स्वातंत्र्य शताब्दी २०४७च्या विकसित भारताचा पाया मागील १२ वर्षांतच रचला गेला: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

0
5

पुणे, प्रतिनिधी – “स्वातंत्र्याच्या शताब्दीनिमित्ताने सन २०४७ मध्ये जो विकसित भारत निर्माण होणार आहे, त्याचा अत्यंत मजबूत आणि भक्कम पाया गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रचला गेला आहे. भारताने जागतिक स्तरावर आपले स्थान अत्यंत भक्कम केले आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमानसेवा आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशस्वी तपपूर्तीनिमित्त (१२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल) पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर कार्यालयात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न नाना काटे, पुणे जिल्हा ग्रामीण (उत्तर) चे अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा ग्रामीण (दक्षिण) चे अध्यक्ष शेखर वढणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, सन २०१४ मध्ये देशातील जनतेने भाजप आणि एनडीए आघाडीवर विश्वास ठेवून स्पष्ट बहुमताची सत्ता दिली. ‘सबका साथ, सबका विकास’ या महामंत्रामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग १२ वर्षे देशाच्या सर्वोच्च पदावर कार्यरत राहिले. १० जून २०२६ रोजी सलग ४,९९३ दिवस पंतप्रधानपदावर राहण्याचा ऐतिहासिक विक्रम मोदी यांनी केवळ जनतेच्या अतूट विश्वासाच्या बळावर केला आहे. मागील १२ वर्षांत सरकारने केलेली अभूतपूर्व विकासकामे घेऊनच आम्ही आगामी काळात जनतेमध्ये जात आहोत.

अधिक वाचा  पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, सुप्रिया सुळेंची मोर्चात एन्ट्री; फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी

मोदी सरकारच्या १२ वर्षांतील प्रमुख घटनाक्रम:

आर्थिक महासत्ता आणि महागाई नियंत्रण:

भारताची अर्थव्यवस्था पूर्वी जगामध्ये ११ व्या स्थानावर होती, ती आता थेट ४ थ्या स्थानावर पोहोचली आहे. यूपीए सरकारच्या काळात महागाईचा सरासरी दर १० टक्के होता, तर मोदी सरकारच्या काळात तो सरासरी ५.१ टक्क्यांवर मर्यादित ठेवण्यात सरकारला यश आले आहे.

गरीबी निर्मूलन व लोककल्याणकारी योजना: 

देशातील सुमारे २५ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेच्या बाहेर आली आहे. विविध कल्याणकारी योजनांमुळे देशातील ५० टक्के जनता थेट शासकीय योजनांची लाभार्थी बनली असून, ८० टक्के जनतेला मोफत धान्य पुरवले जात आहे.

पारदर्शक कारभार आणि डीबीटी क्रांती:

काँग्रेसच्या काळातील भ्रष्टाचाराला आळा घालत मोदी सरकारने थेट लाभ हस्तांतरणच्या माध्यमातून तब्बल ५१ लाख कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत.

अधिक वाचा  पुण्यात गणेशोत्सवाआधी FDAची गुप्त माहितीतून बुधवार पेठ परिसरात धाड ४ ट्रक पनीर-खवा जप्त; सणासुदीच्या ॲक्शनने खळबळ!

पायाभूत सुविधांचा वेगवान विकास: 

देशात पूर्वी राष्ट्रीय महामार्ग उभारणीचा दर प्रतिदिन ११ किमी होता, तो आता दररोज ३४ किमी इतका वाढला आहे. रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण, वंदे भारत ट्रेनचा विस्तार आणि पायाभूत भांडवली खर्चात मोठी वाढ करण्यात आली आहे.

मेट्रो नेटवर्कचे जाळे:

 देशातील ५ शहरांमधील २४८ किमीचा मेट्रो मार्ग आता २३ शहरांमध्ये १ हजार ९३ किमीपर्यंत विस्तारित करण्यात आला आहे.

हवाई वाहतूक क्षेत्रातील मोठी झेप: 

१२ वर्षांपूर्वी देशात केवळ ७४ विमानतळे कार्यरत होती, आज त्यांची संख्या १६५ वर पोहोचली आहे. ‘उडान’ योजनेचा १.५ कोटी प्रवाशांनी लाभ घेतला असून, स्वस्त दरात खाद्यपदार्थ मिळण्यासाठी ‘उडान कॅफे’ सुरू करण्यात आले आहेत. उडान २.० अंतर्गत आणखी १२० नवीन स्थानांवरून सुमारे ४ कोटी प्रवाशांना याचा थेट फायदा होणार आहे.

डिजिटल क्रांती आणि वित्तीय समावेशन:

 जनधन योजनेंतर्गत देशात ५६ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत भारताने जगात क्रांती घडवून आणली असून जगातील सर्वाधिक आर्थिक व्यवहार आज भारतात होत आहेत.

अधिक वाचा  कोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे यांची ही तयारी अन् मुंबईतील आंदोलनाबाबत घेतला ”हा” मोठा निर्णय

संरक्षण स्वावलंबन व निर्यात: 

संरक्षण क्षेत्रासाठी पावणेसात लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकेकाळी संरक्षण साहित्याचा मोठा आयातदार असलेला भारत आज ९० हून अधिक देशांना संरक्षण साहित्याची निर्यात करत असून, ही निर्यात २३ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

शिक्षण आणि सहकार क्षेत्र: 

देशात आयआयटी आणि आयआईएमच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. तसेच देशात स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना करून देशाचा १/३ भाग सहकाराशी जोडला गेला आहे, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत आहे.

पुण्याच्या विकासासाठीचे विशेष प्रकल्प 

पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ५६ किलोमीटरचे भुयारी मार्ग निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच सुरू होणार असून, आगामी काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिक थेट मेट्रोने विमानतळापर्यंत प्रवास करू शकतील. पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल तयार झाले असून, धावपट्टी विस्तारीकरणासाठी ३१३ एकर जागा घेऊन काम वेगाने सुरू आहे. तसेच पुण्यासाठी १ हजार नवीन ई-बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत.