‘माझ्या दोन बहिणी हिंमतीने लढत आहेत’, त्यांचा लढा भारतमातेसाठीच; उद्धव ठाकरेंचं दिल्लीत भावनिक भाषण

0
51

इंडिया आघाडीची दिल्लीत आज रामलीला मैदानावर महारॅली पार पडली. या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी भावनिक साद घातली. भ्रष्टाचाराच्या दोन वेगवेगळ्या आरोपांप्रकरणी देशातील दोन मुख्यमंत्र्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही अटक करण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांना अटकेपूर्वी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याच गोष्टींचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या आपल्या सर्वांच्या बहिणी आहेत. आपण सर्व त्यांच्यासोबत आहोत, असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. “ही निवडणूक रॅली नाही. आपल्या दोन बहिणी हिंमतीने लढत आहेत. बहिणी हिंमतीने लढत आहेत तर भाऊ कसा मागे राहील? त्यासाठीच आम्ही सर्व आलो आहोत. आमच्या दोन्ही बहिणी तुम्ही (कल्पना सोरेन आणि सुनीता केजरीवाल) चिंता करु नका. देश तुमच्यासोबत आहे”, अशी भावनिक साद उद्धव ठाकरे यांनी घातली.

अधिक वाचा  मोदी मंत्रिमंडळ ‘ओव्हरहॉलिंग’ दिग्गजांना डच्चू 16-17 संधीची चर्चा; 2027 आणि 2029चे निवडणुकांचे गणित

“देशात जी स्थिती आहे त्याबाबत मी बोलू इच्छित नाही. काही दिवसांपूर्वी शंका वर्तवली जात होती की, आपला देश हुकूमशाहीच्या दिशेला तर चालला नाही ना? पण आता ती शंका राहिली नाही. आता ते वास्तव आहे. भाजप सरकारला वाटत असेल की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली तर लोक घाबरुन जातील. पण त्यांना आजपर्यंत माहिती नसेल की, त्यांनी अजून देशवासीयांना ओळखलेलं नाही. माझ्या भारताचा प्रत्येकजण घाबरणारं नाही तर लढणारं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंचं भाजपला चॅलेंज

“आम्ही जसं इंडिया आघाडी बनवून एकत्र आलो आहोत तसं भाजपात हिंमत असेल तर त्यांनी आपल्या बॅनरवर आमच्यासोबत ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स असा उल्लेख करुन दाखवावा. आम्ही किती दिवस त्यांच्यावर टीका करायची. आता तर त्यांचं स्वप्न 400 पारचं आहे. मी संपूर्ण देशाला आवाहन करु इच्छितो, एक व्यक्ती आणि एका पक्षाचं सरकार देशासाठी धोकादायक ठरत आहे. हे चालणार नाही. मी देशातील नागरिकांना आवाहन करतो, देशातील सर्व राज्यांचा सन्मान करणारं सरकार आपल्याला हवं आहे. सर्वांसोबत मिळून मिसळून राहणारं सरकार हवं आहे. आपण असं सरकार आणलं तरच देश वाचू शकतो”, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

अधिक वाचा  भाजप सत्ताधारी तरी प्रशासकीय अंकुश नाही वर्गीकरणाचा वादंग अधिकाऱ्यांची पाठराखण थांबवा मुख्य पदाधिकाऱ्यांवर नाराजी

“आम्ही सर्वजण इथे निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेलो नाहीत तर लोकशाहीच्या संरक्षणासाठी आलो आहोत. हे कसं सरकार आहे? अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप केला आणि जेलमध्ये टाकलं. हेमंत सोरेन यांच्यावर आरोप केला आणि जेलमध्ये टाकलं. ही कोणती पद्धत आहे?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच वॉशिंगमशीनमध्ये टाकून…’

“भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांनाच भाजपने वॉशिंगमशीनमध्ये टाकून स्वच्छ धुवून आपल्या मंचावर आणलं. मग आपण यावर विश्वास ठेवू शकतो? देशात जितके भ्रष्ट लोकं आहेत त्या सर्वांना एकत्र आणून भाजप देशात विकास करणार आहे? त्यांच्या या सर्व गोष्टी खोट्या आहेत. भाजपने आजच्या रॅलीला ठगांची मेळावा म्हटलं आहे. तुम्ही सर्व ठग आहात?”, असा सवाल ठाकरेंनी केला.

अधिक वाचा  गणितज्ञ प्रा. भापकर यांना काश्मीरमध्ये ‘उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ’ पुरस्कार

ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन

“काही दिवसांपूर्वी उत्तर भारताचे सर्व शेतकरी दिल्लीत येऊ इच्छुक होते. पण त्यांना येऊ दिलं नाही. त्यांच्या रस्त्यांवर खिळे टाकले होते. त्यांच्यावर अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडल्या, लाठीचार्ज केला. मी तरीही देशाच्या शेतकऱ्यांना आवाहन करतो. तुम्ही अन्नदाता आहात. अन्नदाता देवो भव: अशी आपली संस्कृती आहे. जे सरकार शेतकऱ्यांना अतिरेकी मानतं, जे सरकार शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यास रोखतं, या सरकारला शेतकऱ्यांनी दिल्लीत येण्यापासून आता रोखलं पाहिजे. मी आपल्याला आवाहन करतो तुम्ही जिथून आला आहात तिथे जावून गावागावात ‘अब की बार भाजप तडीपार’ असा नारा द्या. हुकूमशाही करणारं सरकार आम्हाला पुन्हा दिल्लीत येऊ द्यायचं नाही, अशी शपथ घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.