Home Blog Page 10

परित्राण पाठ म्हणजे जीवन जगण्याची पवित्र कला – प्रवचनकार सुगंध कदम

0

मुंबई दि. १४ (रामदास धो. गमरे) “मनुष्याला संकट, व्याधी, भय, दुःख यांसारख्या मानसिक आणि शारीरिक त्रासांपासून संरक्षण देणारा आणि त्याच्या जीवनात शांती, स्थैर्य व प्रज्ञेचा प्रकाश पसरवणारा पाठ म्हणजेच परित्राण पाठ होय. परित्राण पाठ पठण करताना आपण उंच जागी एक तांब्या ठेवतो त्याला पवित्र दोरा बांधतो आणि तो दोरा सर्व श्रद्धाळूंना हातात दिला जातो — यामागील गूढार्थ फारच सुंदर आहे; हा दोरा म्हणजेच समत्व आणि शुद्धतेचं प्रतीक आहे आपण सर्व निर्मळ, निष्कलंक आणि समान आहोत ही भावना त्या क्षणी घट्ट होते नंतर या दोऱ्याचे दोन्ही टोक एकत्र करून पाण्यात ठेवले जाते याचा गूढार्थ म्हणजे जन्म आणि मृत्यू हे निसर्गाचे अटळ नियम आहेत आणि त्याच्या दरम्यानचा हा जीवनप्रवास धम्माच्या प्रकाशातच योग्य अर्थाने पार करायचा आहे, या परित्राण पठणाच्या माध्यमातून धम्मदान, श्रद्धा आणि सद्भावना या मूल्यांचा प्रसार होतो. यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा ही केवळ संकट टाळणारी नसते तर अंतर्मनात एक प्रकारची शुद्धता, प्रज्ञा आणि करुणा जागृत करणारी असते म्हणून परित्राण पाठ हे केवळ संकटांपासून रक्षण करणारे पाठ नसून ते जीवन जगण्याची एक पवित्र कला आहे; शांतीच्या वाटेवर नेणारे आणि धम्माच्या मार्गावर टिकवून ठेवणारे एक सशक्त साधन आहे.” असे प्रतिपादन सुगंध कदम यांनी वर्षावास प्रवचन मालिकेचे प्रथम पुष्प गुंफताना केले.

बौद्धजन सहकारी संघ ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी गाव व मुंबई शाखा संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे, सदर प्रवचन मालिकेचे प्रारंभ तथा प्रथम पुष्प अध्यक्ष सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. १३ जुलै २०२५ रोजी बीडीडी चाळ ३ व ४ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, नायगाव, मुंबई – १४ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले, सदर प्रसंगी संघाचे सरचिटणीस संदेश गमरे व संस्कार समितीचे सचिव सचिन मोहिते यांनी आपल्या धीरगंभीर, पहाडी व प्रभावी आवाजात लाघवी भाषाशैलीत सूत्रसंचालन केले. तसेच अध्यक्ष संदीप गमरे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले तद्नंतर कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन, ध्येय, उद्दिष्टे आणि उद्देश स्पष्ट करीत प्रस्ताविक सादर केले त्यावेळी संघाच्या पुढील वाटचाली संदर्भात सुचोवात करीत उपस्थितांना वर्षावासाच्या शुभेच्छा दिल्या.

सदर प्रसंगी प्रमुख विश्वस्त सिद्धार्थ पवार, विश्वस्त दीपक जाधव, विश्वस्त पांडुरंग गमरे, माजी मुख्य विश्वस्त संजय पवार, माजी विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, कार्याध्यक्ष दीपक मोहिते, उपकार्याध्यक्ष अशोक कदम, सरचिटणीस संदेश गमरे, कोषाध्यक्ष प्रदीप कदम, सचिव संदेश जाधव, सुभाष मोहिते आदी मान्यवरांनी शुभेच्छापर विचार मांडले. विभाग अध्यक्ष संतोष पवार, किशोर जाधव, सचिन गमरे, संतोष कदम, संजीवनी यादव, धम्मवर्तन तांबे, संजय पवार, सर्व समितींचे प्रमुख, शाखांचे कार्यकर्ते सदर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात सुरेश पवार यांनी कोरोना काळापासून तालुका संघाच्या सुरू असलेल्या वर्षावास प्रवचन मालिकेच्या संदर्भातील आढावा मांडत यापुढे ही सर्वांनी एकमताने, एकदिलाने असे उपक्रम राबविले पाहिजे, मुंबईत सुरू झालेली नांदी गावी घराघरात पोहोचली पाहिजे असे मत नोंदवले. माजी विश्वस्त संजय पवार, कार्याध्यक्ष दीपक मोहिते, ऑडीटर शैलेंद्र पवार, सरचिटणीस संदेश गमरे यांनी गेल्या ७५ वर्षात शक्य न झालेली बाब म्हणजे आर्थिक बाजू मजबूत करणे तीही आता पतसंस्थेच्या माध्यमातून आता मूर्तरुपात साकार झाली असून पतसंस्थेच्या रूपात लावलेल्या लहान रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी गाव व मुंबईच्या सर्व शाखा, पदाधिकारी, सभासद यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे तसेच प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी बौद्धजन सहकारी संघ पवारसाक्री शाखा क्र. २० च्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करून सरचिटणीस संदेश गमरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

महाराष्ट्र एनजीओ समितीच्या मुंबई उपनगर जिल्हाध्यक्ष पदी विनोद हिवाळे यांची नियुक्ती

0

मुंबई दि. १८ (अधिराज्य) महाराष्ट्रातील तमाम स्वयंसेवी संस्थांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणारी “महाराष्ट्र एनजीओ समिती” म्हणजे महाराष्ट्रातील विविध सामाजिक क्षेत्रातील व अक्षरशः मोडकळीस आलेल्या सामाजिक संस्थाची आधारवड संस्था; राज्यातील मोडकळीस आलेल्या व कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या स्वयंसेवी संस्थाना मार्गदर्शन करणे, प्रशिक्षण देणे, ऑनलाइन कार्यप्रणालीची, आवश्यक सर्टिफिकेटची माहिती देणे, त्यांना सक्षम करणे अशी अनेक कामे महाराष्ट्र एनजीओ समितीच्या वतीने करण्यात येतात.

संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे हे संकल्प संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षे मुंबईतील चेंबूर, गोवंडी, शिवाजी नगर आणि मानखुर्द यांसारख्या विभागात वस्ती विकास प्रकल्प, शैक्षणिक, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि वस्ती संघटन यांसारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या याच कार्याची नोंद घेत महाराष्ट्र एनजीओ समितीच्या मुंबई उपनगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे, सदर प्रसंगी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. युवराज येडूरे, उपाध्यक्षा डॉ. सुनिताताई मोडक, संचित यादव, मंगेश सावंत, अश्विनी कसबे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विनोद हिवाळे यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

ठाकरे बंधूंनाही भाजपाचे सडेतोड कडक उत्तर; ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेलाही आवडत नाही म्हणून…..

0

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मीरा-भाईंदर भागात ‘आमची रस्त्यावर सत्ता’ अशी भीमगर्जना करून केंद्र सरकार व राज्य सरकारला भेट अहवाल दिल्यानंतर ठाकरे ब्रँड जिवंत असला तरी तो बाजारात चालत नाही. बाजारात अनेक ब्रँड असतात, प्रत्येक ब्रँड बाजारात चालतो असे नाही. सध्या हा ब्रँड बाजारात जनतेस पसंत नाही. मतदारांना आवडत नाही अशा शब्दात भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे बंधू राज आणि उद्धव यांच्यावर निशाणा साधला.

 उद्धव ठाकरे स्वत:ला सामान्य समजत असतील, कारण ते चिंताग्रस्त झालेत बाकी सर्वसामान्य जनता जे मतदार आहेत ते आमच्यासोबत आहे. मतदानातून ईव्हीएम बटण दाबून त्यांनी त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे. राजकारणाचा स्तर इतका खाली गेलाय की जादूटोणा वैगेरे भाषा केली जाते. जादूटोणा करून इतक्या जागा मिळाल्या असत्या तर आपल्या देशातील गरिबी हटवता आली असती, देशातला जातीयवाद हटवता आला असता. जादूटोणा जगात नाही. जादूटोणा असता तर आपल्याला गुलामगिरीत राहावे लागले नसते. ती कपोलकल्पित कथा आहे असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

तसेच मराठीचा मुद्दा घेऊन सरकारवर आक्रमक होण्याची आवश्यकता नाही. याच सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला काँग्रेसने दिला नाही. १९५६ मध्ये कर्नाटक सीमेत मराठी भाषिकांना बळजबरीने घालण्याचं काम काँग्रेसने केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांना समजवण्याचा प्रयत्न झाला. कारवार, निपाणी कर्नाटकला देऊ नका मात्र नेहरूंनी ऐकले नाही. कन्नड भाषिक आपल्या मराठी भाषिकांवर तिथली भाषा संपवावी म्हणून प्रयत्न करतायेत. उदय सामंत मराठी भाषा विभागाचे मंत्री आहेत तिथे भाषेच्या संवर्धनासाठी जेवढा निधी लागेल तेवढा महाराष्ट्र सरकार देईल असं त्यांनी सांगितले. त्याचा अर्थ मराठी भाषा, मराठी भाषिक यांच्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. राज ठाकरे यांच्या सूचनांचे स्वागत आहे. या राज्यात कुणीही असो त्याने हृदयात मराठीचे प्रेम ठेवूनच पुढे जायचे आहे असं मुनगंटीवारांनी राज यांच्यावर भाष्य केले.

दरम्यान, महाराष्ट्रात मराठी सक्तीची आहेच. शिक्षण समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सूत्रीवर निर्णय होईल. राज ठाकरे यांनी काय भाषा वापरायची हा त्यांच्या पक्षाच्या संस्काराचा भाग आहे. जसे संस्कार तसे उच्चार असतात असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांना लगावला.

पुरंदर विमानतळ भूसंपादन ‘एरोसिटी’त ‘प्रथम येणार प्रथम प्राधान्य’ भूखंड; संमतिपत्र पुढील आठवड्यात स्वीकारणार

0

पुरंदर विमानतळाच्या प्रस्तावित भूसंपादनास संमती देणाऱ्यांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ हे तत्त्व वापरून ‘एरोसिटी’त भूखंड वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी विमानतळाच्या परिसरात सुमारे सातशे एकर जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात संमतिपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत पॅकेज निश्‍चित करण्यात आले. त्यासाठी ‘एमआयडीसी’चा २०१९ चा कायदा लागू करून भूसंपादनाचा निर्णय घेतला. या कायद्यानुसार संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना १० टक्के जमिनीचा परतावा अर्थात विकसित भूखंड आणि चार पट मोबदला मिळणार आहे. संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीच्या किमतीच्या चार पट मोबदला मिळणार आहे.

जमिनीचा परतावा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नोटीस काढण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच पुरंदर प्रांताधिकाऱ्यांचे सासवड येथील कार्यालयात संमती स्वीकारण्याची सोय करण्यात येणार आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वानुसार संमती स्वीकारली जाणार असून त्यानुसार भूखंडाचेही वाटप केले जाणार आहे. त्यामुळे प्रथम संमती देणाऱ्याला मोक्याचा भूखंड मिळणार आहे. कोअर विमानतळ सोडता विमानतळाच्या परिसरात एरोसिटीची स्थापना करून त्यात विकसित केलेला भूखंड देण्यात येणार आहे.

विमानतळासाठी सुमारे दोन हजार ६७३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी १० टक्के जमीन वाटपासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींपैकी २६७ हेक्टर अर्थात ६६७.५ एकर राखीव ठेवण्यात येणार आहे.

८२ टक्के शेतकऱ्यांचा पाठिंबा

जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटिसा दिल्या होत्या. त्यावर दोन हजार १६३ शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या होत्या. या हरकतींवर सुमारे महिनाभर सुनावणी सुरू होत्या. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार सात गावांमध्ये एकूण तीन हजार २६६ गट आहेत. त्यात १३ हजार ३०० खातेदार आहेत. त्यातील दोन हजार ४५१ खातेदारांनीच एकूण दोन हजार १६३ हरकती नोंदविल्या होत्या, तर तब्बल १० हजार ८४९ खातेदारांनी हरकतच घेतली नव्हती. यावरून ८२ टक्के शेतकऱ्यांचा भूसंपादनाला पाठिंबा असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

NCP कडून मंत्र्यासह आमदाराला राजीनामा द्या चे आदेश; दोघांनी दाखवली ‘केराची टोपली’ निर्णय अध्यक्षावर सोडला

0

राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या दोन आमदारांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी कारवाई केलीय. प्रफुल्ल पटेल यांनी यासंदर्भात दोन्हीही आमदारांना पत्र पाठवलं असून एक आमदार मंत्रीसुद्धा आहे. राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या दोन्ही आमदारांना प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा देण्यास सांगितलंय. पण त्याला नकार देत हे दोन्हीही आमदार आमचे नेते फक्त शरद पवार असल्याचं म्हणतायत.

दोन्ही आमदार केरळचे असून ए.के. ससींद्रन आणि थॉमस के थॉमस अशी त्यांची नावं आहेत. सध्या ते शरद पवार गटात असले तरी २०२१ मध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक जिंकलेत. केरळचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष असणारे थॉमस के थॉमस आणि ए. के. ससींद्रन हे एलडीएफसोबत सत्तेत आहेत. हे दोन्ही आमदार पक्षविरोधी कारवाया करत असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी पत्रात म्हटलंय.

प्रफुल्ल पटेल यांनी थॉमस के थॉमस यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केलंय. तर एक आठवड्यात पदाचा राजीनामा देण्यास सांगितलंय. जर राजीनामा दिला नाही तर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम आणि पक्षांतर विरोधी कायद्याच्या तरतुदी आधारे अपात्र करण्याच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा स्पष्ट इशारासुद्धा पत्रातून देण्यात आलाय. प्रफुल्ल पटेल यांनी दोन आठवड्यापूर्वीच यासंदर्भात पत्र लिहून दोन्ही आमदारांना कळवलं होतं.

केरळचे वनमंत्री असणाऱ्या ए.के ससींद्रन यांनाही असंच पत्र प्रफुल्ल पटेल यांनी पाठवलंय. यानंतर थॉमस यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेसचं केरळ युनिट हे शरद पवारांना नेता मानतं. तेच आमचे नेते आहेत आणि त्यांना नेते मानूनच आम्ही काम करतोय. त्यामुळे या पत्राकडं आम्ही दुर्लक्ष करतोय. आमचा प्रफुल्ल पटेल यांच्या पक्षाशी संबंध नाही.

पक्षांतर विरोधी कायद्यानुसार कारवाईच्या इशाऱ्याबाबत थॉमस यांनी सांगितलं की, आता याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा. केरळ युनिट प्रफुल्ल पटेल यांनी पाठवलेल्या पत्राचा विचार करणार नाही. आम्ही पक्षाच्या घटनेनुसार काम करतोय आणि करत राहू.

महापालिकेच्या ताफ्यात अत्याधुनिक रोड स्विपिंग मशिन; आयुक्तांच्या उपस्थितीत लोकार्पण

0

पुणे : शहर स्वच्छतेसाठे महापालिकेच्या ताफ्यात चार अत्याधुनिक रोड स्विपिंग मशीन दाखल झाल्या आहेत. या व्हॅक्युम ऑपरेटेड रोड स्वीपर मशिन असून केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्या तयार करण्यात आलेल्या आहेत. या मशिन मध्ये एकाच वेळी माध्यमातून रस्त्यां सोबतच फुटपाथ, सायकल मार्ग, कचरा कुंड्या, दुभाजक तसेच स्ट्रीट फर्निचर स्वच्छ करण्य़ाची सुविधा आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या मशिनचे लोकार्पण करण्यात आले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, ओमप्रकाश दिवटे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्यासह घनकचरा विभागाचे SI , DSI and Engineers, ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटचे दिप सिंग उपस्थित होते. महापालिकेकडून १२ रोड स्विपिंग मशिनच्या माध्यमातून शहर स्वच्छता केली जाणार आहे. त्यातील ४ मशिनच्या कामाला शुक्रवारी रात्री पासून सुरूवात करण्यात आली.

महानगरपालिकेने शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता स्वच्छतेसाठी यांत्रिकीकरण रोड स्वीपिंगचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन गावे समाविष्ट झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ सुमारे ५१६ चौ. किमी. झाले असून लोकसंख्या अंदाजे ७० ते ८० लाख इतकी झाली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, १८ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांसाठी रोड स्वीपर वापरणे आवश्यक आहे, ज्यामुळे पीएम २.५ आणि पीएमे १० या धोकादायक सूक्ष्मधूलीकणांचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे. या कामासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून झोन क्र. १ ते ४ मधील रस्त्यांसाठी ७ वर्षांच्या कालावधीसाठी झोननिहाय चार निविदा मागवण्यात आल्या आहेत. या रस्त्यांची साफसफाई भाडेतत्त्वावरील मेकॅनिकल रोड स्वीपर मशीनद्वारे केली जाणार आहे.

असे होणार काम
या व्हॅक्यूम ऑपरेटेड रोड स्वीपर मशीन असणार आहेत. प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी १० किमी लांबीचे तीन रूट निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये रस्ता दुभाजकाच्या दोन्ही बाजूने तसेच दोन्ही फुटपाथच्या बाजूने मशीन फिरून एकूण ४० किमी साफसफाई करेल. निविदेमध्ये पादचारी पथांची (फुटपाथ) साफसफाई करण्याकरिता अत्याधुनिक पेवमेंट स्वीपर आणि लीफ ब्लोअरचा वापर समाविष्ट आहे. प्रत्येक रूटवर एक मेकॅनिकल रोड स्वीपर मशीन, ११ कामगार, २ पेवमेंट स्वीपर, २ लीफ ब्लोअर, १ ग्रास कटर मशीन, जेटिंग मशीन आणि १ छोटा हत्ती (सीएनजी टिपपर) तैनात करण्यात येणार आहे. जमा झालेली धूळ आणि माती डंपिंग स्टेशनपर्यंत नेण्याची जबाबदारी ठेकेदाराची असणार आहे. तसेच, झोनमधील स्ट्रीट फर्निचर इत्यादी धुवून स्वच्छ करण्यासाठी हाय प्रेशर वॉशर मशीनचा वापर केला जाणार आहे. ही स्वच्छता प्रक्रिया रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत केली जाईल. यामध्ये फुटपाथ, सायकल मार्ग, कचरा कुंड्या, दुभाजक ग्रिल्स आणि स्ट्रीट फर्निचरची साफसफाई समाविष्ट आहे. यात ४० किमी रोडची दररोज सखोल स्वच्छता केली जाईल. तर मोठया रस्त्यावर दोन्ही बाजूस चार वेळा ही मशिन स्वच्छता करेल.

अशी आहे मशिन
मेकॅनिकल स्वीपिंग मशीनमध्ये ६.५ क्युबिक मीटर क्षमतेचा कचरा हॉपर, ३००० लिटर पाण्याची टाकी असलेला रोड स्वीपर आहे. वॉशर आणि स्प्रिंकलर धूळ कमी करण्यासाठी आणि स्वच्छता वाढवण्यासाठी मॅन्युअल स्वच्छतेच्या एक तास आधी काम करतील.या उपक्रमामुळे पुणे शहरातील रस्त्यांची स्वच्छता अधिक प्रभावीपणे केली जाणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. केंंद्रीय सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार धूळ उडवणाऱ्या पद्धतींपेक्षा धूळ शोषून घेणाऱ्या प्रणाली अधिक प्रभावी ठरतात. धूळ कमी करण्यासाठी वॉटर स्प्रिंकलिंग आणि जेटिंग: यंत्रांचा वापर केल्याने माती व धूळ हवेत उडण्याऐवजी जमिनीवरच दाबली जाते.

टाकाऊतून टिकाऊ व शोभेच्या वस्तू तयार करणे कार्यशाळा; कोथरूड क्षेत्रिय कार्यालयाचा अभिनव उपक्रम!

0

कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन, व हर्षदिप फाउंडेशन संयुक्त विद्यमाने “स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२५ व सफाई अपनाओ बिमारी भगाओ” या जनजागृती उपक्रमाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण आरोग्य कोठी, आण्णा साहेब पाटील शाळा आरोग्य कोठी अंतर्गत महेश विद्यालय व सरस्वती शाळा व वस्ती पातळीवरील लक्ष्मीनगर वसाहत, कोथरूड गावठाण या ठिकाणी “टाकाऊतून टिकाऊ व शोभेच्या वस्तू तयार करणे कार्यशाळेचे आयोजन करणे” शिवाय “हात कसे स्वच्छ धुवायचे, कचरा वर्गीकरण करणे, परिसर स्वच्छ करणे, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सदर कार्यक्रम घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त मा. संदीप कदम, महापालिका सहाय्यक आयुक्त मा. विजय नायकल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मा. राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यशाळेचे आयोजन करून जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

महेश विद्यालय मधील २२५ विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी 5 मुलांचा गट करून कार्यशाळेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन कचऱ्यात टाकल्या जाणाऱ्या वस्तूपासून टिकाऊ व शोभेच्या अनेक वस्तू तयार करून घेण्यात आल्या. सदर कार्यशाळेत प्रशिक्षक हर्षदिप फाऊंडेशनच्या संस्थापिका ज्योती बेंडाळे व रागिणी सोमण यांनी कार्यशाळेत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले. स्वच्छ सर्वेक्षण मध्ये शाळा, महाविद्यालय तसेच सोसायटी व वस्तीपातळीवर प्रत्यक्ष नागरिक, महिलाना स्वच्छतेविषयी व महिला सक्षमीकरणाचे वर्ग नियमितपणे घेतात. महानगरपालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतेच्या उपक्रमात विशेष योगदान दिल्यामुळे महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या हस्ते ज्योती बेंडाळे,रागिनी सोमण तसेच महेश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जान्हवी अजोतीकर यांचा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या व कचरा वर्गीकरणाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना धडे दिले. मुकादम वैजिनाथ गायकवाड यांनी मुलांना हात स्वच्छ धुवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

आरोग्य निरिक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, दत्ता दळवी, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे,अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी, रोटरी क्लब ऑफ सहवासचे मा.उपप्रांतपाल मा. किरण इंगळे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे सल्ला दिला. सफाई अपनाओ बीमारी भगाओ या कार्यक्रमात महेश विद्यालयाचे शिक्षक श्री पवार सर व तसेच सरस्वती विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कोल्हे सर व कैलास सरतापे, शिक्षक वृंद तसेच लक्ष्मी नगर भागातील ज्येष्ठ नागरिक व महिला यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवाय सदर कार्यक्रमांमध्ये आरोग्य निरिक्षक गणेश साठे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, गणेश चोंधे, हनुमंत चाकणकर, दत्तात्रय दळवी राजेश आहेर, जया सांगडे, संतोष ताटकर, प्रमोद चव्हाण सेवक परेश कुचेकर, दत्ता जाधव, प्रविण कांबळे, कुणाल जाधव नागरिक सहभागी होते. स्वच्छ समन्वयक सोहम खिलारे, मंदार जाधव, युवराज चाबुकस्वार उपस्थित होते.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन वैजीनाथ गायकवाड समारोप आण्णा ढावरे यांनी राष्ट्रगीतांनी केला.

कर्वेनगर राजाराम पूल ते दुधाने लॉन्स हा १०० फुटी रस्ता लवकरच पूर्ण; जागा मालकांशी सकारात्मक बैठक माजी नगरसेवकही हजर

0

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रामबाण मार्ग ठरणारा राजाराम पूल ते दुधाने लॉन्स हा १०० फुटी डीपी रोडच्या ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे प्रलंबित काम पूर्णत्वास नेण्यासाठी आज आपल्या पुणे मनपाच्या पथ विभागाचे मुख्य अधिकारी श्री. अनिरुद्ध पावसकर यांच्यासमवेत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. शिवणे ते खराडी कर्वेनगर हद्दीमधील दरम्यान आपल्या प्रभागातील २ किमी रस्त्यामध्ये बाधित आणि मिसिंग लिंक जोडण्यामध्ये ज्यांच्या जमिनी बाधित होत आहेत, त्या शेतकरी बांधवांच्या सोबत सकारात्मक बैठक पार पडली.

पुणे महानगरपालिकेच्या विकासाकडे मध्ये 1986 पासून या रस्त्याची आखणी करण्यात आली होती परंतु सन २०११ पर्यंत हा रस्ता जागेवर अस्तित्वात नव्हता. २०१२ साली प्रथमतः नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सौ. लक्ष्मी दुधाने यांनी शेतकरी वर्गाला विश्वासात घेऊन २ किमी रस्त्यापैकी सव्वा ते दीड किमी रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले होते; परंतु गेल्या 3 वर्षांपासून प्रशासनाकडून या रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. प्रशासनाने बाधित शेतकरी वर्गाशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात आणि त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. याबाबत लोकप्रतिनिधी या नात्याने प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांना सहकार्य करण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करत सरकारी मोजणी, झोनिंग, योग्य मोबदला, बाधित जमिनीच्या मोबदल्याचे प्रलंबित प्रस्तावाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. कामांमध्ये दिरंगाई झाल्यास पुढील कामही लवकर न होण्याचा धोका संभवतो, असे स्वप्निल लक्ष्मी देवराम दुधाने अध्यक्ष – कोथरूड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष यांनी सांगत नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निवारण करण्याची प्रक्रिया करून रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी विनंती केली.

यावेळी रस्ताबाधित शेतकरी बांधव – जमीन मालक श्री. विनोद बराटे, श्री. आदित्य बराटे, मांडेकर कुटुंबीय, श्री. दिलीपराव बराटे व कुटुंबीय, श्री. हेमराज चौधरी, श्री. विश्वनाथ बगाटे, श्री जावळकर कुटुंबीय प्रभागातील सहकारी माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, दत्तात्रय चौधरी तसेच अन्य नागरिकांना आवश्यकता ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द अधिकारी वर्गाकडून देण्यात आला आहे.

28 वर्षीय तरुण ‘सेक्सटॉर्शन’चा बळी 2.5 लाख उकळले व्हिडिओ कॉल अन् अश्लील चाळ्यांचे स्क्रीनशॉट मारले

0

खराडी परिसरातील एक 28 वर्षीय तरुण ‘सेक्सटॉर्शन’ला बळी पडल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणाशी ऑनलाइन मैत्री करून त्याची नग्न छायाचित्रे व मॉर्फ व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करून या तरुणाकडून अडीच लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील खराडी भागातील थिटेनगर परिसरात राहणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाने या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यावरून सायबर चोरट्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. ‘सोनम गुप्ता’ नावाच्या तरुणीने व्हॉट्स अॅपद्वारे तरुणाशी आधी संभाषण व हळूहळू व्हिडिओ कॉलिंग सुरू केले.

व्हिडिओ कॉलवर अश्लील चाळे

तिने व्हिडिओ कॉलवरून अश्लील चाळे करून ‘स्क्रीनशॉट’ घेतले. त्यानंतर ते फोटो व व्हिडिओ मॉर्फ करून समाजमाध्यमात व्हायरल करण्याची धमकी दिली. भीतीपोटी तक्रारदार तरुणाने आरोपीच्या सांगण्यानुसार वेळोवेळी पैसे पाठवले.

सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा

सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या व्हिडिओ कॉलला उत्तर देऊ नका. फोन किंवा समाजमाध्यमातून धमकी मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

डिजिटल अरेस्टची धमकी देत उकळले २४ लाख

डिजिटल हाउस अरेस्टची धमकी देत सायबर ठकबाजांनी मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी विजय पाठक यांना 24 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी मनोज शर्मा नावाच्या ठकबाजाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दोन जुलै रोजी ठकबाजाने पाठक यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘मी दिल्लीतील दूरसंचार विभागाचा अधिकारी आहे. तुमच्या आधार कार्डावर कॅनरा बँकेत खाते उघडण्यात येऊन पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्याबदल्यात तुम्हाला सहा कोटी रुपये मिळाले. मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात या घोटाळ्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. तुम्हाला अटक करण्यात येणार आहे, अशी भीती त्यांना दाखवण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी सायबर गुन्हेगाराने त्यांच्याकडून एकूण 23 लाख 71 हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाठकांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली.

चक्क MBBS डॉक्टरच निघाला ड्रग तस्कर; पुण्यात १५ लाखांचा एमडी जप्त, तिघांना अटक

0

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील एका नामांकित रुग्णालयात काही महिन्यांपूर्वीपर्यंत नोकरी करणारा एमबीबीएस डॉक्टर अमली पदार्थ तस्कर (ड्रग) निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने संबंधित डॉक्टरसह तिघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे १५ लाख रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला. ही कारवाई बिबवेवाडीतील निमंत्रण हॉटेलसमोर करण्यात आली.

महंमंद ऊर्फ आयान जारून शेख (वय २७, रा. उंड्री) असे डॉक्टरचे नाव आहे. त्याच्यासह सॅम्युअल बाळासाहेब प्रताप (वय २८, रा. हिंगणे खुर्द), अनिकेत विठ्ठल कुडले (वय २७, रा. नारायण पेठ) या दोघांना अटक केली आहे. या तिघांविरोधात बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, दयानंद तेलंगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमद शेख हा मूळचा जम्मूचा असून, त्याने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील एका नामांकित रुग्णालयात तो वैद्यकीय प्रॅक्टिस करत होता. यापूर्वी त्याला ड्रग प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर डॉक्टर पदावरून निलंबित करण्यात आले. तरीही त्याने तस्करी थांबवली नाही. आता दुसऱ्यांदा ड्रग्ज तस्करीप्रकरणी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. महंमद शेख याच्यासह कुडले यालाही बंडगार्डन भागात ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती. हे लोक ओळखीतील लोकांना एमडी पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. या तिघांनी ‘एमडी’ कोठून आणले, याचा शोध घेतला जात आहे.

कारमधून केली ड्रग विक्री

पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती, की बिबवेवाडी येथील निमंत्रण हॉटेलसमोरील रस्त्यावर तीन जण एका कारमध्ये संशयास्पदपणे थांबले असून, ते ड्रग्ज विक्री करत आहेत. त्या आधारे पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. या वेळी शेखकडून पाच लाख रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले, तर सॅम्युअल प्रतापकडून सहा लाख ३८ हजार रुपये किमतीचा आणि कुडले याच्याकडून सव्वा तीन लाख रुपये किमतीचे ‘एमडी’ जप्त केला. यासह गुन्ह्यात वापरलेली कार, मोबाइलही पोलिसांनी ताब्यात घेतले.