राज्यात दुष्काळ दाहकता! या जिल्ह्यात पशुधन विकण्याची वेळ सरकारने व्यवस्था करावी हिरव्या चाऱ्याचे भाव गगनाला भिडले

0
5

एका बाजूला पावसामुळे शेतातील पिके करपून गेली असताना दुग्ध व्यवसाय हाच शेतकऱ्याचा जगण्याचे साधन असताना आता पाऊसच नसल्याने चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याचे चित्र दिसत आहे. सध्या सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाची भीषण दाहकता भेडसावू लागली असून जनावरांच्या चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने बळीराजा अडचणीत आला आहे.  ज्या ठिकाणी थोडेफार पाणी आहे, अशा ठिकाणी शेतकऱ्यांकडून मक्याचे पीक घेण्यात येत असून हे मकवान आता सहा हजार रुपये टन अशा दराने विकले जाऊ लागले आहे. सध्याच्या परिस्थितीत हाही चारा थोडासा असल्याने याचे भाव अजूनही वाढत जाणार आहेत. सध्या पंढरपूरमधून सांगोला, मंगळवेढा, माढा, करमाळा अशा ठिकाणी हा चारा चढ्या भावाने विकला जात असून आता जनावरे सांभाळणे मुश्किल बनल्याची खंत पशुपालकांकडून व्यक्त होत आहे.

अधिक वाचा  राज्यात ८१०० रिक्त जागांसाठी पोलिसांची भरती, महाराष्ट्र पोलिस दलात नोकरी मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न होणार पूर्ण

सरकारने तातडीने लक्ष घालून चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी

दरम्यान, उसाच्या चाऱ्याचे भावही पाच हजार रुपयेपर्यंत गेल्याने आता कारखान्याला ऊस घालून टप्प्याटप्प्याने पैसे घेण्यापेक्षा ऊस उत्पादक थेट चाऱ्यासाठी ऊस तोडू लागला आहे. सध्या आलेल्या चारा आणि मकवानाची विक्री होत असल्याने अनेक जणांना चाऱ्या अभावी हात हलवत परत जावे लागत आहे. अशा परिस्थितीत सरकारने तातडीने लक्ष घालून चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न केल्यास पशुधन जगवणे अवघड बनणार असल्याचे मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ही टँकर मागवावं लागत असल्याचे सांगत सरकार कधी जागे होणार? असा सवाल शेतकरी करीत आहे.

जवळपास तब्बल दोन महिने पावसाने दडी मारल्याने सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवली असून सप्टेंबर महिन्यातच ही अवस्था असल्याने पुढील वर्ष कसे जायचे हा मोठा प्रश्न पशुपालकांसमोर आहे. त्यामुळे बळीराजा दुबार संकटात सापडला असून सरकारच्या मदतीकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे यांचे उपोषण मागे “हा शेवटचा विश्वास…” फडणवीस सरकारला ९० दिवसांचा ‘अल्टीमेटम’:  मनोज जरांगे पाटील

सीमावर्ति भागात तातडीने कृत्रिम पावसाचे प्रयोग करा; कृषी भूषण अंकुश पडवळे यांची मागणी

यावर्षीचा दुष्काळ हा 1972 मध्ये पडलेल्या दुष्काळापेक्षाही खूप मोठा असून सप्टेंबर महिन्यातच ही परिस्थिती आल्याने पुढील वर्ष कसे जायचे हा भीषण प्रश्न सध्या सोलापूर जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये दिसून येत आहे. आता शेजारच्या कर्नाटक राज्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू केल्याने मंगळवेढ्याप्रमाणे सीमा वरती भागात तातडीने हा प्रयोग सुरू करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत. थोड्याफार प्रमाणात परतीच्या पावसाचे ढग येतात मात्र वाऱ्याने ते निघून जात असल्याने तातडीने कृत्रिम पावसाचा प्रयोग झाल्यास याचा फायदा किमान जनावरांचा चारा आणि थोडाफार पिण्याच्या पाण्यासाठी होईल, अशी मागणी कृषी भूषण अंकुश पडवळे यांनी केली आहे.

अधिक वाचा  केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यालाच दुचाकीवरुन कट मारला, मध्यरात्री 32 वर्षीय तरुणाच्या पोलिस घरात धडकले; नेमकं काय घडलं?

वास्तविक सध्या मंगळवेढ्यातील बहुतांश पिके जळून गेली असून जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न सध्या बळीराजा पुढे उभा आहे. यासाठी मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे कृत्रिम पावसाची मागणी केली आहे. सध्या कर्नाटक राज्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू असून या भागातील ढगही वाऱ्याने तिकडे जातात आणि याचा कोणताच फायदा सीमावर्ति भागात होत नसल्याचे सोलापूर जिल्ह्यातही तातडीने कृत्रिम पावसाचे प्रयोग राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.