राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच ‘महायुती’मध्ये जागा वाटपावरून पडद्यामागे अत्यंत ‘जिकरीच्या’ राजकीय घडामोडी सुरू आहेत. पुण्याची हक्काची जागेची मागणी करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्याच्या नेतृत्वाचा झेंडा अजूनही ‘पवारां’च्याच हाती असल्याचे स्पष्ट करण्याचा ‘राष्ट्रवादी’चा अजेंडा असल्याचे सध्याचे चित्र आहे. महायुतीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे, रायगड आणि लातूर किंवा परभणी यापैकी एक अशा तीन जागांवर थेट दावा ठोकल्याची माहिती मिळत आहे.
सन २०२२पासून रिक्त राहिलेली पुण्याची ही जागा आपल्याकडेच राखण्यासाठी ‘राष्ट्रवादी’च्या हालचाली सुरू आहेत. पुण्यासह रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग, धाराशिव-लातूर-बीड आणि परभणी-हिंगोली या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला आहे. धाराशिव-लातूर-बीड आणि परभणी-हिंगोली या पैकी एकतरी जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. लातूरची जागा ही यापूर्वी भारतीय जनता पक्षाकडे, तर परभणाची जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’कडून या जागांवर दावा सांगण्यात आला असला, तरी त्यांना त्यात कितपत यश मिळेल, हा चर्चेचा विषय ठरणार आहे.
पुण्यातील नेतृत्वाचा लढा?
ज्येष्ठ नेते शरद पवारानंतर दिवंगत नेते अजित पवार यांनी सन २००७पासून पुणे शहराचे नेतृत्व आपल्या हाती घेतले होते. त्यांच्या निधनानंतर नेतृत्वाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पुण्याचे नेते असल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून तसे जाणीवपूर्वक प्रयत्न होत नसले, तरी विधान परिषदेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार पुण्यावर पकड घट्ट करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
‘राष्ट्रवादी’चा उमेदवार कोण असणार ?
माजी आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर योगेश बहल, माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव खासदार पार्थ पवार यांचे निकटवर्तीय विक्रम काकडे उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत आहेत. माजी आमदार अनिल भोसले निवडून आले, तेव्हा अखंड राष्ट्रवादी होती. पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी यापूर्वी सन २०१६मध्ये ७०२ मतदार होते. यंदा मात्र दोन्ही महापालिकांतील नगरसेवकांची संख्या वाढली असून, फुरसुंगी-उरुळी देवाची ही नवीन नगरपंचायत तयार झालेली आहे; त्यामुळे मतदारांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत मतदारयादी अंतिम झाली नसली, तरी ही संख्या ८२७च्या घरात आहे. त्यापैकी ७३४ मते ‘महायुती’कडे आहेत. त्यामुळे ‘महायुती’च्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे.











