मागच्या दोन आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. आज (ता. १८) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सोलापूर, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता आहे.
मॉन्सूनच्या परतीसाठी राजस्थानसह उत्तर भारतातील हवामान पोषक होत असताना राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर येथे ३७ अंश, तर अमरावती, अकोला आणि जेऊर येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, तसेच नंदूरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा, सोलापूर, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड येथेही हलक्या पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळपर्यंत रत्नागिरी येथे ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उत्तर अंदमान समुद्रात शनिवारपर्यंत (ता. १९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या प्रणालीचा प्रवास ओडिशा-आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे होण्याचे संकेत आहेत.











