृहनिर्माण प्रकल्पांतील घरांच्या चाव्या गृहखरेदीदारांना सुपूर्द केल्या. ह्या गृहखरेदीदारांनी मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) काही अडचणीत असलेल्या प्रकल्पांमध्ये घरे खरेदी केली होती. हे प्रकल्प आर्थिक अडचणींमुळे रखडलेले होते. या प्रकल्पांना “स्पेशल विंडो फॉर अफोर्डेबल अँड मिड-इन्कम हाऊसिंग (SWAMIH I) इन्व्हेस्टमेंट फंड” अंतर्गत निधी मिळाल्यामुळे प्रकल्प पूर्ण होऊ शकले.
माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या प्रकल्पांतील घरांच्या चाव्या खरेदीदारांना देण्यात आल्या. अनेक आर्थिक संकटांत अडकलेले प्रकल्प वेळेवर पूर्ण होऊ शकत नाहीत. अशा प्रकल्पांना आर्थिक मदत देऊन गृहखरेदीदारांना दिलासा देणे हा SWAMIH योजनेचा मुख्य उद्देश आहे. आपला उद्देश साध्य करत SWAMIH फंडाने 50,000 घरे पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
अवंत हिलवेज, व्हिजन हाईट्स आणि शुभम ट्रायडेंट या प्रकल्पांमधील गृहखरेदीदारांना या कार्यक्रमात त्यांच्या चाव्या मिळाल्या. हे प्रकल्प आर्थिक दृष्ट्या अडचणीत होते आणि त्यांना पूर्ण करण्यात अडथळे येत होते. SWAMIH (स्वस्त व मध्यम-उत्पन्न गटातील गृहनिर्माणासाठी विशेष निधी) फंडाने यामध्ये हस्तक्षेप करून या प्रकल्पांना आर्थिक सहाय्य पुरवले. परिस्थिती बदलून लोकांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करण्यात या फंडाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
SWAMIH फंडची स्थापना 2019 मध्ये झाली. भारत सरकार द्वारे प्रायोजित असलेल्या ह्या फंड चे व्यवस्थापन स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुपची एक उपकंपनी ‘SBI व्हेंचर्स लिमिटेड’ बघते. हा फंड भारतीय गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वात मोठा जनकल्याण फंड आहे. आर्थिक अडचणींमध्ये अडकलेल्या प्रकल्पांसाठी आणि ब्राऊनफिल्ड निवासी प्रकल्पांसाठी हा निधी महत्त्वपूर्ण आहे.
“ब्राऊनफिल्ड” हा शब्द मुख्यतः रिअल इस्टेट आणि विकास संदर्भात वापरला जातो. याचा अर्थ असा प्रकल्प, जिथे काही बांधकाम झाले आहे, परंतु त्याच प्रकल्पाचे काम अपूर्ण राहिले आहे. SWAMIH फंड या अपूर्ण प्रकल्पांसाठी आवश्यक वित्त पुरवण्याचे काम करतो. अनेक प्रकल्प अडचणीत असतात किंवा आर्थिक साधनांच्या अभावामुळे अपूर्ण राहतात, अशा प्रकल्पांना पुढे नेण्यासाठी हा फंड मोठी मदत करतो.
जागतिक पातळीवर यापूर्वी असा कोणताही उपक्रम राबवण्यात आलेला नाही किंवा त्यासारखे तुलनात्मक उदाहरण उपलब्ध नाही. म्हणून, SWAMIH फंड हा एक अनोखा आणि नवा उपक्रम आहे. या प्रकारच्या गुंतवणुकीत केवळ आर्थिक नफा मिळवणे हा उद्देश नसून, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन हे मुख्य ध्येय आहे.
एसबीआय व्हेंचर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रेम प्रभाकर म्हणाले, “भारत सरकारच्या दूरदृष्टी आणि पाठिंब्यातून तयार झालेल्या ह्या निधीमुळे अनेक गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यामुळे हजारो कुटुंबांचे स्वप्न साकार झाले आहे.”
आर्थिक अडचणींमुळे अपूर्ण राहिलेल्या अथवा रखडलेल्या प्रकल्पांना मदत देऊन, SWAMIH गृहकर्जवाढीला चालना देत आहे. परिणामी, मजबूत आणि समावेशक अर्थव्यवस्था घडवण्यासाठी हातभार लावत आहे.
५०,००० घरांच्या पूर्ततेचा ह्या महत्वपूर्ण टप्पा गाठून स्वामी फंडाने भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये आणि घर खरेदीदारांना दिलासा देण्यामध्ये असलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली आहे. यामुळे भारताच्या आर्थिक पुनरुत्थानाला बळ मिळाले आहे आणि घर खरेदी करणाऱ्या लोकांना दीर्घकाळापासून अपेक्षित असलेली मदत मिळाली आहे.
शिवराजे युवा प्रतिष्ठानच्या विद्यमाने साठेनगर येथे शिवजयंती मोठ्या हर्षोउल्हासात संपन्न
मुंबई दि. २० (रामदास धो. गमरे) शिवराजे युवा प्रतिष्ठान (रजि.) व अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण हौसिंग सोसा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९५ वा जयंतीमहोत्सव अभिजित प्रकाश कदम यांच्या अध्यक्षतेखाली हर्षोउल्हासात संपन्न झाला.
सदर त्रिदिवसीय कार्यक्रमाच्या प्रसंगी विशाल भरम यांनी प्रभावी व भारदस्त आवाजात प्रास्ताविक सादर करून मधुरवाणीने व लाघवी भाषाशैलीत सूत्रसंचालन सादर केले. सदर त्रिदिवसीय महोत्सवात विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी पैठणीचा खेळ तर बालकलाकरांसाठी नृत्यकलाविष्कार स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होता सोबतच महिलांचे स्नेहसंमेलन व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बौद्धजन पंचायत समिती शिवडी विभाग १३ चे गटप्रतिनिधी राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, शिवसेना (ठाकरे गट) शाखा संघटिका सौ. सविता संजय माजरे, शाखाप्रमुख प्रमोद नकाशे आणि विधानसभा क्षेत्र सहनिरीक्षक सुरेश काळे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. नृत्याविष्कार कार्यक्रमास नृत्यकला ५ स्टुडिओचे मालक, मराठी सिनेमा, ३ अल्बम याचे नृत्यदिग्दर्शक, डान्स एकॅडमीचे नृत्यपरिक्षक विशाल दामू कांबळे हे परीक्षक म्हणून लाभले होते त्यांनी पारदर्शक पद्धतीने परीक्षण करून निकाल जाहीर केला त्यानुसार सोलो डान्समध्ये (एकल नृत्य) प्रथम क्रमांक आरुषी मोंडे, द्वितीय क्रमांक थोकशित सनातन, तृतीय क्रमांक जरीना शेख यांनी पटकावला तर ग्रुप डान्समध्ये प्रथम क्रमांक शिवबा ग्रुप, द्वितीय क्रमांक हरीश ग्रुप, तृतीय क्रमांक फोर फ्लोअर यांनी पटकावला या विजयी स्पर्धकांना सुरेश काळे, बौद्धजन पंचायत समिती विभाग क्र. १३चे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, सविता माजरे यांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच महिलांच्या पैठणीचा खेळ यामध्ये प्रथम क्रमांक सुवर्णा तामसंघे, द्वितीय क्रमांक मोनिका तटकरे, तृतीय क्रमांक नम्रता नागप पटकावला त्यांनाही सन्मानित करण्यात आले, सुरेश काळे, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे आणि सविता माजरे, बाळा अडसुळे यांनी स्पर्धक व उपस्थितांना मार्गदर्शनपर विचार व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या, त्यांचाही विशेष सन्मान करून त्यांना सन्मानित करण्यात आले सोबतच शाखा क्र. ५७८ कार्यकर्त्यांचा ही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित कदम, विशाल भरम, निखिल कांबळे, जयेश करंडे, विजय देवकुळे, रणजित यादव, ऋतिक पाचाने, संजय कांबळे, उपेंद्र लोखंडे, सौ. सुधा भरम, सौ. मनीषा जोगळे, सौ. नम्रता सावंत, शिवराजे युवा प्रतिष्ठानचे सभासद, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ५७८, रमाई महिला मंडळ, पंचशील सेवा मंडळ, अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण हौसिंग सोसायटी, मातंग युवक संघटना यांचे मोठे योगदान लाभले त्याबद्दल विशाल भरम यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
तळवली पंचक्रोशी स्वयंभू चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत मुंढर वाघजाई संघाने द्वितीय क्रमांक पटकावला
गुहागर दि. १७ (रामदास धो. गमरे) भेलेवाडी ग्रामस्थ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्यदिव्य “तळवली स्वयंभू चषक २०२५” पंचक्रोशी व खुला गट क्रिकेट स्पर्धेमध्ये “वाघजाई मुंढर गाव” या क्रिकेट संघाने द्वितीय क्रमांकावर आपले नाव कोरल्याने मुंढर ग्रामस्थांमध्ये हर्षोउल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वप्नील आग्रे व सिद्धेश मोहिते यांनी आपल्या शिरपेचात अनुक्रमे उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट फलंदाज म्हणून मानाचा तुरा रोवला, सदर रोमहर्षक सामन्यांत वाघजाई मूंढर टीममध्ये पोलिस पाटील किरण धनावडे, सागर सुर्वे, राजेश मोहिते, आदित्य शिर्के, ऋषभ शिर्के, पारस शिर्के, स्वप्नील आग्रे, स्वप्नील जाधव, सिद्धेश मोहिते, संजय आदावडे, सुजित गांधी, रसिक पाटणकर, सम्यक गमरे, पार्थ गमरे या खेळाडूंनी अतुलनीय कामगिरी केली सोबतच मैदानात आपल्या टीमच्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी अनिल अवेरे, वसंत दादा, मधुकर मोहिते, राकेश मोहिते, सुधीर गमरे या ग्रामस्थांनी आपल्या मुंढर गावाचा विजय होण्यासाठी मैदानात हजर राहून खेळाडूंना वेळोवेळी प्रोत्साहित केले. सदर अटीतटीच्या सामन्यांत वाघजाई मुंढर गाव क्रिकेट संघाने दुसरा क्रमांक पटकवल्याबद्दल सर्व खेळाडूंचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
CT 2025 : उपकर्णधार ‘शुबमन’ची शतकी खेळी, टीम इंडियाची विजयी सलामी, बांगलादेशचा 6 विकेट्सने धुव्वा
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 4 विकेट्स गमावून 46.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने 231 धावा केल्या. उपकर्णधार शुबमन गिल हा विजयाचा शिल्पकार ठरला. शुबमन गिल याने शतकी खेळी केली. शुबमनने नाबाद धावा केल्या. तर केएल राहुल याने शुबमनला चांगली साथ देत टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
टीम इंडियाची बॅटिंग
कर्णधार रोहित आणि शुबमन या सलामी जोडीने टीम इंडियाला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र रोहित 41 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. टीम इंडियाने 69 धावांवर पहिली विकेट गमावली. रोहितनंतर विराट मैदानात आला. विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. विराटला अपेक्षित सुरुवातही मिळाली. मात्र विराट क्रिकेट चाहत्यांना मोठी खेळी करुन दाखवण्यात अपयशी ठरला. विराट 38 बॉलमध्ये 22 रन्स करुन आऊट झाला. विराटनंतर भारताने ठराविक अंतराने 2 विकेट्स गमावले. श्रेयस अय्यर 15 आणि अक्षर पटेल 8 धावा करुन माघारी परतले. त्यामुळे टीम इंडियाची 30.1 ओव्हरमध्ये 4 आऊट 144 अशी स्थिती झाली. टीम इंडिया काहीशी अडचणीत सापडली होती. मात्र तिथून शुबमन आणि केएल राहुल या दोघांनी डाव सावरला आणि भारताला विजयी केलं.
शुबमन आणि केएल या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 87 धावांची नाबाद आणि विजयी भागीदारी केली. शुबमनने 129 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 9 फोरसह नॉट आऊट 101 रन्स केल्या. तर केएलने 47 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 41 धावा केल्या. बांगलादेशकडून रिषाद हौसेन याने 2 विकेट्क घेतल्या. तर तास्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
बांगलादेशची बॅटिंग
दरम्यान त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र बांगलादेशला टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. मात्र तॉहिद हृदॉय याचं शतक आणि जाकेर अली याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने 49.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 228 धावा केल्या. तॉहिदने 118 बॉलमध्ये 100 रन्स केल्या. तर जाकेर अलीने 114 चेंडूत 68 धावा केल्या. या दोघांनी चिवट खेळी करत बांगलादेशची लाज राखली. मात्र इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजंसमोर गुडघे टेकले. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. हर्षित राणा याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अक्षर पटेल याने 2 विकेट्स मिळवल्या.
लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज, आजपासूनच खात्यावर 1500 रुपये; अर्थ खात्यातून 3490 कोटी रुपये वर्ग
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता वेळेच्या आधीच मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीचा हप्ता आजपासून द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान, यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थींची संख्या घटण्याची शक्यता आहे.
अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता
लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. पण आता उद्यापासूनच लाडकी बहिण योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीअखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र, त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
9 लाख महिलांची या योजनेतून नाव कमी करण्यात येणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे. यापूर्वी 5 लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती. आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या 5 लाख महिला आहेत. या महिलांना लाडकी बहिण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे. वाहनं असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांना ही यातून वगळण्यात आलं आहे. सोबतच निकषात न बसणा-या अनेक महिला आहेत त्यांनी ही पैसे परत करायला सुरुवात केली आहे.
21-65 वयोगटातील महिलांना मिळतात 1500 रुपये
राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली होती. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजाराचा लाभ दिला जातो. 21-65 वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. त्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात.
टीम इंडिया विजयी पण बसला १५४ धावांचा ‘फाईन’, रोहित- हार्दिकमुळेच १९ वर्षांपूर्वीचा हा रेकॉर्ड मोडला
क्रिकेटमध्ये एका चुकीमुळे सामना जिंकताही येतो आणि एका चुकीमुळे सामना हातून निसटूनही जातो. असंच काहीसं दृश्य भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान पाहायला मिळाले आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. पहिल्या डावात गोलंदाजी करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. मात्र हार्दिक पंड्या आणि संघाचा कर्णधार रोहित शर्मामुळे भारताला १५४ धावांचा फाईन बसला. यासह मोठा रेकॉर्डही मोडला गेला.
बांगलादेशविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघातील अनुभवी खेळाडू हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा यांनी आपल्या क्षेत्ररक्षणाने निराश केलं. भारतीय संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या हर्षित राणा आणि मोहम्मद शमीने संघाला शानदार सुरुवात करुन दिली.
दोघांनी सुरुवातीच्या ८ षटकात मिळून ३ गडी बाद केले. इथपर्यंत भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. त्यानंतर अक्षर पटेलने आणखी २ गडी बाद करुन बांगलादेशचं टेन्शन आणखी वाढवलं. अवघ्या ३५ धावांवर बांगलादेशचा निम्मा संघ माघारी परतला होता.
रोहित आणि हार्दिकची चूक भारतीय संघाला भोवली
बांगलादेशला सुरुवातीला ५ धक्के बसल्यानंतर भारतीय संघाकडे बांगलादेशचा डाव लवकरात लवकर गुंडाळण्याची संधी होती. अक्षर पटेलने एकाच षटकात २ गडी बाद केले. त्यानंतर त्याला हॅट्रीक घेण्याची संधी होती. मात्र रोहितने सोपा झेल सोडल्यामुळे अक्षरची हॅट्रीक हुकली. त्यानंतर जाकीर आणि हृदोयने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला.
एकट्या रोहितने नव्हे, तर हार्दिकची चूकही भारतीय संघाला महागात पडली. पहिल्या डावातील २० वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीला आला होता. या षटकातही विकेट घेण्याची संधी मिळाली होती.
मात्र हार्दिकने सोपा झेल सोडला आणि पुन्हा एकदा बांगलादेशी फलंदाजाला जिवदान मिळालं. ज्यावेळी हार्दिकने हा झेल सोडला त्यावेळी तौहीद अवघ्या २३ धावांवर फलंदाजी करत होता. तर बांगलादेशची धावसंख्या ७८ धावा इतकाच होता.
या दोघांनी मिळून १५४ धावांची भागीदारी केली. यासह दोघांनी १९ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. ही चॅम्पियन्स ट्रॉफीतील सहाव्या विकेटसाठी केली गेलेली सर्वात मोठी भागीदारी आहे. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचर आणि जस्टीन कँपच्या १३१ धावांच्या भागीदारीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
दिल्ली आज ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; २,६०० कविता सादरीकरण ५० पुस्तक प्रकाशन १०० स्टॉल
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि.२१) ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. मराठी साहित्याची समकालीन प्रासंगिकता आणि भूमिका समोर आणण्याच्या उद्देशाने ७१ वर्षांनंतर, दिल्लीत हे तीन दिवसीय साहित्य संमेलन आयोजित केले गेले आहे.लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डाॅ. तारा भवाळकर या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असणार आहेत. भारताच्या समृद्ध संस्कृती अन् वारशाचा उत्सव साजरा करणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी साडेचार वाजता विज्ञान भवन येथे या साहित्य संमेलनाला संबोधित करतील आणि त्याचे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान चालेल आणि भारताच्या समृद्ध संस्कृती आणि वारशाचे उत्सव साजरा करण्याचे आयोजन केले आहे.
साहित्यकृतींवरील प्रभाव यासारख्या विषयांवर चर्चा
या परिषदेत पॅनेल चर्चा, पुस्तक प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रसिद्ध साहित्यिकांशी संवादात्मक सत्रे असतील, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. भाषा जतन, भाषांतर आणि साहित्यकृतींवर डिजिटायझेशनचा परिणाम यासारख्या विषयांवर चर्चा केली जाईल.
प्रख्यात विद्वान, लेखक, कवी आणि साहित्य प्रेमी एकत्र येणार
या कार्यक्रमात पुणे ते दिल्ली असा एक प्रतीकात्मक साहित्यिक रेल्वे प्रवास देखील समाविष्ट आहे, यामध्ये २,६०० हून अधिक कविता सादरीकरणे, ५० पुस्तकांचे प्रकाशन आणि १०० पुस्तकांचे स्टॉल असतील. देशभरातील नामांकित विद्वान, लेखक, कवी आणि साहित्यप्रेमी यामध्ये सहभागी होतील.
राज ठाकरेंच्या अध्यक्षतेत मुंबईत महत्त्वाची बैठक; पुन्हा धमाका? मनसैनिकांना 27 तारखेच शिवाजीपार्कवर निमंत्रण
राज ठाकरेंनी आपली पूर्ण ताकद लावली. दौरे,सभा,मेळावे,बैठका यांनी मनसेला बळही दिलं. पण महायुतीच्या लाटेसमोर मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी मनसैनिकांना मोठा आदेश दिला आहे.
राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेची मुंबईत गुरुवारी(ता.20)महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी मनसेच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या धर्तीवर महत्वाच्या सूचना केल्या. तसेच यावेळी त्यांनी संघटनात्मक बदलाचे संकेतही दिले. मुंबई महापालिका निवडणुकीसह मनसेच्या पुढील राजकीय दिशा, ध्येयधोरणं यांसह रणनीतीवरही ठाकरेंनी यावेळी भाष्य केलं.
याचवेळी राज ठाकरेंनी मनसैनिकांना येत्या 27 तारखेला शिवाजी पार्कवर मोठ्या संख्येनं एकत्र जमण्याचे आदेश दिले आहेत.केंद्रानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतरचा पहिलाच मराठी भाषा दिन यंदा साजरा होत आहे. हीच संधी साधून आगामी काळात मराठी भाषेचा मुद्दा मनसे उचलून धरण्याच्या हेतूनं मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मोठ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. याचमुळे मनसैनिकांना राज ठाकरेंनी यंदा मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करायचा असून या सोहळ्याला सहकुटुंब या, असं आवाहन केलं आहे.
केंद्र सरकारकडून घटस्थापनेच्या दिवशीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली होती.
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते.राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीआधी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची अपेक्षा जाहीरपणे व्यक्त केली होती. मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा दिला होता,त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा’,असंही त्यावेळी राज ठाकरेंनी म्हटलं होतं.