आजपासून गणेशोत्सवाच्या चैतन्यमयी सोहळ्याला सुरुवात होत आहे. यंदाचा गणेशोत्सव १२ दिवसांचा असून, सोमवारी दुपारी १ वाजून ५१ मिनिटांपर्यंत गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी मुहूर्त आहे, अशी माहिती दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. गणेश चतुर्थीच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४.५० वाजेपासून ते दुपारी १.५१ वाजेपर्यंत घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना मध्याह्नानंतरदेखील करता येऊ शकते. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याचदिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे, असे नाही. तर दुकानातून गणपतीची मूर्ती आठ-दहा दिवस आधीसुद्धा आणून घरामध्ये ठेवता येते.
यंदा हरितालिका तृतीया आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी आहे. सोमवारी सूर्योदयकाली तृतीया व मध्याह्नी चतुर्थी असल्याने ही दोन्हीही व्रते एकाच दिवशी आली आहेत. सोमवारी सकाळी ७.०७ वाजेपर्यंतच, म्हणजे तृतीया समाप्तीपर्यंतच हरितालिका पूजन करावे किंवा त्यानंतरच गणेशपूजन करावे असे नसून, तृतीया समाप्तीपूर्वी अथवा समाप्ती झाल्यानंतरही हरितालिका पूजन करता येईल. तसेच, ७.०७ वाजेपूर्वीदेखील गणेश चतुर्थीनिमित्त पार्थिव गणेश पूजन करता येईल, असे दाते यांनी स्पष्ट केले.
गौरी पूजन १८ सप्टेंबरला
१७ सप्टेंबरला अनुराधा नक्षत्रावर सायंकाळी ७ वाजून ५४ मिनिटांपर्यंत कधीही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र मध्याह्नी असलेल्या दिवशी पूजन करावे, असे असल्याने १८ सप्टेंबरला नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे. मूळ नक्षत्रावर विसर्जन करायचे असल्याने १९ सप्टेंबरला दिवसभरात कधीही गौरी विसर्जन करता येईल.
गणेशोत्सवातील महत्त्वाचे दिवस
- १४ सप्टेंबर, सोमवार : श्रीगणेश चतुर्थी
- १७ सप्टेंबर, गुरुवार : गौरी आवाहन
- १८ सप्टेंबर, शुक्रवार : गौरी पूजन
- १९ सप्टेंबर, शनिवार : गौरी विसर्जन
- २५ सप्टेंबर, शुक्रवार : अनंत चतुर्दशी
हरितालिका उपवास सोडण्याची वेळ
हरितालिकेचा उपवास दिवसभर असतो. हा उपवास दुसऱ्या दिवशी, म्हणजे मंगळवारी (ता. १५) सोडावा. तसेच, ज्यांना ऋषीपंचमीचादेखील उपवास आहे, त्यांनी मंगळवारी (ता. १५) सकाळी हरितालिकेची उत्तरपूजा करून त्यांचे विसर्जन करावे. त्यानंतर भाताच्या एका घासाचा वास घेऊन हरितालिकेचा उपवास सोडावा आणि मंगळवारी ऋषीपंचमीचा उपवास नेहमीप्रमाणे करावा, असे दाते यांनी सांगितले.











