Home Blog Page 143

कोणीही मंत्री कोणत्याही विभागाची उत्तर देत असल्यावर आक्षेप समेट घडविण्याचा प्रयत्न; गदारोळानंतर सत्ताधारी-विरोधकांमध्ये बैठक

0

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गुरुवारी (ता.२०) विधान परिषदेमध्ये रणकंदन झाल्यानंतर आज संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. विधान परिषदेचे काम यापुढे विरोधकांच्या सहमतीनेच होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आश्वस्त केले. दरम्यान, या बैठकीत दिशा सालियन प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दोन्ही सभागृहांत त्यावर चर्चा होणे योग्य नसल्याची नाराजी शिवसेना ठाकरे पक्षाच्या आमदारांनी व्यक्त केल्याचे समजते.

विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्या दालनात यासंदर्भात झालेल्या या बैठकीला सभापती राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब उपस्थित होते.

भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून दोन्ही सभागृहांत चर्चा घडवून आणली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अशाप्रकारे ही चर्चा होणे योग्य नसल्याचे मत ठाकरेंच्या पक्षाच्या आमदारांनी या बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. तसेच विधान परिषदेच्या कामकाजाच्या पद्धतीवर सभागृह सुरु झाल्यापासून विरोधकांनी वारंवार आक्षेप घेतला होता.

कार्यक्रम पत्रिकेनुसार कामकाज होत नसल्याकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. विधानसभेप्रमाणे विधान परिषदेतही सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असल्याने विरोधकांचा आवाज क्षीण असल्याने त्यांचे मत विचारात घेतले जात नसल्याचा तीव्र आक्षेप घेण्यात येत होता.

या बैठकीत परब यांनी हेच मुद्दे पुन्हा उपस्थित करत परिषदेत सभागृहात कोणीही मंत्री कोणत्याही विभागाच्या प्रश्नांना उत्तर देत असल्यावरही आक्षेप घेतला. दोन दिवसांपूर्वी नगरविकास विभागाच्या ठाणे कोस्टल रोडच्या प्रश्नावर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उत्तर देत असताना मंत्री शंभुराज देसाई यांनी हस्तक्षेप करत त्या प्रश्नाचे उत्तर दिल्याकडे परब यांनी लक्ष वेधले.

विश्वास-अविश्वास ठरावावरून आक्षेप

कामकाजासंदर्भात कोणतेही निर्णय घेताना सभागृहाची मान्यता घेतली जात नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावरील अविश्वासाचा ठराव विरोधकांना मांडू न देण्यासह गोऱ्हे यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी अचानक विश्वास ठराव आणून बहुमताच्या जोरावर तो मंजूर केला. मात्र विरोधकांना त्यावरही मत व्यक्त करू न देण्यावर या बैठकीत ठाकरे गटाने आक्षेप घेतला.

‘महाराजांचा अपमान करा आणि पळून जा, फडणवीसांची नवी योजना’, हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

0

पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात होणाऱ्या महाराजांच्या अपमानाच्या पा देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते म्हणाले की, ‘कोरटकर सारखा निर्लज्ज माणूस देश सोडून पळून जातो. यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक योजना सुरु केली आहे की महाराजांचा अपमान करा आणि पळून जा. या विकृत माणसाला सरकारने सुरक्षा पुरवली. इंग्रज देखील औरंगजेब एवढे जुलमी आणि क्रूर होते. अपमान करा आणि पुरस्कार मिळवा असचं सुरु आहे.’

गृहविभाग झोपला होता का?

सपकाळ पुढे म्हणाले की, कोरटकर पळून जातो सरकार काय करत आहेत? तुमचा, देशाचा गृह विभाग झोपला होता का? कोरटकरला पळून जाण्यासाठी मदत करण्यासाठी पोलिसांना देवेंद्र फडणवीस यांनी भाग पाडले आहे का? असा सवाल देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. दुसरीकडे माजी मंत्र्याचा लाडका मुलगा न सांगता पळून जातो त्याच विमान मागे बोलावून परत आणले जाते आणि महाराजांचा अपमान करणारा आरोपी पळून जातो. असं देखील सपकाळ म्हणाले आहेत.

प्रशांत कोरटकरचा दुबईतील फोटो व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्याचा हा फोटो जूना असल्याचा दावा काही जण करत आहेत. तर कोरटकरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे अनेक फोटो समोर आल आहेत. त्याला अद्यापही अटक झाली नसल्याने विरोधक सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत.

‘त्या’ वक्तव्यावर आजही ठाम

याच पत्रकार परिषदेत त्यांनी औरंगजेब आणि फडणवीस यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेब याच्या सारखा असल्याची टीका सपकाळ यांनी केली होती. त्यांच्या या विधानानंतर राज्यात राजकारण जोरदार पेटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपकाळ यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या मागणीनंतर आता हर्षवर्धन सपकाळ कमालीचे आक्रमक झाले असून मी माझ्या विधानावर आजही ठाम असल्याचं सांगितले आहे. मी एकनाथ शिंदे यांना सांगू इच्छितो ‘मी शेंगा खाल्ल्या नाही मी टरफल उचलणार नाही ‘, असं सपकाळ म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी टीका ही कारभाराच्या अनुषंगाने असल्याचे स्पष्ट केले होते.

“महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का?”, हर्षवर्धन सपकाळांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

0

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. औरंगजेबाची कबर पाडण्याच्या संदर्भात काही संघटनांनी मागणी केली होती. यातच काही दिवसांपूर्वी नागपुरात दंगलीची घटना घडली. तसेच बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणही अद्याप चर्चेत आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

‘महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का?’, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास महाराष्ट्राच्या गृहविभागाला अपयश आलं असून आता महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री मिळायला हवे, अशी मोठी मागणी देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

“महाराष्ट्राला आज पूर्णवेळ गृहमंत्री नाहीत. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री असले पाहिजेत. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण घडलं, याबरोबरच महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना पाहता आम्ही गृहमंत्र्यांना राजीनामा मागितला आहे आणि आताही मागत आहोत. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचा एक नव्याने प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे. महाराष्ट्राचा गृहविभाग घाशिराम कोतवाल चालवत आहे का? असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती पाहून उपस्थित होत आहे. सध्या महाराष्ट्रात घाशिराम कोतवाली कारभार गृहविभागाचा सुरु आहे”, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेबासारखाच आहे, असं मी म्हटलं होतं. याचं कारण म्हणजे ते करत असलेला कारभार आहे. आगामी काळात सद्भावना बाळगूनच समाजासाठी काम करण्याची माझी पक्षीय आणि व्यक्तिगत इच्छा आहे. औरंगजेबाचा दाखला देत मी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली नसून ते वक्तव्य कारभाराच्या अनुषंगाने होतं. ज्या घटना सध्या राज्यात घडत आहेत त्यामागचं वास्तव अत्यंत क्रूरपणे एकापाठोपाठ एक उजेडात येत आहे. हा घटनाक्रम लक्षात घेता मी ते वक्तव्य केलं होतं, असं स्पष्टीकरण सपकाळ यांनी दिलं.

जयंत पाटलांसोबत बंद दाराआड काय चर्चा झाली? अजित पवारांनी सगळं सांगून टाकले

0

पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीआधी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये चेंबरमध्ये बंद दाराआड २० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार का? या राजकीय चर्चेला सुरूवात झाली. अजित पवार यांना याबाबत स्पष्टीकरण देत विषय संपवला. प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थिती पाहून बातम्या लावल्या पाहिजेत, असे अजित पवार यांनी सांगितले. त्याशिवाय जयंत पाटील यांच्यासोबत चेंबरमध्ये काय चर्चा झाली? याबाबतही त्यांनी सांगितले.

अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात काय चर्चा झाली?

जयंत पाटील आणि माझ्यामध्ये एआय वर चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. प्रसारमाध्यमांनी काय आणि कोणत्या बातम्या लावाव्यात, हा त्यांचा प्रश्न आहे. पण वस्तुस्थिती पाहून बातम्या द्यायला हव्यात. आमची व्हीएसआयची बैठक होती. त्यासाठी मी आणि जयंत पाटील एकत्र आलो होतो. ⁠आजच्या व्हीएसआयच्या बैठकीत एआयचा महत्वाचा विषय होता. एआयचा फायदा होतोय. एआयचा वापर करणे काळाची गरज आहे. एआयचा वापर करुन ऊसाचे उत्पादन वाढले आहे. आम्ही त्याचा वापर फळबागा आणि इतर पिकांसाठी देखाल करणार आहोत, याबाबत आमच्यामध्ये चर्चा झाली, असे अजित पवार यांनी सांगितले.

कोण कोणते नेते उपस्थित होते?

पुण्यातील मांजरी येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला अनेक दिग्गज उपस्थित होते. अजित पवार, शरद पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह अनेक असे साखर उद्योगातील नेतेही या बैठकीला उपस्थित होते.

जयंत पाटील-अजित पवार यांच्यात बैठक –

संत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी अजित पवार आणि जयंत पाटील मांजरी येथे आले होते. सकाळी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये चेंबरमध्ये २० मिनिटे चर्चा झाली. बंद दाराआड दोघांमध्ये बैठक झाल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले. जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली.

पुणे मेट्रोच्या नव्या पर्वाला सुरुवात! २५ किमी लांब मार्ग अन् २२ नवी स्थानके, कसा आहे प्लॅन? वाचा

0

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना गती देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू केली आहे. प्रकल्पातील खराडी ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग या मेट्रो मार्गावरील स्थानकांसाठी ‘रचनाकार सल्लागार समिती’साठी खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.त्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) निविदा मागविण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील पहिल्या टप्प्यातील मार्गांचा विस्तार अंतिम टप्प्यात असताना दुसऱ्या टप्प्यातील पाच मार्ग नव्याने प्रस्तावित करण्यात आले आहेत. यातील खडकवासला, स्वारगेट, हडपसर आणि खराडी या २५.५१ किमी मार्गावर एकूण २२ स्थानके असतील. तर दुसऱ्या बाजूला नळ स्टॉप, वारजे, माणिकबाग या ६.१३ किमी मार्गावर ६ स्थानके असतील. या दोन्ही मार्गांवरील स्थानकांची रचना भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून आणि इतर दळणवळण यंत्रणा परिस्थितीनुरूप सुनिश्चित करण्यासाठी ‘मेट्रो’ने खासगी रचनाकार सल्लागार समितीची नेमणूक करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत.

खडकवासला-खराडी मार्ग (२५.५१ किलोमीटर २२ स्थानके)

खडकवासला, दळवेवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे चौक, राजाराम पूल, देशपांडे उद्यान, स्वारगेट (उत्तर), सेव्हन लव्हज चौक, पुणे कटक मंडळ, रेसकोर्स, फातिमानगर, रामटेकडी, हडपसर फाटा, मगरपट्टा (दक्षिण), मगरपट्टा मध्य, मगरपट्टा (उत्तर), हडपसर रेल्वे स्थानक, साईनाथनगर, खराडी चौक आणि खराडी बायपास अशी २२ स्थानके निश्चित करण्यात आली आहेत.

नळ स्टॉप ते वारजे माणिकबाग (६.१२ कि.मी. ६ स्थानके)

माणिकबाग, दौलतनगर, वारजे, डहाणूकर कॉलनी, कर्वे पुतळा आणि नळ स्टॉप ही ६ स्थानके आहेत.

स्थानकांमधील रचना

परिसरानुसार स्थानकाची रचना, प्रवाशांना सहज आणि सुलभ प्रवास करण्यासाठी सुविधा, वातानुकूलित यंत्रणा, स्थानकावरील विद्युत आणि सौर यंत्रणांची सुविधा, अग्निसुरक्षेपासून हरित इमारतीच्या दृष्टीने नैसर्गिक स्त्रोतांचा पुरेपूर वापर, स्वच्छतागृहे, उपाहारगृहे, वस्तू विक्री दुकाने, ध्वनियंत्रणा आणि इतर मानकांनुसार देखभाल दुरुस्ती आदींचा विचार करून अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित कंपनीची नियुक्ती असणार आहे.

पवार देणार उद्धव ठाकरेंना दणका; विधानसभेचा उमेदवारच मशाल सोडणार

0

कोकणातील दिग्गज नेत्यांच्या हाती धनुष्यबाण देत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दणका दिलेला असतानाच, आता अजित पवारांनी रायगडात हादरे देण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवणारा उमेदवारच राष्ट्रवादी काँग्रेसने फोडला आहे.या महिला नेत्याचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीतच हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

विधानसभा निवडणुकीपासूनच रायगडचं राजकारण तापलेलं आहे. आधी उमेदवार निश्चिती आणि त्यानंतर तिकीट वाटप यामुळं चर्चेत असलेला रायगड जिल्हा पालकमंत्रिपदाच्या निवडीमुळं राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला. शिवसेनेचे गोगावले आणि राष्ट्रवादीच्या तटकरे यांच्यामुळं या जिल्ह्याचं पालकमंत्रिपदच रद्द करावं लागलं. आता पुन्हा एकदा रायगडचं राजकारण चर्चेत आलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार राहिलेल्या स्नेहल जगताप या आता मशाल सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाताला बांधणार आहेत.

सुतारवाडीत शिक्कामोर्तब

स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटाकडून महाड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. जगताप या पराभूत झाल्या होत्या. आता त्याच स्नेहल जगताप आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. सुतारवाडी येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यालयात त्यावर शिक्कामोर्तब झालंय.

या कार्यालयात बंद दाराआड दोन तास बैठक झाल्याचं कळतं. या बैठकीला माजी आमदार अनिकेत तटकरेही उपस्थित होते. स्नेहल जगताप यांचे काका नाना जगताप यांच्यासह भाऊ श्रेयस जगताप आणि महाड, पोलादपूर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाचे शेकडो पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असल्याचे सांगितले जाते.

अजित पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

या महत्त्वपूर्ण बैठकीत सुनील तटकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोबाइलवरून फोन करत संभाषण घडवून आणलं. येत्या काही दिवसांत पक्षप्रवेशासाठी मुहूर्त ठरवण्यात येणार आहे. महाड येथे एका कार्यक्रमात अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचे कळते. रायगडच्या राजकारणात सध्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद निर्माण झाला आहे. त्यातच मंत्री भरत गोगावले व खासदार सुनील तटकरे यांच्यातून विस्तव जात नसल्याने जगताप यांच्या प्रवेशाने तटकरे यांनी गोगावले यांना राजकारणात शह दिल्याचे बोलले जात आहे.

‘संत तुकाराम’ कारखाना आज सर्व उमेदवारांची संयुक्त बैठक; दादा कृपेची ‘मावळ’ची मोर्चेबांधणी मवाळ करणार का?

0

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांचं नातं संपूर्ण परिसराला परिचित असल्याने आजतागायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील लोकांनी त्यांच्या शब्दाला मान दिला. मुळशी तालुक्यात एका विशिष्ट स्तरावर अन् अभिमानास्पद ‘पूर्णत्वाची कडी‘लागलेल्या या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे बदलत्या समीकरणामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील आठवड्यात वाकड येथे हवेली खेड मुळशी येथील सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली; परंतु संपूर्ण पुणे जिल्ह्यात लक्ष लागलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात याच कारखान्याच्या बांधणीच्या जोरावर जे अयशस्वी बंड उभारण्यात आल्याने संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर मावळ भागातून या निवडणुकीची ‘दादाकृपे’ने जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली असून व्यक्तिगत गाठीभेटीच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात झाली आहे. मावळ वगळता सर्व लोकप्रतिनिधींची प्राथमिक बैठक वाकड येथे पार पडल्यानंतर सर्वांनी सहमतीने आज (शनिवार, दि. २२) वाकड येथील श्री संत तुकाराम मंगल कार्यालयात सर्व उमेदवारांची बैठक होणार आहे.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाल्यापासून संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या माध्यमातून कायमच या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र घेत 70 /30 फॉर्म्युलानुसार उमेदवारांची निवड केली जाते त्यामुळेच आजपर्यंत सर्व सभासद आणि सर्वपक्षीय नेत्यांनी नानासाहेब नवले यांना पसंती देण्याचे काम केले आहे. मुळशी हवेली खेड मावळ शिरूर या पाच तालुक्यांमध्ये कार्यक्षेत्र असतानाही केवळ याच भूमिकेमुळे सर्वांनी आज तागायत संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या विचारांना पाठिंबा दिला त्याच पाठिंब्यावर कारखान्याने संलग्न सर्व प्रकल्प पूर्ण करून आज ‘पूर्णत्वाची कडी’ लावली असली तरी सुद्धा कारखान्याच्या माध्यमातून विभिन्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मावळ भागात गाजलेली मावळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यामुळे यंदा या सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक केले सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीचे एकत्र सदस्य असतानाही विकास मंच च्या नावाने जी बंडखोरी झाली त्यास संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची रसद कारणीभूत असल्याची चर्चा झाल्याने मावळ विधानसभाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी आक्रमक आणि आग्रही भूमिका घेत तोडीस तोड लढत होण्याची संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे याच भागाचे प्रतिनिधित्व करणारे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांची मात्र बिनविरोध करण्याची ‘मनीषा’आहे याची जाणीवपूर्व बैठकीमध्ये स्पष्टपणे दिसली.

‘संत तुकाराम’साठी सर्वपक्षीय योगदान

शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्याची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहकायनि आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कारखान्याच्या उभारणीसाठी नानासाहेब नवले, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी मंत्री अनंतराव थोपटे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार दिगंबर भेगडे, माजी आमदार दिलीप मोहिते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार विलास लांडे, माजी खासदार गिरीश बापट, माजी आमदार रूपलेखा ढोरे, आमदार शंकर मांडेकर, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार सुनील शेळके, माजी आमदार सुरेश गोरे या सर्व नेत्यांनी योगदान दिले असल्याचा उल्लेखही खासदार बारणे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांचे विविध प्रकल्पांच्या माध्यमातून कारखान्याच्या यशस्वी वाटचालीस सहकार्य झाले आहे.

नवनवीन प्रकल्पांमुळे कारखान्याची प्रगती

कारखान्याने वीजनिर्मिती आणि इथेनॉल प्रकल्पाची उभारणी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, खत, बी-बियाणे यांचा पुरवठा, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लागवडीसाठी प्रोत्साहन यासाठी नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने मोलाची भूमिका आहे. त्यामुळे यंदाची निवडणूकही सर्वपक्षीय सहमतीने आणि एकमताने पार पडावी, अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखाली व खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीस माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, माजी आमदार अशोक मोहोळ, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार बाबाजी काळे आदी उपस्थित होते. या बैठकीत कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकमताने निर्णय घेण्यावर भर देण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे यांनीही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे स्पष्ट केले.

‘उद्धव ठाकरेंनीच माझ्यासाठी निरोप पाठवला होता, नार्वेकर…’, चित्रा वाघ यांचा मोठा गौप्यस्फोट

0

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यामध्ये आरोप -प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, चित्रा वाघ या पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील आल्या होत्या असंही अंधारे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ? 

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आताचे आमदार मिलिंदजी नार्वेकर यांच्याकडे निरोप पाठवला होता. चित्राताई एकदा येऊ भेटा. तुमच्या सारख्या महिला आम्हाला आमच्या पक्षात पाहिजे, मी जाणं न जाणं हा नंतरचा भाग होता. पण त्यांच्या शब्दाला मान म्हणून मी नक्की गेले होते. मी नव्हते गेले तर त्यांनी मला बोलावलं होतं. आणि याचा खरेपण म्हणजे एकनाथ शिंदे साहेब पण होते. त्यांनी मला सांगितलं की एकनाथ शिंदे हे सर्व कोऑर्डिनेट करतील, त्यामुळे मिलिंदजी मला दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील घेऊन गेले. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं मला ठरवू द्या मी अजून विचार केलेला नाही. तेव्हा ते मला म्हणाले नाही-नाही तुम्ही आमच्या पक्षात याच. त्यावेळी तिथे आदित्य ठाकरे देखील होते, असा खुलासा यावेळी चित्रा वाघ यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यांची लायकी तीच आहे, आणि ज्याची जशी लायकी तो तशी वक्तव्य करतो, त्यांनी काल ज्या पद्धतीनं माझ्यावर ट्विट केलं. ते नेहमीच करतात. माझ्या कॅरेक्टरवर सतत बोलण्याचा प्रयत्न असतो. वेडं-वाकडं बोलण्याचा प्रयत्न असतो. आता विरोधी पक्षातले आधीचे सगळे बोलून -बोलून थकले. आता हे सुरू झाले आहेत. मला प्रश्न असा पडला आहे की हे आणखी किती वर्ष प्रश्न विचारणार. माझ्या कॅरेक्टरला धरून जे विचारलं जातं, जे बोललं जातं, ज्या पद्धतीने बोललं जातं. माझा एक प्रश्न आहे. तुम्ही काय समजता स्वत: ला. तुम्ही आहात कोण? तुमची लायकी काय असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला आहे.

लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झुडपात सापडला तरूणीचा मृतदेह, पोलीस चौकशीत समोर आली खळबळजनक घटना

0

पुण्यातून एक खळबलजनक माहिती समोर आली आहे. 18 मार्च 2025 पासून बेपत्ता असलेल्या एका तरूणीचा काल थेट मृतदेहच सापडला. सांगवीमधील रहिवासी मानसी प्रशांत गोविंदपूरकर (21) हिचा मृतदेह बुधवारी सकाळी लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी सापडला. नवग्रह मंदिराजवळ असलेल्या झाडीमध्ये हा मृतदेह पडलेला होता.

मानसी लोहगड किल्ल्यावर एकटीच गेली होती. तिथे पोहोचण्यासाठी तिने खाजगी टॅक्सी बुक केली होती. सकाळी 8:56 वाजता तिकीट कार्यालयाजवळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती कैद झाली होती. मात्र, ती परत येतानाची कोणतीही नोंद नव्हती. पिंपरी चिंचवड पोलिसांनी तपास सुरू केला आणि टॅक्सी चालकाचा शोध घेतला. टॅक्सी चालकाने मुलीला किल्ल्यावर सोडल्याची माहिती दिली. तसंच ती एकटी होती असही सांगितलं.

काल सकाळपासूनच मुलीचे नातेवाईक आणि पोलिस पथकं किल्ल्याभोवती शोध मोहीम राबवत होते. शिवदुर्ग बचाव पथकाचा फोन आल्यानंतर नवग्रह मंदिराजवळील झुडुपात मुलीचा मृतदेह आढळला. बचाव पथकानं मृतदेह बाहेर काढला, स्ट्रेचरमध्ये पॅक केला आणि तिच्या कुटुंबियांना आणि पोलिसांच्या ताब्यात दिला.

मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात होता की घातपात की तिने आत्महत्या केली, हे शोधण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र, मानसी तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीच तीचं अपेन्डीक्सचं ऑपरेशन झालं होतं. तसंच काही आजारपणांमुळे तिला एल.एल.बी मधील तिसऱ्या वर्षाची परीक्षाही देता आली नाही. यावरुच तिने आत्महत्या केल्याची माहिती आहे.

ठाकरेंची क्लिनचिट खरी मानून फडणवीसांनी राठोडांना मंत्री केलं असेल तर… अंधारेंचं चित्रा वाघ यांना रोखठोक उत्तर

0

पुणे : उद्धव ठाकरे यांनीच तत्कालिन मंत्री संजय राठोड यांना क्लिनचिट दिली, असा दावा करून भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना विधान परिषदेत घेरण्याचा प्रयत्न केला. हिम्मत असेल तर राठोड यांच्या क्लिनचिटवरून उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारा, असे आव्हानही चित्रा वाघ यांनी अनिल परब यांना दिले. चित्रा वाघ यांच्या ठाकरे आणि परब यांच्यावरील टीकेला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन संजय राठोड यांच्यावरील आरोप आणि तत्कालिन कारवाई तसेच ठाकरे यांची क्लिनचिट यावर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांना चांगलेच कोंडीत पकडले.

अंधारे म्हणाल्या, जर उद्धव ठाकरे यांच्या क्लिनचिटला प्रमाण मानून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोड यांना मंत्री केले असेल तर चित्रा वाघ यांचे नेते फडणवीस हे खरे असतील… आणि जर देवेंद्र फडणवीस खरे असतील तर याचा अर्थ असा आहे की चित्रा वाघ या भटक्या विमुक्त प्रवर्गातील एका नेत्याचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करीत होत्या. तसेच स्वत:च्या राजकीय कारकीर्दीसाठी भटक्या विमुक्त समाजातील पोरीच्या अब्रूचे मातेरे करीत होत्या.

आणि समजा जर उद्धव ठाकरे यांनी दिलेली क्लिनचिट चूक असेल तर चित्रा वाघ यांनी कसला लढा लढला? त्यांच्याविरोधात लढण्यासाठी लगेचच भाजपच्या सदस्यत्वासह राजीनामा देऊन आमदारकी तर तोंडावर फेकून मारायला पाहिजे होती. भाजपनेही संजय राठोड यांची केस पुन्हा एकदा चौकशीसाठी घेतली केली पाहिजे. ज्याअर्थी फडणवीसांनी त्यांना मंत्री केले, त्याअर्थी ती क्लिनचिट योग्य होती, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

अनिल परब यांनी मंत्री संजय राठोड यांच्या केसचे काय झाले? सत्ताधारी पक्षातील महिला आमदार आता का शांत आहेत? असा सवाल विचारल्याने चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या. मी माझा लढा लढले. हे करीत असताना माझ्या कुटुंबियांना अतोनात त्रास झाला, तरीही लढाई सोडली नाही. तुमच्याच नेत्याला (उद्धव ठाकरे) राठोड यांना क्लिनचिट का दिली, हे हिम्मत असेल तर त्यांना विचारा, असे आव्हान देत तुमच्यासारखे ५६ पायाला बांधून फिरते, अशा आक्रमक अंदाजात चित्रा वाघ यांनी अनिल परब यांना उत्तर दिले.